माझ्या आयुष्यातील आजवरच्या कडू-गोड आठवणी मी "पूर्वानुभव" म्हणून सादर करत आहे.
आपण इथे आल्याबद्दल मन:पूर्वक धन्यवाद!

८ जुलै, २०११

चंशिकुम! ११

गाडीत बसता बसताच रिमझिम पाऊस सुरु झालेला होता....पाहता पाहता तो तुफान वेगाने कोसळू लागला. आजुबाजुचे सगळे आसमंत ढगाळ भासू लागले...समोर जेमतेम सात-आठ फुटांवरचा रस्ता फक्त दिसू लागला...बाकी सगळीकडे ढगच ढग...आम्ही जणू ढगातूनच प्रवास करत होतो...साहजिकच आता गाडीचा वेग अतिशय मर्यादित ठेवावा लागत होता.

मुंबईत हवा तेवढा घनघोर पाऊस आयुष्यभर अनुभवलेला आहे त्यामुळे पावसाचे फारसे नाविन्य नाही...पण इथे आम्ही त्या ढगातच वावरत होतो...ज्यातून पडणारा पाऊस फक्त आम्ही अनुभवत असतो...आजचा हा अनुभव अगदी विलक्षणच होता.
आता आजुबाजूला काय पाहायचं म्हणून स्वस्थ बसलो होतो...इतक्यात लक्ष खाली गेलं आणि...

अहाहा,काय दृष्य होतं ते...खाली उतरून जाणारी बियास नदी..अगदी खोल खोलपर्यंत दिसत होती.तशातच डोंगरातला वळणावळणांचा उतरता रस्ता आणि त्यावरील वाहनं,झाडी इत्यादि विहंगम दृष्यही मोहवून टाकणारं होतं...मी लगेच प्रग्रा सावरला आणि त्याची काही छाचि उतरवून घेतली.

निसर्गाचं ते ओलेतं रूप न्याहाळतच आम्ही घाट उतरलो. रस्त्यात एका ठिकाणी सोलांग व्हॅली नावाचं अजून एक पर्यटन स्थळ लागलं....हिवाळ्यात इथे लोक बर्फातून घसरण्याचा खेळ(स्किईंग) करायला येतात असं कळलं. आत्ता इथे बर्फ वगैरे काही नव्हतं...पण आकाशात उडण्याचा...पॅरा ग्लाईंडिंगचा खेळ खेळता येतो असं आमच्या चालकाने सांगितलं...आम्ही चारजण गाडीच्या बाहेर पडलो....अजूनही पाऊस सुरुच होता...मात्र आता तो खूपच कमी झालेला होता...गाडी थांबली तिथून साधारण दहा मिनिटांच्या अंतरावर चालत जायचं होतं म्हणून आम्ही निघालो...माझ्या मनात केव्हापासून पॅरा ग्लाईडिंगचा अनुभव घ्यायचे घोळत होते...अनायासे संधी आलेय तर साधून घेऊ ह्या हिशोबाने आम्ही सगळे झपझप चालत त्या केंद्राजवळ पोचलो...पण आमचं दूर्दैव हे की पावसाळी हवामानामुळे सद्द्या ते बंद ठेवलेलं होतं...त्याच बरोबर इतर काही बारीक-सारीक खेळही बंद होते...तिथे, लोकांची बरीच गर्दी जमलेली होती पण सगळेच जण खट्टु दिसत होते...इतक्या लांब येऊन अपेक्षाभंग झाल्याचे दु:ख प्रत्येकाच्या चेहर्‍यावर ठळकपणाने जाणवत होते.

आम्ही तिथे एक फेरी मारली...हवेतला गारवा चांगलाच जाणवत होता म्हणून मस्तपैकी कॉफी प्यायली आणि परतीचा रस्ता धरला...आमचे सहलप्रमुख आणि त्यांची कन्या पुढे आणि मी आणि त्यांचा पुत्र मागे असे चालत निघालो....अचानक सप्र मागे वळून म्हणाले...अरे,काय हे दगड कशाला मारताय?
आम्ही, मागचे दोघेही अचंबित झालो...हे असे काय अचानक वेड्यासारखे बोलताहेत?
त्यांना आम्ही काही बोलणार...इतक्यात आम्हालाही तसाच दगडांचा प्रसाद मिळायला सुरुवात झाली....हे काय आक्रित घडतंय म्हणून आम्ही आजुबाजूला पाहायला सुरुवात केली आणि.....लक्षात आलं की ते दगड वगैरे काही नव्हते तर आकाशातून चक्क आमच्यावर गारांचा मारा सुरु झालेला होता....आयुष्यातला हा पहिलाच प्रसंग होता की आम्ही गारांचा अनुभव घेत होतो....गारा लहान बोराएवढ्या होत्या पण चांगल्याच शेकवत होत्या...माझ्या डोक्यावर टोपी होती म्हणून मी वाचलो...पण बाकीच्यांच्या डोक्यावर ठपाठप गारा आपटत होत्या....गारांच्या त्या अनपेक्षित माराने क्षणभर आम्ही बावचळलो खरे पण नंतर मग त्या गारा झेलण्यासाठी,वेचण्यासाठी आमच्यात स्पर्धा सुरु झाली.
गारा हातात सहजासहजी येत नव्हत्या. हुलकावणी देऊन निसटत होत्या...कधी एखादी गार हातात आलीच तर हाताच्या उष्णतेने पाहता पाहता विरघळत होती....कमाल ह्याची वाटली की अंगाला,डोक्याला आपटणार्‍या,टणक वाटणार्‍या त्या गारा हातात येताक्षणी कशा अगदी सहजपणाने विरघळत होत्या.
आजुबाजूला ,झाडां-झुडपांनी,गवतांनी तर जणू हिरे-मोती धारण केले होते...ते विलोभनीय दृश्य टिपायला प्रग्रा नव्हता...पाऊस पडत असल्यामुळे मी तो गाडीतच सोडून आलो होतो.
आता पावसाचा आणि गारांचा तडाखा चांगलाच जाणवू लागला होता त्यामुळे आम्ही तो खेळ सोडून देऊन झपाझप गाडीच्या दिशेने चालायला लागलो.

गाडीत बसेपर्यंत चांगलेच भिजलो होतो...अंगात घातलेला  स्वेटर ओला झाल्यामुळे मी काढून टाकला आणि थंडी जास्त जाणवायला लागली....गाडीच्या पुढच्या काचेवर पावसाच्या पाण्याबरोबरच येऊन आदळणार्‍या गारांचा खेळ पाहातच आमचा हॉटेलवर परतीचा प्रवास सुरु झाला....वाटेत पुन्हा एकदा थांबून सकाळी घेतलेला...बर्फात खेळण्यासाठीचा जामानिमा परत करून आम्ही हॉटेलवर परतलो...दुपारचा चारचा सुमार असूनही चांगलेच अंधारलेले होते.

हॉटेलात येताक्षणी आधी ओले कपडे काढून चांगले कोरडे कपडे चढवले. सकाळी रोहतांगला न्याहरी केली होती त्यानंतर सोलांगला कॉफी प्यायली...ह्या व्यतिरिक्त पोटात काहीच गेले नव्हते. आता जेवणाची वेळ तर केव्हाच टळून गेली होती म्हणून मग दुपारची न्याहरी मागवली.

पाचच्या सुमारास पाऊस थांबला आणि आम्ही स्थानिक स्थलदर्शनासाठी बाहेर पडलो.आता बाहेर चांगलाच गारठा निर्माण झाला होता. माझ्या अंगात थंडी भरायला लागली होती आणि माझा एकमेव स्वेटर तर ओला झाला होता...मग काय माझ्या कन्येचं पावसाळी जाकिट  घालून बाहेर पडलो...पण माझी थंडी काही कमी होईना..वाटेत पुन्हा कुठे कॉफी मिळाली तर पिऊ असा विचार करून मी कसाबसा थंडी थोपवण्याचा विचार करत होतो....
तसं पाहायला गेलं तर काही फारसं पाहण्यासारखं नव्हतं म्हणा...पण आलोच आहोत तर जाऊन येऊ म्हणून हजेरी लावली...त्यातलं एक आहे हिंडिंबा मंदिर!  हिडिंबा मंदिराचा परिसर बाकी मस्त आहे...उंचच उंच अशा (बहुदा) देवदार वृक्षांनी नटलेला आहे. दर्शनासाठीची हीऽऽऽऽऽऽ मोठी रांग पाहून आमच्या बरोबरची मंडळी फक्त बाहेरूनच ओझरतं दर्शन घेऊन परतली...ह्या मंदिराच्या आवारातच आमच्यातल्या तरूण मुलींनी हातात ससा घेऊन आपापली छाचि काढून घेतली..एकेक ससे कसले पोसलेले होते !!!
त्यानंतर मुलींनी हिमाचलच्या वेशभुषेतली छाचि काढून घेतली...त्या तिथल्या बायका काही म्हणता पिच्छा सोडीनात..मग काय मुलींचा नाईलाज झाला...तसंही मुलीना नटायला नेहमीच आवडतं म्हणा...म्हणून हो,नाही करता करता त्या तयार झाल्या ती वेशभुषा करायला.  :)

असो.त्यानंतर तिथल्याच एका राष्टीय उद्यानात थोडा फेरफटका मारून आम्ही गेलो बुद्धमंदिर पाहायला. ते पाहून झाल्यावर मंडळी रमत गमत खरेदी, अधिक नुसत्याच चौकश्या करत फिरायला लागली...इथे मला थंडी अजिबात सोसवेना...अंग थरथरायला लागलं होतं...मला माहीत असलेले सगळे श्वसनाचे...कपालभाती इत्यादि प्रकार करून पाहिले पण अंगात काही उष्णता निर्माण होईना...आजूबाजूला कुठेच चहाची टपरी किंवा तत्सम काही दिसेना...आणि मंडळी आपली गुंतलेली होती आपल्याच नादात....शेवटी मी कन्येला एका बाजूला बोलावून सांगितले...मी पुन्हा  मागे जातो...कुठे गरमागरम चहा-कॉफी काही मिळेल का ते पाहतो...तू ह्यांच्याबरोबरच राहा...वेळप्रसंगी भटक्यावर संपर्क साध....तिच्या हो-नाहीची वाटही न पाहता मी पुन्हा हमरस्त्याच्या(माल रोड...इथे मनालीतही आहे..शिमल्याप्रमाणे) वाटेला लागलो.

माझ्या सुदैवाने मला फार नाही चालावं लागलं...वळणावरच एक चांगल्यापैकी क्षुधाशांतिगृह होतं...पाटी दिसली..मद्रास कॅफे.. म्हणून घुसलो...तर कळलं की ते पहिल्या मजल्यावर आहे...मग जिना कुठे आहे ते शोधण्यात पाच मिनिटं गेली..मिळाला एकदाचा...मी वर गेलो. आतमध्ये फारशी गर्दी नव्हती पण हॉटेल ऐसपैस होतं...कडेचीच एक खुर्ची पकडून ’एक कडक फिल्टर कॉफी’ अशी ऑर्डर दिली...पण तो बैरा नुसता पाहातच राहिला माझ्याकडे...असं का पाहतोय? म्हणून विचारलं तर म्हणाला...साब,फिल्टर कॉफी नही है,नेसकाफी है,लाऊं?
मी म्हटलं...अरे जे काही असेल ते आण पण एकदम कडक आणि गरम आण...तो गेला आणि मी वाट पाहात बसलो...दहा मिनिटं लावलीन बेट्याने...मी आपला इथे कुडकुडतच होतो. शेवटी एकदाची ती कॉफी आली...दोनचार घोट पोटात गेले आणि जरा धुगधुगी आली...जीवात जीव आला...मग हळूहळू चवीने कॉफीपान संपवून मी पैसे द्यायला व्यवस्थापकाकडे गेलो आणि त्याला म्हणालो....मद्रास कॅफे नाम लिख्खा है और तुम्हारे पास फिल्टर कॉफी नही है?
तो माझ्याकडे पाहात म्हणाला...साब,ये खाली मद्रास कॅफे नही है...आगे भी क्या लिख्खा है देखो ना!
मी पाहिलं तर...मद्रास कॅफे और पंजाब. हिमाचल हॉटेल असे काहीसे धेडगुजरी समीकरण दिसलं....
क्या है ना साब,हम लोक इधरकेही है...लेकिन बाहरके लोग भी आते है ना, इसीलिये उनका भी नाम शामिल किया है हाटिलके नाममे...वो देखो, गुजराथी थाली,पंजाबी थाली...सब इधर मिलता है!

जाऊ द्या झालं...कॉफी मिळाली ना....उगाच खोलात कशाला शिरा..म्हणून मी पैसे देऊन तिथून सटकलो. खरं तर मनात अनेक प्रश्न निर्माण झाले होते...सगळीकडे, जाईन तिथे गुजराथी,पंजाबी थाळी मिळते...पण महाराष्टीय थाळी कुठेच नाही....अहो कुठेच काय? खुद्द मुंबईतही शोधल्याशिवाय सहजासहजी मिळत नाही...तिथे इतरत्र,महाराष्ट्राबाहेर कशी मिळेल म्हणा!


३ टिप्पण्या:

विनायक पंडित म्हणाले...

खूपच छान काका! तळाची छायाचित्रे तर अप्रतिमच!

चैताली आहेर. म्हणाले...

मस्त लेख आहे काका.... छायाचित्रे पण सही....!
मला तुमचा blog follow करायचा आहे पण कुठे link दिसत नाही काय करू..??

प्रमोद देव म्हणाले...

विनायकराव आणि चैताली, अभिप्रायाबद्दल मन:पूर्वक धन्यवाद!
चैताली,
लेखाच्या खाली...
याची सदस्यता घ्या: पोस्ट (Atom)....असे लिहिलेलं दिसेल. त्यावर टिचकी मार आणि पुढील सुचनांप्रमाणे कर.