माझ्या आयुष्यातील आजवरच्या कडू-गोड आठवणी मी "पूर्वानुभव" म्हणून सादर करत आहे.
आपण इथे आल्याबद्दल मन:पूर्वक धन्यवाद!

१२ एप्रिल, २००८

मराठी माणूस,हिंदू माणूस आणि भारतीय नागरिक!..काही साम्यस्थळे!

विषय पाहून चक्रावलात? विषय फार गहन आहे? अहो हे मला माहीत आहे हो. पण मी काठाकाठानेच पोहणार आहे. कारण फार खोलात शिरण्याची माझी क्षमता नाहीये ह्याची मला पूर्ण जाणिव आहे. ह्या तिघांच्यात जाणवणार्‍या दोषांत(मी इथे फक्त दोषांबद्दलच बोलणार आहे) एक समानता आढळते. त्याबद्दलची माझी काही ढोबळ निरीक्षणे मी इथे नोंदवणार आहे. त्यावर आपलीही मते जाणून घ्यावीत म्हणतो.

काही ठळक दोष जे वरील तिघात समान आहेत.

१)कृती कमी उक्ती जास्त. म्हणजे घोषणा करण्याची उपजत आवड पण अंमलबजावणीच्या नावाने बोंब.
२)मुत्सद्दीपणाचा अभाव. जे करायचे त्याची करण्याआधी जाहीर चर्चाच फार,त्यामुळे विरोधकांचे चांगलेच फावते.
३)अती सहिष्णुता. आपल्या विरोधात कुणी अवाजवी बोलले,वागले तरी त्याचा योग्य वेळी योग्य त्या प्रकारे बंदोबस्त करणे तर दूरच पण मनाचा उदारपणा दाखवण्यासाठी तिथे सोयिस्कर दुर्लक्ष करणे.
४)स्वत:च्या माणसांवर उठसूठ टीका करणे. प्रतिस्पर्ध्याला वचक बसेल असे वागण्याऐवजी स्वत:च्याच लोकांना अक्कल शिकवणे.
५)एकीचा अभाव. आपापसात सामंजस्य निर्माण करण्याऐवजी दुही कशी वाढेल अशी वक्तव्ये आणि वागणूक करणे.

मंडळी मी वर लिहिलेले सगळे दोष हे ममा(मराठी माणूस, हिंमा(हिंदू माणूस) आणि भाना(भारतीय नागरिक)ह्यांच्यामध्ये कमीजास्त प्रमाणात आढळतात.पण ह्यामध्ये ममा हा सर्वात कमजोर आहे,त्यानंतर हिंमा आणि मग भाना. हा नेमका काय प्रकार आहे? चला पुढे वाचा.

ममा:आपल्याच प्रदेशात(महाराष्ट्रात)हा आता उपरा ठरायला लागलाय.इथले राजकीय नेते मराठीसाठी आणि मराठी माणसासाठी अमुक करू आणि तमुक करू असा नुसता घोषणांचा मारा करत असतात.पण कृतीच्या नावाने शून्य. कागदोपत्री मराठी भाषा जरी इथली राजभाषा असली तरी सगळे कागदी व्यवहार अजूनही इंग्लिश मध्ये आणि इतर सर्वसामान्य व्यवहार हिंदीमध्ये चालतात.नोकरी धंद्यात इथला भुमिपुत्र म्हणून ज्याला प्राथमिकता मिळायला हवी त्या ममा ला कुणी हिंग लावूनही विचारत नाही. मराठी अस्मितेचे गाजर दाखवून काही लोक आंदोलनं वगैरे करतात आणि त्यात मराठी माणूसच भरडला जातो. परप्रांतीयांना फुकटची इतरांची सहानुभूती मिळते. जे काही मराठी भाषा आणि ममा साठी करायचे ते बिनबोभाटही करता येत असते. पण इथल्या लोकांना,विशेष करून राजकारण्यांना असे काही करण्याऐवजी मोठमोठ्या घोषणा करण्यात आणि स्वत:भोवती दिवे ओवाळून घेण्यातच स्वारस्य असते. त्याला आम ममाशी काहीही देणेघेणे नसते.
अशा तर्‍हेच्या घोषणांमुळे विरोधकांचे मात्र फावते आणि मग आपली एकत्रित शक्ती ह्याविरुद्ध उभी करून महाराष्ट्र आणि ममाला संकुचित,जातीयवादी वगैरे ठरवून मोकळे होतात.

आता जेव्हा संपूर्ण देशाचा विचार करतो तेव्हा ममाच्या जागी हिंमाला ठेवा. इथेही वरचे सर्व निकष लागू होतात. हिंदू नेते हिंदूंच्या भल्यासाठी(हिंदू बहुसंख्यांक असल्यामुळे ते साहजिक आहे) जे करायचे ते बिनबोभाटपणे करू शकतात पण त्यांना तसे काही करण्याच्या ऐवजी फुकट प्रसिद्धी हवी असते. त्यामुळे राणा भीमदेवी घोषणा करायच्या की ज्यामुळे निधर्मीवादाची झूल पांघरलेल्यांच्या हातात एक आयतेच हत्यार मिळते.इथे हिंमाच्या हिताचे म्हणजे दुसर्‍यांच्या अहिताचे असे नसते पण घोषणा करणार्‍यांना काही तरी सनसनाटी निर्माण करायची असते असे त्यांच्या वक्तव्यावरून कुणालाही वाटू शकते; त्यामुळे त्यावरून रण माजते आणि मूळ विषय बाजूलाच जातो.सर्व जनतेला रोजगार हमी.अन्न,वस्त्र,निवारा,पाणी अशा प्राथमिक गरजा पुरवण्यासाठी
प्राथमिकता देण्याऐवजी नसलेले धार्मिक प्रश्न उकरून काढण्यात ह्या नेत्यांना स्वारस्य असते.त्यामुळे होते काय की इथला बहुसंख्य हिंमा हा उपरा ठरतो.त्यातून हिंदूंमधील तथाकथित विद्वान आणि स्वत:ला पुरोगामी म्हणवणारी माणसे नुसते ’हिंदू’ असे काही ऐकले की लगेच कावकाव करायला सुरुवात करतात.त्यांना अन्य धर्मीयांनी स्वत:ला त्या धर्माचे अनुयायी म्हटले तर त्यात काहीही वावगे वाटत नाही पण हिंमा ने आपण हिंदू आहोत असे म्हटले तर ते जातीयवादाचे द्योतक मानले जाते.

हाच निकष आंतर्राष्टीय पातळीवर भाना ला लागू पडतो. चीन,अमेरिका,पाकिस्तान भारताला अक्कल शिकवायचा प्रयत्न करतात. स्वत:हून कधी कुणावर आक्रमण न करणार्‍या भारतीयांना शांतता आणि संयमाचे धडे दिले जातात. दिवसाढवळ्या चालणार्‍या पाकिस्तानी दहशतवादाला आम्ही चोख उत्तर देऊ वगैरे घोषणा सत्ताधारी नेहमीच करत असतात पण प्रत्यक्ष काहीच करत नाहीत. चीनने आपला प्रदेश बळकावला तरी भारताला आंतर्राष्ट्रीय समुदायाकडून सोडा पण इथल्या मार्क्सवादी पक्षाकडूनही पाठिंबा मिळत नाही. मुत्सद्दीपणात भारतीय नेहमीच मार खातात. मग तो ताश्कंद करार असो,अणुभट्टी-करार असो अथवा चीन-पाकिस्तान बरोबरची सीमावादाची बोलणी असोत,प्रत्येक ठिकाणी आपण कमी पडतो.

मंडळी ह्यातला एकेक विषय हाताळायचा म्हटला तरी त्यावर पानेच्या पाने लिहिता येतील इतके हे विषय सर्वव्यापी आहेत आणि माझ्यासारख्याची ती कुवत नाही. तेव्हा मी इथेच थांबतो. ह्या ठिकाणी बरेच मुद्दे अध्याहृत राहिलेले आहेत. ते आपण आपापल्या कुवतीनुसार समजून घ्याल अशी अपेक्षा करतो आणि आता खरंच थांबतो.
इति अलम्!

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: