माझ्या आयुष्यातील आजवरच्या कडू-गोड आठवणी मी "पूर्वानुभव" म्हणून सादर करत आहे.
आपण इथे आल्याबद्दल मन:पूर्वक धन्यवाद!

३० ऑक्टोबर, २०१०

पुरूषांचा डबा!

स्त्री-पुरुष भेद हा निसर्गानेच निर्माण केलाय. पुरुष शारीरिक दृष्ट्या बलवान असतो तर स्त्री मानसिक दृष्ट्या बलवान असते.त्यामुळे खरंतर त्यांच्यात सर्वथा समानता असू शकणार नाही हे खरंय...पण काहीएक मर्यादेपर्यंत तरी ती तशी मानता यायला काहीच हरकत नाही कारण स्त्रियाही आता फारशा मागे नाहीत. बौद्धिक,शैक्षणिक बाबींबरोबरच त्या आता जिथे शारीरिक कस लागतो अशा पोलिस,सैन्यदल वगैरे ठिकाणींही नित्यनेमाने दिसू लागलेल्या आहेत. पुरुषांचीच मक्तेदारी समजल्या जाणार्‍या सगळ्या क्षेत्रात आता त्यांनीही भरारी मारायला सुरुवात केलेली आहे. ह्याच जोरावर आता त्या स्त्री-पुरुष समानता मागत आहेत...कैक गोष्टींत ती तशी अनुभवायलाही मिळतेय पण तरीही काही बाबींमध्ये स्त्रियांचा युक्तिवाद कसा चुकीचा असू शकतो हे एका उदाहरणावरून दिसून येईल. खरं सांगायचं तर हा दोष केवळ स्त्रियांचाच नाही तर पुरूषही त्या युक्तिवादाचा जसा प्रतिवाद करतात तेही तेवढेच चुकीचे आणि हास्यास्पद आहे...ते उदाहरण म्हणजे...रेल्वेतील पुरुषांचा डबा. स्त्री-पुरुष वादात नेहमीच सामील होणारे लोक हा ’पुरुषांचा डबा’ कुठून आणतात हे मला तरी आजवर पडलेले कोडे आहे.

केवळ स्त्रियांसाठी,सर्व वेळ स्त्रियांसाठी... असे शब्दप्रयोग असलेले आणि स्त्रीचे चित्र असलेले डबे आपण स्थानिक आणि दूर पल्ल्याच्या रेल्वे गाड्यातून नेहमीच पाहत असतो; पण केवळ पुरुषांसाठी,सर्व वेळ पुरुषांसाठी असा एकतरी डबा रेल्वेत आहे का?...ह्याचा विचार चांगले सुशिक्षित आणि सुसंस्कृत स्त्री-पुरुषही करू शकत नाहीत हे पाहून माझी तर खूपच करमणूक होते.

आता मी जेव्हा म्हणतो की केवळ पुरुषांसाठी असे डबे नसतात...मग स्त्रियांसाठी राखीव डबे सोडले तर इतर डब्यात...जे सर्वसाधारण डबे आहेत...ह्यात स्त्री-पुरुष असे कुणीही प्रवास करू शकतात...अशा ठिकाणी पुरुषांची गर्दी का दिसते? अहो, त्याचे कारण खूपच साधे आहे. प्रवास करणार्‍या पुरुषांची संख्या ही प्रवासी स्त्रियांपेक्षा खूपच जास्त आहे म्हणून हे घडते.पुरुषांच्या अंगी नैसर्गिक असणार्‍या शारीरिक बलाचा त्रास स्त्रियांना सोसत नाही म्हणून त्या अशा सर्वसाधारण डब्यातून सहसा प्रवास करत नाहीत...त्यामुळे झाले काय? पुरूषांना आणि स्त्रियांनाही वाटायला लागलं की हा डबा/हे डबे केवळ पुरुषांसाठीच आहेत...म्हणून वाद-विवादात नेहमी पुरुषांचा डबा असाच वाक्प्रचार वापरला जातो...जो सर्वथैव चुकीचा आहे. आता दुसरी बाजू पाहू...ज्या डब्यातून कायद्याने केवळ महिलाच प्रवास करू शकतात त्यात पुरुषांना प्रवास करण्यास मज्जाव आहे...म्हणून ते इतर डब्यात गर्दी करतात....हसलात ना! माझे विधान तुम्हाला गंमतीशीर वाटेल...पण ते वास्तव आहे. अहो पुरुष प्रवाशांचीच नव्हे तर एकूणच आता स्त्री-पुरुष प्रवाशांची संख्या बेसुमारपणे वाढायला लागल्यामुळे गाड्यांना होणारी गर्दीही अनियंत्रित आहे त्यामुळे हे वाद नेहमीच उद्भवतात. आता स्त्री-प्रवाशांची संख्याही वाढायला लागलेय...तर त्यांनी अजून काही राखीव डबे आम्हाला हवेत अशी मागणी करणे हे एकवेळ समजू शकते...पण पुरुषांना इतके सारे डबे आणि बायकांना फक्त एकच का? असा चुकीचा सवाल करू नये. कारण स्त्रियांसाठीच्या राखीव डब्यातून त्या जसा हक्काने(अर्थात पुरुषांपासून सुरक्षित)प्रवास करू शकतात तसाच हक्काने इतर डब्यातूनही प्रवास करू शकतात...त्यात त्यांना कायदा कधीच आड येत नसतो...त्या उलट स्त्रियांसाठीच्या राखीव डब्यातून
पुरुषाने प्रवास केला तर तो बेकायदेशीर समजून त्याला दंड/कारावास होऊ शकतो....तेव्हा हे लक्षात घ्या...स्त्रियांसाठी संपूर्ण गाडी मोकळी असते..तसे पुरुषांना नसते...

असाच एक विरार लोकलचा मजेशीर अनुभव आहे माझ्या गाठीशी....पश्चिम रेल्वेवर गाडीला जो बायकांचा दुसर्‍या वर्गाचा अर्धा डबा असतो(पहिल्या दर्जाच्या डब्याला जोडून) तो एका विशिष्ट गाडीला सामान्य डबा म्हणून जोडलेला आहे....एकदा काही कामानिमित्त मी चर्चगेटहून दहिसरला जाण्यासाठी जी विरार लोकल पकडली...ती गाडी नेमकी हीच होती....आणि मी त्याच डब्यात चढलो होतो...अगदी बाहेर कोणतेही ’केवळ बायकांसाठी’ असे न लिहिलेले पाहून. पण सवयीने सगळ्या बायका त्यात भराभर चढायला लागल्या..आणि मला गुरकवायला लागल्या..लाज नाही वाटत का तुम्हाला? सरळ सरळ बायकांच्या डब्यात चढलात ते....त्यांचा तो रुद्रावतार पाहून माझ्यासारखे आणखी काही तुरळक पुरुष चढले होते त्यांनी लगेच पलायन केलं....मी मात्र तिथेच बसून राहिलो आणि त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला की हा सामान्य डबा आहे..केवळ तुमच्यासाठी नाहीये....हवं तर बाहेर जाऊन पाहा...तरीही त्या वाद घालायल्या लागल्या....नशीब माझं की त्यातल्या एकीने इमानदारीत बाहेर जाऊन पाहिले आणि मग...अय्या, खरंच की...हा आपला डबा नाहीये...हा तर पुरुषांचा डबा आहे...असे म्हणाली. मी पुन्हा तिची चूक दुरुस्त केली...पुरुषांसाठी..केवळ पुरुषांसाठी असा डबा अस्तित्त्वातच नाहीये....त्यावर त्या बायका आरडा-ओरडा करायला लागल्या..असे कसे तुम्ही म्हणून शकता?ते काही नाही...हा आमचाच डबा आहे...तुम्ही जागा खाली करा नाही तर... थांबा आता आम्ही टीसीला आणि रेल्वे पोलिसांना बोलावतो म्हणजे मग समजेल तुम्हाला....आम्हाला अक्कल शिकवताहेत!
पण मी त्यांना कसेबसे शांत करून... वर सुरुवातीला जे काही लिहीलंय तेच... त्यांना समजेल अशा भाषेत सांगितलं तेव्हा मात्र त्या अवाक्‌ झाल्या.....

मी त्याच गाडीने आणि त्याच डब्यातून शेवटपर्यंत प्रवास केला...पुढे तर अजून गंमत आहे.त्या बायका शांत झाल्यावर मी माझ्या ब्रीफकेसमधून दिवाळी अंक काढून वाचायला सुरुवात केली...होय. त्यावेळी दिवाळीचे दिवस जवळ आलेले होते आणि मी आमच्या कार्यालयात एक छोटेसे वाचनालय सुरु केले होते...माझ्या ब्रीफकेसमध्ये अजून एकदोन अंक होते...ते त्या बायकांनी माझ्याकडून मागून घेऊन त्यांचेही सामुदायिक वाचन सुरु झाले. पुढे प्रत्येक स्टेशनवर फक्त बायकाच चढत होत्या आणि मला पाहून अद्वातद्वा बोलायला सुरुवात करायच्या...पण मग सुरुवातीला ज्यांना मी समजावले होते...त्याच बायका माझी बाजू मांडायला लागल्या. :)
रागावलेल्या एका ठकीने मला हेही विचारले..तुम्हाला बायकांच्यात प्रवास करायला लाज कशी नाही वाटत?
मी म्हटलं...माझ्या घरातही आई-बहीण आहेच की...तुम्ही त्या जागी आहात मला..मग मी कशाला लाजू...तेव्हा ती देखील वरमली होती...
दहिसरला उतरण्याआधी कांदिवलीपासून माझ्या जागेसाठी कैकजणींनी फिल्डिंग लावलेली होती....मी उठलो आणि मग त्या आपापसात मारामार्‍या करत बसल्या.

ह्या गोष्टीला आता खूप वर्ष झाली तरीही आज ’पुरुषांचा डबा’ ही संकल्पना रेल्वेने प्रवास करणार्‍या बहुसंख्य लोकांच्यात टिकून आहे ह्याचे वैषम्य वाटते.

२१ ऑक्टोबर, २०१०

दिवाळी अंक प्रकाशन!

जालरंग प्रकाशनाचा दीपज्योती हा अंक प्रकाशित करतांना मी आज खूप खूश आहे. हा अंक बनवणे म्हणजे एक आव्हान होते आणि ते मी पेलू शकलो ते निव्वळ श्रेया रत्नपारखी आणि कांचन कराई ह्या दोघींच्या भरवश्यावर...अंकाचे हे जे काही सुंदर स्वरूप आपल्याला दिसत आहे ती त्या दोघींची कमाल आहे...मी केवळ नामधारी आहे.

हा आहे दुवा...  

http://diwaaliank.blogspot.com/

असो. आता वाचकांना नम्र आवाहन आहे की त्यांनी हा अंक जरूर वाचावा आणि त्यांच्या बर्‍या/वाईट प्रतिक्रिया नोंदवाव्यात...जेणेकरून आमच्या कामाची पोचपावती आम्हाला मिळेल.

सगळ्यांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा देतांना हा अंक प्रकाशित झाला असे मी जाहीर करतो.

धन्यवाद.

१६ ऑक्टोबर, २०१०

आऽऽग!!!

आज साडेअकराच्या सुमारास मी स्नानाला गेलो. स्नान आटोपून अंग पुसत होतोच इतक्यात काही आवाज यायला लागले. टिकल्या फोडतो ना दिवाळीत असा काहीसा आवाज होता त्यामुळे आधी त्याचे विशेष असे काही वाटले नाही; पण तो आवाज सारखा यायला लागला आणि नीट ऐकल्यावर लक्षात आले की हा ठिणग्या पडण्याचा आवाज असावा. त्याच वेळी काही लोकांच्या ओरडण्याचाही आवाज ऐकला आणि मग नक्की काही तरी वेगळेच घडत असावे ह्याची जाणीव झाली. स्नानघराच्या खिडकीतील झरोक्यातून मी बाहेर झाकून पाहिले आणि...चक्क मला धूर दिसला आणि लक्षात आलं की काहीतरी गंभीर प्रकरण असावे.

