माझ्या आयुष्यातील आजवरच्या कडू-गोड आठवणी मी "पूर्वानुभव" म्हणून सादर करत आहे.
आपण इथे आल्याबद्दल मन:पूर्वक धन्यवाद!

२ फेब्रुवारी, २००७

माझ्या लग्नाची चित्तरकथा!भाग १

मंडळी विषय वाचून वाटेल की लग्नात काय विशेष! सगळ्यांचीच होतात. मग मला असे का वाटावे की माझ्या लग्नाची गोष्ट काहीतरी वेगळी आहे? आपणच ठरवा. त्यासाठी वाचण्याचे कष्ट मात्र घ्यावे लागतील.

माझ्या मोठ्या भावाचे लग्न झाले आणि मग माझ्या लग्नाचे घाटू लागले. माझ्यात विशेष असे काही नव्हते की ज्यामुळे मला मुली सांगून येतील. मी इथे पहिल्यांदाच स्पष्ट करतो की उंची बेताची, शिडशिडीत बांधा(जरा भारदस्त शब्द 'कृश'साठी), वजन ४५-४६ किलो भरेल न भरेल इतपतच अशा तर्‍हेच्या माझ्या व्यक्तिमत्त्वाला अनुरूप अशी वधू शोधायची म्हणजे माझ्या आई-वडिलांना किती त्रास झाला असेल ह्याची कल्पना करा. हां,पण काही गोष्टी माझ्या बाजूने होत्या त्या म्हणजे मी संपूर्णपणे निर्व्यसनी, सत्यवचनी(लोकांच्या दृष्टीने'जरा अतीच') होतो आणि मुख्य म्हणजे सरकारी नोकरी हा माझा सर्वात मोठा गुण(लग्नाच्या बाजारात) होता. त्यामुळे रीतसर नाव नोंदणी (वधूवर सूचक मंडळात) झाली. काही मुली दाखवायला आणि बघायला आल्या. मला पसंत पडलेल्या मुलीला मी पसंत नसे आणि जिथे मुलीकडून पसंती(बिचारी काय करणार... घरातल्या वडील मंडळींचा दबाव असणार) असायची तिथे मी काही तरी खोड काढत असे. अशा ४-५ मुली बघितल्या पण काही कुठे जुळेना. मग मी घोषित करून टाकले की मला लग्नच करायचे नाही. आई-वडिलांनी बराच प्रयत्न करून पाहिला पण मी आपल्या निर्णयावर ठाम होतो.
मंडळी काय असतं की आपली पण आपल्या जोडीदाराबद्दल स्वतःची अशी काही मते असतात तशीच ती माझी होती. म्हणजे कशी तर ती अशी. आपली होणारी बायको सडसडीत, काळीसावळी(गोर्‍या रंगाचे मला आकर्षण नाही) पण नाकी डोळी नीटस, शांत स्वभावाची(माझ्या सारख्या विक्षिप्त माणसाला सांभाळण्यासाठी) अशी असावी, शिक्षण असल्यास उत्तम, नसले तरी हरकत नाही वगैरे वगैरे. माझ्या पाहण्यात आजूबाजूला अशा काही मुली होत्या पण मी स्वतःहून कधीही मुलींच्या वाटेला गेलो नाही (आणि मुली माझ्या वाटेलाच काय पण माझ्या कडे बघण्याची तसदी देखिल घेत नसत). मुलींशी बोलण्याचे सोडा पण त्यांच्याकडे मान वर करून बघण्याचे धैर्य माझ्यात नव्हते. त्यामुळे प्रश्न असा होता की माझे लग्न होईल की नाही? माझ्यासाठी मी ठरवून टाकले की निदान ह्या जन्मी तरी आपले लग्न होणार नाही. पण मनात असायचे की काहीतरी चमत्कार व्हावा आणि अशक्य ते शक्य व्हावे. पण असे सगळे फक्त कथा-कादंबर्‍या, चित्रपट-नाटकात होते. आपल्या आयुष्यात असे काही घडणे नाही तेव्हा उगाच मनातल्या मनात मांडे खाण्यात काय अर्थ आहे असे मी माझ्या मनाला समजावत असे. ह्या दुःखात भर म्हणून की काय ज्या मुलींविषयी आपल्या मनात आपली भावी पत्नी अशी भावना निर्माण होत असे त्यांची लग्ने पटापट होऊन त्या माझ्या समोरून गायब होऊ लागल्या...

1 टिप्पणी:

अनामित म्हणाले...

Namaskar Atyanand Saheb
Aapla photo pahila, aapan mala mazya vadilasarkhe, maazihi aapalya ya 1 no bhagasarkhich aavastha aahe, sadhya me 22 running. Vaachun khup mazyahi aali va aaplyasarkhich manat bhitihi aahech mhana.
Vijay Patil