माझ्या आयुष्यातील आजवरच्या कडू-गोड आठवणी मी "पूर्वानुभव" म्हणून सादर करत आहे.
आपण इथे आल्याबद्दल मन:पूर्वक धन्यवाद!

२ ऑक्टोबर, २००७

आठवणी!शालेय जीवनातल्या!१२

बेडकी प्रकरण घडल्यानंतर असाच एक प्रकार आमच्या वर्गात घडला.आम्हाला विज्ञान शिकवायला केळकर नावाचे सर होते. अंगपिंडाने मजबूत, गोरे पान,तुळतुळीत टक्कल ,पोटाचा नगारा(तुंदिलतनु) असे त्यांचे दृष्यरूप होते. ह्यामुळेच की काय शाळेतली टारगट मुले त्यांचा उल्लेख 'बाप्पा' म्हणून करीत.(एक सोंड लावली असती तर खरेच बाप्पा म्हणून शोभले असते.)

विषय शिकवण्यात सरांचा हातखंडा होता. एरवी गंभीर असणारे सर प्रसंगी विनोदही करीत.कधी कधी रागावत तेव्हा पट्ट्यांचा प्रसादही देत. पण एकूण खूप चांगले आणि विद्यार्थीप्रिय असे शिक्षक होते केळकर सर.
मी त्यांचा लाडका विद्यार्थी होतो. शिकवताना नेहमी मला विचारत "काय देवबाप्पा? समजतेय ना?"
मी होय म्हटले की त्यांचे समाधान होई.

एकदा सर शिकवत असताना फळ्यावर आकृती काढण्यासाठी वर्गाला पाठमोरे उभे होते. मुले दिसेल तशी ती आकृती वहीत उतरवून घेत होती. तेव्हढ्यात कुणीतरी "बाप्पा" असे ओरडले. मला वाटले की मलाच कुणीतरी हाक मारतंय म्हणून मी उभा राहून मागे पाहू लागलो; पण सगळे खाली माना घालून आकृती उतरवण्यात मग्न होते. सरांनीही एकदा मागे वळून पाहिले आणि पुन्हा ते आकृती काढण्यात मग्न झाले. सर मला देखील बाप्पाच म्हणत आणि शाळेतील टारगट मुले सरांना बाप्पा म्हणतात हेही त्यांना माहित होते. त्यामुळे ह्या बाप्पा हाकेचे त्यांना विशेष असे काहीच वाटले नाही.

सरांची पाठ पुन्हा आमच्याकडे झाल्यावर पुन्हा कुणीतरी " ए बाप्पा" असे ओरडले. ह्यावेळी मात्र सर चटकन वळले आणि जोरात ओरडले "कोण रे तो?कोण बोलतोय बाप्पा?प्रसाद हवाय का?"
पण मुले खाली माना घालून आकृती उतरवून घेताहेत हे पाहिल्यावर त्यांनी पुन्हा आपला मोर्चा फळ्याकडे वळवला.त्यांची पाठ वळताच पुन्हा कुणी तरी ओरडले "ए बाप्पा,टकल्या"!
इथे सरांची खात्रीच झाली की हे त्यांनाच उद्देशून कुणीतरी बोलले होते. आवाज मागच्या बाकांकडून आला होता हेही त्यांनी हेरले. एक क्षणभर त्यांनी वर्गावरून नजर फिरवली आणि ताड ताड चालत ते सर्वात शेवटच्या बाकाजवळ गेले.

त्या बाकावर दोन मुले बसत होती. एकाचे आडनाव होते वैद्य. मुलगा तसा वयाने मोठाच होता. अंगाने हडकुळा पण उंचीला सहा फूट तरी असावा;मात्र अतिशय गरीब स्वभावाचा. त्याच्या तोंडावरची माशी देखिल उडत नसे. त्याच्या बाजुलाच बसणारा दुसरा म्हणजे सखाराम साळवी. उंची जेमतेम पाच फूट. पण छाती ३६" ते ३८" असावी. हा मुलगाही नापास होत होत आमच्या वर्गात आलेला. शाळेच्या कबड्डी संघाचा कप्तान होता तो,शरीरसौष्टवपटु होता आणि मुख्य म्हणजे 'दादा'(गुंड) होता. खिशात नेहमी चाकू असायचा. भाषा अशुद्ध असायची. मात्र आम्हा वर्गमित्रांशी अतिशय प्रेमाने वागायचा.माझे तर त्याला विशेष कौतुक वाटायचे. "तू काय मस्त संकृत(संस्कृत) बोलतो रे(पक्षी:गीतापठण).आपल्याला ह्या जन्मी तरी येनार न्हाय.आपल्याला अभिमान हाय तुजा की तू आपला दोस्त हायेस"!

तर सर अशा त्या दुकलीजवळ पोचले. आम्हाला वाटले आता वैद्यची काय खैर नाही. सर त्याला निष्कारण मारणार. कारण तो बिचारा कधीच तोंड उघडत नसे. आणि सखारामला हात लावणे हे सरांनाच काय सरांच्या बापालाही जमणे शक्य नव्हते ह्याबद्दल तर खात्रीच होती. त्या दोघांपैकी कुणीही तो आवाज काढलेला नव्हता हेही नक्की होते . पण सरांचा पक्का समज झालेला होता. सर तिथे पोचताच दोघेही उठून उभे राहिले. एक क्षणभर सरांनी दोघांचे निरीक्षण केले आणि... काडकन् एकाच्या कानाखाली खेचली.क्षणभर आमचा आमच्या नजरेवर विश्वासही बसला नाही;पण सरांनी चक्क सखारामच्या कानाखाली 'बाप्पा' काढला होता. बाप रे! केव्हढे हे धारिष्ठ्य?

तेवढ्यात मधल्या सुटीची घंटा झाली आणि सर निघून गेले . सगळेजण सखारामकडे धावले. आम्हाला एकच भीती होती की आता सरांची काय खैर नाही. शाळा सुटल्यावर सखाराम त्यांना आपला इंगा दाखवणार. आम्ही ते पाहायला एकीकडे उत्सुक होतो आणि दुसरीकडे काळजीतही पडलो होतो.
मी सखाराम जवळ जाऊन त्याला म्हटले, " तू आवाज काढला नाहीस आणि काढणार नाहीस ह्याची मला खात्री आहे आणि वैद्यची तर हिंमतच नाहीये. मग असे असताना आणि तुझ्यात शक्ती असताना तू निमूटपणे सरांचा मार का खाल्लास? तू त्यांचा हात का धरला नाहीस? उलटून का मारले नाहीस त्यांना"?माझ्यासारखाच प्रश्न सगळ्यांना पडलेला होता.आता ह्यावर सखाराम काय बोलतो ते ऐकायला आम्ही अधीर झालो होतो.
पण सखाराम शांतच होता.तितक्याच संयत स्वरात तो म्हणाला....ह्ये बग देवा. नीट आईक. कसे बी झाले तरी ते आपले सर हाईत.आपल्याला न्यान देतात.प्रेम करतात आपल्यावर. मंग त्येनला रागवाय्चा आन शिक्षा करायचाबी आधिकार हाय.(हा मी सखारामचा नवीनच अवतार पाहात होतो.)

अरे पण तू काहीही केले नसताना त्यांनी शिक्षा केली ना तुला? मग उगाच गप्प का बसतोस?चांगला धरून हाण त्यांना आणि त्या बेडकीला पण.(माझा जुना राग उफाळून आला होता.मनात म्हटले होऊन जाऊ दे एका फटक्यात दोन्ही कामं!)

मारलं तर मारू दे! एवड्याश्या माराने मला काय बी धाड भरनार नाय. अरे बाबा विचार कर. ज्याने आवाज केला त्याने जर सरांच्या हातचा फटका खाल्ला आसता तर पानी बी मागितलं नसतं. लई जोरात मारलं बग. आपून म्हनून सहन केलं.त्यो वाचला ह्ये काय कमी हाय काय?

मग तू त्यांना मारणार नाहीस? तुझ्या अपमानाचा बदला घेणार नाहीस? हे तुझं काही तरीच!

अरे बाबा आईक माजं! मी ताकत कमावलेय ती अशी गुर्जींना मारायला न्हाय. त्येंचे केवडे उपकार हायेत आपल्या सगल्यावर! आसे गुर्जी नसते तर मी आज निसता रस्त्यावर मारामाऱ्या करत बसलो असतो.त्येंनी शिकवून आपल्याला एवडे मोठे केले मग त्येंना कसे मारनार! माझा बाप बी मला मारतो.मंग आता सांग,मी त्येला बी मारू काय?अंगातल्या ताक्तीचा उपेग आपल्याच मानसांना मारायला केला तर पाप लागंल माझ्या राजा!(हा तर चक्क पाप-पुण्ण्याच्या गोष्टी करत होता.हे सगळे माझ्यासाठी नवे होते.)

सखाराम पुढेही असेच काही बोलत होता आणि मी मात्र मनातल्या मनात खजील होत होतो. अंगात इतकी शक्ती असताना सखाराम त्याचा वापर सरांवर करायला तयार नव्हता. का? तर ते आपल्याला ज्ञान देतात म्हणून. आणि मी? मी बदला घेण्याच्या गोष्टी करतोय.इतकेच नाही तर स्वत:ला जमत नाही म्हणून त्याला प्रवृत्त करतोय. छी:! माझी मलाच लाज वाटायला लागली आणि सखारामचे ते नवे रूप बघून माझा त्याच्याबद्दलचा आदर दुणावला.

खाली मान घालून मी आपल्या जागेवर येऊन बसलो.
"उथळ पाण्याला खळखळाट फार " ह्या म्हणीचा अर्थ आज मला नव्याने समजला होता.

क्रमश:

३ टिप्पण्या:

अनामित म्हणाले...

Another gem from you Pramod Kaka.

Sakharam must have a great mother & ajji to instill this kind of understanding. Hats off to them & to you to remember so many details of your early life. How do you do that?

I consider myself an ideal candidate for dimentia. I got to write down few things now if I have to remember it by your age. ;-)

Cheers
Sahaj

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे म्हणाले...

bशालेय जीवनातल्या आठवणी छान आहेत आणि वाचतांना मजा येते !

अनामित म्हणाले...

Atyanand rav,
Please visit my blog, I have tagged you for 'Avadatya pustakatale utare'.
www.anukulkarni.blogspot.com
-Anu