माझ्या आयुष्यातील आजवरच्या कडू-गोड आठवणी मी "पूर्वानुभव" म्हणून सादर करत आहे.
आपण इथे आल्याबद्दल मन:पूर्वक धन्यवाद!

१९ जून, २०१०

घन घन माला नभी दाटल्या...

ह्या घामोळ्याने तर पार भंडावून सोडलंय.... नुसती चावत असतात सारखी...कधी एकदा पाऊस येतोय असं झालंय...ह्यावर्षी पहिल्या पावसात नक्कीच भिजायचं...सर्दी होवो नाही तर ताप येवो...पण ही घामोळी जाऊ देत एकदाची...

मी गेले कित्येक दिवस मनात हे घोळवत होतो...आणि आला बुवा एकदाचा पाऊस...चांगला दणकून आला...सोसाट्याच्या वार्‍यासह....मेघगर्जना करत...विजांचा लखलखाट-कडकडाट करत आला अगदी...पण नेमका मध्यरात्री...म्हणजे भिजता नाहीच आलं..  :(

त्यानंतर मग मी वाट पाहू लागलो...कधी एकदा तो मला भिजवतोय...पण नाहीच...बेटा, मी घरात झोपलेलो असतांना...तेही मध्यरात्रीच यायचा...बरस-बरस बरसायचा आणि मला वाकुल्या दाखवत निघून जायचा...सगळा दिवस मात्र भाकड....अगदी टळटळीत उन्हात जायचा....पण एक झालं...रात्रीच्या पावसामुळे तापमानात थोडी घट झाली आणि पाहता पाहता अंगावरचे घामोळेही विरून गेले...मग आता पावसात कशाला भिजायचे? ज्यासाठी इतका अट्टाहास होता तेच नाही मग आता कशाला भिजा? पण तरीही डोक्यात काही छुप्या घामोळ्यांची अधूनमधून जाग जाणवायची...अचानक ती अशी काही चिवचिवाट करायची की वैताग व्हायचा....मग ठरवलं....जाऊन लगेच अंमलबजावणीही केली....केश-कर्तनालयात जाऊन डोक्यावरचे सगळं जावळ काढून टाकायला सांगितलं...अगदी एखाद्या सैनिकासारखे डोके भादरून घेतलं....असे केस कापवून घेतांना न्हावी दादांनी विचारलंच....आज हे असं विपरित काय झालं?(ही कसली अवदसा आठवली? असंच म्हणायचं असावं बहुधा त्याला) इतके बारीक केस?
मी म्हटलं....त्याचं काय आहे की डोक्यातली घामोळी लै तरास देतात तेव्हा एकदा पावसात भिजायचा विचार आहे....पण उगाच सर्दी नको व्हायला...आता झेपेल का ह्या वयात...म्हणून आपले केस बारीक केलेल बरे...काय?
त्यावर न्हावीदादांनी मान हालवली आणि मुकाटपणाने डोक्यावरून मशीन फिरवून छप्पर पार उडवून टाकलं...

झालं....एकदा मनासारखं झालं...पावसाला तोंड द्यायला तयार तर झालो...पण पाऊस कसला वस्ताद...मी घरात असतांना जोरात कोसळायचा आणि .मी घराच्या बाहेर पडलो रे पडलो की तो आपला निमूटपणाने दुसरीकडे निघून जायचा....मी देखिल मुद्दाम छत्री नेत नव्हतो...तरीही  तो ही मला दाद देत नव्हता....

मी आपले प्रयत्न सोडले नाहीत. परवाही असंच झालं...सकाळी व्यायामशाळेत निघालो...आभाळ चांगलंच भरून आलं होतं....मनाशीच म्हटलं.....चला आज योग दिसतोय....बहुदा अर्ध्या रस्त्यातच गाठणार महाराज आपल्याला...म्हणून मी मुद्दाम माझी चाल मंद केली...तशी ती मंदच आहे....पण त्यातही अजून मंद केली...रेंगाळलो म्हणा हवे तर...पण एक नाही दोन नाही...व्यायामशाळेत पोचलो तरी  पावसाचा पत्ता नाही....व्यायामाला सुरुवात केली आणि पाचच मिनिटाने पाऊस बरसू लागला....पण आता त्या अवस्थेत पावसात जाणं योग्य नव्हतं म्हणून व्यायाम करतच राहिलो....माझा व्यायाम संपेपर्यंत पाऊसही संपलेला होता. :(
परत घरी यायला निघालो...एखाद दुसरा चुकार थेंब अंगावर पडत होता पण पाऊस थांबलेलाच होता...अजून पाऊस भरलेला दिसत होता पण बरसणं थांबवून, माझ्या घरी पोचण्याची वाट पाहात असावा बहुतेक...मग मी ही हट्टाला पेटलो....चालणं हळू केलं...रेंगाळणं सुरु झालं...रस्त्यात एखाद दुसरा ओळखीचा भेटला की त्याच्याशी गप्पा मारण्यात वेळ काढायचा प्रयत्न करत राहिलो....पण त्या लोकांना पावसात भिजायचं नसल्यामुळे ते पटापट आपली सुटका करून घ्यायला लागले...इथे असे सर्वच बाजूने पावसाला फितूर असलेले वातावरण पाहून मी मग आजची भिजण्याची आशा सोडून दिली आणि घराकडे प्रस्थान ठेवले...घरापासून अर्ध्या अंतरावर आलो आणि अचानक पावसाची रिमझिम सुरु झाली....चला एकदाचे गंगेत घोडं न्हालं...असा मनात विचार येईपर्यंत पुन्हा पाऊस थांबला...आणि त्याच अवस्थेत दहा-पंधरा पावलं मी पुढे गेलो नाही तर शेवटी एकदाचा जोराचा पाऊस सुरु झाला. पाहता पाहता मी चिंब भिजलो...डोळ्यांवरच्या चष्म्यावर पाणी साठलं.(चष्म्याला वायपर बसवता येतात का हो?)...म्हणून चष्मा काढून खिशात टाकला आणि मनसोक्तपणे भिजत मार्गक्रमण करू लागलो....आता पावसाचा वेग इतका वाढला की त्याच्या आवाजाने आजूबाजूचे काहीच ऐकू येईनासे झाले....त्यातच सोसाट्याचा वारा सुटलेला...विजांचा लखलखाट-कडकडाट सुरु झालेला....पाहता पाहता जागोजागी पाणी साचू लागले...बाजूने जाणार्‍या वाहनांमुळे ते साचलेले पाणी अंगावर उडत होते....पण आता फिकीर कुणाला होती....सगळा आसमंत ओलाचिंब झालेला होता...छत्र्या रेनकोटांची गर्दी वाढलेली होती...दुकानांच्या वळचणीला असंख्य लोक उभे राहून पावसापासून आपला बचाव करत होती....काही महाविद्यालयीन तरूण तरूणी एकत्र भिजण्याचा आनंद उपभोगत होते....आणि अशाच त्या कुंद-फुंद वातावरणात मीही नखशिखांत भिजून रस्ता कापत होतो....माझ्याकडे पाहून काही लोकांचे आश्चर्यचकित झालेले चेहरे पाहतांना मलाही मनातल्या मनात गुदगुल्या होत होत्या.....आज कितीतरी वर्षांनी असा मनसोक्त भिजण्याचा आनंद मी उपभोगत...ओठातल्या ओठात गाणे गुणगुणत होतो...

घन घन माला नभी दाटल्या कोसळती धारा...

१७ जून, २०१०

पावसाळी विशेषांक प्रकाशन !

मंडळी, आज  १७ जून. आपल्या हाती हा पावसाळी विशेषांक ऋतू हिरवा देतांना मला विशेष आनंद होत आहे. सद्द्या पावसाने चांगलाच जोर धरलाय आणि अशा कुंद-फुंद वातावरणात कॉफी अथवा मसालेदार चहाचे(आपापल्या आवडीप्रमाणे) घुटके घेता घेता आमचा हा अंक वाचतांना आपला आनंद द्विगुणित होईल ह्याची मला पूर्ण खात्री आहे.  ह्या अंकात आम्ही महाजालावरील काही नामवंतांबरोबरच नवोदितांचाही समावेश केलेला आहे....तेव्हा आता करा सुरुवात वाचायला....आणि हो...अंक आवडला/नावडला तरी कृपया तुमची प्रतिक्रिया टंकायला विसरू नका बरं का.

कळावे आपला
स्नेहांकित
प्रमोद देव

७ जून, २०१०

चारोळी

आज सकाळी व्यायामशाळेतून येतांना अचानक...काहीही ध्यानी-मनी नसतांना मला ही चारोळी स्फुरली.

ती वळवाच्या सरीसारखी अचानक येते ।
खुलवते वातावरण स्नेहार्द्र नजरेतून ।
बरसते अखंड बडबडीतून आणि ।
आली तशीच, अचानक निघून जाते ।।

६ जून, २०१०

शब्दबंध २०१०

होणार, होणार म्हणता म्हणता २०१० च्या शब्दबंधचे इ-संमेलन एकदाचे ५जून रोजी पार पडले.
शब्दबंध २००९ च्या आधी जे एक उत्साहाचे वातावरण होते ते ह्यावेळी फारसे जाणवले नाही त्यामुळे ह्या २०१० च्या संमेलनात कसा प्रतिसाद मिळेल ह्याबाबत मी स्वत: साशंक होतो...पण तरीही प्रत्यक्ष संमेलनाच्या वेळी प्रत्येक सत्रात( प्रत्येकी साडेतीन तासांची चार सत्रे) अभिवाचक आणि श्रोत्यांची उपस्थिती लक्षणीय होती. उत्साहाने आपापल्या साहित्याचे वाचन करणारे अभिवाचक आणि दिलखुलास दाद देणारे श्रोते असे एकूण उत्साहाचे वातावरण दिसून येत होते. सकाळी ९ वाजता सुरुवात झालेले हे संमेलन उत्तररात्रीपर्यंत उत्तरोतर रंगतच गेले.

तांत्रिक बाजूंबद्दल बोलायचे झाल्यास....बर्‍याच सदस्यांना आणि श्रोत्यांना अजून स्काईप हे माध्यम नेमके कसे वापरायचे हे नीटसे कळलेले नाहीये. त्यामुळे सत्रसंचालकांना सत्र सुरु करतांना अनंत अडचणी येत होत्या आणि त्यात बराच वेळही वाया जात होता. ह्या इ-संमेलनाआधी सराव सत्र घेऊन सदस्यांना आणि श्रोत्यांना स्काईपबद्दलची पूर्ण माहिती,ध्वनीग्राहक (मायक्रोफोन) जोडणी,देवनागरीतून लेखन करण्यासाठी बरहा आयएमईचा वापर कसा करायचा वगैरे तांत्रिक माहिती पूरवून आम्ही आमच्या परीने खबरदारी घेतलेली होती...पण बरेचजण अशा सराव सत्रांना त्यांच्या त्यांच्या वैयक्तिक कारणांमुळे हजर राहू शकले नाहीत....अशा लोकांच्या आयत्यावेळी येण्यामुळे खूपच गोंधळ उडत होता. तरीही भगीरथ प्रयत्नांनी आम्ही सगळे त्यावर बर्‍यापैकी मात करून संमेलन यशस्वी करू शकलो...हेही नसे थोडके. मात्र एकच सांगतो...सभासदांनी  स्काईपचा योग्य वापर कसा करावा....संमेलनाच्या वेळी काय काळजी घ्यावी ह्याबद्दलच्या सूचना नीट समजून घेऊन त्या जर व्यवस्थितपणे अंमलात आणल्या असत्या तर कदाचित वाया गेलेल्या वेळात अजून एखादे सत्र होऊ शकले असते असे अतिशयिक्तीने म्हणावेसे वाटते.  ;)  असो....

ह्यावेळच्या शब्दबंधमध्ये एकूण ३० अभिवाचकांनी आपापले साहित्य वाचून दाखवले. कविता,प्रवासवर्णन,कथा,ललित लेखन,माहितीप्रद तसेच ऐतिहासिक महत्वाचे,विनोदी तसेच गंभीर, विचार करायला प्रवृत्त करणारे, करूण,भावूक करणारे असे विविध रसांनी नटलेले साहित्यप्रकार अभिवाचकांनी आपापल्या आवाजात सादर केले.

गेले दोन-अडीच महिने ह्या संमेलनाची तयारी सुरु होती.
ह्यावेळी संमेलनाचा संयोजक होता संग्राम भोसले. त्याला मदतनीस म्हणून मी आणि प्रशांत मनोहर होतो.
सभासदांना सराव सत्रापासूनच मी आणि विनायक रानडे हे तांत्रिक सहकार्य करून त्यांच्या समस्यांचे निराकरण करण्याचा यशस्वी प्रयत्न करत होतो.

ह्या संमेलनात अभिवाचक म्हणून सामील झालेले :

१)संग्राम भोसले(पुणे), २) प्रशांत मनोहर(नागपूर), ३) मी(मुंबई),४) प्रभाकर फडणीस(मुंबई)
५) विनायक रानडे(पुणे), ६)  नरेंद्र गोळे(डोंबिवली), ६) जयंत कुलकर्णी(पुणे), ७) आशा जोगळेकर(अमेरिका),
८) श्रीराम पेंडसे(पुणे), ९) संतोष साळुंके(मलेशिया), १०) तुषार जोशी(नागपूर), ११) हर्षा स्वामी (पुणे),
१२) अमोल वाघमारे, १३) प्रतिमा मनोहर(नागपूर), १४) विद्याधर भिसे(मुंबई),
१५) अमेय धामणकर(ठाणे), १६) राहूल पाटणकर(पुणे), १७) महेंद्र कुलकर्णी(मुंबई),
१८) नीलेश गद्रे(ऑस्ट्रेलिया), १९) अपर्णा लळिंगकर(बंगळुरु), २०) मीनल वाशीकर(कोल्हापूर),
२१) मीनल गद्रे(अमेरिका), २२) प्राजक्ता पटवर्धन(अमेरिका), २३) हेरंब ओक(अमेरिका),
२४) शंतनू देव(कॅनडा), २५) संगीता गोडबोले(अमेरिका), २६) भाग्यश्री सरदेसाई(अमेरिका),
२७) नचिकेत कर्वे (अमेरिका), २८) अपर्णा संख्ये(अमेरिका), २९) समीर सामंत(मुंबई)
आणि ३०) श्रीकांत शिरभाटे

संमेलनात श्रोते म्हणून सामील झालेले....
१) अनिकेत वैद्य(पुणे), २) रविंद्र जाधव,(मुंबई), ३) आनंद पत्रे(हैद्राबाद), ४) सागर बाहेगव्हाणकर(पुणे),
५) सुरेश पेठे(पुणे), ६) नंदन होडावडेकर (अमेरिका), ७) प्रशांत काळकर(पुणे) इत्यादि.

खास,संमेलनाच्या वृत्तांत संकलनासाठी सकाळचे सहाय्यक संपादक सम्राट फडणीसही बहुतेक सत्रांमध्ये उपस्थित होते.

हा झाला थोडक्यात वृत्तांत. बाकी सविस्तर वृत्तांत इतर मंडळी लिहितीलच.  :)