माझ्या आयुष्यातील आजवरच्या कडू-गोड आठवणी मी "पूर्वानुभव" म्हणून सादर करत आहे.
आपण इथे आल्याबद्दल मन:पूर्वक धन्यवाद!

१८ ऑक्टोबर, २००९

प्राक्तन!

प्राक्तन! शब्द जरा जडच आहे नाही. पण तरीही बहुतेकांच्या तोंडातून तो कधी ना कधी उमटतोच.आपटे गुरुजींचं आयुष्य पाहिलं की लक्षात येतं की ...हे प्राक्तन वगैरे नक्कीच खरं असावं. आता हे आपटे गुरुजी कुठून आणले? सांगतो. अगदी व्यवस्थितपणे सांगतो.

ज्या शाळेत माझं माध्यमिक... म्हणजे इयत्ता ५वी ते ११वी असं शिक्षण झालं त्या शाळेच्या काही संस्थापकांपैकी ते एक होते. होते म्हणजे...आता हयात नाहीत. मरेपर्यंत ध्यास एकाच गोष्टीचा होता...शिकवणं आणि शहाणं करून सोडणं. वागण्यात अतिशय शिस्तशीर आणि स्वभावाने तितकेच कडक. क्वचित प्रसंगी माफक विनोद आणि स्मितहास्य. एरवी चेहरा करारी आणि उग्र. आमच्या शाळेचे ते सर्वात पहिले मुख्याध्यापक होते. कधी धोतर सदरा आणि टोपी तर कधी शर्टपॅंट...मात्र हे सगळं जाड्याभरड्या खादीचे असायचे. २६ जानेवारी आणि १५ऑगस्टच्या दिवशी मात्र खास खादीचा सूट असायचा. उभं राहणं देखिल अगदी ताठ. शुक्रवारचा ’मास ड्रील’चा तास कधी मधी ते घेत...तेव्हा ’एडी मिलाव’ आणि ’कदम खोल’ हे त्यांचे शब्द ते ज्या आवाजात उच्चारत..त्याला जवाब नव्हता.बोलणं वागणं अगदी हुकुमशहासारखं होतं. एरवी हिंदी,समाजशास्त्र असेही काही विषय ते वरच्या वर्गांना शिकवत.

ह्यांचा मुलगा...दोन मुलींच्या पाठीवर मोठ्या नवस-सायासाने झालेला असल्यामुळे त्याच्या पायात एक चांदीचा वाळा घातलेला होता.पोरगं तसं लाडावलेलंच होतं म्हणा. हा मुलगा माझ्यापेक्षा एखाद-दोन वर्षाने मोठा होता आणि अंगापींडाने देखिल मजबूत होता. मात्र डोक्याने जरा कमीच होता. १ली ते चौथी माझ्याप्रमाणेच तो नगरपालिकेच्या शाळेत जायचा...तेव्हा आमच्या ह्या(माध्यमिक) शाळेच्या एका शिपायाच्या कडेवर बसून यायचा-जायचा. हे त्या दोघांचे येणे-जाणेही ’प्रक्षणीय’ होतं.
हा शिपाई लहानखोर अंगाचा आणि डोळ्याने चकणा होता....मात्र मनाने तितकाच निर्मळ आणि आज्ञाधारक होता. त्या लहान चणीच्या शिपायाच्या कडेवर ते पायात चांदीचा वाळा आणि डोळ्यात भरमसाठ काजळ(की काजळात डोळा) घातलेलं ’भलं थोरलं मूल’ पाहिलं की असं वाटायचं.....एखाद्या लहान मुलाने मोठ्या भावाला कडेवर घेतलं असावं. ;) पाचवीपासून मग तो त्याच शिपायाबरोबर त्याचा हात धरून आणि दप्तर शिपायाच्या गळ्यात टाकून शाळेत यायचा आणि पुन्हा घरी जायचा.
हा मुलगा जेमतेम ११वी पास झाला...तोही एकदोनदा गोते खाऊनच. ह्यालाच म्हणतात प्राक्तन....आपटे गुरुजींसारख्या शिक्षण-महर्षींच्या पदरी असा करंटा पुत्र...तोही नवसाने जन्मावा...दुसरं काय म्हणायचं? गुरुजींची बायको सदा आजारी..त्यामूळे त्या आघाडीवरही आनंदी-आनंदच होता. त्यांची मोठी मुलगी देखिल डोक्याने अधूच निघाली. बाकी इतर विषयात...संसारोपयोगी गोष्टीत त्या मानाने बरी होती. आईच्या सततच्या आजारपणामुळे तिलाच सगळं सांभाळावं लागलं आणि पुढे तिचं लग्नच नाही झालं.
त्यानंतरची दुसरी मुलगी जेमतेम ११वी झाली. तिचंही लग्न नाही झालं.

पुढे काही कारणावरून शाळेच्या संचालक आणि संस्थापकांमध्ये मतभेद निर्माण झाले...त्याची परिणती म्हणून आपटे गुरूजींना शाळा सोडावी लागली. पण ते स्वस्थ बसले नाहीत. त्यांनी लटपट खटपट करून दुसरी एक शाळा स्थापन केली आणि त्यात आपल्या धाकट्या मुलीला शिक्षिका म्हणून नेमले. आणखी काही वर्षांनी मुलालाही त्याच संस्थेत कारकून म्हणून नेमले. पण पहिल्या शाळेसारखी(माझी शाळा) ही दुसरी शाळा मात्र ते नावारुपाला नाही आणू शकले.

आज गुरुजी हयात नाहीत. त्यांची ती मोठी मुलगी देखिल आता वृद्धत्वाने वाकलेली आहे. अंगावरची वस्त्रं देखिल अतिशय मलीन असतात.मधल्या मुलीबद्दल फारशी माहिती नाही. मुलगा अजूनही अंगाने तसाच आडदांड आहे पण आता नाही म्हटले तरी वृद्धत्वाने तोही वाकलाय...तशात लग्न झालेलं नाही... बाकी परिस्थिती एकूण बेतास बात अशीच आहे. कसंबसं जीवन जगताहेत. काय म्हणावे ह्या परिस्थितीला?

ज्याने असंख्य उत्तमोत्तम विद्यार्थी घडवले....त्या हाडाच्या शिक्षकाची पुढची पिढी अशी निपजावी ना? जीवनात ऐहिक यश,सुख म्हणतात त्याचा लवलेशही ह्या शिक्षकाच्या संपूर्ण हयातीतच नव्हे तर त्याच्या पुढच्या पीढीतही नसावा...ह्याला काय म्हणावे?
प्राक्तन...दुसरे काय?

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: