माझ्या आयुष्यातील आजवरच्या कडू-गोड आठवणी मी "पूर्वानुभव" म्हणून सादर करत आहे.
आपण इथे आल्याबद्दल मन:पूर्वक धन्यवाद!

२८ एप्रिल, २००७

माझ्या 'बुध्दीचे बळ'!३

पहिला डाव हरलो तरी माझ्या स्वभावगुणधर्मामुळे त्याचे विशेष असे काही वाटले नाही. क्षणभर निराश झालो(नाही कसा?);पण लगेच दुसर्‍या दिवशीच्या डावाचा विचार सुरू केला.

बुद्धिबळ ह्या खेळात पण काही तांत्रिक गोष्टी माहीत असणे जरूरीचे असते. तज्ञांच्या मते त्यात डावाचा आरंभ(ओपनिंग गेम),खेळाचा मधला भाग(मिडल गेम) आणि शेवट(एंड गेम) असे खास भाग असतात आणि त्या त्या प्रसंगी खेळी करण्याच्याही पद्धती खासच असतात. खेळातील ह्या तांत्रिक गोष्टी माहीत करून घेतल्याशिवाय कुणालाही चांगला खेळ करता येत नाही.आता असली कोणतीच तंत्र माहीत नसलेले आम्ही दोघे तिथे आमच्यापेक्षा तयारीच्या खेळाडूंशी सामना द्यायला उतरलो होतो म्हणजे एक प्रकारे हाराकिरि करण्याचाच प्रकार होता. हे म्हणजे कसे होते माहीत आहे का? तर अत्याधुनिक शस्त्रास्त्र घेऊन लढणार्‍या एखाद्या योद्ध्याशी हातात एखादी काठी घेऊन लढण्यासारखे होते; पण आम्हाला असल्या गोष्टींची फिकीर नव्हती. कारण आम्ही तिथे जिंकणे शक्य नसले तरी विविध खेळाडूंचा आणि त्यांच्या खेळण्याच्या पद्धतींचा अभ्यास करता येईल ह्या मर्यादित हेतूने गेलो होतो. तेव्हा अशा हरण्याची पर्वा कुणाला?

माझा दुसरा डाव मी अगदी सहजपणाने हरलो. अगदी माझ्या पांढर्‍या सोंगट्या असूनही! प्रतिस्पर्धी इतका तयारीचा होता की त्याने मला माझा खेळ खेळूच दिला नाही. त्याच्या चालीच अशा होत्या की तो मला खेळवत गेला आणि शेवटी अतिशय मानहानी कारक पद्धतीने त्याने माझ्या राजाला एकाकी खिंडीत गाठले. माझा वजीर,दोन हत्ती,एकेक घोडा आणि उंट,सहा प्यादी एवढे सगळे असूनही ते राजाच्या मदतीला येऊच शकले नाहीत. अशा तर्‍हेने दोन डावात हार झाल्य़ानंतर पुढे काय वाढून ठेवलेय ह्याची साधारण कल्पना आलेलीच होती. तिथे माझ्या भावाने दुसरा डाव बरोबरीत सोडवला होता. त्याचे आता १.५ आणि माझे ० गुण झाले होते.

तिसर्‍या फेरीत मात्र मी असा काही खेळ केला की समोरचा भांबावूनच गेला(बहुधा तो माझ्यापेक्षाही कच्चा असावा!). पहिल्या काही खेळीतच मी त्याचा वजीर मारला आणि त्याने हताशपणे पराभव मान्य केला. त्याच्या जागी मी असतो तर अजून खेळायचा प्रयत्न केला असता;पण त्याने हातपायच गाळले होते. अशा तर्‍हेने ह्या स्पर्धेतला माझा पहिला विजय नोंदवला गेला. ह्या विजयाचा परिणाम म्हणा की अजून काही म्हणा मी पुढचे दोन डावही प्रतिस्पर्ध्यांची चिवट लढत मोडून काढत जिंकले आणि पाच डावात लागोपाठ तीन विजय मिळवत तीन गुणांची कमाई करून स्पर्धेत एकदम खळबळ उडवून दिली.तिथे माझ्या भावाने एक हार,दोन जीत आणि दोन बरोबरी करून एकूण पाच डावात ३गुणांची कमाई केली. आता आम्ही दोघेही समान गुणसंख्येवर आलो होतो.

ह्या स्पर्धेतल्या खेळाडूंचा मला आता जरा कुठे अंदाज यायला लागला होता. साधारणपणे माझा खेळ हा हाराकिरीचा(दे धडक बेधडक) म्हणता येईल अशा पद्धतीचा होता . शास्त्रशुद्ध पद्धतीने खेळणार्‍या तिथल्या खेळाडूंना माझ्या ह्या(अपारंपारिक) सुरुवातीच्या खेळी बुचकळ्यांत टाकत. कारण त्या पुस्तकातील आदर्श खेळीप्रमाणे नसत.(आठवा! धोनी अथवा सेहवागचे फटके! धावा होण्याशी मतलब!)खरे तर मलाही नेमके माहीत नव्हते की मी त्या खेळी का करत असे? म्हणजे प्रतिस्पर्ध्याच्या खेळीचा अंदाज घेऊन अथवा त्यामागचे कारण लक्षात घेऊन खेळ खेळायचा असतो ना! खरे तर हेच सूत्र आहे बुद्धिबळाचे;पण मी माझ्या स्वत:च्याच मनसुब्यात रमलेला असे आणि त्यामुळे माझ्या खेळी ह्या प्रतिस्पर्ध्याच्या खेळींना पूरक अथवा मारक अशा ठरत नसत. अशामुळे समोरच्याला माझ्या खेळीचा अंदाजच लागत नसे आणि मी मात्र त्याच्या ह्या परिस्थितीचा फायदा घेत घेत माझे घोडे,वजीर आणि हत्ती असे नाचवत असे की त्याच्या सैन्याची अवस्था अगदी खिळखिळी होऊन जाई. ह्यातून तो जर बचावला तर मात्र माझी खैर नसायची. कारण त्याची अशी दैना करण्यासाठी मी माझे महत्त्वाचे मोहरे बळी दिलेले असत('गँबीट' की काय म्हणतात ना? तसे!) आणि स्वत:च्या राजाचे संरक्षण करण्यासाठी कुणीच शिल्लक नसे. राजाला किल्ल्यात(कॅसलिंग)सुरक्षित ठेवणे वगैरे माहित असूनही कधी करत नसायचो.

म्हणजे खर्‍या अर्थाने आरंभ,मध्य आणि शेवट ह्या खेळातील तीन तंत्रांची माहिती नसताना मी माझ्या पद्धतीने जिंकलेले ते तीन लागोपाठचे डाव बघून मी तिथल्या तज्ञ मंडळींच्या कुतूहलाचा विषय ठरलो. त्याकाळी राष्ट्रीय 'अ' स्पर्धेत खेळणारे अतिशय सुप्रसिद्ध आणि बुजुर्ग खेळाडू होते ते म्हणजे सर्वश्री.रामचंद्र सप्रे,मोहन बाबूर आणि मॅन्युअल एरॉन. ह्यापैकी श्री.मोहन बाबूर ह्यांच्या संपर्कात मी माझ्या ह्या धमाक्यामुळे आलो. मी मालाडला राहायचो आणि बाबूर कांदिवलीला राहत. आमची स्पर्धा बघायला आणि त्यावर देखरेख ठेवायला ते नियमित येत असत. ज्यांचे नाव आजपर्यंत वर्तमानपत्रात वाचत होतो त्या श्री. बाबूरना ह्या आधी प्रत्यक्ष कधीच पाहिलेले नसल्यामुळे आधी ओळखले नव्हते. पण त्या तीन डावांनंतर अचानक त्यांच्याशी ओळख झाली आणि मग आम्ही घरी जाताना एकत्रच जाऊ लागलो. त्यांच्याकडून चार युक्तीच्या गोष्टीही शिकायला मिळाल्या.
अजून चार फेर्‍या बाकी होत्या! आता त्यात ह्या युक्त्यांचा किती फायदा करून घ्यायचा हे आमच्या 'बुद्धीच्या बळावर' अवलंबून होते.

क्रमश:

२४ एप्रिल, २००७

माझ्या 'बुध्दीचे बळ'! २

बुद्धिबळ हा असा एक खेळ आहे की एकदा का कुणी त्याच्या फंदात पडला ना की मग त्याच्याशिवाय त्याला दुसरे काहीच सुचत नाही. इतर गोष्टी करत असतानाही आपण त्याआधी खेळलेला डाव जसाच्या तसा मनाच्या एका कोपर्‍यात मांडलेला असतो आणि त्यात अमुक एक खेळी केली होती त्याऐवजी दुसरी एखादी खेळी केली असती तर.... वगैरे वगैरे गोष्टींचे रवंथ चालूच असते. हा खेळ एखाद्याला वेडही लावू शकतो.

आम्हा तिघाही भावांचे असेच झाले होते. उठता-बसता,खाता-पिता,झोपेतही ह्याच गोष्टीने पछाडल्यासारखे आम्ही त्या वेळी वागत होतो. जरा मोकळा वेळ मिळाला की डाव मांडलाच म्हणून समजा आणि मग तासंतास त्यात डोकी घासत बसायचो. हरणारा चिडायचा,जिंकणारा हसायचा आणि मग चिडवाचिडवी,त्यावरून मारामार्‍या. आव्हानं-प्रतिआव्हानं! असं सगळं वातावरण भारलेले होते.तसा मी जात्याच कोणताही खेळ ईर्ष्येने खेळणार्‍यांपैकी नव्हतो आणि आजही नाही. खेळाचा आनंद लुटायचा हा माझा स्वभाव. त्यामुळे जिंकण्याचे सोयर नसायचे आणि हरण्याचे सुतक नसायचे. त्या मानाने माझे दोघे भाऊ जास्त जिद्दीने खेळायचे. त्यातल्या त्यात लहान भाऊ तर जिंकण्याच्या ईर्ष्येनेच खेळायचा आणि जिंकायचाही! आणि जिंकला की मग खूपच मोठमोठ्याने आनंद व्यक्त करायचा;पण कधी कधी हरायचाही की मग भांडाभांडीला तयार असायचा. त्यामुळे मग घरातले वातावरण एकदम गरम व्हायचे. आई अशावेळी आमच्या सोंगट्या आणि पट काढून घेत असे आणि आम्हाला तिघांना तीन वेगवेगळ्या ठिकाणी बसवत असे.बर्‍याच वेळा असे झालेय की आमची भांडण टाळण्यासाठी ती पट वगैरे लपवून ठेवायची.

अशा तर्‍हेने बुद्धिबळाचे वेड आम्हाला लागलेले होते तरी आमचा खेळ तसा प्राथमिक स्तरावरच होता. त्याकाळी जे नियम आम्ही पाळत असायचो ते धड भारतीय पद्धतीचेही नव्हते अथवा आंतर्राष्ट्रीय पद्धतीचेही नव्हते. सगळ्याच नियमांची खिचडी असे आमचे नियम होते. पण जसे जसे आणखी खेळत गेलो तेव्हा लक्षात आले की कुठेही एखाद्या स्पर्धेत भाग घ्यायचा झाल्यास तिथे आंतर्राष्ट्रीय नियमांप्रमाणे खेळावे लागते.म्हणून मग ते नियम माहीत करून घेण्यासाठी जिवाचा आटापिटा सुरू झाला.हळूहळू ते नियमही माहीत होऊ लागले आणि आम्ही त्याप्रमाणेच खेळू लागलो.

आता वर्ष नक्की आठवत नाही पण साधारण १९७३-७४ साली(त्यावेळी मी आणि माझा मोठा भाऊ नोकरीला लागलेलो होतो) वृत्तपत्रात एका बुद्धिबळ स्पर्धेची जाहिरात पाहिली आणि मी आणि माझ्या मोठ्या भावाने त्यात भाग घ्यायचे ठरवले. ही स्पर्धा अतिशय प्रतिष्ठेची समजली जात असे(हे आम्हाला नंतर कळले). सयानी मार्ग,एलफिन्स्टन रोड येथील सुप्रसिद्ध आयुर्वेदिक औषधे निर्माण करणार्‍या झंडू फार्मसीच्या उपाहारगृहात(कॅन्टिन) ही स्पर्धा होत असे. आम्ही दोघे तिथे गेलो आणि वर्गणी भरून नाव नोंदवले. तिथले नियम समजावून घेतले . स्पर्धा साखळी पद्धतीने होणार होती. प्रत्येक खेळाडूला ९फेर्‍यातून ९डाव खेळायचे होते. रोज संध्याकाळी ६ते रात्री १० वाजेपर्यंत(प्रत्येकी एक फेरी) अशा तर्‍हेने सतत ९दिवस ही स्पर्धा चालणार होती. ही स्पर्धा नवोदितांसाठी होती(एनट्रंट्स साठी) .

ह्या अशा तर्‍हेच्या स्पर्धेत आम्ही पहिल्यांदाच भाग घेत होतो त्यामुळे उत्सुकता आणि भिती अशा संमिश्र भावनांसहित आम्ही दोघे ठरलेल्या दिवशी तिथे दाखल झालो. तिथे जाऊन पाहतो तो काय...........५०टेबले एका रांगेत मांडलेली होती.प्रत्येक टेबलावर एकेक पट मांडून ठेवलेला होता. पटाशेजारीच दोन घड्याळांचा असा एकेक संच(स्टॉप वॉचेस), बसायला टेबलांच्या दोन्ही बाजूंना ऐसपैस खुर्च्या,टेबलावर पाणी पिण्यासाठी तांब्याभांडे, सिगरेट पिणार्‍यांसाठी रक्षापात्र(ऍश ट्रे) असा सगळा जामानिमा होता. हे सगळे पाहूनच आमची छाती दडपून गेली. इथे आपल्या सारख्यांचे कसे होणार? मनात हा एकच प्रश्न घोळायला लागला.

आमच्यासहित सर्व खेळाडूंनी त्यांना सांगितलेल्या जागांवर बसून घेतले. घड्याळ कसे वापरायचे ते समजावून सांगितले गेले. तसेच एक कागद आणि पेनही देण्यात येऊन त्यावर आपल्या व प्रतिस्पर्ध्याच्या खेळी लिहाव्यात अशी सूचना देण्यात आली. आम्हा दोघांना हे सगळे नवीनच होते. घड्याळ काय, खेळी लिहिणे काय?

खेळाला सुरुवात करण्यापूर्वी काळ्या की पांढऱ्या सोंगट्यांनी खेळायचे ह्याबद्दल काटा-छापा झाले. त्यात मला काळ्या सोंगट्या मिळाल्या. माझा भाऊ माझ्यापासून बराच दूर होता त्यामुळे त्याला काय मिळाले कळले नाही. हे सगळे सोपस्कार झाल्यावर डाव सुरू करण्याची सूचना मिळाली आणि माझ्या प्रतिस्पर्ध्याने राजाच्या पुढचे प्यादे दोन घरे पुढे सरकवले आणि चटकन घड्याळाचा खटका दाबला आणि आपल्या कागदावर ती खेळी लिहिली(बहुतेक सराईत गडी असावा!). त्याला मी उजव्या हाताच्या हत्तीच्या पुढचे प्यादे पुढे करून उत्तर दिले(इथेच तो समजून गेला की भिडू अगदीच कच्चा आहे!). माझा अशा तऱ्हेच्या स्पर्धेत खेळण्याचा पहिलाच अनुभव असल्याने मला सुचेल तसे मी खेळत होतो.माझे घड्याळाकडे लक्षच नव्हते. प्रतिस्पर्ध्याने घड्याळाचा खटका दाबल्यामुळे माझे घड्याळ सुरू झाले होते आणि ते तसेच चालू राहिले कारण मी खटका दाबायचा पार विसरून गेलो होतो.त्यामुळे माझ्या घड्याळात एक तास झालेला दिसत होता तरी त्याचे घड्याळ जैसे थेच होते.माझे नवखेपण त्याच्या केव्हाच लक्षात आले होते;पण हे सगळे त्याच्या फायद्याचे असल्यामुळे त्याने मला ते तसे जाणवू दिले नाही.कागदावर खेळी कशी लिहायची हे देखिल माहीत नसल्यामुळे मी डाव लिहूनही काढत नव्हतो. माझे सर्व लक्ष त्याच्या आणि माझ्या खेळीकडे लागलेले होते.

बुद्धिबळाच्या ह्या खेळात नियमाप्रमाणे पहिल्या दोन तासात प्रत्येकाच्या निदान ४० खेळ्या होणे जरूरीचे असते, ते तसे झाले नाही तर ज्याच्या ४० पेक्षा कमी खेळी असतील तो हरला असे मानले जाते.त्यामुळे माझ्या घड्याळात जेव्हा दोन तास व्हायला आले होते(फक्त ३ मिनिटं बाकी होती) तेव्हा माझ्या ३०च खेळ्या झाल्या होत्या.साहजिकच त्याच्याही तितक्याच खेळ्या झालेल्या होत्या तरी त्याचे घड्याळ जेसे थे(सुरुवातीच्या) अवस्थेतच होते. आता मला राहिलेल्या तीन मिनिटात १० खेळ्या करणे भाग होते(त्याच्यावर तसे दडपण नव्हते ते केवळ माझ्या चुकीमुळे) आणि मी त्या करू न शकल्यामुळे मला तो डाव गमवावा लागला. खरे सांगायचे तर माझी परिस्थिती उत्तम होती आणि तो डाव मीच जिंकला असता;पण केवळ तांत्रिक कारणास्तव मी तो डाव गमावून बसलो होतो.

तिथे माझ्या भावाबरोबर खेळणारा प्रतिस्पर्धीही त्याच्यासारखाच नवीन होता त्यामुळे घड्याळ बाजूला ठेवूनच दोघे खेळले आणि त्यात माझ्या भावाचा विजय झाला.

क्रमश:

२२ एप्रिल, २००७

माझ्या 'बुद्धीचे बळ'!१

माझ्या लहानपणी मी भरपूर खेळ खेळलोय.बैठे तसेच मैदानी अशा दोन्ही प्रकारचे खेळ खेळलो असलो तरी कोणत्याही एका खेळात प्रवीण झालो नाही. साधारणपणे ५०-५५% इतपतच त्यात प्रगती करू शकलो. जे काही अनेक खेळ मी खेळलो त्यापैकी एक म्हणजे 'बुद्धिबळ' हा होय.

ह्या बुद्धिबळाची आणि माझी ओळख साधारणपणे मी ५वी-६वीत असताना झाली. त्यावेळी माझा मोठा भाऊ आणि त्याचा एक मित्र आमच्या घराच्या ओटीवर पट मांडून बसत. त्यांना तो खेळ कितपत येत होता हे सांगणे कठीण आहे;पण तेव्हापासूनच त्या खेळातील हत्ती-घोडा-उंट वगैरेंशी माझी तोंडओळख झाली. हा खेळ सुरू करण्या आधी वातावरण निर्मितीसाठी ते दोघे जोरजोरात डबे,थाळ्या बडवत आणि युद्धाचे वातावरण निर्माण करत.म्हणूनही असेल कदाचित वाडीतील यच्चयावत बालगोपाल मंडळी ही लढाई बघायला येत असत आणि मग त्यात दोन तट पडत्‍ा. ज्या बाजूची सोंगटी बळी पडत असे त्याच्या विरुद्ध असणारा गट मग आरडाओरड करून आपला आनंद व्यक्त करत. अशा तऱ्हेने चालणाऱ्या ह्या खेळाचे आकर्षण मला केव्हा निर्माण झाले आणि मी प्रत्यक्ष त्यात केव्हा भाग घ्यायला लागलो हे समजेपर्यंत मी एक बऱ्यापैकी खेळाडू बनलो. शाळेतील बुद्धिबळाच्या स्पर्धेत भाग घेऊन एखादा डाव जिंकूही लागलो होतो. माझ्या बरोबरीनेच माझा लहान भाऊही हा खेळ शिकला आणि पुढे पुढे आम्ही तिघे भाऊ एकमेकांबरोबर खेळून आपली बुद्धिबळातली प्रगती साधू लागलो.

आम्ही तिघेही जरी हा खेळ खेळायला शिकलो होतो तरी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे ह्या खेळाचे सामान्य नियम सोडले तर त्यातील खास असे नियम आणि खाचाखोचा आम्हाला माहीत नव्हत्या. त्याचे कारण म्हणजे आमच्या आजूबाजूला अशी कोणतीच व्यक्ती अस्तित्वात नव्हती की जी हा खेळ अगदी व्यवस्थितपणे जाणत होती. शाळेतल्या शिक्षकांचे ह्या विषयातले ज्ञानही जेमतेमच होते आणि त्यामुळे म्हणावा तसा हा खेळ बहरत नव्हता.

ह्या अशाच अवस्थेत मालाड ब्राह्मण सभेतर्फे आयोजित एका स्पर्धेत आम्ही तिघांनी भाग घेतला. स्पर्धा बाद पद्धतीने घेण्यात आली. इथेही तसा नियमांच्या बाबतीत आनंदी आनंदच होता. जेमतेम १६ स्पर्धकांनी ह्या स्पर्धेत भाग घेतला होता.माझी पहिल्याच फेरीत गाठ पडली ती माझ्या मोठ्या भावाशीच आणि त्याने मला त्यात सपशेल हरवले. झाले! म्हणजे एक मोहरा कामी आला होता! माझ्या धाकट्या भावानेही त्याचा पहिला डाव जिंकला होताच.आता दोघेजण(तीन भावांपैकी) मैदानात उरले. दुसरी फेरीही त्या दोघांनीही सहज जिंकली. तिसऱ्या फेरीत माझ्या दोन्ही भावांची एकमेकांशी गाठ पडली आणि त्यात लहान भावाने बाजी मारली. म्हणजे आम्हा तिघांपैकी आता तो एकटाच मैदानात उरला होता.आता होणार होती ती अंतिम फेरी आणि त्यात कोण विजयी ठरतो ह्याची उत्सुकता होती.

अंतिम फेरीचा सामना बघायला बरीच मंडळी जमली होती. दोघेही खेळाडू तुल्यबळ वाटत होते त्यामुळे जो चूक करेल तो हरणार हे माहीत असल्यामुळे कुणीच जोखीम पत्करत नव्हते आणि त्यामुळे खेळ थोडा कंटाळवाणा व्हायला लागला. ह्या खेळाचे वैशिष्ट्य असे आहे की खेळ खेळणाऱ्या खेळाडूपेक्षा बाहेरून तो खेळ बघणाऱ्यालाच त्यातल्या त्रुटी चटकन कळतात. त्यामुळे मला सारखे वाटत होते की इथे अमुक एक चाल केली तर फायदा होईल;पण माझा भाऊ काही वेगळाच विचार करताना दिसत होता आणि त्यामुळे सामना लांबत चालला होता.इतक्यात प्रतिस्पर्ध्याने एक खेळी केली आणि मी मनोमन सुखावलो कारण ती खेळी म्हणजे त्याच्या भविष्यात होणाऱ्या पानिपताची नांदी होती आणि आता ही संधी जर घालवली तर पुढे डाव अधिक गुंतागुंतीचा होण्याची शक्यता दिसत होती. ती खेळी त्या खेळाडूने केली आणि लगेच त्याची चूक त्याच्याच लक्षात आलेय हे त्याच्या चेहऱ्यावरूनच स्पष्ट होत होते आणि म्हणून मी मोठ्या आशेने माझ्या भावाच्या अपेक्षित खेळीकडे बघत होतो. आता खेळाची सगळी सूत्रे त्याच्याचकडे आपोआप आली होती; पण तो विचारात गुरफटलेला दिसत होता आणि माझे हात तर सारखे शिवशिवत होते पुढची चाल करण्यासाठी. मी मोठ्या आशेने त्याच्याकडे पाहत होतो आणि त्याने मला सुचलेली खेळी करावी असेही वाटत होते;पण तो काहीच करत नव्हता आणि मी फारच अधीर होऊ लागलो तरी तो शांतच दिसत होता. शेवटी मी न राहवून टेबलाखालून माझ्या पायाने त्याचा पाय हळूच दाबला आणि .....
तत्क्षणी इतका वेळ मी अपेक्षित असलेली खेळी त्याने केली. जणू काही माझ्या त्या स्पर्शाने तो आश्वस्त झाला होता. त्यालाही तीच खेळी करायची होती; पण तो पुढच्या गुंतागुंतींचा विचार करत बसला होता आणि अशाने बऱ्याच वेळा आपण मूळ गोष्ट विसरून जातो असा माझा अनुभव होता.
माझ्या भावाची ती खेळी पाहताच वातावरणातला ताण एकदम हलका झाला आणि बघ्यांनी टाकलेला निःश्वास मोठ्याने ऐकू आला. समोरच्या खेळाडूने देखिल तत्क्षणी डाव सोडला आणि आपला पराभव मोठ्या मनाने मान्य केला.

क्रमश:

१५ एप्रिल, २००७

बालपणीचा काळ सुखाचा! १

माझ्या बालपणाची मला स्वत:ला आठवणारी पहिली पुसटशी आठवण म्हणजे माझ्या धाकट्या भावाचा पहिला वाढदिवस! मी त्यावेळी साधारण ४ वर्षांचा होतो.त्या काळी आमच्या घरात विजेचे दिवे नव्हते. म्हणजे तशी वीज आधी होती(मला आठवतेय तेव्हापासून नव्हती); आमच्या घरात फक्त दोनच विजेचे गोळे(बल्ब) असत. इतरांकडे त्या व्यतिरिक्त पंखाही असे. एकदोघांकडे रेडिओही होता.विजेचे मीटर सगळ्यांसाठी एकच असे आणि सगळ्यांनी येणारे बील समान वाटे करून भरायचे असा अलिखित नियम होता.तरीही भांडणे होत. कमी वीज वापरूनही आम्हाला जास्त भुर्दंड पडत असे.म्हणून मग माझ्या वडिलांनी दरवेळेच्या भांडणांना कंटाळून स्वत:च आमच्या घरातील विजेच्या तारा कापून टाकल्या होत्या.(हे सगळे मला थोडा मोठा झाल्यावर आईकडूनच कळले.) त्यामुळे माझे अख्खे बालपण हे चिमणी आणि कंदिलाच्या प्रकाशातच गेले.

तर अशा आमच्या ह्या घरात ज्या गतकाळच्या निशाण्या होत्या त्या म्हणजे वीजगोळे धारक कमनीय दांड्या आणि अशाच त्या दोन दांड्यांना त्या दिवशी लटकवलेल्या होत्या दोन पेट्रोमॅक्सच्या बत्त्या! ते लखलखणारे दोन दिवे मला अजूनही प्रकर्षाने आठवताहेत.

त्या दिवशी आमच्याकडे बर्‍याच पाहुण्यांचा राबता होता. मी जात्याच अशक्त , किरकिरा आणि बुजरा असल्यामुळे एका कोपर्‍यात उभा होऊन ही गंमत पाहत उभा होतो. कुणाच्यात मिसळत नव्हतो. तसा माझा चेहरा बरा असावा(आई-वडील मला मोदकतोंड्या म्हणत!त्याचे काही एव्हढे विशेष नाही हो. प्रत्येक आई-वडिलांना त्यांची मुले गोंडसच दिसतात त्याला आपण तरी काय करणार?) त्यामुळे मामा-मावश्या वगैरेंना माझंही जरा कौतुक असायचे;पण मी मुलखाचा भित्रट असल्यामुळे कुणी माझ्या कडे नुसते बघितले की मी 'मायते'!(मारते... माझ्यासाठी सगळेच स्त्रीलिंगी होते) असे ओरडत रडायला सुरुवात करत असे. सगळेचजण मला मारतील अशी काहीशी सुप्त भिती माझ्या मनात दाटलेली असे. त्यामुळे कुणाकडून कौतुक करून घेण्याचे माझ्या नशिबात नसावे.

त्या दिवशी माझ्या भावाभोवती अक्षरश: खेळण्यांचा सडा पडला होता. तसेच चांदीची भांडी,रंगीबेरंगी कपडे,दुपटी आणि बरेच काही त्याच्यासाठी येणार्‍या नातेवाईंकांनी आणलेले होते. माझ्या वेळेस आमची परिस्थिती यथातथाच असल्यामुळे माझे बारसे किंवा वाढदिवस अशा तर्‍हेने साजरा होऊ शकला नव्हता(हे ही पुढे आईकडूनच कळले) त्यामुळे ह्यावेळी सर्व नातेवाईकांनी अतिशय सढळ हाताने भेटवस्तूंचा मारा केला होता. ह्या सर्वात माझे लक्ष वेधून घेतले होते ते एका लालभडक दुमजली लाकडी बसने. मला ती बस खूपच आवडली. तसेच एक लाकडी घोडाही होता. त्या घोड्यात बसता येत होते आणि मागेपुढे झुलतादेखील येत होते. कधी एकदा पाहुणे जातात आणि मी त्यांच्याशी(खेळण्यांशी) खेळतो असे होऊन गेले होते;पण रात्र झाली तरी काही पाहुण्यांची वर्दळ थांबत नव्हती.

सरतेशेवटी एकेक करत सगळेजण जेव्हा गेले तेव्हा मी चटकन उडी मारून त्या घोड्यात(हो! मध्ये बसायला गादी आणि टेकायला पाठ आणि दोन्ही बाजूला दोन रंगीबेरंगी तोंडे असलेला घोडा होता तो-- हल्लीच्या झुलत्या(रॉकींग चेअर) खुर्चीसारखा) ऐटीत बसलो आणि आणि घोडा चालवता चालवता कधी झोपलो ते कळलेच नाही.

८ एप्रिल, २००७

मित्र!

नक्की आठवत नाही; पण मी बहुधा तिसरीत असतानाची ही गोष्ट आहे.
माझ्या बालवयात मी कमालीचा रड्या,हट्टी,दुराग्रही असा सकल अवगुणसंपन्न होतो. भुकेमुळे कासावीस होणे ही तर माझी सहजप्रवृत्ती होती. सकाळी ९च्या सुमारास वडील कार्यालयात गेले की मी आईकडे 'मला जेवायला वाढ' अशी भूणभूण करायला सुरुवात करायचो. वडीलांच्या डब्यासाठी पोळी-भाजी तयार असायचीच.तेव्हा आई मला 'आधी आंघोळ करुन घे आणि मग जेव' असे सांगायची;पण मी भूकेचा इतका हळवा होतो की 'आधी जेवण आणि मगच आंघोळ' असा हट्ट धरून बसत असे.

माझी आई जितकी प्रेमळ तितकीच कर्तव्य आणि शिस्तीला कडक होती. तिला हे असले नखरे अजिबात रुचत नसत. प्रथम गोडीगुलाबीने आणि नंतर रागावून ती मला आंघोळ करून घ्यायला सांगत असे;पण माझे फक्त 'भूक भूक' हेच पालूपद चालायचे. त्याने आई बधत नाही असे पाहिले की मी मग तारस्वरात रडायला सुरुवात करायचो(पुढील आयुष्यात बहुदा मला आवाज लावायला त्याचा उपयोग झाला असावा!) आणि तिच्यावर भावनिक कुरघोडी करायचा प्रयत्न करायचो. पण आई बधायच्या ऐवजी हातात लाटणे घ्यायची की मग मी पळून जाऊन बाहेरच्या ओट्यावर रडत बसायचो पण आई त्याला दाद देत नसे. तिची 'आधी आंघोळ कर' ची अट कायम असायची.

माझ्या ओट्यावर जाऊन रडण्याने माझा एक फायदा असा व्हायचा की आईच्या मारापासून मी सुरक्षित असायचो आणि द्सरे म्हणजे माझ्या आकांडतांडवामुळे शेजारच्या साळकाया-माळकाया मी का रडतोय हे बघायला यायच्या. मग आईच्यात आणि त्यांच्यात संवाद होत असे. त्यातून त्यांना माझ्या रडण्याचे कारण कळायचे. त्या माझी समजूत घालायचा प्रयत्न करत पण मी बधत नसे म्हणून मग त्या आईवर भावनिक दबाव आणत आणि शेवटी त्या सगळ्यांच्या त्या दबावामुळे आई मला 'घे मेल्या! खा!' असा खास आशीर्वाद देउन जेवायला वाढत असे. मग मी अधाशासारखा खाऊन घेत असे आणि मगच आंघोळ करत असे.

जवळपास रोजच (सुट्ट्यांचे दिवस सोडून! कारण वडील त्यादिवशी घरी असत) माझा हा कार्यक्रम यशस्वी होत असे. पण एक दिवस आई देखिल हट्टालाच पेटली. कुणाच्याही दबावाला बळी न पडता तिने मला ठणकावले 'आंघोळ कर आणि मगच जेव. नाहीतर आज उपाशी राहा'!
मी आकांडतांडवाचे खूप प्रकार करून पाहिले पण आई बधली नाही. बघता बघता माझी शाळेला जाण्याची वेळ आली. माझी इतर भावंडे शहाण्यासारखी आंघोळी, जेवण उरकून शाळेत जायला निघाली देखिल आणि मी अजूनही भिकार्‍यासारखा दारात बसून आशाळभूतपणे आईला दया येईल अशी आस लावून बसलो होतो. शेवटी आईने मला पुन्हा एकदा 'आंघोळ कर आणि चल लवकर जेवायला. शाळा बुडवायची नाही'! असे सांगितले. पण मीही हटवादीपणे तसाच बसून होतो. शाळेची वेळ झाली आणि आता काही जेवण मिळण्याची शक्यता नाही हे लक्षात आल्यावर तशीच पुस्तक-वह्यांची पिशवी उचलली आणि रडत रडत शाळेत गेलो.

आयुष्यात पहिल्यांदाच उपाशीपोटी शाळेत गेलो असल्यामुळे अभ्यासाकडे लक्ष नव्हते. बघता बघता मधली सुट्टी झाली. माझ्या वर्गमित्रांनी आपापले डबे उघडून खायला सुरुवात केली. मी मात्र माझ्या जागेवर भुकेल्यापोटी रडत बसलो. कुणाकडे मागणे (स्वत:च्या घरात सोडून ) स्वभावात नसल्यामुळे मी आपला मुसमुसत बसलो होतो. ते बघून माझा एक मित्र वसंत माझ्याकडे आला आणि माझ्या रडण्याचे कारण विचारू लगला. मी त्याला सकाळचा सगळा प्रकार सांगितल्यावर त्याने आपला डबा माझ्यापुढे धरला आणि मला खाण्याचा आग्रह करू लागला . एक क्षण मला त्या खाण्याचा मोह पडला पण त्यावर मात करून मी त्याला नकार दिला. त्याला खूप वाईट वाटले;पण मला दुसर्‍यांसमोर माझा पराभव मान्य करायचा नव्हता. मी तसाच बसून राहिलो. मधली सुट्टी संपली आणि पुन्हा शाळा सुरु झाली पण माझे लक्ष अभ्यासात लागलेच नाही.

शाळा सुटल्यावर मी घरी येत असताना वसंत पुन्हा माझ्याजवळ आला आणि माझ्या खांद्यावर हात ठेऊन चालायला लागला.मला त्या स्पर्शातला स्नेह मनोमन जाणवला. आम्ही दोघे अबोल अवस्थेत घराजवळ आलो. माझ्या घराच्या जवळच ह्या माझ्या मित्राच्या वडीलांचे चहा-बिस्किटांचे छोटेसे उपहारगृह होते. तिथे पोचल्या पोचल्या त्याने मला बळे बळे आत नेले आणि आपल्या वडीलांना मी सकाळपासून उपाशी असल्याचे सांगितले. त्यांनाही हे ऐकून वाईट वाटले आणि मोठ्या प्रेमाने त्यांनी मला तिथे बसवून स्वत:च्या देखरेखीखाली चहा-बिस्किटे खायला लावली. हे सर्व चालू असताना माझे लक्ष अचानक वसंतकडे गेले आणि त्याच्या चेहर्‍यावरचे ते तृप्ततेचे भाव बघितले आणि मी त्याच्याकडे बघून स्मितहास्य केले. माझ्या चेहर्‍यावर पुन्हा हास्य फुललेले पाहून त्या पिता-पुत्रांना खूपच आनंद झाला होता. माझे खाणे संपल्यावर मग घरी जायला निघालो तेव्हा त्याच्या बाबांनी माझ्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवला आणि 'केव्हाही ये.आपलेच हाटेल हाय' असे सांगितले. मी मोठ्या तृप्त मनाने घराकडे निघालो.

घरी पोचलो तेव्हा आई सचिंत होऊन बाहेरच्या ओट्यावर माझी वाट पाहत बसली होती. मी दिसताच ती लगबगीने आली आणि मला घरात घेऊन गेली. तिच्या डोळ्यातले भाव बघून माझ्या लक्षात आले की तिही दिवसभर जेवलेली नाहीये. मग मी शहाण्यासारखी आंघोळ केली आणि तिच्या बरोबर दोन घास खाऊन घेतले.त्यानंतर आयुष्यात मी पुन्हा कधीही असा हट्ट केला नाही.

मित्रानो आजही वसंत माझा चांगला मित्र आहे. वसंत ही गोष्ट केव्हाच विसरून गेलाय पण त्याला जेव्हा जेव्हा मी भेटतो तेव्हा तेव्हा हा प्रसंग माझ्या डोळ्यासमोर जसाच्या तसा उभा राहतो.माझा स्वत:चा स्वभाव चांगला नव्हता तरीही हे असे मित्र मला वेळोवेळी लाभले हे मी माझे महद्भाग्यच समजतो.

४ एप्रिल, २००७

हिम्मत!!!

त्यावेळी मी चौथीत होतो. अभ्यासात बर्‍यापैकी होतो. दरवर्षी नियमित पणे चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होऊन वरच्या वर्गात जात असे. माझा धाकटा भाऊ माझ्यापेक्षा तीन वर्षांनी लहान होता. तो अभ्यासात हुशार होता. तसा तो सगळ्याच गोष्टीत हुशार होता. गोट्या खेळण्यात तो त्याच्यापेक्षा वयाने मोठ्या असलेल्या माझ्यासारख्यांना सहज हरवत असे. त्याचा नेम अचूक असल्यामुळे गोट्या,बिल्ले,सिगरेटची पाकीटे वगैरेचा खजिनाच त्याने जिंकून गोळा केला होता.त्याचे लक्ष अभ्यासात कमी आणि खेळात जास्त असा सगळा प्रकार होता.

माझी चौथीची परीक्षा मी चांगल्या गुणानी उत्तीर्ण झालो आणि आता मला माध्यमिक शिक्षणासाठी जवळच असलेल्या दुसर्‍या खाजगी शाळेत प्रवेश घेण्याचे वेध लागले होते. माझा हा हुशार भाऊ मात्र पहिलीतच चक्क एका विषयात नापास झालेला होता आणि तो म्हणजे गणित विषय होता. हा निकाल बघून आम्हा सगळ्यांनाच आश्चर्य वाटले. कारण कोणतेही गणित तो तोंडी अगदी सहजगत्या सोडवत असे. आम्हा सगळ्यांना रोज दिवेलागण झाली की शुभंकरोती,परवचा वगैरे सगळ्या गोष्टी म्हणण्याची आई-वडिलांनी सवय लावलेली होती आणि म्हणूनच ज्याचे अडीचकी पर्यंतचे पाढे पाठ होते तो असा गणितात कसा नापास होईल हे कोडे उलगडेना. त्यातून त्याला गणितात 'शून्य भोपळा' मिळालेला होता. हे देखिल अतिशय नवल वाटण्यासारखे होते.

ह्या संबंधात माझ्या वडिलांनी त्याला विचारले तेव्हा त्याला काहीच सांगता आले नाही ;पण त्याच्याच बरोबरच्या आमच्याच वाडीतील एका मुलाने पुरवलेली माहिती गंमतीशीर होती.त्याच्या म्हणण्यानुसार हा माझा भाऊ परीक्षेच्या दिवशी शाळेत गेला होता आणि त्याच्या खिशात नेहमीप्रमाणे गोट्याही होत्या. आम्ही शाळेत नेहमीच वर्ग भरण्याआधी चांगले अर्धातास जात असू आणि तिथे आपापसात खेळत असू.तर परीक्षेच्या दिवशी तो असाच शाळेच्या मागच्या बाजूला इतर काही मुलांबरोबर गोट्या खेळत बसला. खेळताना वेळेका़ळाचे कोणतेही बंधन नसल्यामुळे त्या दिवशीच्या गणिताच्या परीक्षेला तो हजरच राहिला नाही आणि साहजिकच त्याला त्यात शून्य गुण मिळाले. हे सगळे त्याच्याही लक्षात आले नाही. त्या दिवशी त्याने घरी येताना दोन्ही खिसे भरून गोट्या जिंकून आणल्या होत्या आणि त्याच खूषीत तो बाकीचे सगळे विसरला होता.

आता प्रश्न पडला की काय करायचे? सुखासुखी एक वर्ष फूकट कसे घालवायचे? मग माझ्या वडिलांनी आमच्या हेड-मास्तरांना एक चिठ्ठी लिहिली आणि त्यात भावाचे ते सगळे प्रताप लिहून दिलगिरी व्यक्त केली. तसेच त्याची पुन्हा एकदा गणिताची परीक्षा घेण्याची विनंती केली. ही चिठ्ठी त्यांनी मला दिली आणि सांगितले की हेड-मास्तरांना नेऊन दे म्हणून! मंडळी काय सांगू मला तर घामच फूटला पण वडिलांची अवज्ञा करणे म्हणजे मार खाणे हे माहित असल्यामुळे त्यांना नाही म्हणणे शक्यच नव्हते आणि तिथे त्या महा-भयंकर हेड-मास्तरांच्या समोर जाणे हेही अशक्य होते. मग आता काय करणार? 'इकडे आड आणि तिकडे विहीर' अशा परिस्थितीत मी सापडलो होतो.

कोणताच इलाज नसल्याने मी माझ्या लहान भावाला घेऊन शाळेत गेलो. हेड-मास्तरांच्या खोलीच्या आसपास बराच वेळ रेंगाळत राहिलो पण आत जाण्याची हिम्मत होत नव्हती.हातपाय थरथरत होते. वेळ निघून चालला होता आणि ज्यासाठी आलो होतो ते काम करण्याची हिम्मतही हळूहळू कमी होत होती. आमचे दोघांचे घुटमळणे चालूच होते इतक्यात साक्षात जमदग्नीचा अवतार असे ते महा-भयंकर प्रकरण अंगावर चाल करूनच आले. आमचे तिथले ते तसे घुटमळणे त्यांच्या काक दृष्टीतून सुटणे अशक्यच होते हे आम्ही साफ विसरलो होतो.त्यांनी करड्या आवाजात प्रश्न केला. "इथे काय चाललेय तुमचे? आता शाळेला सुट्टी सुरू झालेली आहे मग इथे कसले उपद्व्याप करताय?आणि कोण तुम्ही?उत्तरादाखल मी कसेबसे त्यांच्या दिशेने बघितले आणि पुन्हा मान खाली करून त्यांच्या दिशेने हात करून ती चिठ्ठी त्यांना दिली.त्यांनी मोठ्या त्रासिक नजरेने चिठ्ठी उलगडून बघितली,वाचली आणि आम्हाला दोघांना त्यांनी आत बोलावले. मला वाटले आता बहुदा छडीचा प्रसाद मिळणार! आपले काही खरे नाही! इथून पळून जावे असा विचार मनात आलाच होता तेव्हढ्यात इतका वेळ गायब असलेला शाळेचा शिपाई नेमका टपकला आणि आता इथून सुटका नाही हे लक्षात आल्यामुळे नाईलाजाने कसायाच्या मागे जाणार्‍या बोकडाप्रमाणे आम्ही दोघे आत गेलो.

आत गेल्याबरोबर हेमांनी प्रथम मलाच धारेवर धरले.पण मी ह्यावर्षी उत्तम गुण मिळवून उत्तीर्ण झालोय आणि अमूक अमूक शाळेत ५वीत प्रवेश घेणार आहे हे ऐकून चेहेर्‍यावरचे करडे भाव किंचित सौम्य झाले.मग भावाची परीक्षा सुरू झाली. त्यांनी विचारलेल्या सगळ्या प्रश्नांची सटासट आणि बिनचूक उत्तरे त्याने दिली आणि मग त्या जमदग्नीचे एक सौम्य रूप आम्हाला पाहायला मिळाले. लगेच त्या चिठ्ठीवर त्यांनी माझ्या वडिलांना उद्देशून 'कु. विलास वरच्या वर्गात गेला' असे दोन शब्द लिहिले आणि 'जा ! तू आता दूसरीत गेलास!' असे भावाला म्हणून चक्क मिशीतल्या मिशीत हसले!मग आम्ही दोघांनी पुढे होऊन त्यांना नमस्कार केला आणि त्यांचा आशिर्वाद घेऊन मोठ्या आनंदात रमत-गमत घरी पोचलो.