माझ्या आयुष्यातील आजवरच्या कडू-गोड आठवणी मी "पूर्वानुभव" म्हणून सादर करत आहे.
आपण इथे आल्याबद्दल मन:पूर्वक धन्यवाद!

३० डिसेंबर, २०१०

चाल शंभरीच्या निमित्ताने!

मंडळी,मला सांगायला आनंद होतोय की ’त्यांची कविता माझे गाणे’ ह्या माझ्या जालनिशीवर चढवलेल्या चालींचं शतक पूर्ण झालंय. ह्या निमित्ताने मागे वळून पाहतांना काही गोष्टींचा पुन्हा एकदा उल्लेख करणे जरूरीचे आहे.
सर्वप्रथम, मी हे सांगू इच्छितो की कवितांना चाली लावण्याचा छंद मला शालेय जीवनापासूनच होता. मात्र त्यावेळी चाल लावली आणि विसरली असेच होत असे,कारण ध्वनीमुद्रणाचे कोणतेही साधन उपलब्ध नव्हते. त्यामुळे चाली लावल्या तरी त्या राखून ठेवता आल्या नाहीत...पण छंद सुरुच होता.

असेच एकदा महाजालावर वावरतांना, एक संगीतकार श्री.विवेक काजरेकर ह्यांच्याशी माझा परिचय झाला आणि मग सुरु झाला माझ्या चालींच्या ध्वनीमुद्रणाचा सिलसिला...ह्याबद्दल सविस्तर मी माझ्या हे गजवदना ह्या पहिल्या चालीसंबंधी लिहितांना लिहिलंय तेव्हा इथे तेच सगळं सांगत बसत नाही.

चाली रचल्यावर सुरुवातीला बरेच चांगले,गंमतीशीर अनुभव आले; त्याबद्दलही आधी लिहून झालंय...पण एक सांगतो की सुरुवातीला माझ्या चाली ऐकणार्‍या आणि प्रतिसाद देणार्‍या श्रोत्यांची संख्या हळूहळू कमी होत गेली.श्रोतेच कशाला, बर्‍याचदा अगदी कवी/कवयित्रींकडूनही फारसा प्रतिसाद नाही मिळाला. इथे प्रतिसाद चांगला/वाईट असा दोन्ही असला तरी अपेक्षित आहे...पण तो ही मिळणे कमी झाले.रोजच्या गप्पांमधले कैक जण तर मला चक्क टाळायला लागले. ;) तर काही नवे श्रोतेही लाभले ! तरीही मी हटलो नाही.

इथे एक गोष्ट स्पष्ट करतो की चाली मी कुणाला छळण्यासाठी किंवा कुणावर;विशेष करून कवी जातीवर बदला घेण्यासाठी लावत नाहीये. :D
चाल लावणे हा माझा छंद आहे,विरंगुळा आहे. त्यामुळे माझे तत्व एकच...कुणी निंदा,कुणी वंदा,मी जोपासतो चाली लावण्याच्या छंदा!
आता चाल लावली म्हटल्यावर ती कुणी तरी ऐकावी अशी इच्छा तर असतेच... आमचे मित्र काजरेकरसाहेब प्रत्येक नवी चाल आवर्जून ऐकतात आणि त्यावर खाजगीत अभिप्रायही देतात/सुधारणा सुचवतात . माझ्या चाली आवर्जून ऐकणारी त्यांच्यासारखी दुसरी व्यक्ती ह्या महाजालावर शोधूनही सापडणार नाही.

मी आजवर लावलेल्या कैक चाली ह्या निश्चितच श्रवणीय आणि लोकप्रिय होण्यासारख्या आहेत हे मी आत्मस्तुतीचा दोष पत्करूनही सांगेन.;पण त्याच बरोबर हेही सांगतो की माझ्या आवाजाच्या,गाण्याच्या मर्यादा अशा प्रमूख दोषांमुळे माझ्या चाली नेमकेपणाने श्रोत्यांपर्यंत पोचू शकत नाहीत.ह्यात भरीस भर म्हणजे मी ह्या चाली कोणत्याही संगीत साजाशिवाय गात असल्यामुळे श्रोत्यांना त्या शुष्क वाटतात...हे म्हणणे मला स्वत:लाही पटतं;पण दूर्दैवाने मला कोणतंही वाद्य वाजवता येत नसल्यामुळे आणि माझ्या मित्र परिवारात कुणीच असे संगीत साथ करणारे नसल्यामुळे माझ्या गाण्यावर मर्यादा येतात.

माझ्या चालींवर एखाद्या जाणत्या व्यक्तीकडून काही संस्कार झाले तर त्या कशा श्रवणीय होऊ शकतात ह्याचे दोन नमुने मी इथे देत आहे.

१)आषाढाचा मास:कवयित्री:प्राजु:; गायक आणि संगीत संयोजक: विवेक काजरेकर




२)मेघ आषाढाचा गर्जे:कवी:राघव; गायक आणि संगीत संयोजक: विवेक काजरेकर




आता माझी अशी अपेक्षा आहे की ज्या व्यक्तींना खरोखरच माझ्या चाली आवडत असतील/आवडल्या असतील आणि त्यांच्यापैकी कुणी स्वत: गायक/गायिका असल्यास त्यांनी अशी एखादी माझी चाल त्यांच्या आवाजात ध्वनीमुद्रित करून पाठवावी.जर कुणाला ह्या चालींवर काही सांगितिक संस्कार करायचे असतील तर ते जरूर करू शकतात...कारण मी हे सगळे जे काही करतो आहे ते केवळ हौस,छंद म्हणून..ज्यात कोणत्याही प्रकारचा आर्थिक व्यवहार नाहीये...मी ज्या कवी/कवयित्रींच्या कवितांना चाली लावतो त्यांना ना मी किंवा ना ते...कुणीही कुणाला पैसे देत नसतो...हा निव्वळ हौसेचा मामला आहे. तेव्हा,जर कुणाला ह्या छंदात,हौसेत सामील व्हायचे असेल तर जरूर या,त्यांचे स्वागतच होईल.

आता चालींची शंभरी झाली(आणि श्रोत्यांच्या कानाचीही...कोण कोण पुटपुटतंय ते? ;) ) मग पुढे काय?
पुढे काय म्हणजे? ह्यापुढेही चाली लावणं सुरुच राहणार आहे....
कुणीतरी मला गंमतीनं म्हणालंय...तुम्हाला एक जीवनगौरव पुरस्कार देऊन टाकूया....म्हणजे चाली लावणं आपोआप बंद होईल. :D
पुरस्कार काय मला हवे तेवढे मिळतील हो,पण मीच नको म्हणतोय. ;)
माझा खरा पुरस्कार म्हणजे चाली लावण्यातला आनंद...तो मला रोजच मिळतो! :)

२० डिसेंबर, २०१०

शब्दगाऽऽरवा २०१० चे प्रकाशन!

मंडळी, शब्दगाऽऽरवा २०१०चे आज आम्ही प्रकाशन करत आहोत. ह्या अंकासाठी सर्वस्वी मेहनत घेणार्‍या श्रेया रत्नपारखीचे विशेष कौतुक आहे. प्रत्येकवेळी काही तरी नवं द्यायचं ह्या तिच्या ध्यासापायी अंकाचं दर्शनी स्वरूप दिवसेंदिवस आकर्षक होत चाललंय. पडद्याआडून तांत्रिक मदत देणार्‍या कांचन कराई,देवदत्त गाणार आणि दीपक शिंदे ह्यांचेही खास आभार .

ह्या अंकापासून आम्ही एक नवा पायंडा राबवत आहोत...संपादकीय, हे आमच्या अंकातील एखाद्या लेखकानेच लिहावे अशा हेतूने ह्यावेळी आम्ही संपादकीय कोण लिहीणार असे आवाहन केले होते त्याला चेतन गुगळे ह्याने संमती दिली आणि मला सांगायला आनंद होतोय की त्याने ही जबाबदारी अतिशय उत्तमरीत्या पार पाडलेली आहे.

ह्या वेळचा अंक आपल्या लेखन/वाचन इत्यादिंनी साकारणारी मंडळी आहेत.... अपर्णा लळिंगकर,अपर्णा संखे-पालवे,
अलका काटदरे,आनंद काळे,कामिनी फडणीस-केंभावी (श्यामली),क्रान्ति साडेकर,गंगाधर मुटे,चेतन गुगळे,जयंत कुलकर्णी,
जयंत खानझोडे,जयबाला परूळेकर,जीवनिका कोष्टी,देवदत्त गाणार,देवेंद्र चुरी,नरेंद्र गोळे,पाषाणभेद (दगडफोड्या),
प्रभाकर फडणीस,प्रा.डॉ.दिलीप बिरुटे,मंदार जोशी,महेंद्र कुलकर्णी,मीनल गद्रे,राहुल पाटणकर (राघव),विद्याधर भिसे,
विनायक पंडित,विनायक रानडे,विशाल कुलकर्णी,समीर नाईक,सुधीर कांदळकर,सुरेश पेठे,सोमेश बारटक्के,हेरंब ओक .

तर मंडळी आता व्हा तयार ह्या अंकाची लज्जत चाखायला.त्यासाठी http://hivaliank2010.blogspot.com/ ह्या दुव्यावर टिचकी मारा.

७ डिसेंबर, २०१०

प्रेम!

प्रेमाबद्दलची काही गाणी एकत्र करून ती ह्यात गुंफलेत..ऐकून सांगा, आवडतंय का?

२२ नोव्हेंबर, २०१०

हिवाळी अंक २०१० संबंधीचे निवेदन!

दिवाळी अंकानंतर आता आपल्याला वेध लागलेत हिवाळी अंकाचे. आपल्या जालरंग प्रकाशनाच्या हिवाळी अंकाचे हे दुसरे वर्ष आहे.

लेखनाचे विषय असे असतील... राजकीय/अराजकीय/सामाजिक/सांगितिक/ललित/प्रवासवर्णन/पुस्तक-परीक्षण/चित्रपट-नाटक परीक्षण/कथा/कविता/गजल/कविता-गजल रसग्रहण/विडंबन/इत्यादि . त्याच बरोबर ध्वनीमुद्रण(अभिवाचन.. कविता अथवा लेखाचे),ध्वनीचित्रमुद्रण,छायाचित्रण आणि व्यंगचित्र अशा प्रकारचं साहित्यही ह्या अंकात समाविष्ट केलं जाईल.

लेखन पाठवण्याची शेवटची तारीख १७ डिसेंबर २०१० अशी आहे. लेखनासोबत छापण्यासाठी आपले छायचित्रही जरूर पाठवावे. नाताळच्या आसपास हा अंक प्रसिद्ध करण्याचा मनसुबा आहे.
केवळ नवे/ताजे लेखन ह्या अंकासाठी पाठवावे. ह्या अंकासाठी पाठवलेले लेखन इथे प्रसिद्ध होईपर्यंत कृपया दुसरीकडे कुठेही प्रकाशित करू नये. योग्य वेळेत लेखन पाठवणार्‍या प्रत्येकाचे लेखन ह्यात समाविष्ट करण्यात येईल. संपादन कात्री/निवड निकष वगैरे असे कोणतेही बंधन राहणार नाही.


साहित्य कसे पाठवावे?
१) लेखी साहित्य एचटीएमएल अथवा डॉक्युमेंट सदरात पाठवावे...पीडीएफ स्वरूपात नको.
२) आपल्या साहित्यासोबत जर काही छायाचित्रं असतील तर ती वेगळी जोडावीत(अटॅचमेंट).
३)ध्वनीमुद्रणं...एम्पी३ प्रकारात, ध्वनीचित्रमुद्रणं .flv किंवा .avi स्वरूपात पाठवावीत.
४)छायाचित्र jpeg, png, gif, tiff ह्या प्रकारात असावीत.


ह्या अंकाबाबत काही सुचना असल्यास अवश्य कळवाव्या...त्यांचे स्वागतच होईल.
लेखन पाठवण्यासाठीचा पत्ता:
attyaanand@gmail.com
लेखन पाठवताना हिवाळी अंक २०१० असे लिहून पाठवावे.

चला तर मग आता लागा कळफलक बडवायला. कथा,कविता,लेख वगैरे जे हवे ते लिहा आणि पाठवा.

३० ऑक्टोबर, २०१०

पुरूषांचा डबा!

स्त्री-पुरुष भेद हा निसर्गानेच निर्माण केलाय. पुरुष शारीरिक दृष्ट्या बलवान असतो तर स्त्री मानसिक दृष्ट्या बलवान असते.त्यामुळे खरंतर त्यांच्यात सर्वथा समानता असू शकणार नाही हे खरंय...पण काहीएक मर्यादेपर्यंत तरी ती तशी मानता यायला काहीच हरकत नाही कारण स्त्रियाही आता फारशा मागे नाहीत. बौद्धिक,शैक्षणिक बाबींबरोबरच त्या आता जिथे शारीरिक कस लागतो अशा पोलिस,सैन्यदल वगैरे ठिकाणींही नित्यनेमाने दिसू लागलेल्या आहेत. पुरुषांचीच मक्तेदारी समजल्या जाणार्‍या सगळ्या क्षेत्रात आता त्यांनीही भरारी मारायला सुरुवात केलेली आहे. ह्याच जोरावर आता त्या स्त्री-पुरुष समानता मागत आहेत...कैक गोष्टींत ती तशी अनुभवायलाही मिळतेय पण तरीही काही बाबींमध्ये स्त्रियांचा युक्तिवाद कसा चुकीचा असू शकतो हे एका उदाहरणावरून दिसून येईल. खरं सांगायचं तर हा दोष केवळ स्त्रियांचाच नाही तर पुरूषही त्या युक्तिवादाचा जसा प्रतिवाद करतात तेही तेवढेच चुकीचे आणि हास्यास्पद आहे...ते उदाहरण म्हणजे...रेल्वेतील पुरुषांचा डबा. स्त्री-पुरुष वादात नेहमीच सामील होणारे लोक हा ’पुरुषांचा डबा’ कुठून आणतात हे मला तरी आजवर पडलेले कोडे आहे.

केवळ स्त्रियांसाठी,सर्व वेळ स्त्रियांसाठी... असे शब्दप्रयोग असलेले आणि स्त्रीचे चित्र असलेले डबे आपण स्थानिक आणि दूर पल्ल्याच्या रेल्वे गाड्यातून नेहमीच पाहत असतो; पण केवळ पुरुषांसाठी,सर्व वेळ पुरुषांसाठी असा एकतरी डबा रेल्वेत आहे का?...ह्याचा विचार चांगले सुशिक्षित आणि सुसंस्कृत स्त्री-पुरुषही करू शकत नाहीत हे पाहून माझी तर खूपच करमणूक होते.

आता मी जेव्हा म्हणतो की केवळ पुरुषांसाठी असे डबे नसतात...मग स्त्रियांसाठी राखीव डबे सोडले तर इतर डब्यात...जे सर्वसाधारण डबे आहेत...ह्यात स्त्री-पुरुष असे कुणीही प्रवास करू शकतात...अशा ठिकाणी पुरुषांची गर्दी का दिसते? अहो, त्याचे कारण खूपच साधे आहे. प्रवास करणार्‍या पुरुषांची संख्या ही प्रवासी स्त्रियांपेक्षा खूपच जास्त आहे म्हणून हे घडते.पुरुषांच्या अंगी नैसर्गिक असणार्‍या शारीरिक बलाचा त्रास स्त्रियांना सोसत नाही म्हणून त्या अशा सर्वसाधारण डब्यातून सहसा प्रवास करत नाहीत...त्यामुळे झाले काय? पुरूषांना आणि स्त्रियांनाही वाटायला लागलं की हा डबा/हे डबे केवळ पुरुषांसाठीच आहेत...म्हणून वाद-विवादात नेहमी पुरुषांचा डबा असाच वाक्प्रचार वापरला जातो...जो सर्वथैव चुकीचा आहे. आता दुसरी बाजू पाहू...ज्या डब्यातून कायद्याने केवळ महिलाच प्रवास करू शकतात त्यात पुरुषांना प्रवास करण्यास मज्जाव आहे...म्हणून ते इतर डब्यात गर्दी करतात....हसलात ना! माझे विधान तुम्हाला गंमतीशीर वाटेल...पण ते वास्तव आहे. अहो पुरुष प्रवाशांचीच नव्हे तर एकूणच आता स्त्री-पुरुष प्रवाशांची संख्या बेसुमारपणे वाढायला लागल्यामुळे गाड्यांना होणारी गर्दीही अनियंत्रित आहे त्यामुळे हे वाद नेहमीच उद्भवतात. आता स्त्री-प्रवाशांची संख्याही वाढायला लागलेय...तर त्यांनी अजून काही राखीव डबे आम्हाला हवेत अशी मागणी करणे हे एकवेळ समजू शकते...पण पुरुषांना इतके सारे डबे आणि बायकांना फक्त एकच का? असा चुकीचा सवाल करू नये. कारण स्त्रियांसाठीच्या राखीव डब्यातून त्या जसा हक्काने(अर्थात पुरुषांपासून सुरक्षित)प्रवास करू शकतात तसाच हक्काने इतर डब्यातूनही प्रवास करू शकतात...त्यात त्यांना कायदा कधीच आड येत नसतो...त्या उलट स्त्रियांसाठीच्या राखीव डब्यातून
पुरुषाने प्रवास केला तर तो बेकायदेशीर समजून त्याला दंड/कारावास होऊ शकतो....तेव्हा हे लक्षात घ्या...स्त्रियांसाठी संपूर्ण गाडी मोकळी असते..तसे पुरुषांना नसते...

असाच एक विरार लोकलचा मजेशीर अनुभव आहे माझ्या गाठीशी....पश्चिम रेल्वेवर गाडीला जो बायकांचा दुसर्‍या वर्गाचा अर्धा डबा असतो(पहिल्या दर्जाच्या डब्याला जोडून) तो एका विशिष्ट गाडीला सामान्य डबा म्हणून जोडलेला आहे....एकदा काही कामानिमित्त मी चर्चगेटहून दहिसरला जाण्यासाठी जी विरार लोकल पकडली...ती गाडी नेमकी हीच होती....आणि मी त्याच डब्यात चढलो होतो...अगदी बाहेर कोणतेही ’केवळ बायकांसाठी’ असे न लिहिलेले पाहून. पण सवयीने सगळ्या बायका त्यात भराभर चढायला लागल्या..आणि मला गुरकवायला लागल्या..लाज नाही वाटत का तुम्हाला? सरळ सरळ बायकांच्या डब्यात चढलात ते....त्यांचा तो रुद्रावतार पाहून माझ्यासारखे आणखी काही तुरळक पुरुष चढले होते त्यांनी लगेच पलायन केलं....मी मात्र तिथेच बसून राहिलो आणि त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला की हा सामान्य डबा आहे..केवळ तुमच्यासाठी नाहीये....हवं तर बाहेर जाऊन पाहा...तरीही त्या वाद घालायल्या लागल्या....नशीब माझं की त्यातल्या एकीने इमानदारीत बाहेर जाऊन पाहिले आणि मग...अय्या, खरंच की...हा आपला डबा नाहीये...हा तर पुरुषांचा डबा आहे...असे म्हणाली. मी पुन्हा तिची चूक दुरुस्त केली...पुरुषांसाठी..केवळ पुरुषांसाठी असा डबा अस्तित्त्वातच नाहीये....त्यावर त्या बायका आरडा-ओरडा करायला लागल्या..असे कसे तुम्ही म्हणून शकता?ते काही नाही...हा आमचाच डबा आहे...तुम्ही जागा खाली करा नाही तर... थांबा आता आम्ही टीसीला आणि रेल्वे पोलिसांना बोलावतो म्हणजे मग समजेल तुम्हाला....आम्हाला अक्कल शिकवताहेत!
पण मी त्यांना कसेबसे शांत करून... वर सुरुवातीला जे काही लिहीलंय तेच... त्यांना समजेल अशा भाषेत सांगितलं तेव्हा मात्र त्या अवाक्‌ झाल्या.....

मी त्याच गाडीने आणि त्याच डब्यातून शेवटपर्यंत प्रवास केला...पुढे तर अजून गंमत आहे.त्या बायका शांत झाल्यावर मी माझ्या ब्रीफकेसमधून दिवाळी अंक काढून वाचायला सुरुवात केली...होय. त्यावेळी दिवाळीचे दिवस जवळ आलेले होते आणि मी आमच्या कार्यालयात एक छोटेसे वाचनालय सुरु केले होते...माझ्या ब्रीफकेसमध्ये अजून एकदोन अंक होते...ते त्या बायकांनी माझ्याकडून मागून घेऊन त्यांचेही सामुदायिक वाचन सुरु झाले. पुढे प्रत्येक स्टेशनवर फक्त बायकाच चढत होत्या आणि मला पाहून अद्वातद्वा बोलायला सुरुवात करायच्या...पण मग सुरुवातीला ज्यांना मी समजावले होते...त्याच बायका माझी बाजू मांडायला लागल्या. :)
रागावलेल्या एका ठकीने मला हेही विचारले..तुम्हाला बायकांच्यात प्रवास करायला लाज कशी नाही वाटत?
मी म्हटलं...माझ्या घरातही आई-बहीण आहेच की...तुम्ही त्या जागी आहात मला..मग मी कशाला लाजू...तेव्हा ती देखील वरमली होती...
दहिसरला उतरण्याआधी कांदिवलीपासून माझ्या जागेसाठी कैकजणींनी फिल्डिंग लावलेली होती....मी उठलो आणि मग त्या आपापसात मारामार्‍या करत बसल्या.

ह्या गोष्टीला आता खूप वर्ष झाली तरीही आज ’पुरुषांचा डबा’ ही संकल्पना रेल्वेने प्रवास करणार्‍या बहुसंख्य लोकांच्यात टिकून आहे ह्याचे वैषम्य वाटते.

२१ ऑक्टोबर, २०१०

दिवाळी अंक प्रकाशन!

जालरंग प्रकाशनाचा दीपज्योती हा अंक प्रकाशित करतांना मी आज खूप खूश आहे. हा अंक बनवणे म्हणजे एक आव्हान होते आणि ते मी पेलू शकलो ते निव्वळ श्रेया रत्नपारखी आणि कांचन कराई ह्या दोघींच्या भरवश्यावर...अंकाचे हे जे काही सुंदर स्वरूप आपल्याला दिसत आहे ती त्या दोघींची कमाल आहे...मी केवळ नामधारी आहे.

हा आहे दुवा...  

http://diwaaliank.blogspot.com/

असो. आता वाचकांना नम्र आवाहन आहे की त्यांनी हा अंक जरूर वाचावा आणि त्यांच्या बर्‍या/वाईट प्रतिक्रिया नोंदवाव्यात...जेणेकरून आमच्या कामाची पोचपावती आम्हाला मिळेल.

सगळ्यांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा देतांना हा अंक प्रकाशित झाला असे मी जाहीर करतो.

धन्यवाद.

१६ ऑक्टोबर, २०१०

आऽऽग!!!

आज साडेअकराच्या सुमारास मी स्नानाला गेलो. स्नान आटोपून अंग पुसत होतोच इतक्यात काही आवाज यायला लागले. टिकल्या फोडतो ना दिवाळीत असा काहीसा आवाज होता त्यामुळे आधी त्याचे विशेष असे काही वाटले नाही; पण तो आवाज सारखा यायला लागला आणि नीट ऐकल्यावर लक्षात आले की हा ठिणग्या पडण्याचा आवाज असावा. त्याच वेळी काही लोकांच्या ओरडण्याचाही आवाज ऐकला आणि मग नक्की काही तरी वेगळेच घडत असावे ह्याची जाणीव झाली. स्नानघराच्या खिडकीतील झरोक्यातून मी बाहेर झाकून पाहिले आणि...चक्क मला धूर दिसला आणि लक्षात आलं की काहीतरी गंभीर प्रकरण असावे.

मी अंग पुसून तत्काल बाहेर आलो आणि माझ्या सज्जाच्या खिडकीतून जे पाहिले ते खरंच चिंताजनक होते. आमच्या इमारतीपासून ४०-५० फुटावर असलेल्या ८ मजली इमारतीच्या दुसर्‍या मजल्यावरूनच तो ठिणग्या पडण्याचा आवाज येत होता(अर्थात ठिणग्या दिसत नव्हत्या) आणि त्या घरातून येणार्‍या धुराचे प्रमाण वाढत होते. खाली जमा असणारी मंडळी नुसती एकमेकांना ती घटना,जागा दाखवून आपापसात काही तरी बोलत होती. इमारतीचे सुरक्षारक्षकही इकडून तिकडे धावताना दिसत होते पण त्यापैकी कुणीही त्या घरात जाऊन नेमकं काय झालंय/होतंय हे पाहण्याची हिंमत करत नव्हते.

इकडे धूर वाढतच होता...अजून आग लागलेली दिसत नव्हती. काही लोकांच्या कानाला चिकटलेले भ्रमणध्वनी बहुधा अग्निशमन दलाला आमंत्रण देण्याचे काम करत असावेत. आणि पाहता पाहता अचानक आगीचे लोळ उठले...आता त्या सदनिकेच्या सज्ज्यातील काही गोष्टींनीही पेट घेतला. माझ्या घरातून जे दृश्य दिसत होते ते खूपच भयानक होते. त्यातच त्या सज्ज्यात एक गॅसची टाकी होती(रिकामी की भरलेली..कुणास ठाऊक). ती टाकी पाहूनच माझी मुलगी भिती व्यक्त करत होती...बाबा , ही टाकी फुटली तर..आग अजून भडकेल आणि मग काही खरं नाही...तुम्ही करा ना अग्निशमनदलाला फोन.
मी म्हटलं...अगं इतकी लोकं हातात फोन घेऊन आहेत...नक्कीच त्यांनी कळवलं असेलच त्यांना..येतच असतील ते लोक. तरीही मलाही तिची काळजी योग्य वाटत होती म्हणून मी १०१ क्रमांकावर संपर्क साधला. लगेच तिकडनं विचारणा झाली...
साहेब, मी एन एल हायस्कुलजवळून बोलतोय. माझ्या मागच्या इमारतीत दुसर्‍या मजल्यावर आग लागलेय.

हो,हो! आम्हाला खबर मिळालेय...थोड्या वेळापूर्वीच ६ गाड्या रवाना झाल्या आहेत...येतीलच इतक्यात.

साहेब, अहो आग खूप जोरात पसरतेय आणि जिथे आग लागलेय तिथेच एक गॅसची टाकी आहे....

किती माळ्याची इमारत आहे?

८ माळ्याची आहे इमारत...आणि आग २र्‍या मजल्यावर आहे.

त्यांनी फोन बंद केला आणि तेवढ्यात गाड्यांचे भोंगे ऐकू यायला लागले...जरा जीवात जीव आला. :)

अग्निशमन दल येऊन तर पोचलं...आग किती झपाट्याने पसरतेय हे तेही पाहत होते...पण का कुणास ठाऊक त्यांच्या हालचाली अतिशय मंद होत्या...निदान मला तरी तसे दिसत होते. थोड्या वेळाने मग त्यांनी त्यांचे जलफवारणी अस्त्र आणलं. दोनदोन जणांच्या दोन जोड्यांनी आपल्या जागा पकडल्या आणि फवारणीला सुरुवात करणार.....तोच खूप जबरदस्त असा स्फोट झाला...अशद(अग्निशमनदल) जवानांसकट सगळे आडोशाला धावले. स्फोट इतका जबरदस्त होता की त्या सज्ज्याच्या काचा,लोखंडी जाळी वगैरे कुठच्या कुठे फेकले गेले. माझ्या खिडकीवरही काही तुरळक तुकडे येऊन आदळले.

ह्या स्फोटातून सावरल्यानंतर मग हळूहळू अशद जवान बाहेर आले आणि मग त्यांनी आग विझवण्यासाठी खालूनच पाण्याची फवारणी सुरू केली. आधी आग फक्त दुसर्‍या मजल्यावरच होती पण स्फोट झाल्यामुळे ती पाचव्या मजल्यापर्यंत पोचली. तिसरा,चौथा आणि पाचव्या मजल्यावरही हळूहळू आग पसरत चाललेली पाहून पुढे काय होणार आहे ह्याची काळजी मी करत होतो...पण तरीही मला अशद जवानांच्या केवळ खाली उभे राहून पाणी मारण्याच्या मागचे प्रयोजन कळले नाही.
खाली उभे राहून फक्त इमारतीच्या बाहेर लवलवणार्‍या आगीच्या ज्वालाच फक्त दिसत होत्या पण इथे तर दुसर्‍या मजल्याच्या सदनिकेच्या आत आग पेटलेली दिसत होती...आणि त्याच वेळी वरच्या काही मजल्यांवरची आगही वाढत होती. अशा वेळी वापरावयाच्या कोणत्याच शिड्या ह्या जवानांजवळ दिसत नव्हत्या...हे खरंच आश्चर्य होते.

असो.त्यांचे काम ते जाणोत. जवळपास दीड तासांच्या अथक प्रयत्नानंतर ती आग आटोक्यात आली...सुदैवाने जीवितहानी झाली नाही पण अर्थात त्या स्फोटाच्यावेळी कुणी जखमी झाले असण्याची दाट शक्यता आहे.वित्तहानी मात्र जबरदस्त झालेय हे नक्की.

आता ह्यानंतर मनात निर्माण झालेले काही विचार...
१)अशा आपत्काली कुणी तरी खमकी व्यक्ती आसपास असावी लागते...जी अशावेळी लोकांना योग्य ते मार्गदर्शन करू शकते.
२)इमारतीच्या सुरक्षारक्षकाबरोबरच इमारतीत राहणार्‍यांपैकी काही जणांना अशा आपत्काली पोलिस/अग्निशमनदल वगैरेंची मदत येईपर्यंत किमान काय काळजी घ्यावी/झटपट कारवाई करावी ह्याबद्दलची माहिती असायलाच हवी....कारण आधी नुसत्या ठिणग्या आणि मग धूर येत असताना किमान त्या घरात येणार्‍या विजेचा मूळ स्रोत बंद करायला हवा होता(इलेक्ट्रिकचे मेन स्वीच)...पण हे त्यांनी का नाही केले?

ही इमारत आठ मजल्यांची आहे...म्हणजे मुंबई नगरपालिकेच्या कायद्याप्रमाणे कोणत्याही सहा मजल्यावरील इमारतीत अग्निशमन करण्यासाठीची यंत्रणा बसवावी लागते..जी कदाचित इथे बसवलेली नसेल...अथवा असूनही त्याचा योग्य तो वापर कसा करावा ह्याबद्दलची जाणकारी सुरक्षारक्षकांसकट कुणालाही नसावी..एरवी आधी क्षुल्लक असलेले ठिणग्या पडणे...आगीच्या लोळापर्यंत पोचलेच नसते.

ता.क.: घटना घडून गेली...आगही विझून आता जवळपास दोन तास झालेत तरीही अजून अग्निशमनदल तिथे पंचनामा,चौकशी इत्यादीत गुंतलेलं आहे...आता होईल पुढची कारवाई...त्यानंतर पुन्हा जैसे थे!
जाता जाता: आमची इमारतही ७ मजल्याची आहे आणि आश्चर्य म्हणजे इथेही अशी काही अग्निशमनाची सोय नाहीये...आता एक आपत्कालीन सभा बोलावून आम्हालाही काही तरी नक्कीच निर्णय घ्यावे लागतील..पाहूया लोक किती गांभीर्याने घेतात ते.


ह्या आगीची आणि त्यानंतरची काही क्षणचित्रे पाहा.











७ ऑक्टोबर, २०१०

नाट्यसंगीत !

माझी नाट्यसंगीताबद्दलची काही निरीक्षणं ह्यात नोंदवलेली आहेत...मी जे काही गाऊन दाखवलंय..ते मूळ स्वरूपातही उपलब्ध असल्यामुळे त्याचे विजेट्सही सोबत जोडलेले आहेत...माझ्या गाण्याऐवजी श्रोत्यांनी मूळ स्वरूपातली गाणी नीट लक्ष देऊन ऐकावीत म्हणजे मला काय म्हणायचंय ते त्यांच्यापर्यंत निश्चितपणे पोचेल.

ऐका माझं निरूपण:


राम मराठे: जय शंकरा!


भरे मनात सुंदरा:प्रसाद सावकार


बसंतकी बहार आयी-जुगलबंदी: राम मराठे आणि प्रसाद सावकार

१४ सप्टेंबर, २०१०

आणि गणपती मोदक बनवतो !

अहो उठा!
अहो,म्हटलं उठावं महाराजांनी!
आज एका माणसाचा वाढदिवस आहे ना, मग उठा बघू.

अरे वा,म्हणजे लक्षात आहे तर तुझ्या?

का नसणार? सगळं जग...विशेषेकरून भारतवासी..त्यातही विशेष करून महाराष्टीय लोक हा तुमचा वाढदिवस मोठ्या उत्साहात आणि थाटामाटात साजरे करतात...आणि इतकं सगळं माहीत असूनही मी बरी विसरेन. त्यातून हल्ली सगळ्या दिनदर्शिकांमधूनही ठळकपणे तुमच्या वाढदिवसाच्या दिनांकावर लाल रंग असतो...म्हणजेच सुट्टी असते सगळ्या लोकांना. का तर म्हणे वाढदिवस कसा झोकात व्हायला हवा ना!

आज माझा वाढदिवस? पण मग माघात झाला तो काय?

सगळ्याच महापुरुषांच्या जयंतीबाबत वाद असतात...म्हणून मग ज्याला जे सोयिस्कर वाटेल तो ते साजरे करतो. आपल्याला काय,दोनदोनदा भेटवस्तू मिळतात हे काय कमी आहे.

अच्छा, म्हणजे त्या बेंबट्या जोश्यासारखेच झाले माझे म्हणायचे?

कोण हो तो बेंबट्या?

अगं तो गं..कडमड्याचा बेंबट्या जोशी...त्याच्या आईवडिलांचाही ह्यावरून वाद...एक म्हणे की आषाढी एकादशीला तर दुसरा म्हणे की कार्तिकी एकादशीला...तसेच काहीसे.

ते काहीही असो...पण दोन्ही एकादश्याच होत्या ना मग झाले तर! अय्या, आठवलं! तुमचाही जन्म चतुर्थीचाच की हो..अगदी दोन्ही वेळी.

ए पुन्हा बोल ना अय्या !

इश्श्य! काहीतरीच काय बाई?

घ्या! अय्या म्हणायला सांगितलं तर इश्श्य म्हणून मोकळी झालीस. पण काहीही म्हण हं ह्या महाराष्ट्र देशीच्या बायका लाजतात मात्र सुंदर आणि दिसतातही.....

हं!पुरे,पुरे!जास्त पुढे जाऊ नका! उठा आता लवकर!कितीतरी कामं उरकायचेत! त्यात ते मोदकही बनवायचेत!किती कष्टदायक प्रकार आहे बाई! कशा त्या बायका बनवत असतील कुणास ठाऊक!
अगं मग घे की शिकून, तुला काय कठीण आहे ते?

म्हणे कठीण नाही.कठीण नाही? बोला, तुम्ही बनवताय का?

अगं,मी कुठून बनवणार आणि कसे बनवणार?

कुठून म्हणजे काय? स्वयंपाकघरात जाऊन...इथे आपल्याच घरात!

पण मी कधीच बनवलेले नाहीत.

मी आहे ना! तुम्हाला बनवण्याची सगळी रीत समजावून सांगते.

अगं,पण हे बायकांचं काम आहे ना? पुरुष कुठे करतात असली कामं? आणि मी आजवर कुठे काय केलंय?

काही तरी बोलू नका. घरात सोडले तर इतरत्र कुठेही सार्वजनिक ठिकाणी खायला जा...आचारी,महाराज वगैरे काही नावं द्या..तिथे जेवण बनवणारे सगळे पुरुषच असतात ना!

अहो हे तर सोडाच...आत्ताच मी वाचलं...

काय वाचलंस? कुठे वाचलंस? (स्वगत) कशाला वाचलंस?


दाखवते थांबा. अगदी सचित्र दाखवते.

(स्वगत) मेलो ठार! ही म्हणजे अगदी त्या म्हैस कथेतल्या मास्तरासारखी आहे....धोतरावर ऑर्डरली थुंकला म्हणून दाखवणारा..एक्झिबिट नंबर वन !

काय बोललात?

नाही, काही नाही! तू काय दाखवते आहेस ते दाखव असे म्हणत होतो.

हं तर हे पाहा आता....मुळच्या महाराष्ट्र देशीच्या पण आता इटलीत कामानिमित्त गेलेल्या विद्याधराने पाहा कसे सुबक मोदक बनवलेत. नाही तर तुम्ही?

अरे वा! हा पण विद्याधर का? (स्वगत)माझा कितवा अवतार हा? पण आता माझ्यावरच संकट आणलंय ह्यानं. चला, विघ्नहर्ता,उठा आता. पाहा आता, हे स्वत:वरचं संकट तरी दूर करता येतंय की नाही?

पाहा,पाहा ह्या मर्त्य लोकातल्या विद्याधराला जर इतके सुबक मोदक बनवता येत असतील तर तुम्हाला ते अशक्य कसे असेल. शेवटी तुम्ही पडलात ६४ कलांचे अधिपती....काय कळलं का गणेश महाराज...आपलं विद्याधर!

कौतुकास्पदच आहे गं ह्या मुलाचं काम. पण उगाच मला भरीला पाडू नकोस हं. मला आता तयार होऊन जायचंय भक्तांच्या भेटीला.

तुमचं बाई बरं आहे, जो तो तुम्हाला बोलावतो,मग तुमच्या आईलाही बोलावतो. पण मेलं आम्हाला कधीच कुणी बोलावत नाही.

नाही कसं? अगं दसर्‍याला तुझा मान असतोच ना!

ते खरंय रे ! पण तुझ्यासारखं आमचं खास कौतुक नाही ना!

आता ह्या वेळेला मी खाली जाईन ना तेव्हा समस्तांना तशी बुद्धी देईन. आता झालं समाधान? मी करू माझ्या जाण्याची तयारी?

ए असं रे काय विद्याधरा,हेरंबा,अमेया.....नाही नाही चुकले. गणूऽऽ!

ही तुझी गणूऽऽ हाक मला नेहमीच मोहात टाकत असते. बरं चल बनवूया आपण मोदक.

अं हं ! आपण नाही...तू एकटाच बनवणार आहेस. मी हवं तर त्या दूरदर्शनवरल्या ठक्यांसारखी प्रग्रासमोर माना वेळावत उभी राहीन तुझ्या बाजूला...चल चल चल! आता उशीर नको...नाहीतर तिथे भक्त रागावतील.

तू म्हणजे ना....

१२ सप्टेंबर, २०१०

गप्पा - टप्पा !

रोज आपण निरनिराळ्या विषयांवर गप्पा मारतच असतो आपापल्या मित्रांशी... तसेच त्यांची सुरुवात कुठून होते आणि संपते कुठे हेही कैक वेळेला कळत नाही. अशाच काही खर्‍या/काल्पनिक गप्पा आपल्याला इथे एकत्रपणे वाचता येतील. :)

११ सप्टेंबर, २०१०

१० सप्टेंबर, २०१०

ते रम्य दिवस !

माझ्या नोकरीच्या काळातील सुरुवातीचे ते मंत्रभारलेले रम्य दिवस आपण बर्‍याच जणांनी वाचले असतीलच...पण ज्यांनी नसतील वाचले त्यांच्यासाठी ते एकत्र स्वरूपात..पुस्तकाच्या स्वरूपात इथे वाचता येतील.


८ सप्टेंबर, २०१०

मराठी सुगम संगीतातील नररत्ने !

सुधीर फडके,श्रीनिवास खळे , स्नेहल भाटकर , यशवंत देव आणि दत्ता डावजेकर ह्या मराठीतील गाजलेल्या संगीतकार/गायक नररत्नांची ही थोडक्यात ओळख....वाचा.

६ सप्टेंबर, २०१०

मुक्काम पोस्ट मद्रास !

मद्रासच्या तीन महिन्यांच्या वास्तव्यातील काही मजेशीर आठवणी वाचा एकत्रितपणे ह्या पुस्तकात.


माझे सांगितिक आयुष्य !

संगीत विषयक माझ्या काही गंमतीदार आठवणी एकत्रपणे वाचा ह्या पुस्तकात.


५ सप्टेंबर, २०१०

स्वगत !

स्वगत मालिकेतील तीनही लेख एकत्रपणे वाचता येतील ह्या इ-पुस्तकात.

४ सप्टेंबर, २०१०

३ सप्टेंबर, २०१०

जालरंग प्रकाशन आणि त्याचे ओळखचिन्ह !

मंडळी आम्ही काही जणांनी मिळून ह्यापूर्वी काही इ-अंक प्रकाशित केले...जसे की शब्दगाऽऽरवा, हास्यगाऽऽरवाऋतू हिरवा आणि जालवाणी ...इत्यादि. आता आम्ही दिवाळी अंकही काढत आहोत. तेव्हा काही जणांनी असे सुचवले की आपल्या ह्या अंकांसाठी अमूक एक प्रकाशन असे काही  ओळखचिन्ह असावे...आणि प्रकाशनाचेही काही तरी वैषिष्ठ्यपूर्ण नाव असावे. म्हणून मग आम्ही आमच्या प्रकाशनासाठी नाव सुचवण्याचे आवाहन केले...त्याला चांगलाच प्रतिसाद मिळाला...साधारण १४-१५ सुचवलेल्या नावातून मग बहुमताने निवड झाली ती...जालरंग प्रकाशन ह्या नावाची.

आता त्या नावाचे ओळखचिन्ह बनवायला हवे होते....मग पुन्हा त्यासाठी आवाहन केले गेले आणि एकूण २७ अशी रंगीबेरंगी  ओळखचिन्ह जमली...त्यातून एकाच ओचिची निवड करणे खूपच कठीण काम होते..म्हणून आम्ही पुन्हा त्यासाठी मतदान घेतले आणि त्यात बहुमताच्या जोरावर विशाल कुलकर्णी निर्मित एका ओचिची निवड नक्की केली.....त्याबद्दल विशालचे मन:पूर्वक अभिनंदन!

                                हेच ते ओळखचिन्ह
आता ह्यापुढे आम्ही  जालरंग प्रकाशन ह्या नावाने आणि वर दिलेल्या ओळखचिन्हाने पुढचे अंक प्रकाशित करू ह्याची वाचकांनी/रसिकांनी कृपया नोंद घ्यावी.

३१ ऑगस्ट, २०१०

पुन्हा एकदा शिवथरघळ !

दिनांक २८ ऑगस्टला पुन्हा एकदा दासबोधाचे जन्मस्थान शिवथरघळ येथे जाण्याचा योग चालून आला. मंडळी, मी काही भाविक वगैरे प्रकारातला माणूस नाही. दासबोध तर सोडाच पण मनाचे श्लोक आणि रामरक्षा लहानपणी कधी तरी पाठ केलेले...आता जवळपास पुर्णपणे विसरलेलो आहे. समर्थ रामदासांच्या अध्यात्मिक नव्हे पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्य स्थापनेसाठी लाभलेला त्यांचा सक्रीय पाठिंबा....जावळीचे मोरे आणि  शिवाजी महाराज ह्यांच्यात  समझोता निर्माण व्हावा ह्यासाठी समर्थांनी इथे खास वास्तव्य केले, अफझलखान इत्यादि आक्रमकांच्या सैनिकी हालचालींची बित्तंबातमी महाराजांपर्यंत पोचवण्यासाठी ठिकठिकाणी मठ स्थापन करून तिथल्या शिष्यांकरवी हेरगिरीचे काम करविले..इत्यादि...हे माझे समर्थांच्याबद्दल आत्मीयता वाटण्याचे कारण आहे. त्या काळात त्यांनी गावोगावी मारूतीची देवळे स्थापून तरूणांच्यात व्यायामाबद्दल निर्माण केलेल्या जागृतीमुळे  स्वराज्यासाठी विजिगिषू वृत्तीने लढणारी कुमक निर्माण झाली....ह्या गोष्टी मला जास्त मोलाच्या वाटतात...त्यामुळेच असे हे समर्थ कुठे कुठे गेले, कुठे राहिले ह्याबद्दल बर्‍याच गोष्टी ऐकून आहे...त्यातलंच हे एक ठिकाण...चारही बाजूंनी पर्वतांनी वेढलेले, जावळीच्या गर्द खोर्‍यात वसलेले, एका आडमार्गावर असलेली घळी...घळई  म्हणजे शिवथरघळ...जिथे समर्थांनी बराच काळ म्हणजे जवळपास १० वर्षे  वास्तव्य केलं आणि दासबोधासारखा ग्रंथराज निर्माण केला....ह्या घळीत पुन्हा जाण्याचे माझ्यासाठी असलेले सर्वात मुख्य आकर्षण होते...तो म्हणजे त्या घळीच्या शेजारीच असणारा धबधबा....अशा ह्या शिवथरघळीचे  वर्णन समर्थांच्याच शब्दात ....


गिरीचे मस्तकी गंगा । तेथुनि चालली बळें ।
धबाबा लोटती धारा । धबाबा तोय आदळे ॥१॥

गर्जता मेघ तो सिंधू । ध्वनीकल्लोळ उठिला ।
कड्याशी आदळे धारा । वात आवर्त होतसे ॥२॥

तुषार उठती रेणू । दुसरेरज मातले ।
वात मिश्रीत ते रेणू । सीत मिश्रीत धुकटे ॥३॥

दराच तुटला मोठा । झाड खंडेपरोपरी ।
निबीड दाटती छाया । त्या मधें वोघ वाहती ॥४॥

गर्जती श्वापदें पक्षी । नाना स्वरें भयंकरें ।
गडद होतसे रात्री ।ध्वनी कल्लोळ उठती ॥५॥

कर्दमू निवडेना तो । मानसी साकडेपडे ।
विशाळ लोटती धारा । ती खालेरम्य विवरे ॥६।

विश्रांती वाटते तेथे । जावया पुण्य पाहिजे ।
कथा निरुपणेचर्चा । सार्थके काळ जातसे ॥७॥

ह्या वर्णनातला  "धबाबा लोटती धारा । धबाबा तोय आदळे ।"  ह्या ओळी माझ्यासाठी , मला तिथे पुन्हा जाण्यासाठी उद्युक्त करणार्‍या होत्या. कारण ह्या आधी मी गेलो होतो तेव्हा उन्हाळा होता आणि हा धबधबा अक्षरश: कोरडा होता....पण समर्थांचे ते शब्द..माझ्या मनात नेहमीच रेंगाळत असतात...साहजिकच ही उत्सुकता...की खरंच हा धबधबा जेव्हा वाहात असेल तेव्हा नक्कीच प्रेक्षणीय असणार...तेव्हा ठरवलं की ही आलेली संधी फुकट घालवायची नाही....आणि त्याप्रमाणे मी ती संधी साधू शकलो..ह्याबद्दल मला खचितच आनंद वाटतोय.

शनिवारी सकाळी ६ वाजता घरातून निघालो आणि जिथून मला बसमध्ये बसायचे होते तिथे ६-१५ला पोचलो. बस येईपर्यंत ६-४० झालेले होते...मात्र पाऊस नसल्यामुळे तशी वाट पाहण्याने फार काही त्रास जाणवला नाही. इथे उभे असतांना  एक असे दृष्य पाहिले....जे तसे म्हटले तर रोजचेच आहे...मला मात्र ते थोडे गंमतीदार वाटले....नाक्यावर दोनतीन जण तारेत गुंफलेली मिरची-लिंबू घेऊन उभे होते....तिथे येणार्‍या बहुसंख्य गाड्यांना जुनी सुकलेली गुंफण काढून ती ताजी गुंफण जोडली जात होती...अशा तर्‍हेने आपापल्या वाहनांना वाईट नजरांपासून वाचवणार्‍यात अगदी ट्रक-रिक्षा चालकांपासून ते अगदी कैक लाखाच्या खाजगी गाडयाही होत्या....म्हणजेच दुसर्‍या भाषेत बोलायचे तर अगदी अशिक्षितांपासून ते  उच्चशिक्षितांपर्यंत सगळेजण त्या लिंबू-मिरच्यांमध्ये ओवले गेलेले होते.  एकीकडे आम्ही विज्ञानवादी वगैरे आहोत अशी शेखी मिरवणारे....इथे मात्र निमूटपणे ह्या बंधनात अडकलेले दिसले. असो...जे दिसले ते सांगितले....आता पुन्हा मूळ विषयाकडे वळतो.

आमची बस आली. त्यात चढलो....एकूण २०-२५ जण सहप्रवासी होते. तसे ओळखीचे कुणीच नव्हते...त्यामुळे बराच काळ गप्प बसून राहिलो. त्यानंतर सहजपणे ठाकूर गुरुजींशी ओळख झाली....आणि मग ते बोलत राहिले आणि मी ऐकत राहिलो. आश्रमशाळा, आदिवासी आणि त्यांचं जीवन ह्यात जवळपास संपूर्ण हयात गेलेले ठाकूर गुरुजी त्यांचे एकेक अनुभव सांगत होते आणि मी शांतपणे ऐकत होतो. आपल्याला सहजासहजी मिळणार्‍या कैक गोष्टी...म्हणूनच कदाचित त्याची किंमत आपल्या लेखी नगण्य असते....त्यातलीच एखादी गोष्ट त्या आदिवासींना मिळाली की त्यांचा आनंद कसा बहरून येतो...हे सांगतांना ठाकूर गुरुजींच्या चेहर्‍यावरही एक वेगळाच आनंद दिसत होता.

ह्या गप्पांमध्ये गुंगलेलो असतानाच बस आम्हाला घेऊन पोचली नागोठण्याला...जिथे आमच्या न्याहारीची व्यवस्था केलेली होती. त्या दिवशी संकष्टी चतुर्थी असल्यामुळे उपास धरणारे बरेच सहप्रवासी होते...त्यामुळे सगळ्यांसाठी सरसकट छानपैकी साबुदाण्याच्या खिचडीचा बेत होता....साखि,त्यावर दही आणि ओलं खोबरं....मग काय विचारता? मंडळींनी आडवा हात मारला...त्यानंतर चहा/कॉफी सेवन झाले आणि आम्ही पुढे निघालो.

तिथून आम्ही महाडला गेलो...महाडमध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी ज्यासाठी सत्त्याग्रह केला होता त्या ’चवदार तळ्याचे’ दर्शन घेतले. ह्या तळ्याविषयी आजवर जे काही वाचलेले होते की  ज्यामुळे माझी उत्सुकता खूपच वाढलेली होती....पण प्रत्यक्षात माझा खूपच विरस झाला. एक राष्टीय स्मारक म्हणून निगा बर्‍यापैकी राखलेली असली तरी ज्याचा उल्लेख ’चवदार तळे’ असा होतो..त्याचे पाणी पूर्णपणे हिरवट दिसत होते...तसंच त्यात बर्‍याच प्रमाणात कचराही टाकलेला दिसत होता....तळे चारी बाजूंनी व्यवस्थित बांधून काढलेले असले तरी त्याचे पाणी आता कुणी पिण्यासाठी वापरत असेल असे मात्र वाटण्यासारखी परिस्थिती नाहीये....त्यामुळेच



पाण्याची चव चाखता नाही आली.  :(
हे सगळं उरकेपर्यंत जेवणाची वेळ झालेली...त्यामुळे महाडच्याच जवळ एका ठिकाणी विठ्ठल कामतांच्या उपाहारागृहात आम्ही सगळ्यांनी आपापली क्षुधा शांती करून घेतली...जेवण तसे चांगले होते...पण मराठी पद्धतीचे नसून चक्क पंजाबी पद्धतीचे होते...मराठी लोकांना मराठी पद्धतीचे जेवण आवडत नाही की...उपाहारगृहांमध्ये मराठी पद्धतीचे जेवण बनवण्यासाठी आचारी नसावेत...की अजून काही....कारणं काय असतील मलाही माहीत नाही...पण महाराष्ट्रात देखिल मराठी पद्धतीच्या जेवणाऐवजी इतर पद्धतींचे जेवण मिळण्याच्या ह्या शक्यतेमुळे मला स्वत:ला हा आपला कमीपणा वाटतो हे आवर्जून सांगावेसे वाटले.

तिथून मग थेट आम्ही निघालो ते शिवथरघळीला पोचलो. तिथे पोचेस्तो ३ वाजून गेलेले होते. भक्त निवासात राहण्याची व्यवस्था करून मग आम्ही निघालो धबधब्याखाली नाहायला....पण हाय रे दूर्दैवा...धबधबा अशा कारणांसाठी पूर्णपणे बंद केलेला आहे...तिथे जाण्याचे सगळे रस्ते पार तारांची कुंपणं घालून बंद केलेल दिसले.
माझा तर एकूणच विरस झाला....ज्यासाठी इतका अट्टाहास करून आलो होतो...तेच करायला मिळणार नाही म्हटल्यावर दुसरं तरी काय होणार?  :(




असो. जी गोष्ट होणे नाही म्हटल्यावर त्याबद्दल जास्त विचार का करा....म्हणून मग सगळी मंडळी निघाली भिजायला ...जिथे कुठे भिजायला मिळेल तिथे....धबधब्यापासून निर्माण होणार्‍या सावित्री नदीच्या प्रवाहाकडे मग सगळ्यांची नजर वळली....पण आधीच तुफान पाऊस पडून गेलेला...त्यामुळे पाण्याचा प्रवाह मात्र खूपच वेगवान दिसत होता...मग पुढे पुढे शोधत जात एका ठिकाणी मंडळींना पाण्यात थोडेफार डुंबता येईल अशी जागा दिसली आणि सगळी उत्साहाने पुढे सरसावली.





मी मात्र धबधबा नाही तर ओला होणार नाही...ह्या माझ्या मतावर ठाम राहिलो....नुसत्या पाण्यात भिजण्यासाठी....पावसाच्या पाण्यात भिजण्यासाठी इतके सव्यापसव्य करून इतक्या लांब कशाला जायची जरूर आहे? मुंबईत काय कमी पाऊस आहे काय भिजायला?...हा आपला माझा विचार....म्हणून मग मी आपल्या प्रग्रामध्ये जमेल तेवढे सृष्टीसौंदर्य साठवून घ्यायला सुरुवात केली.

माझ्या दिव्य दृष्टीला दिसलेले आणि प्रग्रामध्ये कैद करता आलेले काही दृष्यकण आता आपल्यासाठी इथे देत आहे.



























त्यादिवशी संध्याकाळी साडेसहा ते जवळपास साडेआठ वाजेपर्यंत...संध्याकाळची प्रार्थना होती.. ’ गाड्या बरोबर नळ्याला यात्रा ’  ह्या म्हणीप्रमाणे मीही त्यात सामील झालो....कधीतरी टाळ्या वाजवणे सोडले तर मला काहीच काम नव्हते...बरेच उत्साही भाविक त्यात रंगून गेल्यासारखे दिसत होते...काही अर्धवट, तसे दिसण्याचा आटोकाट प्रयत्न करत होते तर काही जमेल तसे सामील झालेले दिसत होते...मीच बहुदा एकटा असावा...जो देहाने तिथे असूनही मनाने इतरत्र वावरत होतो. श्लोकांमागून श्लोक, समासांमागून समास, आरत्या, दासबोधाचे वाचन, मनाचे श्लोक इत्यादि नाना प्रकार त्यात सामावलेले दिसत होते... ते दोन तास मी कसे काढले मलाच माहित नाही...पण कधी एकदा तो प्रकार संपतोय असं झालं होतं...शेवटी  संपलं  एकदाचं आणि मग सगळ्यांना चमचा चमचा प्रसाद वाटण्यात आला.

इथल्या काही गोष्टी मात्र मला आवडल्या. ठराविक वेळी घंटा वाजतात...चहासाठी, जेवणासाठी, प्रार्थनेसाठी इत्यादि. मग इच्छुकांनी त्यात सहभागी व्हायचे असते.
चहा इथे तयार करून एका नळ असलेल्या पिंपात ठेवलेला असतो. बाजुलाच एका ठिकाणी कप मांडून ठेवलेले असतात. आपण आपल्यासाठी कप घेऊन रांगेने जाऊन आपल्यासाठी चहा घ्यायचा असतो...स्वत: नळ सोडून...त्यानंतर चहा पिऊन झाल्यावर बाहेर जाऊन नळावर तो कप धुवून मग पुन्हा तो पूर्ववत जागेवर आणून ठेवायचा...सगळी स्वयंशिस्त...छान वाटला हा उपक्रम...कुणी नोकर नाही, सेवक नाहीत.

जेवणाच्या वेळी, न्याहारीच्या वेळीही असेच. रांगेत जाऊन मांडणीतून ताटे-वाट्या-भांडी आपली आपण घ्यायची...इथे मात्र वाढायला एक दोन स्वयंसेवक असतात....ताट वाढून घेतले की तिथेच असलेल्या सभागृहात खाली मांडी घालून बसायचे आणि जेवायचे....जेवण उरकल्यावर पुन्हा जाऊन ताट-वाटी-भांडं घासून आणून जागेवर ठेवायची....सगळं कसं एकदम शिस्तबद्ध काम चालतं.

त्या रात्री आम्ही तिथेच भक्त निवासात झोपलो...दुसर्‍या दिवशी सकाळी आंघोळी करून काहीजण काकड आरतीत सामील झाले...अर्थात मी नाही.  :)
त्यानंतर चहा, न्याहारी वगैरे करून मग आम्ही शिवथरघळीतून बाहेर निघालो.
शिवथरघळीला आदल्या दुपारी पोचल्यापासून ते दुसर्‍या दिवशी सकाळी तिथून निघेपर्यंत पाऊस अखंडपणे बदाबदा कोसळत होता...पावसामुळे तसे सगळे वातावारण कुंद आणि सुस्त झालेले होते तरी आजूबाजूचा हिरवा आसमंत, ढगात,धुक्यात हरवलेले डोंगरकडे, धबाबा कोसळणारा धबधबा आणि वळणं घेत घेत वेगात वाहणारी सावित्री नदी....ह्या सर्वांमुळे मला स्वत:ला खूपच समाधान मिळाले...माझ्या प्रग्रामध्ये मी जमेल तसे आणि जमेल तेवढे त्याचे रूप साठवण्याचा प्रयत्न केलेला आहे.......आणि ह्या संपूर्ण प्रवासाची फलनिष्पत्ती म्हणावी तर हीच की.....हे सगळं मला अनुभवता आलं.....बस्स! त्यामुळे एरवी कैक कारणांनी झालेला विरस जमेस धरला तरी समाधानाचं पारडं जास्त जड आहे असे म्हटल्यास ते वावगे ठरणार नाही.

इति अलम्‌!

२६ ऑगस्ट, २०१०

काय होणार आहे ह्या देशाचं?

महागाईने सगळे लोक त्रस्त झालेत; लोक प्रतिनिधींनीही आपल्या पोळीवर तूप ओतून घेतलंय...
अहो पण का?
का, म्हणजे काय? त्यांनाही महा घाई आहे ना...
तुम्हाला महा घाई म्हणायचंय की महागाई? एकदा काय ते नेमकं बोला.
सांगतो...त्याचं काय आहे की महागाई तर वाढलेलीच आहे...संघटीत कामगार,सरकारी नोकर इत्यादिंना महागाई भत्त्यात तुटपुंजी का होईना पण वाढ करून मिळतेय...बाकी जनतेचं काहीही होवो...पण ह्या महागाईचा बाऊ करून लोकप्रतिनिधींनाही आपले भत्ते वाढवून...वाढवून म्हणजे किती? ३०० पट!
काय सांगताय काय? इतके?
अहो, हो, चालायचंच मोठ्यांचं सगळंच मोठं असतं ना...मग त्यांची महागाईही  तेवढीच ’महा’ असणार ना!
हं! असं आहे तर...जाऊ द्या झालं...ज्याच्या हाती ससा तो पारधी..म्हणजे ज्याच्या हाती सत्ता तो.....
गरीब दिवसेंदिवस अजून गरीब होतोय..त्यामुळे लाचारी वाढतेय..मग त्या लाचारीतून निर्माण होतोय राग आणि रागातून निर्माण होतोय नक्षलवादासारखा अतिरेकी मार्ग....हे एक दुष्टचक्र आहे. आपलेच कैक भाऊबंध इतक्या हलाखीत जगत आहेत तरी कुणालाच त्याचे सोयर सुतक नाही. हे जे गोरगरिंबाचे आणि जनतेचे प्रतिनिधी असे स्वत:ला म्हणवून घेतात..त्यांना जर महागाईच्या झळा जाणवत असतील तर ते ज्यांचे प्रतिनिधीत्व करतात त्यांच्याबद्दल का नाही हे बोलत..महागाईभत्ते वाढवून घेण्याऐवजी महागाई कमी व्हावी ह्यासाठी का नाही उपाययोजना करत?
हॅ हॅ हॅ ! कायच्या काय बोलता राव तुम्ही. हल्लीच्या जमान्यात कोन कुनाचा नसतो म्हाईत नाय काय तुमाला?
अहो म्हणून काय झालं? निवडणुकीच्या वेळी आपल्याकडेच येतात ना ते मतं मागायला?
राहू द्या, कळलं आता...उगाच जास्त पकवू नका.
बरं बाबा, नाही पकवत.

आता आपण दुसरं काही बोलू या का?
हो, पण काय बरं बोलायचं?
ते जेम्स लेन प्रकरण काय आहे हो...त्यावरून म्हणे आता दादोजी कोंडदेवांचा पुतळाही लाल महालातून हलवणार आहेत.
छे हो, अहो खरं काय आहे माहीत आहे काय? आपल्यातलीच काही छिद्रान्वेषी लोकं खाजगीत काही तरी कुजबुजली आणि ती कुजबुज ह्या जेम्स महाशयांनी  त्यांच्या पुस्तकात छापली...झालं त्यावरून आता रणं माजलेत.
पण काय हो, कुजबुज तरी काय आहे नेमकी?
खरं सांगू, मी काही वाचलेलं नाहीये....हो उगाच खोटं कशाला बोला....पण एकच सांगतो शिवाजी महाराज हे आमचं आराध्य दैवत आहे...आणि कुणी एखादा उपटसुंभ त्यांच्याबद्दल कुणाच्या तरी सांगण्याने काही अपशब्द उच्चारत असेल तर त्यामुळे आमच्या मनातील महाराजांच्या प्रतिमेला तडा जाण्याइतपत ती प्रतिमा तकलादू नाहीये. हातात पेन आहे म्हणून कुणी काहीही लिहील...आम्ही त्यामुळे विचलीत होणार्‍यातले नाही. आमच्यातली काही इतिहास अभ्यासू आणि तज्ञ मंडळी अशा लोकांना काय ते उत्तर द्यायला आहेत समर्थ...त्यामुळे आम्ही त्याची फिकीर करत नाही.
अहो, पण आपल्यातलीच काही मंडळी ह्याचा वापर करून आता जातीपातींवर घसरलेत....त्यामुळे हे प्रकरण वेगळेच वळण घेत आहे...त्याचं काय करणार?
दूर्दैवाने हे खरं आहे...छत्रपतींचा वारसा सांगणारे काहीजण आपल्या क्षणिक राजकीय फायद्यासाठी हे सगळं घडवून आणत आहेत...आणि हीच खरी शोकांतिका आहे....असल्या घरभेद्यांशी लढण्यात महाराजांची अर्धी शक्ती खर्च झाली...आजही तेच सुरु आहे...आपल्या आपल्यात लढण्यातच आपली शक्ती खर्च होतेय..
अहो, मग ह्यावर उपाय काय?
तात्कालिक उपाय म्हणाल तर काहीही नाही...तुका म्हणे उगी राहावे,जे जे होईल ते ते पाहावे....अहो साक्षात प्रभू रामचंद्रालाही वनवास चुकला नाही आणि श्रीकृष्णाची तर जन्मत:च जन्मदात्या आईपासून ताटातूट झाली..तिथे तुम्ही आम्ही काय? जे व्हायचे आहे ते होणार, टळणार नाही..कदाचित ह्यातून अजून काहीतरी चांगले उपजेल असा विचार करायचा...इतकंच आपल्या हातात आहे.
अहो, पण जे होतंय ते चुकीचं आहे असं नाही वाटत तुम्हाला?
वाटतं ना! पण काही लोकांची चुकत चुकत शिकण्याची प्रवृत्ती असते....त्याला आपण काय करणार? जाऊ द्या त्यांना आपल्या लायनीप्रमाणे.

अजूनही बरेच बोलण्यासारखे विषय आहेत...पण आपण फक्त बोलूकाकाच आहोत...आपल्या बोलण्याने इकडची काडी तिकडे हलत नाही...त्यामुळे आत्ता इतकंच पुरे.
रामराम!
छ्या! तुम्ही च्यायला नेहमीच शेपूट घालता राव!
अहो, नाही हो, मोडेन पण वाकणार नाही हा आमचा बाणा आहे..आम्ही परकीयांविरुद्ध केव्हाही,कुठेही लढू शकतो..पण आपल्याच लोकांविरुद्ध.... नाही, नाही! आमचे हात नाही उठणार ..मग आमची गर्दन उडाली तरी बेहत्तर...
मग मरा. एक दिवस तुम्हाला हा देशही सोडावा लागेल.
काय तरीच काय बोलता राव. महाराजांचे भक्त आहोत आम्ही...इथल्या मातीतच मरू पण मायभूमीशी कधीच गद्दारी नाय करणार..समजलं काय? वैयक्तिक आमच्या जगण्याने आणि मरण्याने देशाचा काहीच फायदा नुकसान होणार नाहीये हे आम्हालाही माहीत आहे...पण आमची नाळ पुरलेय इथल्या मातीत..त्यामुळे सद्द्याचे अस्थिर राजकीय आणि सामाजिक वातावरण पाहून  काळजी मात्र वाटते....काय होणार ह्या देशाचे?  :(
एकीचे बळ काय असते...हे आम्हाला कधी कळणार?
महाराज, पाहता आहात ना!

२४ ऑगस्ट, २०१०

छोटेखानी कट्टा.















मंडळी आपले सगळ्यांचे स्नेही , पुण्यनगरी निवासी श्री. सुरेश पेठेसाहेबांचे मुंबईत आगमन झालेले आहे. आज त्यांचे माझ्या घरी येण्याचे नक्की झाल्यावर आपले तरूण मित्र सुहास झेले आणि सचिन उथळे-पाटील ह्यांनाही त्यावेळी उपस्थित राहण्याचे आवाहन केले गेले.

आज दुपारी दोनच्या सुमारास पेठेसाहेबांचे माझ्या घरी आगमन झाले; थोड्याच वेळात  सचिन आणि सुहासही येऊन दाखल झाले.














थोडा वेळ नमस्कार चमत्कार आणि इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्यावर मग विषय साहजिकच आपल्या बझ आणि बझकरांकडे वळला. बझकरांबद्दल बोलतांना साहजिकच बोलणे खादाडीवर येऊन ठेपले आणि मग काय खानपानाला सुरुवात झाली. आधी पेठेसाहेबांनी खास पुण्याहून आणलेल्या चितळ्यांच्या बाकरवडीचा समाचार घेणे सुरु झाले....त्या पाठोपाठ कांद्याचा खाकरा(मालाडमध्ये फक्त एकाच दुकानात मिळतो बरं का!), मग बेसन लाडू,पातळ पोह्यांचा















चिवडा असे एकामागून एक पदार्थ येत राहिले आणि गप्पांची मैफलही उत्तरोत्तर रंगत गेली. त्यानंतर शेवटी मसाले-चहाने खादंती यज्ञ समाप्त झाला. गप्पांच्या नादात सुहासने आणलेले श्रीखंड मात्र खायचे राहूनच गेले.  :(

त्यानंतर माझ्या लग्नाचा छायाचित्रसंग्रह दाखवण्याचा/पाहण्याचा कार्यक्रम झाला. छायाचित्रं पाहतांना सगळ्यांमध्ये विशेष औत्सुक्य जाणवत होतं...विशेष करून तेव्हाचा मी आणि आत्ताचा मी ह्यातला लक्षणीय बदल पाहतांना.  :D

ह्या दरम्यान मधून मधून बझकडे पाहणे सुरु होते. कोण काय बोलतंय,कोण काय म्हणतंय ह्यावर सुहास आणि सचिन बारीक लक्ष ठेवून होते.  ;)

साधारण पाचच्या सुमारास मग गप्पांचा भर ओसरल्यावर आम्ही सगळे बाहेर गेलो...खास सुहास आणि सचिनसाठी कांदा खाकरा खरेदी साठी. सुदैवाने त्यांना दोघांना प्रत्येकी एकेक पुडा मिळाला आणि दोघांचे चेहरे एकदम प्रफुल्लित झाले.  :)

त्यानंतर सचिन आणि सुहास मालाड रेल्वे स्टेशनकडे रवाना झाले...पुढे बोरिवलीला जाऊन तिथून एसटी पकडून सचिनला आपल्या बहिणीकडे ठाण्याला रक्षाबंधनाचाठी जायचे  होते...त्याला एसटीत व्यवस्थित बसवून देण्याची जबाबदारी सुहासवर सोपवली गेली होती.    ;)                                                                                                                                 













त्यानंतर मी आणि पेठेसाहेब पुन्हा माझ्या घरी आलो. पेठेसाहेबांना  जालनिशीबद्दलच्या काही बाबी माहिती करून घ्यायच्या होत्या...मला जितकी माहिती होती ती मी त्यांना दिली. त्यानंतर साधारण साडेसहाला पेठेसाहेब गमनकर्ते झाले. अशा तर्‍हेने आमचा एक छोटेखानी कट्टा अतिशय मनमोकळ्या वातावरणात पार पडला.













      
सर्व छायाचित्रं पेठेसाहेबांच्या प्रग्राने(प्रतिमा ग्राहकाने) काढलेली आहेत.


अवांतर: कॅमेरासाठी प्रतिशब्द प्रतिमा ग्राहक...आपले मित्र विनायक रानडे ह्यांनी अतिशय नेमका शब्द मराठीत रुजवल्याबद्दल त्यांचे विशेष आभार.

२३ ऑगस्ट, २०१०

योग,भोग की अजून काही?

काल एका नातेवाईकांकडे सत्यनारायणाच्या पुजेला गेलो होतो. माझा ह्या गोष्टींवर विश्वास नाही पण नाती राखण्यासाठी,माणसं राखण्यासाठी आपल्याला बर्‍याचदा आपल्याच मनाविरूद्ध काही करावं लागतं त्यातलाच हा एक प्रकार.तिथला पूजा सांगणारा उपाध्याय म्हणजे आपल्या सरळ भाषेत बोलायचं झालं तर भटजी हा एक वयाची तिशी ओलांडलेला तरूण होता. अंगापिंडाने मजबूत,दिसायलाही बर्‍यापैकी,दोन्ही हातांच्या काही बोटात कसल्या कसल्या आंगठ्या,कानात वरच्या बाजूला भिकबाळी,पाळीजवळ डूल अशा अवतारातल्या त्या तरूणाकडे पाहिल्यावर लक्षात आलं की त्याचा भिक्षुकीचा धंदा अगदी व्यवस्थित सुरु आहे.तसा ओळखीतलाच निघाला. त्याचे वडील एकेकाळी आमच्या लहानपणी आमच्या घरी काही धार्मिक कार्यात भटजीगिरी केलेले होते. हल्ली मात्र ते पूर्णपणे नास्तिक झालेत असेही त्याच्याकडून ऐकले. आता काय म्हणावे ह्याला?बर्‍याचदा असे होते की लोक जन्मभर नास्तिक असतात..पण काही कारणाने अचानक आस्तिक बनतात...अशा लोकांची संख्या आपल्याला भरपूर मिळेल.पण हे वरचे उदाहरण त्यामानाने विरळाच. असो...आपल्याला काय त्याचे? आले असतील त्यांना काही विपरीत अनुभव ज्यामुळे त्यांचा विश्वास तुटला असावा.

बघा, हे असं होतंय. मला सांगायचं काही वेगळंच आहे आणि भलतंच काही सांगत राहिलो. हं तर आता मूळ मुद्द्याकडे येऊ या.
तर तो तरूण भटजी. आजवर कैक मंगल कार्य,धार्मिक कार्य त्याच्याकडून घडली/घडवली गेली असतील. साम्पत्तिक स्थितीही पूर्वीच्या तथाकथित दरिद्री ब्राह्मणांच्या तुलनेत नक्कीच श्रीमंत वाटावी इतपत. रूप आहेच पण...पण अजून तरी विवाह योग नाही. इतरांचे विवाह लावत असतांना ह्याच्या मनात काय बरं भावना असतील?अमूक ग्रहाची शांती, तमूक व्रतवैकल्य करा म्हणजे मनोकामना पूर्ण होईल असे दुसर्‍यांना सल्ले देणारा आणि त्यामुळे त्या लोकांचे काही प्रमाणात समाधान करणारा हा तरूण स्वत:च स्वत:साठी काय बरं उपाय करत असेल?

माझ्या माहितीत अजून एक गुजराथी भटजी होते...होते म्हणजे आता ते हयात नाहीत.पण एकेकाळी त्यांचा व्यवसाय खूपच तेजीत होता. सर्वप्रकारच्या मंगलकार्य,धार्मिक का्र्यांमध्ये ह्यांना तुफान मागणी होती. झालंच तर पत्रिका बनवणे, मुहूर्त काढून देणे, शांती वगैरे करणे इत्यादि गोष्टीत अगदी हातखंडा असणार्‍या ह्या भटजींना श्वास घ्यायलाही फुरसत नसायची.ह्या भटजींनी किती जणांचे विवाह जुळवले आणि लावले ह्याचीही गणती नसेल.
ह्यांना दोन मुली आणि दोन मुलगे होते....भटजींच्या हयातीतच मोठी मुलगी आणि मुलगा उपवर झाले होते पण भटजी काही त्यांच्यापैकी कुणाचेही लग्न जमवू शकले नाहीत. तसे पाहिले तर मुलगा-मुलगी दोघेही दिसायला नीटनीटके होते. भटजी जाईस्तो..मुलीच्या वयाची तिशी उलटली होती पण तिचे लग्न झालेच नाही...आणि तिच्यापेक्षा एखाद वर्षाने लहान असणार्‍या मुलाचेही लग्न झाले नाही. पुढे मोठ्या मुलाने आपल्या वडीलांची गादी चालवायला प्रारंभ केला..व्यवसाय अगदी उत्तम सुरु राहिला...पण बहिणीच्या अथवा स्वत:च्या लग्नाबाबत तो काहीच करू शकला नाही. पाहता पाहता धाकटी दोन्ही भावंडंही उपवर झाली तरी घरात कुणाच्याही विवाहाचे वारे वाहिले नाही.शेवटी मात्र एक चमत्कार झाला...मोठ्या मुलाने परजातीतल्या एका मुलीशी सूत जमवलं आणि परस्पर विवाह करून पौरोहित्याचा व्यवसायही सोडून दिला.
आता धाकटा चालवतोय ती गादी...अजूनही दोन बहिणी आणि तो स्वत: अविवाहित आहेत.मोठी बहीण पन्नाशी ओलांडलेली आणि ही दोन्ही भावंडही चाळीशी पार केलेली...हे सगळं पाहिल्यावर मनात विचार येतो की...हा काय प्रकार आहे? ह्याला योग म्हणावे की भोग म्हणावे? सगळं काही व्यवस्थित असतांना ह्या लोकांच्या जीवनात विवाह योग का नसावा? ज्यांच्या हातून इतरांचे विवाह संपन्न झाले,वेळप्रसंगी त्यांच्या सल्ल्याने लोकांच्या अडचणी दूर झाल्या...मग ह्यांचा काय दोष म्हणून हे असेच कोरडे राहिले?

अजून असंच एक कुटुंब पाहिलं. दोन बहिणी आणि दोन भाऊ. त्यातल्या मोठ्या बहिणीने प्रेमविवाह केला...पण बाकीचे तिघेही अजूनपर्यंत अविवाहित आहेत...आजच्या घटकेला मोठा भाऊ साठी पार केलेला आणि दुसरे दोघे भाऊ-बहीण साठीच्या उंबरठ्यावर आहेत. आजवरच्या आयुष्यात कैक लोकांच्या लग्नाला ह्यांनी हजेरी लावली असेल...त्यावेळी काय वाटत असेल त्यांना?

जगात असे किती तरी लोक आहेत ज्यांची एक नाही चांगली दोन दोन तीन तीन लग्न झालेली आहेत/होत आहेत. पण असे कैक लोक आहेत ज्यांच्या आयुष्यात हा योगच नाहीये. कैक वेळेला आपण पाहातो...अगदी व्यंग असणार्‍या लोकांची...अंध,मूक-बधिर लोकांचीही लग्नं होतांना दिसतात पण ह्या धडधाकट, कामधंदा,व्यवसाय व्यवस्थित सांभाळणार्‍या काही लोकांची लग्न कधीच होत नाहीत?

मी दिलेली उदाहरणे प्रातिनिधिक आहेत. ह्यात काही ठिकाणी वैयक्तिक,अनुवंशिक इत्यादी बाबी अशा असतीलही ज्या ह्या लग्न जुळण्याच्या आड येत असतील...तरीही समाजात आज एकूणच अशा अविवाहित लोकांचे प्रमाण वाढताना दिसत आहे.

काय म्हणावे ह्याला? योग,भोग की अजून काही?

२१ ऑगस्ट, २०१०

माझ्या लग्नाची चित्तरकथा !

इ-बूक चा एक प्रयोग म्हणून हा लेख एकत्रित स्वरूपात इथे टाकत आहे. कसा वाटतोय ते सांगा.

माझा तरूण मित्र सचिन उथळे-पाटील ह्याची ही करामत आहे...तेव्हा त्याचं अभिनंदन करा.

२० ऑगस्ट, २०१०

दिवाळी अंकासाठी साहित्य पाठवा !

मंडळी आता आपल्याला वेध लागलेत दिवाळी अंकाचे. दिवाळीचे स्वागत आपणही करूया साहित्याच्या निरनिराळ्या प्रकारांनी.
तेव्हा चला,उठा आणि सज्ज व्हा आता.

आपल्या दिवाळी अंकासाठी कोणताही एक विशिष्ट असा विषय नाहीये. लेख,कविता,निबंध,कथा(लघुकथा,दीर्घकथा),विनोद,विडंबन, प्रवासवर्णन,व्यक्तीचित्र,आत्मकथन-अनुभव इत्यादि लेखनप्रकार आणि छायाचित्रण,व्यंगचित्र,ध्वनीमुद्रण,ध्वनीचित्रमुद्रण वगैरे पद्धतींचा अवलंब करूनही आपण साहित्य पाठवू शकता.

साहित्य कोणते हवे?
१)दिवाळी अंकासाठी ताजे आणि आत्तापर्यंत अप्रकाशित साहित्यच हवे.
२) आपला दिवाळी अंक प्रकाशित होईपर्यंत आपण इथे पाठवलेले साहित्य कोणत्याही परिस्थितीत कुठेही...अगदी आपल्या जालनिशी/ब्लॉगवरही प्रकाशित करायचे नाही.


साहित्य कसे पाठवावे?
१) लेखी साहित्य एचटीएमएल अथवा डॉक्युमेंट सदरात पाठवावे...पीडीएफ स्वरूपात नको.
२) आपल्या साहित्यासोबत जर काही छायाचित्रं असतील तर ती वेगळी जोडावीत(अटॅचमेंट).
३)ध्वनीमुद्रणं...एम्पी३ प्रकारात, ध्वनीचित्रमुद्रणं .flv किंवा .avi स्वरूपात पाठवावीत.
४)छायाचित्र jpeg, png, gif, tiff ह्या प्रकारात असावीत.
साहित्य पाठवण्याचा पत्ता... attyanand@gmail.com असा आहे.
साहित्य पाठवण्याची शेवटची तारीख आहे १५ ऑक्टोबर २०१०


दिवाळी अंक प्रकाशनाची तारीख योग्य वेळी जाहीर केली जाईल.

१४ ऑगस्ट, २०१०

’जालवाणी’ ह्या ध्वनीमुद्रित अंकाचे प्रकाशन!

मंडळी आज मला हे जाहीर करायला आनंद होतोय की आपल्या सर्वांच्या सहकार्याने आणि साक्षीने जालवाणी हा पहिला-वहिला ध्वनीमुद्रित अंक प्रकाशित होत आहे. ह्या अंकात आपल्याला गद्य आणि पद्य अभिवाचन ऐकायला मिळणार आहे.

जालवाणीचा दुवा सगळ्यांसाठी... http://jaalavaani.blogspot.com/


ह्या अंकाचे मानकरी आहेत...संकेताप्रमाणे आधी स्त्रियांची नावं देतो.
१)मीनल गद्रे, २) कांचन कराई ३) श्रेया रत्नपारखी, ४)अपर्णा लळिंगकर, ५)अनुजा पडसलगीकर, ६)अनुजा मुळे उर्फ झुंबर, आणि ७) तन्वी देवडे

आता ह्यानंतर पाळी आहे पुरूष मानकर्‍यांची...
१)विनायक रानडे, २) महेंद्र कुलकर्णी, ३) नरेंद्र गोळे, ४)सुधीर काळे, ५)गंगाधर मुटे, ६)हेरंब ओक, ७) विद्याधर भिसे,८)सोमेश बारटक्के, ९)चेतन गुगळे,१०) अमोघ वाघ, ११)दिनेश कोयंडे,१२)विशाल कुलकर्णी,१३)रोहन चौधरी आणि १४) प्रमोद देव


मित्रांनो आणि मैत्रिणीनोही...
हा अंक तसा काही फार देखणा वगैरे नाहीये. जालनिशीच्या एकाच पानावर एकाच ठिकाणी सगळी ध्वनीमुद्रण ऐकण्यासाठी केलेली एक सोय....इतकेच ह्याचे दर्शनी स्वरूप आहे. तेव्हा पहिल्या प्रथम कदाचित आपला भ्रमनिरास झाला असे वाटू शकेल. :)
पण मंडळी, विश्वास ठेवा..जेव्हा आपण एकेक अभिवाचन ऐकू लागाल, तेव्हा आपले आधीचे मत नक्कीच बदललेले असेल...आपण निश्चितच तृप्त झालेले असाल...ह्याची मला खात्री आहे.

ह्या अंकाच्या निमित्ताने काही तांत्रिक गोष्टी मला शिकायला मिळाल्या हा माझ्यासाठीचा एक वैयक्तिक फायदा. ह्यापुढेही अशाच प्रकारचे अंक आम्ही काढत राहू, तंत्रज्ञान जेवढे आम्ही आत्मसात करू तेवढी त्यात अजून जास्त सफाई, देखणेपणा, आकर्षकपणा इत्यादि येईल ह्याबाबत माझ्या मनात शंका नाही.

जाता जाता एक सांगतो की अंकाला मिळणारा लेखक-अभिवाचकांचा प्रतिसाद सुरुवातीला अतिशय क्षीण असा होता...आणि नंतर हळूहळू वाढत आत्ता शेवटच्या क्षणी मात्र तो अचानक ढगफुटी व्हावा तसा येऊन आदळला. तेव्हा माझी सर्वांना विनंती आहे की पुढच्या अंकाच्या वेळी कृपया असे होऊ देऊ नका. शेवटी आलेली अनेक ध्वनीमुद्रणं वेळेअभावी मी ह्यात समाविष्ट करू शकलेलो नाहीये ह्याबद्दल क्षमस्व...मात्र ही ध्वनीमुद्रण पुढच्या अंकात जरूर प्रकाशित होतील ह्याची खात्री बाळगा.

अजून एक जाता जाता सांगतो की...आमच्या दिवाळी अंकाच्या घोषणेकडे लक्ष ठेवून असा....लवकरच त्याबाबतचे निवेदन निघणार आहे.

मीनल गद्रे, कांचन कराई,विद्याधर भिसे ह्यांचे विशेष आभार एवढ्याचसाठी की त्यांनी...इतरांनाही आपला आवाज दिला.

संपादनाच्या छोट्यामोठ्या गोष्टीत साहाय्य केल्याबद्दल श्रेया रत्नपारखी ह्यांचेही विशेष आभार.

कळावे,

आता भेटूया...दिवाळी अंकासोबत.

६ ऑगस्ट, २०१०

मी मार खाल्ला !

ही कहाणी साधारण ३० वर्षांपूर्वीची आहे. नेहमीप्रमाणेच कार्यालयात जायला उशीर झाला होता म्हणून ९-४७ ची चर्चगेटला जाणारी जलद गाडी कशीबशी मी मालाडहून पकडली. ही गाडी जोगेश्वरी ते मुंबई सेंट्रल स्थानकांदरम्यान थांबणार नव्हती. त्यामुळे झटपट पोचता येणार होते.आधी दारातच लटकत होतो;पण दमादमाने जोगेश्वरीपर्यंत बराचसा आत पोचलो. गाडीला मरणाची गर्दी होती आणि त्यातच पंखे बंद होते. हे म्हणजे नेहमीसारखेच होते. म्हणजे काय की ऐन थंडीत हे पंखे अगदी सुसाट फिरतात आणि ऐन उन्हाळ्यात संप पुकारतात अगदी तसेच...... ऐकायचेय ही कहाणी..तर ऐका.


३० जुलै, २०१०

पोलिसी खाक्या !

त्या दिवशी गाडीला नेहमीपेक्षा जरा जास्तच गर्दी होती तरीही मी कसाबसा चढलो. मागून लोक लोटतच होते त्यामुळे थोडा आत आणि सुरक्षित जागी पोचलो. हातात असलेली जड ब्रीफकेस वरती फळीवर ठेवायला दिली आणि व्यवस्थित तोल सांभाळून उभे राहता यावे म्हणून दोन्ही हातांनी वरच्या कड्या पकडल्या. मालाडला चढलो होतो तेव्हा जेवढी गर्दी होती त्यात अंधेरी पर्यंत वाढच होत गेली आणि मग तर श्वास घेणेही मुश्किल होऊन गेले. एकमेकांचे उच्छ्वास झेलत लोक कसे तरी प्रवास करत होते. त्यात काही पंखेही बंद होते. कुणीतरी उत्साही तरूण त्यात कंगवा घालून त्याचे पाते फिरवून पंखा सुरु होतो का असला प्रयत्नही करून पाहात होता.........ऐका हा अजून किस्सा.

२९ जुलै, २०१०

भीमटोला !

भीमटोला! काय जबरदस्त शब्द आहे ना! त्या शब्दातच सगळं वर्णन आलंय.
आता तो शब्द आठवायचं कारण काय म्हणाल तर....
सांगतो. नीट, सविस्तर सांगतो.

२८ जुलै, २०१०

पुनर्जन्म!

मित्रहो इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलेकम्युनिकेशन क्षेत्रात माझी पुरी हयात गेली तरीही आज मी पूर्णपणे एक सामान्य व्यक्ती म्हणून जगतोय. म्हणजे असं की जेव्हा जे करायचं ते हिरीरिने केलं,त्यात बर्‍याच अंशी प्राविण्यही मिळवलं; मात्र आता ते सगळं सगळं जाणीवपूर्वक विसरलोय. राहिलेत फक्त काही कडू-गोड आठवणी. त्यातलीच एक इथे सांगतोय. पाहा तुम्हाला आवडते का?

२७ जुलै, २०१०

छोमा

हे अभिवाचन आहे एका छोट्या मुलीच्या हुशारीचे...ऐका तर खरं.

२५ जुलै, २०१०

सामनावीर

सामनावीर ह्या माझ्या ह्या आधी लिहिलेल्या किस्स्याचे  अभिवाचन ऐका. ज्यांना वाचण्याऐवजी ऐकायला आवडतं अशांच्या सोयीसाठी मी ह्यापुढे वेळोवेळी आणखी इतर किस्स्यांचे अभिवाचनही सादर करणार आहे.

पावसाचे गाणे

ही कविता मी चक्क पाडलेय...आपल्याला का नाही जमत बरं कविता? असा विचार करत करत शब्द एका पाठोपाठ मांडत गेलो,पुसत गेलो,पुन्हा मांडत गेलो आणि त्यानंतर जे काही तयार झालं ते आपल्या पुढे ठेवलंय. आता तुम्हीच ठरवा की ह्याला कविता म्हणायच की नाही ते.

२० जुलै, २०१०

कांदे-पोहे

संजय, अरे ए संजय. कुठे आहेस?

ताई, मी इथे आहे,झाडांना पाणी घालतोय.

अरे,पाणी कसलं घालतो आहेस....चल,लवकर. आपल्याला आत्ताच्या आत्ता जायचंय.

कुठे? आणि इतक्या घाईत...अगदी लगीनघाई असल्यासारखी तू मागे लागलेस?

अरे बाबा, आता घाई करायलाच हवी...लग्न काय होणारच आहे....पण आधी मुलगी नको पाहायला?

कोणती मुलगी? कुणाची मुलगी आणि कुणासाठी पाहायचीय?

त्याच्या डोक्यात टपली मारत ताई म्हणाली....ह्या,ह्या आमच्या बावळट बंधूराजांसाठी. चल आता येतोस की बाबांना हाक मारू?...ओ बाबा, हा बघा....

ताई, ताई असं नको ना करूस. बाबांना कशाला हाक मारते आहेस? मी येतो ना....

हाहाहा...बाबा नाहीचेत मुळी घरात...ते केव्हाच गेलेत.

गेलेत? कुठे?

कुठे म्हणजे काय? वेंधळाच आहेस की तू.....चार दिवसांपूर्वीच नाही का ते समेळकाका म्हणत होते...त्यांच्या माहितीतली एक मुलगी आहे लग्नाची....तिलाच पाहायला जायचंय आपल्याला....बाबा, गेलेत समेळकाकांना आणायला....तेही असणार आहेत आपल्या बरोबर.


समेळकाकांना घेऊन बाबा आले आणि मग आपला कथानायक निघालाय मुलगी पाहायला...बरोबर ताई आणि तिचे यजमानही आहेत बरं का. आपल्या लाडक्या भाऊरायासाठी बायको कशी अगदी अनुरुप पाहिजे नाही का...तेव्हा तिची  पसंती सर्वात आधी...आणि घरात सगळ्यांनीही ते मान्य केलंय. 

हॅलो, मी समेळ बोलतोय. आम्ही आलोय आपल्या घराच्या आसपास. यायचं का त्यांना घेऊन.

समेळसाहेब, जरा अर्धा-एक तास कुठे तरी थांबू शकाल काय? काय आहे.....

काय झालं नानासाहेब? काही गंभीर अडचण?

अहो नाही हो, सुकन्याला पाहायला आत्ताही एक मुलगा येऊन बसलाय....त्याच्याच तजविजीत व्यस्त आहे सद्द्या. तेव्हा जरा तुमच्या बरोबरच्या मंडळींना कुठे तरी फिरवून आणा ना....त्यानिमित्ताने थोडेसे मुंबई दर्शनही होईल...हा हा हा....नानासाहेबांनी तेवढ्यात एक माफक विनोद करून घेतला.

बरं,बरं नानासाहेब. करतो तशी व्यवस्था.

समेळसाहेबांनी,चक्रधराला गाडी चौपाटी कडे घ्यायला सांगितली.मंडळी चौपाटी पाहून आणि त्याहूनही तिच्यापुढे पसरलेला अथांग सागर पाहून भारावून गेले.

समेळसाहेब....अहो, इथे कुठे आणलंत? आपल्याला मुलीच्या घरी जायचं होतं ना?

बाबासाहेब, काय आहे....समेळसाहेब चांचरले.

अहो, काय ते स्पष्ट सांगा...असे चांचरू नका.

बरं सांगतो.  अहो, त्या मुलीला पाहायला अजून एकजण येऊन बसलाय...तिकडे त्यांचा कांदे-पोह्यांचा कार्यक्रम उरकला की आपला सुरु होईल...असे नानासाहेब म्हणत होते....म्हणून थोडा वेळ आपण इथे आलोय.

असं आहे काय? बरं, हरकत नाही. बाकी एका अर्थाने तेही बरंच झालं...एरवी ही विशाल चौपाटी आणि हा अथांग सागर आमच्यासारख्या छोट्या गावात राहणार्‍यांना कधी हो पाहायला मिळणार होता.

बाबासाहेबांनी समजुतीने जरी घेतले तरी संजय भडकलाच....हे काय समेळकाका, आपल्याला वेळ देऊनही बाहेरच्या बाहेर असे ताटकळत  ठेवणे शोभते का तुमच्या त्या नानासाहेबांना?
मी आता त्या मुलीला पाहणारच नाही....माझा निश्चय पक्का झाला.

अरे भाऊ, असं रे काय? लगेच डोक्यात का राख घालून घेतो आहेस?

ते मला काही माहीत नाही. ते लोक स्वत:ला काय समजतात?

भाऊराया, अरे जरा सबूरीने घे रे.

हे काय? तुम्ही मलाच का सांगताय सगळे? खरे तर त्या मुबाला(मुलीच्या बापाला) तुम्ही चांगले झापायला हवंय...त्याऐवजी मलाच गप्प बसायला सांगताय? ते काही नाही...मला त्या मुलीला पाहण्याची अजिबात इच्छा नाहीये.

बाबासाहेबांनी फक्त संजयकडे एकदा करड्या नजरेने पाहिले आणि....

बरं. तुम्ही आता म्हणताय तर पाहीन म्हणतो.....बाबासाहेबांच्या नजरेतला आज्ञार्थी भाव ओळखून संजयने लगेच नांगीच टाकली.

संजयने मग हळूच ताईला इशारा करत बाजूला नेले...समुदाच्या पाण्यात पाय ओले करण्याच्या निमित्ताने ते त्या सगळ्यांपासून जरा दूर आले. लगेच संजयने ताईला निक्षून सांगितले....बाबांच्या आज्ञेमुळे मी माझा निर्णय जरी बदललेला असला तरी ह्या मुलीला मी अजिबात पसंत करणार नाही...मग ती तुला आवडो अथवा भले ती कितीही सुंदर असो...माझा निर्णय पक्का आहे....ही मुलगी मला नापसंत आहे.

बरं बाबा..तुला जे करायचंय ते कर. पण आता हे बाबांसमोर बोलू नकोस बरं का.
चल, आता बाबा बोलावताहेत.


नानासाहेबांचा संदेश मिळताच गाडी तिकडे वळवण्याचा आदेश चक्रधराला देत समेळ साहेबांनी एक सुटकेचा नि:श्वास सोडला. थोड्याच वेळात ते सगळेजण तिथे पोहोचले. स्वागताला खुद्द नानासाहेब ह्जर होते. झाल्या प्रकाराबद्दल बाबासाहेबांकडे दिलगिरी प्रदर्शित करत नानासाहेब त्या सगळ्यांना आत घरात घेऊन आले.
सुरुवातीचे ओळखीचे सोपस्कार पार पडल्यानंतर मग मंडळी थोडीशी सैलावली. मोठ्या माणसांच्या हवा-पाण्याच्या आणि राजकारणाच्या गप्पा सुरु झाल्या...ज्या कारणासाठी इथे ते सगळे जमलेत ते सगळं विसरून.

इथे संजय मात्र वैतागलेलाच होता. अजूनही त्याचा राग धुमसत होता. आपल्या ताईला तो सारखा सांगत होता...ए ताई, बाबांना सांग ना....आपण आता निघूया म्हणून. बस्स झाले हे सौजन्याचे नाटक.

अरे,वेडा आहेस काय तू? अजून मुलीला कुठे पाहिलंय ? आणि कांदे-पोहे खायचे नाहीयेत का? ;)

ताईच्या त्या तसल्या मिस्किल बोलण्यामुळे एरवी जरी संजय लाजला असता तरी ह्यावेळी मात्र तो तिच्यावर चांगलाच उखडला होता....मी आधीच सांगितलंय ना तुला....मला ह्या मुलीला अजिबात पाहायचे नाहीये...मग कशाला उगाच हा देखावा?

हे सगळं बोलणं कुजबुजीच्या स्वरूपातच सुरु होतं....कारण बाबासाहेबांसमोर संजयची कोणतीच मात्रा चालू शकत नव्हती...पण ही कुजबुज पाहून नानासाहेबांना जाणवलं की मुलगा मुलीला पाहण्यासाठी फारच अधीर झालाय...तेव्हा आता जास्त उशीर नको म्हणून त्यांनी आत आवाज देत म्हटलं.....अहो, ऐकलंत का. मुलाकडची मंडळी खोळंबलेत....जरा मुलीला पाठवा पाहू.

नानासाहेबांच्या त्या आज्ञेमुळे माजघरातली लगबग एकदम वाढली. स्वयंपाक घरातून कपबशांचा किणकिणाट ऐकू येऊ लागला. इथे संजय अजूनच अधीर झालेला....कधी एकदा ह्यातून सुटका होतेय ह्याची वाट पाहात निमूटपणे बसण्याव्यतिरिक्त त्याच्या हातात काहीच नव्हतं....तरीही उगाच काही तरी चाळा म्हणून कधी कपाळावरचा घाम पूस ...तर कधी चश्म्याच्या काचा साफ कर अशा अस्वथतेच्या निदर्शक हालचाली त्याच्याकडून होत होत्या.

आणि जिची आतुरतेने सगळेजण वाट पाहात होते ती....मुलगी...घरातल्या इतर वडिलधार्‍या स्त्रियांबरोबर हातात  कांदे-पोह्याच्या बशा असलेले तबक घेऊन आली तेव्हा ... ताईने तिला पाहताच वहिनी पसंत करून टाकली. सगळ्यांच्या नजरा जरी मुलीकडे असल्या तरी संजयने आपली नजर मात्र जमिनीवरच  स्थिरावलेली होती...मुलीला पाहायचं नाही....हा त्याचा ठाम नि:श्चय अजूनही कायम होता. ताईने त्याला कोपराने ढोसले तरीही त्याने तिची दखल घेतली नाही.

मुलगा लाजतोय...असाच अर्थ इतरेजनांनी काढला आणि ते सगळे गालातल्या गालात हसू लागले. मुलीच्या आईने मुलीला इशारा केला....दे,ती कांपोची बशी त्यांला दे....आणि आज्ञाधारकपणाने मुलीने ती बशी मुलासमोर धरत म्हटलं....घ्या ना!!!

तो किणकिणाट ऐकून नकळत संजयची नजर वर गेली...क्षणभर चार डोळ्यांची दृष्टभेट झाली आणि....पुढे काय झाले ते दोघांनाही कळलंच नाही....काही तरी इथून तिथे गेले आणी तिथून इथे आले....असा भास दोघांनाही एकाच वेळी झाला....

संजयच्या ऊरात एक बारीकशी कळ  ऊठली....अरेच्चा...हीच ती...रोज स्वप्नात येते...तीच ही....आणि हिला मी न पाहताच जाणार होतो? छे, छे, छे. भलतंच...किती मोठी चूक मी करणार होतो....बरं झालं....बाबांनी दमात घेतलं ते...बरं झालं ताईने समजावलं ते.....नाहीतर उगाच चांगली सोन्यासारखी संधी.......हा हा हा...अरे खरंच की ’सोन्या’ सारखीच आहे... संधी नव्हे हो....माझी.....
मनातल्या मनात विचार करतांनाही संजय लाजलेला आणि ते त्याच्या चेहर्‍यावर उमटलेलं ताईने हळूच पाहिलं....तिलाही कळलं.....विकेट पडली म्हणून.  :D

हिच्याशी एकांतात बोलायला मिळेल? हिला देखिल आपण पसंत पडू? काहीही असो, पण हिच्याशी बोलण्याची संधी आज साधायलाच हवी....आता नाही तर कधीच नाही....तेव्हा ही संधी सोडायची नाही....

संजयने हळूच ताईला....आणि ताईने हळूच बाबांना....संजयची इच्छा आपोआप नानासाहेबांपुढे पोचली.

बरं का मुलांनो....तुम्हाला आपापसात काही बोलायचं असेल तर आतल्या खोलीत बसा तुम्ही....नानासाहेबांनी इशारा केला. संजय उतावळेपणाने खुर्चीतून उठतांना धडपडला...ताईने हळूच त्याला चिमटा काढत....इतकं काही उतावीळ व्हायला नकोय हं....असं म्हटल्याने तो अधिकच बावरला....पण मुलीच्या भावाने त्याला हाताचा आधार देत  आतल्या खोलीकडे अंगुलीनिर्देश केला.

आतल्या खोलीत संजय आणि सुकन्या समोरासमोर बसलेले...संजयने धीर करून काही विचारण्यासाठी तोंड उघडले आणि तेव्हढ्यात मुलीचा भाऊ....तोच तो आधार देणारा आणि मुलीचा काका....असे दोघेही येऊन त्या दोघांच्यात बसले...संजयचे शब्द घशातल्या घशातच अडकले.  ;)

तुम्ही काय करता?...मुलीच्या भावाचा प्रश्न

मी, अमूक अमूक क्षेत्रात काम करतो.....

अरे वा...मी ही त्याच क्षेत्रातला....

मग काय? संभाषणाचा ताबा मुलीच्या भावानेच घेतला आणी संजय फक्त...हो...नाही...अशी उत्तरं द्यायला लागला...मधून मधून त्याचं लक्ष सुकन्येकडे जात होतं...तीही डोळ्यांच्या कोपर्‍यातून सांडणारं हसू लपवत संजयची तारांबळ पाहात होती आणि मनोमन म्हणत होती....सापडला गं सापडला....हाच तो....असाच भोळा सांब मला हवा होता.



घरी परत येतांना गाडीत बाबा मोठ्यानेच म्हणाले.....काय मग ताई, त्यांना नकार कळवायचा ना?
बाबा.....

ताई पुढे काही बोलण्याच्या आतच संजयने....ही शेवटची संधी...आत्ता नाही तर केव्हाच नाहीच्या अभिनिवेशात  ओरडून सांगितले........बाबा, मुलगी मला पसंत आहे...कळवा त्यांना.

सगळ्याच्या हास्यकल्लोळात आता संजयही सामील झाला.


ही एक सत्यकथा आहे...प्रत्यक्ष नायक-नायि्केच्या तोंडून ऐकलेली....मात्र ह्यातीत व्यक्तिरेखांची नावे,स्थलकाल वगैरे गोष्टी जाणीवपूर्वक बदललेल्या आहेत.