माझ्या आयुष्यातील आजवरच्या कडू-गोड आठवणी मी "पूर्वानुभव" म्हणून सादर करत आहे.
आपण इथे आल्याबद्दल मन:पूर्वक धन्यवाद!

१९ जून, २०११

चंशिकुम! ८

थोडा वेळ आराम करून,चहापाणी करून पुन्हा बाहेर पडलो.आता अंधार झालेला होता पण आम्हाला फक्त एकाच ठिकाणी जायचं होतं... ते म्हणजे वशिष्ठ ऋषींचं मंदिर पाहायला. आम्ही त्याच रस्त्यावर राहात होतो त्यामुळे ते तसे फारसे लांब नसावे असे वाटले होते; पण गाडीतून जाऊनही चांगली पंधरा मिनिटे लागली...आणि गाडीतून उतरून अजून पुढे चढ्या रस्त्याने चालत पंधरा-वीस मिनिटे लागली. रस्ता चढा होता आणि चांगलाच दमवणारा होता. बोलतांना जाणवत होतं की श्वास लागतोय..शिमल्यापासूनच मला हे जाणवले होते की एकदोन मजले चढलो तरी श्वास लागतोय...मनात आलं की आपण आता खर्‍या अर्थाने म्हातारे झालोय. ;)
पण जेव्हा कळलं की माझ्या बरोबर असणारी तरूण मंडळी(आमच्यात मीच सगळ्यात वयाने मोठा होतो)देखील धापा टाकताहेत,त्यांनाही इथे थकायला होतंय, तेव्हा म्हटलं...नाही,नाही. अजून दम बाकी आहे आपल्यात. ;) कारण एक होतं...चढतांना जरी धाप लागत होती...तरी चढून वर गेल्यावर मिनिटा-दोन मिनिटात श्वास पूर्वपदावर येत होता. ह्याचा अर्थ एकच होता...आम्हा शहरी लोकांना चढण चढण्याची...आपल्या भाषेत जिने चढण्याची फारशी सवय नसते आणि त्यामुळेच हा त्रास जाणवत होता. तसे तर मला सहा जिने चढण्याची कमी-जास्त सवय आहेच,कारण मी राहतोच सहाव्या मजल्यावर आणि अधेमधे आमची लिफ्ट बंदही असते...मग काय,चढणे-उतरणे ओघाने आलेच.असो.

वशिष्ठी मंदिराकडे जातांना दूतर्फा बरीच दुकानं आहेत. त्यात शाली,गरम कपडे,शोभेच्या वस्तु,खेळणी वगैरे बर्‍याच गोष्टींची विक्री होते. आम्ही मंदिराकडे चाललो असताना बरेच दुकानदार जाणार्‍या-येणार्‍या आमच्यासारख्या प्रवाशांना एकच प्रश्न विचारत होते,आमंत्रण देत होते....क्या चिंगु चाहिये? आईये जी चिंगू देखिये.

मला ते चिंगू... चिंगूस असे ऐकू येत होते. आम्ही कुठेच न थांबता मंदिराकडे निघालो होतो आणि ही मंडळी आम्हाला विचारत होती...काही घ्यायचंय का? आणि आम्ही नाही म्हणत पुढे चाललो होतो...त्यामुळे प्रत्येक ठिकाणी हे चिंगूस ऐकून...ही मंडळी आम्हाला तर चिंगूस(कंजूष) म्हणत नाहीत ना? असा एक प्रश्न माझ्या मनात आला...

पुढे जाता जाता एकाने अगदी वाट अडवून मला तो प्रश्न पुन्हा विचारला...आता एकदाचा काय तो सोक्षमोक्ष लावावा असे ठरवून मी त्याला म्हटलं...क्या है ये चिंगूस?
तो म्हणाला...आईये इधर दुकानमे आईये..दिखाता हूँ!
नही,हमे लेना नही है,खाली ये क्या है वह बताईये. यहाँपर सब लोक एकही सवाल करते है,इसीलिये उत्सुकता बढ चुकी है!...मी म्हणालो
अच्छा साब, बताता हुँ! वो क्या है ना की..चिंगु नामका एक प्राणी होता है...भेड-बकरी जैसा.जिसके शरीरपर बहुत ऊन होती है.....
मी त्याचं बोलणं मधेच कापत हसत हसत म्हटलं...अच्छा,वो प्राणीका नाम है क्या? हम तो समज रहे थे की आप सब लोक हमें चिंगूस...याने के कंजूष बोल रहे है...हमारे भाषामे कंजूषको चिंगूस बोलते है! हमने सोचा यहॉं सब लोक हमे बुला रहे है और कह रहे है की भाईसाब आईये,कुछ खरिदिये, और हम ऐसेही आगे जा रहे है,तो वो लोक हमे चिंगूस यानी के कंजूष कह रह रहे है!

तो दुकानदार आणि त्याच्या बरोबरचे साथीदारही खूप मोठ्याने हसायला लागले.
नही,साबजी,हम आपको ऐसे कैसे बोल सकते है? हम बेचनेके लिये यहाँपर बैठे है,कोई खरीदे ना खरीदे. वह तो उनकी मर्जी है,लेकिन हम किसीको कजूष कैसे बोल सकते है!
असो. आम्ही पुढे निघालो आणि मंदिराजवळ पोचलो. सगळ्यांच्या चपला-बूट साभाळायला मी बाहेरच थांबलो...बाकीचे लोक मंदिरात निघून गेले. मी हे पाहिलंय की इथली बहुतेक मंदिरं चांगली एकदोन मजली असतात...बहुदा मंदिराबरोबरच तिथे भक्तनिवासही असावेत. दूरवरून येणार्‍या भक्तांची उतरण्याची,राहण्याची सोय असावी म्हणून. हिमाचलमध्ये भरपूर मंदिरं आहेत...इतकी की हिमाचलचं दुसरं नाव आहे देवभूमि!

मंडळी देवळात चक्कर मारून आली..आम्ही पुन्हा खाली उतरायला लागलो....पुन्हा ती चिंगूवाली मंडळी पिच्छा पुरवायला लागली...मग सर्वानुमते ठरवलं...इतकं म्हणताहेत तर काय प्रकार आहे ते पाहूया..आम्ही आत गेलो....पाचसहाजण होते दुकानात...त्यापैकी एकाने आमचा ताबा घेतला...सगळ्यांना बसायला आसनं दिली आणि त्याने त्या चिंगुबद्दल सांगायला सुरुवात केली...
चिंगु नावाचा एक केसाळ बकरी/मेंढी सदृश प्राणी आहे...पूर्वी, ह्याच प्राण्याच्या कंठात आढळणार्‍या विशिष्ठ तंतूंपासून शाल बनायची...ती पश्मिना नावाने ओळखली जायची...पण त्यासाठी त्या प्राण्याची हत्त्या करावी लागत असे...मेनका गांधी मंत्री असतांना तिने ह्यावर बंदी घातली..जी आजपर्यंत टिकून आहे...त्यामुळे त्या पद्धतीने शाल बनणे बंद झाले...मग आता दुसरा पर्याय काय? तर..हा पर्याय जरा खूप लांबचा आहे...कसा तो आपण पाहूया...
त्याच प्राण्याच्या अंगावरच्या केसांपासून आधी रजई बनवायची... ही रजई दुपदरी असते...थंडीत गरम आणि उन्हाळ्यात थंड...असे तिचे वैशिष्ठ्य आहे... ही रजई अंगावर न घेता पलंगपोस म्हणून वापरायची असते...थंडीत ती जशी आहे तशीच गादीवर अंथरायची असते म्हणजे ऊबदारपणा जाणवतो आणि उन्हाळ्यात तिच्यावर पाणी मारून(पाणी न मारताही थंड करणारी चिंगुही होती..अजून महाग होती) मग ती अंथरायची असते म्हणजे गारवा जाणवतो...जेणेकरून उकडत नाही आणि शांत झोप लागते.

ही रजई गिर्‍हाईकाला वापरायला द्यायची...त्यासाठी गिर्‍हाईकाने साधारण ६००० रुपये मोजायचे. दोन ते तीन वर्षे ही रजई वापरून त्याने ती परत करायची....परत करतांना त्याला दोन पर्याय असतात...१) साधारण ४५ ते ५०% पैसे परत मिळतात...किंवा २) थोडे अधिक पैसे भरून दुसरी चिंगु वापरण्यासाठी घेता येते.
रजई घेतांना गिर्‍हाईकाला रजई बरोबरच पाच गोष्टी फुकट दिल्या जातात...एक खास गरम चादर,दोन शाली..एक पुरुषांसाठी आणि एक स्त्रीसाठी,एक खास चादर ज्यावर निसर्गदृश्य रंगवलेलं असतं...जे तुम्ही घरात पडदा किंवा सजावटीसाठी भित्तीचित्र म्हणून वापरू शकता आणि एक जमिनीवर पसरण्याचा रंगीबेरंगी गालिचा....
तसं पाहायला गेलं तर सौदा काही वाईट नव्हता...पण आमच्यापैकी कुणीच काही घेतलं नाही....
हं,आता कुणालाही प्रश्न पडला असेल की...गिर्‍हाईकाने परत केलेल्या त्या चिंगुचं ही मंडळी काय करतात?
अतिशय महत्त्वाचा आहे हा प्रश्न...साधारण वर्ष-दोन वर्ष वापरलेल्या अशा त्या रजईवर काही प्रक्रिया करून नंतर तिच्यापासून अतिशय मुलायम अशा शाली तयार केल्या जातात..ज्या अंगठीतूनही पार होतात..ज्यांची किंमत भरमसाठ असते...आणि हाच त्या दुकानदारांचा/उत्पादकांचा फायदा असतो....रजया जुन्या झाल्याशिवाय त्यातून, त्यांना हवे तसे तलम शाली बनवण्यासाठीचे तंतू मिळत नाहीत...त्यामुळे त्यासाठी त्या आपल्यासारख्या गिर्‍हाईकांना सशुल्क वापरायला दिल्या जातात..त्या आपण घ्याव्यात म्हणून काही मोफत गोष्टींचं आमिषही दाखवलं जातं...एकूण मला तरी हा प्रकार गिर्‍हाईक आणि उत्पादक ह्या दोघांच्या फायद्याचा वाटतो...अर्थात प्रत्यक्ष अनुभव नाही घेतला.
हा सगळा व्यवहार जम्मू-काश्मीर सरकार पुरस्कृत आहे असेही कळले..खरे खोटे माहीत नाही....

रजया तिथे दुकानात पैसे देऊन अथवा क्रेडिट कार्ड इत्यादि वापरून विकत घेता येत होत्या तसेच त्या घरपोचही पाठवतात ...त्या घरी आल्यावरच आपण पैसे द्यायचे....वापरून झाल्यावर आपल्या जवळच्या प्रमुख शहरातील..जसे की मुंबई,पुणे वगैरे ठिकाणी जिथे जम्मू-काश्मीर सरकारच्या वतीने प्रदर्शनं भरवली जातात..तिथे ह्या वापरलेल्या रजया स्वीकारल्या जातात...पैसे परत हवे असतील तर त्यांच्या नियमात जे काही बसते ते ठराविक काळाने तुमच्या घरी धनादेशाद्वारे पोचवले जातात..अथवा अधिक किंमत भरून नवीन चिंगु पाठवली जाते.....

असो...प्रत्येकाच्या मनात त्या रंगीबेरंगी चिंगु,त्यासोबत फुकट मिळणार्‍या तशाच रंगीबेरंगी आणि आकर्षक भेटवस्तु इत्यादि भरूनही आम्ही काही त्या मोहाला बळी पडलो नाही. :)
आम्ही पुन्हा आमच्या विश्रांतीस्थानाकडे निघालो...दुसर्‍या दिवशी पहाटेच निघायचे होते ना आम्हाला...रोहतांग खोरे(पास) दर्शनासाठी.

हॉटेलात पोचलो...जेवणाची वेळ झालीच होती. माझ्या सुदैवाने ह्या हॉटेलात शाकाहारी जेवणच बनवले जाते असे कळले...अर्थात मांसाहारी जेवणाची कुणी आगाऊ मागणी नोंदवली तरच त्यांच्यासाठी वेगळी व्यवस्था केली जाते...असेही कळले...त्यामुळे मी नि:शंक मनाने जेवणाचा आनंद लुटू शकलो....
दुसर्‍या दिवशी गाडी-चालकाला पहाटे चार वाजता येण्यास सांगून आम्ही झोपेच्या स्वाधीन झालो.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: