माझ्या आयुष्यातील आजवरच्या कडू-गोड आठवणी मी "पूर्वानुभव" म्हणून सादर करत आहे.
आपण इथे आल्याबद्दल मन:पूर्वक धन्यवाद!

४ सप्टेंबर, २०१४

पावसाशी संवाद..

ह्यावर्षी पाऊस सरासरीपेक्षा कमी पडेल वगैरे अशा तर्‍हेचे वेधशाळेचे सगळे अंदाज नेहमीप्रमाणेच चुकले...जूनच्या दुसर्‍या आठवड्यापासून पाऊस जो सुरु झालाय तो सतत पडतोच आहे  आणि ह्यावर्षी तर चांगला भरभरून पडतोय...पाऊस सुरु झाल्यापासून  एकही दिवस कोरडा असा गेलेला नाहीये..अगदी रिमझिम म्हणा किंवा दिवसभरात एखादी सर का होईना...पण अशा पद्धतीने तो रोज हजेरी लावतोच आहे....अर्थात हे मी फक्त मुंबईबद्दल बोलतोय...

तेव्हा मी पावसालाच विचारायचं ठरवलं.
हा आमच्यात घडलेला संवाद....

मी: का रे बाबा, नेहमी त्या वेधशाळेचे अंदाज चुकवतोस? यंदाही तेच केलंस.

पाऊस:.त्याला मी नाही, निदान ह्यावर्षी तरी तूच जबाबदार आहेस.

मी: ( आश्चर्यचकित होऊन म्हटलं)मी? मी काय वरूण देव आहे काय? मी तर प्रमोद देव आहे.

पाऊस: उगाच फालतू विनोद करू नकोस...पण तूच जबाबदार आहेस.

मी: कसा काय बुवा?

पाऊस: ते तुझ्या लहानपणीचे गाणे...ये रे ये रे पावसा, मल्हारमध्ये कुणी गायले आणि तेही एकदा नाही...रोज आपलं तुझं ते दळण सुरुच असतं.

मी: बरं मग, त्याचं काय? तो तर एक गमतीचा भाग होता आणि आहेही.

पाऊस: मग इतकी आळवणी केलीस...तीही मल्हारात..तर यावंच लागलं ना मला.

मी: ह्यॅ! उगाच काहीही फेकू नकोस! मल्हार आणि मल्हाराचे अनेक प्रकार नेहमीच गायले जातात आणि तेही एकापेक्षा एक सरस अशा गायकांकडून...तेव्हा का बरं येत नाहीस तू? मी काही तरी इकडचं तिकडचं ऐकून गायलो तर तू म्हणे आलास आणि नुसता आलासच नाहीस तर इथे मुक्कामही ठोकलास....कोण विश्वास ठेवेल तुझ्या बोलण्यावर?

पाऊस: अरे बाबा, खरंच सांगतोय मी!

मी: बरं ! मग मला सांग, तुला गाणं आवडलं म्हणून तू आलास की....

पाऊस नुसता गालातल्या गालात हसला आणि म्हणाला...तुला जे काही समजायचं ते समज!   ;)