माझ्या आयुष्यातील आजवरच्या कडू-गोड आठवणी मी "पूर्वानुभव" म्हणून सादर करत आहे.
आपण इथे आल्याबद्दल मन:पूर्वक धन्यवाद!

४ जून, २०११

चंशिकुम! ४

चंढीगढच्या बाहेर पडलो आणि हिमाचलच्या वाटेला लागलो...परिस्थितीत इतका आमुलाग्र बदल झालेला दिसला की काही विचारू नका. कडक शिस्तीतून बाहेर पडून मोकळ्य़ा वातावरणात गेल्यावर कसं वाटतं तसं अगदी हलकं हलकं वाटायला लगलं. अहो चक्क माणसं दिसायला लागली...नुसती वस्ती असून उपयोग नाही तर माणसांची जागही दिसावी लागते,माणसांची वर्दळ,लगबग असं सारं दिसावं लागतं आणि तेच आता दिसायला लागलं आणि आम्ही पुन्हा एकदा माणसात आलो.

हिमाचल म्हटला की डोंगराळ प्रदेश हे समीकरण मनात होतंच आणि त्याला आता दिसणारं दृश्यही पूरक असंच होतं. रस्ता अगदी वळणा-वळणांचा...नागमोडी शब्दही थिटा पडेल इतका आणि तोही हळूहळू चढत जाणारा.सुरुवातीला रस्त्याच्या दूतर्फा दिसणारी घरं आणि वस्त्या हळूहळू मागे पडत होत्या. आता एका बाजूला डोंगर आणि दुसर्‍या बाजूला उतार दिसत होता. त्या उतारांवरही दूर दूर कुठे काही एकटी-दुकटी घरं बांधलेली दिसत होती. तिथपर्यंत पोचायचा रस्ता कुठून आणि कसा असेल ह्याची कल्पना करणेही आमच्यासारख्या शहरी लोकांना शक्य नव्हतं. रोज इतकी चढ-उतार करून ही माणसं आपापल्या कामावर कशी आणि कधी पोचत असतील? उन-पाऊस आणि थंडीत इथे कोणकोणत्या अडचणींचा मुकाबला हे लोक करत असतील? असले प्रश्न डोक्यात रुंजी घालायला लागले.पण डोक्यावर सूर्य तापत होता आणि जेवणही अंगावर यायला लागले होते..गाडीतले वातानुकुलनही आता जाणवायला लागले होते...ह्या सर्व गोष्टींचा एकत्रित परिणाम म्हणून डोळे मिटायला सुरुवात झाली होती पण बाहेरचे दृष्यही डोळ्यात आणि प्रग्रात साठवण्याजोगे होतेच. अधूनमधून डुलक्या घेणे सूरु होतेच आणि जाग आली की एखादे सुंदर दृष्य टिपण्याचे सुरूच होते.

मे महिना असूनही सगळीकडे हिरवळ दिसत होती.काही ठिकाणी गर्द वनराई तर काही ठिकाणी उतारावरची शेती आणि एकटी-दुकटी घरं. रस्त्यावरची रहदारी फारशी नव्हतीच. येणारी जाणारी, अगदी तुरळक वाहनं दिसत होती त्यामुळे गाडी चालक निर्धास्तपणे गाडी चालवत होता. अशा वळणावळणांच्या आणि चढत जाणार्‍या रस्त्यांवरही तो किमान ७०-८० च्या वेगाने गाडी हाकत होता...जणू काही घाटांचा राजा असावा अशा रूबाबात.

बघता बघता आम्ही खूप उंचावर पोचलो होतो.हवामानातही सुसह्य असा बदल जाणवत होता. वातानुकुलन बंद करून खिडक्या उघडाव्याश्या वाटल्या...आम्ही तेही केलं आणि मग बाहेरची ताजी हवा आत आली...मनसोक्त वारा प्यायला सुरुवात झाली.आजूबाजूला हिरवाईने नटलेले डोंगर,वळणवळणांचा पण अतिशय व्यवस्थित बांधलेला रस्ता,सुसाट वेगात चालणारी गाडी आणि आल्हादक हवा...अशा सगळ्या वातावरणात सगळा शीण दूर झाला. मी पुन्हा माझा प्रग्रा सावरला आणि दिसेल ते दृष्य वेड्यासारखे टिपू लागलो. खरं तर इतक्या मोठ्या प्रमाणावर छायाचित्रण करण्याचा हा माझ्या आयुष्यातील पहिलाच प्रसंग...त्या शास्त्रातलं काही म्हणता काही माहीत नाही..फक्त पडद्यावर पाहायचं आणि बटण दाबायचं इतकंच माहीत असलेला मी...धडाधड बटणं दाबत होतो.

(प्रग्रा म्हणजे प्रतिमा ग्राहक...म्हणजेच सगळ्यांना माहीत असलेला कॅमेरा....प्रगा हा शब्द पुण्याचे आमचे मित्र श्री. विनायक रानडे ह्यांनी निर्माण केला...अतिशय नेमका आणि नेटका शब्द असल्यामुळे तो मला भावला आणि म्हणूनच मी तो वापरतोय)

आत्तापर्यंत क्वचित प्रसंगी एखाद दोन छायाचित्र काढण्याचा प्रसंग माझ्या वाट्याला आलेला....कारण प्रग्रावरचा हात स्थिर असावा लागतो..ज्यात मी नेहमीच कमी पडत होतो...त्यातून माझी कन्या प्रग्रा हाताळण्याच्या बाबतीत खूपच पुढारलेली(माझ्या तुलनेत) असल्यामुळे माझ्या हातात प्रग्रा कधीच येत नसे. मलाही त्याचे फारसे सोयर सुतक नव्हते. हा प्रकार आपल्यासाठी नाहीच मुळी अशी मी माझ्या मनाशी खूणगाठ बांधून घेतली होती.पण हल्लीच तिने एक नवीन प्रग्रा घेतल्यामुळे हा जुना झालेला प्रग्रा माझ्या हातात अनायासे आला आणि मी त्या संधीचा फायदा घेतला...मला जमतील तशी छाचि काढलेली आहेत...ती जर चांगली आली असतील तर ते प्रग्राच्या क्षमतेमुळे आणि खराब असतील तर माझ्यातल्या कौशल्याच्या अभावामुळे.असो.

आता हळूहळू रस्त्याच्या आजूबाजूची आणि डोंगर उतारावरची वस्तीही वाढू लागली होती. शहर जवळ आल्याची ही निशाणी होती आणि हा हा म्हणता आम्ही शिमला शहरात पोचलो सुद्धा. इतका वेळ सुसाट चालणारी गाडी आता मात्र अधूनमधून चक्क थांबवावी लागत होती....कारण आता रहदारी कमालीची वाढली होती...वाहतूक पोलिस वगैरे गोष्टींचे अस्तित्त्वही जाणवायला लागले होते. गजबज प्रचंड प्रमाणात वाढलेली होती. जिथे पाहावं तिथे...एकावर एक चढलेली घरं दिसत होती. डोंगर उतारावर तर मोकळी जागाही दिसेनाशी झालेली..सगळीकडे घरंच घरं....आत्तापर्यंत फक्त छायाचित्रात पाहिलेले दृष्य प्रत्यक्षात पाहात होतो. घरांचे रंगही वैविध्यपूर्ण होते...त्यातही विशेषत्वाने त्यांची छपरं...काही लाल तर काही हिरवी....आजूबाजूच्या वनराईच्या हिरव्या रंगाच्या छटांमध्ये हे रंगही आपली भर घालत होते...हे दृश्य खरंच मनोहारी आहेच होते...चित्तवेधक होते....वेड लावणारे होते...माझ्या प्रग्रात मी जमेल तेवढे ते साठवलंय.

आता वेळ होती आमचं वसतीस्थान शोधण्याची...संध्याकाळ झालेली...सूर्यास्त व्हायला थोडाच अवधी होता... आधीच ठरल्याप्रमाणे ब्राईट लाईन नामक हॉटेलकडे आम्ही मोर्चा वळवला.पण तिथे गेल्यावर कळलं की आमच्या नावाने तिथे कोणतेही आरक्षण झालेले नाहीये. मग पुन्हा फोना-फोनी झाली. त्यात अर्धा-पाऊण तास गेला.मग कळलं की आमच्यासाठी ब्रिज व्ह्यू रिजन्सीमध्ये राह्ण्या-जेवण्याची व्यवस्था केलेली आहे. चालकाने गाडी त्या दिशेने दौडवली आणि मग कळलं की ते हॉटेल उंचावर....शिमल्याच्या खास भागात द मॉलवर(माल रोड असेही काही लोक म्हणतात)...जिथे गाड्यांना मज्जाव आहे. तिथे पायीच जावं लागणार. :(
पायी जाण्यासाठी किमान अर्धा तास चढून जावं लागेल....हे राम! मग,आता काय करायचं?

काही काळजी करू नका. इथे एक सरकारी लिफ्ट आहे...तिचं माणशी ७ रू तिकीट आहे...त्यातून वरपर्यंत जाता येईल..आणि तिथून... बस्स, एक मिनिटावर हे हॉटेल आहे....इति: एक हमाल मुकादम.
झालं,मग काय गाडी त्या लिफ्टच्या पलीकडे बर्‍याच लांब थांबलेली...तिथून हमाल करून आमची वरात निघाली लिफ्टच्या दिशेने. लिफ्टला ही मारूतीच्या शेपटीसारखी रांग लागली होती...त्यात आम्हीही सामील झालो.

आधी तिकिट काढावे लागते....ही माहीती आम्हाला रांगेतच कळली...मग आमच्यापैकी एकाने जाऊन ती तिकिटं आणली.ह्या लिफ्टचेही दोन टप्पे आहेत. एका लिफ्टमधून काही अंतर जायचे....मग एका अधांतरी पण व्यवस्थित छप्पर आणि कठडे असलेल्या लाकडी रस्त्याने दुसर्‍या लिफ्टपर्यंत जायचे आणि तिने अजून वर जायचे. ज्यांना हे माहीत होते(बहुधा स्थानिक लोक असावेत) ते भरभरा दुसर्‍या लिफ्टच्या दिशेने धावत सुटले...आम्ही मात्र...कुठे आणि कसं जायचं ह्या संभ्रमात त्या घोळक्यात वाहवले जात होतो. त्यात मध्येच वीज जात होती...लिफ्ट बंद होत होती...सगळीकडे अंधारच अंधार व्हायचा...बराच वेळ ताटकळत बसावं लागलं... पुन्हा वीज यायची....काही झालेच नाही असे दाखवून पुन्हा सगळा व्यवहार पूर्ववत होत होता....आम्ही वर पोचेपर्यंत किमान चार वेळा वीज गेली होती...विद्युत जनित्र(जनरेटर) वगैरेची काही व्यवस्था नसावी असे जाणवले.असो.

शेवटी एकदाचे वर पोचलो...अगदी खरंच..समोरच हॉटेल होतं....त्यांचा स्वागत कक्ष मात्र सातव्या मजल्यावर...इथेही लिफ्टपर्यंत पोचण्यासाठी एक मजला पायर्‍या चढून जावं लागलं. :)
हॉटेलच्या लिफ्टने एकदाचे स्वागत कक्षात पोचलो...खोल्या ताब्यात घेतल्या....तोवर सूर्यास्त केव्हाच होऊन गेलेला...एक चांगली संधी हुकली...छायाचित्रणाची. ;)

२ टिप्पण्या:

SUDHIR KANDALKAR सुधीर कांदळकर म्हणाले...

व्व्व्व्व्वा! एकदम झक्कास! आता मलाही जावं लागणार तिथे.

प्रमोद देव म्हणाले...

खरंच जा कांदळकरसाहेब आणि तुमच्या दृष्टीकोनातूनही जरा त्यावर प्रकाश टाका.