माझ्या आयुष्यातील आजवरच्या कडू-गोड आठवणी मी "पूर्वानुभव" म्हणून सादर करत आहे.
आपण इथे आल्याबद्दल मन:पूर्वक धन्यवाद!

१९ नोव्हेंबर, २००७

मु.पो.अहमदाबाद!६

खोलीवर परत आलो.माझी शबनम पिशवी घेतली (जिच्यात आणीबाणीच्या प्रसंगी उपयोगी पडतील अशा काही गोष्टी मी नेहमी बाळगत असे. जसे की चश्मा.खरे तर डोळ्य़ात नेत्रस्पर्षी भिंगे असत पण कधी धुळीचा त्रास होऊन ती भिंगे काढावी लागत आणि अशा वेळी चश्मा उपयोगी पडत असे.त्याबरोबरच विजेरी,सुईदोरा,कात्री,चाकू,एक निऑन टेस्टर,काड्यापेटी आणि मेणबत्ती अशी सगळी वेळप्रसंगी उपयोगी पडणारी सामग्री माझ्या ह्या शबनम पिशवीत असे) आणि पुन्हा रस्त्यावर आलो.समोरच कालूपूर बसडेपो होता तिथे गेलो.डेपोमध्ये भरपूर बस होत्या पण चालक-वाहकांचा कुठेही पत्ता नव्हता. ह्याचा अर्थ बस चालणार नव्हत्या हे नक्की झाले.मग आता काय करायचे. तिथून पुन्हा स्टेशनवर आलो.तिथेही बरेच लोक रिक्षा,टॅक्सी नसल्यामुळे ताटकळत बसल्याचे दिसले.म्हणजे एकूण सर्व वाहतूक व्यवस्था बंद होती हेही नक्की झाले.

मी आपले एका पोलिसाला विचारले की सॅटेलाईटला मला जायचे आहे तर कसे जाता येईल? त्याने एकदा मला आपादमस्तक न्याहाळले आणि म्हणाला, "तमे अंया नवा छो केम?तमने खबर नथी के आजे बंद छे?"
मी म्हटले, " एम तो हूं मुंबईना छूं अने अंया सरकारी काम माटे आवेला छूं! मने खबर तो छे के आजे बंद छे पण मारे जाऊज जोईये केमके हूं ड्युटी उपर छूं आने मारी हाजरी बहू जरूरी छे!"
मुंबईचा आणि त्यातून सरकारी माणूस म्हटल्यावर त्याचा आवाज जरा सौम्य झाला.पण तरीही "सॅटेलाईट अंयाथी बहू दूर छे. तमे कोई पण वाहन वगर त्यां नथी जई शकाय" असे त्याने ठासून सांगितले.
मग दूसरा काही मार्ग असल्यास सांग असे म्हटल्यावर त्याने मला सांगितले की "तमे काई पण करीने (म्हणजे पायीच की) लाल दरवाजा(एका विभागाचे नाव) पोचशो तो कदाच त्यांथी तमने एसटी मळशे. एनी पण गेरंटी नथी. पण मारी वात सांबळो, आजे माहोल बहू खराब छे. होई शके तो तमे अंयाच रेवो".
त्याचा सल्ला ऐकून माझा सगळाच उत्साह मावळला. तरीही बघूया तरी तो लाल दरवाजा किती दूर आहे ते. नाहीतरी इथे बसून वेळ कसा जाणार म्हणून मी त्या पोलिसाचा निरोप घेऊन पुन्हा रेल्वे स्टेशनच्या बाहेर पडलो.

रस्त्यावर आलो तेव्हा अतिशय तुरळक अशी वर्दळ दिसत होती. एखाद दूसरा माणूस आपल्याच नादात स्टेशनच्या दिशेने जाणारा दिसत होता. अशाच एकाला मी लाल दरवाजा इथून किती दूर आहे असे विचारल्यावर "बहू दूर छे" इतकेच उत्तर देऊन चटकन पसार झाला. आता विचारायचे तरी कोणाला? जाऊ दे! पाय नेतील तिथे जाऊ. कदाचित त्यातच सापडेल. लाल दरवाजा दिवसा उजेडी सापडायला काय हरकत आहे असा विनोदी विचारही माझ्या मनात आला. लांबूनच त्याचा लाल रंग दिसेलच की. उगीच कशाला कुणाला भाव द्या असा विचार करून मी चालायला लागलो.

माझ्या एकूण विक्षिप्त दिसण्यामुळे आणि दिशाहीन भरकटण्यामुळे नाही म्हटले तरी मी रस्त्यातल्या लोकांच्या डोळ्यात चांगलाच खूपत असलो पाहिजे असे मला जाणवले. कारण माझ्याकडे ते अगदी टक लावून बघत असायचे. माझी आणि त्यांची नजरानजर झाली की नजर चोरायचे पण मग पुन्हा हळूच वळून बघायचा प्रयत्न करायचे. ह्या सगळ्या गोष्टीमुळे मलाही त्यात गंमत वाटू लागली. अर्थात त्यांच्या नजरेचा अर्थ काय असावा हे मला माहित नव्हते पण आपल्याकडे कुणीतरी बघतंय म्हणजे आपण कुणीतरी खास आहोत असे मला उगीचच वाटायला लागले.ह्या भरात मी कितीतरी अंतर पार केले होते. आता उन चढायला लागले होते आणि चालून चालून थकायला झाले होते. कुठे तरी चहा-पाणी मिळाले तर बरे होईल असे मनात म्हणत होतो पण सगळी दुकाने बंद दिसत होती. नाईलाज म्हणून चालतच होतो. कुठे जात होतो ते माहित नव्हते पण जायचे कुठे ते मात्र पक्के डोक्यात होते.

तास दोन तासांची पायपीट झाली होती. मी पार थकलो होतो.कोरड्या हवेमुळे घाम येत नव्हता पण आता अंग भाजायला लागले होते आणि पिण्याचे पाणी कुठे मिळेल असेही वाटत नव्हते.सुदैवाने तिथे एक छोटीशी बाग दिसली तीही जवळपास रिकामी होती. काही घर नसलेली माणसे,भिकारी वगैरे कुठे कुठे बाकांवर झोपलेले दिसत होते. मी बागेत हळूच प्रवेश केला आणि एकदा सभोवार नजर टाकली. मला हवी असलेली गोष्ट एका कोपर्‍यात दिसली आणि मी खूश झालो.पाण्याचा नळ दिसत होता आणि चक्क त्या नळातून थेंब थेंब पाणी ठिबकत होते. आधी जाऊन हातपाय धुतले आणि आधाशासारखा पाणी प्यायलो. तेवढ्यानेही खूप बरं वाटलं. मग एका झाडाच्या सावलीत जाऊन निवांतपणे बसलो.पाचदहा मिनिटे अशीच गेली आणि माझ्या लक्षात आले की मी इथे आल्यापासनं माझ्यावर बरेच डोळे खिळलेले आहेत ह्या गोष्टीची जाणीव झाली. जेव्हा त्यातल्याच काहींशी माझी नजरानजर झाली तेव्हा का कुणास ठाऊक मला किंचित भिती वाटली. इथे आपण सुरक्षित नाही असेही वाटले आणि इथे थांबण्यात काहीही अर्थ नाही असे माझ्या मनाने ठरवले. मी तसाच उठून झपाझप चालत त्या बागेच्या बाहेर आलो आणि जणू काही फार मोठ्या संकटातून सुटलो असे समजून एक दीर्घ सुस्कारा सोडला.

आता मी कुठे येऊन पोचलोय?इथून लाल दरवाजा अजून किती दूर आहे आणि रेल्वे स्टेशन किती मागे राहिले ? ह्या कशाचाच पत्ता लागेना. मुंबई शहर कसे लांबलचक आहे. रेल्वेने केलेले दोन भाग; एक पुर्व आणि पश्चिम. बहुतेक रस्ते हे समांतर असल्यामुळे कोणत्याही रस्त्याने गेलात तरी फारशी चुकामुक होत नाही . तर त्याच्या उलट हे शहर. गोल गोल फिरवणारे. थोडासा कोन चुकला की पार भलत्याच दिशेला पोचवणारा रस्ता. अशा अवस्थेतही मी चालतच होतो आणि अचानक एका खूप मोठ्या चौरस्त्यावर मी येऊन पोचलो. आता आली का पंचाईत! कोणत्या रस्त्याने जायचे? आता कुणाला तरी विचारायला हवे हे नक्की. मग तिथूनच जाणार्‍या एकाला मी लाल दरवाजा कुठे आहे म्हणून मी विचारले तर अतिशय विचित्र नजरेने त्याने माझ्याकडे पाहिले आणि तो चक्क पळत सुटला.मला कळेचना! हा काय प्रकार आहे? पण कोण सांगणार? होतंच कोण त्याचे स्पष्टीकरण द्यायला!

पुन्हा पायपीट सुरु झाली आणि मी त्या चौरस्त्यातला एक रस्ता पकडला आणि चालू लागलो.चालता चालता तोंडातून चक्क गाणे फुटायला लागले "एकटेच येणे येथे,एकटेच जाणे। एकट्याच जीवाचे हे,एकटेच गाणे॥"
माझ्या नादात चालत असतानाच मला अचानक जाणवले की मी हमरस्ता सोडून एका वेगळ्याच रस्त्याला लागलोय.ह्या रस्याच्या दोन्ही बाजूला बरीच गर्दी आहे. बरेच लोक बंद दुकानांच्या पायर्‍यांवर बसून आपापसात काही तरी कुजबुजत आहेत.आपोआप माझे गाणे बंद पडले आणि मला वस्तुस्थितीची कल्पना आली.मी चक्क मुसलमानांच्या मोहल्ल्यात शिरलो होतो. बाहेरचा असा मी त्या रस्त्यावरून एकटाच आपल्या नादात चाललो होतो.तो रस्ता कुठे जाणार आहे हे मला माहित नव्हते आणि इतकी सगळी लोकं आजूबाजूला असतानाही त्यांना विचारण्याची हिंमत होत नव्हती. खरे तर मी मनातून टरकलोच होतो.अगदी आयता बकरा चालून आलाय असेच त्या सगळ्यांच्या मनात असावे असेही क्षणभर वाटून गेले.पण माझी बोकड दाढी आहे ना! ती बघून कदाचित ते मला त्यांच्यातलाच समजतीलही. अरे पण ते लोक फक्त दाढीच ठेवतात. मिशी कापलेली असते आणि माझी तर मिशी चांगली वाढलेली आहे.आता आपले काही खरे नाही. पिशवीत चाकू,कात्री आहे .अशा वातावरणात ही सामान्य शस्त्रे देखिल आपल्याबद्दल संशय निर्माण करू शकतील.तेव्हा चल हो मरणाला तयार! असे उलटसुलट विचार मनात येत होते पण मी त्याची प्रतिक्रिया चेहर्‍यावर दिसणार नाही असा आटोकाट प्रयत्न करत नाकासमोर चालत राहिलो.

रस्ता खूपच लांब होता. कुठेही वळलेला दिसत नव्हता की पुढे संपतोय असेही दिसत नव्हते. अजून असे किती चालायचे? माहित नव्हते.फक्त चालत राहाणे माझ्या हातात होते. चांगला मैलभर चाललो आणि शेवटी तो रस्ता संपलाय असे दिसले. आता आली की पंचाईत? इतका वेळ मला कुणी काही केले नाही. आता पुन्हा त्याच रस्त्याने त्यांच्या समोरून परत जायचे. त्यांच्या नजरा झेलत,चुकवत जायचे म्हणजे आपले काही खरे नाही आज!"ते खरे आहे रे! पण असे हातपाय गाळून काही होणार आहे काय? आल्या प्रसंगाला तोंड द्यायलाच हवे. तुलाच खाज होती ना पायी जाण्याची मग भोग आपल्या कर्माची फळे." एक मन दुसर्‍या मनाला सांगत होते.पण दूसरे मन बजावत होते "सदैव सैनिका पुढेच जायचे,न मागुती तुवा कधी फिरायचे॥" मग काय? चला.तुका म्हणे "उगी रहावे,जे जे होईल ते ते पहावे॥
अशा प्रसंगी मी कितीही घाबरलेला असलो तरी कसे कुणास ठाऊक पण अचानक धैर्य गोळा होते असा माझा नेहमीचा अनुभव आहे.म्हणजे माझ्यातच एक घाबरट आणि एक धैर्यधर अशी दोन व्यक्तिमत्व वास करून आहेत असे म्हणता येईल. मी पुन्हा हिंमतवाला होतो आणि संकटाशी मुकाबला करायला तयार होतो. इथेही तसेच झाले. एका दृढ निश्चयाने मी त्या रस्त्यावरून पुन्हा त्या सर्व मियां लोकांच्या नजरा झेलत झेलत त्या मोठ्या चौरस्त्यापर्यंत आलो.मात्र एक गोष्ट नक्की की त्या लोकांपैकी कुणीही मला अडवण्याचा अथवा मी कोण आहे,इथे कशाला आलोय वगैरे चौकशी करण्यासाठी थांबवण्याचा यत्किंचितही प्रयत्न केलेला नव्हता. माझा मीच घाबरलो होतो आणि माझा मीच तिथून सुखरूप बाहेर आलो होतो. म्हणजे हा सगळा माझ्याच मनाचा खेळ होता. माझ्या एकूण अवतारावरून मी एखादा अवलिया असावा अथवा वाट चुकलेला वाटसरू असावा असेही त्यांना वाटले असेल. खरे काय ते कुणाला ठाऊक? पण त्या तशा परिस्थितीतून मी सहीसलामत बाहेर आलो होतो हे नक्की.

मी मोठ्या रस्त्याला लागलो आणि अचानक मला एक पोलिसांची गाडी दिसली.त्या पहिल्या पोलिसाला विचारल्यावर रस्त्यात ठिकठिकाणी दिसणार्‍या पोलिसांना मी उगाचच विचारत बसलो नव्हतो; पण आता मी जास्त विचार न करता त्या गाडीला हात दाखवला. ती गाडी माझ्याजवळ येऊन थांबली.त्या गाडीत इतर पोलिसांबरोबर एक इन्स्पेक्टरही होता.मी सद्या कुठे आहे आणि इथून लाल दरवाजा किती दूर आहे?असे विचारताच.. माझ्याकडे आश्चर्याने बघत तो इन्स्पेक्टर बोलला ते ऐकून मी हैराण झालो.
"लाल दरवाजा तर विरुद्ध दिशेला राहिलाय" !म्हणजे आत्तापर्यंत माझी जी काही पायपीट झाली होती ती सर्व दर्यापूर,खानपूर,शाहपूर वगैरे मुसलमान बहुल भागांतूनच झालेली होती हेही कळले आणि इतका वेळ अशा भागांतून फिरल्यानंतरही मला काहीच त्रास झाला नव्हता हे माझ्याकडून ऐकल्यावर त्यांच्या डोळ्यात मला अविश्वासाची भावना जाणवली.पण त्याच वेळी मी किती नशीबवान आहे हे देखिल त्यांनी बोलून दाखवले. माझ्या बोलण्यावरून त्यांच्या केव्हाच लक्षात आलेले होते की मी इथला स्थानिक नागरिक नाहीये म्हणून मग त्यांनी माझी कसून चौकशी केली. मी कोण,कुठला,कशासाठी इथे आलोय?
पोलिसांना समजेल अशा भाषेत मी माझी ओळख करून दिली,माझे ओळखपत्र दाखवले आणि मला कसेही करून सॅटेलाईटला पोचवा अशी विनंती केली.ओळखपत्रावरचा अशोकस्तंभ बघून लगेच इन्स्पेक्टरने मला त्याच्या बाजूला बसवून घेतले.तिथून त्यांनी मला शहराच्या बाहेर पोचवले.बंदचे आवाहन शहरापुरतेच असल्यामुळे शहराबाहेर सगळे व्यवहार सुरळितपणे सुरु होते. इथे पोलिसांनी मला एका रिक्शात बसवून दिले.मी पोलिसांचे आभार मानले आणि रिक्षा सॅटेलाईटकडे दौडू लागली.
मी घड्याळात पाहिले तो दूपारचा एक वाजला होता.म्हणजे सकाळी ८ वाजता सुरु झालेली माझी पायपीट जवळ जवळ ५ तास सुरु होती तर.
आणि.. कितीतरी तासांनी मी मोकळा श्वास घेतला.

समाप्त!

1 टिप्पणी:

vivek म्हणाले...

अहमदाबाद ५ व ६ दोन्ही वाचले. छानच वाटले. तुम्ही खरंच धैर्यधर. आमची तर "पिवळीच" झाली असती अशा प्रसंगी.

यापुढे कोणत्या शहराचा दौरा घडवताय आम्हाला. तुमची लेखणी आता बहरत चालली आहे हे तुमच्याही लक्शात यायला लागलंच असेल :-) घ्या मग काडीमोड "स्क्रू ड्रायव्हरशी" आणि करा घरोबा लेखणीशी