माझ्या आयुष्यातील आजवरच्या कडू-गोड आठवणी मी "पूर्वानुभव" म्हणून सादर करत आहे.
आपण इथे आल्याबद्दल मन:पूर्वक धन्यवाद!

२ फेब्रुवारी, २००७

ते रम्य दिवस!भाग १.

मला १९७२ साली नोकरी लागली. मी जेव्हा भरती झालो तेव्हा माझ्याबरोबरच शिकलेले अजून ४ जण देखिल काही दिवसांच्या फरकाने तिथेच भरती झाले.
ह्यामध्ये मी,गजेंद्र,प्रतोद,जोसेफ आणि यशवंत असे पाच आणि सीताराम व सदानंद असे दुसरे दोघे मिळून ७ जणांचा गट प्रस्थापित झाला. ह्या सर्वांच्यात मी वयाने आणि शारीरिक दृष्ट्या लहान होतो.

गजेंद्र उर्फ गजा म्हणजे एक वल्ली होता. ह्याचा बाप(तो वडिलांचा उद्धार असाच करत असे) कुठल्याशा इंग्लिश कंपनीत साहेब होता. त्यामुळे त्यांच्या घरातल्या कपाटात इंग्लिश दारूच्या बाटल्या भरलेल्या असायच्या. बाबासाहेब नियमित मद्यप्राशन करत. त्यांचेच बघून हा गजा देखिल त्यांच्या अनुपस्थितीत चोरून आचमनं करत असे. बोलाचालायला एकदम मोकळाढाकळा असा हा अवलिया पैशाच्या बाबतीत अत्यंत व्यवहारी होता.

प्रतोदला आम्ही सगळेजण पदू असेच म्हणत असू. जातीने कोब्रा असून देखिल खाण्यापिण्याची कोणतीच बंधन न पाळणारा हा प्राणी अत्यंत कुशाग्र बुद्धीचा होता पण इंग्लिश बोलण्यात मार खायचा त्यामुळे पुढे आला नाही. जी गोष्ट इंजिनियरिंगची पदवी घेतलेल्या माणसांना समजायला कठीण असे ती ह्याला चुटकीसरशी समजत असे. जगाच्या दोन पावले पुढे असणारा हा प्राणी वरिष्ठांना देखिल तंत्रज्ञानातील बारकावे अतिशय सहजतेने त्याच्या खास इंग्लिशमध्ये समजावून देत असे. तरीदेखील(त्याच्या भाषेच्या अज्ञानाकडे डोळेझाक करून) त्याला सगळेजण मानत. ह्याचे शरीर इतके लवचिक होते की खुर्चीच्या हातातून तो सहज आतबाहेर होत असे(हातवाल्या स्टीलच्या खुर्च्या ज्यांची बैठक आणि पाठ लाकडी चौकटींची व वेताने विणलेली असे).

जोसेफला तरुण वयातच टक्कल पडायला सुरुवात झाली असल्यामुळे आम्ही त्याला अंकल म्हणत असू. हा नेहमीच स्वत:च्या विचारात गुरफटलेला असे. ह्याला गिटार आणि स्टिरिओ अँप्लिफायर(त्यावेळी हे तंत्रज्ञान भारतात नवीनच आले होते) ह्यांचे जबरदस्त आकर्षण होते. बेस गिटार वाजवत तो अतिशय खर्जात जेव्हा ती इंग्लिश क्लासिकल गाणी म्हणायचा तेव्हा ऐकत राहावेसे वाटे.

यशवंत उर्फ यश हा जबरदस्त थापेबाज प्राणी होता. त्याच्या कैक थापा इतक्या बेमालून मारलेल्या होत्या की मी बरीच वर्षे त्या सर्व गोष्टी खर्‍याच धरून चालत होतो.

सीताराम उर्फ दादा(त्यावेळी तो खरोखरीचा दादा होता) म्हणजे एक अजब रसायन होते. १०० किलोच्यावर वजन,रात्रीची जरा जास्तच झालेली(आज पर्यंत दारूच्या थेंबाला देखील स्पर्श केलेला नाही) असावी असे तारवटलेले लालबुंद डोळे, ढगळ पँट,तितकाच ढगळ पूर्ण हातांचा शर्ट,सोन्याची कपलिंग,बटणं आणि आवाज जाडाभरडा. बोलताना शिव्यांचा सढळ वापर आणि खिशात रामपुरी(एकदा साहेबाला काढून दाखवला होता...‌साहेब गार!!!!). पण कामात तरबेज .

सदानंद अतिशय सभ्य आणि साधा‍. आपण आणि आपले काम ह्या व्यतिरिक्त जास्त कुठल्या भानगडीत नसायचा. हसणं मात्र गदगदून असायचे.

आणि मी. मला सगळे बाप्पा म्हणत. मी बडबड्या,फिरक्या घेणारा आणि माझ्या विषयात बर्‍यापैकी प्रवीण होतो. शारीरिक दृष्ट्या कमकुवत असल्यामुळे कधी कधी मार देखील खायचो; पण तो पचवून पुन्हा फिरक्या घ्यायला तयार असायचो त्यामुळे हळू हळू इतरांना त्याची सवय झाली.

सुरुवातीला मी आणि दादा एकमेकांशी अगदी मोजकेच बोलायचो. दादाच्या दृष्टीने मी भट म्हणजे जंटलमॅन. अशा माणसाशी आपून कसा बोलनार?
दादा जातीने आग्री. नैसर्गिकच मत्स्याहारी आणि मांसाहारी होता. त्याचा जेवणाचा डबा म्हणजे चार-पाच लोकांचे जेवण असे. मी एकटा वेगळा जेवायला बसायचो (पूर्ण शाकाहारी आणि अभक्ष्यभक्षणाची नावड)आणि ते सहाजण एकत्र जेवत.
साहजिकच माझ्यात आणि त्यांच्यात एक अदृश्य अशी लक्ष्मणरेषा आखली गेली की ज्यामुळे मी थोडासा वेगळा पडलो आणि दादा व माझ्यामध्ये तशी खास मैत्रीभावना निर्माण झाली नाही. गजा आणि दादा हे एकमेकांचे घट्ट मित्र झाले.
मलाही त्याचे विशेष काहीच वाटले नाही कारण मी त्यांच्यासारखा वागू शकणार नव्हतो. पहिल्यापासूनच माझे धोरण याल तर तुमच्यासह नाहीतर तुमच्याशिवाय ह्या सावरकरांच्या धोरणासारखे होते.

ह्या सर्वांच्यात आणखी एकाची भर पडली. ह्याचे नाव लुडविग पण ह्याला घरचे लोक चिंटू म्हणत म्हणून आम्ही देखिल तसेच म्हणायला लागलो. दिसायला रानवट. भाषा शिवराळ. तरबेज मुष्टीयोद्धा आणि येताजाता ह्याला हाण त्याला धर असे चालायचे. त्यामुळे त्याला मी आणि दादा सोडले तर सगळे घाबरून असत.पहिल्यापासूनच मी उगीचच कोणाला कधी घाबरलो नाही(अरे मुष्टीयोद्धा असलास तर घरचा असे मनातल्या मनात म्हणत). दादा आणि तो बरेच दिवस एकमेकांना नजरेने जोखत होते आणि बघता बघता एकदिवस ते दोघे एकमेकांना भीडले. आमच्या सारख्या चिल्लर लोकांची शामतच झाली नाही त्यांच्या मध्ये पडायची; पण तेव्हढ्यात मी हळूच ओरडलो,"ए,साहेब आले", आणि घाईघाईत सगळेजण पांगले.

त्यानंतर ते दोघे संधी शोधत होते एकमेकाना भिडायची पण कशी कुणास ठाऊक मला एक युक्ती सुचली. मी त्या दोघांना एकेकटे गाठून (लांबूनच)एकमेकांबद्दल भलावण करणार्‍या चारदोन खोट्या गोष्टी सांगितल्या आणि त्यांच्यात मैत्री झाली(मला आपापसातील मैत्रीचे वातावरण गढूळ होऊ द्यायचे नव्हते). मी मात्र नामानिराळा राहिलो, आपण त्या गावचेच नाही असे दाखवले.
त्यानंतर माझ्याबद्दल त्यांच्या मनात एक कृतज्ञतेची भावना जागृत झाल्याचे त्यांच्या वागण्यातून दिसायला लागले. तरीदेखिल मी चार हात अंतरावरच रहायचे पसंत केले.

४ टिप्पण्या:

जयश्री म्हणाले...

सुरेख ओघवती भाषा, अकृत्रिम आणि निखळ विचार, खुमासदार शैली ह्याचा अनोखा संगम म्हणजे तुमचं लिखाण! तुमच्या लिखाणाचा फ़ुलोरा असाच फ़ुलत राहो!

जयश्री

Sudhir म्हणाले...
ही टिप्पणी लेखकाना हलविली आहे.
mukteshwar kulkarni म्हणाले...

kaka mast !

प्रमोद देव म्हणाले...

धन्यवाद, जयश्री,सुधीर आणि मुक्तेश्वर!