मी अंग पुसून तत्काल बाहेर आलो आणि माझ्या सज्जाच्या खिडकीतून जे पाहिले ते खरंच चिंताजनक होते. आमच्या इमारतीपासून ४०-५० फुटावर असलेल्या ८ मजली इमारतीच्या दुसर्‍या मजल्यावरूनच तो ठिणग्या पडण्याचा आवाज येत होता(अर्थात ठिणग्या दिसत नव्हत्या) आणि त्या घरातून येणार्‍या धुराचे प्रमाण वाढत होते. खाली जमा असणारी मंडळी नुसती एकमेकांना ती घटना,जागा दाखवून आपापसात काही तरी बोलत होती. इमारतीचे सुरक्षारक्षकही इकडून तिकडे धावताना दिसत होते पण त्यापैकी कुणीही त्या घरात जाऊन नेमकं काय झालंय/होतंय हे पाहण्याची हिंमत करत नव्हते.

इकडे धूर वाढतच होता...अजून आग लागलेली दिसत नव्हती. काही लोकांच्या कानाला चिकटलेले भ्रमणध्वनी बहुधा अग्निशमन दलाला आमंत्रण देण्याचे काम करत असावेत. आणि पाहता पाहता अचानक आगीचे लोळ उठले...आता त्या सदनिकेच्या सज्ज्यातील काही गोष्टींनीही पेट घेतला. माझ्या घरातून जे दृश्य दिसत होते ते खूपच भयानक होते. त्यातच त्या सज्ज्यात एक गॅसची टाकी होती(रिकामी की भरलेली..कुणास ठाऊक). ती टाकी पाहूनच माझी मुलगी भिती व्यक्त करत होती...बाबा , ही टाकी फुटली तर..आग अजून भडकेल आणि मग काही खरं नाही...तुम्ही करा ना अग्निशमनदलाला फोन.
मी म्हटलं...अगं इतकी लोकं हातात फोन घेऊन आहेत...नक्कीच त्यांनी कळवलं असेलच त्यांना..येतच असतील ते लोक. तरीही मलाही तिची काळजी योग्य वाटत होती म्हणून मी १०१ क्रमांकावर संपर्क साधला. लगेच तिकडनं विचारणा झाली...
साहेब, मी एन एल हायस्कुलजवळून बोलतोय. माझ्या मागच्या इमारतीत दुसर्‍या मजल्यावर आग लागलेय.

हो,हो! आम्हाला खबर मिळालेय...थोड्या वेळापूर्वीच ६ गाड्या रवाना झाल्या आहेत...येतीलच इतक्यात.

साहेब, अहो आग खूप जोरात पसरतेय आणि जिथे आग लागलेय तिथेच एक गॅसची टाकी आहे....

किती माळ्याची इमारत आहे?

८ माळ्याची आहे इमारत...आणि आग २र्‍या मजल्यावर आहे.

त्यांनी फोन बंद केला आणि तेवढ्यात गाड्यांचे भोंगे ऐकू यायला लागले...जरा जीवात जीव आला. :)

अग्निशमन दल येऊन तर पोचलं...आग किती झपाट्याने पसरतेय हे तेही पाहत होते...पण का कुणास ठाऊक त्यांच्या हालचाली अतिशय मंद होत्या...निदान मला तरी तसे दिसत होते. थोड्या वेळाने मग त्यांनी त्यांचे जलफवारणी अस्त्र आणलं. दोनदोन जणांच्या दोन जोड्यांनी आपल्या जागा पकडल्या आणि फवारणीला सुरुवात करणार.....तोच खूप जबरदस्त असा स्फोट झाला...अशद(अग्निशमनदल) जवानांसकट सगळे आडोशाला धावले. स्फोट इतका जबरदस्त होता की त्या सज्ज्याच्या काचा,लोखंडी जाळी वगैरे कुठच्या कुठे फेकले गेले. माझ्या खिडकीवरही काही तुरळक तुकडे येऊन आदळले.

ह्या स्फोटातून सावरल्यानंतर मग हळूहळू अशद जवान बाहेर आले आणि मग त्यांनी आग विझवण्यासाठी खालूनच पाण्याची फवारणी सुरू केली. आधी आग फक्त दुसर्‍या मजल्यावरच होती पण स्फोट झाल्यामुळे ती पाचव्या मजल्यापर्यंत पोचली. तिसरा,चौथा आणि पाचव्या मजल्यावरही हळूहळू आग पसरत चाललेली पाहून पुढे काय होणार आहे ह्याची काळजी मी करत होतो...पण तरीही मला अशद जवानांच्या केवळ खाली उभे राहून पाणी मारण्याच्या मागचे प्रयोजन कळले नाही.
खाली उभे राहून फक्त इमारतीच्या बाहेर लवलवणार्‍या आगीच्या ज्वालाच फक्त दिसत होत्या पण इथे तर दुसर्‍या मजल्याच्या सदनिकेच्या आत आग पेटलेली दिसत होती...आणि त्याच वेळी वरच्या काही मजल्यांवरची आगही वाढत होती. अशा वेळी वापरावयाच्या कोणत्याच शिड्या ह्या जवानांजवळ दिसत नव्हत्या...हे खरंच आश्चर्य होते.

