माझ्या आयुष्यातील आजवरच्या कडू-गोड आठवणी मी "पूर्वानुभव" म्हणून सादर करत आहे.
आपण इथे आल्याबद्दल मन:पूर्वक धन्यवाद!

३१ मार्च, २०१२

आता थांबूया!

जालरंग! जालरंग ह्या नावाने आपण एक आभासी प्रकाशन संस्था  स्थापन  केली आणि पाहता पाहता तिच्या नावाने आजवर १२ अंक प्रकाशित केले की! विश्वास नाही बसत ना! पण हे ढळढळीत वास्तव आहे.



आजवर जालरंगने केलेली वाटचाल पाहता काही गोष्टी नमूद कराव्याश्या वाटतात...सुरुवात मी एकट्याने केली होती पण लगेच खूप मदतीचे हात आले आणि एकाचे अनेक हात झाले आणि मग प्रस्ताव आला की हे अंक आपण एखाद्या विशिष्ट नावाने प्रकाशित केले तर? प्रस्ताव मान्य झाला..मग अनेकजणांनी अनेक नावं सुचवली आणि निवडणूक प्रक्रियेतून ’जालरंग प्रकाशन’ हे नाव निश्चित झालं....त्यानंतर मग ह्या प्रकाशनाचं एखादं ओळखचिन्ह असावं असा प्रस्ताव आला...अनेकांनी आपापल्या कल्पनेप्रमाणे ओळखचिन्ह बनवली...इथेही निवडणूक प्रक्रियेने ओळखचिन्ह ठरवण्यात आलं ते आपलाच एक सहकारी विशाल कुलकर्णीने बनवलेलं होतं...आणि मग लोक उत्साहाने अंक बनवण्यासाठी मदत करू लागले.... ही मदत लेखन स्वरूपातली होती जी अतिशय आवश्यक होती...ज्यामध्ये महाजालावरील प्रथितयश लेखकांनीही आपला सहभाग नोंदवला...पडद्याच्या मागे तांत्रिक मदतीसाठी मात्र फारसे लोक सहभागी होऊ शकले नाहीत...सुरुवातीला जे तीन चार जण होते त्यातले बहुतेक लोक वैयक्तिक व्यस्ततेमुळे पुढे सक्रिय राहू शकले नाहीत...आणि केवळ राहिली ती म्हणजे श्रेया रत्नपारखी...ती अगदी आपल्या ’हास्यगाऽऽरवा २०१२’ ह्या शेवटच्या अंकापर्यंत...आता तिनेही तिच्या वैयक्तिक जबाबदार्‍या वाढल्यामुळे ह्यापुढे काम करण्यास असमर्थता प्रकट केलेय....एकूणात पुन्हा मी एकटाच उरलोय...जिथून सुरुवात केली तिथेच परत आलो..एक वर्तुळ पूर्ण झाले...तेव्हा आता ठरवले..बस्स! इथेच थांबायचे!

अंक काढून काय मिळवलं? ह्याची बरीच उत्तरे आहेत...ज्यातली काही आवडणारी तर काही नावडणारी आहेत...
अंक काढण्यात माझा वैयक्तिक फायदा असा झाला की माझा स्वत:चा वेळ उत्तम गेला आणि अंक संपादनाच्या निमित्ताने साहित्यातील वैविध्यता पुरेपूर अनुभवता आली.
अंकाला लेखकांचा पाठिंबा भरपूर प्रमाणात मिळाला...प्रथितयश लेखकांच्या बरोबरीने नवोदित लेखकांनीही आपली हजेरी लावली हे विशेष नमूद करण्यासारखे आहे.
होळीच्या निमित्ताने निघणार्‍या खास विनोदी साहित्यासाठीच्या ’हास्यगाऽऽरवा’ अंकाला मात्र अपेक्षेपेक्षा खूपच कमी साहित्यपुरवठा झाला....बाकी एरवी इतर अंकांना भरगच्च म्हणावे इतका साहित्यपुरवठा झाला...ह्या अंकांच्या निमित्ताने आपल्यातल्याच काही लोकांना संपादकीय लिहिण्याची विनंती करण्यात आली आणि सांगायला आनंद वाटतो की सगळ्यांनी आपापले संपादकीय अतिशय उत्तम असे लिहिले...अंकांना आलेल्या प्रतिसादांपैकी अर्ध्यापेक्षा जास्त प्रतिसाद ह्या संपादकीयांना आहेत हीच त्याची पोचपावती समजता येईल.....
एकाही पैशाचा व्यवहार नसलेली अशी ही प्रकाशनसंस्था..बहुदा जगाच्या पाठीवरील पहिलीच असावी.  :
इथे एक गंमत सांगायला हरकत नाही.....जालरंगचे नाव वाचून एक दोघांनी ही संस्था व्यावसायिक स्वरूपाची प्रकाशन संस्था आहे असे समजून काही विचारणा केली होती....त्यातली एक विचारणा म्हणजे....एक लेखक म्हणून लेखकाचा त्याच्या लेखनावर किती अधिकार असतो, त्याला मानधन एकरकमी मिळते की काही अन्य पद्धतीने....
आणि दुसरी विचारणा....मला आपल्या अंकात जाहिरात द्यायची आहे....माझी जाहिरात अमूक अमूक इतकी लहान/मोठी आहे तर त्यासाठी किती आकार(पैशांच्या स्वरूपात) द्यावा लागेल?
आता ह्यांना मी काय उत्तर देणार?
मी जेव्हा सांगितले की,"अहो ही आमची आभासी संस्था आहे...आम्ही कुणाला मानधन देत नाही आणि कुणाकडूनही मानधन घेत नाही....जाहिराती वगैरे आम्ही छापत नाही.आमच्या संस्थेत एकाही पैशाचा व्यवहार होत नाही"...तेव्हा त्यांचा विश्वासच बसेना!
ही झाली काही आवडणारी उत्तरं...

