माझ्या आयुष्यातील आजवरच्या कडू-गोड आठवणी मी "पूर्वानुभव" म्हणून सादर करत आहे.
आपण इथे आल्याबद्दल मन:पूर्वक धन्यवाद!

३० मार्च, २०१०

पुन्हा एकदा..मुक्काम पोस्ट नवी दिल्ली! भाग १

मंडळी ह्या पूर्वी एकदा मी माझे दिल्ली पुराण आपल्यासमोर सादर केलं होतं. त्यावेळी मी केवळ एक रात्र-एक दिवस दिल्लीत राहिलो होतो. त्यानंतर पुन्हा एकदा साधारण १९८०-८१ दरम्यान तीन चार वेळा  १५-२० दिवसांचे दौरे झाले. आणि त्यानंतर १९८७ साली मी पुढे दीड वर्ष दिल्लीत बदलीवर काढली...तर ह्याच बदलीदरम्यान आलेले काही अनुभव इथे लिहिण्याचा विचार आहे...

माझे लग्न जरा उशीरानेच म्हणजे वयाच्या पस्तीशीत...१९८६च्या डिसेंबरात झाले. विवाहोत्तर आनंदात विहरत असतांना अचानक एप्रिल १९८७ मध्ये...माझी बदली मुंबईहून नवी दिल्लीला झाल्याचा आदेश निघाला. बदली तशी अचानकच होती...अर्थात कारणं मला माहित होती...तत्कालीन कार्यालय प्रमुखाशी माझी झालेली वादावादी आणि मी त्याच्या भ्रष्टाचाराची केलेली जाहीर वाच्यता...त्यामुळे त्याने काही एक खोट्या प्रकरणात मला गुंतवून माझी दिल्लीला बदली करण्यासंदर्भात केलेली शिफारस दिल्लीश्वरांनी उचलून धरली.

मला दिल्लीला जावेच लागणार हे जवळपास निश्चित झालेले होते तरी मी अजून आशा सोडलेली नव्हती कारण माझी बाजू पूर्णपणे सत्त्याची होती...आजवरचे,  ह्याआधीच्या वरिष्ठांचे माझ्याबद्दलचे सर्वथा अनुकुल मत..जे  माझ्या आजवरच्या प्रत्येक वार्षिक वैयक्तिक अहवालात नोंदले गेलेले होते...तसेच इतर सहकार्यांबरोबरचे स्नेहसंबंध वगैरे लक्षात घेता...माझ्या बाजूने बरेच अनुकुल ग्रह होते ह्याबाबत माझ्या मनात शंका नव्हती. म्हणून मी दिल्लीश्वरांकडे माझे निवेदन पाठवले...त्यात सत्य परिस्थितीसोबत इतरही काही गोष्टी त्यांच्या नजरेस आणल्या की ज्यावरून त्यांची खात्री व्हावी की ही बदलीची शिफारस निव्वळ आकसाने झालेली आहे.

माझा अर्ज दिल्लीत पोचला आणि त्यातील मजकूर पाहून त्याची शहानिशा करण्यासाठी एक समिती नेमण्यात आली. त्या समितीने पूर्ण शोध घेऊन निकाल माझ्या बाजूने दिला आणि मला जरा हायसे वाटले...आजवर केलेल्या कामाचे चीज झाल्याचे समाधानही झाले. आता बदली रद्द होणार हे नक्की झाले...पण

हा पणच नेहमी आडवा येतो. इथेही असेच झाले. समितीच्या निर्णयाची एकेक प्रत दिल्लीश्वरांनी मला,आमच्या कार्यालयाला तशीच आमच्या दिल्लीतील सर्वोच्च अधिकार्‍याला पाठवली. आमच्या कार्यालयात ती प्रत येताच  माझ्या वरिष्ठाने हा प्रश्न आपल्या प्रतिष्ठेचा बनवला आणि त्याप्रमाणे आमच्या दिल्लीतील सर्वोच्च साहेबांना साकडे घातले. हे आमचे सर्वोच्च साहेब अधून मधून मुंबई दौर्‍यावर यायचे तेव्हा त्यांची आणि माझीही थोडीफार ओळख होतीच...पण आमच्या स्थानिक साहेबांमध्ये एक लोकोत्तर गुण होता...तो म्हणजे चमचेगिरी...आणि ह्या जोरावर आजवर दिल्लीहून आलेल्या कोणत्याही साहेब मजकुरांच्या सरबराईत त्यांनी कधी कुचराई केलेली नव्हती...त्यामुळे दिल्लीश्वरांचीही त्यांच्यावर विशेष मेहेरनजर होती.

योगायोग म्हणजे मी,आमचे स्थानिक साहेब आणि दिल्लीतील सर्वोच साहेब....हे तिघेही मराठी होतो. माझ्याबद्दल आमच्या दिल्लीच्या साहेबांचे वैयक्तिक मत अतिशय अनुकुल होते...हे मला पुढे काही कारणाने त्यांच्याच तोंडून ऐकायला मिळाले..ते येईलच पुढे....
हं तर काय सांगत होतो... आमच्या स्थानिक साहेबांवर वरिष्ठांची असलेली मर्जी...आणि आता तीच त्यांनी वापरायची असे ठरवल्यामुळे...दिल्लीश्वरांना साहजिकपणे त्यांची बाजू घेणे भाग पडले आणि ...नाही,हो...करता माझ्या बदलीवर शिक्कामोर्तब झाले..  :(

आजवरच्या माझ्या निष्कलंक चारित्र्य आणि कामातील सचोटी वगैरेचा झालेला तो दारूण पराभव मला पचवणे अत्यंत कठीण होते...पण काय करणार? सरकारी नोकरी करायची तर काही कायदे पाळावे लागतात..ते खरे तर अलिखित आहेत...ते असे की...
साहेब नेहमी बरोबर असतो....तो बरोबर नसला तरी...तो बरोबरच असतो हे लक्षात ठेवायचे.
साहेब आणि गाढव ह्यांच्या पुढे आणि मागे उभे राहतांना सुरक्षित अंतरावर उभे राहावे...आणि
कधीही नकार देऊ नये....नकार देणे हा दंडनीय अपराध आहे....काम करायचे नसेल तरी होकार देऊन काम करू नका...इत्यादि इत्यादि.

आणि मी हे कायदे माहित असूनही पाळणारा नव्हतो. खर्‍याला खरे आणि खोट्याला खोटे म्हणतांना मी कुणाची कधीच भीडभाड बाळगली नव्हती. अर्थात त्याची जी काय असते ती सजा आता मला भोगावी लागतच होती.
काही सहकार्यांनी,हितसंबंधियांनी माझे मन वळवायचा निष्फळ प्रयत्नही करून पाहिला....अरे,जाऊ दे सोडून दे रे,मागून टाक माफी...कशाला उगाच भिंतीवर डोकं आपटतोस..वगैरे वगैरे...पण मी आधीच वैतागलो होतो...असत्याचा सत्यावर होत असलेला ढळढळीत विजय पाहून...त्यात हे असले सल्ले....मी त्यांना सांगितलं...मित्रांनो तुमच्या भावना मला समजतात....तरीही मी जी काही तत्व आजवर पाळत आलोय त्यात हे बसत नाही...आणि भ्रष्टाचार्‍याची माफी...तेही माझी कोणतीही चूक नसतांना मागायची...हे कधीच होणार नाही. ही लढाई आता खर्‍या अर्थाने सुरु झालेय...मी जाईन दिल्लीला आणि तिथून लवकरच विजयी होऊन परतेन...ह्याच्या उरावर बसण्यासाठी...

२ टिप्पण्या:

अनामित म्हणाले...

प्रमोदकाका, लेखमाला परत सुरु केलीत हे फार छान. नेहमीप्रमाणेच वाचायला मजा आली. पुढचे भाग लवकर येउ दे.

सहज

प्रमोद देव म्हणाले...

धन्यवाद सहजराव.