माझ्या आयुष्यातील आजवरच्या कडू-गोड आठवणी मी "पूर्वानुभव" म्हणून सादर करत आहे.
आपण इथे आल्याबद्दल मन:पूर्वक धन्यवाद!

२६ जानेवारी, २००८

आर्थिक बात-चीत!

दोन गृहस्थांमधला हा संवाद आहे.(फार गंभीरपणे घेऊ नका बरं का! जरा गंमत म्हणूनच ऐका.) शेयरबाजाराबद्दल बोलताहेत. ऐकू या काय म्हणताहेत ते. एक आहे सखाराम साने(ससा); ह्यांनी बरेच चढ-उतार पाहिलेत आणि दुसरा आहे माधव साठे(मासा); नुकताच ह्या क्षेत्रात शिरलाय.

ससा: सुप्रभात.
मासा: सुप्रभात.आज कितीने खाली जाईल आणि वर येईल? की वरच जाईल?
ससा: कुणास ठाऊक? ते सांगणे तसे कठीण आहे.

मासा: तुम्ही असे बरेच चढ-उतार पाहिले असतील ना?
ससा: होय. आज बरीच वर्षे बाजारात आहे. तेव्हा चढ-उतार हे बरेच पाहिलेत.
मासा: एल अँड टी, भेल हे खूप खाली आलेत. घेण्याची हीच वेळ आहे की अजून खाली येतील? सुझलॉन इतका कसा खाली आला?
ससा: होय. एल ऍंड टी, भेल ह्या भावात घेण्यासारखे आहेत. सुझलॉनचा १० रूचा शेयर २रु.च्या पाच शेयरमध्ये विभागला गेलाय.म्हणून तो खाली आल्यासारखा वाटतोय.

मासा: बघा कसे सगळे घडवून आणल्यासारखे वाटते की नाही?
नेमका सुझलॉन आणि जिंदल काल स्प्लिट होतो आणि बाजार इतका कोसळतो. हेज-फंड्स वाले मुद्दाम करत आहेत की काय? की आपल्या जवळचे विकून टाकून मग पुन्हा खाली गेले की स्वतःच पुन्हा घ्यायचे असे करत असतील?
ससा: त्याची शक्यता नाकारता येत नाही. कारण त्यांच्याकडे एकाच कंपनीचे एकगठ्ठा शेयर्स असतात आणि त्यांनी ते तसे एकदम विकले तर बाजार खाली येऊ शकतो हे नक्की. पण ह्यात चुकीचे असे काहीच नाही. शेवटी कधी खरेदी करायचे आणि विकायचे ह्याचा निर्णय प्रत्येकाने घेताना स्वत:चे हित बघायचे असते.त्याला हेज-फंड देखिल कसे अपवाद असतील?
मासा: हं! फार्मा कोणता चांगला आहे? रॅनबॅक्सी, डॉ. रेड्डी, अपोलो की ग्लॅक्सो?
ससा: खरे तर बरेच दिवसात तिथे लक्षच दिले नाही मी. पण हे सगळेच शेयर्स तसे चांगलेच आहेत. पण माझ्या मते सद्या रिलायन्स घ्यायला हरकत नाही.तो पुन्हा फार लवकर वर जाईल.
मासा: तुम्ही रिलायन्स म्हणजे रिलायन्स कॅपिटल म्हणताहात काय?

ससा: नाही. रिलायन्स इडस्ट्रीज.
मासा: अच्छा! बरं मला सांगा की टाटाची कोअर कंपनी कुठली? टाटा सन्स ना? म्हणजे टाटाचा मेन शेयर कुठला? की टाटा सन्स प्रायव्हेट आहे?
ससा: टाटा सन्स हीच मुख्य कंपनी असली तरी तिचे शेयर्स बाजारात नाहीत. सद्या टाटाच्या टीसीएस,टाटा मोटर्स आणि टाटा स्टील ह्या प्रमुख कंपन्या आहेत. टाटाच्या अजूनही बर्‍याच कंपन्या आहेत.
मासा: अच्छा! वाटलेच. मी विचारायचे कारण की रिलायन्स,टाटा, बिर्ला आणि टॉपच्या फार्मा कंपन्या असे चार कोअर घ्यावे असे मनात आहे. तर मग नक्की कुठले घ्यायचे ते विचारावे म्हणतो.रिलायन्सचा मुख्य शेयर... रिलायन्स इंडस्ट्रीज, टाटाचा मुख्य शेयर तुम्ही वर म्हणालात त्या तीन कंपन्या. ह्या चार मुख्य कंपन्या अशाकरता की बी लावून विसरून जायचे; पुढच्या पिढीसाठी त्याचा वृक्ष होईल अशी अपेक्षा.
बरे ह्याच बरोबर मुख्य टेलेकॉमच्या कंपन्यांचे पण शेयर्स पाहिजेत कारण मोबाईलला मरण नाही.

