माझ्या आयुष्यातील आजवरच्या कडू-गोड आठवणी मी "पूर्वानुभव" म्हणून सादर करत आहे.
आपण इथे आल्याबद्दल मन:पूर्वक धन्यवाद!

२४ एप्रिल, २०१०

पुन्हा एकदा..मुक्काम पोस्ट नवी दिल्ली! भाग ५

सिन्हा बर्मनकडे राहायला सुरुवात झाली...जागा आवडली होतीच त्यामुळे लगेच बस्तान बसले. सकाळी सकाळी सिब त्याच्या खास आवडीची बंगाली भजनं ऐकायचा. पंकज मलिक,ज्युतिका रे वगैरेंसारखे जुने गायक असायचे त्यात....बहुदा सिबकडे एकदोनच ध्वनीफिती असाव्यात पण त्यातली गाणी मात्र खूपच छान होती. सुरुवातीला लागणारे एक भजन....बहुतेक पंकज मलिक ह्यांच्या आवाजातले....विलक्षण खर्जातले....अंगावर अगदी काटा यायचा..त्याचे सुरुवातीचे बोल आठवताहेत....

रामनाम घन:श्यामनाम शिवनाम सिमर दिनरात,हरिनाम सिमर दिनरात.....पुढचं काही आठवत नाही कारण ते शब्द माझ्यापर्यंत कधीच पोचले नाहीत...पण हा सुरुवातीचा खर्जातला आवाज आजही माझ्या कानात गुंजतोय...मी काही देवभक्त नाही....म्हणजे आडनावात देवत्व आहे...म्हणजे देव आडनाव आहे...इतकाच माझा देवाशी संबंध...एरवी मी मूर्तीतला अथवा इतर कोणत्याही प्रकारातला देव मानत नाही...त्यामुळे त्या गाण्यातली राम,कृष्ण,शिव,हरि इत्यादी नामांशी मला काही देणे घेणे नाही.....पण ते शब्द,ती चाल आणि तो आवाज ह्यांचा असा काही विलक्षण गोफ गुंफला गेला होता की....सारखं ऐकत राहावंस वाटायचं....ऐकून ऐकून माझं ..ते पालूपद पाठही झालं....मी आंघोळीला जेव्हा जातो तेव्हा माझी संगीतसाधना सुरु असते....असं ऐकलंय की संगीतसाधनेची सुरुवात ही नेहमी खर्जाच्या रियाजाने करावी....मी काही जातिवंत गायक नाही...तरीही आंघोळ करतांना जी गाणी गात असतो....त्यात सर्वप्रथम हे पालूपद आपोआप ओठात येतं....मग सैगलची गाणी...मग भीमसेन...वगैरे वगैरे करत करत वरच्या पट्टीतली गाणी म्हणत असतो...असो.
इथे सांगायचा मुद्दा इतकाच की त्या पालूपदाचा माझ्यावर इतका परिणाम झाला की आजही इतक्या वर्षांनंतरही मी ते गुणगुणत असतो....काही काही गोष्टी मनावर किती खोल प्रभाव टाकतात ह्याचे हे उत्तम उदाहरण आहे असे मानता येईल.

स्नान करतांनाच अंगावरचे कपडे धुवायला लागायचे...म्हणजे एरवी नुसत्या स्नानाला मला किमान अर्धा तास लागायचा...त्याऐवजी इथे एक तास लागत असे....त्यामुळे आधी सिब आणि मग रामदास ह्या दोघांच्या आंघोळी उरकल्या की मी मग अगदी आरामात न्हाणीघराचा ताबा घेत असे....आंघोळ,कपडे धुणे आणि संगीतसाधना असा त्रिवेणी कार्यक्रम मग चालायचा....अशा वेळी मी गातो म्हणजे अगदी खुल्या आवाजात गात असतो...त्यामुळे आवाज खर्जापासून तारसप्तकापर्यंत कसाही फिरवून(त्यावेळी खरंच फिरायचा...आता....गेले ते दिवस) गात असे....सुरुवातीला त्या दोघांना ते जरा विचित्र वाटत असे...मग हळूहळू त्यांनाही त्याची सवय झाली...अधेमधे दरवाजा ठोठावून ते दादही देऊन जायचे.  ;)

माझे स्नान होईपर्यंत सिब किवा रामदास चहा-पान करून तयार झालेले असत...त्या काळात मी कॉफीशिवाय काही पीत नसे... त्यामुळे मला कार्यालायात गेल्याशिवाय ती मिळत नसे. दिल्लीत ढाबे भरपूर आहेत...ढाबे म्हणजे आपल्या इथल्या टपर्‍या म्हणा...पण तिथे पेय म्हणून फक्त चहा मिळत असे आणि दुपारच्या वेळी लस्सी...एरवी न्याहारीसाठी छोले-बटुरे,छोले-कुलचे वगैरे खास पंजाबी पदार्थ असत....कधीमधी परोठे देखिल असत..मग ते आलू(बटाटा),मुली(मूळा),गाजर,कोबी,पालक,मेथी वगैरेपैकी कोणत्याही एका प्रकारचे असत...त्याबरोबर दही देखिल मिळायचे...मला सकाळी कडकडून भूक लागलेली असे ...मग मी आपला मोर्चा अशा एखाद्या ढाब्याकडे वळवत असे.....तिथे दही-परोठ्याची न्याहारी करून मगच कार्यालयाकडे प्रस्थान ठेवत असे...दिल्लीचे हवामान खाण्या-पिण्यासाठी मानवणारे होते त्यामुळे मी सहजपणाने ५-६ परोठे स्वाहा करत असे.

सिब आणि रामदास मुख्यालयात काम करायला जायचे तर मी संसदभवन मार्गावरच्या कार्यालयात जात असे. त्यामुळे आमचे मार्ग आणि दिशाही भिन्न होत्या. तिथून मला कार्यालयात पोचायला बसने साधारणपणे ३५ मिनिटे लागायची. वेळेवर जायचे तसे फारसे बंधन माझ्यावर नव्हतेच तरीही मी सर्वांच्या आधीच साधारणपणे नऊ-सव्वा नऊ वाजेपर्यंत कार्यालयात पोचत असे.

कार्यालयात गेल्यावर मस्तपैकी गरमागरम कॉफीची मजा लूटत ,मित्रांशी गप्पा मारत दिवस सुरु व्हायचा.
हे सगळं जरी व्यवस्थित सुरु होतं तरी मनात कुठे तरी...पुन्हा केव्हा एकदा मुंबईला परत जातो असं वाटत राहायचं.....दुपारच्या जेवणाची व्यवस्था....माझे मित्र आपणहून करायचे...प्रत्येकजण काहीतरी जास्त पदार्थ आणून मला आग्रहाने आणि प्रेमाने खायला लावायचा....सुरुवातीचे काही दिवस मी त्यांच्या आदरातिथ्याला नाही म्हटले नाही....पण जसजसे दिवस जाऊ लागले तसतसे मला ते सगळं प्रकरण पचवणं कठीण व्हायला लागले. असं फुकट कुणाचे, का आणि किती दिवस खायचे? म्हणून मी त्यांना कधी समजावून, तर कधी  परस्पर बाहेरच जेवायला जाऊ लागलो...ऊस कितीही गोड असला तरी तो मूळापासून खाऊ नये असे म्हणतात...... मी त्यांना न दुखावताही त्यातून अलगद बाहेर पडलो.

आमच्या कार्यालयाच्या सभोवताली सगळी सरकारी कार्यालयच होती. डाव्या बाजूला युएनआय(युनायटेड न्युज ऑफ इंडिया) चे ऑफीस(ह्यांचे उपहारगृह इतके जबरदस्त होते की काही विचारू नका...सकाळी तर शिरा,उपमा,इडली,वडा वगैरे पदार्थ असे झकास मिळायचे की आजही ती चव विसरलेलो नाही), विठठभाई पटेल भवन, जीपीओ, संसद भवन, आकाशवाणी,दूरदर्शन वगैरेसारखी महत्वाची कार्यालयं होती...तर उजव्या बाजुला..संसदभवन पोलिस स्टेशन,स्टेट बॅंक ऑफ इंडिया,जंतर मंतर,कॅनॉट प्लेस,नेहरू पार्क वगैरेसारखी सरकारी कार्यालयं आणि सार्वजनिक ठिकाणं होती.
ह्या संसदभवन पोलिस स्टेशनच्या मागेच एक छोटेखानी कोर्ट होते आणि त्याच्यालगत बर्‍याच वकिलांच्या टपर्‍या होत्या...ह्या सर्वांसाठी तिथे  एक छोटेसे उपहारगृहदेखिल होते...जिथे सकाळी चहा-न्याहारी.,दुपारी जेवण वगैरे मिळत असे. एकवेळ मी तिथे अपघातानेच पोचलो आणि तिकडची दालफ्राय खाऊन इतका खुश झालो की ...मग ठरवून टाकले की रोज दुपारी तिथेच जेवायला जायचे.

एकदोनवेळा तिथे गेलो आणि मी तिकडचाच झालो....गंमत अशी की तिथे काम करणार्‍या त्या बिहारी मुलाशी मी गप्पा मारायचो...तो दालफ्राय कसा बनवतो ते विचारायचो...तो ती बनवत असतांना तिथे उभा राहायचो...त्यामुळे एकदोन दिवसातच तो मला छानपैकी ओळखायला लागला....मी तिथे गेल्यावर माझी खास खातिरदारी करायला लागला...पुढे गप्पांच्या ओघात कळले की तो माझ्याशी इतका जवळीक का साधतो आहे ते....त्याचं असं झालं...बोलता बोलता त्याने मला प्रश्न केला..

बाबुजी,आप यहांपर नये दिखते हो.

जी,वैसे देखा तो मैं यहां नया हूँ. लेकिन तुमने कैसे पहचाना.

 आपका डिरेस...वो यहांके लोगोंसे बहुत ही अलग है.......

खरंच माझा पोशाख वेगळाच होता तिथल्या सगळ्यांच्यात. पॅंट,चट्ट्यापट्याचा अर्ध्या हातांचा टीशर्ट, केस विस्कटलेले,छोटेखानी मिशी, हनुवटीखाली राखलेली दाढी, गळ्यात शबनम पिशवी आणि पायात कोल्हापुरी चपला...अशा अवतारातला मी आणि दिल्लीतले सगळे कसे?  पॅंटमध्ये खोचलेले लांब हातांचे शर्ट, पायात बूट, आणि दिसण्यात आणि बोलण्यात एक प्रकारचा मग्रूरपणा,रुबाब वगैरे

कहांके हो आप?

मुंबईका हूँ मैं .

बंबईसे?....आणि त्याचा वासलेला ’आ’ बराच वेळ तसाच होता...
.त्या दिवसानंतर मग तो माझ्या तिथे जाण्याची वाट बघत बसायचा...मी तिथे गेल्यावर एका खास टेबलावर...टेबलं कसली म्हणा...चारदोन फळकूटं जोडून केलेले टेबलासारखे काहीतरी....व्यवस्था करायचा. मला पाणी पिण्यासाठी एक खास पेला आणि जग...दोन्ही.. अगदी माझ्यासमोर घासून, आणून ठेवायचा...मग दालफ्राय,दही आणि गरमागरम फुलके...मुलगा तसा दिसायला काळा रप्प होता..चेहराही फारसा आकर्षक नव्हता...उंची अगदीच बेताची...पण दात एकदम मोत्यासारखे चमकणारे...माझ्या पानातला फुलका संपतो न संपतो दुसरा गरम फुलका हजर असायचा...कोणत्या जन्मीचे संबंध होते माहित नाही....पण तो मुलगा माझी इतकी काही बडदास्त ठेवत होता की साहजिकच त्याच्या मालकाच्या आणि इतर नेहमीच्या गिर्‍हाईकांच्या डोळ्यातही ते भरले....मालकाने एकदा त्याला विचारलेही...मग त्याने काय सांगितले माहित नाही पण त्यादिवसापासून मालकही माझ्या दिमतीला हजर असायचा...खरं सांगायचं तर इतक्या अगत्याची,कौतुकाची मला सवय नव्हती...मी त्या मालकाला तसे सांगूनही पाहिले पण त्याने त्याचा परिपाठ सुरुच ठेवला.

माझ्या सकाळच्या जेवणाची अशी सोय झाली...आणि संध्याकाळी मी ,रामदास आणि सिब मिळून पोळी-भाजी,भात,आमटी वगैरे बनवून खायला लागलो. मी कणीक भिजवून द्यायचो...रामदास मस्तपैकी पोळ्या करायचा...सिब वरणभाताचा कुकर चढवायचा आणि मग मी आमटी आणि भाजी बनवायचो..कधी कधी त्यांच्यापैकी कुणी तरी हे काम करायचे....भांडी घासायचे काम मी आणि रामदास दोघे मिळून करायचो. शनिवार रविवार मात्र मी संपूर्णपणे बाहेर फिरायचो,खायचो...कारण....सिब आणि रामदास दोघेही त्या दिवशी मासे वगैरे बनवून खात असत. ह्या काळात मी बसमधून दिल्लीदर्शन करत हिंडायचो. प्रगती मैदान,त्यावरील कैक प्रदर्शनं,अप्पूघर,बहाई मंदिर,कॅनॉट प्लेस... वगैरे ठिकाणी मी मुक्तपणे फिरायचो.

कॅनॉट सर्कलमधील नेहरू बागेत तिथल्या हिरवळीवर लोळायला मजा यायची. तिथेच संध्याकाळी जुन्या हिंदी सिनेमातली गाणी लावली जायची...संपूर्ण बागेत ठिकठिकाणी स्पीकर्स लावलेले असत...त्यातून मंदपणे ऐकू येणारी गाणी एका वेगळ्याच विश्वात घेऊन जायची...ह्याच हिरवळीवर काही बुद्धिबळ खेळणारे महाभागही मला सापडले. मी त्यांच्या बाजूला जाऊन शांतपणे त्यांचा खेळ बघत बसायचो...एकदोन दिवसात त्यांच्याशीही दोस्ती झाली आणि मीही त्यांच्याशी दोन हात करायला लागलो....पाहता पाहता त्यांच्यातल्या पट्टीच्या खेळाडूलाही मी हरवले आणि मग माझा रुबाब वाढला....माझ्याबरोबर बसून मग ते आपापल्या खेळाचे विश्लेषण करायला लागले...ह्या लोकांनीही माझे दिल्लीतले वास्तव्य काही प्रमाणात सुखकर केले.

६ टिप्पण्या:

सोनाली केळकर म्हणाले...

म्हणजे एव्हाना तुम्हाला दिल्ली आवडायला सुरुवात झाली होती तर. पण एकदम मज्जानु लाईफ होते तुमचे :)

प्रमोद देव म्हणाले...

आवडायला? नाही गं.केवळ नाईलाज म्हणून राहात होतो..पण हे काही विरंगुळ्याचे क्षण निश्चितच होते..एरवी मी पळूनच आलो असतो तिथून.

अनामित म्हणाले...

अजी मिया आप तो दिल्लीमे जम ही गये!! :-)

प्रमोद देव म्हणाले...

नही मियाँ,जम जरूर सकते थे...मगर नही जमें..क्युंकि हमारा दिल नही लगा वहां.

Sarika म्हणाले...

मुंबईकराला इतर कोणतेही शहर कायम निवासासाठी आवडणे तसे कठिण आहे.

प्रमोद देव म्हणाले...

खरं आहे सारिका.
मुंबई हाच प्रत्येक अस्सल मुंबईकराचा श्वास आणि ध्यास आहे.