माझ्या आयुष्यातील आजवरच्या कडू-गोड आठवणी मी "पूर्वानुभव" म्हणून सादर करत आहे.
आपण इथे आल्याबद्दल मन:पूर्वक धन्यवाद!

७ फेब्रुवारी, २०१२

होळी विशेषांक २०१२ संबंधीचे निवेदन!

मंडळी लक्ष देवून वाचा.
२०१० च्या पहिल्या होळी विशेषांकानंतर जालरंग प्रकाशन आणत आहे तिसरा होळी विशेषांक २०१२.
ह्या अंकाचे प्रकाशन होळीच्या दिवशी होईल.
ह्या अंकासाठी फक्त हास्यवर्धक अर्थातच विनोदी साहित्य पाठवायचंय. ह्यामध्ये विनोदी कथा/कविता/विडंबनं/उपहासगर्भ लेखन/वात्रटिका/व्यंगचित्रं/विनोदी स्वरूपाचं अभिवाचन/प्रहसन वगैरे पद्धतीचे लेखन/ध्वनीमुद्रण अपेक्षित आहे.एखादा फजितीचा प्रसंग..स्वत:विषयीचा/दुसर्‍या विषयीचा किंवा कुणाची तरी घेतलेली फिरकी..अशा कोणत्याही प्रासंगिक विनोद निर्मिती करणार्‍या घटना...गद्य/पद्य स्वरूपात आपण पाठवायच्या आहेत. मात्र एक गोष्ट जाणीवपूर्वक लक्षात ठेवावी की कोणत्याही प्रसिद्ध हयात/मृत व्यक्तीची नावानिशी टिंगलटवाळी केलेली चालणार नाही.
ह्या अंकासाठी जे साहित्य येईल त्यात कोणतेही संपादन केले जाणार नाही अथवा लेखन नाकारण्यात येणार नाही...फक्त टंकलेखनात काही चुका असतील तर त्याच सुधारल्या जातील. बाकी लेखातील मजकुराची जबाबदारी संपूर्णपणे त्या त्या लेखक/लेखिकेची असेल हे लक्षात ठेवावे.एखाद्याने पाठवलेल्या साहित्यात काही आक्षेपार्ह/संदर्भहीन मजकूर असल्यास त्याच्याशी वैयक्तिक संपर्क साधून साहित्यात योग्य तो बदल करून देण्याची विनंती करण्यात येईल.अशा परिस्थितीत त्या व्यक्तीने काही बदल करण्यास नकार दिल्यास नाईलाजाने आम्हाला ते साहित्य नाकारावे लागेल.
आपले लेखन पाठवण्याची शेवटची तारीख आहे.... ४ मार्च २०१२ (भारतीय वेळेप्रमाणे रात्री बारा वाजेपर्यंत).
साहित्य पाठवण्याचा पत्ता  jaalarangaprakaashana@gmail.com
विशेष सूचना: कृपा करून लेखन पीडीएफ स्वरूपात पाठवू नये. तसेच पूर्वप्रकाशित साहित्य पाठवू नये. ताजे आणि नवे साहित्य ह्या अंकासाठी पाठवावे आणि हा अंक प्रकाशित होईपर्यंत ते साहित्य जाहीरपणे अन्यत्र कुठेही प्रकाशित करू नये ही विनंती.
तेव्हा मंडळी आता लागा तयारीला आणि लवकरात लवकर पाठवा आपले साहित्य.
खास आकर्षण: ह्या अंकाचे संपादकीय आपले सगळ्यांचे मित्र श्री हेरंब ओक हे लिहिणार आहेत.

५ फेब्रुवारी, २०१२

मौनीबाबा झालाय माझा!

ज्याला जी गोष्ट करायला जास्तीत जास्त आवडते तीच करायला परिस्थितीवशात एखाद्यावर काही काळासाठी बंदी आली तर?
तुम्ही म्हणाल,कसले भलते सलते प्रश्न हल्ली तुमच्या डोक्यात येतात हो....साठी बुद्धी नाठी...दुसरं काय?
चांगलं लिहावं,वाचावं...झालंच तर गप्पा माराव्यात,गाणी म्हणावीत....
झालं! सगळंच मुसळ केरात की हो...अहो मीही तेच सांगत होतो तुम्हाला...गेला आठवडाभर मला खोकल्याने हैराण केलंय... गाणी म्हणणं सोडा हो..नुसतं गाण्याचा मनात विचार आला तरी ढास लागतेय...दोन शब्द बोलायलाही मारामार झालेय....औषधं घेतोय..अगदी वेळच्या वेळी,सगळी काळजीही घेतोय....पाहिलंत ना तोंडावर फडकं बांधलंय ते? पण हा खोकला काही पाठ सोडायला तयार नाहीये....हितचिंतक सल्ला देताहेत त्याला लवकरात लवकर पळवा..लवकर बरे व्हा....मलाही तसंच वाटतंय हो....पण

आता हा पण काय आणखी?
सांगतो हो....काय तो अभंग आहे...आयला आठवायचा प्रयत्न करतोय तर आठवण्याऐवजी खोकलाच येतोय की राव....हं,आत्ता आठवला....
देवाचिये द्वारी, उभा क्षणभरी, त्याने मुक्ती चारी साधियेल्या....असा काहीसा अभंग आहे बघा....
हा खोकला, तशाच मिषाने आला की हो माझ्याकडे...पण आता म्हणतो...नाऽऽही! अजिबात नाही जाणार इतक्या लवकर! मलाही राहायचंय तुझ्याबरोबर! उठसुठ कशाला ती गाणी गायची? जरा आम्हाला पण बागडू दे की तुझ्या मुखी!
आता,हा असा बोलायला लागला तर मलाही प्रश्न पडला की हो....खरा नसलो म्हणून काय झालं आडनावाचा तरी देव आहे ना...मग त्या आडनावाला जागायला नको....भले त्याचा आडफायदा...म्हणजे गैरफायदा हो... तो खोकला घेऊ दे...आपण आपल्या नावाला...त्येच त्ये हो...आड, आडनावाला जागायला नको? म्हणून सद्द्या त्याला म्हटलं..बाबा रे, किती दिवस राहायचे तेवढे दिवस राहा...मी पण कैक वर्षात गप्प बसलेलो नाहीये...तेव्हा जरा तेवढंच मौनव्रत पाळतो...तुला जेवढं काही माझ्या मुखात...खरं तर नरड्यात म्हणणार होतो.....वास करायचा असेल...वास म्हणे रहिवास हो...इतकं शिंपल तुमच्यासारख्या जंटलमन लोकांला समजू नये?....हं तर म्हटलं..तुला जितका वेळ वास करायचा असेल कर बाबा...तुही खूश हो! मी आपला मौनीबाबाच बनतो.

असो...तर मंडळी, ह्या मौनामुळे एक फायदा झाला...बोलता येत नाही, गाता येत नाही मग आता करायचं काय हा माझ्यासारख्या बडबड्या माणसापुढे यक्षप्रश्न निर्माण झाला...पण काही नाही..त्यावरही तोडगा निघाला...कुठेतरी वाचलं होतं...समस्येमुळे  तुमचा एक मार्ग बंद झाला असं जरी क्षणभर वाटलं तरी ते तसं नसतं...दुसर्‍या ठिकाणी कुठे तरी वाट सापडते...आपण ती शोधायची असते....माझंही तसंच झालं..काही काळ मी निर्बुद्ध मनाने बसून होतो...मग एका क्षणी साक्षात्कार झाला....अरेच्चा...इतके दिवस आपण चाली लावत होतो, स्वत:च गात होतो....त्या सगळ्याकडे कधी एका त्रयस्थ श्रोत्याच्या दृष्टीकोनातून पाहिले आहे काय?
नाही...असेच उत्तर होते....मग? आता कसली वाट पाहतो आहेस...आताचा वेळ लाव सत्कारणी...कर त्या गोष्टींचा विचार....शोध त्यातल्या त्रुटी, शोध त्यातलं सौंदर्य...आणि मी लगेच कामाला लागलो....

मंडळी, खरंच सांगतो....माझ्या काही चाली पुन्हा नव्याने ऐकल्या....बर्‍याचशा आवडल्या..काही अगदीच सामान्य वाटल्या....पण त्यांच्यात सुधारणा करता येईल असेही लक्षात आले.....गाण्याच्या बाबतीत सांगायचे तर ताल...तो आधीपासूनच कच्चा आहे....पण बर्‍याचदा अधेमधे किंचित सूरही घसरतोय....किमान तो तसा घसरता कामा नये.....मनातल्या मनात नोंदी करतोय...पुन्हा नरडं गाण्यालायक झालं की आता ह्या गोष्टीतही नक्कीच सुधारणा घडवून आणण्याचा प्रयत्न करणार आहे.....तालाच्या बाबतीत मात्र अजून काही मार्ग दृष्टीपथात दिसत नाहीये...आधी मला माझ्या शरीराचे घड्याळच सुधारावे लागेल...बहुदा त्यातूनच ताल जागेवर येईल....पाहूया...प्रयत्न करणं माझ्या हाती आहे...बाकी यश मिळेल न मिळेल...काहीच माहीत नाही.
(वेळ जात नाही म्हणून काही तरी खरडलंय..फारसं मनावर घेऊ नका.)