माझ्या आयुष्यातील आजवरच्या कडू-गोड आठवणी मी "पूर्वानुभव" म्हणून सादर करत आहे.
आपण इथे आल्याबद्दल मन:पूर्वक धन्यवाद!

२७ जून, २००८

मराठी सुगम संगीतातील नररत्ने! ३ स्नेहल भाटकर!


स्नेहल भाटकर,भाटकर बुवा,व्ही.जी.भाटकर,वासुदेव भाटकर,बी वासुदेव! एकाच माणसाची ही अनेक नावे. ज्येष्ठ-श्रेष्ठ गायक-संगीतकारांपैकी एक नाव म्हणजे आपल्या सर्वांना परिचित असलेले स्नेहल भाटकर.त्यांचे पूर्ण नाव आहे वासुदेव गंगाराम भाटकर .आकाशवाणीच्या नोकरीत राहून देखिल संगीत दिग्दर्शनाचा व्यवसाय करता यावा म्हणून शोधलेला, नियमाला बगल देणारा हा मार्ग होता. ह्यातील स्नेहलता हे त्यांच्या मुलीचे नाव.त्यातील स्नेहल घेऊन केदार शर्मा ह्यांनी सुहागरात ह्या चित्रपटाच्या वेळी त्यांचे स्नेहल भाटकर असे नव्याने बारसे केले. नोकरीत म्हणजे आकाशवाणी मध्ये ते व्ही.जी भाटकर म्हणून वावरले तर भजनी मंडळात भाटकरबुवा म्हणून वावरले. संगीतकार आणि गायक म्हणून कधी स्नेहल तर कधी वासुदेव भाटकर हे नाव घेऊन वावरले.अतिशय साध्या सरळ आणि सुश्राव्य अशा चाली देण्यात त्यांचा हातखंडा होता.

भाटकरांचे नाव उच्चारले की जुन्या मंडळींना चटकन कभी तनहाईयों मे युँ, हमारी याद आयेगी हे मुबारक बेगम च्या आवाजातील सदाबहार गीत आठवते. खरे तर हे गीत भाटकरजींना लतादीदींच्या आवाजात ध्वनीमुद्रित करायचे होते; पण ठरलेले असूनही लागोपाठ तीन दिवस लतादीदी तिथे फिरकल्याच नाहीत हे पाहून कोणतीही तक्रार न करता त्यांनी हे गाणे मुबारक बेगमच्या आवाजात ध्वनिमुद्रित केले आणि मग पुढचा त्या गाण्याने जो इतिहास घडवला तो सर्वश्रुतच आहे.

भाटकरांचा जन्म १७ जुलै १९१९ मध्ये मुंबईच्या प्रभादेवी येथे झाला.गोड गळ्याची देणगी त्यांना त्यांच्या आईकडूनच मिळाली होती. आईलाच ते आपला पहिला गुरु मानतात. त्या नंतर श्रीकृष्ण संगीत विद्यालयात त्यांनी संगीताचे शिक्षण घेतले. तसेच आजुबाजुच्या त्या परिसरात नियमितपणे भजनं चालत, त्यातही ते उत्साहाने भाग घेत आणि "ह्यातूनही आपण बरेच शिकलो" असे ते प्रांजळपणे नमूद करतात.ह्या भजनांचा परिणाम त्यांच्या संपूर्ण आयुष्यावर झालेला दिसतो की ज्यामुळे त्यांचा स्वभाव अतिशय निगर्वी आणि समाधानी झाला.कलेच्या ह्या क्षेत्रात ते अजातशत्रू राहिले ते ह्याच स्वभावामुळे. म्हणूनच आयुष्यभर त्यांनी ह्या भजनांची साथ कधीच सोडली नाही. भजनी मंडळात ते भाटकरबुवा म्हणूनच प्रसिद्ध होते.

१९३९ साली त्यांनी एचएमव्हीत पेटीवादक म्हणून नोकरी पत्करली पण पुढे आपल्या स्वत:च्या कुवतीवर ते संगीतकार म्हणून नावारुपाला आले. १९४४ च्या सुमारास बाबुराव पेंटर ह्यांच्या रुक्मिणी स्वयंवर ह्या चित्रपटाला संगीत देण्यासाठी त्यांची सुधीर फडके ह्यांच्याबरोबरीने निवड झाली आणि मग वसुदेव-सुधीर ह्या नावाने त्या चित्रपटाला त्या दोघांनी संगीत दिले.गंमत म्हणजे ह्यांतील भाटकरांनी संगीत दिलेली काही गाणी बाबुजींच्या पत्नी ललिता फडके ह्यांनी गायलेली होती.

केदार शर्मा ही व्यक्ती भाटकरबुवांच्या आयुष्यातील एक अती महत्वाची व्यक्ती होती. सुरुवातीच्या उमेदवारीच्या काळात केदार शर्मांनी बुवांना जो हात दिला त्याचा विसर कधीही पडू न देता केदार शर्मांच्या पडत्या काळातही पैसे न घेता बुवांनी त्यांच्या चित्रपटांना संगीत दिलंय.बुवांचे वैषिष्ठ्य हे की त्यांनी राज कपूरने पहिल्यांदाच नायक म्हणून काम केलेल्या नीलकमल ह्या चित्रपटातील त्याच्या तोंडच्या गाण्यासाठी आपला आवाज उसना म्हणून दिलेला आहे.ह्या चित्रपटाचे संगीतकार देखिल ते स्वत:च होते. इथे त्यांनी बी वासुदेव हे नाव धारण केलेले होते.तसेच मधुबाला,तनुजा,गीताबाली,नूतन इत्यादिंच्या चित्रपट पदार्पणातील पहिल्याच चित्रपटांना त्यांनी संगीत दिलंय.आधी नायिका म्हणून गाजलेल्या आणि नंतर निर्मात्या बनलेल्या कमळाबाई मंगरुळकर,कमला कोटणीस,शोभना समर्थ वगैरे स्त्री निर्मात्यांच्या पहिल्या चित्रपटांनाही बुवांनीच संगीत दिलंय.

नीलकमल,सुहागरात,हमारी बेटी,गुनाह,हमारी याद आयेगी,प्यासे नैन,भोला शंकर,आजकी बात,दिवाली की रात,पहला कदम इत्यादि हिंदी चित्रपटांना त्यांनी दिलेलं संगीत खूपच गाजलंय. तसेच मराठीतील रुक्मिणी स्वयंवर,चिमुकला पाहुणा,नंदकिशोर,मानला तर देव,बहकलेला ब्रह्मचारी इत्यादि चित्रपटांचे संगीतही विलक्षण गाजलंय.नंदनवन,राधामाई,भूमिकन्या सीता,बुवा तेथे बाया इत्यादि नाटकांचे संगीतही चांगलेच गाजलेय.

सी. रामचंद्र उर्फ रामचंद्र तथा अण्णा चितळकर हे बुवांचे खास मित्र होते. एकदा अण्णांनी बुवांना आयत्या वेळी बोलवून घेतले आणि त्यांच्या बरोबरीने एका कव्वालीचे ध्वनिमुद्रण केले. खरे तर ही कव्वाली अण्णा महंमद रफीच्या साथीने गाणार होते पण ऐन वेळी रफीसाहेब येऊ न शकल्यामुळे त्यांनी ती बुवांच्या साथीने गायली.ही कव्वाली संगीता चित्रपटातील आहे ज्याचे संगीत सी. रामचंद्र ह्यांचे होते. सी. रामचंद्र ह्यांच्याबरोबरच्या गमती जमती आणि अजूनही काही खास गोष्टी इथे वाचा.

भाटकर बुवांच्या संगीताने नटलेली आणि विशेष गाजलेली मराठी गाणी अशी आहेत.
१) झोंबती अंगा जललहरी,आमुची वसने दे श्रीहरी
२)तुझ्या कांतिसम रक्तपताका पूर्वदिशी फडकती
अरुण उगवला, प्रभात झाली, ऊठ महागणपती
३)दहा वीस असती त्या रे, मने उद्धवा !
एक मात्र होते ते मी दिले माधवा
४)एक एक पाउल उचली, चाल निश्चयाने
नको बावरूनि जाऊ नियतीच्या भयाने !
५) मज नकोत अश्रू घाम हवा
हा नव्या युगाचा मंत्र नवा ! गायिका: सुमन कल्याणपुर; चित्रपट : अन्नपुर्णा


६)तुजसाठी शंकरा भिल्लीण मी झाले, धुंडित तूज आले. गायिका: लता मंगेशकर; चित्रपट: चिमुकला पाहुणा
७)प्रीतीचा नव वसंत फुलला, हृदयांतरी खुलला
नव्या नवतीचा नवलाईचा, बागदिलाचा दरवळला. गायिका:लता आणि आशा भोसले; चित्रपट: या मालक

८)खेळेल का देव माझिया अंगणी ?
नांदेल का माझ्या भरल्या लोचनी ? गायिका: ज्योत्स्ना भोळे; नाटक: राधामाई

९)मानसी राजहंस पोहतो
दल दल उघडित नवनवलाने कमलवृंद पाहतो ।

१०)सुखद या सौख्याहुनि वनवास
राजगृही या सौख्य कशाचे, सौख्याचा आभास ॥ गायिका: ज्योत्स्ना भोळे; नाटक : भूमिकन्या सीता

स्वत: भाटकरबुवांनी गायलेले असंख्य अभंग आहेत.त्यातले काही चटकन आठवणारे....
१)आपुल्या माहेरा जाईन मी आता
२)काट्याच्या आणिवर वसले तीन गाव
३)जववरी रे जववरी,जंबूक करी गर्जना
४)वारियाने कुंडल हाले,डोळे मोडित राधा चाले
५)काय सांगु देवा ज्ञानोबाची ख्याती
अशा ह्या असामान्य कलाकाराचे वयाच्या ८८ व्या वर्षी २९मे २००७ रोजी निधन झाले. आज भाटकर साहेब आपल्यात नसले तरी त्यांनीच संगीतबद्ध केलेल्या गाण्यातले शब्द उसने घेऊन म्हणता येईल....
"कभी तनहाईमें तुमको हमारी याद आयेगी, अंधेरे छा रहे होंगे कि बिजली कौंध जायेगी!"

(सर्व माहिती आणि छायाचित्रं महाजालावरून साभार.)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: