माझ्या आयुष्यातील आजवरच्या कडू-गोड आठवणी मी "पूर्वानुभव" म्हणून सादर करत आहे.
आपण इथे आल्याबद्दल मन:पूर्वक धन्यवाद!

३१ डिसेंबर, २०११

हृदय तोड दे!

मुटेसाहेबांनी एका गाजलेल्या हिंदी सिने-गीताचा भावानुवाद केलेला आहे(जालरंग प्रकाशनाच्या ’शब्दगाऽऽरवा २०११’ह्या हिवाळी अंकात पूर्वप्रकाशित)...ते भावानुवादित गाणे मी मूळ गाण्याच्या रूळासोबत गाऊन आपल्यासमोर पेश करत आहे...ऐकून सांगा..प्रयत्न कितपत जमलाय/फसलाय!


चित्रपट -  पुरब और पश्चिम
गीत - इंदिवर
संगीत -  कल्याणजी आनंदजी
गायक - मुकेश

कोई जब तुम्हारा हृदय तोड़ दे...ह्या हिंदी गाण्याचा भावानुवाद!



हे ध्वनीचित्रमुद्रण मुटेसाहेबांनी तयार केलंय.

३० डिसेंबर, २०११

मेरी भिगी भिगी सी!

अनामिका ह्या हिंदी सिनेमातलं,किशोर कुमारच्या आवाजातलं हे गाणं आपण ऐकलेलं असणारच....अनायासे ह्या गाण्याचा रूळ मला मिळाला आणि मी ते माझ्या आवाजात गाऊन इथे पेश करतोय....ऐकून सांगा...कितपत जमलंय/फसलंय ते.

२८ डिसेंबर, २०११

नको देवराया अंत आता पाहू!

प्रभाकर जोग ह्यांच्या गाणार्‍या वायोलिनचा रूळ बनवून मी हे गाणं माझ्या आवाजात ध्वमु केलंय..ऐका.

प्रिया आज माझी नसे साथ द्याया!

प्रभाकर जोग ह्यांच्या गाणारे वायोलिनवर वाजवलेले ’प्रिया आज माझी नसे साथ द्याया’ हे गाणं मिळालं आणि मी त्याचाच रूळ म्हणून वापर करून माझ्या आवाजात हे गाणं गायचा प्रयत्न केलाय...ऐका आणि सांगा..कितपत जमलाय/फसलाय हा प्रयत्न.

सखि मंद झाल्या तारका!

संजय देशपांडे ह्यांनी सतारीवर वाजवलेल्या ’सखि मंद झाल्या तारका’ ह्या गीताचा रूळ बनवून मी ते माझ्या आवाजात गायलंय...त्यांनी पहिलं आणि शेवटचं कडवं वाजवलंय..तस्मात मीही तेच गायलोय....ऐकून सांगा जमलंय की फसलंय?



पुन्हा एकदा गायलंय...आता सांगा..कोणतं जास्त नेमकं आहे की दोन्हीही प्रयत्न फसलेत?




प्रभाकर जोग ह्यांच्या गाणारे वायोलिनचा रूळ बनवून आता हे गाणं पूर्णपणे गायलंय...कसं वाटतंय ते ऐकून सांगा.

अशी पाखरे येती!

संजय देशपांडेकृत सतारीवर वाजवलेले ’अशी पाखरे येती’ हे गाजलेले गाणे  ऐकले आणि मग त्याचाच रूळ म्हणून वापर करून मी त्यावर माझी गाण्याची हौस भागवून घेतली....ऐका आणि सांगा..कितपत जमलंय/फसलंय.

२७ डिसेंबर, २०११

मानसीचा चित्रकार तो!

संजय देशपांडेकृत सतारीवर वाजवलेले ’मानसीचा चित्रकार तो’ हे गाणे मिळाले..मग त्याचाच रूळ म्हणून वापर करून मीही आपलं नरडं जरा साफ करून घेतलं..ऐका आणि सांगा कितपत जमलंय/फसलंय ते!


२९ नोव्हेंबर, २०११

हिवाळी अंक २०११ संबंधीचे निवेदन!

दिवाळी अंकानंतर आता आपल्याला वेध लागलेत हिवाळी अंकाचे. आपल्या जालरंग प्रकाशनाच्या हिवाळी अंकाचे हे तिसरे वर्ष आहे. ह्या अंकासाठी आपले उत्तमोतम साहित्य पाठवावे असे आम्ही आपणास आवाहन करत आहोत...
साहित्य कोणते असावे?
साहित्याला  विषयाचे/प्रकाराचे कोणतेही बंधन नाही ... राजकीय/अराजकीय/सामाजिक/सांगितिक/ललित/विनोदी/प्रवासवर्णन/चरित्र/पुस्तक-परीक्षण/चित्रपट-नाटक परीक्षण/कथा/कविता/गजल/कविता-गजल रसग्रहण/विडंबन/इत्यादि कोणत्याही विषयावरील लेखन चालेल.. त्याच बरोबर ध्वनीमुद्रण(अभिवाचन.. कविता अथवा लेखाचे),ध्वनीचित्रमुद्रण,छायाचित्रण आणि व्यंगचित्र अशा प्रकारचं  साहित्यही ह्या अंकासाठी आपण पाठवू शकता.

काही अटी आणि नियम:
  केवळ नवे/ताजे लेखन ह्या अंकासाठी पाठवावे. ह्या अंकासाठी पाठवलेले लेखन अंकात प्रसिद्ध होईपर्यंत कृपया दुसरीकडे कुठेही प्रकाशित करू नये. योग्य वेळेत लेखन पाठवणार्‍या प्रत्येकाचे लेखन ह्यात समाविष्ट करण्यात येईल. संपादन कात्री/निवड निकष वगैरे असे कोणतेही बंधन राहणार नाही. जरूर तिथे संबंधित साहित्यिकाशी बोलून निर्णय घेतला जाईल.

अहो, आम्हालाही ह्या अंकात भाग घ्यायचाय, पण खरंच सांगतो/सांगते नवीन लिहायला अजिबात वेळ नाहीये हो..जुनं अजिबात चालणार नाही का?

नवीन लिहायला वेळ नाही...हरकत नाही...मग आपले जुने लेखनही चालेल.
अरेच्चा,वर तर म्हणताय की केवळ नवे आणि ताजे लेखन हवंय आणि इथे म्हणता जुनेही चालेल...नीट काय ते सांगा ना!
थांबा,थांबा मंडळी! असे एकदम अंगावर येऊ नका....सांगतो...नीट वाचा.  :)
जुने लेखनही चालेल, पण, त्याचे स्वरूप बदलून,बरं का...म्हणजे कसे? सांगतो....आपल्याच कोणत्याही जुन्या लेखाचे/कवितेचे अभिवाचन/गायन करून आपण ते आम्हाला पाठवू शकता...पाठवतांना कृपया तसा उल्लेख मात्र करावा.



साहित्य कसे पाठवावे?
१) लेखी साहित्य एचटीएमएल अथवा डॉक्युमेंट सदरात पाठवावे...पीडीएफ स्वरूपात नको.
२) आपल्या साहित्यासोबत जर काही छायाचित्रं असतील तर ती वेगळी जोडावीत(अटॅचमेंट).
३)ध्वनीमुद्रणं...एम्पी३ प्रकारात, ध्वनीचित्रमुद्रणं .flv किंवा .avi स्वरूपात पाठवावीत.
४)छायाचित्र jpeg, png, gif, tiff ह्या प्रकारात असावीत.


ह्या अंकाबाबत आपल्या काही सूचना असल्यास अवश्य कळवाव्या...त्यांचे स्वागतच होईल.
लेखन पाठवण्यासाठीचा पत्ता:
jaalarangaprakaashana@gmail.com

साहित्य पाठवताना हिवाळी अंक २०११साठी असे लिहून पाठवावे.
आपले साहित्य आमच्याकडे पाठवण्यासाठी शेवटची तारीख आहे २१ डिसेंबर २०११

चला तर मग आता लागा तयारीला आणि आपले साहित्य आमच्याकडे ठरलेल्या मुदतीत पाठवायला विसरू नका.

२५ नोव्हेंबर, २०११

जाऊं कहां बता ऐ दिल!

छोटी बहन ह्या जुन्या सिनेमातील स्वर्गीय मुकेश ह्याने गायलेले हे गीत माझ्या आवाजात काराओके रुळाच्या साथीने कसं वाटतंय ते ऐकून सांगा.

१७ नोव्हेंबर, २०११

आ लौटके आजा मेरे मीत!

हिंदी सिनेसंगीतातले हे जुने गाणे स्वर्गीय मुकेशच्या आवाजात आपण कैक वेळेला ऐकलेले असेल....आता एका वेगळ्या आवाजात ऐका...जमलंय/फसलंय हे तुम्हीच ठरवा.



१५ नोव्हेंबर, २०११

कानडा राजा पंढरीचा!

माझे दोन आवडते गायक..सुधीर फडके आणि वसंतराव देशपांडे ह्यांनी गायलेले ’कानडा राजा पंढरीचा’ हे गीत माझे अतिशय आवडते असे आहे..आज पंडितजींच्या कृपेने त्या गाण्याचा रूळ मिळाला..मग काय, मी देखिल माझी गायनाची गाडी पळवली त्यावरून..एकदम भरधाव! :)



१४ नोव्हेंबर, २०११

देहाची तिजोरी!

आम्ही जातो आमुच्या गावा ह्या चित्रपटातील एक गाजलेले गीत..देहाची तिजोरी...त्याचा रूळ(ट्रॅक) मिळाला..मग काय केला प्रयत्न त्याबरोबर गायचा...आता तुम्हीच ऐका आणि ठरवा..कितपत जमलाय/फसलाय ते!




७ नोव्हेंबर, २०११

स्वर आले दुरुनी!

सुगम संगीतातला माझा आदर्श असलेले सुप्रसिद्ध गायक आणि संगीतकार सुधीर फडके तथा बाबुजी ह्यांची गाणी ऐकतच मी लहानाचा मोठा झालोय. ह्याआधी त्यांनी गायलेले ’तोच चंद्रमा नभात’ ट्रॅकबरोबर गाण्याचा प्रयत्न केला...तो बराच यशस्वी झाला अशा प्रतिक्रिया मिळाल्यामुळे ह्यावेळी त्यांच्याच एका गीताचे पुन्हा गायन करण्याची हिंमत करतोय. प्रभाकर जोग हे ह्या गीताचे संगीतकार आहेत आणि मी त्यांच्याच ’गाणारे वायोलिन’चा ट्रॅक वापरूनच हे गाणं गायलंय...पाहा आपल्याला आवडतंय का?




२ नोव्हेंबर, २०११

तोच चंद्रमा नभात

बर्‍याच दिवसांपासून ’तोच चंद्रमा’चा ट्रॅक पडून होता...अचानक झटका आला..म्हटलं पाहूया आपल्यालाही त्यासोबत गाता येतंय का ते...दोन तीन वेळा प्रयत्न केला आणि जमले की हो...आधी केवळ ध्वनीमुद्रण केले होते...मग आता सरळ ध्वनीचित्रमुद्रणच केलं..ऐकून/पाहून सांगा आवडला का हा प्रयत्न?
हे ध्वनीचित्रमुद्रण वेबकॅमद्वारे थेट युट्युबवर केलंय...ध्वनी आणि ओठांच्या हालचाली ह्यांमध्ये मला बराच फरक आढळतोय...आधी आवाज येतोय आणि मग तोंड हलतंय...ह्याबाबतची सुधारणा कशी करायची..कुणी सांगू शकेल काय?




३१ ऑक्टोबर, २०११

फक्त केला आराम!

जगाच्या पाठीवर ह्या सिनेमातलं  सुधीर फडके आणि आशा भोसले ह्यांनी गायलेलं आणि अतिशय गाजलेलं असं गाणं....बाई मी विकत घेतला शाम...अतिशय अवीट गोडीचं असं हे गाणं कुणा रसिकाला आवडलं नसेल असे होऊच शकत नाही...अहो पण नुसतंच गाणं नाही आवडत लोकांना...त्यातले शब्दही आवडतात आणि कधी कधी त्याचे विडंबन करावे असेही वाटू लागते....माझ्या लहानपणी ह्या गाण्याचे विडंबन मी त्यावेळचे सुप्रसिद्ध नकलाकार श्री. वि.र.गोडे ह्यांच्या तोंडून ऐकले होते....त्यातले धृवपदच आता मला आठवतंय....

नाही खर्चिली कवडी दमडी, नाही वेचिला दाम
फुकट घेतला बाम, बाई मी फुकट घेतला बाम
...

हे इतकंच मला आठवतंय...पण जेव्हा जेव्हा मूळ  गाणं लागतं तेव्हा मला हे विडंबनही आठवतं....आज अचानक माझ्या डोक्यातही एक सणकी आली आणि मी ह्याच गाण्याच्या धृवपदाचे माझ्या पद्धतीने विडंबन केले...गेले बरेच दिवस काही ना काही शारिरीक दुखापतींमुळे  माझा व्यायाम जवळपास बंद आहे..तेव्हा साहजिकच त्याचे प्रतिबिंब त्यात उमटले........
नाही खर्चली चरबी बिरबी
नाही गाळिला घाम
फक्त केला आराम
अहो मी फक्त केला आराम....
हे इतकं करून मी ते थोपुवर..म्हणजे फेसबुकवर  टाकलं आणि विडंबन आवडलं म्हणून सांगणार्‍या एकामागून एक प्रतिक्रिया यायला लागल्या...त्यात क्रांतिने, "काका,पूर्ण करा हे विडंबन!" अशी विनंती केली.
मग काय आधी मूळ गीत शोधून काढलं आणि वाचलं तेव्हा लक्षात आलं की हे काही आपले काम नाही...तरीही उगाच एक चाळा म्हणून रला  ट ,टला फ असे जोडून मोडतोड सुरु केली...आणि हा हा म्हणता बर्‍यापैकी जमलं की हो...मग जरा त्याच्यावर संस्कार करण्यासाठी खुद्द क्रांतिकडेच ते गीत पाठवलं...तिने अगदी सहजपणाने तीन-चार बदल सुचवले आणि खरोखरच एक विडंबन तयार झालं.
गीताचं विडंबन करायचं असे जरी ठरवले होते तरी मला असं वाटतंय की हे मूळ गीताचे विडंबन म्हणण्याऐवजी त्याच चालीत गाता येईल असे, पण एक गमतीशीर असे स्वतंत्र गीतच तयार झालंय असे नक्की म्हणता येईल...तरीही मूळ प्रेरणा ज्या गीतापासून सुचली त्यातल्या भावाशी प्रतारणा करणारे हे गीत असल्यामुळे ह्याला आपण विडंबनच म्हणूया!
आता पाहूया पूर्ण गीत.....
नाही खर्चली चरबी बिरबी
नाही गाळिला घाम
फक्त केला आराम
अहो मी फक्त केला आराम

कुणी म्हणे मी वेडा झालो, कुणा वाटले उगा बरळलो
जन्मभरी त्या गादीवरती लोळायाचे काम

काल झोपलो आजच उठलो, कुशी बदलूनी पुन्हा झोपलो
एवढाच हो माझ्यासाठी रोज असे व्यायाम

जितुके खाणे तितुके बसणे, बसूनी दमणे आणि झोपणे
कुणी न म्हणती तरीही माझ्या आरामास हराम


हे विडंबन पूर्ण करून थोपुवर टाकलं आणि मग काहीजणांनी मागणी केली की काका आता हे त्याच पद्धतीने गाऊन सादर करा...मग काय महाजालावर शोधला त्याचा ट्रॅक...प्रभाकर जोग ह्यांचे गाणारे वायोलिन मदतीला आलं...त्यालाच ट्रॅक समजून त्याच्याच साथीने माझ्या खडबडीत आवाजात गायलं...आता ऐकून सांगा कसं वाटतंय ते...एकदोन ठिकाणी किंचित घाई झालेय..पण तरीही माझ्या कुवतीच्या मानाने मी बर्‍यापैकी न्याय दिलाय असं म्हणायला हरकत नाही...बाकी काय ते तुम्हीच ठरवा.  

२८ ऑक्टोबर, २०११

महा’गीत’कार जगदीश खेबूडकर!

३० जानेवारी १९४८. ह्या दिवशी महात्मा गांधींची हत्या झाली आणि महाराष्ट्रात सगळीकडे जाळपोळ सुरू झाली...एका विशिष्ट जातीच्या लोकांना वेचून काढून,त्यांना निर्वासित करून,त्यांच्यादेखत,त्यांच्या घरादाराची राखरांगोळी करण्यात येत होती...अशाच एका जगदीश नावाच्या विस्थापित तरुणाने डोळ्यासमोर आपलं धडधडा जळणारं घर बघितलं आणि त्याच्या मनाने टाहो फोडला... त्यातूनच एका गीताचा जन्म झाला. त्या गीताचे शब्द होते...मानवते तू विधवा झालीस!
ह्याच गीताने त्याच्यातला कवी जागा झाला. त्यानंतर त्याने बर्‍याच कविता लिहिल्या. त्या वेळच्या नामांकित अशा वृत्तपत्रांना,मासिकांना पाठवल्या; पण सगळीकडून त्या साभार परत येत होत्या...मग कंटाळून जाऊन जगदीशने आपली कवितांची वहीच फाडून टाकली. त्यावर त्याचा मोठा भाऊ रागावला आणि जगदीशला आपली चूक कळली. त्याने पुन्हा ती फाडलेली पाने जोडली आणि नव्या उमेदीने , भावाच्या सल्ल्यावरून भावगीते, भक्तिगीते आणि अभंग लिहायला सुरुवात केली आणि आकाशवाणीकडे पाठवून दिली. लवकरच जगदीशला आकाशवाणीकडून आमंत्रण आलं आणि त्यांच्या मान्यवर कवींमध्ये जगदीशची वर्णी लागली. ते वर्ष होतं १९५६-५७. जगदीशचं आकाशवाणीवर जे पहिलं गीत सादर झालं ते होतं....
खांद्यावरती शतजन्माच्या घेऊन पुण्याईला
काशीला श्रावण बाळ निघाला
काशीला श्रावण बाळ निघाला
माय आंधळी, पिता आंधळा
ग्रीष्म ओकतो अनन ज्वाळा
जल तृष्णेने माता-पित्यांचा व्याकूळ जीव झाला
श्रावण बाळ निघाला


आणि इथून जगदीशची गाडी भरधाव पळायला लागली...१९६० साली वसंत पवारांनी,’रंगल्या रात्री अशा’ ह्या चित्रपटासाठी जगदीशकडून तीन लावण्या लिहून घेतल्या...आणि मग जगदीशने कधीच मागे वळून पाहिले नाही.... त्यातली गाजलेली लावणी म्हणजे..
नाव गांव कशाला पुसता, मी आहे कोल्हापुरची
मला
हो म्हणतात,लवंगी मिरची....
ह्या लावणीला,१९६० सालचे रसरंग फाळके पारितोषिक मिळाले. ह्या लावणीचा हा रचयिता जगदीश म्हणजेच आपल्याला माहीत असलेले सुप्रसिद्ध कवी आणि गीतकार श्रीयुत जगदीश खेबूडकर होय.


१९६० सालच्याच ’मोहित्यांची मंजुळा’ ह्या चित्रपटातील त्यांनी लिहिलेले एकमेव गीत गाजले...
बाई बाई मन मोराचा कसा पिसारा फुलला


१९६३ साली, भालजी पेंढारकर निर्मित ’साधी माणसं ह्या सिनेमात खेबूडकरांना एक गाणं लिहायची संधी मिळाली....ते गाणं होतं...
ऐरणिच्या देवा तुला ठिणगी ठिणगी वाहु दे
आभाळागत माया तुजी आम्हांवरी र्‍हाउ दे

हे गाणंही तुफान गाजलं आणि चित्रपट-गीतलेखनात प्रस्थापित अशा ग.दि.माडगूळकर,पी.सावळाराम आणि शांता शेळके ह्यांच्या पंक्तीत जगदीश खेबूडकर जाऊन बसले.

चित्रपट सृष्टीत खेबूडकरांचा आता चांगलाच जम बसला होता पण खर्‍या अर्थाने ते घराघरात,जनमानसात पोचले ते १९७२सालच्या
देहाची तिजोरी,भक्तीचाच ठेवा
उघड दार देवा आता,उघड दार देवा
..............  ह्या भक्तिगीताने.

’आम्ही जातो आमुच्या गावा’ ह्या चित्रपटासाठी लिहिलेली त्यांची सगळीच गाणी गाजली; पण ’देहाची तिजोरी’ने ते थेट प्रत्येकाच्या देवघरात पोचले.
मला आठवतंय, हे गाणं जेव्हा जेव्हा रेडिओवर लागायचं तेव्हा तेव्हा आमच्या वाडीतल्या सगळ्या रेडिओंचे आवाज क्षणात वाढत असत...वातावरण नुसतं भारून जायचं. मला आठवतंय,शेजारच्या गुजराथी सुशीलामावशी माझ्या आईला म्हणायच्या, "ए विद्याचे आई,ते तुमचे भजन हाय ना, देहाची तिजोरी...ते मला लई आवडते. असा वाटते की आपण एकदम मंदिरात देवासमोर बसून भजन ऐकतेय."
ह्यापेक्षा जास्त बोलकी प्रतिक्रिया काय बरं असू शकेल.
ह्याच चित्रपटातले  ब्रह्मा विष्णू आणि महेश्वर सामोरी बसले,मला हे दत्तगुरू दिसले  हे गाणंही  देहाची तिजोरीच्या साथीने आकाशवाणीच्या, सकाळी ११ वाजताच्या, दर गुरुवारच्या कामगार सभेच्या भक्तिगीतांच्या कार्यक्रमात हमखास हजेरी लावू लागलं...वर्षानुवर्षे ही गीतं मी ऐकत आलोय...पण त्यांचा गोडवा  कणभरही कमी झालेला नाहीये.
ह्याच चित्रपटातील १) मी आज फूल झाले, २) स्वप्नात रंगले मी, ३) हवास तू , हवास तू  ही गाणीही तेवढीच गाजली.

खेबूडकरांना सिनेमा सृष्टीत सगळेजण ’नाना’ म्हणत...आता ह्यापुढे मीही त्यांचा उल्लेख ’नाना’ असाच करेन.
नाना हे सिद्धहस्त कवी आणि गीतकार तर होतेच....पण त्यातही त्यांची गीतकाराची भूमिका ही जास्त अवघड होती. गीतकार म्हटलं की त्याला कोणतंही गीत लिहिण्याआधी त्या मागची कथा,प्रसंग,काळ, वेळ,पात्रपरिचय आणि अशा बर्‍याच गोष्टी जाणून घ्याव्या लागतात...त्याशिवाय ते गीत नेमकेपणानं बनत नाही. पण एकदा का ह्या सर्व गोष्टी डोक्यात नीट बसल्या की नानांच्या लेखणीतून ते गीत बघता बघता साकार होत असे. शब्द जणू त्यांच्यापुढे हात जोडून याचना करत..मला घ्या,मला घ्या..म्हणून.

कधी कधी संगीतकारांनी आधीच चाल तयार करून ठेवलेली असते आणि त्याबरहुकूम गीतकाराला  गीत लिहावं लागतं. अशा वेळी गीतकाराची काय पंचाईत होते हे आपण नानांच्याच शब्दात वाचूया..........
 चालीवर गाणं लिहिताना गीतकाराला मोठी तडजोड करावी लागते, असं सांगत नाना म्हणतात, पूर्वी आम्ही गाणी लिहायचो आणि संगीतकार त्याला चाल लावायचा. पुढे हे चित्र पालटलं. संगीतकार आधी चाल लावू लागला अन् त्या चालीवर गाणी लिहिली जाऊ लागली. म्हणजे आधी अंगडं-टोपडं शिवायचं आणि मग बाळाला जन्म द्यायचा, असा प्रकार सुरू झाला. चालीवर लिहिताना गीतकाराला गाणं नको तिथं तोडावं लागतं व नको तिथं जोडावं लागतं. एक तडजोड म्हणून नाना हे देखील करत पण मनापासून त्यांना हा प्रकार कधीच आवडला नाही.

व्ही शांताराम ह्यांच्या ’पिंजरा’ चित्रपटासाठी नानांनी तब्बल ११० गाणी लिहिली...त्यातली ११ गाणी निवडण्यात आली. ह्याच चित्रपटातील
तुम्हावर केली मी मर्जी बहाल
नका सोडून जाऊ रंगमहाल

ह्या लावणी विषयी सांगताना नाना म्हणतात....त्या प्रसंगासाठी शांताराम बापूंनी माझ्याकडून ४९ लावण्या लिहून घेतल्या...त्यातील एकही न आवडल्याने मी निराश होऊन घरी परतलो. झोप पार उडाली होती. डोक्यात लावणीचेच विचार घोळत होते आणि रात्री दोन वाजण्याच्या सुमारास लावणी सुचली, 'तुम्हावर केली मी मर्जी बहाल...'. लगेच फोन करून मी ती बापूंना ऐकवली. ‘व्वा! झक्कास, खेबुडकरजी, गाणं खास जमलं बरं का’ अशा शब्दात बापूंनी मला शाबासकी दिली.अगदी कृतकृत्य झाल्यासारखं वाटलं.

आपल्या गीतांचे वैशिष्ट्य सांगताना नानांनी एके ठिकाणी म्हटलंय , ‘मी मागणी तसा पुरवठा करतो, मात्र गुणवत्तेशी कदापिही तडजोड करीत नाही. विशेष म्हणजे कोणतीही कविता अथवा गीत पूर्ण लिहून झाल्यावर त्यातील प्रत्येक शब्दाचं मी स्वत:च परीक्षण करीत असतो. दादा कोंडकेंसाठी ‘सोंगाड्या’पासून ‘तुमचं आमचं जमलं’पर्यंतची गाणी लिहिली. नंतर दादांनी मला गीत लिहिताना थोडं कमरेखाली उतरण्याचा सल्ला दिला. त्यावेळी मी त्यांना स्पष्ट शब्दात नकार दिला. जनतेला देताना चांगलंच द्यायचं, असं माझं ध्येय आहे. गीतकारापेक्षाही मला स्वत:ला कवी म्हणून घेणं अधिक आवडतं.

नानांच्या लेखणीचा आवाका आपण पाहिला तर थक्क व्हायला होतं. त्यांनी गाण्यातले सगळे प्रकार हाताळलेत... बालगीतं ते प्रेमगीतं, नांदी, पोवाडा, भक्तिगीतं, अंगाई गीतं, कीर्तन, देशभक्तिपर गीतं, गणगौळण,लावणी, गौरीगीतं, वासुदेव गीत, माकडवाला, कोळीगीतं, सवाल-जवाब, एकतारी भजन, डोंबार्‍याचं गीत, कुडबुडा जोशी गीत, वारकरी भजनापर्यंत सगळे प्रकार त्यांनी लीलया हाताळलेत. गीत लिहिताना शब्दांचे सोपेपण आवश्यक असतं व ते नानांनी अचूक साधल्याने ‘देहाची तिजोरी’ सारख्या भक्तिगीतांपासून  ‘मला इष्काची इंगळी डसली’ सारख्या शृंगार गीतांपर्यंत सर्व प्रकार ते सहजपणे हाताळू शकले. त्यांना सुपारीच्या खांडाचेही व्यसन नव्हतं मात्र त्यांनी पान व विडा यांच्याशी संबंधित दोनशेहून अधिक गाणी लिहिली. तसेच अष्टविनायकाची एकदाही वारी न करता ‘अष्टविनायका तुझा महिमा कसा’ हे खास गणेशभक्तांसाठी दिलेलं अप्रतिम गाणं म्हणजे नानांचा अजब महिमाच होय. आपल्या एकापेक्षा एक वरचढ गाण्यांनी त्यांनी मराठी रसिकांना अक्षरश: डोलायला लावलं आहे.

निर्माते-दिग्दर्शकांमध्ये भालजी,शांतारामबापूंपासून यशवंत भालकरांपर्यंत, संगीतकारांमध्ये वसंत पवार,सुधीर फडकेंपासून अजय अतुल, शशांक पोवारांपर्यंत, गायकांमध्ये सुधीर फडके,जयवंत कुलकर्णींपासून अजित कडकडे, अजय-अतुलपर्यंत, गायिकांमध्ये सुलोचना चव्हाण,,लता मंगेशकरांपासून ते वैशाली सामंतपर्यंतच्या गायिकेबरोबर नानांनी काम केलंय. म्हणजेच निर्माते,दिग्दर्शक, संगीतकार, गायक-गायिकांच्या जवळपास तीन पिढ्यांबरोबर नानांनी काम केलंय. या अफाट कामांद्वारे अनेक कलाकृतींवर नानांचा अस्सल गावरान ठसा उमटला. त्यांनी ३५० चित्रपटांसाठी २७०० गीते लिहिली तर ३५०० कविता लिहिल्या.

पहिल्या गीताला मिळालेल्या रसरंग फाळके पुरस्कारापासून सुरू झालेल्या मानसन्मानांच्या प्रवासात ६० हून अधिक पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आलं. महाराष्ट्र शासनाचे ११ पुरस्कार, फाळके प्रतिष्ठान, गदिमा पुरस्कार, बालगंधर्व, शाहू पुरस्कार, कोल्हापूर भूषण, करवीर भूषण, दूरदर्शन जीवनगौरव, कुसुमाग्रज साहित्य पुरस्कार अशा अनेक पुरस्कारांनी नानांना सन्मानित करण्यात आलं.

नानांची गाजलेली खूप गीतं आहेत.सगळीच इथे द्यायची म्हटलं तर पानंच्या पानं भरतील..म्हणून त्यातलीच चटकन आठवणारी काही गीतं देतोय.

* कसं काय पाटील बरं हाय का?
* सोळावं वरीस धोक्याचं गं
* दिसला गं बाई दिसला
* छबीदार छबी मी तोर्‍यात उभी
* मला लागली कुणाची उचकी
* कशी नशिबानं थट्टा आज मांडली
* चंद्र आहे साक्षीला
* सत्य शिवाहूनी सुंदर हे
* आकाशी झेप घे रे पाखरा
* सावधान होई वेड्या
* एकतारी संगे एकरूप झालो,
* धागा जुळला, जीव भुलला,
* धुंदी कळ्यांना धुंदी फुलांना
* कल्पनेचा कुंचला
*हा सागरी किनारा, ओला सुगंध वारा
* विठू माउली तू माउली जगाची
* कधी तू हसावी, कधी तू रुसावी
* सत्यम शिवम सुंदरा
* कुण्या गावाचं आलं पाखरू,
* आज प्रीतीला पंख हे लाभले रे,
* सख्या रे घायाळ मी हरिणी,
* रुणझुणत्या पाखरा,
* तुझे रूप राणी कुणासारखे गं?
* मोरया..मोरया..

जन्म-१० मे १९३२  आणि मृत्यू-३ मे २०११....म्हणजे उणंपुरं ७९ वर्षांचं आयुष्य नानांना लाभलं...१९५६ सालापासून सिनेमाक्षेत्राशी जोडले गेलेले नाना त्यांच्या अखेरच्या श्वासापर्यंत त्याच्या सोबत राहिले....५५ वर्ष सतत गीतलेखन करणं आणि तेही तेवढ्याच ताकदीने हे केवळ नानाच करू जाणे.....नानांना माझे शतश: प्रणाम.

ज्या नानांनी असंख्य  कविता/गीतं लिहिली...त्याच नानांवर त्यांच्या कन्येने लिहिलेल्या एका कवितेने लेखाचा समारोप करतो.

जीवनगाणे
बहरुनी पुष्पात सार्‍या,गंध माझा वेगळा
लहरुनी छंदात सार्‍या,छंद माझा वेगळा॥धृ॥
सुख म्हणती ज्यास ते
ते सर्व काही भोगले
दुःख आले जे समोरी
सोसुनी ना संपले
अंत नाही ज्यास, ऐसा खेळ आहे मांडला॥१॥
वाट पुढची चालताना
सोबती सारे असे
उतरणीला वळण येता
संगती मम सखी नसे
क्लेश मनीचे लपवण्या, हा मुखवटा मी ओढला॥२॥
दान द्यावे ज्ञान घ्यावे
जीवनाचे मर्म हे
काव्यरुपी दान देता
तृप्त झाले कर्म हे
दुखविलेल्या लोचनांनी, पाहतो सुख सोहळा॥३॥
- कविता खेबुडकर( अमृता पाड़ळीकर)

नानांबद्दल आणि त्यांच्या गीतलेखनाबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी खालील दुव्यावर टिचकी मारा.
http://72.78.249.107/esakal/SearchResult.aspx?q=%E0%A4%9C%E0%A4%97%E0%A4%A6%E0%A5%80%E0%A4%B6+%E0%A4%96%E0%A5%87%E0%A4%AC%E0%A5%81%E0%A4%A1%E0%A4%95%E0%A4%B0&b=


(सर्व मजकूर आणि छायाचित्र महाजालावरून साभार)
संकलक: प्रमोद देव

मायबोलीच्या  हितगुज  दिवाळी अंक २०११ मध्ये पूर्वप्रकाशित

२० सप्टेंबर, २०११

’चाल’कत्व!

२०११च्या मायबोली वर्षाविहारला ह्यावेळी हजेरी लावली आणि त्यामुळे मित्रमंडळाचं वर्तूळ अजून मोठं झालं. खरं तर गेले जवळपास पाच वर्ष सदस्य असूनही मी मायबोलीवर फारसा सक्रिय कधीच नव्हतो. हाताच्या बोटावर मोजता येतील इतकेच लोक मला आणि मी त्यांना नावाने ओळखत होतो..त्यातही एक/दोन जणांनाच मी प्रत्यक्ष भेटलो होतो....मात्र वविच्या आधी टी-शर्ट नोंदणी आणि टी-शर्ट वाटप निमित्ताने दोन वेळा शिवाजीपार्कच्या कट्ट्यावर हजेरी लावली आणि अजून किमान दहा-बारा जणांना प्रत्यक्ष भेटलो...त्यातले बहुसंख्य लोक मला आधी नावानिशी माहीतही नव्हते...असो.

वविला भरपूर दंगामस्ती करतांना तीन चांगल्या आवाजाच्या तरूण मित्रांशी माझी ओळख झाली आणि ह्या आवाजाचा उपयोग मला करून घेता येईल अशी आशा मनात निर्माण झाली...आता तुम्ही म्हणाल की आवाजाचा उपयोग?हा काय प्रकार आहे? :) सांगतो....तसं पाहायला गेलं तर आता जालावरच्या बहुसंख्य मित्रमंडळींना हे माहीत झालंय की मी एक हौशी आणि छांदिष्ट चालक आहे...चालक? हो...चालकच! कवितांना चाली लावतो ह्या अर्थाने हो... ’चाल’क! ;)
हं, तर काय झालं....जरा मूळ मुद्द्याकडे येतो आता. वविला भेटलेल्या त्या तीनजणांना मी माझी कल्पना सांगितली ती अशी....मी आजवर बर्‍याच कवितांना चाली लावलेत. त्यातल्या काही निवडक एक/दोन चाली मी तुम्हाला पाठवतो...तुम्ही त्या तुमच्या आवाजात गाऊन मला पाठवायच्या...नेहमीपेक्षा काही तरी हटके करायला मिळणार म्हणून त्यांनीही उत्सुकतेने होकार दिला. ह्या तीन तरूणांपैकी दोन माझ्यापासून बरेच दूर राहात असल्यामुळे आम्ही प्रत्यक्ष एकमेकांना वारंवार भेटणे शक्य नव्हते, त्यामुळे हे सगळे काम इमेलच्या माध्यमातूनच होणार होते...पण तिसरा एकजण तर माझ्या अगदीच जवळ राहणारा निघाल्यामुळे तो म्हणाला...काका,मी येईन तुमच्या घरी...मला तुम्ही तिथेच ऐकवा तुमच्या चाली..मी माझ्या आवाजात गायचा प्रयत्न करेन! अशा तर्‍हेने तीन जणांच्या होकारामुळे, त्यांच्या तरूण आवाजात आता माझ्या चाली जास्त लोकांना ऐकायला आवडतील अशी खुशीची गाजरं खात मी घरी परतलो. मध्यंतरी एकमेकांच्या इमेल आणि भ्रमणध्वनीक्रमांकाची देवघेवही झाली.

त्यानंतर मी दूरस्थ अशा त्या दोन पुतण्यांना माझ्या चालींची एम्पी३ फाईल आणि संबंधित कवितेचा दुवा असे दोन्ही पाठवून दिले. बरेच दिवस कुणाकडूनही काही उत्तर आले  नाही. त्यातला एकजण थोपुवर भेटला तेव्हा त्याला विचारल्यावर..विचारल्यावर बरं का! स्वत:हून नाही. ;)   त्याने सांगितले...काका,चाल ऐकली,आवडलीही, पण ताल कठीण आहे..मला नाही जमणार! :(
दुसराही थोपुवर भेटला...त्याला विचारले...तो म्हणाला, अजून मला वेळच मिळाला नाहीये त्या फाईल्स पाहायला. तिसरा, काही ना काही कारणाने आजपर्यंत घरी आलेला नाहीये...थोडक्यात काय तर...परिस्थिती जैसे थे...एकूणच माझ्या चाली माझ्या व्यतिरिक्त दुसरे कुणी गाऊ शकेल अथवा गाईल अशी आशा उरली नाही. असो.

त्यानंतर इथे मायबोलीवर गणेशोत्सवाची घोषणा झाली...त्यासाठी संयोजन मंडळात काम करण्यासाठीच्या आवाहनाला मी प्रतिसाद दिला आणि माझी संयोजन मंडळात वर्णीही लागली...खरं तर मी नेमकं काय करू शकेन ह्याची मलाच कल्पना नव्हती...पण काम करण्याची इच्छा आणि भरपूर मोकळा वेळ ह्या गोष्टी हाताशी असल्यामुळे मी बिनधास्तपणे हो म्हणून टाकलं. संयोजन मंडळातल्या इतर चार व्यक्ती माझ्यापेक्षा खूपच तरूण असल्यामुळे आपोआपच मला वडिलकीचा मान मिळाला आणि कामाचा भार माझ्यावर फारसा पडणार नाही हे त्यांनी पाहिले आणि त्याप्रमाणे मला सहज जमतील आणि आवडतील अशी मुशो(मुद्रितशोधन) आणि गणेशोत्सवासाठी गाणी तयार करणे  अशी दोन कामं माझ्यावर सोपवली....इथे माझा ’चाल’कत्वाचा लौकिक कामी आला. ;)
गाणी तयार करायची तर आधी त्यासाठी काव्य हवे...आता ते कुणाकडून मागवावे बरं? लगेच माझ्या डोळ्यासमोर काही नावं झळकली.. जयश्री अंबासकर,क्रांती साडेकर,गंगाधरपंत मुटे आणि कामिनी केंभावी(श्यामली)....ही चौघंही माझ्या जवळच्या वर्तूळातली असल्यामुळे मी हक्काने त्यांच्याकडून काही गणेशगीतांची मागणी केली. खरं सांगायचं तर माझ्याकडे आधीच ह्या कविमंडळींच्या काही काव्यरचना होत्याच ज्यांना मी आधी चाली लावलेल्या होत्या....पण त्या सगळ्या माझ्या आवाजात ध्वनीमुद्रित होत्या त्यामुळे त्या कुणी ऐकायला उत्सूक असणार नाहीत ह्याची जाणीव होती..म्हणून तर ताज्या दमाचे आणि चांगल्या आवाजाचे गायक/गायिका मला हवे होते...पण आयत्यावेळी आता काय करायचं असा यक्षप्रश्न उभा राहिला. गऊच्या तयारीत असतांना त्यासंबंधीचे गेल्या वर्षीचे काही धागे वाचतांना ’योग’ ह्यांचे अनुभव कथन वाचले आणि त्यांची गाणी ऐकल्यावर लक्षात आलं की हीच व्यक्ती आपल्याला नक्की मदत करेल, म्हणून मग त्यांच्याशी संपर्क साधला...त्यांनीही लगेच प्रतिसाद देऊन अशा मदतीची काही प्रमाणात ग्वाही दिली...व्यवसायात व्यस्त असल्यामुळे खूप जास्त आणि सलग असा वेळ देऊ शकत नसलो तरी यथाशक्ती मदत नक्की करेन...असे आश्वासन मिळाले आणि मी थोडा सुटकेचा नि:श्वास टाकला. त्यांच्या मागणीप्रमाणे मी लगेच त्यांना माझ्या, आधीच तयार असलेल्या चार चाली आणि काव्य पाठवून दिले...चाली ऐकल्यावर त्यातल्या तीन गीतांवर ते निश्चितपणे काम करून साधारण ३१ ऑगस्टपर्यंत तयार करून पाठवतील असे म्हणाले.

चला, आता बाकी राहिलेल्या गीतांचं काय करावं? कुणाकडून गाऊन घ्यावं बरं? चौकशी करता करता मायबोली सदस्या ’रैना’चं नाव पुढे आलं, म्हणून तिला संदेश पाठवला......तिला तर प्रचंड सर्दी-खोकला झाला होता, बोलतांनाही दम लागत होता हे तिच्याशी प्रत्यक्ष फोनवर बोलतांना जाणवत होते...तरीही तिचे उत्तर होते...मी जरूर प्रयत्न करेन...वेळेचं बंधन मात्र थोडं शिथिल केलंत तर बरं होईल...ते तर करणं भाग होतंच...मी प्रत्यक्ष परिस्थिती पाहात होतोच...मग तिच्याचकडून कळलं की मायबोली सदस्या ’अगो’ देखिल खूप चांगलं गाते...त्याचा पुरावा म्हणून तिने मला लागलीच ’अगो’च्या गेल्या वर्षीच्या गायनाचा दुवा पाठवून दिला...’अगो’चं गाणं ऐकलं आणि ठरवलं..तिलाही विनंती करूया, म्हणून तिला संदेश पाठवला...अपेक्षेप्रमाणे तिचाही होकार आला..मात्र गाणं ऐकल्यावरच निश्चित काय ते सांगता येईल असं ती म्हणाली...मग मी तिला चाल आणि काव्य पाठवलं...ऐकल्यावर तिने ते तिच्या आवाजात पाठवायचं कबूल केलं, मात्र वेळेची मर्यादा वाढवण्याची विनंती केली... मी लगेच ती मान्य करून टाकली.....हुश्श! चला आता किमान पाच गाण्यांची निश्चिंती झाली होती...हेही काही कमी नव्हते..माझ्यासारख्या नवख्या माणसाला. :)

आणि अचानक...योग ह्यांच्याकडून संदेश आला....अचानकपणे  मला व्यवसायानिमित्त परदेशी जावं लागत आहे त्यामुळे आधी सांगितल्याप्रमाणे मी गाणी तयार करू शकत नाही...आपल्या गैरसोयीबद्दल क्षमस्व...आपण मला समजून घ्याल अशी अपेक्षा करतो... खरं तर हा जबरदस्त आघात होता...क्षणभर काय करावे तेच कळेना...पण ह्या गाण्यांपेक्षा त्यांचे काम निश्चितच जास्त महत्त्वाचे होते त्यामुळे त्यांना दोष न देता शांतपणे विचार करू लागलो...विचार करतांना माझ्या एका मित्रवर्यांची, श्री.सुहास कबरे ह्यांची आठवण झाली जे एक प्रख्यात तबलजी आहेत...माझा हा चाली लावण्याचा छंद त्यांनाही माहीत होता...लगेच त्यांच्याशी संपर्क साधून त्यांना सगळी परिस्थिती कथन केली आणि म्हटलं...काही मदत करू शकाल काय? त्यांनी थोडा विचार करून म्हटले...माझा एक चांगला गायक मित्र आहे...त्याला विचारून पाहतो आणि थोड्या वेळाने तुम्हाला कळवतो. अर्धाएक तासाने त्यांचा फोन आला...अमूक अमूक दिवशी रात्री ८ वाजता माझ्या गायक मित्राला घेऊन येतोय...येतांना तबला,पेटीही आणतोय...कितीही उशीर होऊ दे किमान दोन गाणी बसवून देतो. पुन्हा जीवात जीव आला...कबरेसाहेबांनी शब्द दिलाय म्हटल्यावर मी निश्चिंत झालो.

ठरल्याप्रमाणे कबरेसाहेब आपले मित्र श्री. केदार पावनगडकर ह्यांना घेऊन हजर झाले....थोडा वेळ इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्या, चहा-पाणी झालं आणि मग आम्ही मूळ मुद्द्याकडे वळलो....आधी केदारजींना चाली ऐकवल्या....शांतपणाने आणि लक्षपूर्वक त्यांनी चाली ऐकल्या. त्यानंतर पहिली भूप रागातली ’सकल कलांचा उद्गाता’ ही चाल ऐकता ऐकताच त्यांनी ती स्वरलिपीत लिहायला सुरुवात केली आणि त्यानंतर प्रत्यक्ष गाऊन पाहिली... केदारजी ह्यांचा आवाज ऐकला मात्र...मी अतिशय रोमांचित झालो..अतिशय मधुर आणि तीनही सप्तकात सहजतेने फिरणारा त्यांचा आवाज ऐकून मनाची पक्की खात्री झाली की आता आपल्या चालींचे नक्की सोने होणार. केदारजी हे व्यवसायाने संगीत शिक्षक आहेत आणि ते खाजगी मैफिलीतूनही गातात...त्यामुळे त्यांच्या गात्या गळ्यातून येणारे स्वर अगदी सहजसुंदर असेच होते....माझ्यासारख्या संगीतातल्या कुडमुड्या ’चाल’काच्या चाली, असा मातबर कलाकार गाणार म्हटल्यावर मला खरंच कृतकृत्य झाल्यासारखे वाटले...स्वत: एक संगीतशिक्षक असूनही, चाल माझ्याकडून समजून घेतांना मात्र ते एखाद्या विद्यार्थ्यासारखे माझे गाणे ऐकत होते...मी स्वत: काय आहे हे मला नीटपणे माहीत आहे...बेताल आणि बेसूर...अशी बेची जोडी माझ्या गाण्यात पदोपदी आढळून येत असतांनाही....त्यातनं नेमकं जे काही घेण्यासारखं दिसलं ते घेऊन केदारजींनी त्यानंतर ’सकल कलांचा उद्गाता’ असं काही गायलंय की माझ्या आणि कबरेसाहेबांच्या तोंडून उस्फूर्तपणाने ’व्वा!’ असा उद्गार निघाला.

आता थोडं ध्वनीमुद्रणाविषयी.....इतके दिवस मी माझ्याच आवाजातल्या चाली ऑडेसिटी ह्या ध्वनीमुद्रण प्रणालीच्या मदतीने ध्वनीमुद्रित करत होतो..त्याही विना वाद्यसंगीत...पण आज इथे तर गायन-वादन असे दोन्हीही ध्वनीमुद्रित करायचे होते. माझ्या संगणकातल्या दोन ऑडियो पोर्टमधील फक्त एकच ऑडियोपोर्ट व्यवस्थित सुरु आहे...ह्याचा अर्थ केवळ एकाच माईकवर हे ध्वनीमुद्रण करावे लागणार होते...तसं पाहायला गेलं तर माझ्या आयुष्यातला हा पहिलाच प्रसंग होता की मी एखाद्या मातबर कलाकाराचे गाणे ध्वनीमुद्रित करणार होतो.... सर्वात आधी दोनतीन चांचणी ध्वमु केली आणि त्याचा दर्जा पाहून एका विवक्षित ठिकाणी मायक्रोफोनची मांडणी केली....ह्या मांडणीमुळे शक्यतो गायकाचा आवाज इतर वाद्यांच्या तुलनेत कमी पडणार नाही ही खात्री झाली...आणि त्याप्रमाणे प्रत्यक्ष ध्वनीमुद्रणाला सुरुवात केली...खरं तर केदारजींना स्वत: पेटी वाजवून गायची सवय नाही...पण दुसरा कुणी वादक हजर नसल्यामुळे गातांना त्यांना स्वत:लाच पेटीसाथ करावी लागली...त्याचा नाही म्हटले तरी थोडा परिणाम त्यांच्या गाण्यावर जाणवत होता हे त्यांच्याच बोलण्यावरून मला कळत होते...एकदोनदा पूर्णं गाणं गाऊनही त्यांचं पूर्ण समाधान झालेलं नव्हतं...पण एकीकडे वेळेचं बंधन होतं तर दुसरीकडे घड्याळाचा तासकाटा भराभर पुढे सरकत होता....दोन तास उलटून गेले होते आणि कसंबसं एक गाणं पूर्णपणे ध्वमु झालेलं होतं...शेवटी मीच केदारजींना म्हटलं की आता जे झालंय ते चांगलंच आहे...आपण दुसर्‍या गाण्याकडे वळूया का? खरा कलाकार कधीच समाधानी नसतो हे केदारजींच्या बोलण्यावरून कळलं...ते म्हणाले..तुमचं समाधान झालं असलं तरी माझं स्वत:चं अजून समाधान झालेलं नाहीये...मला अजून चांगलं गायला हवंय... मी आणि कबरेसाहेबांनी मग कशीबशी त्यांची समजूत घालून त्यांना दुसर्‍या गाण्याकडे वळवलं...त्यानंतर ते नाईलाजानेच दुसर्‍या गाण्याकडे वळले....आणि मग ध्वमु झालं... ’तुंदिलतनु श्री गणेश!’ फक्त दोन गाणी पूर्ण होईपर्यंत रात्रीचे साडेबारा होऊन गेले होते...दुसर्‍या दिवशी सकाळी उठून त्या दोघांनाही आपापल्या कामगिरीवर जायचं होतं आणि म्हणूनच नाईलाजाने जे काही ध्वमु झालं त्यावर समाधान मानण्यावाचून गत्यंतर नव्हतं...खरं तर केदारजींचं म्हणणं होतं की... माझ्या मनाप्रमाणे अजून गाणी जमलेली नाहीयेत तेव्हा ही गाणी प्रसिद्ध करू नयेत, आपण पुन्हा एकदा बसून ती चांगली बसवू आणि मगच ध्वमु करू... पण गणपती उत्सव संपेस्तोवर त्या दोघांनाही अजिबात फुरसत नव्हती आणि मला तर ही गाणी मायबोलीसाठी द्यायची होती...मग दुसरा पर्याय काय होता? मी केदारजींना म्हटलं...केदारजी,तुम्ही स्वत: जरी समाधानी नसलात तरी मला मात्र दोन्ही गाणी आवडलेत आणि आता तुमच्या-माझ्याकडे,दोघांकडेही अजिबात वेळ नाहीये तेव्हा मला वाटतंय की हीच गाणी आपण वापरूया...मग केवळ नाईलाज म्हणून त्यांनी मला गाणी वापरण्याची परवानगी दिली...मी लगेच ती गाणी मायबोलीकडे  पाठवून दिली...गणेशोत्सवाची सुरुवात तरी आता सुश्राव्य संगीताने होणार हे निश्चित झाले होते.
त्याप्रमाणे  सकल कलांचा उद्गाता  आणि तुंदिलतनु श्रीगणेश ही दोन्ही गीतं गणेश उत्सवाच्या अनुक्रमे दुसर्‍या आणि चौथ्या दिवशी मायबोलीवर प्रसारित झाली.
ह्या दोन्ही गीतांची रचना मायबोलीची एक आघाडीची कवयित्री क्रांती साडेकर हिनेच केलेली आहे. अतिशय उत्तम शब्दरचना आणि अंगभूत लय असलेल्या ह्या रचनांना चाल देण्याची खरं तर काहीच गरज पडली नाही..ह्या दोन्ही चाली गीतं वाचतांनाच आपोआप उलगडत गेल्या ...हेच क्रांतीच्या शब्दसामर्थ्याचं यश आहे.


ही दोन गाणी तर झाली.लोकांना आवडलीही... अजून रैना आणि अगोकडून  गाणी यायची होती. रैनाशी माझं फोनवर बोलणं होतंच होतं...एकदोनदा तिने मला तिला जमले तसे ध्वनीमुद्रण पाठवलेही..पण तिला जबरदस्त सर्दी आणि खोकला झालेला असल्यामुळे त्याचा तिच्या आवाजावर झालेला परिणाम स्पष्टपणे जाणवत होता..त्यामुळे तिचं आणि माझंही पूर्ण समाधान होत नव्हतं...पण रैना मागे हटणारी नव्हती...तिने  काहीही करून ह्यावर मात करण्याचा चंग बांधला होता...ध्वनीमुद्रण ऐकतांना मला एक जाणवत होतं की तिला धाप लागतेय,मध्येच ठसका लागतोय...त्यामुळे बर्‍याचदा सूर कमी पडतोय... तिने पाठवलेल्या ध्वनीमुद्रणातले हे दोष मी काढायचा प्रयत्न केला...काही अंशी तो जमलाही..पण त्यामुळे तंबोर्‍याचा आवाजही मधे मधे गायब होत होता...म्हणून मग मी तिला ऑडेसिटी वापरण्याची सूचना केली आणि ती तिने ऐकली.
ह्यात ध्वनीमुद्रण करण्यासाठीही एक उपसूचना केली...इलेक्ट्रॉनिक तंबोरा वापरून तो हेडफोनमधून ऐक आणि फक्त गाणं ध्वनीमुद्रित कर...गाणं ध्वनीमुद्रित करतांना खोकावंसं वाटलं तर खुशाल खोक..ध्वनीमुद्रण मात्र सुरुच ठेव..जिथे व्यत्यय येतोय तिथे थोडं थांबून  तो भाग पुन्हा गाऊनच पुढे जा.....तंबोर्‍याचा ट्रॅक वेगळा पाठव...मी करतो बाकीचे सोपस्कार....आणि रैनाने तसंच करून मला पाठवलं ...आता माझं काम आधीपेक्षा सोपं झालं होतं....रैनाच्या ध्वनीमुद्रणातले अधलेमधले व्यत्यय,थांबे पुसत पुसत मला तिचे सलग असे गाणे तयार करता आले...मग त्याला तंबोर्‍याचा ट्रॅकही जोडला आणि तयार झाले एक सुंदर गाणे...तारीख होती
६ सप्टेंबर २०११. मी लगेच ते गाणं मायबोलीला पाठवून दिलं.
एकवेळ तर अशी आली होती की रैनाला तिचा खोकलाग्रस्त गळा हे गाणं गाऊ देईल की नाही ही शंका येत होती...पण त्या तशा परिस्थितीतही तिने सर्वस्व पणाला लावून जे काही गायलंय ते आपण प्रत्यक्ष ऐकलंच आहे...शाबास रैना! तुझ्या जिद्दीला माझे शतश: प्रणाम!
रैनाने गायलेल्या हे गजवदना ह्या गीताचे कवी आहेत मायबोलीचेच एक ज्येष्ट सदस्य आणि सुप्रसिद्ध कवी श्री. प्रसाद शिरगांवकर. त्यांच्या ह्या गीताला मी खूप आधीच चाल लावलेली होती...उत्सुकता असल्यास त्याबद्दलची कहाणी अवश्य वाचावी.

इथे रैनाच्या गाण्याचे हे प्रयोग सुरु असतांना अचानक अगोकडून निरोप आला...  काही वैयक्तिक अडचणींमुळे मी हे गाणं गाऊन, ठरलेल्या अवधीत पाठवू शकेन असे वाटत  नाहीये त्याबद्दल क्षमस्व..म्हणून आपण माझ्यावर अवलंबून राहू नये.  :(
पुन्हा विचार सुरु झाला...कुणाला सांगावं आता? मी पुन्हा केदारजींना फोन केला..अजून एखादं गाणं किमान तंबोर्‍याच्या साथीने गाऊन द्याल का हे विचारण्यासाठी...पण फोनवरचा त्यांचा आवाज ऐकताच लक्षात आलं की त्यांची तब्येत बिघडलेली आहे....ते सांगत होते...गेले दोन दिवस सर्दी,खोकला आणि तापाने बेजार आहे. :(
मी माझे शब्द तसेच गिळून त्यांना... आराम करा आणि वेळेवर औषध घ्या असे सांगून फोन ठेवला. मनाशी म्हटलं...चला,किमान तीन गाणी तर तयार आहेत ना...हेही नसे थोडके! आता शांत बसणंच ठीक आहे.

केदारजींची दोन्ही गाणी प्रकाशित झाली आणि त्याने जणू जादूच केली...ती गाणी ऐकताच अगोकडून पुन्हा संदेश आला...काका,दोन्ही गाणी उत्तम झालेत...इतकी, की ती ऐकून मी ठरवलंय...
मीही आता गाणं पाठवतेच. :)
अचानक ह्या आलेल्या संदेशाने मी ही खुश झालो. अगो नुसतं बोलून थांबली नाही तर तिने काही तासातच गाणं अतिशय उत्तमरित्या गाऊन आणि ध्वनीमुद्रित करून पाठवलं...ती तारीख होती ७ सप्टेंबर २०११. अगोने तिच्या वैयक्तिक अडीअडचणींना बाजूला सारून ठरलेल्या मुदतीत इतकं उत्तम गाणं गाऊन पाठवलं त्याबद्दल तिचंही करावं तेवढं कौतुक कमीच आहे...शाबास अगो!
तिचे गाणं येतांच मी तेही लगेच मायबोलीला पाठवून दिलं आणि लगेचंच दुसर्‍या दिवशी रैना आणि अगो ह्या दोघींचीही गाणी मायबोलीवर प्रकाशित झाली.
अगोने गायलेल्या गिरीजासुता,गौरीगणेशा ह्या गाण्य़ाची कवयित्री देखील क्रांती साडेकर हीच आहे. अशा रितीने ह्या गणेशोत्सवात क्रांतीने, क्रिकेटच्या परिभाषेत सांगायचे तर  हॅटट्रीक केलेली आहे.

अशा रितीने, इतक्या सगळ्या लोकांच्या मदतीने मी माझ्यावर सोपवलेली कामगिरी काही प्रमाणात का होईना पार पाडू शकलो ह्याबद्दल मी समाधानी आहे. ही संधी दिल्याबद्दल मी मायबोली प्रशासनाचे मन:पूर्वक आभार मानतो. तसेच, मला माझ्या ह्या ’चाल’कत्वाला पूर्ण वेळ देता यावा म्हणून इतर दुसर्‍या कोणत्याही कामाला न जुंपता पूर्ण मोकळे सोडल्याबद्दल   संयोजन समितीच्या प्रमुख मामी आणि इतर सदस्य लाजो,प्रज्ञा९ ,वैद्यबुवा आणि दिव्या ह्यांचेही मन:पूर्वक आभार मानतो.

तळटीपः प्राप्त परिस्थितीत आणि सहज हाताशी असलेल्या साधनसामुग्रीचा वापर करून ही सर्व ध्वनीमुद्रणं घरगुती स्वरूपात केलेली असल्यामुळे त्यांचा दर्जा हा व्यावसायिक दर्जाच्या ध्वनीमुद्रणाइतका उत्तम नाहीये ह्याची मला पूर्ण जाणीव आहे.

२० जुलै, २०११

चंशिकुम! १२(अंतिम)

कॉफी पिऊन खाली उतरणार होतोच,तेवढ्यात भटक्या वाजला...कन्या म्हणत होती...बाबा कुठे आहात? आम्ही आता माल रोडवर आलोय.
मी इथेच आहे माल रोडवर..इथे कोपर्‍यावरच्या इमारतीत पहिल्या मजल्यावर एक हॉटेल आहे. आत्ताच कॉफी प्यायली,आता उतरतोच खाली आणि येतो दोन मिनिटात.
मनालीच्या त्या गजबजलेल्या मालरोडवर मंडळींना शोधायला जरा वेळ लागला खरा...पण शोधलं ! मंडळी एका रस्त्यावरच्या दुकानाबाहेर उभी राहून पाणीपुरी खात होती. त्यांचं पाणीपुरी खाऊन झाल्यावर मग मंडळी ’मोमोज’ शोधायला लागली...तेही मिळाले ...मग तिथे दहापंधरा मिनिटं घालवली...मोमोज..हा प्रकार मी पहिल्यांदा ऐकला...काय तर म्हणे...  मोदकाचा चिनी अवतार...त्यातही शाकाहारी आणि मांसाहारी असे प्रकार असतात म्हणे...असंही कळलं.
मला पाणीपुरी कधीच खावीशी वाटत नाही आणि मोमोज वगैरेसारख्या आधी कधीच न ऐकलेल्या/खाल्लेल्या प्रकारांच्या   वाटेलाही मी कधी जात नाही...खाण्यात प्रयोग करण्याच्या मी विरुद्ध आहे अशातला भाग नाहीये...पण आजवर खात आलेल्या पारंपारिक पदार्थांनीच मला इतकं समाधान दिलंय की अजून नवीन काही खाऊन पाहावं असं अजिबात वाटत नाही....कदाचित त्यामागे दुसरीच भिती ही असावी...वशाट असण्याची. असो...पण तिथे मात्र त्या त्या दुकानांबाहेर गिर्‍हाईकांची अगदी झुम्मड उडालेली दिसत होती....एकेकाच्या चेहर्‍यावरचे ते तृप्ततेचे आणि कृतकृत्यतेचे भाव टिपण्यात(प्रग्रात नव्हे) मला मजा वाटत होती.

मनालीच्या मालरोडवर आम्ही तासभर हिंडलो. मला स्वत:ला काहीच खरेदी करायची नव्हती पण बरोबरची मंडळी..खास करून स्त्रीवर्ग...हे बघ,ते बघ! कुठे भाव विचार! कुठे भाव करत...पण काहीही न घेता पुढे पुढे सरकत होती...मी तिथे आलेल्या आमच्यासारख्याच इतर प्रवासी मंडळीतलं वैविध्य पाहात होतो. स्थानिक मंडळी आणि प्रवासी मंडळी ह्यांच्यातला फरक मात्र चटकन कळून येत होता....आमच्यासारखेच गटागटाने,रेंगाळत चालणारे,दुकानात डोकावणारे बहुसंख्य हे प्रवासीच होते आणि विक्रेते,फेरीवाले,ठेलेवाले,इत्यादि बहुतेक स्थानिकच होते....मोठ्या दुकानात मात्र पंजाबी आणि सरदारजी लोकांची मालकी दिसत होती.

फिरून फिरून मंडळी थकली होती. आमची गाडी जिथे उभी केली होती तिथून आम्ही कितीतरी दूर आलेलो...मग काय चालकाला भ्रमणध्वनीवरून आमचा पत्ता कळवला आणि गाडी तिथेच आणायला सांगितली. दहा-पंधरा मिनिटात गाडी आली....आम्ही त्यात आम्हाला कोंबलं आणि निघालो आमच्या वसतीस्थानाकडे.
ही आमची मनालीतली आणि एकूणच प्रवासातली शेवटची रात्र होती. दुसर्‍या दिवशी सकाळी लवकर उठून चंडीगढकडे प्रस्थान ठेवायचं होतं(मनाली-चंडीगढ ३२० किमीचा,साधारणपणे १० तासांचा  प्रवास होता)...
उशीरा निघालात तर रस्त्यात रहदारीत अडकून पडाल...हे आमच्या पहिल्या चालकाचे शब्द आमच्या कानात गुंजत होते. दुसर्‍या दिवशी संध्याकाळी ७.२० चे विमान पकडायचं होतं आणि उशीरात उशीरा ६-४०ला विमानतळावर पोचणं गरजेचं होतं...त्याआधी चंडीगढात पोचून काही स्थानिक खरेदी करण्याचा मंडळींचा मनसुबा होता... त्यामुळे ह्या चालकाला गाडी सकाळी सहा वाजता आणायला सांगून  आम्ही हॉटेलात परतलो...गरमागरम  आणि स्वादिष्ट जेवण  आमची वाट पाहात होतेच....त्याचा रसास्वाद घेत जेवण उरकलं आणि आपापल्या खोल्यात दाखल झालो.

मी पुन्हा एकदा खोलीच्या सज्जातून समोर दिसणारे दृश्य टिपायचा प्रयत्न केला...खरं तर आता अंधाराचेच साम्राज्य होते...पण तरीही दूरवर दिसणारी हिमशिखरं अका अनामिक प्रकाशाने चमकत होती...प्रग्रा आपल्याला काहीही दाखवो पण एक मात्र खरं की आपल्या डोळ्यांना जे दिसतं ते तसंच्या तसं प्रग्रात कधीच कैद होत नसतं...प्रग्राचे तंत्रज्ञान कितीही अद्ययावत का असेना अजूनही आपल्या डोळ्याशी ते बरोबरी करू शकलेले नाहीये हे माझे प्रांजळ मत आहे.

दुसर्‍या दिवशी सकाळी आम्ही सगळी आन्हिकं उरकून,चहापाणी घेऊन तयार झालो पण गाडीचालकाचा पत्ताच नव्हता....त्याच्याशी संपर्क साधण्याचा एक दोन वेळा केलेला प्रयत्न फोल ठरला...हा माणूस असा मध्येच कुठे गायब होतो कुणास ठाऊक? काहीच कळायला मार्ग नव्हता...होता होता सात वाजता तो हजर झाला...आम्ही पटापट गाडीत सामानासह आम्हाला कोंबून घेतलं आणि गाडी निघाली.... मनालीला टाटा करून..चंडीगढकडे.

वाटेतली तीच निसर्गदृश्ये पुन्हा डोळ्यात साठवत,काही प्रग्रात टिपत आमचा परतीचा प्रवास सुरु झाला. वातावरण खूपच आल्हाददायक होते. सोबतीला बियास होतीच....जातांना ती आमच्या उजव्या अंगाला होती...आता डाव्या. तिची विविध रूपं आता मला जवळून टिपायला संधी मिळत होती...ती मी कशी सोडणार?
मध्ये एका ठिकाणी आम्ही एका ढाब्यावर न्याहारीसाठी थांबलो....गरमागरम पराठे आणि कॉफीचा आस्वाद घेऊन पुन्हा पुढचा प्रवास सुरु केला. अधून मधून आमच्या पहिल्या चालकाचा फोन येत होता...तो मंडीला आमची वाट पाहात उभा होता....तिथून थेट चंडीगढ विमानतळावर नेऊन सोडेपर्यंत तो आमच्याबरोबर राहणार होता...तो आमची केव्हापासून तिथे वाट पाहात उभा होता....त्याच्या अंदाजानुसार आम्ही तिथे आत्तापर्यंत पोचायला हवे होतो....पण आधीच निघायला उशीर झालेला आणि त्यातही रस्त्यावरची रहदारी थोडीफार वाढलेली असल्यामुळे....आम्ही न्याहारीसाठी वाटेत अर्धा तास थांबल्यामुळे...अशा एकूणच सगळ्यांमुळे उशीर वाढत चाललेला होता.

शेवटी एकदाचे आम्ही मंडीला पोचलो...साधारण नऊ वाजल्यापासून तो आमची वाट पाहात होता आणि आम्हाला पोचायला वाजले होते पावणेअकरा! दोन्ही चालकांचे आपापसात काही तरी गुफ्तगु झाले...सूत्रबदल झाला आणि पुढच्या प्रवासाला सुरुवात झाली...चालकाचे काय बिनसले होते कुणास ठाऊक तो थोड्या थोड्या वेळाने आम्हाला सुनावत होता..इतका उशीर केलात,आता रहदारीत नक्की फसणार...तुम्हाला पोचायला उशीर झाला तर माझ्याकडे दोष नाहीये.....मनालीहून निघतांनाच चालक एक तास उशीरा आला वगैरे आम्ही सांगूनही तो आपले तेच पालूपद ऐकवत बसला...आता उशीर झाला तर मला दोष देऊ नका.
शेवटी मी त्याला सुनावले....तू तुझे काम कर निमूटपणे...जे काही घडलं त्याला कोण जबाबदार वगैरे बाबी दे सोडून...जे व्हायचं ते होईल...चल पुढे!
तेव्हा कुठे तो गप्प बसला आणि आपल्या कामाकडे नीटपणे लक्ष देऊ लागला.
रस्त्यावर तशी खूप काही वर्दळ नव्हती पण आमच्या पुढे चालणार्‍या वाहनांमुळे गाडीच्या वेगावर मर्यादा येत होती..कारण  अधून मधून उलट्या दिशेने येणार्‍या काही वाहनांमुळे कधी कधी चालकाला गाडी पुढे काढता येत नव्हती....तसा चालक कुशल होता त्यामुळे त्यातूनही तो वाट काढत गाडी दामटत होता....वाटेत भेटलेल्या कैक वाहनांना मागे टाकत तो आपल्या कुशल सारथ्याचे प्रदर्शन करत होताच... त्यामुळे माझी खात्री होती की गाडी अशीच धावत राहिली तर आम्ही निश्चितपणे चार साडेचारपर्यंत चंढीगढ शहरात पोचू.

गाडी आता भरधाव धावत होती..वेळेवर पोचू आणि  हवी ती खरेदी करायलाही थोडा वेळ नक्की मिळेल याबाबत आम्ही सगळेच आता आश्वस्त झालो होतो...थोड्याच वेळात एक गोष्ट प्रकर्षाने जाणवायला लागली की समोरच्या बाजूने येणारी वाहने अदृश्य झालेत आणि आम्ही ज्या दिशेने निघालो होतो त्या दिशेला तोंड करून बरेच मालवाहू ट्रक रस्त्याच्या कडेला उभे आहेत...आमची गाडी मात्र पुढे पुढे जात होती...इतका वेळ भरधाव जाणार्‍या गाडीला आता आपल्या पुढे बर्‍याच छोट्या गाड्या रांगेत हळूहळू चालताहेत हे दृश्य दिसलं आणि पुढे काहीतरी आक्रित घडले असण्याची पुसटशी शंका मनात डोकावायला लागली.

डाव्या बाजूला ट्रकची रांग लागलेलीच होती...त्यातले चालक-साथीदार खाली उतरून निवांतपणे गप्पा हाणत होते...आता शंकेचं रुपांतर खात्रीत झालं...पुढे नक्कीच अपघात झाला होता...ट्रकचालकांकडून कळलं...पुढे एखाद किलोमीटर दूर, एक ट्रक रस्त्यातच आडवा होऊन पडलाय आणि त्यामुळे रस्ता अडवला गेलाय....पण त्यातही एक आशेचा किरण दिसत होता..छोटी वाहनं हळूहळू का होईना त्यातून निसटू शकत होती...होता होता एक क्षण असा आला की छोटी वाहनंही जागची हालेनात...दोन्ही दिशांनी येणार्‍या छोट्या वाहनांनी त्या चिंचोळ्या रस्त्याचा ताबा घेऊन अभूतपूर्व अशी वाहतूक कोंडी निर्माण केली होती...कुणीच मागे हटायला तयार नव्हते कारण दोन्ही बाजूंना आता मागे लांबच लांब, वाहनांची रांग लागलेली होती....आता मागे जाणे अथवा पुढे जाणे शक्यच नव्हते....आम्हीही गाडीच्या बाहेर निघून हातपाय मोकळे करून घेतले....गाडीत इतका वेळ वातानुकुलनात बसलेलो..आता तळपत्या उन्हात ,उन्हाचे चटके खात उभे राहिलो...दुसरा पर्यायच नव्हता...गाडी थांबलेल्या अवस्थेत वाकु यंत्रणा सुरु ठेवता येत नव्हती....आता इथे किती वेळ थांबावं लागणार कुणास ठाऊक?
थोड्या वेळापूर्वी मनात रचलेले सगळे मनसुबे हवेत विरले...आता निदान विमान गाठण्यासाठी तरी वेळेवर पोचता येऊ दे...अशी इच्छा आम्ही आपापसात व्यक्त करू लागलो.

आता त्या घाटरस्त्यावर झालेला असा हा अपघात...ह्याबाबत पुढे कोण आणि कशी  आणि कधी कारवाई करणार ह्या चिंतेत आम्ही बूडून गेलो....मग बातमी आली की लष्कराला पाचारण केलं गेलंय...त्यांच्या पथकासोबत एक क्रेनही येतेय..ती लवकरच मार्ग मोकळा करेल.
मला प्रश्न पडला की आता हे लष्करी पथक इथे येणार तरी कसे? दोन्ही बाजूचे रस्ते तर वाहनांनी पूर्ण भरलेले आहेत...रस्त्याच्या एका बाजूला उंच डोंगर तर दुसर्‍या बाजूला खोल खोलपर्यंत उतार...मग हे लोक काय हेलीकॉप्टरने येणार आहेत काय? अहो,माणसं येऊ शकतील हो हेकॉने पण क्रेन कशी आणणार?
ही लष्कराची तुकडी आमच्या मागून येणार आहे की समोरच्या बाजूने? ह्याबाबतही परस्परविरोधी मतं होती...कुठूनही येऊ देत...पण त्यांच्यासाठी रस्ता कुठे होता?

चार तासांची निश्चिंती झाली बगूनाना!
मी मनातल्या मनात,पुलंच्या म्हैस कथेतला संवाद घोळवत बसलो...दुसरं करणार तरी काय अशावेळी?

तेवढ्यात थोडी धावपळ झाली...जो तो आपापल्या गाडीत जाऊन बसू लागला..आम्हीही बसलो...गाड्या चार पावलं...आपलं चार चाकं पुढे गेल्या आणि पुन्हा थांबल्या...आता मात्र पुढे जाईनात..पुन्हा लोक बाहेर पडले...आम्हीही बाहेर पडलो.

साधारण अर्धा तासाने पुढच्या बाजूला काहीतरी हालचाल जाणवायला लागली....काही लष्करी जवान आणि वाहतूक पोलिस चालत येतांना दिसले...जरा हायसं वाटलं.  :)
पण नंतर लक्षात आलं की लष्करी जवान म्हणताहेत...एकेकाने गाड्या थोड्या थोड्या मागे घ्या(सुदैवाने डाव्या बाजूला थांबलेल्या ट्रकवाल्यांनी प्रत्येक दोन ट्रकमध्ये जी जागा सोडलेली होती त्यात जेमतेम एकेक छोटी गाडी मावू शकत होती)...तर वापु म्हणत होते की गाड्या थोड्या थोड्या पुढे घ्या!
दोघांच्यात अजिबात सामंजस्य दिसत नव्हतं..पण गाडीचालकांनी प्रसंगावधान राखून आपापल्या गाड्या दोन ट्रकांच्यामध्ये कशाबशा कोंबल्या....आणि थोड्याफार साफ झालेल्या रस्त्यावरून समोरच्या बाजूने लष्कराच्या तीनचार बस आणि एक क्रेन  हळूहळू येतांना दिसल्या....त्यांनी आपली कामगिरी संपवलेली होती..ट्रकला रस्त्याच्या एका कडेला सरकवून...रस्त्याचा एक पदर सुरु केलेला होता आणि आता तिथे वापुची नेमणूक करून आलटून पालटून दोन्ही बाजूच्या दहा दहा गाड्या सोडायला सुरुवात केलेली होती... आता गाड्या हळूहळू हलायला लागल्या...आमची गाडी प्रत्यक्ष अपघातस्थळापाशी पोचायलाच अर्धा तास लागला....पण कसे का असेना...शेवटी तिथून बाहेर पडलोच....पुढेही भरपूर रहदारी असल्यामुळे वेगावर मर्यादा होतीच....वाटेत अडकलेले...रांगेत उभे असलेले शेकडो ट्रक कैक किलोमीटर दूरपर्यंत आम्हाला भेटत होते...त्यावरून असं अनुमान काढता येईल की हा अपघात बराच आधी झालेला असावा....असो. आम्ही निघालो बुवा एकदाचे त्यातून...सहीसलामत!

पुढे साधारण दहा-पंधरा किलोमीटर गाडी अतिशय धिम्या गतीने जात होती...तिथल्या एका गावातून गाडी बाहेर पडली आणि मग रस्ता एकदम साफ मिळाला....मग काय चालक महाशयांनी अशी काय गाडी हाणली की यंव रे यंव!

गाडी जोवर हिमाचलच्या परिसरात होती तोवर सगळा रस्ता डोंगराळ होता...पण तिथून जेव्हा पंजाबात शिरली तेव्हा रस्ता एकदम सपाट दिसायला लागला. मध्ये दूभाजक असलेला लांबरूद रस्ता आणि त्याच्या दोन्ही बाजूंना दूरदूरपर्यंत पोचलेला सपाट प्रदेश! रस्त्याच्या एका बाजूने संथपणे वाहणारा  भाक्रा-नान्गलचा पाट आणि त्या पाण्यावर होणारी शेती...दूरदूरपर्यंत...पाहावे तिथे शेतजमीनच दिसत होती.....हिमाचलमध्ये होतो तोवर हवा गरम असली तरी वारे थंड होते आता इथे हवा आणि वारेही गरम जाणवू लागले..गाडीची वाकु यंत्रणा व्यवस्थित सुरु होती म्हणून ठीक, नाहीतर काही खैर नव्हती.

पंजाबात शिरलो तेव्हा साधारण साडेतीनचा सुमार झालेला...पोटात भूक उसळलेली म्हणून एका ढाब्यावर गाडी थांबवायला सांगितली....गाडीतून बाहेर आल्याक्षणी उन्हाचा चटका बसला...ढाब्यावर हात धुवायला नळाखाली हात धरला आणि पुन्हा एकदा जोराचा चटका बसला...वरून सूर्य आग ओकत होता,अंग नुसते भाजून निघत होते..त्यावेळचे किमान तापमान ४५ अंशाच्या खाली नक्कीच नसावे...आमच्यासारख्या मुंबईकरांना हा अनुभव नवीनच होता...पण उपायही नव्हता....कसेबसे हात धूवून आत गेलो...जेवणाची मागणी नोंदवली आणि ते येण्याची वाट पाहात बसलो....अचानक आठवण झाली...जेवण येईपर्यंत लस्सी मागवूया...तेवढीच जीवाला शांती मिळेल...बैर्‍याला पुन्हा बोलावून सगळ्यांसाठी लस्सी मागवली....शिमल्यापासून माझ्या कन्येला लस्सी प्यायची होती...पण तिथला पहिलाच अनुभव खास नव्हता(पाणीदार ताक होते हो...साखर घातलेले) म्हणून मी तिला म्हटलं होतं की आपण पंजाबात पोचलो की तिथे पिऊया....त्यांच्याकडे मस्त लस्सी मिळते...म्हणून तो बैरा जातांना मला त्याला सांगायचं होतं...बाबा रे लाज राख तुझ्या पंजाबची....इथे पंजाबात लस्सी खास असते असे ऐकून आहे...पण पूर्वी दिल्लीत सरदारजीच्या ढाब्यावर प्यायलेल्या लस्सीने माझी चांगलीच फसगत केलेली होती.

लस्सी खरंच मस्त होती...पहिल्याच घोटात अंतरात्मा शांत झाला....नंतर जेवणही आलं...तेही उत्तम होतं...दोन प्रकारच्या भाज्या,दाल-फ्राय आणि तंदुरी रोटी असा सगळा बेत होता...सोबत कांदा-मुळा-गाजरही होतंच...लस्सीचे घोट घेत घेत जेवतांना मजा आली....तिथल्या त्या विलक्षण गरम हवेलाही आम्ही काही क्षण विसरलो.

जेवण झालं...सगळेजण तृप्त मनाने गाडीत जाऊन बसले...गाडी सुरु झाली...वाकुही सुरु झाले आणि आता पंजाबच्या त्या मोकळ्या आणि प्रशस्त मार्गावरून गाडी भन्नाटपणे धावू लागली....चंढीगढ अमूक किमी...असे अधून मधूने मैलाचे दगड दिसत होते....आम्ही चंढीगढच्या जवळ जवळ जात होतो...चालक इथल्या रस्त्यांबद्दल जाणकार होता .. मध्येच एक रेल्वे-फाटक आले होते..फाटक बंद असल्यामुळे तिथे वाहनांची रांग लागलेली होती आणि रेल्वेगाडी अजून यायची होती....तेव्हा त्याने लगेच आपली गाडी वळवून दुसर्‍या एका आडवाटेने काढून पुन्हा गाडी मूळ मार्गावर आणली आणि वेळ वाचवला....पाहता पाहता आम्ही चंढीगढमध्ये शिरलो....संध्याकाळचे सव्वापाच वाजून गेले होते....आम्ही जिथून चंढीगढमध्ये शिरलो...त्याच्या दुसर्‍या टोकाला विमानतळ होता...त्यामुळे संपूर्ण चंढीगढ पार करूनच तिथवर पोचायचे होते....आता संध्याकाळ झाल्यामुळे रस्त्यावरची रहदारीही वाढलेली होती आणि शहरातील वेगमर्यादेमुळे  साहजिकच गाडीचा वेगही मंदावलेला होता...चंढीगढमध्ये काहीही खरेदी करण्यासाठी आता वेळ नव्हताच; पण निदान आता आम्ही वेळेवर विमानतळावर पोचणार होतो...हेही कमी नव्हतं....
शेवटी एकदाचे पोचलो विमानतळावर तेव्हा संध्याकाळचे सहा वाजले होते....

खरंच आमचं सुदैव म्हणून त्या वाहतूक खोळंब्यातून आमची वेळेवर सुटका झाली होती..एरवी आम्ही खूप मोठ्या विचित्र संकटात सापडलो असतो...असो...त्यानंतर मग पुन्हा सगळ्या तपासण्या वगैरे करून विमानात बसलो...विमान वेळेवर मुंबईला पोचलं....रात्रीची झगमगती मुंबई विमानातून पाहतांना जणू सूवर्णनगरीच वाटत होती....

विमानतळावरून रिक्षा पकडून घरी पोचलो....
हुश्श! किती बरं वाटलं म्हणून सांगू! कसंही असलं तरी..शेवटी आपल्या घराची सर कशालाच नाही हेच खरं!
इति अलम्‌!




१५ जुलै, २०११

आता पुढे काय?

१३ जुलै २०११. मुंबईत तीन ठिकाणी दहशतवाद्यांनी बॉंबस्फोट घडवून आणले. त्यात जितकी जीवित व वित्तहानी झाली त्यापेक्षाही लोकांमध्ये  एकप्रकारचे जे नैराश्य आलंय ते मला तरी जास्त त्रासदायक वाटतंय. अब्जावधी लोकसंख्येच्या ह्या देशात एकही असा नेता असू नये की जो अशावेळी सगळ्या लोकांना धीर देऊन पुन्हा असे काही घडू नये म्हणून योग्य ते उपाय योजू शकेल? अपराध्यांना लवकरात लवकर शोधून त्यांना आणि त्यांच्या संघटनांना जरब बसेल अशी शिक्षा तातडीने करू शकेल? देशात लोकशाही पद्धतीने निवडून दिलेलं सरकार आहे,सक्षम अशी सैन्यदलं आहेत,उत्तम आणि प्रशिक्षित गुप्तवार्तादलं , पोलीसदलं आहेत,न्यायसंस्था आहेत..पण ह्यापैकी कुणीच ही जबाबदारी उचलायला तयार नाहीये...सगळेजण आपापली जबाबदारी झटकून...लोकांनी शांत राहावे(आणि किड्यामुंग्यांसारखे मरत राहावे)...असली आवाहनं करत आहेत....झालंय तरी काय ह्या देशाला?
ज्या देशात छत्रपती शिवाजी महाराज,राणा प्रताप इत्यादि वीरांनी आपल्या पराक्रमाने बलाढ्य शत्रूला खडे चारले...त्याच आपल्या भारत देशाला शेजारचे काही क्षुल्लक देश,अतिरेकी वेठीस धरू शकतात आणि आपण बलाढ्य असूनही त्यांची मस्ती जिरवू शकत नाही...हे खरंच अतर्क्य आहे....सद्यस्थितीत हे खरं जरी असलं तरी मुळीच मानवणारं नाहीये...म्हणूनच आता नुसता विचार नव्हे तर कृती करायची वेळ आली आहे...आता नक्कीच ह्यावर तातडीचा तोडगा काढायलाच हवाय....काय बरं करता येईल तातडीने?

मला काही उपाय सुचताहेत...सर्वात पहिला आणि झटपट उपाय म्हणजे...अफजल गुरु आणि कसाब, ह्या,आपल्या न्यायसंस्थेने दोषी ठरवलेल्या आणि फाशीची सजा फर्मावलेल्या दहशतवाद्यांना तातडीने... कमाल एका आठवड्यात..फाशी दिलीच पाहिजे...अशा तर्‍हेने तातडीने फाशी देण्याने काही  गोष्टी साधल्या जातील...
१) सीमेपल्याडच्या राष्ट्रांना,त्यांनी पोसलेल्या दहशतवाद्यांना आणि आपल्याच देशातील घरभेद्यांना योग्य तो संदेश जाईल...तो असा...अशा तर्‍हेने पकडल्या गेलेल्या दहशतवाद्यांची मुळीच गय केली जाणार नाही. त्यांचा झटपट निकाल लावला जाईल.
२) जनतेमध्ये, सरकार आणि राज्यकर्त्यांप्रति विश्वास निर्माण होईल.
३) आपले पोलिस खाते..ज्यांच्यावर अंतर्गत सुरक्षेचा प्रचंड ताण आहे, त्यांना,त्यांनी केलेल्या परिश्रमाचे, तपासकार्याचे..ज्यात गुंतागुंतीचे पुरावे गोळा करणं, खटला उभा करणं इत्यादि बाबतचे समाधान मिळेल...... अंतिम फळ त्यांना अशा तर्‍हेने चाखता येईल...आणि ह्यामुळे त्यांच्या मनोधैर्यात अजून वाढ होईल. त्यामुळे आपल्या कामाप्रति त्यांची आस्था अजून वाढेल...एरवी होतंय काय तर...इतके सगळे करूनही,न्यायसंस्थेने न्याय करूनही हे दहशतवादी आपल्या समोर वर्षानुवर्षे जीवंत राहून सरकारी पाहूणचार झोडताहेत... तर मग इतका सगळा अट्टहास कराच कशाला? असा विचार येऊन पोलिसांमध्येही सुस्ती, नैराश्य येऊ शकतं...

आता काही दुसरे उपाय...आपल्या न्यायप्रक्रियेत काही आमुलाग्र बदल करावे लागतील...लोकसभा आणि राज्यसभेत त्यासंबंधीचे प्रस्ताव पारित करून घेऊन त्याचे लगेच कायद्यात रुपांतरण करणे...हे शक्य वाटत नसेल तर त्यासाठी वेळप्रसंगी वटहुकुमाचाही वापर केला तरी चालेल...पण हे बदलही कमाल महिन्याभराच्या अवधीत व्हायला हवेत....अर्थात हे सगळे भविष्यातल्यासाठी(भविष्यात असे गुन्हे घडलेच तर)आहे....पण हेही बदल कमाल महिन्याभरात व्हायला हवेत.
हे बदल कोणते असावे?
१) देशद्रोहाच्या खटल्यासंदर्भात  खास कोर्ट स्थापन व्हावे.
२)परिस्थितीजन्य पुराव्यांच्या आधारेही खटले दाखल करून घेतले जावेत.
ह्यातले खटले कमाल एक आठवड्यात उभे राहिलेच पाहिजेत.
३)गुन्हेगाराला वकील दिला जाणार नाही. त्याचे निरपराधित्व त्यानेच सिद्ध करायला हवे.
३) कमाल १५ दिवसात निकाल लागून त्याची अंमलबजावणी कमाल आठवडाभरात व्हायलाच हवी.
४) ह्या शिक्षेविरुद्ध कोणतेही अपील करण्याची तजवीज असू नये.
५) देशद्रोहाला अजिबात दया दाखवली जाता कामा नये. देहदंडाची-फाशीची शिक्षाच सुनावली जावी.

मंडळी, आपल्या देशाविरुद्ध युद्ध पुकारलेल्या दहशतवाद्यांना जेरीस आणायचे असेल तर तातडीने हे अत्यंत कडक असे उपाय अंमलात आणायलाच हवेत.

आता असे गुन्हे शक्य तो घडूच नयेत म्हणून काही दीर्घकालीन उपाय...अंतर्गत सुरक्षेसाठी.. ज्यात राज्य आणि केंद्रिय पोलीसदलं आणि गुप्तवार्तादलं ह्यांच्यात समन्वय साधला जाण्यासाठी ह्या सर्व दलातील निवडक व कर्तृत्ववान अधिकार्‍यांची...गृह मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली   एक समिती नेमून वेळोवेळी देशातील सुरक्षा यंत्रणेचा आढावा घेऊन वेळोवेळी योग्य ती कारवाई तातडीने केली पाहिजे.

लोकप्रबोधनाचा कार्यक्रम राबवणे...आता जनतेचाही ह्या कार्यात सहभाग असलाच पाहिजे नाही का? सरकार , पोलिस आणि न्यायव्यवस्थेवरच  सगळा ताण का बरे?
ह्यासाठी स्थानिक मोहल्ला समित्या स्थापन करून ,त्या त्या विभागात काही अनुचित घटना घडत असतील,घडण्याची शंका असेल तर नेमकं काय करावं ह्याबाबत पोलिसांकडून नागरिकांचं प्रबोधन केलं जावं..जेणेकरून पोलिसांवरचा ताण काही प्रमाणात तरी कमी होईल.

युद्ध...युद्ध हा शेवटचा पर्याय आहे...भावनेच्या आहारी जाऊन अथवा तडकाफडकी त्याबाबत निर्णय घेणे कधीही उचित होणार नाही...म्हणूनच वर सांगितलेले उपाय आपण अत्यंत तातडीने केले तर आपल्याच देशात येऊन आपल्या लोकांना मारण्याचे दु:साहस करायला सहसा कुणीही परकीय धजावणार नाही....

अरे हो! पण हे करणार कोण? सद्द्याच्या राज्यकर्त्यांमध्ये,समस्त राजकीय पक्षांमध्ये इतकी हिंमत,एकी आहे काय? त्यांना खरोखर ह्या देशातील आम जनतेची किंमत आहे काय? त्यांच्यात हिंमत नसेल तर जनमताचा रेटा त्यांना तसे करायला भाग पाडेल काय? आणि तसे होण्यासाठी  हे जनमत संघटित होईल काय? त्यासाठी कोण पुढाकार घेणार? आहे का कुणी माय का लाल?

छे बुवा! विचार करूनच दमलो...
पुन्हा पहिले पाढे पंचावन!
मुंबईच्या स्पिरिटला...म्हणजे भूताला हो...आपला सलाम!
इतकंच हो...इतकंच म्हणणार आपले नेते ...फारतर एकदोन लोकांना बळीचे बकरे बनवले जाईल...आणि...आणि...
छ्या! पुन्हा हरदासाची गाडी आली मूळपदावर!
आता पुढे काय?????????????

८ जुलै, २०११

चंशिकुम! ११

गाडीत बसता बसताच रिमझिम पाऊस सुरु झालेला होता....पाहता पाहता तो तुफान वेगाने कोसळू लागला. आजुबाजुचे सगळे आसमंत ढगाळ भासू लागले...समोर जेमतेम सात-आठ फुटांवरचा रस्ता फक्त दिसू लागला...बाकी सगळीकडे ढगच ढग...आम्ही जणू ढगातूनच प्रवास करत होतो...साहजिकच आता गाडीचा वेग अतिशय मर्यादित ठेवावा लागत होता.

मुंबईत हवा तेवढा घनघोर पाऊस आयुष्यभर अनुभवलेला आहे त्यामुळे पावसाचे फारसे नाविन्य नाही...पण इथे आम्ही त्या ढगातच वावरत होतो...ज्यातून पडणारा पाऊस फक्त आम्ही अनुभवत असतो...आजचा हा अनुभव अगदी विलक्षणच होता.
आता आजुबाजूला काय पाहायचं म्हणून स्वस्थ बसलो होतो...इतक्यात लक्ष खाली गेलं आणि...

अहाहा,काय दृष्य होतं ते...खाली उतरून जाणारी बियास नदी..अगदी खोल खोलपर्यंत दिसत होती.तशातच डोंगरातला वळणावळणांचा उतरता रस्ता आणि त्यावरील वाहनं,झाडी इत्यादि विहंगम दृष्यही मोहवून टाकणारं होतं...मी लगेच प्रग्रा सावरला आणि त्याची काही छाचि उतरवून घेतली.

निसर्गाचं ते ओलेतं रूप न्याहाळतच आम्ही घाट उतरलो. रस्त्यात एका ठिकाणी सोलांग व्हॅली नावाचं अजून एक पर्यटन स्थळ लागलं....हिवाळ्यात इथे लोक बर्फातून घसरण्याचा खेळ(स्किईंग) करायला येतात असं कळलं. आत्ता इथे बर्फ वगैरे काही नव्हतं...पण आकाशात उडण्याचा...पॅरा ग्लाईंडिंगचा खेळ खेळता येतो असं आमच्या चालकाने सांगितलं...आम्ही चारजण गाडीच्या बाहेर पडलो....अजूनही पाऊस सुरुच होता...मात्र आता तो खूपच कमी झालेला होता...गाडी थांबली तिथून साधारण दहा मिनिटांच्या अंतरावर चालत जायचं होतं म्हणून आम्ही निघालो...माझ्या मनात केव्हापासून पॅरा ग्लाईडिंगचा अनुभव घ्यायचे घोळत होते...अनायासे संधी आलेय तर साधून घेऊ ह्या हिशोबाने आम्ही सगळे झपझप चालत त्या केंद्राजवळ पोचलो...पण आमचं दूर्दैव हे की पावसाळी हवामानामुळे सद्द्या ते बंद ठेवलेलं होतं...त्याच बरोबर इतर काही बारीक-सारीक खेळही बंद होते...तिथे, लोकांची बरीच गर्दी जमलेली होती पण सगळेच जण खट्टु दिसत होते...इतक्या लांब येऊन अपेक्षाभंग झाल्याचे दु:ख प्रत्येकाच्या चेहर्‍यावर ठळकपणाने जाणवत होते.

आम्ही तिथे एक फेरी मारली...हवेतला गारवा चांगलाच जाणवत होता म्हणून मस्तपैकी कॉफी प्यायली आणि परतीचा रस्ता धरला...आमचे सहलप्रमुख आणि त्यांची कन्या पुढे आणि मी आणि त्यांचा पुत्र मागे असे चालत निघालो....अचानक सप्र मागे वळून म्हणाले...अरे,काय हे दगड कशाला मारताय?
आम्ही, मागचे दोघेही अचंबित झालो...हे असे काय अचानक वेड्यासारखे बोलताहेत?
त्यांना आम्ही काही बोलणार...इतक्यात आम्हालाही तसाच दगडांचा प्रसाद मिळायला सुरुवात झाली....हे काय आक्रित घडतंय म्हणून आम्ही आजुबाजूला पाहायला सुरुवात केली आणि.....लक्षात आलं की ते दगड वगैरे काही नव्हते तर आकाशातून चक्क आमच्यावर गारांचा मारा सुरु झालेला होता....आयुष्यातला हा पहिलाच प्रसंग होता की आम्ही गारांचा अनुभव घेत होतो....गारा लहान बोराएवढ्या होत्या पण चांगल्याच शेकवत होत्या...माझ्या डोक्यावर टोपी होती म्हणून मी वाचलो...पण बाकीच्यांच्या डोक्यावर ठपाठप गारा आपटत होत्या....गारांच्या त्या अनपेक्षित माराने क्षणभर आम्ही बावचळलो खरे पण नंतर मग त्या गारा झेलण्यासाठी,वेचण्यासाठी आमच्यात स्पर्धा सुरु झाली.
गारा हातात सहजासहजी येत नव्हत्या. हुलकावणी देऊन निसटत होत्या...कधी एखादी गार हातात आलीच तर हाताच्या उष्णतेने पाहता पाहता विरघळत होती....कमाल ह्याची वाटली की अंगाला,डोक्याला आपटणार्‍या,टणक वाटणार्‍या त्या गारा हातात येताक्षणी कशा अगदी सहजपणाने विरघळत होत्या.
आजुबाजूला ,झाडां-झुडपांनी,गवतांनी तर जणू हिरे-मोती धारण केले होते...ते विलोभनीय दृश्य टिपायला प्रग्रा नव्हता...पाऊस पडत असल्यामुळे मी तो गाडीतच सोडून आलो होतो.
आता पावसाचा आणि गारांचा तडाखा चांगलाच जाणवू लागला होता त्यामुळे आम्ही तो खेळ सोडून देऊन झपाझप गाडीच्या दिशेने चालायला लागलो.

गाडीत बसेपर्यंत चांगलेच भिजलो होतो...अंगात घातलेला  स्वेटर ओला झाल्यामुळे मी काढून टाकला आणि थंडी जास्त जाणवायला लागली....गाडीच्या पुढच्या काचेवर पावसाच्या पाण्याबरोबरच येऊन आदळणार्‍या गारांचा खेळ पाहातच आमचा हॉटेलवर परतीचा प्रवास सुरु झाला....वाटेत पुन्हा एकदा थांबून सकाळी घेतलेला...बर्फात खेळण्यासाठीचा जामानिमा परत करून आम्ही हॉटेलवर परतलो...दुपारचा चारचा सुमार असूनही चांगलेच अंधारलेले होते.

हॉटेलात येताक्षणी आधी ओले कपडे काढून चांगले कोरडे कपडे चढवले. सकाळी रोहतांगला न्याहरी केली होती त्यानंतर सोलांगला कॉफी प्यायली...ह्या व्यतिरिक्त पोटात काहीच गेले नव्हते. आता जेवणाची वेळ तर केव्हाच टळून गेली होती म्हणून मग दुपारची न्याहरी मागवली.

पाचच्या सुमारास पाऊस थांबला आणि आम्ही स्थानिक स्थलदर्शनासाठी बाहेर पडलो.आता बाहेर चांगलाच गारठा निर्माण झाला होता. माझ्या अंगात थंडी भरायला लागली होती आणि माझा एकमेव स्वेटर तर ओला झाला होता...मग काय माझ्या कन्येचं पावसाळी जाकिट  घालून बाहेर पडलो...पण माझी थंडी काही कमी होईना..वाटेत पुन्हा कुठे कॉफी मिळाली तर पिऊ असा विचार करून मी कसाबसा थंडी थोपवण्याचा विचार करत होतो....
तसं पाहायला गेलं तर काही फारसं पाहण्यासारखं नव्हतं म्हणा...पण आलोच आहोत तर जाऊन येऊ म्हणून हजेरी लावली...त्यातलं एक आहे हिंडिंबा मंदिर!  हिडिंबा मंदिराचा परिसर बाकी मस्त आहे...उंचच उंच अशा (बहुदा) देवदार वृक्षांनी नटलेला आहे. दर्शनासाठीची हीऽऽऽऽऽऽ मोठी रांग पाहून आमच्या बरोबरची मंडळी फक्त बाहेरूनच ओझरतं दर्शन घेऊन परतली...ह्या मंदिराच्या आवारातच आमच्यातल्या तरूण मुलींनी हातात ससा घेऊन आपापली छाचि काढून घेतली..एकेक ससे कसले पोसलेले होते !!!
त्यानंतर मुलींनी हिमाचलच्या वेशभुषेतली छाचि काढून घेतली...त्या तिथल्या बायका काही म्हणता पिच्छा सोडीनात..मग काय मुलींचा नाईलाज झाला...तसंही मुलीना नटायला नेहमीच आवडतं म्हणा...म्हणून हो,नाही करता करता त्या तयार झाल्या ती वेशभुषा करायला.  :)

असो.त्यानंतर तिथल्याच एका राष्टीय उद्यानात थोडा फेरफटका मारून आम्ही गेलो बुद्धमंदिर पाहायला. ते पाहून झाल्यावर मंडळी रमत गमत खरेदी, अधिक नुसत्याच चौकश्या करत फिरायला लागली...इथे मला थंडी अजिबात सोसवेना...अंग थरथरायला लागलं होतं...मला माहीत असलेले सगळे श्वसनाचे...कपालभाती इत्यादि प्रकार करून पाहिले पण अंगात काही उष्णता निर्माण होईना...आजूबाजूला कुठेच चहाची टपरी किंवा तत्सम काही दिसेना...आणि मंडळी आपली गुंतलेली होती आपल्याच नादात....शेवटी मी कन्येला एका बाजूला बोलावून सांगितले...मी पुन्हा  मागे जातो...कुठे गरमागरम चहा-कॉफी काही मिळेल का ते पाहतो...तू ह्यांच्याबरोबरच राहा...वेळप्रसंगी भटक्यावर संपर्क साध....तिच्या हो-नाहीची वाटही न पाहता मी पुन्हा हमरस्त्याच्या(माल रोड...इथे मनालीतही आहे..शिमल्याप्रमाणे) वाटेला लागलो.

माझ्या सुदैवाने मला फार नाही चालावं लागलं...वळणावरच एक चांगल्यापैकी क्षुधाशांतिगृह होतं...पाटी दिसली..मद्रास कॅफे.. म्हणून घुसलो...तर कळलं की ते पहिल्या मजल्यावर आहे...मग जिना कुठे आहे ते शोधण्यात पाच मिनिटं गेली..मिळाला एकदाचा...मी वर गेलो. आतमध्ये फारशी गर्दी नव्हती पण हॉटेल ऐसपैस होतं...कडेचीच एक खुर्ची पकडून ’एक कडक फिल्टर कॉफी’ अशी ऑर्डर दिली...पण तो बैरा नुसता पाहातच राहिला माझ्याकडे...असं का पाहतोय? म्हणून विचारलं तर म्हणाला...साब,फिल्टर कॉफी नही है,नेसकाफी है,लाऊं?
मी म्हटलं...अरे जे काही असेल ते आण पण एकदम कडक आणि गरम आण...तो गेला आणि मी वाट पाहात बसलो...दहा मिनिटं लावलीन बेट्याने...मी आपला इथे कुडकुडतच होतो. शेवटी एकदाची ती कॉफी आली...दोनचार घोट पोटात गेले आणि जरा धुगधुगी आली...जीवात जीव आला...मग हळूहळू चवीने कॉफीपान संपवून मी पैसे द्यायला व्यवस्थापकाकडे गेलो आणि त्याला म्हणालो....मद्रास कॅफे नाम लिख्खा है और तुम्हारे पास फिल्टर कॉफी नही है?
तो माझ्याकडे पाहात म्हणाला...साब,ये खाली मद्रास कॅफे नही है...आगे भी क्या लिख्खा है देखो ना!
मी पाहिलं तर...मद्रास कॅफे और पंजाब. हिमाचल हॉटेल असे काहीसे धेडगुजरी समीकरण दिसलं....
क्या है ना साब,हम लोक इधरकेही है...लेकिन बाहरके लोग भी आते है ना, इसीलिये उनका भी नाम शामिल किया है हाटिलके नाममे...वो देखो, गुजराथी थाली,पंजाबी थाली...सब इधर मिलता है!

जाऊ द्या झालं...कॉफी मिळाली ना....उगाच खोलात कशाला शिरा..म्हणून मी पैसे देऊन तिथून सटकलो. खरं तर मनात अनेक प्रश्न निर्माण झाले होते...सगळीकडे, जाईन तिथे गुजराथी,पंजाबी थाळी मिळते...पण महाराष्टीय थाळी कुठेच नाही....अहो कुठेच काय? खुद्द मुंबईतही शोधल्याशिवाय सहजासहजी मिळत नाही...तिथे इतरत्र,महाराष्ट्राबाहेर कशी मिळेल म्हणा!


२९ जून, २०११

चंशिकुम! १०

बर्फात खेळायला गेलो खरे...पण मी काही खेळलो नाही...त्याची दोन कारणं..एक तर गळ्यात प्रग्रा होता आणि आजुबाजूचे सृष्टीसौंदर्य,माणसांच्या हालचाली टिपण्यातच मी दंग होतो...हे एक कारण. दुसरं असं की बर्फात खेळायचा जामानिमा मी केव्हाच उतरवून गाडीत ठेवलेला होता...त्यामुळे साध्या कपड्यात बर्फात खेळण्यात ती मजा नव्हती...उगाच थंडी बाधायची आणि आजारपण उद्भवून सहलीचा मजा किरकिरा व्हायचा...माझ्या बरोबर असणार्‍यांनी मात्र तो मजा त्यांना हवा तसा लुटला.

बर्फातला मुख्य खेळ म्हणजे घसरगुंडी...लोक ते जाणतेपणाने आणि अजाणतेपणानेही खेळत होते....जाणतेपणाने म्हणजे...काही साधनांचा वापर करून...आणि अजाणतेपणाने म्हणजे...बर्फावरून चालतांना तसंही घसरायला होत होतंच...मीही एकदोनदा चांगलाच घसरलो...बरोबरच्या लोकांनी वेळीच आधार दिला म्हणून बरं...नाही तर माझा प्रग्राही बिघडला असता....त्यामुळे त्यानंतर मी बर्फाच्या बाहेरूनच इतरांच्या खेळाची मजा पाहात उभा होतो.

तास-दोन तास खेळल्यानंतर साहजिकच त्यातली गंमत कमी झाली,उत्साह मावळला आणि पोटात भूक जाणवू लागली...म्हणून मग आम्ही तिथून चालत चालत रस्त्यावर आलो आणि आमची गाडी शोधू लागलो...आता तिथे सगळ्याच गाड्या एका रंगाच्या,त्यातही एकाच मॉडेलच्याही भरपूर....इतक्या सगळ्या गाड्यांच्यात आपली गाडी शोधायची/ओळखायची म्हणजे प्रत्येक गाडीवरचा नंबर वाचत जायला हवा...आम्ही तेही करून पाहिले....पण गाडी काही सापडेना...खिशात हात घालून भ्रमणध्वनी काढावा म्हटलं....तर प्रत्येकाने तो गाडीतच ठेवून आल्याचं सांगितलं....मग आता गाडी कशी शोधणार? ती नेमकी कुठे पार्क केली हेच आम्हाला कुठे माहीत होतं? आम्ही तर मध्येच उतरलो होतो ना! :(


गाड्यांची ही भली थोरली रांग लागलेली होती....कैक किलोमीटर लांबवर ती पसरलेली दिसत होती...आम्ही परतीच्या दिशेन चालत होतो...आपली गाडी दिसेल ह्या आशेने...साधारण अर्धा-एक किलोमीटर चाललो...गाडीचा पत्ताच नव्हता...तेवढ्यात एक बाई दिसली...तिच्याकडे हातात तीन भ्रमणध्वनी दिसले...आमच्यापैकी एकाने जाऊन तिला विनंती केली....आम्हाला जरा आमच्या चालकाशी संपर्क साधायचाय, देता का तुमचा भ्रमणध्वनी?
ती बाई तर रडायलाच लागली....अहो, इथे रेंजच पकडत नाहीये...एकाही मोबाईलचा उपयोग नाहीये....मी गेले दोन तास शोधतेय....माझी गाडी कुठे हरवलेय कळतच नाहीये.आम्ही तिचे सांत्वन केले...म्हटलं,घाबरू नका,तुमच्या बरोबरची लोकंही तुम्हाला येतील शोधत. आम्हीही आमची गाडी शोधतोय.

त्या बाईसारखी आणि आमच्यासारखी अजूनही कैक लोकं आपापल्या गाड्या शोधत फिरत होती...आजूबाजूला इतक्या गाड्या असतांना नेमकी आपली गाडीच दिसू नये हा अनुभव अगदी वैताग आणणारा होता. इथे सूर्य तापलेला होता,त्यातच बर्फावरून परावर्तित होणारी त्याची किरणं अजून तापदायक वाटत होती आणि लोक आपापल्या साथीदारांना आणि गाड्यांना शोधत इतस्तत: भटकत होते...रोहतांगच्या त्या परिसरात कुणाचाही मोबाईल चालत नव्हता. खरं तर अशा ठिकाणी सरकारी पातळीवरून एखाद्या नियंत्रण कक्षाची स्थापना करणे गरजेचे होते...जिथे ध्वनीवर्धकाची योजना असायला हवी होती...ज्यावरून घोषणा करून संबंधितांचं लक्ष वेधता येईल...पण तशी काही सोय तिथे नव्हती....त्यामुळे सगळेच भरकटलेले दिसत होते.

आम्हा सहाजणांपैकी पाचजण आम्ही एकत्र होतो...आमच्या बरोबरच्या एक बाई आणि चालक गाडीबरोबर होते.जवळपास एक तास उलटला तरी गाडीचा पत्ता लागेना....आम्ही मात्र उगाच पुढे पुढे चालत होतो....बस्स! शेवटी मी निर्णय घेतला...आता पुढे जाणे नाही...इथेच थांबू.
पण मग प्रश्न निर्माण झाला...आम्हाला शोधायला कोण येणार?
मग दोन जणांना पुन्हा मागे पाठवलं...नदीच्या कोरड्या पात्रातही भरपूर गाड्या थांबवलेल्या दिसत होत्या....माझा अंदाज होता की आमची गाडी तिथेच असणार...कारण?
आमच्या बरोबरच्या ज्या बाई गाडीत राहिल्या होत्या त्या चालकाला गाडी खूप दूरवर नेऊन पार्क करायला निश्चितच देणार नव्हत्या ह्याची खात्री वाटत होती...त्यांचा नवरा,मुलांना सोडून फार लांब राहणं त्यांना शक्यच नव्हतं...तेव्हा गाडी तिथेच त्या नदीच्या कोरड्या पात्रातच असणार...साधारण त्याच्या आसपासच आम्ही उतरून गेलो होतो.

आमच्यापैकी दोघांना...माझी मुलगी आणि त्यांच्यापैकी एक मुलगा...अशा दोघांना मागे पाठवलं....हे असं करण्याचं कारण म्हणजे त्या मुलाला गाड्यांची इथ्यंभूत माहिती आहे आणि दूरवरून,मागून,पुढूनही तो गाडी कोणती आहे...म्हणजे कंपनी,मॉडेल इत्यादि ओळखू शकतो...अहो पण इथे एकाच कंपनीच्या मॉडेलच्या अनेक गाड्या आहेत...मग तो ओळखणार कसा आपली गाडी? आणि आत्तापर्यंत का नाही ओळखली?
प्रश्न बरोबर आहे...पण उत्तर असं आहे की...आत्तापर्यंत आम्ही केलेला गाडीचा शोध हा फारसे गंभीर होऊन केलेला नव्हता...आता मात्र संशोधक वृत्तीने आणि गंभीरपणाने तो शोध घ्यायचा होता...म्हणून ह्या दोघांना मागे पाठवलं. माझ्या मुलीकडे नुकताच घेतलेला अत्त्याधुनिक प्रग्रा होता...त्याचा उपयोग ह्यावेळी दुर्बीणीसारखा करायचा ठरले....त्याप्रमाणे ह्या दोघांचे पथक मागे रवाना झाले.
मग दुसरे दोन जणांचे पथक...आमचे सहलनेते आणि त्यांची मुलगी...हे दोघे पुढे निघाले...मी मात्र तिथेच एक उंचवटा पाहून बसून राहिलो. पुढे जाणार्‍यांना फार पुढे जाऊ नका...असं सांगून त्यांची रवानगी केली.

साधारण अर्ध्या तासाने पुढे गेलेले दोघेजण परत आले...गाडीचा कुठेच पत्ता नव्हता....ते जिथपर्यंत गेले होते...त्याच्याही पुढे किमान दोन किलोमीटरपर्यंत गाड्यांची रांग लागलेली होती...त्यामुळे मी सांगितल्याप्रमाणे जास्त पुढे न जाता ते परतले होते....आता पुढे जायचंच तर सगळ्यांनी मिळूनच...हे ठरवून.

आमची मागे गेलेली दोनजणांची तुकडी अजूनही आलेली नव्हती...त्यांची वाट पाहणे सुरुच होते. आमच्यासारखे भरकटलेले लोकही इतस्तत: दिसत होते...त्यांचेही आपापसातले संभाषण निराशाजनक होते...गाडी कधी सापडणार? :(

इतक्यात काही विशिष्ट गणवेश घातलेले तरूण-तरूणींचे एक टोळके आले.....हातात फलक घेतलेले’पर्यावरण बचाओ’ मोहिमेचे ते सगळे शिलेदार होते. लोकांमध्ये जागृती करण्याचा त्यांचा प्रयत्न सुरु होता...प्लास्टिक पिशव्या,बाटल्या इतस्तत: टाकू नका,हिमालयाचा परिसर खराब करू नका...असा लोकांमध्ये प्रचार करत,वैयक्तिक संवाद साधत ही मंडळी माझ्यापर्यंत आली...त्यातली एक तरूणी मला उद्देशून म्हणाली...अंकल,आपका क्या कहना है?
मी म्हटलं, हे पाहा,तुम्ही जे काही करताय ते अतिशय स्तुत्त्य आहे,पण....
मी मराठीतच बोलत होतो...त्या लोकांना समजेल की नाही हे लक्षात आलं म्हणून मराठी/हिंदी असे संमिश्र बोलू लागलो....आणि काय आश्चर्य! त्यांच्यापैकी काहीजण चक्क मराठीच निघाले....त्यांचा एक गटप्रमुख तर कोल्हापुरचा ’कपडेकर’ आडनावाचा तरूण होता(नाव मात्र विसरलो त्याचे.)
मग काय मराठीतच गप्पा सुरु झाल्या.
मी त्यांना म्हटलं..हे पाहा,लोकांना तुम्ही जे काही आवाहन करताय ते त्यांना समजत नाहीये असे समजू नका...खरं तर इथे येणारे बहुसंख्य हे सुशिक्षित आणि सुसंस्कृत घरातूनच आलेले आहेत/असतात...पण अंगभूत असलेल्या/लागलेल्या वाईट सवयी इतक्या सहजासहजी सुटणार नाहीत. लोक कचरा टाकतात/करतात...त्यांना तुम्ही कचरा करू नका असे सांगितले तर काही मोजकेच लोक कदाचित तुमचे तेवढ्यापुरते ऐकतीलही...पण तुमच्या अपरोक्ष पुन्हा ते कचरा करतील...कारण...सवयी कधी सुटत नाहीत..त्या तशाच राहतात अशा अर्थी एक इंग्रजी म्हण आहे..हॅबिट ऑलवेज रिमेन्स!
हॅबिटचे स्पेलिंग आहे...एच(h) ए(a) बी(b) आय(i) ट(t)...habit
ह्यातलं पहिलं अक्षर काढलं तर राहतं.. ए बीट(a bit) रिमेन्स!
ह्यातलं दुसरं अक्षर काढलं तर राहतं...बीट(bit) रिमेन्स!
ह्यातलं तिसरं अक्षर काढलं तर राहतं...इट(it)रिमेन्स!...म्हणजेच ती(it)टिकते! अशी सहजासहजी जात नसते.
तेव्हा तुम्ही आवाहन जरूर करा,लोक लगेच सुधारतील अशी अपेक्षा मात्र करू नका आणि ती सुधारत नाहीत म्हणून खट्टूही होऊ नका...कारण जी गोष्ट तुम्हाला मनापासून पटलेय आणि जी तुम्ही अंगीकारलेय, ही गोष्ट जर बहुजनांच्या फायद्याची आहे अशी तुमची मनापासून धारणा असेल तर ती तुम्ही करत राहा...सुधारणा ह्या खूप हळूहळू होत असतात....सुधारकांच्या कैक पिढ्यांना त्यासाठी आपलं संपूर्ण आयुष्य वेचावं लागतं,तेव्हा कुठे इंचभर प्रगती होत असते.
लोकांनी टाकलेला कचरा उचलणारे,हातात झाडू घेऊन स्वत: साफसफाई करणारे सेवाभावाने प्रेरित झालेले लोकही मी पाहिलेत....पण म्हणून सर्वसामान्य लोक सुधारलेत असे नाही झाले...उलट लोक मुद्दाम तिथे,साफ केलेल्या जागी जाऊन पुन्हा कचरा टाकायला लागले...अशा वेळी स्वत: स्वच्छतेचं उदाहरण घालून देणारी मंडळी एक तर रागावतात किंवा मरू दे,हे लोक सुधारायचे नाहीत. आपण कशाला उगाच मरा....असे म्हणून त्यातून बाजूला हटतात....
आपल्याला लोकांच्या सवयी सुधारायच्या असतील तर त्याची अगदी प्राथमिक शालेय पातळीपासूनच सुरुवात करायला हवी आहे...एकदा एखाद्याच्या मनात चांगल्या सवयींबद्दल जागरूकता निर्माण झाली की मग भविष्यात तो कधीच चुकीच्या गोष्टी करणार नाही....तेव्हा माझा तुम्हाला असा सल्ला आहे...की जोवर तुम्ही हे जे काही करताय(ते चांगलंच आहे...पण त्याला फारसे यश येणार नाहीये हे देखिल तेवढेच खरे आहे)ते तुम्हाला न रागावता,चिडता आणि निराश न होता करता येतंय तोवर जरूर करा...तुमच्या अशा मोहिमेमुळे किमान एक माणूस जरी सुधारला तरी खूप झाले असे समाधान माना...बाकी..आपण काही तरी समाज जागृतीचे काम करतोय ह्या समाधाना व्यतिरिक्त दुसरे काही फारसे साध्य होणार नाही हेही लक्षात ठेवा, म्हणजे तुमच्यात नैराश्य निर्माण होणार नाही.

तुम्हाला निरुत्साही करण्यासाठी मी हे बोलत नाहीये...फक्त वस्तुस्थितीची कल्पना देतोय....कारण जेव्हा कुणीही आपल्या स्वत:च्या मनाने ठरवतो तेव्हाच ती सवय दीर्घकाळ टिकते,दुसर्‍यांच्या सांगण्याने नव्हे...एरवी तेरड्याचा रंग तीन दिवस ह्या म्हणीसारखे होत असते...असला ताप फार काळ टिकत नाही.

माझं हे बौद्धिक ती मुलं शांतपणे ऐकून घेत होती...मी सांगितलेला..विशेष करून कचरा गोळा करण्याबद्दलचा त्यांचा अनुभवही तसाच होता...ह्याआधी हे लोक जेव्हा पिशव्यातून कचरा गोळा करत असत तेव्हा इतर लोक लगेच, तिथेच...साफ केलेल्या जागेवर कचरा आणून टाकत....ही वस्तुस्थिती त्यांच्याही लक्षात आलेली आणि म्हणूनच आता त्यांनी कचरा उचलणे बंद करून फक्त कचरा इथे तिथे टाकू नका...आपल्याबरोबर घेऊन जा आणि कचर्‍याच्या डब्यातच टाका असं सांगायला सुरुवात केलेली होती.... अजूनही बरंच काही सांगता आलं असतं...पण तेवढ्यात आमची गाडी आली...मागे गेलेल्या दोघांनी आपली कामगिरी अगदी चोख पार पाडली होती.

गाडीत बसता बसता त्या तरूणांचा निरोप घेतला. गाडी येईपर्यंतचा माझा वेळ मात्र मजेत गेला...त्या लोकांना कदाचित तो कंटाळवाणाही वाटला असेल. ;)

२४ जून, २०११

चंशिकुम! ९

पहाटे चार वाजता जायचं म्हणून तीन वाजताच उठून मुखमार्जनादि आन्हिकं आटोपून आम्ही सगळे तयार होतो पण गाडी चालकाचा पत्ताच नव्हता. त्याच्या भ्रमणध्वनीवर संपर्क साधण्याचा प्रयत्न फोल ठरत होता...चार ते पाच असा एकतास गेला आणि शेवटी एकदाचा संपर्क झाला बुवा...महाराजांनी फोन उचलून आम्हाला कृतार्थ केले...आणि मग गाडीत बसून रोहतांगच्या दिशेने निघायला सकाळचे पावणे सहा वाजले.
आमच्या आधीच्या चालकाने आम्हाला प्रवासाच्या सुरुवातीलाच सांगितले होते की इथे तुम्ही चालकाच्या सांगण्यानुसार आपला कार्यक्रम ठरवलात तरच तो उत्तमरित्या पार पडेल...कारण कोणत्या वेळी आणि कुठे रहदारी जास्त असते,ज्यामुळे उगाच प्रवासातला वेळ वाढत असतो...हे, चालक इथला स्थानिक असल्यामुळे त्यालाच बरोबर माहीत असतं. त्यामुळे तो सांगेल तसं वागा,तुम्हाला प्रवासात कोणतीच अडचण येणार नाही. आम्ही अगदी शहाण्या मुलासारखे त्याचे ऐकूनच ह्या आमच्या चालकाला आदल्या रात्री विचारून,त्याची संमती घेऊन पहाटे चारची वेळ ठरवली होती...पण त्याने तर मनालीतच आमचे दोन तास फुकट घालवले होते. असो,जे झालं ते झालं. आम्ही दोन-चार शब्द त्याला ऐकवले आणि त्यानेही प्रत्त्युत्तर न देता मुकाटपणे ऐकून घेऊन चक्राचा ताबा घेतला.

सकाळचं प्रसन्न वातावरण,थंडगार हवा,वळणावळणाचा रस्ता, रस्त्याच्या एका बाजूने वाहणारी नदी,तर दुसर्‍या बाजूला असणारा हिरवागार पर्वत...झोपेचे फुकट गेलेले दोन तास वसूल करायला मंडळींनी सुरुवात केली. मी मात्र चालकाजवळच्या आसनावर प्रग्रा सावरून बसून होतो...डोळ्यात काय आणि किती साठवू? प्रग्रात नेमकं काय कैद करू अशा द्विधा मन:स्थितीत सगळा आसमंत न्याहाळत होतो...अशा परिस्थितीत मला तरी झोप येत नाही बुवा...आपण अशी दृश्य रोज कुठे पाहात असतो?मग ही संधी सोडली तर आपणच आपल्यासारखे...कपाळकरंटे...

रस्ता अगदी साफ होता,वाटेत कुठेही विरुद्ध दिशेने येणारं वाहन दिसत नव्हतं. आमचा गाडीचालक अतिशय कुशलतेने गाडी चालवत होता...अधूनमधून भेटणार्‍या,आमच्याच सारखे रोहतांगच्या दिशेने जाणार्‍या बर्‍याच वाहनांच्या पुढे तो गाडी काढत होता.रस्ता असा नागमोडी होता की कधी नदी डाव्या हाताला तर कधी ती उजव्या हाताला...असे सारखे चित्र बदलत होते...मध्येच कधी छोटेखानी धबधबे दिसत होते आणि....आणि...अचानक समोरच्या बाजूला काहीतरी चमकायला लागलं...काय बरं होतं ते...अरेच्चा,ही तर हिमशिखरं दिसायला लागली होती...सूर्याची कोवळी किरणं त्यावर पडून ती हिमशिखरं जणू सुवर्णशिखरं भासत होती....मी लगेच प्रग्रा सावरला...काही छायाचित्रं घेतलीही...पण गाडी इतक्या वेगात पळत होती आणि रस्ता इतक्यावेळा वळत होता की ती हिमशिखरंही मध्येच गायब व्हायची....तशी ती अजून खूप दूर होती...आम्हाला तिथेच जायचं होतं...आणि त्यांनी आपली झलक दाखवून आमची उत्सुकता अजून वाढवून ठेवली होती.

चालकाने गाडी मध्येच एका गावात एका दुकानाजवळ थांबवली. इथून आम्हाला बर्फात खेळण्यासाठीचा सगळा जामानिमा घ्यायचा होता असं कळलं. पटापट सगळे खाली उतरून दुकानात गेलो. तिथे एक प्रसन्नवदना तरूण स्त्री उभी होती. तिच्याशी आमच्यातल्या महिलामंडळाने बातचीत करून आम्हा सहाजणांसाठी जामानिम्याची व्यवस्था केली..प्रत्येकी २०० रूपये असे त्याचे भाडेही ठरले. मग त्या स्त्रीने प्रत्येकाच्या उंचीचा,देहयष्टीचा अंदाज घेत एकेक पोशाख निवडून काढला,त्या त्या व्यक्तीला चढवला...अगदी आई लहान मुलाला आंगडं,टोपरं घालते त्याच मायेने ती माऊली आम्हाला सजवत होती. अंगात घालायच्या पोशाखात सगळ्यात आधी खुर्चीवर बसून पाय घालायचे, मग उभं राहून दोन्ही बाजूला हात पसरून लांब बाह्यात हात घालायचे आणि मग कमरेपासून वर गळ्यापर्यंत चेन खेचून अगदी गळाबंद व्हायचे. त्याच पोशाखाला जोडलेली टोपी असते...ती डोक्यावरून घ्यायची,तिचे बंद आवळून गळ्याशी बांधायचे....मग हातात घालायला हातमोजे आणि पायात घालायला गमबूट मिळाले....आयुष्यात पहिल्यांदाच हे सगळं आम्ही करत होतो...त्यामुळे एकमेकांच्या दिसणार्‍या ध्यानाकडे,अवताराकडे पाहून मस्तपैकी हसत होतो..एकमेकांची खेचत होतो...त्या माऊलीलाही आमची ही खेळीमेळी पाहून हसू फुटत होते. :)

चला,एकदाचे तयार तर झालो,म्हटलं आता सगळ्यांचं छायाचित्र काढूया.
नको,आत्ता नको,बर्फात गेल्यावर काढणारच आहोत ना,मग आता इथे वेळ नको घालवूया....असा एकूण विचार प्रकट झाल्यामुळे तसेच गाडीत बसलो आणि पुन्हा सुरु झाला प्रवास...रोहतांगच्या दिशेने.

मनाली ते रोहतांग पास हे अंतर तसं पाहायला गेलं तर फक्त ५१ किलोमीटरचं आहे असं नकाशा सांगतो....त्यामुळे ६०-७०च्या वेगाने गाडी हाणली तर ती तासाभरात पोहोचायला हवी असा सरळ साधा हिशोब आहे...पण तसं अजिबात झालं नाही...एक तर वळणावळणांचा आणि चढा रस्ता,त्यातच आता रहदारी कमालीची वाढलेली...सगळी रोहतांगच्या दिशेने जाणारी वाहनं एकामागोमाग एक अशी अक्षरश: रांगेत[रांगत म्हणलंत तरी चालेल.;)] चाललेली होती. अशी झुम्मड उडाल्यामुळे चांगले अडीच-तीन तास तरी लागले असावेत.(इथे घड्याळाकडे कुणाचं लक्ष होतं म्हणा?) तसेही शेवटचे काही किलोमीटर रस्ता बर्फाच्छादित असल्यामुळे प्रवाशांसाठी बंदच ठेवलेला होता...त्यामुळे आम्हाला जिथपर्यंत जायला परवानगी मिळाली तिथपर्यंत आम्ही पोचलो.वातावरणातला गारठा चांगलाच जाणवत होता...बर्फात खेळण्य़ासाठीचा सगळा जामानिमा घालून तयार होतो...तरीसुद्धा!
पांढर्‍या शुभ्र बर्फाच्या पार्श्वभुमीवर जिथे पाहावे तिथे पांढर्‍या गाड्याच गाड्या आणि प्रवाशांची वर्दळ दिसत होती. काही क्षुधाशांति गृह देखील तिथे असल्याचं लक्षात आलं....मग काय आम्ही सगळ्यात पहिल्यांदा तिथे मोर्चा वळवला. सकाळपासून पोटात चहा-कॉफीसुद्धा गेलेली नव्हती...मग गरमागरम पराठे आणि चहा-कॉफी अशी न्याहरी केली. न्याहरी करतांनाही मी अक्षरश: थरथरत होतो...आयुष्यात इतका गारठा पहिल्यांदाच अनुभवत होतो...तेही अंगावर इतके सगळे कपडे असतांना...

पोट भरलं तसा जीवात जीव आला.तिथून बाहेर पडलो...आजूबाजूला हिंडत-फिरत निघालो.बर्फाळ शिखरांची छायाचित्र घेण्याचा सपाटा लावला.सकाळचे साडेनऊ वाजले असावेत.आता सूर्य बराच प्रखर भासू लागला होता...बर्फाच्छादित शिखरांवरून येणारे त्याचे प्रकाशकिरण डोळ्यांना जाचक वाटू लागले आणि त्याच वेळी जाणवलं की अंगातली थंडी आता कुठल्या कुठे दूर पळालेय...मग काय मी तो खास अंगावर चढवलेला जामानिमा काढून टाकला...त्याच्याबरोबरच अंगातला स्वेटरही काढून टाकला...आता अंगावर एक पॅंट आणि टी-शर्ट..नाही म्हणायला पायतले गमबूट फक्त ठेवले होते. बाकी अगदी मुंबईत राहतो तशा पोशाखात मी तयार झालो होतो...हुश्श! आता कसं अगदी मोकळं मोकळं वाटायला लागलं....इतका वेळ माझ्यातला गुदमरलेला मी, पुन्हा एकदा अंगात संचारलो.

आजूबाजूला आमच्यासारख्याच उत्साही प्रवाशांनी आणि त्यांच्या गाड्यांनी रस्ते फुलले होते. खरं सांगायचं तर बर्फ फारसा नव्हता पण जो काही आजूबाजूला पसरला होता त्यात लोकांचे खेळणे-घसरणे सुरुच होते. आम्हीही मग त्यांच्यात सामील व्हायचं ठरवलं आणि म्हणून, चालकाला गाडी एका बाजूला घ्यायला सांगितली जिथे लांबवर बर्‍यापैकी बर्फ दिसत होता. त्याने गाडी पुन्हा उतारावर घेतली आणि पार्किंग शोधत शोधत हळूहळू आम्ही पुढे निघालो....पण मुद्दाम पार्किंगला अशी जागा कुठेच सापडेना...असली नसलेली जागा आधीच आलेल्या गाड्यांनी काबीज केली होती...मग आम्ही मध्येच उतरलो आणि चालकाला पुढे जिथे जागा मिळेल तिथे गाडी लावण्यास सांगून लांबवर दिसणार्‍या बर्फात खेळायला निघालो.
इतक्या लांब, चढ-उतार करून जाण्याची तयारी नसल्यामुळे आमच्यापैकी एक बाईमाणूस गाडीतच बसून राहिली...गाडी जिथे पार्क होईल तिथेच थोडे-फार बर्फात खेळून घेण्याच्या इच्छेने...आम्ही सगळे त्या बर्फमय वातावरणामुळे भारलेलो होतो...त्यामुळे पुढचा-मागचा विचार न करताच निघालो...बर्फाळ प्रदेशाकडे.

२२ जून, २०११

ध्वनीमुद्रण!

बर्‍याच जणांना काही तरी दुसर्‍यांना सांगावेसे वाटते पण देवनागरीत लिहिता येत नाही किंवा लिहायचा कंटाळा असतो. अशा लोकांसाठी एक उपाय आहे तो म्हणजे..जे आपल्याला दुसर्‍याला सांगावेसे वाटते ते ध्वनीमुद्रित करून ऐकवावे...त्यासाठी कुणीही अगदी सहजपणाने आपल्या भ्रमणध्वनीवरील ध्वनीमुद्रक(रेकॉर्डर)वापरू शकतो...पण त्यावरील ध्वनीमुद्रणाचा दर्जा तेवढा खास नसतो..मग काय करायचं? त्यासाठी तेच ध्वनीमुद्रण संगणकावर करावे असे मी सांगेन...

आता तुम्ही म्हणाल ते कसे करावे बरं?
सांगतो.
आपल्या संगणकावर एक ध्वनीमुद्रक असतो..त्यात साधारण एक मिनिटाचे ध्वनीमुद्रण होते...पण ते होते .वॅव(.wav) ह्या प्रकारात...ज्यात फाईलचा आकार मोठा असतो...तो आकार कमी करण्यासाठी मग ही फाईल आपल्याला मप३(mp3) प्रकारात रुपांतरीत करावी लागते..ज्यासाठी वॅवचे मप३ मध्ये रुपांतर करता येणारी प्रणाली लागते...इतकं सगळं करूनही ध्वनीमुद्रण फक्त एकच मिनिटाचे होते आणि त्यात संपादनही करता येत नाही...मग अशा गोष्टीचा काय बरं उपयोग?

मंडळी असे निराश होऊ नका...मी सांगतो तुम्हाला...तुम्हाला हवा तेवढा वेळ बोलता येईल इतके ध्वनीमुद्रण करणारी प्रणाली..ज्यात हव्या तेवढ्या वेळा संपादन करता येते..झालंच तर अशा ध्वनीमुद्रणातून तयार होणार्‍या वॅव फाईलचे मप३ मध्ये सहजपणाने रुपांतर करता येईल अशी सोयही आहे ह्या प्रणालीत...आणि ही प्रणाली पूर्णपणे फुकटही आहे..तेव्हा लागा तयारीला.

ह्या प्रणालीचे नाव आहे ऑडेसिटी(Audacity).
http://audacity.sourceforge.net/download/windows ह्या दुव्यावरून आपण ती आपल्या संगणकावर उतरवून घेऊन वापरू शकता.
१)Windows 98/ME/2000/XP: Audacity 1.2.6 installer (.exe file, 2.1 MB) - The latest version of the free Audacity audio editor..ह्यातले Audacity 1.2.6 installer हे उतरवून घ्यायचंय.
२)आणि मप३ मध्ये रुपांतरण करण्यासाठी ज्या फाईलची गरज असते...ती लेम फाईल ... LAME MP3 encoder - Allows Audacity to export MP3 files.

वर दिलेल्या दोन्ही फाईली उतरवून घेऊन त्याची स्थापना आपण आपल्या संगणकावर केलीत की आपण हवे तेवढे ध्वनीमुद्रण करू शकता....लेम फाईल ही ऑडेसिटीच्या मूळ फोल्डरमध्येच ठेवावी म्हणजे ती त्या प्रणालीला आपोआप जोडली जाते.

ऑडेसिटी कसं वापरायचं? प्रश्न पडला असेल ना?
अहो त्याच्या हेल्प फाईलमध्ये सगळ आहे त्याबद्दल.
आणि इथेही आहे.....म्हणजे खालच्या दुव्यावर.
http://audacity.sourceforge.net/manual-1.2/index.html

खरं सांगायचं तर ध्वनीमुद्रणासाठी महाजालावर हव्या तेवढ्या फुकट स्वरूपातल्या प्रणाल्या आहेत...पण ऑडेसिटीइतकी सोपी आणि परिपूर्ण अशी दुसरी कोणतीही प्रणाली नाही आढळली.

१९ जून, २०११

चंशिकुम! ८

थोडा वेळ आराम करून,चहापाणी करून पुन्हा बाहेर पडलो.आता अंधार झालेला होता पण आम्हाला फक्त एकाच ठिकाणी जायचं होतं... ते म्हणजे वशिष्ठ ऋषींचं मंदिर पाहायला. आम्ही त्याच रस्त्यावर राहात होतो त्यामुळे ते तसे फारसे लांब नसावे असे वाटले होते; पण गाडीतून जाऊनही चांगली पंधरा मिनिटे लागली...आणि गाडीतून उतरून अजून पुढे चढ्या रस्त्याने चालत पंधरा-वीस मिनिटे लागली. रस्ता चढा होता आणि चांगलाच दमवणारा होता. बोलतांना जाणवत होतं की श्वास लागतोय..शिमल्यापासूनच मला हे जाणवले होते की एकदोन मजले चढलो तरी श्वास लागतोय...मनात आलं की आपण आता खर्‍या अर्थाने म्हातारे झालोय. ;)
पण जेव्हा कळलं की माझ्या बरोबर असणारी तरूण मंडळी(आमच्यात मीच सगळ्यात वयाने मोठा होतो)देखील धापा टाकताहेत,त्यांनाही इथे थकायला होतंय, तेव्हा म्हटलं...नाही,नाही. अजून दम बाकी आहे आपल्यात. ;) कारण एक होतं...चढतांना जरी धाप लागत होती...तरी चढून वर गेल्यावर मिनिटा-दोन मिनिटात श्वास पूर्वपदावर येत होता. ह्याचा अर्थ एकच होता...आम्हा शहरी लोकांना चढण चढण्याची...आपल्या भाषेत जिने चढण्याची फारशी सवय नसते आणि त्यामुळेच हा त्रास जाणवत होता. तसे तर मला सहा जिने चढण्याची कमी-जास्त सवय आहेच,कारण मी राहतोच सहाव्या मजल्यावर आणि अधेमधे आमची लिफ्ट बंदही असते...मग काय,चढणे-उतरणे ओघाने आलेच.असो.

वशिष्ठी मंदिराकडे जातांना दूतर्फा बरीच दुकानं आहेत. त्यात शाली,गरम कपडे,शोभेच्या वस्तु,खेळणी वगैरे बर्‍याच गोष्टींची विक्री होते. आम्ही मंदिराकडे चाललो असताना बरेच दुकानदार जाणार्‍या-येणार्‍या आमच्यासारख्या प्रवाशांना एकच प्रश्न विचारत होते,आमंत्रण देत होते....क्या चिंगु चाहिये? आईये जी चिंगू देखिये.

मला ते चिंगू... चिंगूस असे ऐकू येत होते. आम्ही कुठेच न थांबता मंदिराकडे निघालो होतो आणि ही मंडळी आम्हाला विचारत होती...काही घ्यायचंय का? आणि आम्ही नाही म्हणत पुढे चाललो होतो...त्यामुळे प्रत्येक ठिकाणी हे चिंगूस ऐकून...ही मंडळी आम्हाला तर चिंगूस(कंजूष) म्हणत नाहीत ना? असा एक प्रश्न माझ्या मनात आला...

पुढे जाता जाता एकाने अगदी वाट अडवून मला तो प्रश्न पुन्हा विचारला...आता एकदाचा काय तो सोक्षमोक्ष लावावा असे ठरवून मी त्याला म्हटलं...क्या है ये चिंगूस?
तो म्हणाला...आईये इधर दुकानमे आईये..दिखाता हूँ!
नही,हमे लेना नही है,खाली ये क्या है वह बताईये. यहाँपर सब लोक एकही सवाल करते है,इसीलिये उत्सुकता बढ चुकी है!...मी म्हणालो
अच्छा साब, बताता हुँ! वो क्या है ना की..चिंगु नामका एक प्राणी होता है...भेड-बकरी जैसा.जिसके शरीरपर बहुत ऊन होती है.....
मी त्याचं बोलणं मधेच कापत हसत हसत म्हटलं...अच्छा,वो प्राणीका नाम है क्या? हम तो समज रहे थे की आप सब लोक हमें चिंगूस...याने के कंजूष बोल रहे है...हमारे भाषामे कंजूषको चिंगूस बोलते है! हमने सोचा यहॉं सब लोक हमे बुला रहे है और कह रहे है की भाईसाब आईये,कुछ खरिदिये, और हम ऐसेही आगे जा रहे है,तो वो लोक हमे चिंगूस यानी के कंजूष कह रह रहे है!

तो दुकानदार आणि त्याच्या बरोबरचे साथीदारही खूप मोठ्याने हसायला लागले.
नही,साबजी,हम आपको ऐसे कैसे बोल सकते है? हम बेचनेके लिये यहाँपर बैठे है,कोई खरीदे ना खरीदे. वह तो उनकी मर्जी है,लेकिन हम किसीको कजूष कैसे बोल सकते है!
असो. आम्ही पुढे निघालो आणि मंदिराजवळ पोचलो. सगळ्यांच्या चपला-बूट साभाळायला मी बाहेरच थांबलो...बाकीचे लोक मंदिरात निघून गेले. मी हे पाहिलंय की इथली बहुतेक मंदिरं चांगली एकदोन मजली असतात...बहुदा मंदिराबरोबरच तिथे भक्तनिवासही असावेत. दूरवरून येणार्‍या भक्तांची उतरण्याची,राहण्याची सोय असावी म्हणून. हिमाचलमध्ये भरपूर मंदिरं आहेत...इतकी की हिमाचलचं दुसरं नाव आहे देवभूमि!

मंडळी देवळात चक्कर मारून आली..आम्ही पुन्हा खाली उतरायला लागलो....पुन्हा ती चिंगूवाली मंडळी पिच्छा पुरवायला लागली...मग सर्वानुमते ठरवलं...इतकं म्हणताहेत तर काय प्रकार आहे ते पाहूया..आम्ही आत गेलो....पाचसहाजण होते दुकानात...त्यापैकी एकाने आमचा ताबा घेतला...सगळ्यांना बसायला आसनं दिली आणि त्याने त्या चिंगुबद्दल सांगायला सुरुवात केली...
चिंगु नावाचा एक केसाळ बकरी/मेंढी सदृश प्राणी आहे...पूर्वी, ह्याच प्राण्याच्या कंठात आढळणार्‍या विशिष्ठ तंतूंपासून शाल बनायची...ती पश्मिना नावाने ओळखली जायची...पण त्यासाठी त्या प्राण्याची हत्त्या करावी लागत असे...मेनका गांधी मंत्री असतांना तिने ह्यावर बंदी घातली..जी आजपर्यंत टिकून आहे...त्यामुळे त्या पद्धतीने शाल बनणे बंद झाले...मग आता दुसरा पर्याय काय? तर..हा पर्याय जरा खूप लांबचा आहे...कसा तो आपण पाहूया...
त्याच प्राण्याच्या अंगावरच्या केसांपासून आधी रजई बनवायची... ही रजई दुपदरी असते...थंडीत गरम आणि उन्हाळ्यात थंड...असे तिचे वैशिष्ठ्य आहे... ही रजई अंगावर न घेता पलंगपोस म्हणून वापरायची असते...थंडीत ती जशी आहे तशीच गादीवर अंथरायची असते म्हणजे ऊबदारपणा जाणवतो आणि उन्हाळ्यात तिच्यावर पाणी मारून(पाणी न मारताही थंड करणारी चिंगुही होती..अजून महाग होती) मग ती अंथरायची असते म्हणजे गारवा जाणवतो...जेणेकरून उकडत नाही आणि शांत झोप लागते.

ही रजई गिर्‍हाईकाला वापरायला द्यायची...त्यासाठी गिर्‍हाईकाने साधारण ६००० रुपये मोजायचे. दोन ते तीन वर्षे ही रजई वापरून त्याने ती परत करायची....परत करतांना त्याला दोन पर्याय असतात...१) साधारण ४५ ते ५०% पैसे परत मिळतात...किंवा २) थोडे अधिक पैसे भरून दुसरी चिंगु वापरण्यासाठी घेता येते.
रजई घेतांना गिर्‍हाईकाला रजई बरोबरच पाच गोष्टी फुकट दिल्या जातात...एक खास गरम चादर,दोन शाली..एक पुरुषांसाठी आणि एक स्त्रीसाठी,एक खास चादर ज्यावर निसर्गदृश्य रंगवलेलं असतं...जे तुम्ही घरात पडदा किंवा सजावटीसाठी भित्तीचित्र म्हणून वापरू शकता आणि एक जमिनीवर पसरण्याचा रंगीबेरंगी गालिचा....
तसं पाहायला गेलं तर सौदा काही वाईट नव्हता...पण आमच्यापैकी कुणीच काही घेतलं नाही....
हं,आता कुणालाही प्रश्न पडला असेल की...गिर्‍हाईकाने परत केलेल्या त्या चिंगुचं ही मंडळी काय करतात?
अतिशय महत्त्वाचा आहे हा प्रश्न...साधारण वर्ष-दोन वर्ष वापरलेल्या अशा त्या रजईवर काही प्रक्रिया करून नंतर तिच्यापासून अतिशय मुलायम अशा शाली तयार केल्या जातात..ज्या अंगठीतूनही पार होतात..ज्यांची किंमत भरमसाठ असते...आणि हाच त्या दुकानदारांचा/उत्पादकांचा फायदा असतो....रजया जुन्या झाल्याशिवाय त्यातून, त्यांना हवे तसे तलम शाली बनवण्यासाठीचे तंतू मिळत नाहीत...त्यामुळे त्यासाठी त्या आपल्यासारख्या गिर्‍हाईकांना सशुल्क वापरायला दिल्या जातात..त्या आपण घ्याव्यात म्हणून काही मोफत गोष्टींचं आमिषही दाखवलं जातं...एकूण मला तरी हा प्रकार गिर्‍हाईक आणि उत्पादक ह्या दोघांच्या फायद्याचा वाटतो...अर्थात प्रत्यक्ष अनुभव नाही घेतला.
हा सगळा व्यवहार जम्मू-काश्मीर सरकार पुरस्कृत आहे असेही कळले..खरे खोटे माहीत नाही....

रजया तिथे दुकानात पैसे देऊन अथवा क्रेडिट कार्ड इत्यादि वापरून विकत घेता येत होत्या तसेच त्या घरपोचही पाठवतात ...त्या घरी आल्यावरच आपण पैसे द्यायचे....वापरून झाल्यावर आपल्या जवळच्या प्रमुख शहरातील..जसे की मुंबई,पुणे वगैरे ठिकाणी जिथे जम्मू-काश्मीर सरकारच्या वतीने प्रदर्शनं भरवली जातात..तिथे ह्या वापरलेल्या रजया स्वीकारल्या जातात...पैसे परत हवे असतील तर त्यांच्या नियमात जे काही बसते ते ठराविक काळाने तुमच्या घरी धनादेशाद्वारे पोचवले जातात..अथवा अधिक किंमत भरून नवीन चिंगु पाठवली जाते.....

असो...प्रत्येकाच्या मनात त्या रंगीबेरंगी चिंगु,त्यासोबत फुकट मिळणार्‍या तशाच रंगीबेरंगी आणि आकर्षक भेटवस्तु इत्यादि भरूनही आम्ही काही त्या मोहाला बळी पडलो नाही. :)
आम्ही पुन्हा आमच्या विश्रांतीस्थानाकडे निघालो...दुसर्‍या दिवशी पहाटेच निघायचे होते ना आम्हाला...रोहतांग खोरे(पास) दर्शनासाठी.

हॉटेलात पोचलो...जेवणाची वेळ झालीच होती. माझ्या सुदैवाने ह्या हॉटेलात शाकाहारी जेवणच बनवले जाते असे कळले...अर्थात मांसाहारी जेवणाची कुणी आगाऊ मागणी नोंदवली तरच त्यांच्यासाठी वेगळी व्यवस्था केली जाते...असेही कळले...त्यामुळे मी नि:शंक मनाने जेवणाचा आनंद लुटू शकलो....
दुसर्‍या दिवशी गाडी-चालकाला पहाटे चार वाजता येण्यास सांगून आम्ही झोपेच्या स्वाधीन झालो.