माझ्या आयुष्यातील आजवरच्या कडू-गोड आठवणी मी "पूर्वानुभव" म्हणून सादर करत आहे.
आपण इथे आल्याबद्दल मन:पूर्वक धन्यवाद!

३ फेब्रुवारी, २००७

मुक्काम पोस्ट मद्रास! भाग ७

त्यादिवशी खोलीवर येताना काही इतर प्रशिक्षणार्थींशी ओळख झाली त्यात आमच्या शेजारच्या खोलीत राहणारा पंजाब इलेक्ट्रिसिटी बोर्डाचा 'परसराम' हा एक होता. त्याचा खोलीबंधू हा एक हरियाणवी 'प्यारेलाल' होता. हे दोघे मिळून खोलीतच जेवण बनवत असत. परसराम पोळ्या अगदी वर्तुळाकार लाटत असे. ते बघून मला त्याचे खूप कौतुक वाटले. आम्ही दोघांनी मात्र ह्या भानगडीत न पडता बाहेरच जेवणे पसंत केले.

संध्याकाळी रामालिंगमची भेट झाली तेंव्हा आम्ही त्याला त्या सकाळच्या मुलांचे 'मणीएन्ना' प्रकरण सांगितले आणि मला वाटलेला 'भले शाब्बास"असा अर्थ सांगितला. तो हसला आणि त्याने आम्हाला त्याचा अर्थ सांगितला.'मणी' म्हणजे 'वेळ'(वाजले ह्या अर्थाने) आणि 'एन्ना' म्हणजे 'किती’. किती वाजले म्हणजे मणीएन्ना हे समजले पण त्याचे उत्तर कसे द्यायचे? आम्ही साधारण सकाळी ८ च्या सुमारास प्रकें मध्ये जाण्यासाठी निघत असू म्हणून त्याने आम्हाला सांगितले की तुम्ही त्यांना 'एट्टमणी' असे उत्तर द्या. ह्यातल्या 'एट्ट'चा अर्थ मी विचारला नाही आणि दुसर्‍या दिवशी गंमत झाली. दुसर्‍या दिवशी सकाळी साडेसातला आम्ही नास्ता करायला बाहेर पडलो तेंव्हा एका व्यक्तीने ’मणीएन्ना?’ असे विचारल्यावर मी ऐटीत ’एट्टमणी!’ असे उत्तर दिले आणि त्याने विचित्र नजरेने आमच्याकडे पाहिले. मला काही त्याच्या त्या पाहण्याचा अर्थ लागला नाही पण मी त्याच्याकडे दुर्लक्ष केले आणि पुढे एका शाळकरी मुलाने विचारले तेंव्हासुद्धा एट्टमणी असे उत्तर दिले. त्याने स्वतःच्या घड्याळात बघितले आणि तो हसत सुटला. (मला अगोदर हे कळत नव्हते की स्वतःच्या हाताला घड्याळ असताना हे लोक आम्हाला वेळ विचारतातच का? बरे विचारतात तर विचारतात आणि वर हसतात. अर्थ काय ह्याचा?) रस्त्यात भेटून वेळ विचारणार्‍या त्या सर्व मुलांना मी ओरडून ओरडून ’एट्टमणी,एट्टमणी!’ असेच सांगत होतो आणि ती मुले फिदीफिदी हसत असत. मी हैराण होतो पण विचारणार कुणाला?
पुढे मला रामालिंगमकडून कारण कळले आणि मी माझ्या मूर्खपणावर मनसोक्त हसलो. त्याने मला मग १ ते १० आकडे शिकवले ते काहीसे असे होते...'ओन्न(१),रंड(२),मूनं(३),नालं(४),अंज्ज(५),आरं(६),येळ्ळं(७),एट्ट(८),ओंपत्त(९), आणि पत्त(१०). मी त्याला तसे म्हणून दाखवले तर स्वारी एकदम खूश!

त्यादिवशी देखिल जेवणाच्या सुट्टीत मी केळीच खाऊन वेळ मारून नेली. केळी जरा जास्तच पिकलेली होती पण दुसरा पर्याय नसल्यामुळे मी ती तशीच खाल्ली आणि कालच्यापेक्षा दोन जास्तच खाल्ली. त्यामुळे पोट व्यवस्थित भरले आणि वर्गात नीट लक्ष लागले. अजून फक्त थिअरीच चालू होती आणि दुसर्‍या दिवसापासून प्रात्यक्षिकं सुरू होणार होती. संध्याकाळी आम्ही तिथून परस्पर बाहेर फिरायला गेलो आणि परतताना एका बर्‍याशा उपाहारगृहात जेवूनच परतलो. थोडावेळ रामालिंगमशी गप्पा झाल्या आणि मग आम्ही झोपायला खोलीत परतलो. रात्री मला अचानक जाग आली तेंव्हा जाणवले की पोटात प्रचंड खळबळ माजलेय. मी उठून दरवाजा उघडला आणि संडासला जाऊन आलो. जरा बरे वाटले. पुन्हा अंथरुणावर पडलो‍. झोप लागते आहे असे वाटते न वाटते तोच पुन्हा पोटात गडबड सुरू झाली. पुन्हा उठलो,जाऊन आलो. अंथरुणाला पाठ टेकली न टेकली पुन्हा गडबड. पुन्हा गेलो,पुन्हा गेलो. असे रात्रभर जातच होतो.

चिंटू शांत झोपला होता. मी त्याला जागे केले नाही. पहाटे पहाटे त्याला जाग आली आणि त्याने बघितले तर त्याला मी अंथरुणावर दिसलो नाही. तो उठून बसला आणि त्याच्या लक्षात आले की दरवाजा सताड उघडा आहे. तो बाहेर आला तेंव्हा त्याने मला संडासाकडून परतताना पाहिले. मी कसाबसा पाय ओढत चालत होतो. तो झटकन पुढे आला. मला आधार दिला आणि पलंगापर्यंत आणून सोडले. त्याने मला विचारले, हा काय प्रकार आहे?
मी झाला प्रकार त्याला सांगितला आणि पुन्हा 'गमन' कर्ता झालो. ह्यावेळी त्याने मला नेऊन आणले. ही माझी १८वी खेप होती आणि अजूनही जीवाला शांती नव्हती. शरीरात बळ नव्हते पुन्हा पुन्हा जाण्यासाठी, पण पर्याय नव्हता. संडास खोलीपासून लांब होते ह्याचे प्रथमच वैषम्य वाटत होते. असेही वाटत होते की संडासातच पलंग ठेवावा. सकाळी आठ वाजेपर्यंत माझा स्कोअर २३ झाला होता. पण अस्वस्थता जात नव्हती. खालच्या मजल्यावरील डॉक्टर ८ वाजता येतात असे कळले होते म्हणून चिंटू खाली गेला तेंव्हा सुदैवाने डॉ.आले होते. त्यांना त्याने झालेली कहाणी सांगितली आणि वर येण्याची विनंती केली. पण ती त्यांनी फेटाळली आणि मलाच तिथे आणण्यास सांगितले.

मी तर पार गळून (गळून जाणे म्हणजे काय त्याचा प्रत्यक्ष अनुभव घेत होतो) गेलो होतो. चिंटूने मला उचलले आणि खाली नेले. हे दृश्य बघायला सगळी गर्दी जमली होती. डॉ. नी मला कंबरेच्या खाली एक मोठे इंजेक्शन दिले आणि काही गोळ्या दिल्या‌‌. शिवाय दिवसभर थोड्या-थोड्या वेळाने 'इलेक्ट्रॉल' घ्यायला सांगितले. त्यादिवशी माझ्याबरोबर चिंटू देखिल खोलीवरच राहिला. ठरलेल्या वेळी औषधे देत होता. मी त्याला मोठ्या मुश्किलीने, जेवून येण्यास राजी केले. येताना त्याने माझ्यासाठी मोसंबीचा रस आणला. रस प्यायल्यावर मला जरा हुशारी वाटली. इंजेक्शन आणि इतर औषधांच्या परिणामांमुळे माझे गळून जाणे पूर्णपणे थांबले होते आणि संध्याकाळपर्यत थोडे बरे वाटायला लागले होते. भूक लागायला लागली होती पण काय खायचे हा प्रश्नच होता. पण हा प्रश्न त्यादिवशी परसरामने सोडवला. त्याने मऊमऊ खिचडी बनवून आणली आणि मला खायला लावली.

खिचडी ह्यांपूर्वी आयुष्यामध्ये असंख्यवेळा खाल्ली असेल पण त्यादिवशीची खिचडी काही औरच लागली‍. जवळजवळ २४तासांनी मी अन्नग्रहण करत होतो त्यामुळे मोठ्या आवडीने मी ती खिचडी खाल्ली आणि मोठ्ठी ढेकर दिली तेंव्हा समोर बसलेल्या परसराम आणि चिंटू च्या डोळ्यात मला समाधानाची तृप्ती दिसली. त्यानंतरच त्या दोघांनी जेवून घेतले. माझ्या मनात असंख्य प्रश्नांनी गर्दी केलेली. कोण लागतात हे माझे? काय ह्यांचा माझा संबंध? का माझ्यासाठी एव्हढे सगळे केले? मी असे काही केले असते काय इतर कुणासाठी? उत्तर नव्हते! फक्त प्रश्न! त्यातच झोप केंव्हा लागली कळलेच नाही.

सकाळी जाग आली तेंव्हा उठायचा प्रयत्न केला पण जाणवले की अजून अंगात शक्ती नाही म्हणून पडूनच राहिलो. तंबी चहा-कॉफी देऊन गेला. कॉफीपान करता करता चिंटूने त्याने घेतलेला निर्णय मला सांगितला. त्यानुसार आज संध्याकाळपासूनच आम्ही देखिल खोलीवरच जेवण बनवायचे होते. त्यासाठी लागणारी सर्व सामग्री संध्याकाळी बाजारातून आणायचे असे ठरले. आजच्या सकाळच्या जेवणाची जबाबदारी पुन्हा एकदा परसरामने उचलली. त्याने आमच्यासाठी स्वतःबरोबर अजून एक पोळीभाजीचा डबा घेतला होता. त्या दोघांच्या मदतीने मी हळूहळू तयारी केली आणि प्रकें कडे प्रयाण केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: