My Photo
प्रमोद देव
राहणार मुंबई, महाराष्ट्र, India
मी आहे एक सामान्य मराठी माणूस. गप्पा-गाणी,साहित्य-संगीत,विविध खेळ इत्यादि गोष्टीत मी रमतो. १)माझ्या आजवरच्या आयुष्यातील कडूगोड अनुभव मी इथे माझ्या कुवतीनुसार "पुर्वानुभव" ह्या नावाने शब्दबद्ध केलेले आहेत. आपण ते वाचावेत आणि वाटल्यास त्यावर प्रतिक्रिया द्यावी अशी आपल्याला विनंती आहे. २)तसेच "त्यांची कविता माझे गाणे" असा एक नवीन प्रयोग आपल्यासमोर सादर करत आहे.महाजालावरील काही कवी/कवयित्रींच्या कविता मला आवडल्या आणि मी त्यांना माझ्या कुवतीप्रमाणे चाली लावून माझ्याच आवाजात ध्वनीमुद्रित केलेल्या आहेत. या इथे तुम्हाला मूळ कविता वाचता येईल आणि त्याच बरोबर त्याची चालही ऐकता येईल. ३)पुर्वानुभववर लिहीलेल्या काही मोजक्या आठवणी तुम्हाला माझ्याच आवाजात "बत्तीशीची चौसष्टी" वर ऐकायला मिळतील.
View my complete profile

महाजालीय शारदीय अंक!

>> 6 November 2009

मंडळी,माझ्या मनात एक आयडियाची कल्पना आलेय. महाजालीय दिवाळी अंकासारखाच एक महाजालीय शारदीय अंक काढावा...ज्यासाठी सर्वांना हार्दिक निमंत्रण.
ह्या अंकासाठी लेखनाचा विषय कोणताही चालेल. तरीहीलोकांनी विचारणा केल्यामुळे अजून सविस्तर लिहितोय.
लेखनाचे विषय राजकीय/अराजकीय/सामाजिक/सांगितिक/ललित/प्रवासवर्णन/पुस्तक-परीक्षण/चित्रपट-नाटक परीक्षण/कथा/कविता/गजल/कविता-गजल रसग्रहण/विडंबन इत्यादि कोणतेही चालतील.

लेखन पाठवण्याची शेवटची तारीख ३०नोव्हेंबर २००९ अशी आहे. लेखनासोबत छापण्यासाठी आपले छायचित्रही जरूर पाठवावे. नाताळच्या आसपास हा अंक प्रसिद्ध करण्याचा मनसुबा आहे.
केवळ नवे/ताजे लेखन ह्या अंकासाठी पाठवावे. ह्या अंकासाठी पाठवलेले लेखन इथे प्रसिद्ध होईपर्यंत कृपया दुसरीकडे कुठेही प्रकाशित करू नये. योग्य वेळेत लेखन पाठवणार्‍या प्रत्येकाचे लेखन ह्यात समाविष्ट करण्यात येईल. संपादन कात्री/निवड निकष वगैरे असे कोणतेही बंधन राहणार नाही.

ह्या अंकाचे स्वरूप ब्लॉग पद्धतीचेच राहील...कारण मला स्वत:ला तांत्रिक गोष्टीत फारसे गम्य नाही. तरीही काही उत्साही आणि जाणकार मंडळी मदतीला मिळाली तर ह्या अंकाचे स्वरूप अधिक आकर्षक करता येईल.

तरी ह्या अंकाबाबत काही सुचना असल्यास अवश्य कळवाव्या...त्यांचे स्वागतच होईल.
लेखन पाठवण्यासाठीचा पत्ता:
attyaanand@gmail.com
लेखन पाठवताना.....शारदीय अंकासाठी....असे लिहून पाठवावे.....म्हणजे माझ्या वैयक्तिक पत्रव्यवहारापेक्षा वेगळे म्हणून लगेच लक्षात येईल.
चला तर मग आता लागा कळफलक बडवायला. कथा,कविता,लेख वगैरे जे हवे ते लिहा आणि पाठवा.
तथास्तु!!!

Read more...

ही बालगीते कोणाकडे आहेत काय?

>> 4 November 2009

मी ५वी ६वीत असताना म्हणजे सुमारे ४० वर्षापूर्वी ही दोन बालगीते पाठ करून त्यावर शाळेत बक्षिसे देखील मिळवली होती.पण ती बालगीते आता मला पुसटशी आठवतात ती अशी....

१) अशी कशी बाई ही गंमत झाली
फराळाची ताटली चालू लागली

कुशीवर झोपून लाडू कंटाळला
टुणकन ताटलीच्या बाहेर आला
गड गड गड गड गोलांटी रंगली.......वगैरे वगैरे.

आणि

२) मेथाबाईचे लगीन निघाले
दुध्या-भोपळा नवरा झाला
पुढे काशीफळ आघाडीला
वांगी-बटाटे दोहो बाजूला....... वगैरे वगैरे

ह्या बालगीतांचे कवी कोण हे देखिल मला आठवत नाहीत.आपणा पैकी कोणाला ह्याबद्दल काही माहिती असल्यास कळवण्याची कृपा करावी.

Read more...

कांद्याची पीठ पेरून भाजी!

>> 3 November 2009

मंडळी मी माझी एक आवडती पाककृती इथे चढवतोय.
बरेचजण विविध भाज्या बनवताना त्यात कांदा घालतात. पण मी आज फक्त कांद्याची भाजी कशी करतात हे सांगणार आहे.अर्थात हा पदार्थ तसा काही नवीन नाहीये. ही भाजी मी माझ्या लहानपणापासून खात आलेलो आहे....म्हणजे ही केवळ ही एकच भाजी नाही बरं का. :D
माझी आई ही भाजी अतिशय चविष्ट आणि खमंग अशी बनवायची. तुमच्यापैकी कैक जणांकडेही कदाचित ही भाजी केली जात असेल. असो. आता नमनाला वाटीभर तेल वापरल्यावर मूळ कहाणीकडे आपण आता वळू या....अहो तो ’वळू’ नाही हो. ;)
ह्या भाजीला लागणारे साहित्यः
४ कांदे,२चमचे चण्याचे पीठ(बेसन),तिखट,मीठ,साखर,तेल,मोहोरी,हिंग इत्यादि.
कृती:प्रथम कांदे सोलून,चिरून घ्यावेत. चिरताना कांदे उभे(खाली दाखवल्याप्रमाणे) चिरावेत.



त्यानंतर कढईत दोनतीन चमचे तेल घालून हिंग-मोहोरीची फोडणी करावी. त्या फोडणीत चिरलेला कांदा घालून तो चांगला परतून घ्यावा. त्यानंतर त्यात चवीपुरते लाल तिखट,मीठ आणि चिमूटभर साखर(साखरेमुळे खमंगपणा येतो.) घालून कालथ्याने सगळं एकजीव करावं.
त्यानंतर भाजीत बेसन घालावे... बेसन घालताना ते चमच्याने आधी हातावर घ्यावे आणि नीट पसरून भाजीवर पेरावे म्हणजे त्याच्या गुठळ्या होणार नाहीत. पुन्हा कालथ्याने भाजी सारखी करून मग त्यावर झाकण ठेवून एक हलकीशी वाफ द्यावी जेणेकरून बेसन कच्चं राहणार नाही.



अशा तर्‍हेने आपली भाजी तयार झाली.
करून पाहा आणि खाऊन सांगा कशी वाटली.
तळटीप: कांदे चिरल्यावर जरी जास्त दिसले तरी त्याची भाजी चोरटी होत असते. तेव्हा केवळ हे एकच तोंडीलावणे असल्यास अशी भाजी करताना आपण किती लोकांसाठी ही भाजी करणार आहोत हे लक्षात घेऊन त्याप्रमाणात कांदे आणि इतर साहित्य वापरावे.

Read more...

  © Blogger templates Inspiration by Ourblogtemplates.com 2008

Back to TOP