माझ्या आयुष्यातील आजवरच्या कडू-गोड आठवणी मी "पूर्वानुभव" म्हणून सादर करत आहे.
आपण इथे आल्याबद्दल मन:पूर्वक धन्यवाद!

२३ नोव्हेंबर, २०१२

विनायक कारभाटकर....बेकरी व्यवसायातील एक यशस्वी उद्योजक!

मध्यंतरी रिलायन्स एनर्जीकडून टाटा पॉवरकडे माझी वीज जोडणी हस्तांतरित करण्यासाठी मी अभय सरमळकर नावाच्या  एका मध्यस्थाची मदत घेतली होती...त्याच्याशी बोलतांना कळले की तो ज्या कंपनीसाठी पूर्णवेळ काम करतोय त्या ’व्हिनस कन्फेक्शनर्स’चे मालक एक हिंदू आणि त्यातूनही मराठी(गोवेकर) आहेत. खरंतर बेकरी धंद्यात ख्रिश्चन,पारशी आणि मुसलमान  ह्या लोकांचाच वरचष्मा आहे...अशा ह्या धंद्यात अपवाद म्हणून का होईना एक हिंदू पाय रोवून उभा आहे.  हे ऐकून माझे कुतूहल जागृत झाले आणि मग मी ठरवले की ह्या व्यक्तीबद्दल सगळं जाणून घेण्यासाठी त्यांची प्रत्यक्ष मुलाखतच घ्यावी...

मुलाखत घ्यायचे असे ठरवून मी जरी ’व्हिनस’मध्ये पाऊल टाकले तरी प्रत्यक्षात मुलाखत सुरु होण्याआधी, जणू काही माझीच मुलाखत आहे अशा थाटात समोरच्या सद्गृहस्थांनी...विनायक कारभाटकरांनी....हेच ते व्हिनसचे मालक.... मलाच प्रश्न विचारायला सुरुवात केली.  थोडा वेळ माझीच मुलाखत सुरु होती...त्यानंतर गाडी सरकत सरकत राजकारणाकडे आणि हळुहळू समाजकारण आणि एकूणच माणसांची बदललेली प्रवृत्ती इत्यादि विषयांची स्थानके घेत घेत भलत्याच दिशेला जाऊ लागली....नमनालाच घडाभर नव्हे तर पिंपभर तेल गेल्यावर मी हळूच मुद्याला हात घातला......अर्थात हा वेळ फुकट गेला असे मी म्हणणार नाही कारण इतक्या वेळात आमने सामने बसणार्‍या दोन व्यक्तींची एकमेकांशी व्यवस्थित ओळख झाली होती आणि औपचारिकतेचे वातावरण दूर होऊन पुढचा संवाद अतिशय मोकळेपणाने होऊ शकला......

मी : कारभाटकरसाहेब, ह्या धंद्याविषयी बोलण्याआधी थोडेसे आपल्या कौटुंबिक आणि शैक्षणिक पार्श्वभुमीबद्दल सांगाल काय?

कारभाटकरसाहेब:  माझा जन्म १ मार्च १९३९ रोजी गोव्यात झाला आणि संपूर्ण बालपणही तिथेच गेले. माझं पूर्ण नाव विनायक नवसो कारभाटकर असे आहे.घरची परिस्थिती तशी बेताचीच होती आणि शिक्षणाचे म्हणाल तर जेमतेम चार इयत्ताच मी शिकू शकलो...पुढे साधारण १३-१४ वर्षांचा होईपर्यंत काहीच केले नाही.....
तुझ्या वयाची इतर मुले बघ, काही तरी कमावतात....असे रोज वडिलांकडून ऐकून मी कंटाळलो होतो...त्याच तिरमिरीत एक दिवस एका मित्राच्या बरोबर मॅंगेनीज खाणीत दगड फोडायला गेलो. जेमतेम दोन दिवस काम केले आणि हे वडिलांना कळले....त्यांच्या मनाला ती गोष्ट लागली म्हणून त्यांनी ताबडतोब मला त्यांच्या ओळखीच्या एका सद्गृस्थांमार्फत चौगुले कंपनीत नोकरीला लावले. ती शिपायाची नोकरी होती.  ह्या असल्या नोकरीत खरे तर माझे मन रमत नव्हते. तरीही साधारण २ वर्ष तिथे काम करून मग मी ती नोकरी सोडली....पण ह्या नोकरीचा फायदा असा झाला की पत्रव्यवहार कसा करतात, लोकांशी कसे बोलतात ह्या गोष्टी मला शिकता आल्या....
माझ्या आजीला माझे खूप कौतुक होते.. वडिलांच्या मागे लागून तिने मला मुंबईला, माझ्या बहिणीकडे पाठवले. माझ्या भावोजींची (बहिणीचे यजमान) एक लॉंड्री होती. त्यात त्यांनी मला काम दिले. हे काम मी साधारणपणे दीड वर्ष केले..इथे मी कपड्यांना इस्त्री करायचे काम करायला लागलो. एकदा इस्त्री करतांना एकाची पॅंट माझ्या हातून जळाली.  ते माझ्या मनाला लागले आणि मी ते काम सोडून दिले.....त्यानंतर भावोजींच्या ओळखीने मी एका मोटर मेकॅनिकच्या हाताखाली काम करायला सुरुवात केली....तिथे चार वर्ष काम केले...ह्या दरम्यान मी रात्रशाळेत जाऊ लागलो आणि मॅट्रिकपर्यंत शिकलो. पुढे मग तो मोटर मेकॅनिक आपला धंदा बंद करून गावाला निघून गेला आणि माझी नोकरी सुटली. मग मी तेच काम स्वतंत्रपणे करायला लागलो......पण काही कारणांमुळे ह्या कामात माझे बस्तान नीटसे बसले नाही.

मी: नेमके काय झाले होते?

कासा: मोटरगाडीत एक गेयरबॉक्स असतो...तो नव्याने बसवल्यावर त्याचे सेटिंग करावे लागते. अशा वेळी तो पुन्हा सुरळीत चालायला थोडा वेळ लागतो...मधल्या काळात तो आवाज वगैरे करतो....दूर्दैवाने, काम चांगले करून सुद्धा काही डिफेक्ट्स गिर्‍हाईकांना समजावण्यात मी बराचसा कमी पडलो आणि त्यामुळे मला त्यांची नाराजी ओढवून घ्यावी लागली...मग ठरवले की हे काम आपले नाही...आणि  ते काम बंद करून मी काहीतरी नवीन  काम शोधायला लागलो....
रात्र शाळेतला माझा एक मित्र  बेकरीमधे काम करत होता. त्याला आपला स्वतंत्र धंदा करायचा होता. त्याने मला विचारले की तू मला बेकरीमधे मदत करशील का? मी त्यास संमती दिली आणि पुढे आम्ही कसे करायचे ते ठरवून धंदा सुरु केला. ..आधी तुझे बस्तान नीट बसू दे आणि मग माझे बस्तान बसवायचे पाहू असे मी त्याला म्हटले....त्यामुळे पगार घ्यायचा नाही, फक्त हातखर्चाला पैसे घ्यायचे असे मी ठरवले. ..फक्त दोन माणसांची कंपनी...केक बनवण्याचे काम त्याचे आणि तो बाजारात नेऊन विकायचे काम माझे...अशी कामाची वाटणी झाली....रोज मी वांद्रे(बांद्रा) ते कुलाबापर्यंत सायकलवरून दुकानदारांकडे जाऊन माल पोचवायला लागलो....दुकानदारांकडून मालाच्या सुधारणेबाबत किंवा नवीन प्रकारांबाबत काही सूचना यायला लागल्या...त्या मी माझ्या मित्राला कळवत होतो....पण माझ्या मित्राच्या कौशल्याला मर्यादा होत्या त्यामुळे तो जे काही करू शकत होता तेवढेच बनवायचा...पुढे प्रगती होण्याची  काहीच शक्यता नव्हती....
मध्यंतरी काही कामानिमित्त हा मित्र चार दिवस गावाला गेला....
माझा मित्र केक कसा बनवायचा हे मी पाहिले होते म्हणून  मी विचार केला की आपणही केक करून पाहावे आणि त्याप्रमाणे केले आणि गंमत म्हणजे मला चक्क ते काम जमले की हो!

मी: आणि इथून तुमच्या ’व्हिनस’ची सुरुवात झाली तर!

कासा: नाही...सुट्टीवरून मित्र परत आला..पुन्हा  आम्ही आपापली जबाबदारी  सांभाळली... मला एका दुकानदाराने सल्ला दिला....विनायक, हातखर्चाच्या पैशातून रोज काहीतरी शिल्लक टाकत जा...सगळे पैसे वापरू नकोस...त्याच्या सल्ल्यानुसार मी रोज माझ्या हातखर्चातून एक रूपया बाजूला काढून ठेवायला लागलो....साठत साठत त्याचे दीडशे रूपये झाले....ह्या दीडशे रूपयातून मी काही साड्या विकत घेतल्या आणि गावी, घरी घेऊन गेलो ..त्यावेळी साड्या ८-१० रूपयांना मिळत....माझ्या आजीला त्याचे खूप कौतुक वाटले. माझ्या मित्राची आईही तेव्हा तिथे आली होती. तिला माझ्या आजीने कौतुकाने त्या साड्या दाखवल्या आणि इथूनच पुढचे वितुष्ट घडले.  माझ्या मित्राच्या आईने भलतीच शंका घेतली...तिला वाटले की मी आमच्या दोघांच्या धंद्यातले पैसे परस्पर लाटले आणि त्यातून ह्या साड्या आणल्या...तिने ते तिच्या मुलाला म्हणजेच माझ्या मित्राला तसे बोलून दाखवले..त्यामुळे त्याच्याही मनात माझ्याबद्दल संशय निर्माण झाला आणि तो माझ्यावर पाळत ठेवू लागला...मला हे कळताच मी खूप दु:खी झालो. त्याच्याकडे जाऊन मी त्याला म्हटले... वरून देव पाहतोच आहे .  जर मी तुला फसवलं असेल तर देव माझे कधीच भले करणार नाही आणि तू जर उगीच माझ्यावर आरोप करशील तर तुझे पण देव कधीच कल्याण करणार नाही....आणि असे म्हणून मी त्याच्याशी संबंध तोडले.

मी: मग पुढे काय झाले?

कासा:  त्यानंतर पुढे ६ महिने बेकारीत काढले. एकदा छेडा नावाच्या एका दुकानदाराने मला म्हटले...विनायक, तू स्वत:च केक बनवायचे  काम का नाही सुरु करत? मला ती कल्पना आवडली आणि मी तशी तयारी दर्शवली. छेडाने मला ४५०रुपये दिले...त्यातून  मी सायकल घेतली. माझ्या बहिणीनेही काही पैसे दिले. त्यातून मी साचे(मोल्ड्स) विकत घेतले...माझ्या एका मित्राच्या ओळखीने मला पावाच्या बेकरीत  भाडेतत्वावर जागा मिळाली आणि हाताशी एक मदतनीस घेऊन मी केक बनवायला सुरुवात केली.... इथून खर्‍या अर्थाने ’व्हिनस’चा जन्म झाला असे म्हणायला हरकत नाही...सुरुवातीला अडचणी आल्या..कधी केक कच्चा राहायचा, कधी करपायचा...पण मग हळुहळू त्यावर मात करत प्राविण्य मिळवले....फावल्या वेळात सतत मनन चिंतन चालत असायचे...त्यातूनच नवनवे प्रकार सुचायला लागले आणि बघता बघता त्यातही प्राविण्य मिळवले...धंद्यात जम बसला आणि...
१९७१ सालचं  बांगलादेश मुक्तीचं  भारत-पाकिस्तान युद्ध सुरु झाले....युद्धामुळे  धंद्यावर विपरीत परिणाम झाला...मालाची मागणी एकदम कमी झाली..त्यामुळे कच्चा माल पुरवठादारांची देणी थकली...मी अतिशय चिंताग्रस्त झालो...पण इथेही चांगलाच अनुभव आला....पुरवठादारांनी मला धीर दिला...ते म्हणाले, विनायक, तू आमच्या पैशाची चिंता करू नकोस...तुझ्या धंद्यावर लक्ष दे...आज ना उद्या आमचे पैसे आम्हाला मिळतील ह्याची आम्हाला खात्री आहे.
युद्ध समाप्त झाले..हळूहळू वातावरण निवळले आणि पुन्हा धंद्याने वेग घेतला. सगळी देणी फेडली आणि  पुन्हा एक अडथळा निर्माण झाला....सततच्या उभे राहण्यामुळे, सायकल चालवण्यामुळे पायांवर ताण पडत होता. त्यामुळे माझ्या पायांना व्हेरिकोज व्हेन्सचा त्रास सुरु  झाला आणि हळूहळू तो त्रास इतका वाढला की त्यासाठी शस्त्रक्रिया करावी लागली... हा त्रासाचा कालावधी जवळपास अडीच वर्षांचा होता....ह्यातूनही सावरलो...पण आता सायकलने माल पोचवणे कठीण होऊ लागले म्हणून मग एक तीनचाकी मालवाहतूक गाडी(टेंपो) विकत घेतली.
माल तयार करणे आणि पोचवण्याच्या सततच्या धावपळीमुळे नाही म्हटले तरी थकायला व्हायचे...अशा वेळी मनात एकच विचार यायचा...आपले एखादे दुकान असते तर!

असाच एकदा संध्याकाळी दमून भागून एका दुकानाच्या फळीवर बसलो होतो.. आपले एखादे दुकान असावे हाच विचार मनात घोळत होता आणि काय विलक्षण योगायोग पाहा...ज्या ठिकाणी मी बसलो होतो त्या दुकानाचा मालक मला म्हणाला....तुला दुकान हवेय का?
मी तर हवेतच उडालो. ह्याला कसे काय कळले माझ्या मनातले?
मी लगेच हो म्हटले...त्याने दुकानाची किंमत सांगितली ६५हजार रूपये....माझ्याकडे फक्त दहा हजार होते पण मी त्याच्याकडून आठ दिवसांची मुदत मागून घेतली . आजवर माझ्या गोड बोलण्याने आणि चांगल्या वागणुकीने मी बरेच लोक जोडले होते. त्यांच्याकडे मी मदत मागितली आणि सांगायला आनंद वाटतो की त्यांनीही मला मनापासून मदत केली.... मी ६५हजार रुपये जमवून साक्षीदार म्हणून माझ्या एका सज्जन मित्राला घेऊन दुकानाच्या मालकाकडे गेलो....
मध्यंतरीच्या काळात त्या दुकानासाठी एक अजून गिर्‍हाईक आले होते असे कळले, ज्याने ७० हजार द्यायची तयारी दाखवली होती....आता त्या दुकानदाराची नियत बदलली होती...त्यामुळे मी व्यथित झालो पण आपल्या मनाला कसेबसे समजावले...नशीबात असेल तर मिळेल दुकान.
आम्ही दोघे त्या दुकानदाराकडे पोचलो...तो दुकानदार टाळाटाळ करू लागला..
तुमच्या दोघांच्यात ठरल्याप्रमाणे  विनायकाने ठरलेल्या मुदतीत ६५ हजार जमवून आणलेत..तुला देण्यासाठी. आता तू उगीच अधिक पैशाच्या मोहापायी आपला शब्द फिरवू नकोस...माझ्या मित्राने त्याला सुनावले...
आणि काय सांगू! खरेच, त्या दुकानदाराला उपरती झाली...ठरल्याप्रमाणे ६५ हजार रूपये घेऊन त्याने ते दुकान मलाच दिले....

इथून धंद्याला खर्‍या अर्थाने वेग आला... उत्पादन आणि आता काही प्रमाणात स्वत:च्या दुकानात विक्री असे दोन्ही स्वत: करू शकत असल्यामुळे फायद्याचे प्रमाणही वाढले....पण आता उत्पादनासाठीची जागा कमी पडायला लागली...नवी जागा घेण्याचा विचार सुरु झाला...आणि लवकरच तशी संधी आली....एक प्रशस्त, भाड्याची जागा मिळाली...त्या नव्या प्रशस्त जागेत मग बेकरी हलवली....त्यामुळे आता उत्पादनेही वाढली...म्हणून मग नवे लोक भर्ती केले, नवीन यंत्रे विकत घेतली, नवी मालवाहतूक वाहने खरेदी केली....अशा तर्‍हेने धंदा चारही अंगाने वाढत गेला.

पुढे हीच भाड्याची जागा मूळ मालकाकडून खरेदी करून आता ती आपल्याच मालकीची झालेय...
मुंबईत वरळीपासून ते दहीसरपर्यंत आणि नवी मुंबईत (काही ठिकाणी) मिळून १०० पेक्षा जास्त दुकामदारांना आज ’व्हीनस’चा माल पुरवला जातो.
आजच्या घडीला शंभरच्याही पेक्षा जास्त प्रकार आपण बनवत असतो. प्लम केक, मावा केक, बार केक आणि पॅटिस ही आपली खास वैषिष्ठ्ये आहेत

मी: आपल्या भविष्यातील योजना काय आहेत?

कासा:  संपूर्ण मुंबईभर आपले उत्पादन पोचवण्याचे प्रयत्न सद्द्या सुरू आहेत...त्यानंतर पुढे माल परदेशात पाठवण्यासाठीही चाचपणी केली जाईल.
तसंच  आपण व्हिनसची   स्वतंत्र वेबसाईटही सुरु केलेली आहे.
www.venusconfectioners.com


मी: निव्वळ धंदा एके धंदा न करता आपण सेवाभावी कार्यातही रस घेता असं ऐकून आहे..त्याबद्दल काही सांगा ना.

कासा: गोव्यातील मये ह्या गांवी आपण तीन शाळा दत्तक घेतलेत...इमारत दुरुस्ती,शाळेला लागणारे टेबल.खुर्च्या,बाकं इत्यादि सामान अशा स्वरूपात आपण त्यांना मदत करत असतो.( कारभाटकर साहेब स्वत:कडे श्रेय न घेता, मी,आम्ही केले असे शब्द प्रयोग न करता सहजपणाने आपण केले...असे म्हणतात) ज्यात इयत्ता पाचवी ते १२वी पर्यंत शिक्षण दिलं जातं. आर्थिक दृष्ट्या कमकुवत वर्गातील जी मुले उत्तीर्ण होतात त्यांना शिष्यवृत्ती दिली जाते..ह्यात आपण तीन विभाग केलेत...केवळ जास्त गुण मिळवणार्‍यांनाच नाही तर कमी गुण मिळवून उत्तीर्ण होणार्‍यांचा देखील ह्यात आपण समावेश करतो. जेणेकरून त्यांची शिक्षणाची जिद्द टिकावी आणि वाढावी अशी त्यामागची भूमिका आहे.. शिष्यवृत्ती मिळवणार्‍या विद्यार्थ्यांच्या पालकांचाही आपण सत्कार करून त्यांना काहीतरी गृहोपयोगी वस्तू भेट म्हणून देत असतो. माझी आई श्रीमती अनुसया नवसो कारभाटकर हिच्या नावाने आपण एक ट्रस्ट स्थापन केलाय आणि त्या ट्रस्टद्वारे हे कार्य केले जाते. ट्रस्टला  चार वर्ष पूर्ण झाली. वर्षाला साधारण ३ लाख रुपयांपेक्षाही जास्त मदत दिली जाते.

सद्गुरू श्री. वामनराव पै ह्यांच्या शिकवणुकीचा माझ्यावर खूप मोठा प्रभाव आहे. त्यांचे सद्विचार जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचावेत ह्यासाठी आपण, त्यांची व्याख्याने, साहित्य इत्यादिंचा जाहिरातीद्वारे प्रचार करण्यासाठी लागणारी आर्थिक जबाबदारी काही अंशी स्वीकारली आहे.

मी: ज्यांना बेकरी व्यवसायात यायचंय अशा आजच्या तरूणांना आपण काय मार्गदर्शन कराल?

कासा: सगळ्यात आधी कष्ट करण्याची,पडेल ते काम करण्याची  तयारी हवी. त्या बरोबर शिक्षण तर हवंच हवं पण शिकतांना नुसती घोकंपट्टी नको तर ज्ञान ग्रहण करायला शिकलं पाहिजे...ज्याला ज्ञान प्राप्त झालं तो कधीच मागे पडत नाही...ज्ञानाने शहाणपण,प्रकृती आणि संपत्ती इत्यादि सर्व आपोआप मिळत राहते, हा माझा जीवनातला अनुभव आहे. आपण ज्या धंद्यात जाऊ त्यातलं ज्ञान सतत अद्ययावत करत राहिलं पाहिजे,  आपण जगाच्या मागे पडू नये म्हणून ती काळजी जरूर घ्यायला हवी.  सचोटी, प्रामाणिकपणा आणि वेळप्रसंगी सहकार्‍यांना, आपल्या हाताखालच्यांना सांभाळून घेणे हे गुणही अंगी बाणवायला हवेत....कामगार लोक आहेत म्हणून आपण आहोत हे कधीही विसरता कामा नये...

कारभाटकर साहेबांना भेटायला जाण्याआधी आम्ही एकमेकांशी अगदीच अपरिचित होतो...पण तिथून बाहेर निघतांना..जणू काही दोन जीवाभावाचे मित्र बर्‍याच काळाने एकत्र आले होते...असं वाटण्याइतपत मोकळ्या गप्पा झाल्या होत्या.
आज वयाच्या ७३ व्या वर्षीही कारभाटकर साहेब एखाद्या तरूणाला लाजवेल अशा तर्‍हेने कार्यरत आहेत.
सकाळी वांद्रे(पश्चिम) येथील दुकानात आणि दुपारनंतर जोगेश्वरी(पश्चिम) येथील त्यांच्या बेकरीत असे दिवसभर ते कामात व्यस्त असतात.....
आपण त्यांना दीर्घायुरोग्य चिंतूया आणि त्यांच्या भावी योजना सफल होवोत अशी सदिच्छा व्यक्त करूया.

***************************************समाप्त**********************************



९ टिप्पण्या:

Alok Mohan म्हणाले...

nice

शांतीसुधा (Shantisudha) म्हणाले...

व्हिनस बेकरी प्रसिद्ध आहे. तिचे मालक एक हिंदू-मराठी आहेत हे माहीती नव्हते. तुमच्या लेखामुळे समजले. छान झालाय लेख. धन्यवाद.

प्रमोद देव म्हणाले...

धन्यवाद आलोक मोहन आणि अपर्णा!
अपर्णा,व्हिनस कन्फेक्शनर्स असे नाव आहे त्यांच्या बेकरीचं....व्हिनस बेकरी कदाचित वेगळीही असेल.

Panchtarankit म्हणाले...

चाकोरी बंद्ध काही करायचे नाही म्हणून मी हॉटेल मेनेजमेंट केले तेव्हा विठ्ठल कामत हे आमचे आदर्श होते , पण पुढे नोकरीच्या साचेबंध सापळ्यात अडकलो,
ते आजतागायत
आता हा लेख वाचून मनात परत एकदा काहीतरी स्वतःचे करावेसे वाटत आहे.

प्रमोद देव म्हणाले...

धन्यवाद निनाद!
जरूर करा!
एक दिवस आपलीही मुलाखत घेण्याची संधी मला साधता येईल. :)

mannab म्हणाले...

आपण मुलाखतीतून उत्तम परिचय करून दिला आहे.
मंगेश नाबर

प्रमोद देव म्हणाले...

धन्यवाद मंगेशराव!

प्रभाकर फडणीस P.K. Phadnis म्हणाले...

अभिनंदन देवा! तुमचा लेख फार उत्तम जमला आहे.
जगात अशीहि माणसे आहेत त्यांच्या खांद्यावर भार टाकून आपण इतर लोक आराम करतो! ईश्वर श्री. कारभाटकरांना दीर्घायुष्य देवो.

प्रमोद देव म्हणाले...

धन्यवाद फडणीससाहेब!