माझ्या आयुष्यातील आजवरच्या कडू-गोड आठवणी मी "पूर्वानुभव" म्हणून सादर करत आहे.
आपण इथे आल्याबद्दल मन:पूर्वक धन्यवाद!

१६ फेब्रुवारी, २००७

ते रम्य दिवस!भाग ११



डावीकडून: मी(चश्मीश), दादा आणि चिंटू कार्यालयात एका पार्टी दरम्यान!
हे छायाचित्र साधारणपणे १९७२-७३ मधील आहे. छायाचित्रकार आहे गजा.

माझ्या नोकरीच्या सुरुवातीच्या काळात दादा हा खरा 'दादा'होता हे मी तुम्हाला सांगितलेच आहे. तर त्या काळातले काही किस्से ऐका. दादाच्या खिशात नेहमीच रामपुरी चाकू असायचा आणि कार्यालयात तो त्याचा प्रत्यक्ष जरी उपयोग करत नसला तरी वेळप्रसंगी समोरच्याला घाबरवण्यासाठी तो रामपुरी उघडून दाखवत असे. त्याचे लखलखते पाते बघितले की भल्याभल्यांची घाबरगुंडी उडत असे(आता मला कळले की एखाद्याला गुंड का म्हणतात ते; अहो उत्तर साधे आहे! घाबरगुंडी उडवतो तो गुंड! आहे की नाही सोपी व्याख्या!).

दादाने बरेच यांत्रिक शिक्षणक्रम केलेले होते. टर्नर,फिटर,मशिनिस्ट,वेल्डर वगैरे वगैरे. त्यामुळे कोणत्याही यंत्राबद्दलचे त्याचे ज्ञान सखोल होते. लेथ मशीन,ड्रील मशीन,ग्राईंडर,वेल्डींग मशीन वगैरे यंत्रे हाताळण्यात तो कुशल होता. त्या यंत्रांकडून काम करून घेणे आणि त्यांची देखभाल करणे हे त्याचे नेहमीचे मूळ काम होते. ह्या व्यतिरिक्त तो कोणतेहि पडेल ते काम करत असे. जिथे कुणी हरला तिथे तुम्ही दादाला कामाला लावा. आपली सगळी बुद्धी,कौशल्य आणि शक्ती वापरून तो ते काम यशस्वी करत असे.

एकदा दादा आपल्या रामपुरीला, धार काढण्याच्या यंत्रावर(ग्राईंडर) धार काढत होता. नेहमी तो काम करताना त्यात रंगून जात असे. आताही तशाच अवस्थेत असताना आमचा सर्वात मोठा साहेब( हा मद्रासी होता) तिथे आला. त्याने ते बघितले आणि करु नये ते साहस केले. त्याने दादाला जरा गुश्श्यातच विचारले, व्हाट आरायू डुईंग आय से?
प्रश्न ऐकून दादाची समाधी भंग पावली. त्याने मागे वळून बघितले तर साहेब उभा आहे आणि जाब विचारतोय.

दादाने तो लखलखता रामपुरी त्याच्यावर रोखला आणि म्हणाला, देखता नही धार लगा रहेला है! अंधा है क्या?
साहेब, दादाचा तो अवतार बघून एकदम सर्दच झाला. इकडे-तिकडे बघत असताना मी त्याला दिसलो तसा मला म्हणाला, ए मिस्टर यु टेल हीम नॉट टू डू सच थिंग्ज हीयर आय से!('आय से' हे त्याचे पालूपद असायचे)
मी काही बोलायच्या आत दादाने त्या साहेबाची कॉलर धरली आणि त्याला विचारले, मरने का है क्या बोल? तेरे साथ उसको भी छील के रख दूंगा! क्या समझा? अभी चूपचाप चला जा नही तो घुसाड दूंगा!

मी मागच्या मागेच सटकलो. ह्या लोकांच्या भानगडीत मी कशाला उगीच मरू? साहेब तर पाणी-पाणी झाला होता. दादाचा तो हिंस्त्र चेहरा,हातातला चमचमणारा रामपुरी आणि आजूबाजूला मदतीला कोणीच नाही हे पाहून त्याने हात जोडले आणि गयावया करत दादाची माफी मागितली आणि पुन्हा असा प्रश्न कधीच विचारणार नाही अशी ग्वाही दिली तेव्हा कुठे दादाने त्याची कॉलर सोडली आणि साहेबाने लगेच तिथून पलायन केले.

थोड्याच वेळात ही बातमी सगळीकडे पसरली. गजा आणि चिंटूने जाऊन दादाचे अभिनंदन केले. साहेबाची चांगली जिरवली म्हणून दादाचे कौतुक केले. मी मात्र सगळे स्थिरस्थावर झाल्यावर लांबूनच (लांबूनच बरं का!) दादाला म्हणालो, दादा, तू हे जे काही केलेस ते चांगले केले नाहीस. कदाचित तुझी नोकरीही जाईल. ह्या साहेबाने दिल्लीला तुझ्या ह्या प्रतापाबद्दल कळवले ना तर तुला घरी बसावे लागेल. तेव्हा आता ह्यापुढे जरा जपून वाग!
दादाने फक्त एकदा माझ्याकडे तुच्छतेने बघितले आणि म्हणाला, अरे तो मद्रासी घरी जित्ता जायेल काय? त्याला वर रिपोर्ट तर करू दे, नाय त्याची फूल्टू केली ना तर बापाचे नाव नाय लावणार. आणि तू त्याची चमचेगिरी कशाला करतोस? कोण लागतो तुझा तो ?
मी आपला तिथून काढता पाय घेतला. मनात म्हटले, जे झाले ते चांगले झाले नाही. आता ह्यावर काही तरी उपाय केला पाहिजे. पण काय करणार?

इथे साहेब सॉलीड तापला होता पण दादाचे ते हिंस्त्र रूप त्याच्या नजरेसमोरून जात नव्हते आणि त्यामुळे वर दिल्लीला ह्याबद्दल कळवण्याची हिंमत करू शकत नव्हता आणि तिथे दादा विजयोन्मादात मश्गुल होता. काही तरी करायला पाहिजे होते आणि ते मलाच करावे लागणार होते. कारण सगळे दादाच्या बाजूने होते(विरोधात जाऊन मरायचे थोडेच होते कोणाला?) पण दादाला रोखण्याची शारिरीक क्षमता तर माझ्यात नव्हती. मग त्याला रोखायचे कसे? नीट विचार करून मी मनाशी एक निर्णय घेतला.

दुसर्‍या दिवशी सकाळी कार्यालयात पोहोचल्यावर हिंमत करून मी दादाला म्हटले, मला तुझ्याशी बोलायचे आहे. तू शांतपणे ऐकणार असशील तर बोलू काय?
माझ्याकडे आपादमस्तक न्याहाळत दादा म्हणाला, बोल. तुझ्या सारख्या जंटलमन भटाला मी नाय कसा बोलनार?
मग मी कालच्या प्रसंगाबद्दल त्याला नीट समजावून सांगितले(त्याने ऐकून घेतले हे खरंच एक आश्चर्य होते).मी म्हणालो, " हे बघ दादा, आपण इथे नोकरी करायला येतो. तो आपल्या पोटापाण्याचा प्रश्न आहे म्हणूनच ना? मग इथे आल्यावर इथले काही नियम आपल्याला पाळायलाच हवेत असे मला वाटते. तू एक कुटुंबवत्सल माणूस आहेस हे नेहमी लक्षात ठेव. तुझ्या कोणत्याही वाईट कृत्त्यामुळे तुझ्या घरच्यांना हाल भोगावे लागले तर तुला ते आवडेल काय?
दादा म्हणाला, कुनाची माय व्यालेय माझ्या कुटुंबाला त्रास द्यायला? फुल्टू करून टाकेन त्याची!
मी म्हणालो, दादा तू एखाद्याची फुल्टू केलीस तर पोलीस तुला सोडतील काय? तू पण जेलमधे जाशील. कदाचित फाशीही होईल आणि तुझे कुटुंब रस्त्यावर येईल. हे सगळे तुझ्या करणीमुळे. दुसर्‍याचा त्यात कोणताही हात नसेल. बोल,तुला चालेल काय असे त्यांचे हाल झालेले? तू एकाला मारशील आणि तूही मरशील. मधल्या मधे ह्या तुझ्या कुटुंबाचा काय दोष आहे? विचार कर जरा!

मी त्याला तसेच सोडून माझ्या कामाला लागलो. जेवणाच्या सुट्टीनंतर दादा माझ्याकडे आला आणि मला म्हणाला, ए भटा! तुज्या बोलन्यात पाईंट हाय! पन मी गप्प बसलो तर तो मा**** मद्रासी माजा काटा काडेल त्याचे काय? त्याला वाटेल की मी त्याला घाबरलो आनि तो एकदम चढून बसेल. तेच्यावर उपाय काय?
मी दादाला म्हणालो, अरे तो तुला घाबरतोय. आता तो तुझ्या वाटेला जाणार नाही;पण तूही आता हे असले चाळे ह्यापुढे करु नकोस. जरा सभ्य माणसाप्रमाणे वाग. तुझ्यातल्या ताकदीचा चांगल्या गोष्टींसाठी वापर कर. कामात तर तू कुशल आहेसच. तेव्हढा माथेफिरूपणा जरा कमी कर म्हणजे बघ तुझ्याबद्दल साहेबासकट सगळ्यांना कसा आदर वाटायला लागेल ते!

माझ्या सुदैवाने (आणि त्याच्याही!) त्या बोलण्याचा खरोखरच चांगला परिणाम दादावर झाला आणि हळूहळू दादा बदलत गेला. हे सगळे मला त्यावेळी कसे सुचले आणि मी ते कसे बोललो हे आज मागे वळून पाहताना मलाही आश्चर्यकारक वाटतेय;पण दादा आता,ह्या घडीला माझा सख्खा मित्र असल्यामुळे मला त्याच्याकडून जे कळले ते असे! का कुणास ठाऊक पण पहिल्यापासूनच तो मला मानत होता. कदाचित माझ्यातल्या वेगळेपणामुळे असावे! नक्की सांगणे त्यालाही कठीण वाटते

1 टिप्पणी:

जयश्री म्हणाले...

वा भई वा.....! आपकी गांधीगिरी चल गयी जनाब!

बाकी ते क्रमश: चालूच ठेवलं हे मात्र वाचून छान वाटलं. आने दो और किस्से :)