माझ्या आयुष्यातील आजवरच्या कडू-गोड आठवणी मी "पूर्वानुभव" म्हणून सादर करत आहे.
आपण इथे आल्याबद्दल मन:पूर्वक धन्यवाद!

२८ सप्टेंबर, २००८

अजि म्या परब्रह्म पाहीले!

दरवाज्यावरील पाटी वाचून घंटी वाजवली. दरवाजा उघडायला थोडा वेळ लागला. अर्धवट दरवाजा उघडून त्या व्यक्तीने विचारले कोण हवंय आपल्याला?
पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे इथेच राहतात काय?..माझा सवाल!
होय! तशी पाटी इथे दिसतेय ना?...त्यांनी थोडेसे चिडून विचारले.
काय आहे, की हल्ली दारावरची पाटी आणि आत राहणारी माणसे एकच असतील असा काही भरवसा राहीलेला नाहीये. म्हणून विचारले. कृपया रागावू नका. मला भाईकाकांना भेटायचंय. मी पाऽऽर मुंबईहून इतक्या लांब आलोय त्यांना भेटायला...मी.
आपण कोण? आपले काय काम आहे? हल्ली भाईला बरं नसतं तेव्हा त्याला उगाच त्रास द्यायला कशाला आलात?..सुनीताबाई बोलल्या.
ह्या सुनीताबाई आहेत हे इतक्या वेळात माझ्या लक्षात आलेच होते. तेव्हा मी जास्त घोळ न घालता म्हटले..काकी, अहो मला ओळखले नाही काय तुम्ही? अहो मी मोद! इतक्यात विसरलात?
खरे तर मला त्यांनी ओळखावे असा मी कुणीच नव्हतो आणि ह्याआधी कधी त्यांना भेटलेलो देखिल नव्हतो. पण जरा जवळीक दाखवावी म्हणून हा गुगली टाकला.
त्याही जराशा गोंधळल्या. आठवायचा प्रयत्न करत होत्या इतक्यात...ते, समस्त महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्व म्हणजे खुद्द भाईकाका भिंतींचा आधार घेत घेत तिथे आले.
ह्याची देही ह्याची डोळा माझे परब्रह्म मला पाहायला मिळत होते म्हणून मी देखिल हरखून गेलो.

कोण गं सुनीता? कुणाशी इतका वेळ बोलते आहेस?
अहो,हे.....
सुनीताबाई पुढचं काही बोलण्याच्या आधीच मी चटकन पुढे होऊन त्यांना वाकून नमस्कार केला आणि म्हटले..भाईकाका,अहो मी मोद. ओळखले नाही काय मला?...मी स्वत: कुणी शेक्सपीयर वगैरे असल्याच्या आविर्भावात म्हणालो.
भाईकाकांनी मला नीट न्याहाळले आणि म्हटले...हं! नाव ऐकल्यासारखे वाटतेय. अरे हो! मोदबुवा नाही काय तुम्ही! ओहोहो! या या! अलभ्य लाभ!
आणि सुनीताबाईंकडे वळून डोळे मिचकावीत म्हणाले...अगं तू ओळखत नाहीस ह्या महाभागाला?
सुनीताबाईंचा अजूनही प्रश्नार्थक चेहरा पाहून भाईकाका त्यांना म्हणाले...अगं, हेच ते मोदबुवा! स्वरभास्कराची आणि आधुनिक तानसेन सैगलसाहेबांची भेट घालून देणारे ’महान(?)व्यक्तीमत्व’ आठवतंय काय?
आता मात्र सुनीताबाईंच्या चेहर्‍यावरचा अनोळखीपणाचा भाव जाऊन त्याजागी किंचित स्मित उमटले.
या,या! म्हणत त्यांनी मला घरात घेतले.

मी इथे विचारात पडलो होतो की भाईकाकांना कसे कळले त्या भेटीबद्दल?  मी तर कधीच त्यांना त्याबद्दल बोललेलो नव्हतो. मग त्यांनाच विचारलेलं बरं म्हणून मी धीर करून विचारले...भाईकाका, भीमसेन अण्णा आणि सैगलसाहेबांच्या भेटीबद्दल तुम्हाला कसे कळले हो? ती भेट तर अगदीच खाजगी स्वरुपाची होती.
अरे वा! अशा गोष्टी कधी लपून राहतात काय? पण एक सांगतो, मी तुझ्यावर रागावलोय...भाईकाका.
का बरं? माझ्याकडून असा कोणता प्रमाद घडला?...गोंधळून जाऊन मी जरा गटणेच्या भाषेत प्रश्न केला.
अरे बाबा, त्या भेटीच्या वेळी मला का नाही बोलावलेस? मीही त्या दोघांना पेटीवर साथ करून तेवढेच माझे हात साफ करून घेतले असते. ती संधी तू मला नाकारलीस. म्हणून मी तुझ्यावर रागावलोय....भाईकाका लटक्या रागाने म्हणाले.
भाईकाका, एक डाव माफ करा ना! पुढच्या वेळी नाही विसरणार. नक्की बोलावीन तुम्हाला आणि वसंतरावांनाही बोलवीन. तेही मस्तपैकी तबला बडवतील आणि ..
माझे बोलणे अर्धवट तोडत भाका म्हणाले...अरे, नाही रे. गंमत केली तुझी. आता ह्या हातात अजिबात ताकद नाही राहीली. गेले कैक महिने ह्या हाताला साधा पेनचा स्पर्शही नाही झालाय तर पेटी कसली वाजवतोय?
भाईकाका, एक सांगु?..मी
अरे बोल मोदबुवा! तुला हवे ते बोल. त्यात परवानगी कशाला मागतोस?
भाईकाका, तुम्ही हरितात्या आणि अंतु बर्वा ही पात्रं काय जीवंत उभी केलेत. त्यांची एकेकाची तत्वज्ञानं ऐकली ना की कसे भरून येते. पण भाईकाका, अहो तुम्ही अजून एक करा ना. ह्या दोन्ही पात्रांना एकमेकांशी संवाद साधताना ऐकायला आम्हाला आवडेल...मी.
ते कसे? त्याने काय होईल?...भाका
म्हणजे बघा आता, तुमचा तो अंतु बर्वा म्हणतो ना की, "आला नेहरू, आणि त्याने इथे येऊन काय केले? तर, भाषण! अरे भाषणं कसली करतोस? त्याऐवजी तांदूळ दे! आणि रत्नांग्रीस त्यास काय दाखविले तर, टिळकांचा जन्म झाला ती खोली. दाखवली कुठली तरी बाज आणि दिले ठोकून की टिळकांनी इथे पहिले ट्यांहा केले. अरे पुरावा काय? टिळकांच्या आयशीचे बाळंतपण करणारी सुईण होती काय तिथे?......म्हणजे अंतु पुरावा मागतो की नाही?
हो. बरोबर. मग? ...भाका
आता त्या उलट तुमचे हरितात्या. पुराव्याने शाबित करतात ते सगळ्या गोष्टी. मग मला सांगा आता की ह्या दोघांना एकमेकांना तुम्ही समोरासमोर आणलेत तर काय बहार येईल? त्यांचा सवाल-जबाब अगदी ऐकण्यासारखा होईल...मी
मिस्कीलपणे हसत आणि चश्म्यातुन माझ्यावर आपले बोलके डोळे रोखत भाईकाका म्हणाले...खरंच की! मोदबुवा,तुझ्या बोलण्यात पाईंट आहे बरं का! माझ्या कसे हे लक्षात नाही आले?
मग, भाईकाका, कधी घेताय मनावर? कधी लिहाल?..मी लगेच, ती संधी हातातुन सुटू नये म्हणून म्हटले.
अरे, नाही रे! आता हातात ताकत नाही उरली.
भाईकाका, असे म्हणू नका हो. तुम्ही नुसते सांगत जा. मी लिहीतो. तुम्ही व्हा व्यास आणि मी होतो गणपती. चालेल?
चालेल? अरे धावेल! आता किती जमेल ते माहीत नाही पण प्रयत्न करून बघू या...भाईकाकांच्या चेहर्‍यावर एक वेगळेच स्मित झळकू लागले.
जरासा विचार करून भाईकाका सांगु लागले....हं, लिही....
काय हो हरितात्या......
इतक्यात दारावरची घंटी वाजली.भाईकाका मला म्हणाले, मोदबुवा जरा बघा बघू. कोण आलंय तडमडायला ह्या भलत्या वेळी?
मी धडपडत जाऊन आधी दार उघडले. दारात कुणी तरी विक्रेता उभा होता. त्याला वाटेला लावले. चला, आपण आपलं ते भाईकाका काय सांगताहेत ते लिहून घेऊ या असा विचार केला आणि वळलो. पाहतो तो काय?....

