माझ्या आयुष्यातील आजवरच्या कडू-गोड आठवणी मी "पूर्वानुभव" म्हणून सादर करत आहे.
आपण इथे आल्याबद्दल मन:पूर्वक धन्यवाद!

१६ फेब्रुवारी, २०१९

पुन्हा एकदा...वजन कमी केले आणि पोटाचा घेरही...


२१ डिसेंबर २०१८ ते आजपर्यंत, वजन  ७२किलोवरून ६६.८० किलोपर्यंत घटवलंय....आणि पोटाचा घेरही कमी केलाय...तरीही अजून संघर्ष जारी आहे....

गेली तीन-चार वर्ष व्यायामशाळेत जाऊन व्यायाम करणं बंद झालेलं...कारण होतं गोठलेला खांदा...शुद्ध मराठीत त्याला फ्रोजन शोल्डर असं काहीसं म्हणतात. तसा घरी मी व्यायाम करत नव्हतो असं नाही पण तो फारच जुजबी स्वरूपातला होता. त्यामुळे साहजिकच वजन आणि पोटाचा घेर वाढत गेला. ६६ किलोवरून वजन ७२ च्या वर सरकलं आणि पोटही नेहमीच्या पॅंटमध्ये मावेना...साहजिकच दोन नव्या पॅंट घ्याव्या लागल्या.

वजन वाढल्याचं फार काही वाटलं नाही कारण ते कमी करणे फारसे कठीण नाही हे मी स्वानुभवाने जाणतो. मात्र वाढलेलं पोट कमी करणे हे मात्र भलतंच कठीण आणि किचकट काम आहे...पोट हा सगळ्यात हट्टी अवयव आहे हे मी खात्रीपूर्वक सांगू शकतो आणि म्हणूनच काळजी वाटायला लागली. आहार नियंत्रण मुख्य आणि नियमित मध्यम प्रतीचा व्यायाम केल्याने वजन आटोक्यात राहू शकते-कमी होऊ शकते हा अनुभव पदरी आहे म्हणूनच तसा निश्चिंत होतो पण पोटाचं काय करायचं ह्याबद्दल गंभीरपणे विचार करायला लागलो...पोटाचे असे खास व्यायाम अाहेत आणि मी ते करायला सुरूवातही केली. महाजालावरही  काही नवीन प्रकार सापडले...तेही रोजच्या व्यायामात सामील केले..दोन-तीन महिने हे सगळे निष्ठेने केले...पण पोटाचा घेर जैसे थे. मग पुन्हा विचारचक्र सुरू झालं...रोजच्या खाण्याची आणि शारिरीक हालचालीची खानेसुमारी सुरू केली.

खाणं तर माझं खूपच मर्यादित आहे. मी गेली काही वर्ष फक्त एकवेळच जेवतोय. तेही मोजकंच... बाकी दिवसभरात दोन वेळा चहा किंवा काॅफी, दुपारच्या चहासोबत थोडं अबर-चबर (चिवडा, खाकरा, शेव-गाठ्या वगैरेपैकी एखादा पदार्थ) आणि रात्री एक कप दूध. कधीतरी अचानक शेजारून काही अालंच तर तेही खात असे. माझं जेवण पाहून माझे मित्र मला नेहमी हसत असतात, काळजीही करतात...मी उगाच मन मारतोय असं समजतात...पण मी त्यांना दाद देत नाही.
  तरीही खाण्यातले ते अबर-चबर पदार्थ आणि शेजारून आयत्या वेळी येणारे पदार्थ पूर्णपणे वर्ज्य करायचं ठरवलं..शेजाऱ्यांनाही सांगून टाकलं...आता काही पाठवू नका...मी डायेट करतोय म्हणून. त्यांनी ते हसण्यावारी नेलं आणि पदार्थ पाठवणं थांबवलं नाही. पण मी ते स्वीकारणंच बंद केलं...मग त्यांचा नाईलाज झाला आणि त्यांनी आयत्या वेळी पदार्थ पाठवणं बंद केलं.  मी ठरवलं तसं  काटेकोरपणे पाळलं...त्याचा परिणाम म्हणून महिनाभरात वजन किलो-दीड किलोने खाली आलं पण अजूनही पोटोबा काही दाद देत नव्हते...

पुन्हा विचार करायला लागलो...आता खाणं तर कमी करणं शक्यच नव्हतं म्हणून मग ठरवलं की आता शारिरीक मेहनत जास्त करायची. पण प्रश्न असा उभा राहिला की नेमकं काय करायचं? पुन्हा व्यायामशाळेत जायचं?
नको...आता पुन्हा खांदा दुखवायला नको. त्यापेक्षा आपण रोजचं चालणं वाढवुया. पण त्यातही भरपूर व्यत्यय येतात. रस्त्यात कुणी भेटलं  की आपण चालणं विसरून गप्पांत रमतो. अरे मग करायचं तरी काय ?

ठरलं एकदाचं...चालायचं/धावायचं...बाहेर/घरातल्या घरात...जिथे जसे जमेल तसे, जमेल तेवढे...नंतर हळूहळू वाढवत न्यायचं. हं, तरीही एक प्रश्न उरतोय...किती चाललो/धावलो ह्याची नोंद कशी ठेवायची ?
तोही प्रश्न सुटला...पावलं मोजणारं एक अॅप (स्टेप काऊंटर) उतरवून घेतलं मोबाईलवर आणि केली एकदाची सुरूवात चालण्या/धावण्याची.  घरात धावायचं आणि बाहेर चालायचं....सुरूवातीला अंदाज नव्हता...आपण एका वेळी किती वेळ आणि किती पावलं चालू शकू?  म्हणून निश्चित असं काही उद्दिष्ट ठेवलं नाही...पण थकेपर्यंत चालायचं इतकंच मनाशी पक्कं केलं आणि केली सुरूवात...२१ डिसेंबर २०१८ रोजी...त्या दिवशी साधारण ५०००+  पाऊले/ ३ किलोमीटर  चाललो/धावलो...त्यानंतर हळूहळू अंतर वाढवत गेलो, पावलंही वाढत गेली...सरासरी १० ते १२हजार पावले / सात-साडेसात किलोमीटर पर्यंत आता मजल पोचलेली आहे... हा उपक्रम सुरू  केल्यापासून साधारण तीन आठवड्याने म्हणजेच जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यात लक्षात आलं की पॅंट खाली घसरायला लागलेय.  :)
जानेवारीच्या तिसऱ्या आठवड्याच्या शेवटी चक्क पट्टा आवळावा लागला आणि ऊत्सुकता म्हणून जुनी पॅंट चढवून पाहिली आणि थोडी ओढाताण करून तीही पोटावर चढली की हो ! त्यामूळे हुरूप वाढला आणि उपक्रम नेटाने जारी ठेवला...परिणामस्वरूप आज जुनी पॅंट सहजपणे पोटावर चढतेय. मेहेनत केल्याचे सार्थक झाले म्हणायचे, त्यामुळे आता हा उपक्रम शक्य होईल तोवर असाच जारी राहील हे सांगणे नलगे !

कुणीसं म्हणून ठेवलंय....केल्याने होत आहे, आधी केलेचि पाहिजे.
-समाप्त.

१३ जानेवारी, २०१८

चुकीचा पायंडा !

सर्वोच्च न्यायालयाच्या चार न्यायमूर्तींनी आपली व्यथा मांडण्यासाठी प्रसार माध्यमांसमोर येणं हा अतिशय चुकीचा पर्याय होता.  भारतीय न्यायव्यवस्थेवर नितांत विश्वास असलेला  एक सर्वसामान्य भारतीय नागरिक म्हणून मला हे मत व्यक्त करावंसं वाटतंय...  कोणत्याही तर्काने हे कृत्त्य योग्य आहे असे म्हणता येत नाही असं मला वाटतं. कोर्टाच्या कोणत्याही निर्णयावर किंवा वैयक्तिकपणे कोणत्याही न्याधीशांच्या हेतूविषयी शंका व्यक्त करणं म्हणजे  कोर्टाचा अवमान होतो असे सरसकटपणे मानलं जातं.  मग आता सरन्यायाधीशांबाबत ह्या चार न्यायाधीशांच्या जाहीर वक्तव्याबाबत तसं का मानता येणार नाही?

सरकारी कामाची पद्धत ही परंपरागत आहे आणि ती सगळीकडे सारखीच असते असं सामान्यपणे म्हटलं जातं. खात्याअंतर्गत कोणत्याही प्रकरणांची तड लावण्यासाठी ठरवून दिलेल्या पद्धतीनेच प्रयत्न करायचे असतात, त्यासाठी विशिष्ठ आणि नियमबद्ध मार्ग अवलंबणे ह्या गोष्टीला पर्याय नाही...कुणी ह्या मार्गाव्यतिरिक्त दुसरा कोणताही मार्ग अवलंबला तर तो शिस्तभंग होतो. त्या दृष्टिकोनातून पाहायचे झाल्यास सरन्यायाधीशांसोबत चर्चा करून, त्यांच्याकडे अर्ज करूनही जर ह्या न्याधीशांचे समाधान झाले नसेल तर त्यांना अजून एक मार्ग शिल्लक राहतोय आणि तो म्हणजे राष्ट्रपतींकडे दाद मागणे. भारतीय घटनेप्रमाणे राष्ट्रपती हेच सर्वोच्च पद आहे आणि सर्वोच्च न्यायालयातील सरन्यायाधीशांसह इतरही न्यायाधीश नेमण्याचा अधिकार त्यांचाच आहे. अशा परिस्थितीत ह्या चार न्यायाधीशांनी राष्ट्रपतींकडे दाद का मागितली नाही ह्याचे उत्तर त्यांना द्यावेच लागेल.

आता ह्या प्रकरणाकडे आपण जर राजकीय नजरेने पाहिले तर असे लक्षात येतंय की सत्ताधारी विरूद्ध विरोधी पक्ष ह्यांच्यातल्या वितुष्टाचा हा परिपाक आहे. सरन्यायाधीश हे भाजपला झुकते माप देत आहेत असे अप्रत्यक्षपणे सुचवत ही मंडळी त्यांच्या विरोधात बंड करून उठलेत. त्याच वेळी ह्या चौघांचे कॉंग्रेस, डावे वगैरेंशी असलेले छुपे संबंधही आता उघड होत आहेत. 

आपापल्या कार्यकालात सत्ताधारी पक्ष आपल्या धोरणाला अनुकूल ठरतील असे अधिकारी नेमतात...मोक्याच्या जागी असलेले  जुने अधिकारी निश्चितपणे बदलले जातात. ह्यात राजकीय सोय असतेच आणि शासनसुलभताही असतेच. ह्या गोष्टी सगळेच पक्ष करत असतात आणि त्यामुळे त्याबद्दल आक्षेपही घेता येत नाही किंवा तसा तो घेऊनही फारसा उपयोग होत नाही. ह्या गोष्टीचा चांगला आणि वाईट असा दोन्ही तर्‍हेचा परिणाम होत असतो. मोक्याच्या जागी नेमणूक व्हावी, सेवानिवृत्तीनंतरही काही तरी सत्तापद मिळावं ह्यासाठी काही अपवाद वगळता
ह्यातली बहुसंख्य माणसं सत्ताधार्‍यांच्या कलाने कारभार करत असतात. खरं तर हा गुण सर्वसाधारणपणे कमीजास्त प्रमाणात सगळ्यांच्यातच दिसून येतो...त्यात पक्षीय मतभेद करता येणार नाहीत.

म्हणूनच मला असं वाटतं की ह्या चार न्यायाधीशांनी आपल्या व्यथा जाहीरपणे माध्यमांसमोर मांडून अतिशय चुकीचा असा पायंडा पाडलेला आहे आणि त्यासाठी त्यांना शासन होणे नक्कीच गरजेचे आहे. आता कुणी म्हणेल की मग त्यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यांचे काय?  तर त्याचीही शहानिशा खुद्द राष्ट्रपतींनी करायला हवी आहे आणि त्यात जर सरन्यायाधीशांचे वर्तन चुकीचे वाटले तर त्यांना बरखास्त करून त्यांच्यावरही योग्य ती कायदेशीर कारवाई करायला हवी आहे...ह्या चार न्यायाधीशांच्या जाहीर आरोपांमुळे डळमळीत झालेला, भारतीय न्यायव्यवस्थेवरचा  विश्वास जर पुन्हा बळकट करायचा असेल तर व्यक्तीनिरपेक्ष, पदनिरपेक्ष अशा पद्धतीने ह्या प्रकरणात लक्ष घालून त्याचा तातडीने निकाल लावायला हवा आहे.

जे घडलं ते निश्चितच दूर्दैवी होतं  पण ह्यातूनही नक्कीच काहीतरी चांगलं निष्पन्न होईल असा माझा विश्वास आहे.

२३ जानेवारी, २०१७

दिव्य विद्यालय, जव्हार!


काल दिनांक २२जानेवारी २०१७रोजी पालघर जिल्ह्यातील जव्हार येथील श्री गुरुदेव बहुद्देशिय सामाजिक संस्था संचालित ’दिव्य विद्यालय’शाळेच्या दत्तक पालक मेळाव्याला हजर राहण्याचा योग आला.
तिथली काही छायाचित्र आणि दृष्यचित्र आपल्याला त्या संस्थेचं स्वरूप माहीत व्हावी ह्या दृष्टीने इथे सादर करत आहे.






दत्तक पालकांचे वाजत-गाजत स्वागत



थोडक्यात संस्थेचा परिचय


अंध विद्यार्थी आणि त्यांचे शिक्षक ह्यांनी सादर केलेले स्वागत गीत आणि एक भावगीत




विद्यार्थ्यांनी अतिशय सहजपणाने सादर केलेली कलाकुसर, नाट्य, संगीत आणि नृत्य पाहून असं वाटलंच नाही की त्यांच्यात काही कमी आहे/असावी. खरं तर कमी असलीच तर त्यांच्यांकडे पाहण्याची आपली दृष्टीच अधू असावी असंच मला वाटतं. ह्या सर्वाचे श्रेय मुख्याध्यापिका आणि संस्थापिका श्रीमती कोकडबाई आणि त्यांचे सहकारी शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी ह्या सगळ्यांनाच द्यायला हवंय. मुलांच्या अंगी असणारे अंगभूत गुण
शोधून त्यांना त्याबाबतीत प्रोत्साहन देऊन आणि त्यांच्याच कलाने वागून त्यांना शिक्षण देणं हे काम वाटतं तेवढं सोपे नाही...पण ह्या समस्त शिक्षक मंडळींचं कर्तृत्त्व  निश्चितच कौतुकास्पद आहे. त्यांना माझा सलाम.

आणि हे त्यांचे फेसबुक पेज
https://www.facebook.com/Divya-Vidyalaya-School-for-Blind-and-Mentally-Disabled-Children-611020559083391/?fref=ts


शाळा भेट संपल्यावर येता येता रस्त्यात एक स्थळ पाहिलं ते म्हणजे ’शिरपामाळ!’
शिवाजी महाराज सुरतेला जातांना वाटेत जिथे जव्हारचे राजे विक्रमशहा ह्यांनी शिवाजी महाराजांचा शिरपेच देऊन सत्कार केलेला ते स्थळ म्हणजे शिरपामाळ!  



३ ऑक्टोबर, २०१५

गांधीजयंतीच्या निमित्ताने...

मंडळी, काल गांधी जयंती झाली...त्यानिमित्ताने पुन्हा एकदा जे उलटसुलट अशा राजकीय विचारांचे वादळ ह्या जालीय जगात उठले ते सर्व पाहून कधी नव्हे ते खूपच अस्वस्थ झालो आणि त्यानंतर आत्मचिंतन करण्यास प्रवृत्त झालो....कधीकाळी मीही असाच, वाहवत जायचो.....पण हे योग्य नव्हे ह्याचे आता नक्कीच भान आलेले आहे.....तुम्हीही वाचा आणि विचार करा...


गांधीजी-सावरकर-आंबेडकर आणि अशाच मोठ्या लोकांकडून आपण जर काही शिकायचं असेल तर ते म्हणजे ह्या देशाबद्दलचं त्यांचे निस्सीम प्रेम...देश स्वतंत्र व्हावा म्हणून त्यांनी वेगवेगळे मार्ग जरी चोखाळले असले तरी त्यांचे उद्दिष्ट मात्र एकच होते..मला वाटतं, आज कुण्या एकाला नायक आणि इतरांना खलनायक बनवून आपण नेमकं हेच विसरून जातोय की हे जे स्वातंत्र्य,स्वराज्य आपल्याला त्यांच्या त्यागामुळे, लढ्यांमुळे आणि कष्टांमुळे मिळालंय त्याचा आपण अनादर करत आहोत...कोण श्रेष्ठ, कोण कनिष्ठ ह्या वादात न पडता, सगळेच आपल्यासाठी वंदनीय आहेत हे आपण लक्षात घ्यायला हवे आहे आणि आपल्याला मिळालेलं हे स्वराज्य, सुराज्य कसे करता येईल ह्याचा गांभीर्याने विचार करून त्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करायला हवेत....

नेता झाला तरी तोही माणूसच असतो आणि गुणावगुण सगळ्यांच्यातच असतात...आपण फक्त त्यांच्यातल्या आपल्याला आवडलेल्या गुणाचे/गुणांचे आपल्या कुवतीप्रमाणे आचरण करायचा प्रयत्न केला तरी त्यांचा योग्य तो सन्मान होईल...त्यासाठी जयंत्या/मयंत्या साजर्‍या करण्याचा देखावा करणे जरूरी नाही...त्यांना देवत्त्व बहाल करण्याची किंवा त्यांची स्मारकं, पुतळे उभारण्याची गरज नाहिये...त्याऐवजी आपण त्यांच्यातला एक जरी गुण आपल्यात बाणवण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न केला तरी ह्या देशाचे भवितव्य बदलून जाईल आणि तीच खरी ह्या समस्त महान लोकांच्या कार्याची पावती असेल...

थोडंसं वैयक्तिक...

माझे वडिल गांधीजी आणि सावरकर ह्या दोघांच्या विचाराने प्रभावित झाले होते...गांधीजींकडून त्यांनी स्वावलंबन, सत्यप्रियता, साधेपणा, काटकसरीपणा  इत्यादि गुण उचलले होते आणि सावरकरांच्या प्रेरणेने ते दुसर्‍या महायुद्धाच्या काळात भारतीय सैन्यात दाखल होऊन आपले राष्ट्रीय कर्तव्य बजावून आले होते....


वडिलांच्यातले बरेचसे गुण माझ्यातही आलेत....तरीही माझ्या तरूणपणात मी अतिशय बोलभांड होतो, बर्‍याचदा, उचलली जीभ लावली टाळ्याला अश्या प्रकारे..आपली लायकी विसरून, न्यायाधीशाच्या आवेशात एखाद्याला नायक आणि दुसर्‍याला खलनायक ठरवून मोकळा होत असे...काहीच अभ्यास नसतांनाही, तुटपुंज्या वाचनाच्या आधारे आपली राजकीय मतं ठामपणे व्यक्त करत होतो...त्यात ठामपणापेक्षाही दुराग्रहच जास्त होता..हे आज कळतंय...माझ्या पिढीतल्या बर्‍याच जणांची थोड्याफार फरकाने बहुदा हीच अवस्था असावी आणि म्हणूनच मला असं वाटतंय की स्वातंत्र्यानंतर इतक्या वर्षांनीही आपण समाज म्हणून एकत्र होऊ शकलो नाही...त्याच्या मुळाशी ही माझ्या/आमच्यासारखी बहुसंख्य अशी वाचाळ, निष्क्रिय अशी सर्व थरातील अर्धवट मंडळी असावीत...आमच्या ह्या वाईट अनुभवांतून ह्या नव्या पिढीने जर काही शिकायचे असेल तर...न्यायाधीश बनायचे सोडा...प्रत्येक गोष्टीचा निष्कारण कीस काढणे सोडा...गतगोष्टीचे शवविच्छेदन करणे थांबवा आणि थोडेसे क्रियाशील व्हा, देशाच्या प्रगतीसाठी मारक होतील अशा गोष्टींपासून जाणीवपूर्वक चार हात दूर राहा..मतभेद जरूर व्यक्त करा पण मनभेद होतील इतके ताणू नका....

थोरामोठ्यांना आपण खरोखरच मानत असाल तर इतके जरूर कराच...
आमची पिढी वाया गेली...तुमची आणि पुढील पिढ्या वाया जाऊ नयेत इतकीच माफक अपेक्षा!
जयहिंद!