माझ्या आयुष्यातील आजवरच्या कडू-गोड आठवणी मी "पूर्वानुभव" म्हणून सादर करत आहे.
आपण इथे आल्याबद्दल मन:पूर्वक धन्यवाद!

३० जून, २००८

मराठी सुगम संगीतातील नररत्ने! ४ यशवंत देव!



स्वरांच्या दुनियेतला देव! कवी, शब्द-प्रधान गायक आणि संगीतकार यशवंत देव. गेल्या ४०पेक्षा जास्त वर्षे ज्यांनी आपल्या विविध गीतांनी रसिकांना डोलायला लावले असे हे मराठी सुगम संगीतातले मातबर व्यक्तिमत्व.
कधी बहर-कधी शिशिर, अशी पाखरे येती आणिक स्मृती ठेवूनी जाती, तिन्ही लोक आनंदाने भरून गाऊ दे रे, अशी एकापेक्षा एक सुरेल गीते आपण सुधीर फडके उर्फ बाबुजींच्या मधाळ आवाजात ऐकलेली असतील...ह्या गीतांना स्वरबद्ध केलेले आहे यशवंत देवांनी. कवि मंगेश पाडगावकरांचे काव्य,यशवंत देवांचे संगीत आणि बाबुजींचा स्वर असा समसमा योग कैक गाण्यात सुरेलपणे जुळून आलाय. ही गाणी ऐकत ऐकतच मी लहानाचा मोठा झालो. आज इतक्या वर्षांनंतरही ह्या गाण्यांची गोडी अवीट आहे.

यशवंत देवांचा जन्म १ नोव्हेंबर १९२६ सालचा. त्यांच्या घरात वडिलांच्या रुपातच गाणं होतं. तेच त्यांचे पहिले गुरु. देवांचे वडील विविध वाद्यं वाजवण्यात पटाईत होते पण त्यातही तबल्यावर त्यांचे जास्त प्रेम. त्यांच्याचकडून देवांना तालाचे जे बाळकडू मिळाले त्यामुळे देवांचा जीवनातला ताल कधीच चुकला नाही. घरामध्ये मोठमोठ्या कलाकारांचा राबता असे. मैफिली तर जवळपास रोजच असत. अशाच संगीतमय वातावरणात देव वाढले त्यामुळे सूर-ताल-लय ह्या गोष्टी त्यांच्या रक्तात सहजपणे भिनल्या. सुगमसंगीताकडे देव वळले ते मात्र जी.एन जोशी आणि गजाननराव वाटवे ह्यांच्या शब्दप्रधान गायकीमुळेच.

गीतातल्या शब्दातूनच त्याची चाल सहजपणे उलगडत येते म्हणून शब्द अतिशय महत्वाचे असतात असे देवसाहेब म्हणतात. देवसाहेबांच्या चालींचे हेच मर्म आहे. गाण्याचे मर्म समजण्यासाठी आधी त्यातल्या शब्दांचा अर्थ नीटपणे समजून घेतला पाहिजे असेच ते नेहमी होतकरू संगीतकारांना मार्गदर्शन करताना सांगत असतात. केवळ कानाला गोड लागते म्हणून ती चाल चांगली असे ते मानत नाहीत. ह्याचे एक उदाहरण देवसाहेबांनी दिलंय ते म्हणजे..बहरला पारिजात दारी,फुले का पडती शेजारी...ह्या गाण्याचे. ह्याची चाल अतिशय उत्कृष्ट अशी आहे पण देवसाहेब म्हणतात की गाण्याचा अर्थ असा आहे , "ती स्त्री तक्रार करते आहे की पारिजात जरी माझ्या दारात लावलेला असला तरी फुले सवतीच्या दारात का पडताहेत? हा अर्थ त्या चालीत कुठे दिसतोय? म्हणजे, चाल म्हणून एरवी जरी श्रवणीय असली तरी गीतातल्या भावना श्रोत्यांपर्यंत पोचवायला ती असमर्थ आहे.
तेव्हा संगीतकार म्हणजे लग्नात आंतरपाट धरणार्‍या भटजीसारखा असतो हे पक्के लक्षात ठेवून संगीतकारांनी कवी आणि रसिकांच्या मध्ये लुडबुड करू नये असे ते बजावतात.

देवसाहेब जसे एक संगीतकार आहेत तसेच ते एक उत्तम गायकही आहेत आणि त्याहीपुढे जाऊन ते एक अतिशय समर्थ असे कवी देखिल आहेत. त्यांनी रचलेली कैक गाणी ह्याची साक्ष देतील. १)जीवनात ही घडी अशीच राहू दे २)श्रीरामाचे चरण धरावे दर्शन मात्रे पावन व्हावे ३) अशी धरा असे गगन कधी दिसेल का? ४)कोटी कोटी रुपे तुझी कोटी सुर्य चंद्र तारे ५) तू नजरेने हो म्हटले पण वाचेने वदणार कधी ६)प्रिया आज माझी नसे साथ द्याया ७)स्वर आले दुरुनी,जुळल्या सगळ्या त्या आठवणी ८)अरे देवा तुझी मुले अशी का रे भांडतात,कुणी एकत्र नांदती कुणी दूर दहा हात ९) अशी ही दोन फुलांची कथा,एक शिवाच्या पदी शोभते एक शवाच्या माथा....अशी एकाहून एक सरस गाणी देवांनी रचलेली आहेत. ह्यातील काही चित्रपटांसाठी रचलेत तर काही भावगीत-भक्तिगीत म्हणून रचलेली आहेत.

देवसाहेबांनी कैक हिंदी मराठी चित्रपटांना संगीत दिलंय, तसेच बावनखणी, चारचौघी, सख्खे शेजारी,घन:श्याम नयनी आला... अशासरख्या जवळपास ३०-४० नाटकांनाही संगीत दिलंय. कै. सचिन शंकर बॅले ग्रुपसाठीही त्यांनी संगीत दिग्दर्शन केलेले आहे. गदिमांचे गीतरामायण जसे बाबुजींनी संगीतबद्ध केले तसेच गदिमांचे "कथा ही रामजानकीची" ही नृत्यनाटिका सचिनशंकर बॅले ग्रुपने सादर केली होती आणि त्याचेही संगीतकार देव साहेब होते.

देवसाहेबांच्या जडणघडणीत आकाशवाणीचा मोलाचा वाटा आहे. सुरुवातीला सतारवादक म्हणून रुजु झालेल्या देवांनी पेटी कधी जवळ केली हे त्यांनाच कळले नाही. आकाशवाणीवरील संगीतिका,भावसरगम सारखे भावगीतांचे कार्यक्रम,नभोनाट्यांचे पार्श्वसंगीत असे कैक प्रकार त्यांनी त्यांच्या संगीत दिग्दर्शानाच्या क्षेत्रात हाताळलेले आहेत. सुप्रसिद्ध पार्श्वगायक श्री. अरुण दाते ह्यांचे नामकरणही त्यांनी ह्याच कालावधीत केले. त्याची गंमत अशी...अरूण दाते ह्यांचे मूळ नाव अरविंद असे आहे पण ते त्या काळी ए.आर दाते ह्या नावाने गात असत आणि देवसाहेब जेव्हा दात्यांच्या घरी गेले होते तेव्हा घरातील सगळी मंडळी दात्यांना अरू,अरू असे म्हणत होती. हे ऐकून ए म्हणजे अरूण असे समजून देवांनी आकाशवाणीच्या भावसरगम कार्यक्रमात त्यांच्या नावाची घोषणा अरूण दाते अशी केली आणि तेव्हापासून अरविंद दाते संगीताच्या विश्वात अरूण दाते म्हणूनच ओळखले जाऊ लागले.

अरूण दाते
कवि मंगेश पाडगावकर,संगीतकार यशवंत देव आणि गायक अरूण दाते ही त्रिमुर्ती त्यानंतर कैक गाण्यात आपल्याला एकत्र आढळते. त्यातली काही गाणी अशी आहेत.
१)६)भातुकलीच्या खेळामधली राजा आणिक राणी
अर्ध्यावरती डाव मोडला, अधुरी एक कहाणी

२)मान वेळावुनी धुंद बोलू नको
चालताना अशी वीज तोलू नको

३)अखेरचे येतिल माझ्या हेच शब्द ओठी
लाख चुका असतिल केल्या, केली पण प्रीती
४)डोळ्यांत सांजवेळी आणू नकोस पाणी
त्या दूरच्या दिव्यांना सांगू नको कहाणी
५)दिल्याघेतल्या वचनांची शपथ तुला आहे
मनातल्या मोरपिसाची शपथ तुला आहे
६) दिवस तुझे हे फुलायचे
झोपाळ्यावाचून झुलायचे
७)धुके दाटलेले उदास उदास
मला वेढिती हे तुझे सर्व भास
८)भेट तुझी माझी स्मरते अजुन त्या दिसाची
धुंद वादळाची होती रात्र पावसाची
९)या जन्मावर, या जगण्यावर शतदा प्रेम करावे
१०)जेव्हा तिची नि माझी चोरून भेट झाली
झाली फुले कळ्यांची, झाडे भरास आली

यशवंत देवांनी सुरुवातीच्या काळात संगीताच्या शिकवण्याही केलेत. त्यामधून कितीतरी गायक-गायिका तयार झालेले आहेत. त्यापैकी एक प्रमुख नाव आहे सुमन कल्याणपुर. देवसाहेबांनी संगीत दिलेली कैक गाणी सुमनताईंनी गाऊन अजरामर केलेत.त्यातली आठवणारी ही काही गाणी.
१)मधुवंतीच्या सुरासुरांतुन आळविते मी नाम
एकदा दर्शन दे घनश्याम !
२)रात्र आहे पौर्णिमेची, तू जरा येऊन जा
जाणिवा थकल्या जिवांच्या एकदा ऐकून जा
३)श्रीरामाचे चरण धरावे
दर्शनमात्रे पावन व्हावे

देवसाहेब स्वत: जेव्हा गाण्याचे कार्यक्रम करतात तेव्हा त्यांना त्यांच्या गाजलेल्या गाण्यांबरोबरच इतर संगीतकारांची गाजलेली गाणी गाण्याचाही आग्रह होत असतो.साधारणपणे कोणताही कलाकार ही मागणी मान्य करत नसतो.पण देवसाहेब श्रोत्यांची मागणी मात्र वेगळ्या पद्धतीने पुरी करतात. ती गाणी ज्या गायक-गायिकेनी गायलेली असतात तशीच हुबेहुब ती गायली तरच लोकांना आवडतील आणि अशी गाणी आपल्या गळ्यातून तशीच्या तशी येणार नाहीत हे लक्षात घेऊन देवसाहेब इथे एक गमतीदार प्रयोग करतात आणि लोकांनाही तो आवडतोय. ते ती गाणी न गाता त्या गाण्यांचे विडंबन त्याच चालीत सादर करतात. हा प्रकारही श्रोत्यांना आवडतो. तसेच अजून एक नवा प्रकार देवसाहेबांनी सुरु केलाय तो म्हणजे समस्वरी गाणी.गाजलेल्या मूळ हिंदी-मराठी गाण्यांच्या चालींना आणि मतितार्थाला अजिबात धक्का न लावता नवीन रचना ते त्या चालीत सादर करतात. इथे आधीच रचलेल्या लोकप्रिय चालींमध्ये नेमकेपणाने काव्य रचण्याचे त्यांचे कौशल्य दिसून येते. शास्त्रीय संगीतातही त्यांनी प्रयोग करून एक नवा देवांगिनी नावाचा राग जन्माला घातलाय. ह्या रागाचा वापर त्यांनी घन:श्याम नयनी आला ह्या नाटकातील गाण्यात केलाय.

देवसाहेबांबद्दल लिहावे तेवढे थोडेच आहे. आता शरीर थकलेलं असले तरी अजूनही त्यांचे संगीतातले नवनवीन प्रयोग चालूच असतात. त्यांना ह्या कार्यात अधिकाधिक प्रयोग करता यावेत आणि आपल्याला नवनवीन रचना ऐकण्याचे भाग्य लाभावे म्हणून आपण त्यांना दीर्घायुरोग्य चिंतूया.
जीवेत शरद: शतम्‌!

सर्व माहिती,छायाचित्रे आणि दुवे महाजालावरून साभार.

२८ जून, २००८

बालपणीचा काळ सुखाचा! १३ बायमावशी!

आमच्या घरात तसे फारसे धार्मिक वातावरण नव्हते. थोडीफार पूजा-अर्चा रोज नित्यनेमाने चालत असे.पण सोवळे-ओवळे,अभिषेक किंवा जप-जाप्य असली कर्मकांडे नव्हती. एक छोटीशी फळी ठोकलेली भिंतीत(हाच देव्हारा),त्याच फळीवर एखादी तसबीर आणि समोर छोट्य़ा ताम्हणात तीन चार पितळी मूर्ती असत.त्यातील एक शंकर,दुसरा गणपती,एक कोणती तरी देवी(लक्ष्मी की पार्वती? आठवत नाही) आणि लंगडा बाळकृष्ण.पूजा आईच करायची पण कधी अडचण असली तर मग आम्हा मुलांपैकी कुणी तरी करत असू.अर्थात पूजा म्हणजे स्वच्छ फडक्याने तसबीर साफ करायची,सगळे पितळी देव पुसायचे(आठवड्या्तून एकदा त्यांना आंघोळही घातली जायची), हळद-कुंकू वाहायचे,थोडी फुले वाहायची... की झाली पूजा. हाय काय नी नाय काय.

शाळेत गीतापठण,श्लोकपठण वगैरे असल्यामुळे ते सगळे पाठ होते. संध्याकाळी इतर उजळणी बरोबर त्याचीही उजळणी व्हायची. आता माझाच विश्वास बसत नाहीये,तर तुमचा काय बसणार म्हणा,पण त्या काळात मला रामरक्षा,अथर्वशीर्ष,मनाचे श्लोक, गीतेतले २,१२ आणि १५ असे अध्याय,झालेच तर संस्कृत सुभाषिते,मोरोपंतांच्या आर्या आणि असेच काही मिळून कितीतरी गोष्टी पाठ होत्या. अगदी मधनंच कुठूनही सुरु करायला सांगितले तरी न अडता,अस्खलितपणे घडाघडा म्हणून दाखवू शकत असे, असा मी घनपाठी होतो. असो. गेले ते दिवस! आता थोड्या वेळापूर्वी काय केले हेही आठवत नाहीये. :)

मुख्य दिवाळी संपली की देवदिवाळीच्या आधी येणारे तुळशीचे लग्न आमच्या वाडीत बर्‍याच जणांकडे साजरे व्हायचे. मात्र त्यात पहिला मान ह्या बायमावशींकडच्या तुळशीच्या लग्नाचा. वाडीतल्या जवळपास सगळ्या बायका अगदी नटून थटून त्यांच्या चिल्ल्यापिल्ल्यांसह येत असत. एरवी दिवसातनं एखादेवेळ पाणी घालण्या व्यतिरिक्त ज्या तुळशीकडे फारसे लक्ष नसायचे तिला आज भलतेच महत्व यायचे. ज्या डब्यात ती तुळस लावलेली असायची(बहुदा डालडाचा डबाच असायचा)त्या डब्याला बाहेरून गेरू फासला जायचा. मग त्यावर खडूने स्वस्तिक आणि कसली कसली नक्षी काढली जायची. तुळशीला जरीच्या हिरवाकंच खणाने गुंडाळले जायचे. समोर सुगंधी उदबत्ती,धूप लावला जायचा. तुळशीचा नवरा म्हणजे लंगडा बाळकृष्ण एका ताम्हणात घालून आणलेला असायचा. मग दोघांच्या मध्ये आंतरपाट म्हणून वापरायला नवा कोरा पंचा आणलेला असायचा.हळद कुंकु,ओटीचे सामान वगैरे सगळी जय्यत तयारी झाली की मग खास मला बोलावणे पाठवले जायचे. मी म्हणजे ते लग्न लावणारा पुरोहित असायचो.

अहो आता लग्नात भटजी काय म्हणतात कुणाला कळतंय? मलाही त्यातलं काही येत नव्हतंच. तसं मी बायमावशीना सांगितलं की त्या लगेच म्हणायच्या, "मी म्हणते, लग्नात ते मेले भटजी काय म्हणतात ते त्यांचं त्यांना तरी समजतंय काऽऽऽऽय?तुला जे काय श्लोक-बिक येतात नाऽऽऽऽ ते तू म्हण. आमच्या तुळशीबायला आणि बाळक्रिष्णाला चालेऽऽल बरं का! तू काऽऽऽऽऽऽही काळजी करू नकोस. मग मी हात जोडून संध्येला म्हणतात ते (माझी नुकतीच मुंज झालेली होती) "केशवायनम:,माधवाय नम:,गोविंदायनम: इतके म्हणून सुरु करायचो. माझे बघून बायमावशी सगळ्या पोरांना हात जोडायला लावत.

रामरक्षा,मनाचे श्लोक,गीतेचे तीन अध्याय,अथर्वशीर्ष आणि अजून जे जे काही म्हणून माझे पाठ होते ते सगळे म्हणायला मला किमान एक-दीड तास लागत असे. मी जे काही म्हणत असे त्याचा अर्थ माझ्यासकट कुणालाच समजत नसे . पण मोठ्या बायकांना माझे कोण कौतुक. पोरगं काय धडाधड संस्कृत बोलतंय.त्यावेळचे त्यांच्या चेहर्‍यावरचे ते कौतुकाने ओसंडून जाणारे भाव पाहिले की मलाही मी फार मोठा पंडित असल्यासारखा वाटायचो.निदान त्या क्षणी तरी मला हवेत तरंगल्यासारखे वाटायचे.
हे सगळं झालं की अक्षता वाटल्या जायच्या. मग तुळस आणि बाळक्रिष्णाच्या मध्ये आंतरपाट धरून कुणा हौशी बाईने रचलेली मंगलाष्टकं म्हटली जायची आणि शेवटी "शुभ लग्न सावधान" च्या गजरात अक्षता टाकून हे लग्न लागायचे की तिकडे मुलांनी लक्ष्मीबारचा धुमधडाका सुरु केलेला असायचा. त्यानंतर मग आम्हा चिल्लर पिल्लर लोकांना आवडणारा खाऊ मिळायचा तो म्हणजे उसाचे कर्वे,चिंचा,बोरं,बत्तासा आणि पुन्हा नव्याने बनवलेले ताजे दिवाळीचे पदार्थ. भटजींची दक्षिणा म्हणून मला सव्वा रुपया आणि एखादे शर्टाचे कापड मिळायचे. झालंच तर काही फळंही त्या बरोबरीने असायची. हे सगळे घेऊन ऐटीत मी घरी जात असे.काही म्हणा ते क्षण अक्षरश: मंतरललेले(मंत्र म्हणायचो म्हणून असेल! ;) )होते.
बायमावशींचं माझ्या बालपणातले स्थान हे माझ्या सख्ख्या मावशांपेक्षाही जास्त जवळचे होते. ११वीत जाईपर्यंत दरवर्षी मी ह्या नाटकात सक्रीय भाग घेत होतो. त्यानंतर शिंग फुटली म्हणा किंवा मनात संकोच निर्माण व्हायला लागला....कोणतेही कारण असो. मी ह्यातनं माझं अंग काढून घेतले.
(इथे बायमावशी पुराण संपले)

२७ जून, २००८

मराठी सुगम संगीतातील नररत्ने! ३ स्नेहल भाटकर!


स्नेहल भाटकर,भाटकर बुवा,व्ही.जी.भाटकर,वासुदेव भाटकर,बी वासुदेव! एकाच माणसाची ही अनेक नावे. ज्येष्ठ-श्रेष्ठ गायक-संगीतकारांपैकी एक नाव म्हणजे आपल्या सर्वांना परिचित असलेले स्नेहल भाटकर.त्यांचे पूर्ण नाव आहे वासुदेव गंगाराम भाटकर .आकाशवाणीच्या नोकरीत राहून देखिल संगीत दिग्दर्शनाचा व्यवसाय करता यावा म्हणून शोधलेला, नियमाला बगल देणारा हा मार्ग होता. ह्यातील स्नेहलता हे त्यांच्या मुलीचे नाव.त्यातील स्नेहल घेऊन केदार शर्मा ह्यांनी सुहागरात ह्या चित्रपटाच्या वेळी त्यांचे स्नेहल भाटकर असे नव्याने बारसे केले. नोकरीत म्हणजे आकाशवाणी मध्ये ते व्ही.जी भाटकर म्हणून वावरले तर भजनी मंडळात भाटकरबुवा म्हणून वावरले. संगीतकार आणि गायक म्हणून कधी स्नेहल तर कधी वासुदेव भाटकर हे नाव घेऊन वावरले.अतिशय साध्या सरळ आणि सुश्राव्य अशा चाली देण्यात त्यांचा हातखंडा होता.

भाटकरांचे नाव उच्चारले की जुन्या मंडळींना चटकन कभी तनहाईयों मे युँ, हमारी याद आयेगी हे मुबारक बेगम च्या आवाजातील सदाबहार गीत आठवते. खरे तर हे गीत भाटकरजींना लतादीदींच्या आवाजात ध्वनीमुद्रित करायचे होते; पण ठरलेले असूनही लागोपाठ तीन दिवस लतादीदी तिथे फिरकल्याच नाहीत हे पाहून कोणतीही तक्रार न करता त्यांनी हे गाणे मुबारक बेगमच्या आवाजात ध्वनिमुद्रित केले आणि मग पुढचा त्या गाण्याने जो इतिहास घडवला तो सर्वश्रुतच आहे.

भाटकरांचा जन्म १७ जुलै १९१९ मध्ये मुंबईच्या प्रभादेवी येथे झाला.गोड गळ्याची देणगी त्यांना त्यांच्या आईकडूनच मिळाली होती. आईलाच ते आपला पहिला गुरु मानतात. त्या नंतर श्रीकृष्ण संगीत विद्यालयात त्यांनी संगीताचे शिक्षण घेतले. तसेच आजुबाजुच्या त्या परिसरात नियमितपणे भजनं चालत, त्यातही ते उत्साहाने भाग घेत आणि "ह्यातूनही आपण बरेच शिकलो" असे ते प्रांजळपणे नमूद करतात.ह्या भजनांचा परिणाम त्यांच्या संपूर्ण आयुष्यावर झालेला दिसतो की ज्यामुळे त्यांचा स्वभाव अतिशय निगर्वी आणि समाधानी झाला.कलेच्या ह्या क्षेत्रात ते अजातशत्रू राहिले ते ह्याच स्वभावामुळे. म्हणूनच आयुष्यभर त्यांनी ह्या भजनांची साथ कधीच सोडली नाही. भजनी मंडळात ते भाटकरबुवा म्हणूनच प्रसिद्ध होते.

१९३९ साली त्यांनी एचएमव्हीत पेटीवादक म्हणून नोकरी पत्करली पण पुढे आपल्या स्वत:च्या कुवतीवर ते संगीतकार म्हणून नावारुपाला आले. १९४४ च्या सुमारास बाबुराव पेंटर ह्यांच्या रुक्मिणी स्वयंवर ह्या चित्रपटाला संगीत देण्यासाठी त्यांची सुधीर फडके ह्यांच्याबरोबरीने निवड झाली आणि मग वसुदेव-सुधीर ह्या नावाने त्या चित्रपटाला त्या दोघांनी संगीत दिले.गंमत म्हणजे ह्यांतील भाटकरांनी संगीत दिलेली काही गाणी बाबुजींच्या पत्नी ललिता फडके ह्यांनी गायलेली होती.

केदार शर्मा ही व्यक्ती भाटकरबुवांच्या आयुष्यातील एक अती महत्वाची व्यक्ती होती. सुरुवातीच्या उमेदवारीच्या काळात केदार शर्मांनी बुवांना जो हात दिला त्याचा विसर कधीही पडू न देता केदार शर्मांच्या पडत्या काळातही पैसे न घेता बुवांनी त्यांच्या चित्रपटांना संगीत दिलंय.बुवांचे वैषिष्ठ्य हे की त्यांनी राज कपूरने पहिल्यांदाच नायक म्हणून काम केलेल्या नीलकमल ह्या चित्रपटातील त्याच्या तोंडच्या गाण्यासाठी आपला आवाज उसना म्हणून दिलेला आहे.ह्या चित्रपटाचे संगीतकार देखिल ते स्वत:च होते. इथे त्यांनी बी वासुदेव हे नाव धारण केलेले होते.तसेच मधुबाला,तनुजा,गीताबाली,नूतन इत्यादिंच्या चित्रपट पदार्पणातील पहिल्याच चित्रपटांना त्यांनी संगीत दिलंय.आधी नायिका म्हणून गाजलेल्या आणि नंतर निर्मात्या बनलेल्या कमळाबाई मंगरुळकर,कमला कोटणीस,शोभना समर्थ वगैरे स्त्री निर्मात्यांच्या पहिल्या चित्रपटांनाही बुवांनीच संगीत दिलंय.

नीलकमल,सुहागरात,हमारी बेटी,गुनाह,हमारी याद आयेगी,प्यासे नैन,भोला शंकर,आजकी बात,दिवाली की रात,पहला कदम इत्यादि हिंदी चित्रपटांना त्यांनी दिलेलं संगीत खूपच गाजलंय. तसेच मराठीतील रुक्मिणी स्वयंवर,चिमुकला पाहुणा,नंदकिशोर,मानला तर देव,बहकलेला ब्रह्मचारी इत्यादि चित्रपटांचे संगीतही विलक्षण गाजलंय.नंदनवन,राधामाई,भूमिकन्या सीता,बुवा तेथे बाया इत्यादि नाटकांचे संगीतही चांगलेच गाजलेय.

सी. रामचंद्र उर्फ रामचंद्र तथा अण्णा चितळकर हे बुवांचे खास मित्र होते. एकदा अण्णांनी बुवांना आयत्या वेळी बोलवून घेतले आणि त्यांच्या बरोबरीने एका कव्वालीचे ध्वनिमुद्रण केले. खरे तर ही कव्वाली अण्णा महंमद रफीच्या साथीने गाणार होते पण ऐन वेळी रफीसाहेब येऊ न शकल्यामुळे त्यांनी ती बुवांच्या साथीने गायली.ही कव्वाली संगीता चित्रपटातील आहे ज्याचे संगीत सी. रामचंद्र ह्यांचे होते. सी. रामचंद्र ह्यांच्याबरोबरच्या गमती जमती आणि अजूनही काही खास गोष्टी इथे वाचा.

भाटकर बुवांच्या संगीताने नटलेली आणि विशेष गाजलेली मराठी गाणी अशी आहेत.
१) झोंबती अंगा जललहरी,आमुची वसने दे श्रीहरी
२)तुझ्या कांतिसम रक्तपताका पूर्वदिशी फडकती
अरुण उगवला, प्रभात झाली, ऊठ महागणपती
३)दहा वीस असती त्या रे, मने उद्धवा !
एक मात्र होते ते मी दिले माधवा
४)एक एक पाउल उचली, चाल निश्चयाने
नको बावरूनि जाऊ नियतीच्या भयाने !
५) मज नकोत अश्रू घाम हवा
हा नव्या युगाचा मंत्र नवा ! गायिका: सुमन कल्याणपुर; चित्रपट : अन्नपुर्णा


६)तुजसाठी शंकरा भिल्लीण मी झाले, धुंडित तूज आले. गायिका: लता मंगेशकर; चित्रपट: चिमुकला पाहुणा
७)प्रीतीचा नव वसंत फुलला, हृदयांतरी खुलला
नव्या नवतीचा नवलाईचा, बागदिलाचा दरवळला. गायिका:लता आणि आशा भोसले; चित्रपट: या मालक

८)खेळेल का देव माझिया अंगणी ?
नांदेल का माझ्या भरल्या लोचनी ? गायिका: ज्योत्स्ना भोळे; नाटक: राधामाई

९)मानसी राजहंस पोहतो
दल दल उघडित नवनवलाने कमलवृंद पाहतो ।

१०)सुखद या सौख्याहुनि वनवास
राजगृही या सौख्य कशाचे, सौख्याचा आभास ॥ गायिका: ज्योत्स्ना भोळे; नाटक : भूमिकन्या सीता

स्वत: भाटकरबुवांनी गायलेले असंख्य अभंग आहेत.त्यातले काही चटकन आठवणारे....
१)आपुल्या माहेरा जाईन मी आता
२)काट्याच्या आणिवर वसले तीन गाव
३)जववरी रे जववरी,जंबूक करी गर्जना
४)वारियाने कुंडल हाले,डोळे मोडित राधा चाले
५)काय सांगु देवा ज्ञानोबाची ख्याती
अशा ह्या असामान्य कलाकाराचे वयाच्या ८८ व्या वर्षी २९मे २००७ रोजी निधन झाले. आज भाटकर साहेब आपल्यात नसले तरी त्यांनीच संगीतबद्ध केलेल्या गाण्यातले शब्द उसने घेऊन म्हणता येईल....
"कभी तनहाईमें तुमको हमारी याद आयेगी, अंधेरे छा रहे होंगे कि बिजली कौंध जायेगी!"

(सर्व माहिती आणि छायाचित्रं महाजालावरून साभार.)

२२ जून, २००८

मराठी सुगम संगीतातील नररत्ने! २ श्रीनिवास खळे

श्रीनिवास खळे! एक प्रसन्न आणि शांत व्यक्तिमत्व! त्याचेच प्रतिबिंब त्यांच्या संगीतात आपल्याला दिसतं!
जन्म १०जून १९२५. मुळचे बडोद्याचे. तिथल्याच सयाजीराव गायकवाड संगीत महाविद्यालयात मधुसुदन जोशी ह्यांच्याकडे गाण्याचे पहिले धडे गिरवले. त्यानंतर तिथेच आतांहुसेनखाँ,निस्सारहुसेनखाँ आणि फैयाजहुसेनखाँ सारख्या दिग्गजांकडूनही तालीम मिळाली. पुढे काही वर्षे त्यांनी बडोदा आकाशवाणीत संगीतकार म्हणून नोकरी केली.
त्यानंतर काही घरगुती अडचणीमुळे खळेसाहेब मुंबईत आले पण त्यांना काम मिळेना. ह्या काळात त्यांना त्यांच्या एका मित्राची मोलाची मदत झाली त्याच्यामुळे राहण्या-खाण्याची सोय झाली. इथेच त्यांची ओळख के.दत्ता(दत्ता कोरगावकर) ह्या संगीतकाराशी झाली. खळ्यांनी मग कोरगावकर साहेबांचे सहाय्यक संगीतकार म्हणून काम करायला सुरुवात केली.ह्याच काळात काही चित्रपटाच्या संगीत दिग्दर्शनाच्या स्वतंत्र संधी त्यांच्याकडे चालून आल्या, मात्र ते चित्रपट कधीच पूर्ण झाले नाहीत आणि खळे साहेबांचे सगळे कष्ट पाण्यात गेले. त्यामुळे त्यांना विलक्षण नैराश्य आले होते. आपल्या जवळची बाजाची पेटी विकून टाकून संगीताला रामराम ठोकावा आणि काही तरी दुसराच नोकरीधंदा शोधावा अशा टोकाच्या निर्णयाप्रत ते आले होते. पण अशा वेळी त्यांच्या पत्नीने त्यांना धीर दिला आणि ह्या प्रसंगातून त्यांना सुखरुप बाहेर काढले.

'गोरी गोरी पान'च्या ध्वनीमुद्रणप्रसंगी खळे साहेब,आशा भोसले आणि वाद्यवृंद

१९५२ साली त्यांची पहिली तबकडी प्रसिद्ध झाली. त्याच्या एका बाजुला होते गोरी गोरी पान,फुलासारखी छान आणि दुसर्‍या बाजुला होते एका तळ्यात होती बदके पिले सुरेख . ह्या दोन्ही रचना ग.दि माडगुळकर ह्यांच्या होत्या. मुळात ह्या रचना लक्ष्मीपूजन ह्या चित्रपटासाठी होत्या.पण ऐन वेळी हा चित्रपट मुळ निर्मात्याऐवजी दुसर्‍याच एका निर्मात्याने बनवून त्यात संगीतकार म्हणून खळ्यांना घेतलेच नाही.पण खळ्यांनी लावलेल्या ह्या गीतांच्या चाली गदिमांना इतक्या आवडल्या होत्या की त्यांनी त्यांची एचएमव्ही कडून एक वेगळी तबकडी बनवून घेतली. ह्या दोन्ही गाण्यांनी खळ्यांना खर्‍या अर्थाने प्रसिद्धी दिली आणि मग खळे एक संगीतकार म्हणून मान्यता पावले.ह्या गाण्यांसंबंधीची खरी हकीकत खुद्द खळेसाहेबांच्या शब्दात वाचा.

१मे १९६० हा महाराष्ट्र राज्य स्थापनेचा दिवस. ह्यासाठी खास राजा बढेंनी दोन महाराष्ट्रगीतं लिहिली. त्यापैकी एक म्हणजे जय जय महाराष्ट्र माझा,गर्जा महाराष्ट्र माझा हे गीत..जे गायलंय शाहीर साबळे ह्यांनी आणि खळे साहेबांनी त्याची चाल बांधलीय. आजही हे महाराष्ट्र गीत अतिशय लोकप्रिय आहे. ही पावती जितकी राजा बढे ह्यांच्या काव्याला,शाहीरांच्या गायनाला आहे तितकीच ती खळेसाहेबांच्या संगीताला देखिल आहे हे निश्चित. दुसरे महाराष्ट्र गीत म्हणजे महाराष्ट्र जय,महाराष्ट्र जय,जय जय राष्ट्र महान, हे देखिल खूपच गाजले.

खळे साहेबांनी फारच मोजक्या चित्रपटांना संगीत दिलंय..त्याचे कारण म्हणजे तडजोड करणे त्यांच्या स्वभावात नाही. भारंभार पैसे मिळताहेत म्हणून कोणतेही काम त्यांनी कधी स्वीकारले नाही. स्वत:च्या मनाला आनंद देईल अशाच चालींची त्यांनी निर्मिती केली. मागणी तसा पुरवठा हे तत्वच त्यांना मान्य नाही. त्यामुळे कैक चित्रपटांचे प्रस्ताव त्यांनी फेटाळून लावलेत.
यंदा कर्तव्य आहे,बोलकी बाहुली,जिव्हाळा,पोरकी,सोबती,पळसाला पाने तीन अशा काही मोजक्याच चित्रपटांना त्यांनी संगीत दिलंय. ह्या चित्रपटांतील गाजलेली गाणी म्हणजे...बोलकी बाहुलीतली १)सांग मला रे सांग मला,आई आणखी बाबा यातुन कोण आवडे अधिक तुला,२)देवा दया तुझी की ही शुद्ध दैवलीला, जिव्हाळातले १)लळा जिव्हाळा शब्दच खोटे,२)प्रिया तुज काय दिसे स्वप्नात आणि ३)या चिमण्यांनो परत फिरा रे ४)चंदाराणी का गं दिसतेस थकल्यावाणी ही गाणी कोण विसरू शकेल?

खळे साहेबांनी मोजक्याच चित्रपटांना संगीत दिलेलं असलं तरी भावगीत-भक्तिगीत हे प्रकार भरपूर हाताळलेत.
खळेसाहेबांच्या संगीत दिग्दर्शनाखाली जवळ जवळ ८०हून जास्त गायक गायिकांनी गाणी गायलेली आहेत.पंडित भीमसेनजी,बाबुजी,वसंतराव,लतादीदी,आशाताई,सुमनताई,माणिक वर्मा,सुलोचना चव्हाण वगैरे सारख्या दिग्गजांपासून ते हृदयनाथ,उषा मंगेशकर, अरूण दाते,सुधा मल्होत्रा,सुरेश वाडकर,देवकी पंडीत,कविता कृष्णमुर्ती,शंकर महादेवन पर्यंत कैक नामवंतांनी खळे साहेबांची गाणी गायलेली आहेत.ह्या गायक-गायिकांनी गायलेल्या गीतांचा नुसता उल्लेख करायचा म्हटला तरी पानेच्या पाने भरतील.
लतादीदींनी गायलेले १)भेटी लागी जीवा अथवा २)वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरेसारखे तुकारामाचे अभंग असोत अथवा १)नीज माझ्या नंदलाला २)श्रावणात घननीळा बरसला सारखी पाडगावकरांची भावगीते असोत; भीमसेनांनी गायलेले १)सावळे सुंदर रूप मनोहर २)राजस सुकुमार मदनाचा पुतळा सारखे अभंग असोत अथवा बाबूजींनी गायलेले लळा जिव्हाळा शब्दच खोटे असो; वसंतरावांनी गायलेले १)बगळ्यांची माळफुले २)राहिले ओठातल्या ओठात वेडे असो;आशाताईंनी गायलेली १)कंठातच रुतल्या ताना २)टप्‌ टप्‌ टप्‌ टप्‌ काय बाहेर वाजतंयअसोत; अशी शेकडोंनी गाणी आपण सहज आठवू शकतो.
सहज आठवणारी आणखी काही गाणी आणि गायक-गायिका
१)हृदयनाथ मंगेशकर........ १)वेगवेगळी फुले उमलली २) लाजून हासणे अन्‌
२)अरुण दाते/सुधा मल्होत्रा.... १) शुक्रतारा मंद वारा २)हात तुझा हातातून धुंद ही हवा
३) सुरेश वाडकर.......... १)धरिला वृथा छंद २)जेव्हा तुझ्या बटांना
४)सुमन कल्याणपूर......... १)उतरली सांज ही धरेवरी २)बोलून प्रेमबोल तू लाविलास छंद
अशा तर्‍हेची एकाहून एक श्रवणीय कितीही गाणी आठवली तरी ती कमीच.

१९६८ सालापासून खळे साहेबांनी एचएमव्ही मध्ये संगीतकार म्हणून नोकरी सुरु केली. त्यानंतर त्यांनी संत तुकारामाचे अभंग लतादीदींकडून गाऊन घेतले. पंडित भीमसेनांकडून अभंगवाणी गाऊन घेतली. राम-श्याम गुणगान नावाने काही भक्तिगीतांची तबकडी काढली... त्यात लतादीदी आणि पंडित भीमसेनजी ह्यांच्याकडून गाऊन घेतले.सुरेश वाडकर,कविता कृष्णमुर्ती,वीणा सहस्रबुद्धे,उल्हास कशाळकर अशा अजून कितीतरी कलाकारांकडून त्यांनी गाऊन घेतलेल्या गाण्यांच्या तबकड्या बनलेल्या आहेत.

राम-श्याम गुणगानच्या वेळी पंडित भीमसेन आणि लतादीदींना चाल गाऊन दाखवताना खळेसाहेब.

खळे साहेबांनी दिलेल्या चाली वरवर जरी सोप्या वाटल्या तरी त्या गाताना विशेष श्रम घ्यावे लागतात.स्वर आणि लय सांभाळताना भल्याभल्यांना कठीण जातं. त्याबद्दल बाबुजी म्हणतात की खळे साहेबांच्या काही गाण्यातल्या जागा आपल्याला कधीच जमणार नाहीत.बाबुजींसारख्या सिद्धहस्त गायक-संगीतकाराने असे म्हटल्यावर अजून कोणते वेगळे शिफारसपत्र हवे?

आयुष्यभर केलेल्या खडतर वाटचालीमुळे आणि वेळोवेळी आलेल्या आजारपणांमुळे आज वयाच्या ८३व्या वर्षी खळे साहेब शरीराने खूपच थकलेत. हात थरथर कापतात म्हणून लिहिता येत नाही अशी परिस्थिती आहे;पण पेटी समोर येताच सगळी थरथर थांबते आणि आपले आजारपण विसरून खळे साहेब संगीताच्या विश्वात रंगून जातात.आजही त्यांची संगीतसाधना अव्याहतपणे सुरु आहे.अशा ह्या महान संगीतसाधकाला आपण दीर्घायुरोग्य चिंतुया!

सर्व माहिती आणि छायाचित्रे महाजालावरून साभार!

१८ जून, २००८

मराठी सुगम संगीतातील नररत्ने! १...सुधीर फडके!




मराठी सुगम संगीताचा विषय निघाला की सर्वप्रथम जे नाव ओठावर येते ते म्हणजे सुधीर फडके ह्यांचे! गायक आणि संगीत दिग्दर्शक म्हणून त्यांची कारकीर्द विलक्षण गाजली. संगीत जगतात ते बाबुजी ह्या टोपण नावाने ओळखले जातात. तेव्हा बाबूजींच्या संगीत प्रवासाचा थोडक्यात परिचय करून घेऊ या.

२५ जुलै १९१९ रोजी कोल्हापुरात जन्म झाला. सुधीर फडके ह्यांचे मूळ नाव रामचंद्र विनायक फडके. वयाच्या सातव्या वर्षापासून वामनराव पाध्ये ह्यांच्याकडून संगीत शिकायला सुरुवात केली. साधारण १९२९ मध्ये शालेय शिक्षण आणि पुढील संगीत शिक्षणासाठी बाबुजी मुंबईत आले. त्याच वेळी मुंबईतल्या सरस्वती संगीत विद्यालयातर्फे झालेल्या अभिजात संगीत स्पर्धेत बाबूजींनी पहिला क्रमांक पटकावला.

१९३४ मध्ये बाबुजी पुन्हा कोल्हापुरला गेले आणि तिथे त्यांनी श्रीकृष्ण संगीत विद्यालयात गायन-शिक्षक म्हणून नोकरी पत्करली. ह्या संगीत विद्यालयाचे प्रमुख होते श्री. न. ना. देशपांडे. ह्या विद्यालयातर्फे दरवर्षी एक मेळा आयोजित केला जायचा. त्यात सादर होणार्‍या गाण्यांचे संगीत दिग्दर्शन करण्याची जबाबदारी बाबूजींवर पडली. न. ना. देशपांड्यांनी बाबूजींचे रामचंद्र नाव बदलून सुधीर असे नामकरण केले. इथूनच पुढे ते संगीतकार आणि गायक सुधीर फडके म्हणून ओळखले जाऊ लागले.

पुढे त्यांचा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंध आला. संघाचा एक प्रचारक म्हणून बाबुजीं बर्‍याच ठिकाणी हिंडले.मधल्या काळात त्यांचे वडिल निवर्तले. त्यामुळे कुटुंबाच्या चरितार्थासाठी त्यांना अर्थप्राप्ती करणे भाग पडले. ह्या काळात त्यांची झालेली जेवणा-खाणाची परवड, प्रकृतीची आबाळ, त्यातून उद्भवलेली क्षयरोगासारखी आजारपणं हा त्यांच्या जीवनातला अक्षरश: खडतर काळ होता. पुढे गावोगाव वणवण फिरत गायनाचे कार्यक्रम करत, मिळेल ती बिदागी स्वीकारून बाबूजींनी महाराष्ट्र, मध्यप्रदेश, बिहार, कलकत्ता, दिल्ली, राजस्थान, पंजाब पर्यंत धडक मारली. ठिकठिकाणी गाण्याचे कार्यक्रम करत असतानाच तिथल्या स्थानिक गायक-गायिकांचे गाणेही ते आवर्जून ऐकत. त्यातून प्रेरणा घेऊन आपल्या गाण्यातही तो ढंग आणण्याचा ते प्रयत्न करत. ह्या अशा ठिकाणी फिरत असताना गया येथल्या एका मंदिरात बाबूजींनी सादर केलेल्या गायनाने प्रभावित होऊन तिथल्या मुख्य पुजार्‍याने देवीच्या गळ्यातला हार बाबूजींना घालून त्यांचे कौतुक केले आणि इथून मग बाबूजींनी कधीच मागे फिरून पाहिले नाही. त्यांचा संगीताच्या अश्वमेधाचा वारू चौखूर उधळला आणि त्याने अवघा भारत आपलासा केला.

त्यानंतर बाबूजींना प्रभात कंपनीकडून संगीत दिग्दर्शनाची संधी मिळाली आणि बाबूजींनी तिचे सोने केले. १९४६ साली गोकुल ह्या चित्रपटाचे संगीत त्यांनी केले. त्यानंतर मग एका पाठोपाठ रुक्मिणी स्वयंवर, आगे बढो, सीता स्वयंवर, अपराधी इत्यादी चित्रपटांना सुमधुर संगीत देऊन प्रभातच्या गोविंदराव टेंबे, केशवराव भोळे आणि मास्तर कृष्णराव फुलंब्रीकर इत्यादी नामांकित संगीतकाराची परंपरा त्यांनी समर्थपणे पुढे चालवली.

बालगंधर्व आणि गानहिरा हिराबाई बडोदेकर हे बाबूजींचे गायनातील आदर्श होते. ह्या दोघांच्या गाण्याचा अतिशय बारकाईने अभ्यास करून बाबूजींनी त्यांचे गुण एकलव्याच्या निष्ठेने आत्मसात केले.त्याचाच परिणाम म्हणून कोमल तरीही सुस्पष्ट शब्दोच्चार, सूर आणि तालावरील हुकमत आणि शब्दांना न्याय देणार्‍या चाली ही बाबूजींची काही ठळक वैशिष्ट्ये आपल्याला त्यांच्या गाण्यात आणि संगीत दिग्दर्शनात दिसून येतात.

गीत-रामायण आणि गदिमा-बाबुजी हे एक अतूट असे समीकरण होऊन बसलेय. आधुनिक वाल्मिकी असे आपण ज्यांना म्हणतो त्या कविश्रेष्ठ ग. दि. माडगुळकरांनी गीतांतून रामायण कथन केले आणि बाबूजींनी त्या गीतांना उत्तमोत्तम चाली लावून श्रोत्यांसमोर ते साक्षात उभारले. नुसती ही कामगिरी जरी जमेस धरली तरी बाबूजींचे संगीत अजरामर आहे हे आपल्या लक्षात येईल.

बाबूजींनी चित्रपटसंगीत, भावगीत, भक्तिगीत, लावणी, लोकगीतं, भारूड असे कितीतरी गायनप्रकार एक गायक आणि संगीतकार म्हणून समर्थपणे हाताळलेले आहेत. वंदे मातरम्, हा माझा मार्ग एकला, लाखाची गोष्ट, जगाच्या पाठीवर, सुवासिनी, प्रपंच, मुंबईचा जावई, झाला महार पंढरीनाथ, चंद्र होता साक्षीला ह्या आणि अशा कैक चित्रपटांना त्यांनी दिलेले संगीत गाजलंय.
बाबुजींनी संगीत दिलेल्या मालती-माधव ह्या हिंदी चित्रपटातील लताबाईंनी गायलेली ही दोन गाणी ऐका. मन सौंप दिया अनजाने में आणि कोई बना आज अपना

ज्योतीकलश छलके ह्या लतादीदींनी गायलेल्या हिंदी गीताचे संगीतकार होते बाबुजी आणि त्यासाठी त्यांना सुरसिंगारचा पुरस्कार प्राप्त झाला होता. अशाच तर्‍हेचे अनेक मानसन्मान त्यांना वेळोवेळी प्राप्त झाले होते त्यापैकी एक होता.. संगीत नाटक अकादमी पुरस्कार.

तुझे गीत गाण्यासाठी सूर लावू दे, अशी पाखरे येती, अंतरीच्या गुढगर्भी, कधी बहर कधी शिशिर, दिसलीस तू फुलले ऋतू.... अशी कितीऽऽतरी भावगीते आपल्या सुमधुर आवाजाने बाबूजींनी अजरामर करून ठेवलेत.


बाबुजी जसे उत्तम संगीतकार होते तसेच ते एक उत्तम गायकही होते. बाबूजींनी इतर संगीतकारांचीही गाणी गायलेत. त्यात यशवंत देव, श्रीनिवास खळे, दत्ता डावजेकर, राम फाटक, राम कदम ह्यांच्यासारख्या अनेक जुन्या-जाणत्या संगीतकारांपासून ते हल्लीच्या संगीतकारांपैकी त्यांचेच चिरंजीव श्रीधर फडके, अनिल-अरुण अशांचीही गाणी तितक्याच तन्मयतेने गायलेली आहेत.
बाबूजींचा एक विलक्षण गुण असा आहे की ते जेव्हा इतरांच्या संगीत दिग्दर्शनाखाली गातात तेव्हा त्या संगीतकाराला अपेक्षित असलेल्या अगदी बारीक सारीक जागादेखील आपल्या गळ्यांतून निघत नाहीत तोवर समाधान मानत नाहीत. त्यासाठी लागेल तितका वेळ देण्याची आणि मेहनत करण्याची त्यांची तयारी असते.

बाबुजी जसे थोर गायक आणि संगीतकार होते तसेच कट्टर हिंदुत्ववादी आणि देशभक्त होते. गोवा मुक्ती आंदोलनात त्यांनी सशस्त्र भाग घेतलेला होता. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर हे त्यांचे प्रेरणास्थान होते. त्यांच्यावरचा चित्रपट बनवण्यासाठी बाबूजींनी गीतरामायणाच्या कार्यक्रमांचा धडाका लावून लोकवर्गणी जमवली आणि निष्ठेने स्वातंत्र्यवीर सावरकर हा चित्रपट पूर्ण केला. ह्या दरम्यान बाबुजी खूप आजारी पडले होते; पण त्यांनी प्रतिज्ञा केली होती की हा चित्रपट पूर्ण केल्याशिवाय मी मरण पत्करणार नाही आणि ती त्यांनी जिद्दीने खरी करून दाखवली. ह्या चित्रपटाच्या प्रकाशनानंतर काही दिवसातच म्हणजे २९जुलै २००२ रोजी त्यांचे देहावसान झाले.

आज बाबुजी जरी देहाने आपल्यात नसले तरी त्यांचे सूर आपल्या सोबत अखंड राहणार आहेत. त्यांनीच गायलेल्या एका गीताचा आधार घेऊन म्हणता येईल.....

अशी पाखरे येती आणिक स्मृती ठेवूनी जाती
दोन दिसांची रंगत संगत दोन दिसांची नाती॥

कुठे कुणाच्या घडल्या भेटी
गीत एक मोहरले ओठी
त्या जुळल्या हृदयांची गाथा सूर अजूनही गाती ॥

(सर्व माहिती आणि छायाचित्र महाजालावरून साभार!)

१५ जून, २००८

पंडित जितेंद्र अभिषेकी!

पंडित जितेंद्र अभिषेकी! हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतातले एक प्रमुख व्यक्तीमत्व. आवाजाची उपजत देणगी नसली तरी परिश्रमाने त्यावर मात करून ग्वाल्हेर,आग्रा आणि जयपूर अशा तीन विविध घराण्याची गायकी पचवलेल्या पंडितजींनी त्यातून स्वत:ची अशी एक वेगळी गायकी परंपरा निर्माण केली. अभिषेकी बुवा म्हणूनच ते जास्त प्रसिद्ध आहेत! गोव्यातल्या मंगेशी इथला जन्म. वडिल कीर्तनकार.इथेच,वडिलांकडेच त्यांचे संगीताचे आद्य शिक्षण झाले. त्यांनतर उस्ताद अझमत हुसेन खाँ,गिरिजाबाई केळकर,जगन्नाथबुवा पुरोहित आणि गुलुभाई जसदनवाला अशा विविध घराण्याच्या दिग्गजांकडे पुढचे धडे गिरवले. तसेच काही अनवट रागांची दिक्षा खुद्द बडे गुलाम अली खाँ ह्यांच्याकडूनही मिळाली.
आपण सामान्य रसिक अभिषेकींना एक शास्त्रीय गायक म्हणून ओळखण्याऐवजी ऐवजी एक समर्थ संगीतकार म्हणून जास्त ओळखतो.मत्स्यगंधा,ययाति आणि देवयानी,कट्यार काळजात घुसली वगैरे नाटकातल्या पदांना त्यांनी दिलेल्या चाली विलक्षण गाजल्या. काटा रुते कुणाला,सर्वात्मका-सर्वेश्वरा वगैरे सारखी त्यांनी गायलेली कैक गीतेही ज्याच्या त्याच्या ओठी आजही आहेत.



तंबोरा जुळवण्यात तल्लीन.






गानमग्न अवस्थेतील काही भावमुद्रा!




मैफिलीतले अभिषेकी बुवा!
सर्वात्मका सर्वेश्वरा ऐका आणि पाहा.

सर्व छायाचित्रं जितेंद्र अभिषेकी.कॉम वरून साभार!

१३ जून, २००८

पंडित मल्लिकार्जून मन्सूर!

ग्वाल्हेर-जयपूर घराण्याचे बुजुर्ग गायक पंडित मल्लिकार्जून मन्सूर,एक संगीत पंढरीचा वारकरी. ग्वाल्हेर घराण्याचे प्रख्यात गायक बाळकृष्णबुवा इचलकरंजीकरांचे पट्टशिष्य नीळकंठबुवा जंगम हे मन्सूर ह्यांचे आद्य गुरु. पुढे त्यांनी जयपूर घराण्याचे गायक संगीत-सम्राट अल्लादियाखाँ साहेब ह्यांचे सुपुत्र मंजीखाँ आणि भुर्जीखाँ ह्या दोघांच्याकडूनही तालीम घेतली.जवळ जवळ ६० वर्षे ते अव्याहतपणे गात होते.

ऐन तारुण्यातले मन्सूर!







ब्रह्मानंदी लागली टाळी.


मैफिलीतले मन्सूर.

मन्सुरांच्या गाण्याची झलक इथे ऐका आणि पाहा.

सर्व छायाचित्रं महाजालावरून साभार.

११ जून, २००८

पुलंदर्शन!

आज १२ जून. आज पुलंचा स्मृतीदिन. पुलंच्या काही भावमुद्रा इथे देण्याचा मोह होत आहे.








साहित्य साधनेत मग्न!


पहिल्या चित्रात पंडित भीमसेनांबरोबर आणि दुसर्‍या छायाचित्रात पंडितजींना पेटीवर साथ करताना.

पु.ल.देशपांडे! महाराष्ट्राला पडलेलं एक हसरं स्वप्न! ह्या माणसाने निर्विष विनोदाने कोट्यावधी मराठी लोकांच्या हृदयात कायमचे स्थान मिळवलेले आहे. पुलं ची रुपेही अनेक. साहित्यिक पुलं,संगीतकार-गायक पुलं,नाटककार,नट,पटकथाकार,दिग्दर्शक अशा कितीतरी वेगवेगळ्या भूमिका जगून ह्या माणसाने मराठी माणसाचे सांस्कृतिक आयुष्य समृद्ध करून टाकलंय.
पुलंचे लेखन इतके सर्वव्यापी आहे की व्यवहारात त्या त्या प्रसंगाला अनुरुप अशी त्यांच्या लेखनातील वाक्ये आपल्याला आठवत असतात आणि त्या प्रसंगातही आपण रमतो असा माझा अनुभव आहे.

पुलंच्या पुण्यस्मृतीला माझी विनम्र आदरांजली.

पुलंची सर्व छायाचित्रे पुलंदेशपांडे.नेट वरून साभार

७ जून, २००८

बासरीवादक पंडित हरिप्रसाद चौरसिया!

पंडित हरिप्रसाद चौरसिया. प्राथमिक गायनाचे धडे वाराणसीच्या पंडित राजाराम ह्यांच्याकडे. त्यानंतर बासरीने त्यांना वेडं लावलं म्हणून बासरीवादनाचे धडे पंडित भोलानाथ ह्यांच्याकडून घेतले. १९व्या वर्षी आकाशवाणी च्या कटक केंद्रात बासरीवादक म्हणून नोकरी. पाच वर्षांनंतर तिथून मुंबई आकाशवाणीत बदली. त्यानंतरचे सर्व शिक्षण उस्ताद अल्लाउद्दीन खाँ(मैहर घराणे) ह्यांची कन्या श्रीमती अन्नपुर्णा देवी ह्यांच्याकडून घेतले.


१९५०च्या सुमारास अहमदाबाद येथील मिलन मिल्समध्ये स्टेनोग्राफर असताना.


कसून केलेला रियाज़!सोबत पत्नी अनुराधा.

ओरिसातील कटक आकाशवाणीवर वाद्यवृंद संचालन करताना.

आकाशवाणीचे तीन शिलेदार. गिटारवादक ब्रिजभूषण काब्रा,संतुरवादक शिवकुमार शर्मा आणि पंडित हरिप्रसाद.


विख्यात सतारवादक पंडित रविशंकर आणि विख्यात संतुरवादक पंडित शिवकुमार शर्मांसोबत

ध्वनिमुद्रणाप्रसंगी तबलानवाज़ झाकिर हुसेन आणि पंडित हरिप्रसाद

घट्ट मित्र: शिव-हरि. ह्याच नावाने चित्रपटांना संगीत दिलंय.



तिरुपती बालाजी मंदिरात गानकोकिळा लता मंगेशकर,उषा मंगेशकरांसोबत.

जन्माष्टमी साजरी करताना


मैफ़ल सजवताना. सोबत तानपुर्‍यावर पत्नी अनुराधा







वादनात तल्लीन!