अरेच्चा! भाईकाका कुठे गेले? आणि हे काय? मी माझ्याच घरात कसा? छ्या! म्हणजे? इतका वेळ मी स्वप्न तर बघत नव्हतो? काहीच उलगडा होईना. इतका वेळ जे काही घडले ते खरे नव्हते? माझा तर माझ्यावरच विश्वासच बसेना.जे काही घडले ते साक्षात डोळ्यासमोर अजूनही दिसत होते तरी ते खरे नव्हते? कसं शक्य आहे?

हळूहळू एकेक गोष्ट आठवायला लागली. मी आपला नेहमीप्रमाणे भाईकाकांच्या आवाजातली ध्वनीफीत लावून पलंगावर पडून मस्तपैकी ऐकत होतो आणि बघता बघता केव्हा झोपलो ते कळलेच नाही. काय मस्त स्वप्न होते ते..त्यातनं बाहेर पडूच नये असे वाटतंय. पण त्या दुष्ट लोकांना पाहवले नाही आणि त्यांनी मला त्या दुनियेतून जबरदस्तीने बाहेर काढले. पण तिथे भाईकाका माझी वाट पाहत असतील. मला गेलंच पाहीजे. चला पुन्हा झोपू या.
ढुर्रर्रऽऽऽऽऽऽऽ! ढुर्रर्रऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽ!

११ सप्टेंबर, २००८

बालपणीचा काळ सुखाचा! १५

माझ्या लहानपणी मी कितीतरी प्रकारचे खेळ खेळलोय.मैदानी खेळात कुस्ती,हुतूतू,लंगडी,खो-खो,आट्या-पाट्या,डब्बा ऐसपैस,पकडापकडी,लगोरी,आबादुबी,तारघुसणी(हा खेळ फक्त पावसाळ्यातच खेळू शकतो),विटी-दांडू,भोवरेबाजी,बिल्ले,गोट्या वगैरे असे खास भारतीय खेळ तर क्रिकेट,व्हॉलीबॉल,फूटबॉल,बॅडमिंटन,टेबल-टेनिस वगैरे विदेशी खेळही भरपूर खेळलोय.त्याच प्रमाणे बैठे खेळ आठवायचे म्हटले तर प्रामुख्याने बुद्धीबळ,कॅरम,पत्ते,सापशिडी,ल्युडो,व्यापार-डाव,कवड्या,सागरगोटे,काचापाणी वगैरे अनंत खेळ आठवतील. ह्यापैकी बैठ्या खेळातल्या पत्त्यांच्या खेळाबद्दलच बोलायचे झाले तरी त्याचे कैक वेगवेगळे प्रकार आहेत. त्यापैकी आता चटकन आठवताहेत ते म्हणजे तीन-पत्ती,रमी, सात-आठ,पाच-तीन-दोन,मुंगूस,भिक्कार-सावकार,एकपानी झब्बू,गड्डा झब्बू,गुलामचोर,बदामसत्ती,मेंडीकोट,नॉट ऍट होम,लॅडीस,गेम ऑफ पेशन्स(हा एकट्याने खेळायचा प्रकार आहे)वगैरे वगैरे. ह्यातले तीन-पत्ती आणि रमी हे सामान्यत: जुगार समजले जातात कारण हे खेळ खेळताना काही तरी पणाला लावावे लागते.एकेकाळी मी तीन-पत्तीमध्ये अतिशय निष्णात होतो.पण एक प्रसंग असा घडला की मी तो खेळ त्यानंतर कधीच खेळलो नाही(एकवेळचा अपवाद सोडून).आज त्याबद्दल ऐका.

आमच्या वाडीत मराठी,गुजराथी अशी संमिश्र वस्ती होती. ह्यातले गुजराथी लोक त्यांच्या काही विशिष्ठ सणांना सहकुटुंब जुगार खेळतात हे आधी ऐकले होते पण त्यानंतर प्रत्यक्ष पाहिले देखिल. त्या जुगारात बरंच काही जिंकता येते हे पाहून मलाही त्यात रस निर्माण झाला. पण आमच्या आईची करडी नजर चूकवून हे असले उद्योग करणे कधीच शक्य नसायचे. पण ही गुजराथ्यांची मुले एरवीही हा जुगार सर्रासपणे खेळायची. त्यात पैसे न लावता गोट्या,बिल्ले(शीतपेयांच्या बाटल्यांची पत्र्याची बुचे),सिगारेटची पाकिटे,काजू वगैरे गोष्टी पणाला लावत. हे त्यांचे खेळ आम्ही चूपचाप बसून पाहायचो पण खेळायची हिंमत नसायची. त्याचे एक कारण आईची जरब आणि दुसरे म्हणजे ही सर्व मुले त्यात पटाईत होती आणि आम्हाला त्यातले जुजबी ज्ञानच होते तेही पाहून पाहून झालेले त्यामुळे सर्वस्व हरण्याची शक्यता होती.

ह्या सर्व मुलांच्यात भानू नावाचा एक मुलगा खूपच पोचलेला होता. त्याचा गोट्या,बिल्ले वगैरे खेळातला नेम अचूक असायचा आणि त्यात तो नेहमीच जिंकायचा. तसेच ह्या तीन-पत्तीमध्येही तो चांगलाच सराईत होता. त्याचा हात धरेल असा कुणी दुसरा खेळाडू आमच्या वाडीत नव्हता.ह्या भानूच्या बाजूला बसून मी तीन-पत्तीचा खेळ नुसता बघत असे.गंमत अशी की भानू जात्याच हुशार असल्यामुळे ह्या खेळात जिंकत असे पण त्याचा असा समज असायचा की मी त्याच्या बाजूला बसतो म्हणून तो जिंकतो.कमाल आहे ना? हा खेळ खेळणार्‍यांच्यातली अंध:श्रद्धा तरी किती ते आठवले तरी आजही हसू येते.

समजा एखादा खेळाडू हरायला लागला तर मग त्याच्या उजव्या आणि डाव्या बाजूला बसलेल्या प्रेक्षक मुलांना तो सांगणार की पाणी पिऊन या. ती दोन्ही मुले पाणी पिऊन येईपर्यंत खेळ तहकूब केला जाई. तसेच आपल्या बाजूला बसलेल्या प्रेक्षक मुलापैकी कुणी मागे हात टेकून बसला तरी त्याला तसे बसण्यापासून परावृत्त करणे.कारण काय तर नरटी लागते. कोपर मांडीवर टेकून आणि हनुवटी तळहातावर टेकून कुणी बसलेले त्या खेळाडूंना चालायचे नाही. ह्याचेही कारण ..नरटी लागते.
ज्याच्यावर पिशी असेल तो त्याच्या बाजूला बसलेल्या प्रेक्षक मुलाला आपल्या पत्त्यांना हात लावायला सांगणार म्हणजे पानं चांगली येतात अशी धारणा असते.काय काय अंध:श्रद्धा होत्या तेव्हा. आता सगळंच आठवत नाही.

तर अशा ह्या भानूजवळ मी नेहमी प्रेक्षक म्हणून बसत असे आणि त्याचे खेळण्यातले कौशल्य जाणून घेत असे.भानू केवळ हुशारच नव्हता तर तो धुर्तदेखिल होता. हल्लीच्या भाषेत सांगायचे झाले तर अगदी बोलबच्चन होता.स्वत:ला आलेली पाने कितीही रद्दड असली तरी समोरच्याला बोलून गार करायचा आणि डावामागून डाव जिंकायचा. एखादा खेळाडू जरा जास्त वेळ टिकला की त्याच्या चेहर्‍यावरचे भाव जाणून घेऊन भानू तो डाव त्याला बहाल करायचा.मात्र एरवी सहजासहजी हार मानायचा नाही.पण लावायची देखिल एक भाषा होती. म्हणजे कसे? डाव सुरु होण्याआधी समजा की प्रत्येकाने दोन-दोन गोट्या मध्ये ठेवलेल्या आहेत. मग डाव सुरु झाला की कुणी म्हणेल...एक आलो...म्हणजे अजूनएक गोटी मध्ये ठेवायची. की दुसरा म्हणणार..दोन आलो.
हे ’आलो’ प्रकरण आणि गोट्यांची संख्या वाढत जायची की भानू हळूच आपली पानं बघितल्यासारखी करायचा आणि त्याच्या आधीच्याने जितक्या गोट्या आलो असे म्हटले असेल त्याच्यापेक्षा एकदम दूप्पट गोट्या आलो असे म्हणून जोरात हात आपटून त्या गोट्या मध्यभागी ठेवायचा. त्याचा तो आविर्भाव बघूनच बहुतेक लोक माघार घ्यायचे आणि त्याला डाव बहाल करायचे. ह्यात कैक वेळेला प्रतिस्पर्ध्यांकडे चांगली पाने असूनसुद्धा भानू जिंकायचा. हे सगळे मी नीट पाहात होतो आणि हळूहळू मलाही त्यात भाग घ्यावासा वाटू लागले.

एक दिवस हिंमत करून मीही त्या खेळात उतरलो पण एकदोन डाव जिंकलेले सोडले तर सरतेशेवटी खिशात असलेल्या सगळ्या गोट्या हरलो आणि चेहरा पाडून तिथेच इतरांचा खेळ पाहत बसलो.तसा मी सहजासहजी हार मानणारा नसल्यामुळे दुसर्‍या दिवशी थोड्या(१०) उसन्या गोट्या घेऊन पुन्हा त्या जुगारात सामील झालो आणि पुन्हा सपशेल आडवा पडलो. आज मी नुसताच हरलेलो नव्हतो तर अंगावर कर्जही झालेले होते. त्यामुळे आज अजूनही खट्टू झालो होतो. आता पुन्हा कुठून गोट्या पैदा कराव्यात ह्या विवंचनेत होतो कारण आमच्या कडे लहान मुलांच्या हातात पैसे देण्याची पद्धत नव्हती मग मी गोट्या तरी कुठून आणणार?

मी मग एक शक्कल शोधली. रोजच्याप्रमाणे भानू मला त्याच्या बाजूला बसायचा आग्रह करायला लागला तेव्हा मी त्याला सरळ सांगितले....प्रत्येक जिंकलेल्या डावामागे मला तू १ गोटी बक्षीस द्यायची. कबूल असेल तर सांग.
तो कबूल झाला आणि गंमत म्हणजे योगायोगाने त्यादिवशी तो सगळे डाव जिंकला. त्याच्या विरुद्ध खेळणारे सगळे प्रतिस्पर्धी कफल्लक होऊन निघून गेले.भानूने त्याचा गल्ला मोजला तर एकूण २०० गोट्या जमलेल्या होत्या त्याच्याकडे. त्यादिवशी भानूने मला कबूल केल्याप्रमाणे जिंकलेल्या १५ डावांच्या प्रत्येकी एक अशा १५ आणि अधिक ५ खास बक्षीस अशा २० गोट्या दिल्या. मी तर एकदम मालामाल होऊन गेलो.त्या गोट्या मिळताच मी कर्जाऊ घेतलेल्या १० गोट्या परत केल्या आणि सुटकेचा श्वास घेतला आणि मनात ठरवले की ह्यापुढे कधीच कर्ज काढायचे नाही.

त्यानंतर मग मी ह्या जुगारात भाग घेताना सावधपणे खेळायचा पवित्रा घेत काही दिवस ना नफा ना तोटा ह्या तत्वावर टिकून राहिलो.प्रेक्षक म्हणून बाहेर बसून इतरांचा अंदाज घेणे आणि त्यांचाच एक प्रतिस्पर्धी बनून त्यांच्या डावपेचांचा अंदाज घेणे हा अतिशय वेगळाच अनुभव होता. हळूहळू माझा आत्मविश्वास वाढायला लागला आणि भानूच्या खालोखाल जास्त डाव जिंकण्यात माझा क्रमांक लागायला लागला. एकदोनदा तर मी भानूलादेखिल पूरून उरलो. पण भानू हा त्यातला किडा असल्यामुळे त्याने वेळीच माझा धोका ओळखला आणि मला एकदा बाजूला घेऊन मांडवली केली. ती अशी की...दोघांनी एकाच वेळी खेळात उतरायचे नाही. जेव्हा भानू खेळत असेल तेव्हा मी फक्त त्याच्या बाजूला बसून राहायचे आणि प्रत्येक जिंकलेल्या डावासाठी त्याने मला २ गोट्या द्यायच्या. भानूच्या आधी जर मी खेळात उतरलो असेन तर मग भानूने तिथे अजिबात थांबायचे नाही...वगैरे वगैरे.

त्याप्रमाणे काही दिवस सुरळीत गेले आणि माझ्या लक्षात आले की माझ्या समोर कुणाचीच डाळ शिजेना. प्रत्येकवेळी मीच जिंकायला लागलो. एक भानू सोडला तर मला कुणीच तुल्यबळ प्रतिस्पर्धी उरलेला नव्हता आणि तो तर माझ्याशी तह करून बसलेला होता. पण माझ्या मनात भानूलाही हरवायचे होते आणि आता मी त्या दृष्टीने तयार देखिल झालो होतो. दुसरे म्हणजे भानूच्या सगळ्या क्लुप्त्या मी इतके दिवस अगदी जवळून पाहात आलेलो होतो त्यामुळे साहजिकच मी त्याला भारी पडेन ह्याची मला पूर्ण खात्री झाली होती. पण त्याच्याशी लढत जुळवून कशी आणायची?

मी एकदा भानूला सहज म्हटले देखिल...आता ह्या चिल्लर पिल्लर लोकांशी खेळण्यात मला मजा नाही वाटत. एकदा तुझ्याशी खेळायचे आहे; तर कधी बसू या आपण?
तो फक्त हसला आणि त्याने खांदे उडवले. तो विषय तात्पुरता तिथेच संपला.

त्या दिवशी देखिल मी नेहमीसारखाच जिंकत होतो. खेळ अगदी रंगात आला होता आणि इतक्यात आईची हाक आली.नेहमीप्रमाणे मी चटकन ओ दिली नाही कारण आईच्या अचानक आलेल्या हाकेने मी भांबावलो होतो.आई निवांतपणे झोपलेली आहे हे पाहून मी निश्चिंत होत्साता हळूच खेळात भाग घेतला होता. दुसरे म्हणजे आज आम्ही जिथे बसलो होतो ती जागा अगदी माझ्या घरासमोरच होती त्यामुळे आज पकडला जाईन अशी भिती होतीच. आईने दोनतीन हाका मारल्या तरी मी ओ दिली नाही तेव्हा ती घरातून अंगणात आली आणि तिने पुन्हा दोनतीन हाका मारल्या. खरे तर मी आईपासून अगदी जवळच होतो पण तिला दिसू शकत नव्हतो कारण आम्ही सगळे एका दाट झुडूपात बसून हे सगळे उपद्व्याप करत होतो.
तेवढ्यात तिथेच खेळणार्‍या एका लहान मुलाला आईने विचारले की..प्रमोदला कुठे पाहिलेस काय?
त्यावर त्याने त्या झुडूपाकडे बोट दाखवले आणि मग काय विचारता...आमचा खेळ पाऽऽर संपला.

जुगार खेळताना आईने मला अगदी रंगेहात पकडले आणि मग असा काही चोप दिलाय की काही विचारू नका. वर त्या दिवशी रात्रीचे जेवणही नाही दिले. हे कमी म्हणून की काय मी जिंकलेल्या जवळ १००-१५० गोट्या बाहेर अंगणात फेकून दिल्या ज्या त्या सगळ्या मुलांनी आनंदाने लुटल्या आणि मला चिडवत चिडवत एकेक जण तिथून सटकला. त्या दिवशी आईने निर्वाणीचा इशारा दिला की ...पुन्हा जर असा जुगार खेळलास तर तू माझा मुलगा नाहीस असे समजेन.
हा झटका सगळ्यात जबरी होता.त्या दिवशी मी शपथ घेतली की.. असा जुगार मी पुन्हा कधीच खेळणार नाही म्हणून.. जी आजवर पाळलेली आहे. वर म्हटल्याप्रमाणे त्याला एक वेळचा अपवाद आहे.तोही एक योगायोग म्हणून घडला. त्याबद्दल पुन्हा केव्हा तरी.

७ सप्टेंबर, २००८

जयहिंद राव!

"देवसाहेब! हे बघा कोण आलेत!"
कार्यालयात प्रवेश करताक्षणीच आमच्या सुरक्षा रक्षकांनी माझे लक्ष वेधले. खरं तर मी साहेब वगैरे काही नाही; पण त्या अर्धशिक्षित सुरक्षारक्षकांपेक्षा जरा दोन बुकं जास्त शिकलेलो असल्यामुळे मला ते साहेब म्हणतात इतकेच. तर सांगायचा मुद्दा इतकाच की त्यांनी माझे लक्ष वेधले तेव्हा त्यांच्या जवळ एक मध्यमवयीन व्यक्ती बसलेली दिसली. मी माझ्या नेहमीच्या सवयीने "वंदे मातरम्‌" असे त्याला म्हणून अभिवादन केले.त्यावर लगेच त्याने "जयहिंद" असे म्हणून मला प्रतिसाद दिला. :)
त्याची चौकशी केल्यावर जी माहीती कळली ती अशी.... त्याचे नाव ’ जे.एच.राव’ असे होते आणि आधी तो एकवायुदल अधिकारी होता. आता तिथून सेवानिवृत्ती घेऊन आमच्या कार्यालयात एक अधिकारी म्हणून दाखल झालेला आहे. सुरुवातीची दोन वर्ष त्याने दिल्लीत काढल्यावर तो आता मुंबईत बदलीवर आलाय. मी त्याचे यथोचित स्वागत केले आणि त्याला आमच्या वरीष्ठांकडे घेऊन गेलो. ही आमची पहिली मुलाखत!

राव माझ्यापेक्षा वरचा अधिकारी होता हे त्याला नंतर माझ्या वरीष्ठांकडून कळले पण तरीही त्याच्या वागण्यात तसे काहीच आढळले नाही. वागण्यात तो अतिशय सरळ होता आणि कोणत्याही व्यक्तीशी बोलताना तो प्रत्येकाला अहो-जाहो करत असायचा.राव जसजसा रुळत गेला तसतसे हळूहळू त्या अहो-जाहोचे एकेरी संबोधनात रुपांतर झाले. आम्ही त्याच्यापेक्षा वयाने आणि अधिकाराने लहान लोकंही मित्रत्वाच्या अधिकारात त्याला अरे-तुरे करू लागलो. बघता बघता तो आमच्यातलाच एक झाला.आणखी एक सांगण्यासारखी गोष्ट म्हणजे तो नेहमी ’जयहिंद’ असे म्हणून समोरच्याला अभिवादन करायचा. त्यामुळे त्याचे नाव आपोआपच ’जयहिंद राव’ असेच झाले.(त्याच्या नावातली आद्याक्षरं देखिल योगायोगाने जे.एच अशीच होती. पण त्याचे पूर्ण रूप वेगळे होते.)

साधारण साडेपाच फूट उंची,काळा-सावळा वर्ण,तेल चोपडलेले चपचपीत केस आणि त्यांचा व्यवस्थित पाडलेला भांग, दिसायला नाकी-डोळी नीटस असे काहीसे रावचे रुपडे होते. बोलताना नेहमी प्रत्येक वाक्याची सुरुवात ’भ’काराने सुरु होणार्‍या शिवीने आणि वाक्याचा शेवट ’म’काराने सुरु होणार्‍या शिवीने होत असे. सुरुवातीला आम्हाला ते जरा विचित्र वाटले पण नंतर नंतर त्याचे काहीच वाटेनासे झाले कारण एरवी रावचे बोलणे अतिशय सभ्य असेच होते.

राव हा माजी सैनिक असल्यामुळे त्याला मिलिटरी कॅंटीनमधून सवलतीच्या दरात सगळ्या जीवनावश्यक वस्तू मिळत. आमच्या कडे रावसारखेच इतरही काही माजी सैनिक होते. पण केवळ राव हाच सर्वांना त्याच्या कार्डावर अशा वस्तु एकही जास्तीचा पैसा न घेता आणून देत असे. अशा वेळी समोरचा माणूस झाडूवाला आहे की आपला वरीष्ठ आहे हे तो बघत नसे. सगळ्यांना आपल्याला मिळणार्‍या सोयी-सवलतींचा लाभ देत असे.मात्र एक गोष्ट तो कुणालाही कधीच देत नसे आणि ती म्हणजे ’दारू!’
महिन्याला एका विशिष्ठ प्रमाणातच त्याला ती मिळत असे आणि ती त्याला स्वत:लाच कमी पडायची. जे इतर माजी सैनिक स्वत: पीत नसत ते, ही अशा तर्‍हेने त्यांना मिळणारी दारू चक्क बाजार भावाने विकत आणि राव ती त्यांच्याकडून बाजारभावाने विकत घेत असे.

राव त्याच्या कामात हुशार होताच पण त्या व्यतिरिक्त तो बहुश्रुतही होता. रावची आणि माझी विशेष मैत्री जमली ती कशी? हे मलाही तसे एक कोडेच आहे.कारण एक माणूस म्हणून राव जरी लाख माणूस होता तरी रावचे दारू आणि सिगरेटचे व्यसनही मला माहित होते आणि मी एरवी अशा लोकांपासून चार हात दूरच राहातो. रावच्या लेखी मात्र मी एक सच्चा माणूस होतो आणि दिलेल्या शब्दाला जागणारा होतो..हे मला त्याच्याचकडून कळले होते.ह्या गोष्टीचे कारण असे की मी रावला वेळोवेळी उसने पैसे देत असे. आश्चर्य वाटले ना? अहो वाटणारच! कारण माझ्यापेक्षा जास्त पगार त्याला होता. मग अशा रावला मी कशी मदत करत असे आणि का?....

त्याचे काय आहे की आमच्या कार्यालयात आधी गजा नावाचा एक सहकारी ’फंड’ चालवायचा. दर महिन्याला अमूक एक रक्कम प्रत्येकाकडून त्याच्या त्याच्या ऐपतीप्रमाणे गोळा करून ती गरजवंताला/ना मासिक दोन रूपये व्याजाने देऊ केली जायची.
ह्यातून मिळणारे व्याज वर्षाच्या शेवटी सर्व सभासदांना त्यांच्या त्यांच्या हिश्श्याप्रमाणे वाटले जाई. ह्या योजनेमुळे बर्‍याच जणांची सोय होत असे.पण गजा फंड बंद करून अचानक नोकरी सोडून गेला आणि अशा गरजवंतांना पैशाची चणचण जाणवू लागली. गजानंतर एक दोघांनी पुढाकार घेऊन हे फंड प्रकरण हाताळायचा प्रयत्न केला पण त्यांना हवा तसा प्रतिसाद मिळाला नाही. कारण हे लोक ते पैसे गरजवंतांना देण्याऐवजी स्वत:च वापरू लागले. ह्यातून जी गरज निर्माण झाली ती एका प्रामाणिक व्यवस्थापकाची जी इतरांच्या मते मी पूर्ण करू शकत होतो आणि म्हणून सगळ्यांनी मला गळ घातली फंड सुरु करण्याची.मला खरे तर ह्या भानगडीत पडायची अजिबात इच्छा नव्हती. विशेष करून लोकांकडून पैसे मागण्याच्या बाबतीत माझा भिडस्तपणा मला त्रासदायक व्हायचा. कैक वेळेला कर्जाऊ दिलेले माझेच पैसे मी परत मागताना मलाच अजिजी करायला लागायची. माझे पैसे गेले तरी ते नुकसान एक वेळ मी सोसू शकत होतो पण सार्वजनिक पैशाबाबत असे करून चालणार नव्हते. तिथे माझ्या सचोटीबद्दल शंका निर्माण होऊ शकली असती आणि ते मला कधीच आवडले नसते त्यामुळे मी आधी नकारच दिला. पण माझ्या जवळच्या मित्रांपैकी ’दादा’ने देखिल गळ घातली आणि पैसे वसुलीचे माझ्यावर सोपव असे सांगून धीर दिला. दादा हा नावाप्रमाणेच दादा होता त्यामुळे मी मग जास्त आढेवेढे न घेता फंड सुरु केला.(दादाबद्दल सविस्तर ह्या लेखांमध्ये वाचा.)
ह्या फंडाचा फायदा खर्‍या गरजवंतांना द्यायचा असे माझे तत्व होते आणि त्याप्रमाणे मी वागत होतो. प्रत्येकाची परतफेडीची क्षमता लक्षात घेऊन मी कर्ज देत असे.त्यामुळे कुणा एकाला अवाच्या-सवा कर्ज दिले असे होत नसे. त्यामुळे जमा रकमेपैकी पाच दहा टक्के रक्कम माझ्याकडे नेहमी शिल्लक राहात असे ज्याचा उपयोग आयत्या वेळी कुणाला पैसे लागले तर होत असे. ह्या गोष्टीचा फायदा बर्‍याच वेळेला रावला होत असे कारण महिन्याच्या शेवटी शेवटी त्याला पैश्यांची तंगी जाणवत असे आणि माझ्याकडून वेळेवर खसखस न करता पैसे मिळत असल्यामुळे तोही खुश असायचा.एक तारखेला पगार झाला की आठवणीने तो ते पैसे आणून देत असे. हा त्याचा गुण फारच थोड्या लोकांच्यात होता. अशा ह्या रावला मी नेहमी दारू-सिगरेट सोडण्याचा सल्ला देत असे पण त्याचा त्यावर काडीमात्रही परिणाम होत नसायचा. तो आपल्याच नशेत असायचा.त्याची ही सवय सुटावी म्हणून मी कधी कधी त्याला कर्जाऊ पैसे द्यायला नकार देखिल दिला होता पण राव माझं बारसं जेवलेला होता. तो इतर कुणाला तरी पुढे करून पैसे घ्यायचा आणि आपला शौक पुरवायचा.असो.

सुरुवातीला राव कार्यालयात आणि कार्यालयाच्या वेळेत दारू कधीच पीत नसे.पण कसे कुणास ठाऊक पण तो हळूहळू गुपचुपपणे कार्यालयातही थोडी थोडी पिऊ लागला हे माझ्या नजरेतून सुटले नाही. मी त्याला त्याबद्दल चांगलेच झाडत असे पण त्याने ते कधीच मनावर घेतले नाही.(हे मी कोणत्या अधिकारात करत असे मला माहीत नाही आणि रावने देखिल मला कधी उलट उत्तर कसे केले नाही हे कोडे देखिल कधीच उलगडले नाही)उलट वेळप्रसंगी तो मलाच आग्रह करायचा आणि माझा अपेक्षित नकार ऐकून पुन्हा आपल्या नशेत धुंद राहायचा.मग मी त्याला टाळायला लागलो. मला भिती एकाच गोष्ठीची वाटत होती की हे जर वरिष्ठांना कळले तर रावची नोकरी जाईल. एरवी चांगला असलेला एक माणूस निव्वळ ह्या दारूपायी फुकट जातोय हे मला बघवत नव्हते पण मी काहीच करू शकत नव्हतो कारण मी त्याच्यापेक्षा वयाने आणि अधिकारानेही छोटा होतो.

रावचे दारू पिणे हळूहळू वाढू लागले. आधी तो कार्यालयात असताना अतिशय मर्यादित पीत असे आणि ते फारसे कुणाच्या लक्षात येत नसे.अशा वेळी राव अतिशय शांत दिसत असे. पण जसजसे त्याचे दारुचे प्रमाण वाढायला लागले तसे त्याचे वर्तन बदलायला लागले.जसजशी दारू चढायला लागायची तसतसा तो भांडखोर व्हायला लागायचा. एरवी देवभोळा असणारा राव अशावेळी समस्त ३३कोटी देवांची यथेच्छ निंदानालस्ती करायचा. क्षुल्लक गोष्टींवरून वाद वाढवायचा.

मधल्या काळात आम्ही काही जणांनी त्याला सुधारण्याचा एक अयशस्वी प्रयत्न केला.म्हणजे तो थोडाफार सुधारला देखिल. नाशिक की कुठे तरी जाऊन विपश्यना शिबिरात हजेरी लावून आला. काही दिवस छान गेले आणि एक दिवस पुन्हा रावने भर ऑफिसात राडा केला. त्या दिवशी तो अक्षरश: ’फुल्ल’ होता. त्याला स्वत:च्या देहाचीही शुद्ध नव्हती.बसल्या जागीच पॅंट ओली केली त्याने. दारूचा वास आणि त्यात त्याच्या मुताच्या वासाने एक संमिश्र वास धारण करून सगळ्यांच्या नाकातले केस जाळले. त्याच्या आसापासही कुणी जायला तयार होईना. अशात त्याने रडायला सुरुवात केली. अक्षरश: धाय मोकलून रडायला लागला तो...जणू काही त्याची कुणी प्रिय व्यक्ती मरण पावली असावी.
दारू प्यायल्यावर एरवी आक्रमक होणारा हा प्राणि आज इतका धाय मोकलून का रडतोय हे कुणालाच कळेना. लोक आपापसात तर्क लढवत होते पण कुणीच त्याला त्याबद्दल काही विचारण्यासाठी त्याच्याजवळ जाण्याची हिंमत करत नव्हता. त्याचे कारण असे की एकदोघांनी त्याला समजवण्यासाठी त्याच्या जवळ जाण्याचे धाडस केलेही होते पण तो त्यांच्या गळ्यात पडायचा प्रयत्न करायला लागला तेव्हा तेही मागे हटले.

हा हा म्हणता ही बातमी आमच्या साहेबांपर्यंत पोचली आणि रावची खबर घ्यायला खुद्द साहेब येताहेत असे कळले तेव्हा सगळीकडे पांगापांग झाली. मनात आले, ’गेली आता रावची नोकरी!कोण वाचवणार ह्याला आता?’
आणि खरंच साहेब आले. त्यांनी रावची अवस्था पाहिली आणि ते हतबुद्धच झाले. इतका जबाबदार माणूस असे कसे वागू शकतो? पण डोकं शांत ठेवून आधी झाडूवाल्याकडून ती जागा साफ करवून घेतली आणि मग रावजवळ जाऊन त्याची विचारपूस करू लागले.

रावने साहेबांनाही मिठीत घ्यायचा प्रयत्न केला पण त्यांनी त्याला हळूच दूर केले.मग हळूहळू त्याच्याकडून माहीती करून घ्यायला लागले. मधे मधे राव खिशातली ’चपटी’ काढून साहेबाच्या देखतच आचमनं करत होता. वर साहेबालाही घेण्याचा आग्रह करत होता. तसे साहेबही ’घेणार्‍यातले’ होते;नाही असे नाही, पण स्थळं-काळाचं भान ठेऊन. इतकंच कशाला,राव आणि साहेब एकत्र बसूनही पीत असत...पण ते साहेबांच्या घरी. ऑफिसात कधीच नाही.... आणि इथे राव साहेबांना घ्यायचा आग्रह करत होता. साहेबांनी हळूच त्याच्या हातातून बाटली काढून घेतली आणि झाडूवाल्याकडे देऊन त्याला संडासात ओतून टाकायला सांगितली.

रावच्या असंबद्ध बडबडीतून शेवटी असे लक्षात आले ते असे.. सहा एक महिन्यापूर्वीच हैद्राबादमध्ये त्याची लग्न झालेली मोठी मुलगी एका मुलीला जन्म देऊन बाळंतपणातच वारली होती . रावचा जावई देखिल हैद्राबादेतच नोकरी करत होता आणि त्याच्या घरी त्या तान्ह्या मुलीला सांभाळणारे कुणीच नसल्याने ती जबाबदारी रावच्या बायकोवर येऊन पडली होती. ह्या गोष्टीचा परीणाम म्हणून रावला इथे मुंबईतएकटेच राहावे लागत होते. मुलीच्या अकाली निधनाचे दु:ख आणि त्यात पुन्हा पत्नी जवळ नसल्याने येणारा एकटेपणा..ह्यामुळे तो पूर्ण गांजून गेलेला. अशा अवस्थेत दारू हाच एक जवळचा मित्र असे समजून राव त्याच्या जास्तच आहारी गेला होता.

साहेबांनी एकूण परिस्थितीचा आढावा घेतला आणि रावला काही दिवसांची सुटी देऊन हैद्राबादला पाठवण्याची व्यवस्था करण्याचे आदेश दिले. पटापट सुत्र हलली आणि तिकीट वगैरेची व्यवस्था झाल्यावर साहेबांनी दादाला पाचारण केले आणि रावला हैद्राबादच्या गाडीत बसवायची आज्ञा दिली. सोबत कार्यालयाची गाडी आणि चालक देखिल दिला. दादाने रावला बाबापुता करून समजावले आणि मोठ्या मुश्किलीने हैद्राबादच्या गाडीत बसवले. त्याही अवस्थेत राव दिसेल त्याच्या गळ्यात पडायचा प्रयत्न करत होता.दादालाही सोडायला तो तयार नव्हता त्यामुळे नाईलाजाने दादादेखिल त्याच्या बाजूला बसून राहीला. शिट्टी वाजली,गाडी सुरु झाली. बाहेरून येणार्‍या थंडगार हवेमुळे आणि दिवसभराच्या थकव्यामुळे राव आडवा झाला आणि पाहता पाहता झोपेच्या आधीन झाला.तो शांत झोपलाय हे पाहिले आणि दादा दादरला उतरला आणि कार्यालयात त्याने दूरध्वनी करून साहेबांना हा वृत्तांत कळवला. साहेबांनी त्याला शाबासकी दिली आणि तिथूनच घरी जायची परवानगी दिली.

महिन्याभराने सुटी संपवून राव बायको आणि नातीसह मुंबईत आला.बायको महिनाभर राहून नातीसह पुन्हा हैद्राबादला गेली. बायको मुंबईत असेपर्यंत रावचे रूप पाहण्यासारखे होते. सकाळी पूजा करून,कपाळावर गंध लावून येणार्‍या रावचे प्रसन्न रूप पाहून खूप बरे वाटायचे. ह्या काळात सिगरेटचे सेवन खूपच मर्यादित झालेले होते आणि दारूदेखिल संपूर्णपणे बंद होती.
पण बायको गेल्यावर पुनः राव पूर्वपदावर आला. सिगरेटचे प्रमाण वाढले आणि दारुदेखिल पुन्हा सुरु झाली.

रावच्या व्यसनाची ही गोष्ट न संपणारी आहे पण शेवटी एक दिवस तिचाही शेवट झालाच.
असेच व्यसनात राहून कशीबशी नोकरी करत राव एके दिवशी सेवानिवृत्त झाला. त्या दिवशी त्याने त्याच्या पठडीतल्या लोकांना दारूने आंघोळ घातली आणि अतिशय आनंदाने तो हैद्राबादला गेला.दोनतीने महिन्यांनी राव काही वैयक्तिक कारणांसाठी मुंबईत येऊन आम्हाला भेटून गेला तेव्हाचा राव आजही नजरेसमोरून हटत नाही. तेव्हा रावच्या चेहर्‍यावर एक विलक्षण असे सात्विक तेज विलसत होते. त्याच्या बायकोत काय जादू होती माहीत नाही, पण तिच्या सहवासात असताना राव सर्व व्यसनं विसरायचा.रावची बायको खूपच धार्मिक होती आणि तिच्या व्यक्तिमत्वाचा पगडा राववर पडल्यामुळे रावमध्ये होणारा सकारात्मक बदल पाहून नेहमीच असे वाटत आलंय की जर रावला पत्नीचा सहवास अखंडपणे लाभला असता तर...

आणि काही दिवसातच बातमी आली...रावची बदली झाली...त्याला वरचे बोलावणे आले....देवाज्ञा झाली.
ऐकून खूप वाईट वाटले. आत्ता कुठे त्याच्या जीवनात चांगले दिवस येत होते आणि अचानक हे असे का व्हावे?
इश्वरेच्छा बलियसी! दुसरे काय?

३ सप्टेंबर, २००८

संगीत चिवडामणी स्वर’बास’कर पंडीत मोदबुवा!

संगीत आवडत नाही असा माणूस क्वचितच सापडेल.म्हणजेच, एकूण काय तर, संगीत सगळ्यांना आवडतं. हां,आता त्याचे प्रकार वेगवेगळे असू शकतात. म्हणजे आपलं भारतीय शास्त्रीय अभिजात संगीत,सुगमसंगीत,चित्रपटसंगीत वगैरे करत करत अगदी हल्ली तरुणांच्यात प्रचलित असलेले पॉप/रॅप पर्यंत असे कोणतेही प्रकार असतील.ह्यातला एक तरी प्रकार आवडत असलेला माणूस माझ्या दृष्टीने संगीत रसिकच आहे. तर सांगायचा मुद्दा काय की संगीत हा आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे आणि संगीतकार,गायक,वादक वगैरेंना चांगल्या प्रकारची प्रतिष्ठाही आहे.

आता नमनाला घडाभर नाही तरी वाटीभर तेल गेलंय तेव्हा मूळ मुद्याकडे वळतो. आधी माझी ओळख करून देतो. हो,हल्ली अशी प्रथाच आहे. आपणच आपली ओळख द्यावी लागते त्याशिवाय लोक हिंगं लावूनही विचारत नाहीत.तर, मी आहे न्हाणी घराण्याचा गायक आणि संगीतकार मोद. पण ’पंडीत मोदबुवा’ अशी पदवी मला खुद्द अण्णांनी दिलेय.(आता अण्णा कोण ते विचारू नका. महाराष्ट्रात राहून जर तुम्हाला अण्णा आणि बाबूजी कोण ते माहीत नसेल तर मग तुम्ही खरे मराठी असूच शकत नाही.)तेव्हा ती मला माझ्या नावापुढे लावणे क्रमप्राप्तच आहे. मला लहानपणापासून संगीताची(मुलगी नव्हे! ;))आवड आहे. तेव्हा माझा आवाजही चांगला होता पण मला संगीत शिकण्याची संधी मात्र मिळाली नाही. असं असलं तरी श्रवण मात्र भरपूर केलंय. आकाशवाणी हे सर्वात प्रभावी माध्यम आहे आणि ह्या माध्यमाद्वारेच माझी अनेक गायक कलाकार आणि संगीतकारांशी ओळख झाली ती त्यांच्या शैलीची. ऐकलेल्या प्रत्येक गाण्याची नक्कल तर मी हुबेहुब करत असे. मात्र माझा आवाज सर्वच प्रकारच्या गाण्यांना अनुकुल नव्हता त्यामुळे माझ्या पहाडी आवाजाला अनुकुल असणारे गायन प्रकारच मी जास्त निवडू लागलो. त्यात मुख्यत्वे समरगीतं,स्फुर्तीगीतं,पोवाडे वगैरे प्रकार असतच पण मा.दिनानाथ,श्रीपादराव नेवरेकर,वसंतराव देशपांडे ह्यासारख्यांची दणदणीत आवाजातली नाट्यगीतं गायला मला फारच आवडायची.
इतरांची गाणी गाता गाता मला गाण्यांना चाली देण्याचाही नाद लागला. शालेय अभ्यासक्रमात त्या वेळी आम्हाला कवि बा.भ बोरकर,कुसुमाग्रज,पाडगावकर,वसंत बापट,अनिल वगैरे सगळ्या दिग्गज कवींच्या कविता असत.त्या कविता शाळेत म्हणण्याची तेव्हा एक विशिष्ट पद्धत असे. बहुतेक सगळ्या कविता त्या पद्धतीने आम्ही म्हणत असू. पण चौथीला आम्हाला एक केणी नावाचे गुरुजी होते त्यांनी एक कविता स्वत: चाल लावून आम्हाला शिकवली. ती कविता कुणाची होती ते आता आठवत नाही पण त्याचे बोल साधारण असे होते.... जा हासत खेळत बाल निर्झरा आनंदाने गात...
ती चाल नेहेमीच्या कविता गायनापेक्षा नक्कीच वेगळी होती आणि त्यावरून मग स्फुर्ती घेऊन मी मला आवडणार्‍या कवितांना चाली लावू लागलो.
माझ्या आठवणी प्रमाणे माझी पहिली चाल होती कवि मंगेश पाडगावकरांच्या ’सत्कार’ ह्या कवितेला.... पहिल्या हिरव्या तृणपात्याचा आज असे सत्कार.....असे त्याचे शब्द होते. मला संगीतातल्या रागांची,तालांची नुसती नावं माहीत आहेत पण ते ओळखता येत नाहीत त्यामुळे ती चाल कोणत्या रागातली होती हे माहीत नाही पण आज आठवायचा प्रयत्न केल्यावर लक्षात आलं की ती चाल त्यावेळी गाजणार्‍या एका सिनेगीतासारखी होती. अगदी जरी हुबेहुब नव्हती तरी देखिल साधारण तसा भास होईल अशी होती. अर्थात चाल लावताना माझ्या नजरेसमोर ती प्रसिद्ध चाल नव्हती पण नंतर त्यातलं साम्य लक्षात आलं आणि गंमतही वाटली. माझा नैसर्गिक कल हा रागदारीकडे असल्यामुळे माझ्या चालीही तशाच प्रकारे रागानुवर्ती असतात असा माझा अनुभव आहे. पण तो कोणता राग असतो हे मला नका विचारू कारण तेवढंच मला जमत नाही. :)
आता जेव्हा मी त्या गोष्टींचा विचार करतो तेव्हा हे लक्षात येतं की मला आवडणारी जी काही खास गाणी आहेत ती साधारणपणे दरबारी,मल्हार आणि त्याचे प्रकार,भैरवी,हमीर,यमन,मालकंस...वगैरे रागातली असतात. तेव्हा ही माझी पहिली चाल बहुतेक करून दरबारीच्या अंगाने जाणारी असावी असा तर्क आहे.
मी अशीच एका कवितेला चाल लावली होती जी ’रम्य ही स्वर्गाहुनी लंका’ ह्या भीमसेनांनी गायलेल्या गाण्याच्या अंगाने जाणारी होती. कारण जरी मला भीमसेनांची गायकी कळत नव्हती तरी अनुकरणीय नक्कीच वाटायची आणि माझ्या आवाजाला अनुकुल देखिल होती. आता माहीत झालंय की तो राग हिंडोल आहे म्हणून. पण तेव्हा हे माझ्या ध्यानी-मनी देखिल नव्हतं.

आज ह्या आठवणी येण्याचं कारण असं की हल्लीच, माझं, माझ्या एका संगीतकार मित्राशी बोलणं सुरु होतं. विषय अर्थातच संगीत हा होता.नेहमीप्रमाणे मी त्यांना विचारलं की.. सद्या काय सुरु आहे?
तेव्हा एका भक्तीगीतावर ते काम करताहेत असं कळलं. लगेच मी म्हटलं की... ऐकवा की मग त्याची चाल.
ते म्हणाले की.. अजून पूर्ण नाही झालं काम.
मी आपलं उगीच त्यांना चिडवण्यासाठी म्हटलं तुम्हाला जमत नसेल तर मला सांगा. मी लावतो चाल.
त्यांनीही मला गंमत म्हणून लगेच गीताचा दुवा दिला आणि म्हणाले..तिथे जावून वाचा आणि लावा चाल.
मी लगेच त्या दुव्यावर जाऊन शब्द वाचले आणि मला लगेच चाल सुचली. त्यांना म्हटलं की ...झाली की चाल तयार.
तर म्हणाले...पाठवा ध्वनिमुद्रित करून.
आता आली का पंचाईत? इतके दिवस मी जे काही करत होतो ते सगळं स्वान्त सुखाय होतं. आता ध्वनिमुद्रण करायचं म्हणजे पीडाच की. त्यातून आता माझा आवाज साफ खलास झालेला.एकेकाळी मला माझ्या आवाजाचा सार्थ अभिमान होता पण आज मात्र तो घशातल्या घशातच अडकतो. आता काय करणार?
मी आपलं आता नाही,मग करू म्हणून टाळायला लागलो आणि ते माझ्या पाठी लागले..करा,करा..म्हणून.
मग काय केली हिंमत आणि एकदाचं केलं ध्वनीमुद्रण. मग त्याचे मप३ रुपांतर कसं करायचं तेही त्यांनीच सांगितलं आणि शेवटी सगळे सोपस्कार होऊन एकदाची चाल त्यांच्याकडे रवाना केली. मला खात्री होती की आता ह्यानंतर पुन्हा काही ते आपल्याशी ह्या विषयावर बोलणार नाहीत. पण...
अहो आश्चर्य म्हणजे त्यांना ती चाल आवडली आणि ती चक्क ’यमन’ रागातली निघाली. आता बोला.
अजून एक दोघा जणांना चाल ऐकवली. त्यानाही आवडली असं त्यांनी सांगितलं. मग काय हो, मी मुद्दाम कविता वाचायला सुरुवात केली आणि बघता बघता आठ-दहा कवितांना चाली लावल्या.
सर्वात आधी आमच्या ह्या गुरुवर्यांना ऐकवायच्या आणि मग काही खास मित्रांना...असा प्रकार सुरु झाला. आमचे गुरुवर्य अगदी चिकाटीचे निघाले. न कंटाळता ते नित्यनेमाने माझी चाल ऐकून त्यांचे स्पष्ट मत त्यावर द्यायचे. इथे एक गंमत सांगण्यासारखी आहे.

चाल लावली,ती ध्वनिमुद्रित केली,ती मप३ मध्ये रुपांतरीत केली की गुरुवर्यांना पाठवायचो. मग गुरुवर्य मिस्किलपणे सांगायचे...ही तुमची चाल आधीच अमूक अमूक संगीतकाराने चोरलेय बरं का! ;)
आणि त्याचा पुरावाही सादर करायचे.
आता आली का पंचाईत? तद्माताय मी आपला मेहनत करून इतकी मस्त चाल लावतोय आणि ती गुरुवर्यांकडे पोचण्याआधीच कैक वर्ष आधी कुणी तरी चोरलेली असायची? ;) बरं ते संगीतकारही कुणी ऐरे-गैरे नसायचे. चांगले नावाजलेले आणि मलाही जे आवडत असत.पण म्हणून त्यांनी चक्क माझ्या चाली चोरायच्या म्हणजे काय? छे छे! हे भलतंच!त्याऐवजी माझ्याकडे एखादी चाल मागितली असती तर मी अशीच दिली असती आनंदाने ! जाऊ द्या झालं, असं म्हणून मग मी त्याच गीताला अजून वेगळ्या चाली लवायचो. तरीही तीच बोंब! कुणी तरी माझी नवी चाल देखिल आधीच चोरलेली निघायची. मग मीही मनात म्हटलं...आपण मनातच म्हणू शकतो... जाऊ द्या. आपल्यामुळे कुणाचं भलं होत असेल तर कशाला त्रागा करा. करा लेको मजा. चोरा माझ्या चाली.
मग काय मी कोण माझ्या चाली चोरतोय वगैरे बघायचं सोडूनच दिलं.आपण आपलं चाली रचत राहायच्या इतकंच ठरवलं आणि तेव्हापासून गुरुवर्यांनाही सांगितलं....ह्या पुढे मला सांगत जाऊ नका कुणी कोणती चाल चोरली ते. बिनधास्त चोरू द्या त्यांना. हवं तर तुम्हीही चोरा. ;)

आता चाली लावून गायल्यावर त्या गुरुवर्यांव्यतिरिक्त ज्या इतर काही लोकांना ऐकवायला लागलो त्यांचेही मजेशीर अनुभव आले.
एक प्रातिनिधिक अनुभव पाहा...शितावरून भाताची परीक्षा म्हणतात तशी.
आमचा एक महाजालावरील दूरस्थ पुतण्या आहे. त्याला जेव्हा पहिली रचना पाठवली तेव्हा त्याचा उत्साह असा काही होता की यंव रे यंव. म्हणाला...काका,चाल पण मस्त आहे आणि आवाजही मस्त आहे.
मनात म्हटलं..चला,कुणाला तरी आवडतंय.
मग त्याला दुसरे गाणं पाठवलं. ह्यावेळी प्रतिसाद जरा थंड होता तरी आवडलं असं म्हणाला पण मग तो मला टाळायला लागला.महजालावर मी उगवताना दिसलो रे दिसलो की तो अंतःर्धान पावायला लागला.माझ्या लक्षात आला सारा प्रकार. असे दोनचार दिवस गेले. मग एक दिवस एका गाफील क्षणी पकडलं त्याला आणि म्हटलं....बाबा रे, असं तोंड चुकवू नकोस. ह्यापुढे तुला माझ्या चाली आणि गाणी कधीच ऐकवणार नाही असा शब्द देतो. तेव्हा कुठे त्याने सुटकेचा श्वास सोडला. त्याचा तो "हुश्शऽऽऽऽऽऽऽऽऽऽ" म्हणून सोडलेला सुस्कारा इथपर्यंत ऐकायला आला मला. ;)

अजून एक छान आणि बोलकी प्रतिक्रिया मिळाली ती एका छोट्या मुलीकडून. तिचे बाबा माझं कुठलंतरी गाणं ऐकत होते आणि त्यामुळे साहजिकच त्या मुलीनेही ते ऐकलं. ती चटकन आपल्या बाबांना म्हणाली....हे असं फाटकं फाटकं गाणं बंद करा. :)

माझ्या एका मित्राने माझं गाणं ऐकून तर मला एक फार मोठी पदवीच देऊन टाकली. "संगीत चिवडामणी" अशी आणि त्याला पुढे अजून एक शेपूटही जोडलं.. स्वर खेच......रं! संगीतात चिवडा-चिवड करतो म्हणून ’संगीत चिवडामणी’आणि स्वर खेचत खेचत गातो म्हणून ’स्वर खेच....रं’ असे त्याचं स्पष्टीकरणही देऊन टाकलं.
दुसर्‍या मित्राने त्यात थोडा बदल करून म्हटलं.... "संगीत चिवडामणी स्वर’बास’कर "(आता तरी बास कर रे!) किंवा "संगीत चिवडामणी स्वर खरखर" (आवाजात इतकी खरखर आहे की...)ह्यापैकी जी हवी ती पदवी घे . मग मी विचार केला कोणती पदवी आपल्याला जास्त शोभेल? आणि पक्कं करून टाकलं.

तेव्हा आजपासून मी आहे "संगीत चिवडामणी स्वर’बास’कर-खरखर-खेच...रं पंडीत मोदबुवा!"
कसं वाटतंय माझं नवं नाव? भारदस्त आहे ना? उच्चारायला जड जातंय? मग असं करा. नुसतं "संचिस्वबाखखे पंडीत मोदबुवा" म्हणा!
जमेल ना हे? ;)