आता काही नावडणारी..पण वास्तववादी उत्तरं....
अंकाला जितका साहित्यिकांचा भरपूर पाठिंबा मिळाला त्या मानाने वाचकांचा..विशेष करून प्रतिसादकांचा  मिळालेला प्रतिसाद अतिशय असमाधानकारक आहे.
आपल्या साहित्यिकांमध्ये महाजालावर अतिशय लोकप्रिय असे जे जालनिशीकार आहेत त्यांचा सहभाग असूनही...त्या त्या जालनिशीकारांच्या वैयक्तिक वाचक/चाहत्यांना जालरंगकडे आकर्षित करू शकलो नाही...थोडक्यात ह्या लेखकांना ना जालरंगाचा फायदा झाला ना जालरंगाला त्यांच्या लोकप्रियतेचा....एकूण काय तर आपल्या अंकात नामवंत लेखकांचे साहित्य असूनही वाचकांनी आपल्याला दिलेला अत्यल्प प्रतिसाद हा नाऊमेद करणारा आहे...जालरंगने अंकांमध्येही वैविध्य ठेवले होते...ध्वनीमुद्रित स्वरूपाचा ’जालवाणी’सारखा अंक देऊनही आपण रसिक वाचकांना आपल्याकडे आकर्षित करू शकलो नाही....ह्या आघाडीवर आपण कधीच प्रगती करू शकलो नाही....ह्याची कारणमीमांसा कशी करावी हे आजवर मला तरी समजलेलं नाही...माझ्या दृष्टीने हे न सुटलेले एक कोडेच आहे.

गंमतीने असे म्हणावेसे वाटते की....शस्त्रक्रिया यशस्वी झाली....पण रूग्ण वाचू शकला नाही. :)
तसंच काहीसं जालरंगचं झालं. 

म्हणूनच म्हणतो आता इथेच थांबूया!

७ मार्च, २०१२

होळीविशेषांक ’हास्यगाऽऽरवा २०१२’चे प्रकाशन!

मंडळी ज्याची आपण अगदी आतुरतेने वाट पाहात होता तो आपला होळी विशेषांक ’हास्यगाऽऽरवा २०१२’ आज होळीच्या दिवशी आम्ही प्रकाशित करत आहोत. विनोदी लेखन ...त्यातूनही ठरवून विनोदी लिहायचे म्हटले की भलीभली सिद्धहस्त मंडळी माघार घेतात ह्याचा अनुभव ह्यावर्षीही आम्हाला आलाय. त्यामुळे हा अंक तसा अगदीच छोटेखानी झालाय ह्याची आम्हाला कल्पना आहे...तरीही हे निश्चित की जे काही आम्ही आपणासमोर सादर करणार आहोत त्यामुळे आपले निखळ मनोरंजन होईल ही खात्री आहे...तेव्हा करा सुरुवात वाचायला...आणि जमल्यास प्रतिसादही द्या.
अंकाचा दुवा:
http://holivisheshank2012.blogspot.in/2012/03/blog-post_05.html