माझ्या आयुष्यातील आजवरच्या कडू-गोड आठवणी मी "पूर्वानुभव" म्हणून सादर करत आहे.
आपण इथे आल्याबद्दल मन:पूर्वक धन्यवाद!

२७ मार्च, २००८

सातत्याचा विक्रम!

मंडळी आज गुरुवार! दत्ताचा वार!
चक्रावलात ना! माझ्यासारख्या नास्तिक(आडनावाने देव आहे म्हणून काय झाले.... नाव सोनुबाई.... ही म्हण उगीच नाही केली आपल्या पूर्वजांनी) माणसाकडून हे असले काही ऐकले की सूर्य आज पश्चिमेला तर नाही ना उगवला.. असे वाटायचे तुम्हाला. मी हे असले काही बोललो म्हणून तुमच्या भुवया उंचावलेल्या दिसताहेत. पण थांबा. नाही! अहो, मला काहीच झालेलं नाहीये. मी अगदी व्यवस्थित आहे. मग? मी असा का बोलतोय? जाणून घ्यायचंय? बरं तर ऐका!

काय आहे, की मी आज सकाळी लवकर उठलो.
आता लवकर उठलात! त्यात काय विशेष? असते एकेकाला अशी सवय!
अहो पण मी काय म्हणतोय ते ऐकून तर घ्या ना! असा मध्ये मध्ये हाल्ट करू नका बॉ! उगाच विसरायला होते. हां! तर आज गुरुवार! मी सकाळी लवकर उठलो.
च्या मारी(काय ती घ्या म्हणतो एकदाची)! तुमची तबकडी अजून तिथेच अडकलेय की! काय ते एकदा सांगून टाका ना. कशाला उगाच नमनालाच वाटीभर(कोण म्हणाला तो घडाभर? )तेल फुकट घालवताय?
बरर्र्! सांगतो. आता एकदम विषयालाच हात घालतो.

आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरील 'मुंबई ब'(आता 'अस्मिता) ह्या वाहिनीवरून रोज सकाळी मंगलप्रभात हा कार्यक्रम सादर होत असतो. ह्या कार्यक्रमात भक्तिगीते सादर होत असतात. साधारणपणे ज्या देवाचा वार(उदा. सोमवार=शंकर,मंगळवार=गणपती...वगैरे वगैरे) असेल त्या देवाची गाणी लावण्याची प्रथा सुरुवातीपासूनच चालत आलेली आहे आणि ती इमाने-इतबारे पाळली देखिल जाते. तर आज गुरुवार म्हणून दत्ताची गाणी लावणे हेही साहजिकच आहे म्हणा. तर तशी ती लावली गेली होती. पण प्रत्येक वारी त्या त्या देवांची गाणी लागणे आणि गुरुवारी दत्ताची गाणी लागणे ह्याचे खास असे वैशिष्ठ्य आहे. एरवी जी इतर देवांची गाणी लागतात ती गाणारी कलाकार मंडळी हवी तेव्हढी आहेत. गानकोकिळा लताबाईं,आशा भोसले,भीमसेन जोशी,सुधीर फडके अशां सारख्या दिग्गजांपासून ते आता नव्यानेच उदयाला येणार्‍या अनेक गायक-गायिकांकडून आपण ही गाणी सदैव ऐकतच असतो. पण दत्ताची गाणी गाण्याचा जणू काही मक्ता एखाद्याच व्यक्तीकडे असावा.... आहे असे म्हणा हवे तर अशा तर्‍हेने चटकन ओठावर येणारे नाव म्हणजे "रघुनाथ उर्फ आर.एन्.पराडकर" हेच होय. ह्याचा अर्थ इतर कुणी दत्ताची गायलेली नाहीत किंवा गात नाहीत काय? गातात की! नाही कोण म्हणतंय! मग "आर्.एन." ह्यांचेच नाव मी का घेतो?
त्याला कारण आहे ते म्हणजे गेली कैक वर्षे.....५० हून जास्त वर्षे अखंडपणे दर गुरुवारी आर.एन. ह्यांची ही दत्तगीते सादर होत असतात आणि हा एक विक्रम आहे असे म्हटले तर ती अतिशयोक्ती होणार नाही.

माझ्या बालवयापासून मी ही दत्त-भक्तिगीते ऐकत आलेलो आहे. साधी सोपी रचना,प्रासादिक शब्द असे ह्या गीतांचे स्वरूप आहे. अतिशय सुस्पष्ट शब्द,सुगम अशा चाली आणि मधुर आणि आवाजात फारसे चढउतार नसलेल्या पद्धतीने पराडकरांनी ही गीते गायलेली आहेत. इतक्या वर्षांनंतरही त्या गाण्यांची गोडी अवीट आहे. इथे दत्त+पराडकर+आकाशवाणी असे त्रिकुट बनलेले आहे . आजही ते अतूट आहे आणि येणारी अनेक वर्षे हे अबाधित राहील ह्या बद्दल माझ्या मनात शंका नाही.

विसु: मी (स्वतःचा सोडून)कोणत्याही देवाचा भक्त नाही हेलक्षात असू द्या. संगीतालाच (मुलगी नव्हे. उगाच विचित्र नजरेने पाहू नका)मी देव मानतो.

1 टिप्पणी:

मोरपीस म्हणाले...

मला पण आकाशवाणीवरील कार्यक्रम फ़ार आवडतात