माझ्या आयुष्यातील आजवरच्या कडू-गोड आठवणी मी "पूर्वानुभव" म्हणून सादर करत आहे.
आपण इथे आल्याबद्दल मन:पूर्वक धन्यवाद!

१५ ऑगस्ट, २००७

आठवणी! शालेय जीवनातल्या! ८... १५ऑगस्ट १९५८

१९५८ च्या १५ऑगस्टचा स्वातंत्र्यदिन! त्याच्या शालेय आयुष्यातील पहिलाच! मालाड मधील समस्त शाळेच्या मुलांना मालाडमधीलच एका नामांकित शाळेच्या मैदानावर जमायचे होते. विद्यार्थ्यांच्या नेण्या-आणण्याची जबाबदारी ज्याच्या त्याच्या पालकांवर सोपवण्यात आलेली होती. तोही आपल्या वडिलांबरोबर मैदानावर येऊन दाखल झाला. तिथे वर्गशिक्षिका चाफेकर बाईंकडे त्याला सोपवून त्याचे वडील काही कामानिमित्त निघून गेले. कार्यक्रम कधी संपू शकेल ह्याची पूर्वकल्पना माहीत करून घेऊन त्यावेळी आपण उपस्थित राहू असे आश्वासन जाताना त्यांनी त्याला आणि बाईंना दिले. आपल्या शाळकरी सवंगड्यात तो मिसळला आणि समारंभ सुरू होण्याची वाट पाहू लागला.

सरतेशेवटी समारंभ सुरू झाला. प्रमुख पाहुण्यांचे आगमन झाले. त्यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. मग त्या डौलदारपणे फडकणाऱ्या झेंड्याला सामुदायिकपणे वंदन करून झाले. राष्ट्रगीत झाले. मोठ्या वर्गातील स्काउटच्या मुलामुलींनी सामुदायिकपणे संचलन सादर केले. त्यांनी ध्वजाला प्रणाम केला आणि मग पाहुण्यांना मानवंदना दिली. देशभक्तिपर गीते आणि स्फूर्तिदायक गीतांचे गायन सादर करताना मुलांबरोबर शिक्षक आणि पाहुणेही भारावून गेले. मग पाहुण्यांनी मार्गदर्शनपर चार शब्द सांगितले आणि तो रंगलेला कार्यक्रम संपन्न झाला. त्यानंतर मुलांना पेढे वाटले गेले.

त्याच्या शालेय आयुष्यातील(इयत्ता १ली) तो पहिलाच स्वातंत्र्यदिन असल्यामुळे तोही इतरांसारखाच भारावून गेला होता. कधी एकदा घरी जातो आणि हे सगळे आई-वडिलांना सांगतो असे त्याला झाले होते. ज्यांचे पालक हजर होते ते आपापल्या मुलांना घेऊन जाऊ लागले. एकेक करत आपली मित्रमंडळी घरी जाताहेत हे पाहून त्यालाही त्याच्या वडिलांची तीव्रतेने आठवण व्हायला लागली. होता होता शेवटी मैदान रिकामे झाले आणि तो चाफेकर बाईंचा हात घट्ट धरून (घाबरला होता)आपल्या बाबांच्या वाटेकडे डोळे लावून बसला होता. आता त्याला ते वाट बघणे असह्य व्हायला लागले आणि त्याने रडायला सुरुवात केली. आधी हळूहळू स्फुंदत मग त्याने चांगलाच 'आ'कार लावला. त्याच्या ह्या रडण्याने बाईदेखील भांबावून गेल्या. त्यांनी त्याच्या त्या 'आ' केलेल्या तोंडात एक पेढा टाकला. पेढा चावण्याच्या निमित्ताने त्याचे रडणे क्षणभर थांबले आणि पेढा संपल्यावर पुन्हा सुरू झाले. बाईंना काय करावे काही सुचेना. त्यांना त्याचे घरही माहीत नव्हते आणि त्यालाही ते कुठे आहे हे नीट सांगता येत नव्हते. त्या त्याची समजूत घालायचा आणि रडणे थांबवण्याचा प्रयत्न करत होत्या. त्याने आ वासला की बाई तोंडात पेढा भरवत होत्या. तो तेवढा वेळ गप्प की मग पुन्हा रडगाणे सुरू करी. बाईंच्या हातातील पेढ्याच्या खोक्यातले पेढे संपत आले तरी त्याचे रडणे थांबत नव्हते. बाईदेखील रडकुंडीला आल्या. त्याला ओरडावे असे बाईंना क्षणभर वाटून गेले पण त्या गोंडस (खरेच तेव्हा तो तसा होता!  खोटं नाही सांगत. हवं तर हरितात्यांना विचारा!!) मुलाला ओरडणे त्या आई इतक्याच प्रेमळ बाईंना शक्यच नव्हते. आता ह्याला कसे आवरायचे हे काही त्यांना कळेना.पण त्यांचे नशीब थोर म्हणून दूरून घाईघाईत येणारे त्याचे वडील त्यांना दिसले आणि एकदाची त्यांची ह्या गंभीर प्रसंगातून सुटका झाली.

वडिलांनी जवळ येताच उशीर झाल्याबद्दल बाईंची क्षमा मागितली आणि मग आपल्या मुलाने दिलेल्या त्रासाबद्दल पुन्हा एकदा क्षमा मागितली. इतका वेळ रडकुंडीला आलेल्या बाई आता सावरल्या होत्या. त्यांनी उलट त्याचे कौतुकच सांगायला सुरुवात केली. तो कसा रडत होता; मध्ये मध्ये पेढा भरवल्यावर कसा गप्प व्हायचा आणि मग पुन्हा कसा रडे सुरू करायचा, आणि रडतानादेखील किती गोड दिसत होता वगैरे वगैरे. आधीच सर्व मुलांच्या आवडत्या असलेल्या बाई त्या तसल्या अवस्थेतही त्याला अधिक आवडून गेल्या. बाईंकडे पाहून त्याने एक स्मितहास्य केले आणि त्यांचा निरोप घेऊन आपल्या बाबांचा हात धरून तोंडाची टकळी चालवत, उड्या मारत मारत तो मार्गस्थ झाला.

मित्रहो आपण ओळखले असेलच त्याला! मग मी कशाला सांगू त्याचे नाव!

क्रमश:

1 टिप्पणी:

कोहम म्हणाले...

wah wah....hya veli ithe pahilyanda vachala lekh.....tyamule commentahi ithech...chaan..