माझ्या आयुष्यातील आजवरच्या कडू-गोड आठवणी मी "पूर्वानुभव" म्हणून सादर करत आहे.
आपण इथे आल्याबद्दल मन:पूर्वक धन्यवाद!

३ फेब्रुवारी, २००७

'दिल्लीवर स्वारी!'अंतिम भाग.

मित्रांचे आव्हान मी स्वीकारले आणि त्या तयारीला लागलो. खाली आलो आणि त्या छोट्या-छोट्या इमारतींच्या आसपास फिरून बघितले. माझ्या त्या अवस्थेत मला एकाने हटकले. माझे दिशाहीन फिरणे त्याला संशयास्पद वाटले असावे. मी त्यालाच प्रश्न केला...भाईसाब, यहांसे बाहर जानेका कोई रास्ता है क्या?
मला नीट न्याहाळत त्याने प्रतिप्रश्न केला, आप कौन है? कहांसे आये हो और कहांपे जाना है?
मी: मैं यहांपे विवेक लॉजमें ठहरा हूं. मुझे नाश्ता करना है. यहांपे कोई छोटामोटा होटल है क्या?
तो: आप नई दिल्ली स्टेशनपे जाओ,यहांसे नजदीक है!
मला तिथेच तर जायचे नव्हते, कारण तिथे जाण्यासाठी मला राक्षसासमोरून जावे लागले असते आणि पुन्हा कालच्या प्रसंगाची पुनरावृत्ती झाली असती. मला हे सगळे टाळायचे होते आणि बाहेर निघण्याचा वेगळा मार्ग शोधायचा होता. म्हणून मी त्याला म्हटले, नई दिल्ली स्टेशनपे तो बहोत भीड है. यहां और कोई दुसरी जगह हो तो बताईये!
माझी मात्रा लागू पडली आणि त्याने तिथल्याच एका बोळकांडीतून बाहेर जाण्याचा मार्ग दाखवत सांगितले,आप यहांसे चलते जाओ. बाहर जानेके बाद एक लंबी सडक लगेगी. वह 'पहाडगंज'(विभागाचे नाव) जायेगी. वहांपे आपको अच्छासा मद्रासी होटल मिलेगा. डोसा,इडली वडा ऐसा सब तुम्हारे लोगोंका खाना मिलेगा!
मनातल्या मनात म्हणालो, आयला!म्हणजे मी ह्याला मद्रासी वाटलो की काय? बाकी मद्रासी काय आणि मराठी काय, मला काहीही समजू दे ना. रस्ता दाखवला ना झाले तर मग. आपले काम झाल्याशी मतलब!

मी त्याचे आभार मानले आणि त्या बोळकांडीतून पुढे चालत जाऊन ती 'लंबी सडक' बघून आलो. आता ही सडक आम्हाला कुठे नेणार होती ते माहीत नव्हते;पण राक्षसाच्या तावडीतून चुपचाप सटकण्याचा त्याक्षणी तो एकमेव मार्ग मला तरी दिसत होता. तसाच उलट्या पावली परत आलो आणि माझा इरादा मित्रांना सांगितला. ते सर्व ऐकून सगळे सर्दच झाले. चुपचाप पळून जाताना त्याने पकडले तर काय? अशी भीती व्यक्त करू लागले. मी त्यांना म्हणालो, तुम्ही सगळे भेकड आहात. काल रात्री जर तुम्ही माझी साथ दिली असतीत तर आज हा प्रसंग आलाच नसता. काल रात्रीच्या वेळी तुम्हाला सोडून मी कुठेही जाऊ शकलो असतो; पण केवळ मित्रत्वाच्या नात्याने मी तुमच्यासाठी माघार घेतली होती. आज सुद्धा तुम्ही अशीच कच खाणार असाल तर मग मी माझ्या रस्त्याने जाणार. तुम्हाला बरोबर यायचे असेल तर या, नाहीतर मी चाललो! असे म्हणून मी माझे सामान उचलले आणि दरवाजाच्या दिशेनं निघालो. लगेच तिघेही धावत आले आणि म्हणाले, बाप्पा,तू म्हणशील ते करतो पण आम्हाला असे वार्‍यावर टाकून जाऊ नकोस. जे व्हायचे ते होईल. आम्ही तू म्हणशील तसे करू!

मग मी सामान तिथेच ठेवून त्या तिघांना खाली नेले आणि ती चोरवाट दाखवली. सगळ्यांनी एकदम खाली न उतरता, एकेकट्याने आपले सामान घेऊन त्या लंबी सडकवर जाऊन दुसर्‍याची वाट बघायचे असे ठरले. मी सगळ्यांच्या शेवटी निघायचे असे सांगितल्यावर त्यांचे चेहरे खुलले. ठरवल्या प्रमाणे एकेक जण आपले सामान घेऊन त्या बोळकांडीतून विनाव्यत्यय जाऊ लागले. शेवटी माझी पाळी आली. मी खोलीवरनं एक नजर फिरवली. कोणाची काही वस्तू मागे राहिली नाही ह्याची खात्री केली आणि बॅग उचलून खोलीबाहेर पडणार एवढ्यात कुणाच्या तरी येण्याची चाहूल लागली. मी बॅग बाजूला ठेवली आणि येणार्‍या व्यक्तीबद्दल अंदाज करू लागलो. तो राक्षसाचा नोकर पुन्हा आम्हाला खाली बोलवायला आला होता. मी त्याला लगेच येतो असे सांगून कटवले. तो माझ्या मार्गातून दिसेनासा झाल्याची खात्री केली आणि लगेच 'सुटलो.' मला ठरलेल्या ठिकाणी पोचायला थोडा उशीर झाल्यामुळे ते तिघे चिंताग्रस्त दिसत होते;पण मला पाहून त्यांच्या जीवात जीव आला. आता खरा प्रश्न होता जायचे कुठे आणि कसे?

रस्ते सुनसान होते. कोणतेही वाहन तर नव्हतेच;पण रस्त्यावर माणसांची वर्दळ पण जवळ जवळ नव्हतीच. आम्ही आपले बॅगा सावरत सावरत दिशाहीन अवस्थेत रस्ता जाईल तिथे चाललो होतो. मधनं-मधनं मागे वळून बघत होतो कुठे शत्रुसैन्य पाठलाग तर करत नाहीना? पण दूर दूरपर्यंत कुणीच दिसत नव्हते. ते मद्रासी हॉटेल देखील अजूनपर्यंत कुठेच दिसले नव्हते. सकाळपासून फक्त चहा पोटात गेला होता आणि आता पोटात कावळे कावकाव करत होते;पण एकही हॉटेल सद्दष्य ठिकाण दिसत नव्हते. चालून चालून थकलो होतो आणि वरून सूर्य आग ओकत होता. कुणाला काही विचारावे तर 'बंद' असल्यामुळे क्वचितच कोणी भेटत होते. तरी देखील मोठ्या आशेने पाय ओढत ओढत आम्ही कसेबसे चालत होतो. एव्हढ्यात सुध्या ओरडला. बाप्पा तिकडे बघ लिहिलेय 'बृहन महाराष्ट्र भवन.' अरे सापडले. चल आपण तिकडे जाऊ. आपली राहण्याची आणि खाण्याची सोय होईल!

वादळात भरकटलेल्यांना किनारा दिसावा आणि जगण्याची आशा जागृत व्हावी तसे काहीसे आम्हाला झाले. आम्ही मोठ्या उत्साहाने तिथे पोहोचलो. तिथून सामानासह बाहेर पडणारी काही मंडळी आम्ही पाहिली आणि आम्हाला जागा मिळणार अशी खात्री झाली. लगबगीने आम्ही व्यवस्थापकांकडे गेलो. आम्ही काहीही बोलायच्या अगोदर त्यांनी आम्हाला सांगितले ’जगह नही है!’
माझी तर खसकलीच. मी बोललो,आम्ही मुंबईहून आलोय,मराठी आहोत. आमच्याशी मराठीत बोलायच्याऐवजी सरळ हिंदी काय फाडताय?
शांतपणे ते सद्गृहस्थ म्हणाले, तुम्ही मराठी आहात असा काय शिक्का मारलाय काय तुमच्या कपाळावर? इथे जागा मागायला कोणीही येते,बोलल्याशिवाय आम्हाला कसे कळणार की कोण कुठला भाषक आहे ते?
मी म्हणालो,अहो तुम्ही बोलायला संधी देखिल दिली नाहीत आणि असे परस्पर जागा नाही म्हणून कटवताय काय? आम्ही एवढ्या लांबून आशेने आलोय तर आमची काही तरी व्यवस्था करा की!
व्यवस्थापक म्हणाले, अजून दोन दिवस तरी आम्ही तुम्हाला जागा देऊ शकणार नाही. आजच्या 'संसद घेराओ' कार्यक्रमासाठी आलेली मंडळी दोन दिवसापासूनच इथे येऊन थडकली आहेत आणि ती एवढ्या लवकर इथून हालणार नाहीत. मग मला सांगा,मी तुम्हाला जागा कुठून देऊ?

आता माझ्या लक्षात आले,सकाळी तो हमाल म्हणाला ते खरेच आहे. सध्या दिल्लीत रिकामे हॉटेल मिळणे शक्यच नव्हते. आता काय करायचे? मोठा गंभीर प्रश्न होता! आम्ही आपापसात विचारविनिमय केला आणि ठरले की ह्या अवस्थेत लटकत राहण्यापेक्षा आपण मुंबईला परत जाणेच श्रेयस्कर ठरेल. व्यवस्थापकाना आम्ही जेवण-खाण्या विषयी काही सोय होईल का म्हणून विचारले तेंव्हा त्यांच्या सांगण्याप्रमाणे बाहेरच्या कुणासाठीही ते अशी व्यवस्था करू शकणार नव्हते असे कळले. मग त्यांना नवी दिल्ली स्टेशनकडे जाण्याचा रस्ता विचारला. तो मात्र मोठ्या आनंदाने त्यांनी आम्हाला स्वत: उठून बाहेर येऊन दाखवला. धन्य तो मराठी माणूस आणि धन्य ते आम्ही सारे!

ह्या ठिकाणाहून नवी दिल्ली स्टेशनवर पायी जायला किमान पाऊण तास लागेल असे कळले. पुन्हा एकदा आम्ही सामान उचलले आणि स्टेशनच्या दिशेने निघालो. आमच्या सुदैवाने रस्त्यात एक छोटेसे खानपानगृह आम्हाला दिसले. त्याचा मालक सरदारजी होता. आम्हाला बघून तो अदबीने पुढे आला आणि आसनस्थ होण्याची विनंती केली. लगेच थंडगार पाणी आणून पुढ्यात ठेवले. एका क्षणात चौघांनी घटाघट पाणी प्यायले आणि मग एकदम जीवात जीव आल्यासारखा वाटला.
गरम क्या है? ह्या आमच्या प्रश्नाला छोले-बटुरे असे उत्तर मिळाले. मग आम्ही तेच मागवले. पदार्थ छानच होते आणि भूक सपाटून लागली असल्याने सगळ्यांनी त्यावर आडवा हात मारला. खाणे आटोपल्यावर आम्ही लस्सी मागवली. दोन मिनिटातच तो बैरा परत आला म्हणाला,साब,दही कम है. सिर्फ दो लस्सी ही बन पायेगी. चार नही बनेगी!
मी त्याला म्हणालो, कोई बात नही,तुम दो लस्सी चार ग्लासमें ले आओ.
तो मान हालवून गेला आणि नंतर चार ग्लास भरून लस्सी घेऊन आला. आम्ही लस्सी मजा चाखत चाखत फस्त केली. त्या बैर्‍याला बील आणायला सांगितले. पण तो म्हणाला, साब पैसा काउंटरपेही देना,इधर बील नही देत!
आम्ही सरदारजीकडे गेलो. बैर्‍याने आम्ही खाल्लेल्या पदार्थांच्या यादीत चार लस्सी असे सांगितले. मी त्याला टोकले आणि म्हटले,चार नही,दो!
तो:चार ग्लास लस्सी लाया तो था!
मी: तुमने तो बोला की सिर्फ़ दो लस्सी बनेगी इतनाही दही है, तो चार लस्सी कैसी हुई?
तो: आपने तो बोला की दो लस्सी चार ग्लासमें लाओ, बोला था ना?
मी : हां,मैने बोला था. लेकीन दो ग्लास लस्सीके चार ग्लास कैसे बनाये?
तो: "आपने बोला तो मैने दहीमे पानी मिलाके चार ग्लास बनाये.
मी: जब तुमने दो ग्लासके चार ग्लास बनानेके लिये पानी डाला इसका मतलब लस्सी असली नही थी.
तो: ऐसे कसे असली नही होगी,मैने खुदने बनायी थी. वो असली ही थी. आप चार लस्सीके पैसे देना.

इतका वेळ आमचा संवाद ऐकणार्‍या सरदारजीने मध्येच तोंड घातले. ऐजी,पाईसाब की गल है? मेणु समझादे तुसी!
मी : देखो सरदारजी हम लोक मुंबईसे आये है. हमको धरमपाजी(हे माझ्या ऑफिसातील मित्राचे नाव बरं का.... गरम धरम नव्हे) ने बोला था की दिल्लीमें जाओगे तो पहाडगंजमे एक सरदारजीका ढाबा है(हे लोक छोटेखानी हॉटेलला ढाबा म्हणतात. उधरकी लस्सी पीके देखो,जनमभर याद रखोगे. ऐसी लस्सी पुरे दिल्लीमे कही नही मिलेगी. इसीलिये आपके पास खास लस्सी पीने आये थे, लेकिन निराश होकर जा रहे है! आणि मग घडलेले लस्सी पुराण मी त्याला समजेल असे सांगितले आणि म्हटले, अभी मै धरम पाजी को क्या बताऊं? लस्सी की क्वालिटी घट गयी है,लस्सी पानीदार हुई है! बोलो,क्या जवाब दुं?
सरदारजी एकदम शरणच आला. तो म्हणाला, प्राजी, माफ करना जी! ऐ बेवकुफ्के वास्ते मेरा नाम खराब ना करो. तुसी मेरा मेहमान हो. शामको वापस आओजी,मै अपने हातोंसे त्वाडेवास्ते लस्सी बणाउंगा! तुसी फिकर ना कर. ऐसी लस्सी पिलाउंगा की जिंदगीभर करतारसिंगदा नाम भुलोगे नही. लेकीन भगवानके वास्ते धरमपाजी को मत बताओ. इतना बडा आदमी दुखी हो जायेगा!
माझ्या लक्षात आले की बहुतेक ह्याची धरमपाजी च्या बाबतीत गल्लत झालेली दिसतेय म्हणून मी सफाई देण्यासाठी म्हणालो, प्राजी,धरमपाजी....माझे बोलणे अर्धवट थांबवून मला तो अजिजीने म्हणाला,पाइसाब,किरपा करके धरमपाजी को कुछ ना बताना. मेरी मानो,आप मेरे मेहमान है और मै आपसे पैसे कैसे ले सकता हुं? लेकिन शामको जरूर आना!

मी त्याला आमची परिस्थिती समजावून सांगितली. राहायला जागा नाही म्हणून आम्ही मुंबईला परत कसे जात आहोत वगैरे गोष्टी सांगितल्यावर सरदारजी खट्टू झाला. त्याने आमच्या राहण्याची व्यवस्था करण्यासाठी दोन तीन ठिकाणी टेलीफोन करून बघितले पण त्याला यश आले नाही. निराश मनाने त्यांने आम्हाला निरोप दिला. जाता जाता धरमपाजी ला ’सतश्री अकाल’ सांगायला विसरला नाही. विषण्ण मनाने आम्ही देखील स्टेशनच्या मार्गाला लागलो.
दिल्लीत आल्यापासूनचा हा पहिलाच 'माणुसकीचा' हृद्य अनुभव, आम्हाला दिल्ली सोडताना मिळण्यामागे काय योग होता न कळे!

समाप्त.

३ टिप्पण्या:

जयश्री म्हणाले...

अहा....क्या बात है! तो आखिर आपको धरम पाजीने बचा लिया :)
प्रमोद.... फ़ारच ओघवतं लिहिता तुम्ही...! लिखते रहो...!

अनामित म्हणाले...

प्रमोदजी, तुमच्या दिल्लीच्या समस्त स्वा-या नजरेत अधाश्यासारख्या सामावून घेतल्या. साधरणत: प्रवासवर्णन रटाळ होण्याची शक्यता अधिक असते. पण तुम्ही तुमच्या ओघवत्या शैलीने ते अत्यन्त रसाळ आणि रंजक केले आहे. वाचताना मझा आला!

आता पुढच्या सुट्टीत तुमच्या बरोबर मुक्कामपोष्ट मद्रासला जाईन म्हणतो! :-)

Unknown म्हणाले...

u ROCKS kakashri......!!!!!