माझ्या आयुष्यातील आजवरच्या कडू-गोड आठवणी मी "पूर्वानुभव" म्हणून सादर करत आहे.
आपण इथे आल्याबद्दल मन:पूर्वक धन्यवाद!

३ ऑक्टोबर, २०१५

गांधीजयंतीच्या निमित्ताने...

मंडळी, काल गांधी जयंती झाली...त्यानिमित्ताने पुन्हा एकदा जे उलटसुलट अशा राजकीय विचारांचे वादळ ह्या जालीय जगात उठले ते सर्व पाहून कधी नव्हे ते खूपच अस्वस्थ झालो आणि त्यानंतर आत्मचिंतन करण्यास प्रवृत्त झालो....कधीकाळी मीही असाच, वाहवत जायचो.....पण हे योग्य नव्हे ह्याचे आता नक्कीच भान आलेले आहे.....तुम्हीही वाचा आणि विचार करा...


गांधीजी-सावरकर-आंबेडकर आणि अशाच मोठ्या लोकांकडून आपण जर काही शिकायचं असेल तर ते म्हणजे ह्या देशाबद्दलचं त्यांचे निस्सीम प्रेम...देश स्वतंत्र व्हावा म्हणून त्यांनी वेगवेगळे मार्ग जरी चोखाळले असले तरी त्यांचे उद्दिष्ट मात्र एकच होते..मला वाटतं, आज कुण्या एकाला नायक आणि इतरांना खलनायक बनवून आपण नेमकं हेच विसरून जातोय की हे जे स्वातंत्र्य,स्वराज्य आपल्याला त्यांच्या त्यागामुळे, लढ्यांमुळे आणि कष्टांमुळे मिळालंय त्याचा आपण अनादर करत आहोत...कोण श्रेष्ठ, कोण कनिष्ठ ह्या वादात न पडता, सगळेच आपल्यासाठी वंदनीय आहेत हे आपण लक्षात घ्यायला हवे आहे आणि आपल्याला मिळालेलं हे स्वराज्य, सुराज्य कसे करता येईल ह्याचा गांभीर्याने विचार करून त्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करायला हवेत....

नेता झाला तरी तोही माणूसच असतो आणि गुणावगुण सगळ्यांच्यातच असतात...आपण फक्त त्यांच्यातल्या आपल्याला आवडलेल्या गुणाचे/गुणांचे आपल्या कुवतीप्रमाणे आचरण करायचा प्रयत्न केला तरी त्यांचा योग्य तो सन्मान होईल...त्यासाठी जयंत्या/मयंत्या साजर्‍या करण्याचा देखावा करणे जरूरी नाही...त्यांना देवत्त्व बहाल करण्याची किंवा त्यांची स्मारकं, पुतळे उभारण्याची गरज नाहिये...त्याऐवजी आपण त्यांच्यातला एक जरी गुण आपल्यात बाणवण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न केला तरी ह्या देशाचे भवितव्य बदलून जाईल आणि तीच खरी ह्या समस्त महान लोकांच्या कार्याची पावती असेल...

थोडंसं वैयक्तिक...

माझे वडिल गांधीजी आणि सावरकर ह्या दोघांच्या विचाराने प्रभावित झाले होते...गांधीजींकडून त्यांनी स्वावलंबन, सत्यप्रियता, साधेपणा, काटकसरीपणा  इत्यादि गुण उचलले होते आणि सावरकरांच्या प्रेरणेने ते दुसर्‍या महायुद्धाच्या काळात भारतीय सैन्यात दाखल होऊन आपले राष्ट्रीय कर्तव्य बजावून आले होते....


वडिलांच्यातले बरेचसे गुण माझ्यातही आलेत....तरीही माझ्या तरूणपणात मी अतिशय बोलभांड होतो, बर्‍याचदा, उचलली जीभ लावली टाळ्याला अश्या प्रकारे..आपली लायकी विसरून, न्यायाधीशाच्या आवेशात एखाद्याला नायक आणि दुसर्‍याला खलनायक ठरवून मोकळा होत असे...काहीच अभ्यास नसतांनाही, तुटपुंज्या वाचनाच्या आधारे आपली राजकीय मतं ठामपणे व्यक्त करत होतो...त्यात ठामपणापेक्षाही दुराग्रहच जास्त होता..हे आज कळतंय...माझ्या पिढीतल्या बर्‍याच जणांची थोड्याफार फरकाने बहुदा हीच अवस्था असावी आणि म्हणूनच मला असं वाटतंय की स्वातंत्र्यानंतर इतक्या वर्षांनीही आपण समाज म्हणून एकत्र होऊ शकलो नाही...त्याच्या मुळाशी ही माझ्या/आमच्यासारखी बहुसंख्य अशी वाचाळ, निष्क्रिय अशी सर्व थरातील अर्धवट मंडळी असावीत...आमच्या ह्या वाईट अनुभवांतून ह्या नव्या पिढीने जर काही शिकायचे असेल तर...न्यायाधीश बनायचे सोडा...प्रत्येक गोष्टीचा निष्कारण कीस काढणे सोडा...गतगोष्टीचे शवविच्छेदन करणे थांबवा आणि थोडेसे क्रियाशील व्हा, देशाच्या प्रगतीसाठी मारक होतील अशा गोष्टींपासून जाणीवपूर्वक चार हात दूर राहा..मतभेद जरूर व्यक्त करा पण मनभेद होतील इतके ताणू नका....

थोरामोठ्यांना आपण खरोखरच मानत असाल तर इतके जरूर कराच...
आमची पिढी वाया गेली...तुमची आणि पुढील पिढ्या वाया जाऊ नयेत इतकीच माफक अपेक्षा!
जयहिंद!