असो.त्यांचे काम ते जाणोत. जवळपास दीड तासांच्या अथक प्रयत्नानंतर ती आग आटोक्यात आली...सुदैवाने जीवितहानी झाली नाही पण अर्थात त्या स्फोटाच्यावेळी कुणी जखमी झाले असण्याची दाट शक्यता आहे.वित्तहानी मात्र जबरदस्त झालेय हे नक्की.

आता ह्यानंतर मनात निर्माण झालेले काही विचार...
१)अशा आपत्काली कुणी तरी खमकी व्यक्ती आसपास असावी लागते...जी अशावेळी लोकांना योग्य ते मार्गदर्शन करू शकते.
२)इमारतीच्या सुरक्षारक्षकाबरोबरच इमारतीत राहणार्‍यांपैकी काही जणांना अशा आपत्काली पोलिस/अग्निशमनदल वगैरेंची मदत येईपर्यंत किमान काय काळजी घ्यावी/झटपट कारवाई करावी ह्याबद्दलची माहिती असायलाच हवी....कारण आधी नुसत्या ठिणग्या आणि मग धूर येत असताना किमान त्या घरात येणार्‍या विजेचा मूळ स्रोत बंद करायला हवा होता(इलेक्ट्रिकचे मेन स्वीच)...पण हे त्यांनी का नाही केले?

ही इमारत आठ मजल्यांची आहे...म्हणजे मुंबई नगरपालिकेच्या कायद्याप्रमाणे कोणत्याही सहा मजल्यावरील इमारतीत अग्निशमन करण्यासाठीची यंत्रणा बसवावी लागते..जी कदाचित इथे बसवलेली नसेल...अथवा असूनही त्याचा योग्य तो वापर कसा करावा ह्याबद्दलची जाणकारी सुरक्षारक्षकांसकट कुणालाही नसावी..एरवी आधी क्षुल्लक असलेले ठिणग्या पडणे...आगीच्या लोळापर्यंत पोचलेच नसते.

ता.क.: घटना घडून गेली...आगही विझून आता जवळपास दोन तास झालेत तरीही अजून अग्निशमनदल तिथे पंचनामा,चौकशी इत्यादीत गुंतलेलं आहे...आता होईल पुढची कारवाई...त्यानंतर पुन्हा जैसे थे!
जाता जाता: आमची इमारतही ७ मजल्याची आहे आणि आश्चर्य म्हणजे इथेही अशी काही अग्निशमनाची सोय नाहीये...आता एक आपत्कालीन सभा बोलावून आम्हालाही काही तरी नक्कीच निर्णय घ्यावे लागतील..पाहूया लोक किती गांभीर्याने घेतात ते.


ह्या आगीची आणि त्यानंतरची काही क्षणचित्रे पाहा.











७ ऑक्टोबर, २०१०

नाट्यसंगीत !

माझी नाट्यसंगीताबद्दलची काही निरीक्षणं ह्यात नोंदवलेली आहेत...मी जे काही गाऊन दाखवलंय..ते मूळ स्वरूपातही उपलब्ध असल्यामुळे त्याचे विजेट्सही सोबत जोडलेले आहेत...माझ्या गाण्याऐवजी श्रोत्यांनी मूळ स्वरूपातली गाणी नीट लक्ष देऊन ऐकावीत म्हणजे मला काय म्हणायचंय ते त्यांच्यापर्यंत निश्चितपणे पोचेल.

ऐका माझं निरूपण:


राम मराठे: जय शंकरा!


भरे मनात सुंदरा:प्रसाद सावकार


बसंतकी बहार आयी-जुगलबंदी: राम मराठे आणि प्रसाद सावकार