माझ्या आयुष्यातील आजवरच्या कडू-गोड आठवणी मी "पूर्वानुभव" म्हणून सादर करत आहे.
आपण इथे आल्याबद्दल मन:पूर्वक धन्यवाद!

८ मे, २०१०

पुन्हा एकदा..मुक्काम पोस्ट नवी दिल्ली! भाग ६

अशुभस्य कालहरणम्‌...असं कुणीसं म्हटलंय...त्यानुसार मी माझे दिल्लीतले दिवस काढत होतो. सोमवार ते शुक्रवार तसे बरे जात होते कारण दिवसभर कार्यालयात इतर सहकार्‍यांबरोबर गप्पा-टप्पांमध्ये वेळ त्यामानाने बरा जायचा...मी काम तर करतच नव्हतो...दिल्लीत आल्यापासून मी कामाला अजिबात हात लावलेला नव्हता....आणि नायरसाहेबांच्या आदेशाप्रमाणे...काम करावे/न करावे हे सर्वस्वी माझ्या इच्छेवर सोपवलेलं होतं.... त्यामुळे इतर साहेबलोक माझ्या भानगडीत पडत नसत....काम न करता वेळ कसा घालवायचा? हा एक प्रश्नच होता...पण तोही मी सोडवलेला होता...कार्यालयात काही कुणी सदैव काम करत नसतात...आणि त्यातून सरकारी कार्यालयात तर मान मोडून काम करणारे (पूर्वीच्या)माझ्यासारखे एकूण कमीच लोक असतात.
एकेकाळचा अत्यंत कामसू माणूस असा माझा लौकिक होता....आणि आता निव्वळ रिकामटेकडा...
त्यामुळे माझ्यासारखे रिकामटेकडे/अर्धरिकामटेकडे लोक असायचेच...त्यांच्याशी गप्पा मारण्यात माझा वेळ जायचा. संध्याकाळी कार्यालय बंद झाल्यावर मग कधीकधी कार्यालयातच बुद्धीबळाचा डाव मांडून बसायचो...माझ्यासारखेच एकटे राहणारे....घरादाराकडे कुणी वाट पाहणारे नसलेले ...आपले आजचे काम संपलंय तरी घरी जाण्यात फारसे रस नसलेले काही शिलेदार असायचे...त्यांच्यात एकदोन जण मला तुल्यबल असे प्रतिस्पर्धी सापडले आणि मग कैक वेळा रात्री दहा-दहा वाजेपर्यंत आमच्या लढती चालायच्या...कधी ते जिंकत...कधी मी जिंकत असे....पण जिंकण्या-हरण्याचा मुद्दा सोडला तर...त्यामुळे माझे मन कुठेतरी तेवढा वेळ गुंतून राहात असे हे माझ्यासाठी महत्वाचे होते.

त्या काळात माझी मेव्हणी मटेनिलि,मुंबईमध्ये दूरध्वनी केंद्रात कामाला होती...योगायोगाने ती त्याच कालात मालाड दूध्व केंद्रात रुजू झाली होती...त्यामुळे अधूनमधून एखाद्या संध्याकाळी ती माझ्या पत्नीला तिच्या कार्यालयातून माझ्याशी बोलण्याची सोय करून द्यायची....त्यावेळी आम्ही एकमेकांशी काय बोलायचो?...खरंच,काय सांगू? नवविवाहित पण विरहाने झुरणारे दोन जीव काय वेगळं बोलू शकणार...तुम्ही कल्पना करू शकाल...पण सौचा वेळ जास्त करून रडण्यात आणि माझा तिची समजूत घालण्यात जात असे...मी स्वत: कितीही परिस्थितीने गांजलेलो असलो तरी त्याची क्षिती न बाळगता समोरच्या व्यक्तीला त्याची फारशी जाणीव होऊ देता नये....अशा तर्‍हेने तिची समजूत काढत असे...अर्थात वेगळ्या नजरेने पाहिले तर ती मीच माझी काढलेली समजूत असायची....असे म्हटल्यास वावगे ठरू नये.

शनिवार-रविवार अक्षरश: खायला उठायचे....मग मी उगाच दिशाहिन भरकटत बसायचो. बाहेर जातांना नेहमी माझ्याबरोबर एक शबनम पिशवी असायची....त्यात अगदी लहान-सहान पण वेळप्रसंगी उपयोगी पडतील अशा वस्तू असायच्या....मेणबत्ती-काड्यापेटी,सुईदोरा-कात्री,छोटासा चाकू,चष्मा,विजेरी आणि काही जुजबी औषधी गोळ्या....त्या काळात दिल्लीत वीज-भारनियमन चालायचे...एकूणच दिल्ली,दिल्लीच्या वस्त्या आणि रस्ते मला अनोळखी...त्यामुळे वेळप्रसंगी उपयोगी पडावी म्हणून विजेरी, मेणबत्ती-काड्यापेटी वगैरे होती.
माझ्या डोळ्यांचा नंबर खूप जास्त होता त्यामुळे मी नेत्रस्पर्षी भिंगं(कॉनटॅक्ट लेन्सेस)वापरायचो....पण दिल्लीत धूळ भरपूर होती त्यामुळे कैक वेळा ती डोळ्यात जाऊन नेभिं खुपायला लागायची....अशा वेळी ती काढून चष्मा वापरावा लागायचा...म्हणून चष्माही सदैव बरोबर असायचा.

असाच एका शनिवारी घराबाहेर पडलो...बाहेर पडतांना नेहमीप्रमाणे शबनम पिशवी खांद्यावर लटकवायला विसरलो...खरं तर कसा विसरलो तेच आठवत नाही...कारण त्या काळात मी कुठेही बाहेर जातांना शबनम खांद्यावर अडकवली जाणं...ही जणू प्रतिक्षिप्त क्रियाच झाली होती....पण तरीही त्यादिवशी खरंच विसरलो...
त्या दिवशी दिल्लीच्या बसने दिल्लीदर्शन करण्याचे ठरवले आणि मग मनात येईल तसे फिरत राहिलो...शनिवार-रविवारी..दिल्लीच्या बसमधून(डीटीसी) हवा तितका प्रवास एकरकमी तिकिट काढून करता यायचा. मी ते तसे तिकिट काढून हवा तसा...हवा तिथे जात होतो. दिल्लीतले कैक प्रसिद्ध/अप्रसिद्ध भागही पाहिले. हे सगळं करता करता संध्याकाळ झाली...हळूहळू काळोखही झाला....मी माझ्या निवासी स्थानापासून बराच दूर होतो...आणि अचानक एक जबरदस्त वार्‍याचा झोत आला....माझ्या डोळ्यात काहीतरी हललं....आणि मला सभोवतालचं ते सारं विश्वं एकदम अपरिचित वाटायला लागलं....आजूबाजूचा काळोख वाढला....आत्तापर्यंत दिसणारी माणसं,वस्तू वगैरे सगळं धूसर दिसायला लागलं.... डोळ्यातले नेभिं जागेवरून हललं होतं ह्याची तत्काल जाणीव झाली आणि हात आपोआप डोळ्याकडे वळले. डोळा बंद करून नेभिं जागेवर आणण्याचे सगळे प्रयत्न विफल ठरले....आणि मग लक्षात आलं की नेभिं...डोळ्यात नाहीच आहे...ते वार्‍याने कुठेतरी बाहेर उडाले....मग अंगावर चाचपडून पाहिले...जिथे जिथे हात जाईल तिथे बसच्या सीटवर, सीटच्या खाली...चाचपडणे सुरु झाले....माझ्या आजूबाजूला असलेल्यांच्या प्रतिक्रिया मला दिसणे शक्यच नव्हते...पण मी कल्पना नक्कीच करू शकत होतो....इतक्या वेळ नीट,व्यवस्थित बसलेल्या ह्या माणसाला झालं तरी काय? असे भाव त्याक्षणी नक्कीच त्यांच्या चेहर्‍यावर असावेत.

बरं, कुणाला काही सांगावं तर...हे नेभिं काय प्रकार आहे...हे समजावूनही कुणाला कळेना....मी आपला आंधळ्यासारखा....अहो आंधळाच म्हणा....निव्वळ चाचपडत होतो....बसमधल्या दिव्यांचा प्रकाशही अतिशय क्षीण वाटत होता...शेवटी एकदाची बस...शेवटच्या थांब्यावर जाऊन थांबली..सगळे लोक उतरून गेले...मी फक्त बसून होतो...काय करायचं ह्याचा विचार करत. इतक्यात चालक -वाहक दिवे बंद करून चालते झाले.
काय करावं मला कळेना....मी ओरडून  दिवा लावा ,दिवा लावा असे म्हटले पण ते कुणाच्याही कानी गेले नाही.  मी पुन्हा अंदाजाने आधी स्वत:चे कपडे, टीशर्टाचा वरचा खिसा वगैरे तपासून पाहात होतो...कुठे नेभिं चिकटून राहिलेले सापडतंय का? पण नाही...स्वत:वरच वैतागलो....नेमकी आजच शबनम विसरायची चूक कशी केली आपण? आता परत कसे जाणार निवासाकडे?

जिथे दोन पावलांवरचे मला स्पष्ट दिसत नव्हते तिथे मी घरी कसा पोचणार होतो? रस्त्यावरचे ते भगभगीत दिवे मला एखाद्या पसरट प्रकाशासारखे दिसत होते...समोरून येणार्‍या वाहनांचे प्रखर दिवे मला पार आंधळे करून टाकत होते...मी त्याच बसने परतण्याचा निर्णय घेतला...पण मला जिथे जायचे होते तिकडची ही बस नव्हती....म्हणजे मला आता दुसरी बस पकडणे क्रमप्राप्तच होते....कसाबसा बसमधून खाली उतरलो....कुठे जावे...कसे जावे काहीच कळत नव्हते... आजूबाजूला असणार्‍या व्यक्तींपैकी पूरूष कोण,स्त्री कोण हे ही कळत नव्हते....तरीही मी आसपास असणार्‍या एकदोघांना मला मदत करायची विनंती केली...सुदैवाने एकाने मला हाताला धरून एका बसथांब्याजवळ नेऊन उभे केले आणि इथे येणारी बस...ही माझ्या इच्छितस्थळी पोचवणारी असेल असे सांगितले...

दिल्लीतल्या बसेस कधीच थांब्यावर थांबत नाहीत...त्या एकतर थांब्याच्या बर्‍याच पुढे जाऊन थांबतात अथवा अजिबात न थांबता फक्त थांब्याच्या आसपास कमी वेगाने धावतात...त्यात आपण आपल्याला लोटून द्यायचे असते...पण आता माझ्यासारख्या आंधळ्याला हे कसे जमणार? माझ्या नशिबाने तो बस सुटण्याचा सुरुवातीचा थांबा होता...त्यामुळे मी त्यात व्यवस्थित चढू शकलो...अमूक ठिकाण आलं की मला सांगा असे वाहकाला सांगून त्याच्या जवळच्या जागेवर बसलो.

इतकं सगळं होऊनही मी निवांत नव्हतो...मनात एकच धाकधूक...हा माणूस सांगेल ना आपल्याला,  आपला थांबा आल्यावर....त्यामुळे डोळे फाडफाडून बाहेर पाहात होतो....बाहेर काय दिसणार म्हणा....सगळीकडे एकच चित्र....एखाद्या कॅनव्हासवर नुसतेच रंग ओतल्यावर दिसतं तस आकारहीन...अस्पष्ट असं...
सगळंच सारखं दिसत असल्यामुळे असेल कदाचित...अरे, किती वेळ लागतोय? अजून कसा  नाही आला माझा थांबा...अधीर मन क्षणाक्षणाला अजून अधीर होत होते आणि त्या नादातच कसा बसा हेलपाटत एका थांब्यावर उतरलो.

रात्र फार झाली होती अशातला भाग नाही...पण एकूणच दिल्लीत पादचारी...रस्त्याने चालणारा माणूस अशा अवेळी दिसणं कठीणच. त्यात नुकतीच थंडी सुरु झालेली...त्यामुळेही सगळं कसं चिडीचूप होतं....रस्त्यावरून  धावणारी वाहनंही तुरळक होती पण जी होती ती भरधाव वेगाने धावणारी होती....मला रस्ता ओलांडायचा होता...दूरून येणारे वाहन...नेमके किती दूर आहे तेही कळत नव्हते...कुणाची मदत घ्यावी तर दूरदूरपर्यंत चिटपाखरूही नव्हते...फक्त रस्त्यावरचे प्रखर प्रकाश ओकणारे दिवे तेच काय ते माझ्या साथीला होते...पण तो प्रकाशही असा नुसता...विस्कटलेला,उसवलेला वाटत होता...डोळ्यासमोर कोणतेही रेखीव आकार दिसतच नव्हते...सगळेच असरट-पसरट...अशा अवस्थेत रस्ता ओलांडण्याचा कैक वेळेला केलेला प्रयत्न आयत्या वेळी उगवणार्‍या एखाच्या चुकार भरधाव वाहनाने अयशस्वी होत होता...एकदोन वेळा गाडी अंगावर येता येताही वाचलो...वर चालकाच्या भरपूर शिव्याही खाल्ल्या... हो, नाही..करता करता कसाबसा रस्त्याच्या दुसर्‍या बाजूला पोचलो....चाचपडत , खुरड्त, हेलपाटत कसाबसा घराचा शोध घेत होतो...दिल्लीत घरंही एकाच पद्धतीने बांधलेली...एकाच पद्धतीने रंगवलेली....अर्थात हे रंग वगैरेही मला दिसत नव्हते...आणि त्या इमारतीवर अगदी मोठ्या आकड्यात लिहिलेले क्रमांकही दिसत नव्हते...त्यामुळे माझे निवासस्थान शोधणे म्हणजे गवताच्या गंजीतून सुई शोधण्याइतके कठीण झाले होते....

त्या इतक्या मोठ्या वसाहतीत कुणीही घराबाहेर दिसत नव्हतं...त्यामुळे विचारायचं तरी कुणाला आणि सांगायचं तरी कुणाला? त्या संपूर्ण वसहतीला माझ्या चारपाच फेर्‍या तरी मारून झाल्या असतील....कुणी मला त्या अवस्थेत पाहिले असेलच तर त्यांना, कुणी तरी चोर ठेहळणी करण्यासाठी आला असावा...असेही वाटू शकले असेल. पण माझा शोध काही संपता संपत नव्हता....एखाद्या दारूड्याप्रमाणे मी हेलपाटत, भेलकांडत घराचा शोध घेत होतो...तुम्हा कुणाला अनुभव आहे की नाही माहित नाही पण माझा असा अनुभव आहे की दृष्टी अधू झाली की आपले चालणेही आपोआप बेताल होते...आपल्या पायांवरही आपलं नियंत्रण राहात नाही.

नटसम्राटमधल्या अप्पासाहेब बेलवलकारांच्याहीपेक्षा जास्त आर्ततेने मी मनातल्या मनात म्हणत होतो...अरे कुणी घर दाखवता का घर...मी जिथे राहतो ते घर.
अशीच घरघर लागलेली असतांना शेवटी मी थकलो...पायातलं त्राणही संपलं होतं....एका इमारती समोरच्या गवतावर बसलो...बसत्याचा आडवा झालो...आणि आकाशातले तारे पाहता पाहता कधी डोळा लागला ते कळलंच नाही.

मला गदगदा हलवून कुणी तरी उठवत होतं...अरे देव, इथे कशाला झोपलास? चल खोलीत चल आणि झोप...असं काहीसं ऐकू येत होतं...हळूहळू मी भानावर आलो आणि पाहिले तो रामदास मला उठवत होता...योगायोगाने मी आमच्याच इमारतीसमोरच्या गवतावर झोपलो होतो. मी झटकन रामदासचा हात धरला आणि त्याच्या बरोबर वर गेलो...सर्वात आधी माझा चष्मा डोळ्याला लावला आणि...हुश्श...माणसात आलो.

मी खोलीवर पोचलो तेव्हा साडेअकरा वाजले होते....नेहमी साधारणपणे ९च्या आसपास घरी पोचणार्‍या मला इतका वेळ का लागला म्हणून सिब आणि रामदास दोघेही चिंतेत पडले होते....पण ते तरी मला कुठे शोधणार होते?  दोघेही आलटून पालटून घरातल्या घरात येरझारा घालत सर्व शक्याशक्यतेचा विचार करत होते...सहजपणाने सिब सज्जात आला आणि त्याने गवतावर कुणी माणूस सदृष्य आकृती पाहिली....रामदासलाही त्याने ती  दाखवली...म्हणून उत्सुकतेपोटी रामदासने खाली येऊन पाहिले तो काय....मीच होतो तो!

आधी दोघांची काळजीपोटी/प्रेमापोटी  बोलणी खाऊन घेतली...मग त्यांना झाला प्रकार सांगितला....त्यावर त्यांच्याकडेही काहीच उत्तर नव्हते....कारण आलेली बिकट परिस्थिती ही अचानक आलेली होती....बरं त्यावेळी दूरधनीचं प्रस्थही इतकं माजलं नव्हतं...की पावलापावलावर दूध्व करण्याची सोय असावी...दुसरी गोष्ट म्हणजे तशी सोय असती तरी मी कुणाला करणार होतो दूध्व? सिबकडे  नव्हता दूध्व...मग ? अशा परिस्थितीत मी तरी वेगळं काय बरं करू शकलो असतो?

८ टिप्पण्या:

सचिन उथळे-पाटील म्हणाले...

काका, बाका प्रसंग आला होता कि हो तुमच्यावर.
असो निभावालात शेवटी देव आहात तुम्ही.
-
SACHIN PATIL

Mahendra म्हणाले...

लिहिलं पण किती ओघवतं आहे तुम्ही- अगदी तुमच्या बरोबर ते नेभी शोधत होतो मी पण. :)

प्रमोद देव म्हणाले...

सचिन...खरंच प्रसंग बांका होता...पण निभावलो...माझ्याबरोबर नेहमीच कुणाच्या तरी सदिच्छा असतातच...त्यामुळे अशा प्रसंगातूनही मी सहीसलामत बाहेर पडत असतो.
प्रतिसादाबद्दल...आपलं सदिच्छेबद्दल धन्यवाद.

प्रमोद देव म्हणाले...

महेन्द्रजी, अहो तुम्हालाही नाही सापडलं ना ते नेभिं...बघा ना! :)
नेभिं डोळ्यातून निसटण्याचे प्रकार त्या आधी एकदोनदा झाले होते...पण बंदिस्त जागेत...त्यामुळे ते लगेच सापडले होते इतरांच्या मदतीने...पण इथे ते वार्‍याच्या झोताबरोबर कुठे तरी उडून गेले असावे.
प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद.

शांतीसुधा (Shantisudha) म्हणाले...

कसला प्रसंग आला होता देका तुमच्यावर. मस्तच कथन केलायत प्रसंग. खरंय मी पण तुमच्या बरोबर बस मध्ये चाचपडत होते :-)

प्रमोद देव म्हणाले...

अपर्णा...त्या बसमधल्या काही लोकांनी देखिल तसेच चाचपडून घेतले....कारण त्यांना नेभिं काय असतें हे शेवटपर्यंत समजलंच नाही...ते आपले चष्माच समजत होते. ;)

Maithili म्हणाले...

Baap rre... kaka.. kharech bikat prasang ki ho...

प्रमोद देव म्हणाले...

होय मैथिली..खरंच प्रसंग बिकट होता...
पण पार पडलो सुखरूप...त्यातूनही.