माझ्या आयुष्यातील आजवरच्या कडू-गोड आठवणी मी "पूर्वानुभव" म्हणून सादर करत आहे.
आपण इथे आल्याबद्दल मन:पूर्वक धन्यवाद!

२३ नोव्हेंबर, २००७

बाबूल मोरा! २

"सैगल साहब! आपने इतने सारे गाने जो गाये है और उसमेसे बहूत सारे लोकप्रिय भी हुये है! क्या आप बता सकते है की इनमेसे कौनसा गाना सबसे ज्यादा, आपको पसंद है?"
माझा प्रश्न ऐकताच सैसा हसले आणि कोणताही कलाकार जे उत्तर देईल तेच, म्हणजे "जैसे माँ को तो सभी बच्चे प्यारे होते है वैसे ही मुझे मेरे गाये हुये सभी गाने उतनेही प्यारे है. उसमे कोई ज्यादा,कोई कम नही हो सकता!" असे म्हणाले.
"लेकीन मुझे तो आपने गाया हुआ 'बाबुल मोरा नैहर छुटोही जाय' यही गाना सबसे ज्यादा प्रिय है! मैं तो गये कितने सालोंसे उसके पीछे पागल हुआ हूँ.आपकी क्या राय हैं इस बारेमे?".... मी.
काही क्षण सैसांनी डोळे मिटले आणि त्या गाण्याचा पूर्व-इतिहास आठवण्यात दंग झाले. मग एकदम दचकून जागे झाल्यासारखे करत म्हणाले, " अरे वो गाना तो मेरे कलेजेका टुकडा है रे! 'आर सी बोराल' साहबने क्या धुन बनाई है! जितनी भी बार वो गाना गाता हूँ तो बाकी सबकुछ भूल जाता हूँ! सच कहूँ तो लब्जोमें बयाँ करना मुश्किल है!" आणि सैगल साहेब पुन्हा जुन्या आठवणीत हरवले.

"मोद'बुवा'! अहो तुम्ही काय ती तुमची कल्पना सांगणार होता ना? केव्हांपासून मी वाट पाहतोय, तुम्ही त्याबद्दल काही बोलतच नाहीये. आता काय ते चटकन सांगा बघू." अण्णा कृतक कोपाने म्हणाले.
"अण्णा! मी ह्या गाण्याबद्दलच म्हणत होतो की....
तेव्हढ्यात सैसा त्यांच्या भावसमाधीतून जागे झाले आणि नकळतपणे गुणगुणायला लागले. मी पटकन त्या नोकराला खुणेने पेटी आण म्हणून सांगितले आणि त्यानेही अतिशय तत्परतेने पेटी आणून सैसांच्या पुढ्यात ठेवली. सैसांनी पेटी उघडली आणि सहजतेने त्यावर बोटे फिरवत हलकेच भैरवीची स्वरधून छेडली आणि पाठोपाठ गळ्यातून तो ओळखीचा खर्ज उमटला.
आहाहाहा!सगळे अंग रोमांचित झाले.
"बाबुल मोराऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽ नैहऽऽऽर छुटोऽऽही जाय." सैसा मुक्तपणे गाऊ लागले.

मी अण्णांकडे पाहिले. त्यांचीही भावसमाधी लागली होती. सैसा गातच होते आणि आम्ही सगळे त्यात रंगून गेलो होतो. मधेच थांबून सैसा म्हणाले, "भीमसेनजी! आपभी सुरमे सुर मिलाईये ना!"
अण्णा मनातल्या मनात सैसांबरोबर गातच होते. अशा तर्‍हेचे आवाहन ते वाया कसे जाऊ देतील. त्यांनीही आपला आवाज लावला आणि मग त्या दोन 'तानसेनांची' ती अवर्णनीय जुगलबंदी सुरु झाली.एकमेकांवर कुरघोडी करणारी जुगलबंदी नव्हती ती! ती तर एकमेकांसाठी पुरक अशीच होती. अण्णांच्या गळ्यातुन येणार्‍या त्या भैरवीच्या करूण सुरांनी सगळे वातावरणच भारुन गेले. अण्णांच्या सुरांची जादूच अशी होती की सैसांनी मग फक्त धृवपद गाण्यापुरताच आपला सहभाग ठेवला.

"चार कहार मिल, मोरी डोलिया सजावें" ह्यातल्या "डोलिया" वर पोचलेला अण्णांचा आर्त 'तार षड्ज' काळजाचे पाणी पाणी करत होता. सैसांच्या डोळ्यातून घळघळा अश्रु झरायला लागले. "क्या बात है!", "जियो!" अशी वाहवा त्यांच्या मुखातून निघू लागली. सैसांसारख्या तानसेनाची दाद मिळाल्यामुळे अण्णांना नव्या नव्या जागा दिसायला लागल्या आणि त्या त्यांच्या गळ्यातून निघताना त्यांच्या चेहर्‍यावरची ती तृप्ती खूप काही सांगून जात होती. मी तर त्या स्वरसागरात आकंठ बुडालो होतो. मधेच अण्णांनी मला खूण केली आणि माझ्या नकळत मीही गाऊ लागलो. अण्णा(माझे मानसगुरु) आणि सैसा ह्यांच्या गाण्याचा आणि सहवासाचा परिणाम म्हणा किंवा जे काही असेल त्याने माझाही आवाज मस्त लागला होता आणि कधी अण्णांची तर कधी सैसांची नक्कल करत मीही उन्मुक्तपणे गाऊ लागलो. त्यांची दादही घेऊ लागलो. मधेच सैसा देखिल एखादी छोटी नजाकतदार तान घेऊन अण्णांना प्रोत्साहन देत होते आणि अण्णा मला. कधीच संपू नये असे वाटणारा तो क्षण होता.

दुसर्‍या कडव्यातील "जे बाबुल घर आपनो मैं चली पिया के देश" मधल्या "पियाऽऽऽ" वर सैसांनी केलेला किंचित ठेहराव पुन्हा काळजाला हात घालून गेला. अण्णांनी तर ह्या ठिकाणी नतमस्तक होत सैसांना वंदन केले. धृवपद गाऊन सैसांनी भैरवीची समाप्ती केली आणि आनंदाच्या भरात अण्णांना कडकडून मिठी मारली. ते दृष्य पाहात असताना माझ्या डोळ्यांचेही पारणे फिटले.मघाशी कान तृप्त झाले आता डोळेही तृप्त झाले.ज्या साठी हा सगळा बनाव मी घडवून आणला होता तो त्या दोघांच्या नकळत त्यांनीच सहजसाध्य केलेला पाहून मी कृतकृत्य झालो. इथे मला तुकाराम महाराजांच्या त्या वचनाची प्रकर्षाने जाणीव झाली, "ह्याच साठी केला होता अट्टहास,शेवटचा दिस गोड व्हावा!"

बराच वेळ दिवाणखान्यात एक प्रसन्न शांतता नांदली. त्या शांततेचा भंग करत अण्णा म्हणाले, "काय मोद'बुवा'! आता तरी सांगणार काय तुमची कल्पना?"
"अण्णा! मी सांगायच्या आधीच तुम्ही दोघांनी ती काही प्रमाणात मूर्त स्वरुपात आणलीत."
"म्हणजे? मी नाही समजलो!"
"सांगतो ऐका! त्याचं काय आहे अण्णा! माझ्या मनात बरेच दिवसांपासून एक कल्पना आहे. सैगल साहब आप भी सुनिये!.............

"आणि तू मला तेव्हढ्यात उठवलेस. काय मस्त बैठक जमली होती."
"कमालच आहे बाबा तुमची. अहो सैसा जाऊन कितीतरी वर्षे झाली आणि भीमसेन आजोबाही आता खूप थकलेत. तरीही तुमच्या बरोबर ते गात होते? तुम्ही काही म्हणा पण तुमची स्वप्नं देखील अफलातून असतात बाकी!"
"अगं! देहरुपाने सैसा आता नसले तरी ह्या 'बाबुल मोरा' च्या रुपात ते सदैव माझ्यासोबत असतात आणि अण्णा जरी शरीराने थकले असले तरी त्यांचे गाणे माझ्या हृदयात आजही तरूण आहे. ही कलावंत मंडळी म्हातारी होवोत अथवा ह्या जगाचा निरोप घेवोत पण त्यांची कला 'चिरतरूण' आहे हे विसरु नकोस. तिला कधीही मरण नाही."
"हे मात्र पटलं बाबा !"

दूर कुठे तरी रेडिओ गात होता, "बाबुल मोरा नैहर छुटोही जाय!"

समाप्त.

थोडीशी पूर्वपिठिका:
बरेच दिवस माझ्या डोक्यात स्वर्गीय कुंदनलाल सैगल ह्यांनी गायलेलं आणि अजरामर झालेलं 'बाबुल मोरा' ठाण मांडून बसलंय.सैगलसाहेबांची तशी सगळीच गाणी मला आवडतात; पण हे गाणं त्यातले शिरोमणी म्हणावं असे आहे. माझेच काय मोठमोठ्या गवयांना देखिल 'बाबुल मोरा' ने भूल घातलेय. ठुमरीच्या अंगाने जाणारे भैरवी रागातले हे गीत असल्यामुळे बर्‍याचदा शास्त्रीय मैफिलींचा शेवट देखिल ह्याच भैरवीने करण्याचा मोह भल्याभल्यांना आवरता आलेला नाहीये. स्वरभास्कर पंडित भीमसेन जोशींनी देखिल ही भैरवी गायलेली आहे.त्याची ध्वनीफितही माझ्याकडे आहे. तसेच गिरिजा देवींकडूनही हीच भैरवी ठुमरी एकदा कधीतरी ऐकल्याची स्मृती अजूनही ताजी आहे.
रोज न्हाणीघरात स्नानाच्या वेळी मी ह्याच गाण्यावर निरनिराळे प्रयोग करत असतो. तेव्हा मनात एक कीडा आला की आपण ह्या गीताचे 'फ्युजन' की काय म्हणतात ते का करू नये? सैसा,भीमसेन आणि गिरिजादेवी ह्या तिघांनी मिळून हे गीत गावे असे मला वाटते. मात्र प्रत्येक वेळी धृवपद सैगलसाहेबच गातील. त्यामुळे गाण्याला एक वेगळाच उठाव येईल असे माझे मत आहे.सगळ्यांचे गाऊन झाल्यावर मग त्याचे संपादन करून जे काही बनेल ते नक्कीच अफलातून असेल.अर्थात ही निव्वळ कविकल्पना आहे हे मला ठाऊक आहे. पण कशी वाटली कल्पना? आवडली का तुम्हाला?

अवांतर: मला संगीतातले तसे काही कळत नाही. पुलंच्या 'रावसाहेबां' इतकेच माझे संगीत विषयक ज्ञान आहे ह्याची कृपया संगीतज्ञांनी नोंद घ्यावी.

हाच लेख इथेही वाचता येईल.

२ टिप्पण्या:

अनामित म्हणाले...

mala hi sagitatale o-ki-tho kalat nahi pan ya diggajanna ektra eikayala kharch maja yeyil.

pratyakshat yene kathin asale mhanun kay zale, swapne baghyach hakka tar konich hiravun ghevu sakat nahi... hyatach anand ahe...
Prachi

अनामित म्हणाले...

कितीतरी कानसेनांच हेच स्वप्न असेल ....एक अप्रतिम आणि अशक्य गोष्ट तुमच्या स्वप्नातून कां होईना अनुभवायला मिळाली धन्स..... !!!