ससा: सद्या भारती एयरटेल, टाटा टेलेसर्व्हिसेस्(महाराष्ट्र) ह्या मोबाईल कंपन्या घ्यायला हरकत नाही. तसेच ए ग्रुप मधल्या एबीबी, महिन्द्र आणि महिन्द्र, स्टेट बँक, आयटीसी, हिंदुस्थान युनिलिव्हर ह्या कंपन्याही घ्यायला हव्यात.
मासा : महिन्द्र आणि महिन्द्र चा शेतीशी संबंध आहे काय?
ससा:होय. महिन्द्र ट्रॅक्ट्रर साठी प्रसिद्ध आहे.
मासा: कुठल्या कंपन्या ह्यात मुख्य आहेत? किंवा कोणत्या कंपन्यांना शेतीसंबंधातून जास्त फायदा आहे?
ससा: तसे लगेच सांगता येणार नाही.कारण खरे सांगायचे तर मी असा कधी अभ्यास केलाच नाही. पण ढोबळमानाने सांगायचे तर वर सांगितलेल्या महिंद्र आणि महिन्द्र,आयटीसी,हिंदुस्थान युनिलिव्हर, तसेच टाटा टी वगैरे कंपन्या चांगल्या आहेत.
मासा: अच्छा. पण माझी विचारसरणी योग्य आहे ना;म्हणजे सगळ्या क्षेत्रातील आघाडीवर असणार्‍या कंपन्या निवडण्याची?

ससा: तुमची विचारसरणी चुकीची मुळीच नाही.उलट चांगली आहे.विचारपूर्वक निर्णय घेणे केव्हाही चांगले. मी स्वत: जरी तसे काही करत नसलो तरी पण तुम्ही करता आहात तोच खरा योग्य मार्ग आहे.
पण एक लक्षात असू द्या नुसते टॉप घेऊन चालत नाही. कारण त्यांची वाढ कुंठीत होऊ शकते म्हणजे त्यांना आता वाढीस विशेष जागाच उरलेली नसू शकते. तेव्हा नवे आणि भविष्यात वाढ होईल असे क्षेत्रही निवडायचे असते.
मासा: हो.खरे आहे. म्हणून मी काही अगदी मुलभूत क्षेत्रातील आणि नव्यानेच स्थापन झालेल्या परंतु लवकर गाशा गुंडाळणार नाहीत अशा कंपन्यांपासून सुरुवात करावी असे म्हणतोय.
ससा: अगदी योग्य निर्णय आहे.

मासा
: तुमच्या मते गुंतवणुक किती आणि कशी करावी?
ससा: म्हणजे? कळले नाही. नेमके काय हवे आहे?
मासा: म्हणजे बघा की तुमच्याकडे १००रू. आहेत तर ते कशा प्रमाणात गुंतवावे? उदा. घर-जागा खरेदी,सोने.शेयर्स,मुदतठेवी वगैरे. सगळेच कोणत्याही एका गोष्टीत टाकून चालणार नाही ना?
ससा: बरोबर. माझ्या मते २५% शेयर्समध्ये आणि बाकी ७५% इतर गोष्टीत वाटायचे. ते आपापल्या जरूरीप्रमाणे.
मासा: कमीत कमी धोका आणि जास्तीत जास्त वृद्धी असेल ह्या हिशोबाने त्यांचे प्रमाण निश्चित कसे करता येईल?
ससा: त्यासाठी आपल्याला रोजच्या जगण्यासाठी किती % लागतात हे पाहिले पाहिजे. आपली मिळकत किती आणि रोजचा खर्च किती. बचत होते का? होत असल्यास किती?
जर बचत होत असेल तर बचतीच्या २५% शेयर्समध्ये,५०टक्के एफडी,सोने वगैरे आणि २५ टक्के बचत खात्यात. अर्थात हे निकष अंतिम नाहीत. प्रत्येकाची वैयक्तिक गरज आणि प्राधान्य बघून त्यात हवा तसा योग्य बदल करता येईल. प्रत्येकाच्या स्वभावाप्रमाणेही त्यात बदल करता येतील. नुकसान सोसण्याची आर्थिक आणि मानसिक कुवत असणार्‍या आणि नसणार्‍या अशा दोन्ही प्रकारच्या लोकांसाठी वेगवेगळे पर्याय योजता येतील.
.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: