माझ्या आयुष्यातील आजवरच्या कडू-गोड आठवणी मी "पूर्वानुभव" म्हणून सादर करत आहे.
आपण इथे आल्याबद्दल मन:पूर्वक धन्यवाद!

२८ सप्टेंबर, २००७

स्वगत! २

ते मलाही माहित आहे. तू सांगायची काही जरूर नाही. आपले नेते नाही का नेहमी सांगतात की "देशासाठी त्याग करा"! पण स्वतः मात्र लाभाची पदे लाटण्यात अगदी पुढे असतात. ते बाबा-बुवा लोकही तसेच स्वतः मात्र ऐश्वर्यात लोळतात आणि लोकांना सांगतात सत्ता,संपत्तीचा मोह सोडा. संपत्ती दान करा(कुणाला? तर ह्यांना)! संसार करून कुणाचे भले झालेय(ह्यांचे अंग रगडून द्यायला मात्र ह्यांना सुंदर सुंदर स्त्रिया लागतात)? त्यापेक्षा आमच्या चरणावर लीन व्हा! आम्ही तुम्हाला सन्मार्ग दाखवतो.परमार्थ साधा भक्तानो आणि मुक्ती मिळवा.

हे बाकी तुझे पटले बरं का! मी सुद्धा विचार करतो कधी कधी "बाबा" बनण्याचा! मागे माझा मित्र दादा मला म्हणाला होता की "तू बाबा हो. मी तुझा चेला बनतो आणि तुफान प्रसिद्धी करतो".

अरे पण बाबा बनणे हे काही येरागबाळ्याचे काम नाही. त्यासाठी काहि गोष्टींचा दांडगा अभ्यास लागतो. पहिले म्हणजे लोकांना आकर्षित करेल अशी बोलबच्चनगिरी करता आली पाहिजे. झालंच तर चमत्काराच्या नावाखाली काही हातचलाखीचे प्रकारही करता आले पाहिजेत. तुझ्याकडे काय आहे? कधी आरशात पाहिले आहेस का आपले मुखकमल(थोबाडच म्हणणार होतो;पण जाऊ दे काही झाले तरी आपला मराठी माणूस आहेस म्हणून सोडून देतो)?

माझे पराक्रम ऐकायचेत? अरे एकापेक्षा एक असे चमत्कार केलेत मी. तू आपली झूकझूक गाडी कधी थांबवू शकतोस? अरे हट! तुला जमणार नाही. त्याला माझ्यासारखा पॉवरबाज माणुस पाहिजे.

काय तरी फेकू नकोस. कधी आणि कशी थांबवलीस तू गाडी? काय ते स्पष्ट बोल. उगाच तोंडची वाफ फुकट घालवू नकोस. काय समजले?

अस्सं! तर मग ऐक! मी आणि माझा एक मित्र अंत्या(अनंत) चर्चगेटहून घरी यायला निघालो. अंत्याला पालघरला जायचे होते आणि मी मालाडला जाणार होतो. साहजिकच मी बोरिवली लोकलची वाट पाहात होतो आणि अंत्या विरार लोकलची. आधी विरार लोकल फलाटावर आली. अंत्याने चपळाईने त्यात शिरकाव करुन खिडकीजवळची जागा पटकावली. त्याची गाडी गेल्यानंतर त्याच फलाटावर माझी गाडी येणार होती म्हणून मी त्याच्याशी गप्पा मारत उभा राहिलो. खरे तर अंत्याने माझ्याबरोबर बोरिवली लोकलने यावे आणि मग पुढे गाडी बदलून जावे असे वाटत होते म्हणून मी त्याला सारखे सांगत होतो की "अंत्या! लेका ही गाडी आज रद्द होणार आहे. आता बघ ही गाडी यार्डात जाईल. तू उतर आणि माझ्या बरोबर चल. पण एक नाही आणि दोन नाही. बराच वेळ झाला. गाडीची निघण्याची वेळही टळून ५ मिनिटे झाली(लोकलच्या वेळापत्रकात पाच मिनिटे म्हणजे पाच तासांसारखी वाटतात) तरी गाडी हलायचे लक्षण दिसेना आणि मी पुन्हःपुन्हा त्याला सांगतोय की "अरे बाबा अंत्या उतर ह्या गाडीतून! ही गाडी इथून हल्याची नाय"!माझे हे बोलणे इतर लोकही ऐकत होते. त्यापैकी काही लोकांनी रेल्वेला आणि मला शिव्या द्यायला सुरुवात केली. शेवटी अंत्या कंटाळून डब्याच्या बाहेर पडला आणि उद्घोषणा झाली , "तीन नंबरकी विरार जानेवाली गाडी कुछ तकनिकी खराबीके कारण यार्डमे(भाडमे!) जायेगी!"
मी आणि अंत्या तिथून दूर पळालो. लोक मला शोधायला लागले. कुठे आहे तो काळतोंड्या म्हणून.तेव्हा, समजली माझी पावर! अरे असे अजून किती तरी चिमित्कार आहेत. मी सांगता सांगता आणि तू ऐकता ऐकता आपण दोघेही थकून जाऊ. आता बोल आहे की नाही बाबा बनायची पावर?

हॅ! हे तर "कावळा बसायला आणि फांदी मोडायला एक गाठ" अशा प्रकारचे आहे. अजून काही असेल तर बोल!

सांगतो . अजून एक किस्सा सांगतो पण वाईच दम खाऊ दे!

क्रमश:

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: