माझ्या आयुष्यातील आजवरच्या कडू-गोड आठवणी मी "पूर्वानुभव" म्हणून सादर करत आहे.
आपण इथे आल्याबद्दल मन:पूर्वक धन्यवाद!

४ जून, २०११

चंशिकुम! ५

शिमल्यात आम्ही एकूण दोन रात्री राहिलो...त्यापैकी आजची पहिली.(२६मे २०११)
खोल्या छान प्रशस्त आणि सगळ्या सुखसोयींनी युक्त अशा होत्या.खिडकीतून शिमल्याची एक बाजू खूप छानपैकी दिसत होती. त्याची छाचि आधीच्या भागात जोडलेत. रात्री जेवणासाठी त्यांच्या जेवणघरात गेलो तेव्हा असं आढळलं की शाकाहारी आणि मांसाहारी पदार्थ एकाच रांगेत मांडलेले होते. मला अशा ठिकाणी जेवणे कठीणच होते... माझ्याबरोबर असलेलं कुटुंब मांसाहारी होते...त्यांची तर चंगळच झाली...माझी मुलगी जरी माझ्यासारखी शाकाहारी असली तरी तिला अशा मिश्र वातावरणात काहीच अडचण वाटत नव्हती. शेवटी मी तिथल्या त्या उग्र वासांनी हैराण होऊन निमूटपणे खोलीवर परतलो. माझ्या बरोबरच्यांनी माझी बरीच मनधरणी केली पण मला तिथे थांबणे अशक्यच होते. मी त्यांना सांगितलं...की त्यांनी खुशाल जेवणाचा आनंद लुटावा,माझी काळजी करू नये आणि स्वत:चा विरस देखील करून घेऊ नये.

अशा तर्‍हेने मी खोलीवर आलो. ह्या अशा अडचणींची खात्री होतीच म्हणून मी मुंबईहून येतांना माझ्याबरोबर भरपूर ठेपले बनवून आणले होते(मी बनवले नव्हते काही....बाहेरून बनवून घेतले होते. :) ) मग काय पोटभर ते ठेपले खाल्ले आणि वर पाणी प्यायलं...तुम्ही म्हणाल...नुसतेच ठेपले?त्याबरोबर लोणचं किंवा दही वगैरे काही नव्हतं?
होय,काहीच नव्हतं...माझे खाणे हे निव्वळ पोट भेरण्यासाठी असतें...त्यामुळे वेळप्रसंगी मी मला पचेल/रुचेल असे जे मिळतं त्यावर समाधान मानत असतो. असो.

खोलीत सगळ्या सोयी होत्या पण मुख्य म्हणजे पंखा किंवा एसी ह्या दोघांपैकी काहीच नव्हतं. एक मात्र आहे की ते नसूनही वातावरणात चांगलाच गारवा जाणवत होता.बहुदा इथलं रात्रीचं तापमान नेहमीच कमी असावं की ज्यामुळे पंखा वगैरेची गरजच लागत नसावी. रात्री पलंगावर पडल्यावर दिवसभराच्या प्रवासाचा विचार करता करता झोप केव्हा लागली तेच कळलं नाही...कन्येच्या हाकेने जेव्हा जाग आली तेव्हा तिच्याकडून कळलं की बाहेर धो धो पाऊस पडतोय.हवेतला गारठाही वाढलेला होताच. मी लगेच उठून खिडकीचे पडदे दूर करून पाहिले...सगळं आसमंत कुंद-फुंद झालं होतं....पाऊस इतका घनघोर पडत होता की दहा फुटांपलीकडचंही काही दिसत नव्हतं.पहाटेचे पावणे पाच वाजले होते आणि आश्चर्य म्हणजे इतके ढग असूनही उजेड बराच होता....पण सुर्योदय पाहाणे नक्कीच नशिबी नव्हतं.

खरं तर आज(२७मे २०११) आम्ही सकाळी आठ वाजता बाहेर निघणार होतो पण हा पाऊस आम्हाला जखडून ठेवणार हे तर नक्की झालं. थोडावेळ पावसाची गंमत पाहात मी खिडकीजवळ बसून होतो. नंतर मुखमार्जनादि आन्हिकं उरकून कॉफी मागवली. ती येईपर्यंत थोडा वेळ टीव्ही पाहात बसलो. कॉफी आल्यावर पुन्हा एकदा ठेपले बाहेर काढले आणि आता ते कॉफी बरोबर एकट्यानेच खाल्ले...छान वाटलं. :)
माझी आणि कन्येची तयारी होईपर्यंत सकाळचे ८ वाजले होते...पाऊस अजूनही जोशात होता. आज बहुदा खोलीतच अडकून पडावं लागणार अशी शक्यता वाटायला लागली. सव्वा आठ वाजता वरती न्याहारीला या असा सहकुटुंबीयांकडून आदेश आला.माझी न्याहारी तर केव्हाच झाली होती म्हणून मी म्हटलं...तुम्ही खाऊन घ्या.
पण सकाळची न्याहारी पूर्ण शाकाहारी आहे...तेव्हा तुम्हीही याच असे पुन्हा आग्रहाचे बोलावणे आले.बटाटा,फ्लॉवर इत्यादिचे पुरण भरलेले गरमागरम पराठे,चहा,कॉफी वगैरे असा न्याहरीचा थाट होता. माझं पोट भरलेलंच होतं पण त्यांचा आग्रह मोडवेना म्हणून त्यांच्या विनंतीचा मान राखण्यासाठी त्यांच्या बरोबर बसून पुन्हा एकदा कॉफी प्यायलो..खरं तर पराठे मला खूप आवडतात पण....माझा स्वत:चा स्वभाव आहे...तो चांगला की वाईट हे सापेक्ष आहे....पण एकदा पोट भरलं की मग समोर कितीही सुग्रास,आवडतं खाणं असलं तरी मी ते खात नसतो...पण हे जर समोरच्या माणसाला नाही पटलं तर उगाच तणाव निर्माण होत असतो. अर्थात माझ्या बरोबरच्या सहकुटुंबियांना माझा स्वभाव पूर्णपणे माहीत असल्यामुळे आणि त्याचा योग्य तो आदर ते करत असल्यामुळे आमच्यात अशा बाबतीत विसंवाद होत नाही. असो.

न्याहारी आटोपली तरी अजून पाऊस थांबण्याची चिन्हं दिसेना. पण तिथल्या स्थानिक लोकांचं म्हणणं होतं की पाऊस थोड्याच वेळात नक्की थांबेल...शिमल्यातलं म्हणा की एकूणच हिमाचलमधलं वातावरण हे असंच आहे...कधी पाऊस,कधी ऊन....हवामान सतत बदलत असतं...कशाचीच शाश्वती देता येत नाही...तरीही गेले चार-पाच तास कोसळणारा पाऊस आता बंद होईल हे त्या लोकांचे अनुभवसिद्ध मत होते हे लवकरच खरे ठरले....पुढच्या दहा-पंधरा मिनिटात पाऊस खूपच कमी झाला...मी माझ्याबरोबर छत्री नेलेली होती....जय महाजाल...महाजालावरून शिमल्याला जाण्याआधी तिथल्या हवामानाची माहिती काढली होती...पुढच्या काही दिवसांच्या हवामान अंदाजात जोरदार पाऊस वगैरेची शक्यता वर्तवली गेली होती....असो.

त्या रिमझिमत्या पावसात बाहेर पडतांना आम्ही आधी चालक महाशयांना गाडी लिफ्टच्या जवळ असलेल्या ब्रिजवर घेऊन यायला सांगितली...पण आम्हाला असं कळलं की तो कुठे तरी रहदारीत अडकलाय आणि आमच्यापर्यंत पोचायला त्याला अजून किमान अर्धा तास तरी लागेल. आज सगळीकडे चिखल साठलेला असणार त्यामुळे आम्ही कुठेच बाहेर जाऊ नये असे त्याचे सांगणे होते....पण निदान गाडीत बसून तरी जमेल तेवढे शिमला दर्शन करू असे आम्ही त्याला म्हटले आणि त्याने ते ऐकले...तरीही गाडी येईपर्यंत सकाळचे दहा वाजले होते...आता पाऊस पूर्णपणे थांबलेला होता...छानपैकी ऊन पडले होते आणि अशा मस्त वातावरणात आम्ही निघालो कुफरीच्या दिशेने...शिमल्याच्या जवळच एक नयनरम्य असे स्थळ आहे...जमलंच तर ते पाहायला.

चंढीगढ सोडल्यापासून हिमाचलच्या हद्दीत प्रवेश केल्यानंतर सगळीकडे एकच चित्र दिसत होतं...डोंगराच्या कडेकडेने जाणारे वळणावळणाचे रस्ते,दूरवर पसरलेल्या डोंगरांच्या रांगा,...दोन्ही बाजूला गर्द वनराई...डोंगरांच्या कुशीत विसावलेली, उतारावरची कधी एकटी दुकटी तर कधी दाटीवाटीने वसलेली एकमेकांवर उभी दिसणारी घरं...आणि ह्या चित्रात अजून एक ठळकपणे जाणवणारी गोष्ट म्हणजे अधूनमधून अचानकपणे डोकावणारी बियास नदी...कुठे अगदी ओढा वाटावा इतकी छोटी तर कुठे बर्‍यापैकी मोठी...झुळूझुळू वाहणारं पाणी,आजूबाजूला साग,देवदार आणि अशाच काहीशा उंचच ऊंच वृक्षांची दाट वनराई....मध्येच कुठे एका झाडावरून दुसर्‍या झाडावर उड्या मारणारी माकडं, निवांतपणे चरणारी गाई-गुरं...असं नुसतं भरगच्च आणि चित्रमय वाटावं असं सगळं वातावरण अनुभवत आमचा प्रवास सुरु होता.ह्यात भर म्हणून की काय कधी मधी रस्ता ओलांडणारा किंवा रस्ता भरून टाकणारा शेळ्या-मेंढ्यांचा कळपही दृष्टीस पडत असे...त्यातली ती गोजिरवाणी कोकरं,कळपाच्या पुढे आणि मागे असे चालणारे दोन शिकारी कुत्रे..एकाद दुसरा गुराखी...चित्रातले रंग अधिक गडद करायचे.

अशा तर्‍हेन मजेत प्रवास करत आम्ही कुफरीला पोचलो...अहो पण तिथे खास असं काहीच नव्हतं...पण भरपूर घोडे,घोडेवाले आणि आमच्यासारख्या प्रवाशांची आणि प्रवासी वाहनांची दाटीवाटी मात्र होती...जरा वेळाने लक्षात आलं की जे काही प्रेक्षणीय आहे तिथपर्यंत गाड्या जात नाहीत..एकतर पायी जा किंवा घोड्यावरून जा. पावसामुळे सगळीकडे चिखलच चिखल झालेला त्यामुळे चार पावलंही धडपणे टाकता येत नव्हती..मग काय? दुसरा पर्याय...घोड्यावर बसून जाणे...आता इतकं लांब आलोय तर मग मागे का हटा...घोडेवाल्यांचा भाव ठरलेला होता...म्हणजे तो सरकारी पत्रकाप्रमाणे २५० रुपये आणि ३८० रुपये असा होता....जवळच्या अंतरासाठी २५० रुपये..जाऊन-येऊन आणि लांबच्या अंतरासाठी ३८० रुपये जाऊन येऊन....पुढे असे कळले की जिथे जायचे तिथे लोक किमान दोनतीन तास तरी थांबतातच
...म्हणजेच खास काहीतरी प्रेक्षणीय असणारच...तेव्हा मग ठरवलं...बसायचं घोड्यावर.

माझ्या आयुष्यात मी दुसर्‍यांदा घोड्यावर बसणार होतो...मात्र पहिल्यांदाच घोड्यावरून प्रवास करणार होतो....
गंडलात ना...विमानाचं ते तसं पहिलं दुसरं आणि आता घोड्याचंही पहिलं दुसरं? काय प्रकार आहे हा?
सांगतो....
त्याचं काय आहे की १९७५ साली मी माझ्या एका मित्राच्या भावाच्या लग्नाला राजस्थानला गेलो होतो...तिथे त्या नवरदेवाच्या घो्ड्यावर(की घोडी...माहीत नाही) बसलो होतो...फक्त छायाचित्र काढून घेण्यासाठी...
पण आता प्रत्यक्ष घोड्याच्या पाठीवरून प्रवास करायचा होता तेव्हा मनाची तयारी करणे भागच होते....आम्हा सहाजणांपैकी माझ्यासहित पाचजण घोड्यावर यशस्वीरित्या स्वार होऊ शकले..मात्र आमच्या बरोबरच्या कुटुंबातल्या गृहमंत्री मात्र घोड्यावर चढण्यात अयशस्वी झाल्या आणि त्यांनी लगेच माघारच घेतली..त्या निमूटपणे जाऊन गाडीत बसल्या.


आमचे घोडे निघाले...घोड्यावर आमच्यासारखे एकेकटे प्रवासी....चारपाच घोडे एकमेकांना जोडून स्वत: चालत आणि घोड्यांना एका मागोमाग चालवत नेणारे घोडेवाले...वाट चढणीची होती आणि त्यात पावसाने माती कालवलेली...त्यामुळे निसरडी झालेली...घोडे एकापाठोपाठ चालत होते...एखादे वेळी रस्त्याच्या अगदी कडेने चालायचे...बाजूचा उतार पाहून मनात कुशंका यायची, इथून खाली घसरतात की काय अशी मनात धास्ती... कधीकधी मध्येच थांबायचे...मग ते घोडेवाले एखादी शिवी हासडून किंवा चक्क लाथ मारून त्याला पुढे ढकलायचे... कधी चढ तर कधी उतार...चढ असला की घोड्यावर स्वार असलेल्याने पुढे झुकायचे...आणि उतार असला की पाय पुढे ताठ करून अंग मागे ताणायचे...अशी सगळी कसरत करत आमची रपेट अत्यंत सावकाशीने सुरु होती....मध्येच एक बराच खोलगट भाग होता...तिथे चक्क गुडघाभर पाणी साठलेलं....चांगला २००-३०० फुट लांब असा तो पट्टा असेल....त्यातून चालतांना घोडेदेखिल डुचमळत होते....त्यांच्या चालीमुळे अंगावर चिखल उडत होता आणि मनात एक भिती...हा मध्येच बसला तर? :(
पण सुदैवाने तसे काही झाले नाही...मजल दरमजल करत..साधारण अर्धा-पाऊण तासात आम्ही इच्छितस्थळी पोचलो आणि घोड्यावरून उतरलो....एकदाचे! हुश्श!

तिथे पाहण्यासारखे खास असे मला तरी काही आढळले नाही...एकदोन निसर्गदृष्य सोडली तर... खरं तेच सांगतो(बाकी ते ३८० रुपयेवाले घोडे जिथपर्यंत जात असतील तिथे नेमके काय होते/असेल मला ठाऊक नाही)....हं,एक घोड्यावर बसून इथपर्यंत येण्याचा अनुभव जरी रोमांचक आणि कचरवणारा होता तरी इथले वातावरण पाहता तो अनुभव...तोही विकत घेण्याची खरंच काही गरज नव्हती असे माझे प्रामाणिक मत आहे....तुम्ही म्हणाल की मग लोक काय वेडे आहेत काय तिथपर्यंत जायला?
वेडे की शहाणे..ज्याचे त्याने ठरवावे....तिथे काय काय होतं सांगतो.....
तिथे एक सफरचंदाची बाग होती...सद्द्या सफरचंदाचा हंगाम नाहीये त्यामुळे आम्हाला फक्त झाडंच पाहावी लागली असती..जुलै-ऑगस्टमध्ये जायला हवं तर सफरचंद लगडलेली दिसतील...ही बाग पाहायलाही तिकिट होतं म्हणून आम्ही नाही गेलो...दुसरं एक म्हणजे गुलाबाची बाग....ती काय हल्ली आपल्या शहरातही पाहायला मिळते(पण एक आहे की..इथले गुलाब खूपच टपोरे असतात)....आणि तिसरे म्हणजे...आपल्या इथल्या एस्सेलवर्ल्ड सारखी खेळनगरी...आता हे(सफरचंदाची बाग सोडून) सगळं पाहायला मुंबईत मिळत असतांना तिथे कोण तडफडायला जाईल? असो एकूण हा बार फुसका निघाला....आता वाटेत अनुभवलेलं सृष्टी सौंदर्य जमेस धरता वेळ अगदीच फुकट गेला असं मात्र नाही वाटलं.

२ टिप्पण्या:

SUDHIR KANDALKAR सुधीर कांदळकर म्हणाले...

घोड्यावरून गेल्यावर मूड खराब होता काय? अहो आल्या क्षणाचा आनंद लुटा की! पण अशा रम्य ठिकाणची सफर घडवताय, झकास आहे. चालू द्यात पुढे.

प्रमोद देव म्हणाले...

अपेक्षाभंग झाला म्हणून म्हणावी तेवढी मजा नाही आली...पण तरीही जे काही पाहिलं त्याचा आनंद लुटलाच.