माझ्या आयुष्यातील आजवरच्या कडू-गोड आठवणी मी "पूर्वानुभव" म्हणून सादर करत आहे.
आपण इथे आल्याबद्दल मन:पूर्वक धन्यवाद!

२९ सप्टेंबर, २००७

स्वगत! ३

हां! ऐक तर आता दुसरा चिमित्कार!असाच एकदा मी रस्त्याने चाललो होतो. माझ्याच नादात होतो.रस्त्यातली गर्दी चुकवीत चाललो होतो. ते गाणं आहे ना वसंतरावांचे "वाटेवर काटे वेचीत चाललो,वाटते जसा फुला-फुलात चाललो" अगदी तसाच आपल्याच नादात चालत होतो.बाकी वसंतराव म्हणजे एकदम जंक्शन माणुस बरं का! आपण तर त्याचा पंखाच आहे. त्यांचे ते अनुनासिक बोलणे आणि आणि दमदार गाणे हे दोन्हीही मला आवडते. कधी तरी त्यांच्या गाण्याची नक्कल करायची पण हुक्की येते. माझ्या नरड्यातून वसंतराव जेव्हा गातात तेव्हा मला कळते की ते गाणं किती कठीण आहे ते.पण तरी मजा येतो.त्या वेळी आपल्याला कुणी "किंचित वसंतराव" म्हटले ना तरी आयुष्याचे चीज झाल्यासारखे वाटेल. पण लोकांना पारख नाही ना असली गोष्टींची.

अरे तू कुठे भरकटलास? तुझी पावर दाखवत होतास ना ? मग असा मध्येच रस्ता सोडून त्या बाबा बर्व्यांसारखा (ते कसे मध्येच वेदकालीन जंगलात घुसायचे) संगीताच्या जंगलात घुसलास! मूळ मुद्यावर ये! हां! तर तू रस्त्याने चालला होतास, आता पुढे बोल.

तर काय झालं? माझ्या बाजूने एक बस धडधडत गेली.

आता रस्त्यावरनं तुझ्या बाजूने एक बस धडधडत गेली ह्यात काय विशेष? बसऐवजी काय रणगाडा जायला हवा होता काय?

तू असा मध्ये मध्ये हाल्ट करू नको हां(काय आरडरलीचा रुबाब होता नाय!) सांगून ठेवताय. मंग लिंक तुटतेय ना. तर ती बस जेव्हा माझ्या बाजूने गेली तेव्हाच माझ्या मनात विचार आला की "ही बस काय शेवटपर्यंत पोचणार नाही"!

म्हणजे?

सांगतो. तशी ती माझ्यापासून पुढे ५० पावलांवर(म्हणजे तिच्या चाकांवर म्हणू या) जाऊन थांब्यावर थांबली. त्यातनें एक-दोन प्रवासी उतरले आणि पाच-सहा चढले. बस पुन्हा सुरु झाली आणि मोजून १० पावले पुढे गेली आणि पुन्हा थांबली. एक-एक करून लोक खाली उतरत होते. तोपर्यंत मी देखिल तिथे पोचलो. कुतुहल म्हणून एकाला विचारले की हे सगळे लोक खाली का उतरताहेत? अजून तर खूप लांब जायचंय ह्या बसला. मग हा प्रकार काय आहे?

काय झालं होतं?

काय होणार? बस "बंद" पडली होती. डायवर साहेबांनी सांगितले की आता बस अजिबात हल्याची नाय तवा मुकाटपणे खाली उतरा समद्यांनी.आता बोल. हाय का नाही माझी पावर?

विचार करावा लागेल. तरीपण हे देखिल "बोला फुलाला गाठ " असेच म्हणता येईल.अजून आहे काय एखादा किस्सा?असेल तर बोल.

आहे ना. सांगतो. पण हा किस्सा माझ्या पावरचा आहे असे म्हणावेसे मला वाटत नाही. पण माझ्या तोंडून निघाले आणि दुर्दैवाने ते खरे झाले. हा किस्सा सांगताना मला मुळीच आनंद होत नाहीये.पण काहीतरी पूर्वसूचना मला मिळत असावी असे वाटते म्हणून हाही किस्सा ऐक.

सांग. आता माझेही औत्सुक्य वाढलंय!

मी नववीत असतानाची ही गोष्ट आहे(१९६६ सालची). त्यावेळी भारताचे पंतप्रधान होते लाल बहाद्दुर शास्त्री. नुकतेच पाकिस्तान विरुद्धचे युद्ध आपण जिंकले होते. "जय जवान,जय किसान" असा नारा देत शास्त्रीजींनी जनमानसात एक नवे स्फुल्लिंग चेतवले होते.म्हणूनच शास्त्रीजींना आजवर भारताला लाभलेला सर्वात कार्यक्षम आणि लोकप्रिय पंतप्रधान असे मी मानतो. "मूर्ती लहान पण किर्ती महान" ही म्हण सार्थ करणारा हा माणूस अकाली जाण्याने भारताचे नशीबच फिरले असेही मला वाटते. असो. तर पुढे ऐक. मी नागरिक शास्त्राचा अभ्यास करत होतो. त्यात कुठे तरी असा संदर्भ आला की "कै.शास्त्रींनी अमूक अमूक ठराव मांडला(की काय. नक्की आठवत नाही ते वाक्य)". हे वाचताच मी सहजपणे आईला म्हटले, "आई! शास्त्री तर जीवंत आहेत.ते आपले पंतप्रधान आहेत आणि सद्या ताश्कंदमध्ये आहेत. मग त्यांचा उल्लेख असा "कै." म्हणून का केला?
आई म्हणाली, " अरे ते दुसरे कुणी असतील. हे कसे असतील? इतके साधे तुला कळू नये म्हणजे कमाल झाली. मुर्खासारखे काही तरी बोलू नकोस".
दुसर्‍या दिवशी सकाळी सकाळी रेडिओ लावला तेव्हा रोजच्या मंगलमय सनईचे सूर ऐकू येण्याऐवजी रडकी सारंगी वाजत होती. तिथेच लक्षात आले की काही तरी गडबड आहे. कुणी तरी मोठा माणूस "गेला" असावा. सारंगीचे रडणे संपले आणि निवेदकाने अतिशय व्यथित स्वरात जे सांगितले त ऐकून मी तर हतबुद्धच झालो. तो सांगत होता "भारताचे पंतप्रधान श्री. लाल बहाद्दुर शास्त्री ह्यांचे ताश्कंद येथे दु:खद निधन"! पुढचे मला काहीच ऐकू आले नाही.

खरेच! प्रसंग मोठा मन विषण्ण करणारा होता हे मान्य आहे आणि तुझ्या तोंडून नकळत का होईना त्या अभद्राची सूचना मिळाली होती हे आता पटतंय! पण तरीही असे वाटतेय की हा देखिल निव्वळ योगायोग असावा.

तू म्हणतो आहेस ते मलाही पटतेय किंबहुना तो प्रसंग अथवा आधी सांगितलेल्या घटना हा निव्वळ योगायोगच होता असेच माझेही मत आहे.फक्त एक गंमत म्हणून तुला हे सगळे सांगितले. कैक वेळेला सामान्य माणसेही अशा घटनांची पूर्वसूचना देतात(त्यातला मीही एक) हेच मी सिद्ध करायचा प्रयत्न करत होतो. मात्र काही धुर्त लोक अशा गोष्टींना चमत्काराचे लेबल लावून त्याचा जनमानसात प्रचार करतात आणि एखाद्याला बाबा बनवून स्वतःच्या पोळीवर तूप ओतून घेतात. गंमत म्हणजे लोकही चक्क फसतात.म्हणून म्हणतो "बोल! बनू का बाबा? आहे की नाही पावर?"

बाबा की जय हो!

समाप्त!

1 टिप्पणी:

अनामित म्हणाले...

तो सांगत होता "भारताचे पंतप्रधान श्री. लाल बहाद्दुर शास्त्री ह्यांचे ताश्कंद येथे दु:खद निधन"! पुढचे मला काहीच ऐकू आले नाही.....

ha prasang me DoLyaa samor aaNaayacha prayatna kartoy...paN kaahi jamenaa:-(