माझ्या आयुष्यातील आजवरच्या कडू-गोड आठवणी मी "पूर्वानुभव" म्हणून सादर करत आहे.
आपण इथे आल्याबद्दल मन:पूर्वक धन्यवाद!

२९ मार्च, २००७

आणि मी मार खाल्ला!...पुढे

एकीकडे काम चालू असतांना मनात चक्र फिरतच होती. उद्या काय करायचे आणि कसे करायचे. संतापाच्या भरात मी दादा आणि चिंटूची मदत घेण्याचे मान्य तर केले होते;पण त्यानंतर पुढे उद्भवणार्‍या संभाव्य धोक्यांचा मी विचारच केला नव्हता! काय होते ते संभाव्य धोके?

दादा हा वृत्तीने दादाच होता. त्याच्या खिशात सतत रामपूरी असायचा आणि त्याने खरेच जर एखाद्याची फुल्टू केलीच तर? तर मग तो आणि त्याच्याबरोबरच मी आणि चिंटू देखिल आत जाणार हे ओघानेच आले. चिंटूही तरबेज मुष्टीयोध्दा आणि नेहमीच मारामारी करायला तयार असल्यामुळे त्याच्याकडून पण असेच काही जीवघेणे घडू शकणार होते आणि मी! एक नाकासमोर चालणारा,कुणाच्या अध्यात ना मध्यात पडणारा सरळमार्गी शक्तिहीन माणूस! आज हे माझे कार्यालयीन मित्र माझ्या अपमानाचा बदला घेण्यासाठी कोणत्याही थराला जातील. त्या ७-८ जणांना अद्दल घडवतील;पण खरेच ह्या सगळ्याची जरूर आहे काय? आज हे दोघे माझ्यासाठी त्यांना मारतील.मग उद्या ते सगळे मिळून परत मला मारतील आणि पुन्हा त्याचा बदला घेण्यासाठी........ छे! हे काही बरोबर वाटत नाही. माझ्यासारख्या सामान्य माणसाला कसला आला आहे मानापमान? आणि माझ्या मानापमानाची लढाई इतरांनी का लढावी?ती मी स्वत:च्या जोरावर का लढू नये?ह्या लढाईत दादाला आणि चिंटूलाच जर काही लागले तर त्याला मीच जबाबदार असणार! माझ्या साठी त्यांचा का बळी? तेव्हा त्यांना ह्यात गुंतवायचे नाही. मी केले,मी भोगले! अतिशय साधे-सोपे उत्तर आहे त्याचे! त्यासाठी ह्या माझ्या मित्रांना का भरीला घाला.

दिवसभर मनातल्या मनात असा विचार करत असतांना मी एका ठाम निर्णयाशी आलो. आपली लढाई आपण एकट्यानेच लढायची! आपली क्षमता नसेल तर एक वेळ हार पत्करणे परवडले पण अशी दुसर्‍यांची मदत घेऊन आणि त्यांच्यावर जोखीम टाकून आपण फुकटचा मोठेपणा मिरवायचा नाही. माझा पक्का झालेला निर्णय मी दादा आणि चिंटूला सांगितला त्यावर ते दोघेही माझ्यावरच उखडले. "तू असाच ऐनवेळी शेपूट घालणार हे आम्हाला माहित होते. साले तुम्ही सगळे भट ती भेंडीची बुळबुळीत भाजी खाऊन शेवटी पळपुटेपणाच करणार! चांगली अद्दल घडवली असती त्या भो***** ! पण तू पडला गांधी! तुला कसे सहन होणार आमचे उपाय"?

मी त्यांना माझे विचार पटवायचे काही निष्फळ प्रयत्न केले आणि शेवटी काहीसे रागावूनच त्यांनी मला माझ्या पध्दतीने वागायची उदारता दाखवली. स्वभावताच मी काही गांधीवादी किंवा अहिंसावादी वगैरे मुळीच नाही. असलोच तर काही प्रमाणात सावरकरवादी असेन. पण स्वत:ची लढाई स्वत:च्याच ताकदीवर लढायची असा काहीसा माझा स्वत:चा म्हणता येईल असा 'स्ववाद' होता. कदाचित तो आत्मघातकी देखिल असेल तरीपण तसा तो होता.

आता माझ्यापुढे प्रश्न होता की मी नेमके काय करणार होतो?मी काय करू शकत होतो? जर काही करता येण्यासारखे होते तर तसे आजच का केले नाही? खरं तर मी ती विशिष्ठ गाडी,तो डबा टाळूनही ते प्रकरण विसरू शकत होतो; पण खुमखुमी म्हणतात ना तसे काही तरी माझ्याबाबतीत झाले होते. स्वत:च्यात धमक नाही तरी कुणाची मदत घेणार नाही हा अडेलतट्टूपणा होताच !वर प्रकरण विसरून जाऊ द्यावे तर तेही नाही! मग आता काय होणार? म्हणजे करणार?कुणास ठाऊक! पण उद्या तीच गाडी आणि तोच डबा पकडणार आणि पुढे.........?

दुसर्‍या दिवशी मी मालाड स्थानकात पाच मिनिटे आधीच पोचलो. फलाटावर तुफान गर्दी होती. आज चढायला मिळेल की नाही ह्याचीही निश्चिती नव्हती पण प्रयत्न करायला काहीच हरकत नव्हती. माझ्या ठरलेल्या जागी येऊन गाडीची वाट पाहात उभा होतो.इतक्यात मला मागून हाक आली म्हणून वळून बघितले तर माझे दोनतीन शाळकरी मित्र तिथे आपापसात गप्पा मारत उभे होते. त्यातील एक 'विकी'!शरीरसौष्टवपटू होता आणि ह्या वर्षीच त्याला 'भारत श्री' होण्याचा सन्मान मिळाला होता. त्याला इतक्या वर्षांनी बघून आणि भेटून मला खूप आनंद झाला. आम्ही एकमेकांची चौकशी करेपर्यंत गाडी धाड धाड करत फलाटावर आली. मी ज्या डब्यात ज्या विशिष्ठ ठिकाणी चढणार होतो त्याच्या खिडकीत त्या कंपूची काही मंडळी बसली होती. त्यांच्यापैकी कुणीतरी मला आणि माझ्या 'भारत श्री' मित्राला हातात हात घेऊन बोलतांना(गाडी थांबेपर्यंत) बघितले असावे. माझा मित्र निरोप घेऊन प्रथम दर्जाच्या डब्यात चढला आणि मी कसाबसा माझ्या इच्छित डब्यात चंचूप्रवेश केला.

"आला रे! सांभाळा"! असा जोराचा पुकारा झाला. मी हळूहळू त्या कंपूच्या जवळ पोचलो पण माझ्या पुढे अजून एकदोन जण उभे होते. आश्चर्याची गोष्ट म्हणजे आज कुणी पत्ते खेळत नव्हते!मी हळूच बघून घेतले.कालचे सगळे हजर होते.बरोबर पेट्याही होत्या पण कुणी खेळत नव्हते.त्यातल्या एकाशी माझी नजरानजर झाली आणि अहो आश्चर्यम! चक्क त्याने माझ्याकडे बघून स्मितहास्य केले!क्षणभर माझा त्यावर विश्वास बसला नाही पण ते दृष्य खरे होते. मी मनात त्याच्या त्या हास्यामागच्या कारणांचा विचार करत असतानाच त्यांच्यापैकी एकाने मला पुढे येण्याची खूण केली आणि माझ्या पुढे उभे असणार्‍या त्या दोघांना उद्देशून म्हटले, " जरा वो साबको अंदर आने दो ना! हमारा दोस्त है"!
माझ्या कानांवर माझा विश्वास बसेना! मनात आले, "ह्यांचा हा नवीन डाव तर नाही ना"?
पण मी मुद्दामहून तर ह्या डब्यात चढलोय मग आता घाबरायचं कशाला? असा विचार करून आत गेलो. एकाने उठून मला त्याच्या जागी बसायची विनंती केली. बसावे की न बसावे असा विचार करत असतानाच त्याने मला माझ्या खांद्यांना धरून बसवले.

हे काय आज विपरीत घडतंय असा मनात विचार येत असतानाच एकाने पहिला चेंडू(प्रश्न) टाकला!
" तो प्लॅटफॉर्मवर हातात हात घेऊन बॉडीबिल्डर उभा होता तो तुमचा कोण लागतो"?
आता कुठे माझी ट्युब पेटली. "अच्छा, म्हणजे हा सगळा त्याचा प्रताप आहे तर"! (मी मनातल्या मनात!)
" हो ! तो माझा खास मित्र आहे"! का? तुमची काही हरकत"?
"नाही ! हरकत कसली? पण काल आम्ही जे काही तुमच्याबरोबर वागलो त्याबद्दल तुम्ही आम्हाला माफ करा हो! आम्ही त्यातले नाही हो! कृपा करून त्याला काही सांगू नका"!
" असे कसे सांगू नका"!
मी खरे तर त्याच्याशी काहीच बोललो नव्हतो पण जरा फिरकी ताणायची आणि मुख्य म्हणजे सूड उगवायची संधी का सोडा असा विचार करून पुढे बोललो. " काल तुमचा दिवस होता आणि आज माझा दिवस आहे! कुणापासून सुरुवात करायची ते सांगा!तुमच्यापासून करायची का ह्या टग्यापासून करायची"?
तो टग्या थरथर कापायला लागला. हात जोडून बोलला, " साहेब माफ करा! एक वार गलती झाली.आता ह्यापुढे कधी नाही होणार अशी गलती"! असे म्हणून त्याने स्वत:चे कान पकडले.
" अहो आम्ही मध्यमवर्गीय घरातली मुले आहोत. काल जरा अतिउत्साहात तुम्हाला मारझोड केली;पण खरे सांगतो,आम्हाला आमच्या कृत्त्याची लाज वाटते हो! तुमचे जे काही नुकसान झाले असेल ते आम्ही भरून देतो पण आम्हाला तुम्ही मारू नका"!

हे मी काय बघत आणि ऐकत होतो? माझ्या कानांवर आणि डोळ्यांवर विश्वासच बसेना!मी मला एक चिमटा काढून बघितला आणि हे सगळे सत्यात घडते आहे ह्याची खात्री पटली.खरे तर मी ह्यांना काय शिक्षा करणार होतो? मलाच माहित नव्हते आणि आज असे काही घडेल अशीही शक्यता नव्हती. मग केवळ माझ्या विकी बरोबरच्या हस्तांदोलनाने ही किमया घडत होती हे ऐकून तर मलाच मोठी मजा वाटली आणि त्या भेकड लोकांची कीवही आली. आज जर प्रत्यक्ष दादा आणि चिंटू आले असते तर? तर कदाचित त्यांचा तो भीषण अवतार बघूनच एक-दोघेजण जागच्या जागीच गार झाले असते! बरं झालं मला वेळीच सुबुध्दी सुचली आणि मी त्यांना येऊ नका असे सांगितले.

मी असा विचारमग्न असतानाच एकाने खरेच माझे पाय पकडले तेव्हा मला अवघडल्यासारखे झाले. मी त्याला उठवले आणि म्हणालो, " बाबानो,तुम्ही तरूण आहात(मीही तेव्हा तरूणच होतो हो!) पण म्हणून तुमची शक्ति अशी चुकीच्या ठिकाणी वापरू नका. तिचा चांगला वापर करा! मी तुम्हाला काहीही करणार नाहीये. पण तुम्ही ह्या पुढे कधीही अशी दंडेली करून लोकांना त्रास द्यायचा नाही असे कबूल करा"!

त्या सगळ्यांनी ते मान्य केले आणि मग जरा वातावरण निवळले.

तात्पर्य: शेवटी माझी लढाई मी स्वत: न लढताच त्रयस्थाच्या केवळ दर्शनाने अनपेक्षितपणे जिंकलो होतो. म्हणजे मी पुन्हा हरलो!!!

६ टिप्पण्या:

अनु म्हणाले...

Aapalya lekhanatil ha pramanikpana avadato.

अनामित म्हणाले...

वर्णन एकदम सचोटीनं केलंय! खरंच दुर्धर प्रसंग ओढवला होता तुमच्यावर. पण तुम्ही चिंटू आणि दादाला जो मार्ग सुचवला होता तोच खरा! सूडबुद्धीने कोणतीही समस्या सुटण्या ऐवजी गुंता वाढतंच जातो.

खरं तर शेवटी तुम्हीच जिंकलात. तरीही तुम्ही,"मी हरलो" असे शेवटी का म्हणता?

कोहम म्हणाले...

wah...dev saheb farach chaan....apale anubhav ani te sangnyachi paddhat atishay ranjak aahe...

जयश्री म्हणाले...

हारकर जीतनेवाले को ही बाजीगर कहते है जनाब ;)

SUDHIR KANDALKAR सुधीर कांदळकर म्हणाले...

तुमच्या क्षमाशील वृत्तीचे आश्चर्य वाटले. फार थोड्यांनीच एवढा संयम दाखवला असता. मला पटले नाही. पण तुमच्या मताचा आदर करतो.

THEPROPHET म्हणाले...

काका,
आज वाचलं...लय भारी आहे हे! एकदम भारी! :)