माझ्या आयुष्यातील आजवरच्या कडू-गोड आठवणी मी "पूर्वानुभव" म्हणून सादर करत आहे.
आपण इथे आल्याबद्दल मन:पूर्वक धन्यवाद!

११ ऑक्टोबर, २०१२

क्षयाच्या निमित्ताने....

मंडळी मागच्या लेखात जे म्हटलं होतं....त्याची पुढची कहाणी ऐका...आपलं वाचा.

८ ऑगस्ट २०१२ला माझी सिटी स्कॅनच्या मदतीने बायोप्सी झाली. त्यातून गाठीतून काढलेले दोन नमुने पुढील तपासणीसाठी पाठवले....त्यातल्या एकाचा अहवाल आठवडाभरात आला....मला त्यातली तांत्रिक भाषा कळत नाही पण त्याचा सारांश असा होता...त्यात टीबी(क्षय) किंवा सार्कॉईडोसिस (मी हा रोग पहिल्यांदाच ऐकला) ह्यांची शक्यता व्यक्त केली होती.
सार्कॉईडोसिसवर शक्यतो औषधोपचार करत नाहीत ...तो आपोआप बरा होतो असे कळले....मी जास्त खोलात नाही गेलो...ज्यांना उत्सुकता असेल त्यांनी कृपया गुगलून पाहावे.  :)
त्यामुळे टीबी(क्षय) असावा असे समजून त्यावर १३ ऑगस्ट २०१२ पासून उपचार सुरु झाले.....

बायोप्सी करून काढलेला दुसरा नमुना कल्चर करण्यासाठी पाठवला होता...त्याचा अहवाल सहा आठवड्यांनी म्हणजे साधारण नोव्हेंबरच्या तिसर्‍या आठवड्यात आला....त्यातही क्षयासाठी भक्कम पुरावा सापडला नाही.
हा अहवाल येण्याआधी काही दिवस टीबी गोल्ड नावाची एक रक्त तपासणी केली गेली...त्याचा निष्कर्ष नकारार्थी आला.

अशा तर्‍हेने बहुतेक तपासण्यात काहीच ठोस पुरावा सापडला नाही.
१३ ऑक्टोबरला औषधोपचारांना दोन महिने होतील....काल पुन्हा एकदा छातीचा एक्स-रे काढला...आज तो  एक्स-रे आणि जुना...अगदी सुरुवातीला काढलेला एक्सरे ह्यांची तुलना डॉक्टरांनी करून काही आशादायक बदल झाल्याचे म्हटले आणि एकूण चारपैकी दोन औषधं बंद करण्याचे ठरवलंय...राहिलेली दोन औषधं अजून किमान तीन चार महिने घ्यावी लागतील असेही ते म्हणाले.

इतकं सगळं आजवर झालंय....माझा पहिल्यापासूनचा एकच प्रश्न..जो मी डॉक्टरांना विचारतोय.....मला टीबी झालाय हे  पूर्णपणे सिद्ध झालेलं नाहीये..बहुतेक तपासण्या नकारार्थी निष्कर्ष दाखवताहेत...तरी मला ही औषधं का घ्यावी लागताहेत....

डॉक्टर शांतपणे म्हणतात...बायोप्सीच्या सुरुवातीच्या निष्कर्षात  तशी शक्यता वर्तवलेली होती. त्यामुळे पुढचे निष्कर्ष काही येवोत...केवळ शंका आली तरी टीबीच्या बाबतीत वेळीच जर उपचार नाही केले तर पुढे त्याचा त्रास होतो....वगैरे वगैरे.

मंडळी, एक मात्र झालंय...ज्या सततच्या खोकल्यामुळे मी हे सर्व सोपस्कार...उदा. तपासण्या,औषधं वगैरे करून घेतोय...तो खोकला सुरुवातीच्या आठ-दहा दिवसातच कमी झाला आणि हळूहळू गायब झाला....हा माझ्यासाठी खूप मोठा लाभ आहे.

७ टिप्पण्या:

हेरंब म्हणाले...

काळजी घ्या आणि लवकर बरे व्हा.

अपर्णा म्हणाले...

काका, तब्येतीची काळजी घ्या. काहीवेळा औषधोपचारांबाबतीत किती प्रश्न पडले तरी डॉ. चं ऐकावं हेच बरं.
तुम्हाला लवकर बरं वाटो. :)

प्रमोद देव म्हणाले...

हेरंब आणि अपर्णा, मी काळजी घेतोच आहे.
अपर्णा, मला पडणारे प्रश्न मी नेहमी डॉक्टरांना विचारतच असतो...अर्थात उत्तर पटो न पटो त्यांनी लिहून दिलेली औषधही नियमितपणे आणि वेळेवर घेत असतोच...तेव्हा काळजी नको.
सद्भावनेबद्दल दोघांनाही मन:पूर्वक धन्यवाद!

zakasrao म्हणाले...

kaakaanu tumhee aajaari hotaa he maahiteech navhat.
aataa theek aahe naa tabyet?

Zakasrao

प्रमोद देव म्हणाले...

झकासा,आता सुधारतेय तब्येत!

महेंद्र म्हणाले...

जर टिबी नाही, तर मग औषधं कशाला घ्यायची? खरंच महत्त्वाचा प्रश्न आहे. जर विनाकारण काही औषधं घेतली तर त्याचा दुष्परीणाम होणार नाही का? हा विचार मनात येणे सहाजिकच आहे.
असो,
काळजी घ्या, आणि लवकर बरे व्हा.

प्रमोद देव म्हणाले...

धन्यवाद श्रीमंत!
बर्‍याच गोष्टीत आपण परावलंबी असतो....तसंच हे प्रकरण. इथे डॉक्टर म्हणतील त्याला मान डोलवावी लागते...वर त्यांना आपणच पैसे देत असतो. शेवटी बरं आपल्यालाच व्हायचं असतं ना? :)