माझ्या आयुष्यातील आजवरच्या कडू-गोड आठवणी मी "पूर्वानुभव" म्हणून सादर करत आहे.
आपण इथे आल्याबद्दल मन:पूर्वक धन्यवाद!

२९ जून, २०११

चंशिकुम! १०

बर्फात खेळायला गेलो खरे...पण मी काही खेळलो नाही...त्याची दोन कारणं..एक तर गळ्यात प्रग्रा होता आणि आजुबाजूचे सृष्टीसौंदर्य,माणसांच्या हालचाली टिपण्यातच मी दंग होतो...हे एक कारण. दुसरं असं की बर्फात खेळायचा जामानिमा मी केव्हाच उतरवून गाडीत ठेवलेला होता...त्यामुळे साध्या कपड्यात बर्फात खेळण्यात ती मजा नव्हती...उगाच थंडी बाधायची आणि आजारपण उद्भवून सहलीचा मजा किरकिरा व्हायचा...माझ्या बरोबर असणार्‍यांनी मात्र तो मजा त्यांना हवा तसा लुटला.

बर्फातला मुख्य खेळ म्हणजे घसरगुंडी...लोक ते जाणतेपणाने आणि अजाणतेपणानेही खेळत होते....जाणतेपणाने म्हणजे...काही साधनांचा वापर करून...आणि अजाणतेपणाने म्हणजे...बर्फावरून चालतांना तसंही घसरायला होत होतंच...मीही एकदोनदा चांगलाच घसरलो...बरोबरच्या लोकांनी वेळीच आधार दिला म्हणून बरं...नाही तर माझा प्रग्राही बिघडला असता....त्यामुळे त्यानंतर मी बर्फाच्या बाहेरूनच इतरांच्या खेळाची मजा पाहात उभा होतो.

तास-दोन तास खेळल्यानंतर साहजिकच त्यातली गंमत कमी झाली,उत्साह मावळला आणि पोटात भूक जाणवू लागली...म्हणून मग आम्ही तिथून चालत चालत रस्त्यावर आलो आणि आमची गाडी शोधू लागलो...आता तिथे सगळ्याच गाड्या एका रंगाच्या,त्यातही एकाच मॉडेलच्याही भरपूर....इतक्या सगळ्या गाड्यांच्यात आपली गाडी शोधायची/ओळखायची म्हणजे प्रत्येक गाडीवरचा नंबर वाचत जायला हवा...आम्ही तेही करून पाहिले....पण गाडी काही सापडेना...खिशात हात घालून भ्रमणध्वनी काढावा म्हटलं....तर प्रत्येकाने तो गाडीतच ठेवून आल्याचं सांगितलं....मग आता गाडी कशी शोधणार? ती नेमकी कुठे पार्क केली हेच आम्हाला कुठे माहीत होतं? आम्ही तर मध्येच उतरलो होतो ना! :(


गाड्यांची ही भली थोरली रांग लागलेली होती....कैक किलोमीटर लांबवर ती पसरलेली दिसत होती...आम्ही परतीच्या दिशेन चालत होतो...आपली गाडी दिसेल ह्या आशेने...साधारण अर्धा-एक किलोमीटर चाललो...गाडीचा पत्ताच नव्हता...तेवढ्यात एक बाई दिसली...तिच्याकडे हातात तीन भ्रमणध्वनी दिसले...आमच्यापैकी एकाने जाऊन तिला विनंती केली....आम्हाला जरा आमच्या चालकाशी संपर्क साधायचाय, देता का तुमचा भ्रमणध्वनी?
ती बाई तर रडायलाच लागली....अहो, इथे रेंजच पकडत नाहीये...एकाही मोबाईलचा उपयोग नाहीये....मी गेले दोन तास शोधतेय....माझी गाडी कुठे हरवलेय कळतच नाहीये.आम्ही तिचे सांत्वन केले...म्हटलं,घाबरू नका,तुमच्या बरोबरची लोकंही तुम्हाला येतील शोधत. आम्हीही आमची गाडी शोधतोय.

त्या बाईसारखी आणि आमच्यासारखी अजूनही कैक लोकं आपापल्या गाड्या शोधत फिरत होती...आजूबाजूला इतक्या गाड्या असतांना नेमकी आपली गाडीच दिसू नये हा अनुभव अगदी वैताग आणणारा होता. इथे सूर्य तापलेला होता,त्यातच बर्फावरून परावर्तित होणारी त्याची किरणं अजून तापदायक वाटत होती आणि लोक आपापल्या साथीदारांना आणि गाड्यांना शोधत इतस्तत: भटकत होते...रोहतांगच्या त्या परिसरात कुणाचाही मोबाईल चालत नव्हता. खरं तर अशा ठिकाणी सरकारी पातळीवरून एखाद्या नियंत्रण कक्षाची स्थापना करणे गरजेचे होते...जिथे ध्वनीवर्धकाची योजना असायला हवी होती...ज्यावरून घोषणा करून संबंधितांचं लक्ष वेधता येईल...पण तशी काही सोय तिथे नव्हती....त्यामुळे सगळेच भरकटलेले दिसत होते.

आम्हा सहाजणांपैकी पाचजण आम्ही एकत्र होतो...आमच्या बरोबरच्या एक बाई आणि चालक गाडीबरोबर होते.जवळपास एक तास उलटला तरी गाडीचा पत्ता लागेना....आम्ही मात्र उगाच पुढे पुढे चालत होतो....बस्स! शेवटी मी निर्णय घेतला...आता पुढे जाणे नाही...इथेच थांबू.
पण मग प्रश्न निर्माण झाला...आम्हाला शोधायला कोण येणार?
मग दोन जणांना पुन्हा मागे पाठवलं...नदीच्या कोरड्या पात्रातही भरपूर गाड्या थांबवलेल्या दिसत होत्या....माझा अंदाज होता की आमची गाडी तिथेच असणार...कारण?
आमच्या बरोबरच्या ज्या बाई गाडीत राहिल्या होत्या त्या चालकाला गाडी खूप दूरवर नेऊन पार्क करायला निश्चितच देणार नव्हत्या ह्याची खात्री वाटत होती...त्यांचा नवरा,मुलांना सोडून फार लांब राहणं त्यांना शक्यच नव्हतं...तेव्हा गाडी तिथेच त्या नदीच्या कोरड्या पात्रातच असणार...साधारण त्याच्या आसपासच आम्ही उतरून गेलो होतो.

आमच्यापैकी दोघांना...माझी मुलगी आणि त्यांच्यापैकी एक मुलगा...अशा दोघांना मागे पाठवलं....हे असं करण्याचं कारण म्हणजे त्या मुलाला गाड्यांची इथ्यंभूत माहिती आहे आणि दूरवरून,मागून,पुढूनही तो गाडी कोणती आहे...म्हणजे कंपनी,मॉडेल इत्यादि ओळखू शकतो...अहो पण इथे एकाच कंपनीच्या मॉडेलच्या अनेक गाड्या आहेत...मग तो ओळखणार कसा आपली गाडी? आणि आत्तापर्यंत का नाही ओळखली?
प्रश्न बरोबर आहे...पण उत्तर असं आहे की...आत्तापर्यंत आम्ही केलेला गाडीचा शोध हा फारसे गंभीर होऊन केलेला नव्हता...आता मात्र संशोधक वृत्तीने आणि गंभीरपणाने तो शोध घ्यायचा होता...म्हणून ह्या दोघांना मागे पाठवलं. माझ्या मुलीकडे नुकताच घेतलेला अत्त्याधुनिक प्रग्रा होता...त्याचा उपयोग ह्यावेळी दुर्बीणीसारखा करायचा ठरले....त्याप्रमाणे ह्या दोघांचे पथक मागे रवाना झाले.
मग दुसरे दोन जणांचे पथक...आमचे सहलनेते आणि त्यांची मुलगी...हे दोघे पुढे निघाले...मी मात्र तिथेच एक उंचवटा पाहून बसून राहिलो. पुढे जाणार्‍यांना फार पुढे जाऊ नका...असं सांगून त्यांची रवानगी केली.

साधारण अर्ध्या तासाने पुढे गेलेले दोघेजण परत आले...गाडीचा कुठेच पत्ता नव्हता....ते जिथपर्यंत गेले होते...त्याच्याही पुढे किमान दोन किलोमीटरपर्यंत गाड्यांची रांग लागलेली होती...त्यामुळे मी सांगितल्याप्रमाणे जास्त पुढे न जाता ते परतले होते....आता पुढे जायचंच तर सगळ्यांनी मिळूनच...हे ठरवून.

आमची मागे गेलेली दोनजणांची तुकडी अजूनही आलेली नव्हती...त्यांची वाट पाहणे सुरुच होते. आमच्यासारखे भरकटलेले लोकही इतस्तत: दिसत होते...त्यांचेही आपापसातले संभाषण निराशाजनक होते...गाडी कधी सापडणार? :(

इतक्यात काही विशिष्ट गणवेश घातलेले तरूण-तरूणींचे एक टोळके आले.....हातात फलक घेतलेले’पर्यावरण बचाओ’ मोहिमेचे ते सगळे शिलेदार होते. लोकांमध्ये जागृती करण्याचा त्यांचा प्रयत्न सुरु होता...प्लास्टिक पिशव्या,बाटल्या इतस्तत: टाकू नका,हिमालयाचा परिसर खराब करू नका...असा लोकांमध्ये प्रचार करत,वैयक्तिक संवाद साधत ही मंडळी माझ्यापर्यंत आली...त्यातली एक तरूणी मला उद्देशून म्हणाली...अंकल,आपका क्या कहना है?
मी म्हटलं, हे पाहा,तुम्ही जे काही करताय ते अतिशय स्तुत्त्य आहे,पण....
मी मराठीतच बोलत होतो...त्या लोकांना समजेल की नाही हे लक्षात आलं म्हणून मराठी/हिंदी असे संमिश्र बोलू लागलो....आणि काय आश्चर्य! त्यांच्यापैकी काहीजण चक्क मराठीच निघाले....त्यांचा एक गटप्रमुख तर कोल्हापुरचा ’कपडेकर’ आडनावाचा तरूण होता(नाव मात्र विसरलो त्याचे.)
मग काय मराठीतच गप्पा सुरु झाल्या.
मी त्यांना म्हटलं..हे पाहा,लोकांना तुम्ही जे काही आवाहन करताय ते त्यांना समजत नाहीये असे समजू नका...खरं तर इथे येणारे बहुसंख्य हे सुशिक्षित आणि सुसंस्कृत घरातूनच आलेले आहेत/असतात...पण अंगभूत असलेल्या/लागलेल्या वाईट सवयी इतक्या सहजासहजी सुटणार नाहीत. लोक कचरा टाकतात/करतात...त्यांना तुम्ही कचरा करू नका असे सांगितले तर काही मोजकेच लोक कदाचित तुमचे तेवढ्यापुरते ऐकतीलही...पण तुमच्या अपरोक्ष पुन्हा ते कचरा करतील...कारण...सवयी कधी सुटत नाहीत..त्या तशाच राहतात अशा अर्थी एक इंग्रजी म्हण आहे..हॅबिट ऑलवेज रिमेन्स!
हॅबिटचे स्पेलिंग आहे...एच(h) ए(a) बी(b) आय(i) ट(t)...habit
ह्यातलं पहिलं अक्षर काढलं तर राहतं.. ए बीट(a bit) रिमेन्स!
ह्यातलं दुसरं अक्षर काढलं तर राहतं...बीट(bit) रिमेन्स!
ह्यातलं तिसरं अक्षर काढलं तर राहतं...इट(it)रिमेन्स!...म्हणजेच ती(it)टिकते! अशी सहजासहजी जात नसते.
तेव्हा तुम्ही आवाहन जरूर करा,लोक लगेच सुधारतील अशी अपेक्षा मात्र करू नका आणि ती सुधारत नाहीत म्हणून खट्टूही होऊ नका...कारण जी गोष्ट तुम्हाला मनापासून पटलेय आणि जी तुम्ही अंगीकारलेय, ही गोष्ट जर बहुजनांच्या फायद्याची आहे अशी तुमची मनापासून धारणा असेल तर ती तुम्ही करत राहा...सुधारणा ह्या खूप हळूहळू होत असतात....सुधारकांच्या कैक पिढ्यांना त्यासाठी आपलं संपूर्ण आयुष्य वेचावं लागतं,तेव्हा कुठे इंचभर प्रगती होत असते.
लोकांनी टाकलेला कचरा उचलणारे,हातात झाडू घेऊन स्वत: साफसफाई करणारे सेवाभावाने प्रेरित झालेले लोकही मी पाहिलेत....पण म्हणून सर्वसामान्य लोक सुधारलेत असे नाही झाले...उलट लोक मुद्दाम तिथे,साफ केलेल्या जागी जाऊन पुन्हा कचरा टाकायला लागले...अशा वेळी स्वत: स्वच्छतेचं उदाहरण घालून देणारी मंडळी एक तर रागावतात किंवा मरू दे,हे लोक सुधारायचे नाहीत. आपण कशाला उगाच मरा....असे म्हणून त्यातून बाजूला हटतात....
आपल्याला लोकांच्या सवयी सुधारायच्या असतील तर त्याची अगदी प्राथमिक शालेय पातळीपासूनच सुरुवात करायला हवी आहे...एकदा एखाद्याच्या मनात चांगल्या सवयींबद्दल जागरूकता निर्माण झाली की मग भविष्यात तो कधीच चुकीच्या गोष्टी करणार नाही....तेव्हा माझा तुम्हाला असा सल्ला आहे...की जोवर तुम्ही हे जे काही करताय(ते चांगलंच आहे...पण त्याला फारसे यश येणार नाहीये हे देखिल तेवढेच खरे आहे)ते तुम्हाला न रागावता,चिडता आणि निराश न होता करता येतंय तोवर जरूर करा...तुमच्या अशा मोहिमेमुळे किमान एक माणूस जरी सुधारला तरी खूप झाले असे समाधान माना...बाकी..आपण काही तरी समाज जागृतीचे काम करतोय ह्या समाधाना व्यतिरिक्त दुसरे काही फारसे साध्य होणार नाही हेही लक्षात ठेवा, म्हणजे तुमच्यात नैराश्य निर्माण होणार नाही.

तुम्हाला निरुत्साही करण्यासाठी मी हे बोलत नाहीये...फक्त वस्तुस्थितीची कल्पना देतोय....कारण जेव्हा कुणीही आपल्या स्वत:च्या मनाने ठरवतो तेव्हाच ती सवय दीर्घकाळ टिकते,दुसर्‍यांच्या सांगण्याने नव्हे...एरवी तेरड्याचा रंग तीन दिवस ह्या म्हणीसारखे होत असते...असला ताप फार काळ टिकत नाही.

माझं हे बौद्धिक ती मुलं शांतपणे ऐकून घेत होती...मी सांगितलेला..विशेष करून कचरा गोळा करण्याबद्दलचा त्यांचा अनुभवही तसाच होता...ह्याआधी हे लोक जेव्हा पिशव्यातून कचरा गोळा करत असत तेव्हा इतर लोक लगेच, तिथेच...साफ केलेल्या जागेवर कचरा आणून टाकत....ही वस्तुस्थिती त्यांच्याही लक्षात आलेली आणि म्हणूनच आता त्यांनी कचरा उचलणे बंद करून फक्त कचरा इथे तिथे टाकू नका...आपल्याबरोबर घेऊन जा आणि कचर्‍याच्या डब्यातच टाका असं सांगायला सुरुवात केलेली होती.... अजूनही बरंच काही सांगता आलं असतं...पण तेवढ्यात आमची गाडी आली...मागे गेलेल्या दोघांनी आपली कामगिरी अगदी चोख पार पाडली होती.

गाडीत बसता बसता त्या तरूणांचा निरोप घेतला. गाडी येईपर्यंतचा माझा वेळ मात्र मजेत गेला...त्या लोकांना कदाचित तो कंटाळवाणाही वाटला असेल. ;)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: