माझ्या आयुष्यातील आजवरच्या कडू-गोड आठवणी मी "पूर्वानुभव" म्हणून सादर करत आहे.
आपण इथे आल्याबद्दल मन:पूर्वक धन्यवाद!

१७ नोव्हेंबर, २००७

मु.पो.अहमदाबाद!५

आम्ही मागवलेले मनुष्यबळ आले आणि काम अधिक जोरात आणि व्यवस्थितपणे सुरु झाले. माझ्या बरोबर काम करण्यासाठी पदू आला त्यामुळे मी एकदम निश्चिंत्त झालो होतो. पदू ज्ञानाच्या आणि कामाच्या बाबतीत 'बाप माणूस' होता. मी बरेचसे काम त्याच्याकडूनच शिकलो होतो. त्यामुळे आता तो माझा बॉस झाला होता आणि साहजिकच माझ्यावरचे दडपण खूपच कमी झालेले होते. मुंबईला एक चक्कर टाकावी असे मनात होते आणि आता पदूच्या आगमनामुळे ते शक्य होणार होते म्हणून मी वरिष्ठांकडे चार दिवस मुंबईला जाण्याची परवानगी मागितली आणि ती त्यांनी कोणतीही खळखळ न करता दिली. पडत्या फळाची आज्ञा घेऊन मी लगेच मुंबई गाठली.

मुंबईत चार दिवस राहून मी पुन्हा अहमदाबादला आलो तेव्हा मला कळले की सॅटेलाईटच्या सगळ्या गेस्टरूम भरलेल्या असल्यामुळे निदान एक आठवडा तरी मला कुठे तरी बाहेर राहावे लागणार होते आणि त्याप्रमाणे माझ्या राहण्याची व्यवस्था अहमदाबाद स्टेशनच्या जवळ असणार्‍या कालूपूर भागातील वेड्यांच्या इस्पितळाशेजारी(मेंटल हॉस्पिटल.. इथे नुसते 'मेंटल' म्हणूनच प्रसिद्ध होते) असणार्‍या सरकारी विश्रामगृहात करण्यात आली होती. इथून सॅटेलाईटला जायचे म्हणजे खूपच वेळ लागत असे. बसने जवळ जवळ १७-१८ किमि चा प्रवास करावा लागायचा.पण त्यातही एक गंमत होती. जायला यायला बराच वेळ लागत असल्यामुळे मला फक्त दिवसपाळी करावी लागायची आणि त्यामुळे संध्याकाळ मोकळीच मिळायची. मग रात्रीचे जेवण अगदी मनपसंत असे मिळत असे. तसेच आजूबाजूचा परिसर बघण्याची संधी आणि तिथल्या स्थानिक लोकांशी संवाद साधण्याची संधीही मिळाली.

संध्याकाळी शहरात परत आलो की मी आजूबाजूचा परिसर पाहण्यासाठी पायीच फिरत असे. पण असे करताना कैक वेळेला रस्ता चूकल्यामुळे माझ्या वसतीस्थानाकडे कसे पोहोचायचे हे कळत नसे. मग सरकारी विश्रामगृह कुठे असे एखाद्या स्थानिक माणसाला विचारले की तो बावचळत असे. इथे असे काही आहे हे स्थानिकांना माहितच नसायचे. मग नुसते 'मेंटल' म्हटले तरी चालायचे. पण असे म्हटल्याने समोरचा माणूस माझ्याकडे विचित्र नजरेने पाही आणि काहीच उत्तर न देता निघून जाई. आधी मला त्याचे कारण कळले नाही. पण मग उशीराने ट्युब पेटली. अरेच्चा! खरेच की! रात्री-बेरात्री मेंटल हॉस्पिटलचा पत्ता विचारणार्‍या माणसाकडे लोक असेच बघणार की! त्यातून माझा एकूण अवतारच एखाद्या विक्षिप्तासारखा असायचा. त्यामुळे काहीजण मला टाळत पण एखाददुसरा सज्जन भेटायचाच की जो व्यवस्थित मार्गदर्शन करायचा आणि मी सुखरुप आपल्या विश्रामगृहावर पोहोचायचो.

असाच एक दिवस मी माझे काम संपवून शहरात आलो आणि कळले की शहरात कुठे तरी दोन जमातीत वादावादी झाली आणि त्याचे पर्यवसान मारामारीत होऊन त्यात दोन जण ठार झालेत. त्यामुळे दुसर्‍या दिवशी अहमदाबाद बंदचे आवाहन केले गेलेय आणि त्यात बस,टॅक्सी,रिक्शा वगैरेसकट सगळी वाहने बंद राहतील. आता सॅटेलाईटला कसे जायचे हा प्रश्न माझ्या पुढे पडला होता.पण विचार करायला संपूर्ण रात्र हाताशी होती तेव्हा 'बघू उद्या सकाळी' असा विचार करून मी निवांतपणे जेवून झोपलो.

दुसर्‍या दिवशी उठलो. सगळी आन्हिके उरकली. कपडे चढवले आणि चहा पिण्यासाठी बाहेर पडलो. बाहेर सगळा थंडा कारभार होता. रस्ते सुनसान होते . दुकाने बंद होती. अहमदाबाद स्टेशन जवळच असल्यामुळे मी तिथे जाऊन चहा प्यायला. वर्तमानपत्र घेतले. त्यातील ठळक बातम्या वाचल्या आणि लक्षात आले की मामला गंभीर आहे. आज शहरातली सगळी वाहतूक बंद असल्यामुळे मला स्वतःला खोलीतच कोंडून घ्यावे लागणार होते.पण तिथे दिवसभर एकटाच भूतासारखा बसून काय करणार? पायी जावे काय? छे! ते तर शक्यच नव्हते आणि त्यातून मला रस्तेही नीट माहित नव्हते. मग काय करायचे?

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: