माझ्या आयुष्यातील आजवरच्या कडू-गोड आठवणी मी "पूर्वानुभव" म्हणून सादर करत आहे.
आपण इथे आल्याबद्दल मन:पूर्वक धन्यवाद!

२६ जुलै, २००९

माझी ’चाल’पन्नाशी!

मंडळी एक आनंदाची बातमी आहे. महाजालावरील नामांकित कवि/कवयित्रींनी रचलेल्या कवितांना चाली लावण्याच्या छंदाचे फलस्वरूप म्हणजे नुकतीच मी ’पन्नासावी’ चाल लावली.
ह्या निमित्ताने मागे वळून पाहतांना जे काही मनात आले ते आपल्यासमोर मांडतोय.

चाल लावण्याचा छंद कधी लागला म्हणाल तर तो लहानपणीच लागला असे आता सांगितले तर कदाचित तुम्ही हसाल;पण वस्तुस्थिती तशीच आहे. मी चौथीत असताना आम्हाला एक केणी आडनावाचे गुरुजी होते. त्यांनी कविता शिकवताना पारंपारिक चालींऐवजी स्वत:ची अशी चाल लावून आम्हाला जी पहिली कविता शिकवली होती ती म्हणजे...जा हासत खेळत बालनिर्झरा आनंदाने गात.
ह्या चालीने माझ्यातला ’चाल’क जागा झाला आणि त्यानंतर मात्र मी देखिल मला आवडणार्‍या कवितांना चाल लावायला सुरुवात केली. पण ते सर्व हौस ह्या सदरात होते आणि मुख्य म्हणजे त्या चाली कोणत्याही स्वरूपात मी जतन करू शकलो नाही.पण तरीही हे चाली रचण्याचे काम माझे अखंडपणे सुरु होते.

साधारण वर्षभरापूर्वी महाजालावर ओळख झालेल्या माझ्या एका संगीतकार मित्राशी म्हणजेच श्री विवेक काजरेकरांशी बोलणे सुरु होते तेव्हा अर्थात विषय होता संगीत. त्या दरम्यान त्यांना मीही ’चाल’क आहे असे सांगितले आणि त्यांनी मला एक चाल करण्यासाठी एक कविता सुचवली. मी तिला चालही लावली पण ती त्यांना ऐकवणार कशी? म्हणून त्यांनी मग ती ध्वनीमुद्रित करायला मला भाग पाडले आणि तिथूनच सुरु झाला माझ्या चाली ध्वनीमुद्रित करण्याचा उपक्रम.

ती माझी पहिली चाल होती सुप्रसिद्ध कवि श्री.प्रसाद शिरगांवकर ह्यांच्या हे गजवदना ह्या भक्तिगीताची.म्हणजे चाली ध्वनीमुद्रणाचा श्रीगणेशाच अशा रितीने झाला असे म्हणता येईल.
आणि आता ५०वी चाल ध्वनिमुद्रित स्वरूपात सादर केलेय ती आहे सुप्रसिद्ध ज्योतिषी,साहित्यिक आणि समर्थ कवि श्री. धोंडोपंत आपटे ह्यांची एक गजल...जिथे तिथे मी हर्ष पेरला जाता जाता.

आजवर ज्यांच्या कवितांना चाली लावलेल्या आहेत ते सर्वजण महाजालावरच नियमितपणे आपले लेखन करत असतात.मी ज्यांच्या कवितांना चाली लावल्या आहेत त्यांची यादी आता दिवसेंदिवस वाढत चाललेय. वर उल्लेख केलेल्या दोन कविं व्यतिरिक्त ज्यांच्या कवितांना चाली लावल्या आहेत त्यांची नावे असी आहेत....
अनिरुद्ध अभ्यंकर,अरूण मनोहर,कुमार जावडेकर,क्रान्ति साडेकर,जयंत कुलकर्णी,जयश्री कुलकर्णी-अंबासकर,तुषार जोशी,दीपिका जोशी,पुष्कराज,प्रशांत मनोहर,प्राजक्ता पटवर्धन,चक्रपाणि चिटणीस,मनीषा,मिलिंद फणसे,राहुल पाटणकर,रामदास,रेमी डिसोजा,विशाल कुलकर्णी,कामिनी केंभावी,सुमति वानखेडे आणि सोनाली जोशी.

मंडळी,खरे तर ही कविता पन्नाशी म्हणायला हवे कारण मी ज्या कवितांना चाली लावून त्या माझ्या जालनिशीवर चढवल्या आहेत त्या कवितांची संख्या पन्नास झालेय आणि त्याच वेळी काही कवितांना दोन-दोन,प्रसंगी तीन चाली लावलेल्या आहेत. त्यामुळे तसे पाहिले तर चाली पन्नास पेक्षा जास्तच होतील. :)
तरीही पन्नास कविता इथे चढवल्या म्हणून त्यांच्या पन्नास चाली असा साधा हिशोब मी केलाय.

मी वर ’आनंदाची बातमी’ असे जरी म्हटलेले असले तरी कदाचित माझ्या परिचयातील आणि नेहमीच्या संपर्कातील काही व्यक्तींना ही बातमी आनंदाची वाटणार नाही. ;) कारण?
कारण हक्काने मी त्यांचे कान खाण्याचे पाप केलेय आणि केवळ सौजन्य म्हणून त्यांनी ते सहन केलेले असू शकते. :)
तेव्हा हा लेख त्या सर्व सौजन्यमूर्तींना अर्पण करतो.

1 टिप्पणी:

mangal म्हणाले...

जा, हासत खेळत बालनिर्झरा ही कविता तुम्ही मला पाठवू शकाल काय? कवी कोण आहे?