माझ्या आयुष्यातील आजवरच्या कडू-गोड आठवणी मी "पूर्वानुभव" म्हणून सादर करत आहे.
आपण इथे आल्याबद्दल मन:पूर्वक धन्यवाद!

२० मार्च, २००७

धंदेवाईक?............२

ब्रह्मांड नायकांचे यथोचित स्वागत झाल्यावर(पाद्यपूजा वगैरे) ते उच्चासनावर आसनस्थ झाले. काही खास शिष्यगणांनी जाऊन त्यांचे चरणकमल स्पर्शून त्यांना वंदन केले. हे बघून काही उपस्थित उच्चभ्रूंनीही त्यांचे अनुकरण केले. महाराजांनी हात उंचावून समस्त भक्तगणांना आशीर्वाद दिले. आता महाराज काय बोलणार ह्याकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिले.

महाराजांनी डोळे मिटले आणि दीर्घ श्वास घेऊन ॐकाराचा ध्वनी काढला आणि भक्तगणांनी त्यांचेच अनुकरण केले तेव्हा सगळे वातावरण ॐकारमय होऊन गेले. मग महाराजांनी धीर गंभीर आवाजात बोलायला सुरुवात केली. मलाही उत्सुकता होतीच की हे काय बोलतात म्हणून मी कान टवकारले.

महाराजांनी घोषणा केली, ईश्वरनामाच्या बॅंकेत डिपॉझिट जमा झालंय! किती? माहित आहे?
भक्त म्हणाले, किती?
१४ हजार कोटी! असे म्हणून महाराजांनी एका कौतुकभरल्या नजरेने भक्तांकडे पाहिले. त्या नजरेने भक्त सुखावले,अगदी कृतकृत्त्य झाले.

माझ्या बाजूला बसलेल्या झिलग्या सावताला गप्प बसवले नाही. तो मला म्हणाला, आपानू!(लोक मला हवे त्या संबोधनाने पुकारतात ) तुमका माहित असा हे ईश्वरनाम डिपॉझिट काय असा ता?
नाय बा! माझे उत्तर.
त्यावर त्याने दिलेली माहिती अक्षरश: आश्चर्यजनक आणि तितकीच विचारप्रवण होती. ती माहिती अशी....
बापूंनी(म्हणजे हे महाराज बरं का! ह्यांना भक्तगण बापू,बाबा,सद्गुरू असे काहीही म्हणतात) ईश्वरनामाची एक बॅंक उघडलेय. 'बापूज बॅंक ऑफ रामनाम!' अशा नावाची बॅंक उघडलेय. ह्या बॅंकेची आजपर्यंतची सभासदसंख्या किती आहे महाराजा? तर ती आहे एक लाख दोनशे चौतीस! आणि ह्या सभासदांनी आजपर्यंत ईश्वरनामाच्या रुपाने जमा केलेली अनामत आहे १४कोटी!!
पण ही अनामत जमा कशी करतात? तर त्याची एक खास पध्दत आहे. तुम्ही ह्या बॅंकेत २०रुपये भरून एक खातं उघडायचं. त्याबरोबर तुम्हाला एक वही मिळते. मग तुम्ही ती वही रामनामाने भरायची आणि बॅंकेत जमा करायची. मग पुन्हा नवी वही विकत घ्यायची,लिहायची आणि जमा करायची. आहे की नाही एकदम झकास कल्पना! इतक्या सहजतेने तुमच्या पदरात पुण्य पडणार असेल तर मग तुम्ही मागे का? चला पटापट सदस्य व्हा आणि लागा रामनाम लिहायला.
मग ह्या वह्यांचे काय करत असतील हो? रद्दीत देतात काय? छे!छे! अहो काय तरीच काय? आता त्यापासून पर्यावरणमित्र अशा साडे सहा हजार गणेशमूर्ती बनवण्याचा संकल्प आहे.

हे सर्व ऐकून माझ्या मनात विचारचक्र सुरु झाले. काय हुशार आहे हा बापू! लोकांच्या भावनांची त्याने किती सहजपणे अर्थशास्त्राशी गाठ घातली आहे बघा. एक लाख भक्त गुणिले २०रुपये= २०लाख(एकवेळचे) रुपये झाले. बघायला गेले तर २०रुपये ही अतिशय क्षुल्लक रक्कम आहे;पण अशा तर्‍हेने किती माया आजपर्यंत साठवली असेल बापूंनी? अजून ते गणपती आहेतच . ते विकून होणारा लाभ आणि ही रामनामाची कधीही न आटणारी गंगा!
ह्या बरोबर अजूनही किती तरी गोष्टींचा व्यापार इथे निर्वेधपणे चालतो. बापूंची छायाचित्रे,बिल्ले,छोट्या-मोठ्या पोथ्या आणि कितीतरी!!!
त्यात अजून एक गोष्ट कळली बापूंच्या सौ. म्हणजे त्याही अवतारी स्त्रीशक्ती(ओघाने आलेच) आहेत. त्या स्वत: सौंदर्यप्रसाधने बनवतात आणि लाखो भक्तिणी त्या मोठ्या श्रध्देने वापरतात. साक्षात भवानी माता सर्व सुंदर बायकांचा मेकप करते असे काहीसे पुलंनी हरितात्या ह्या व्यक्तिचित्रात एका ठिकाणी लिहून ठेवलेय त्याला बळकटी आणणारा हा साक्षात पुरावा बघितला की खरेच मन थक्क होऊन जाते.

कधी मन:शक्तीला तर कधी तुम्हालाच आवाहन करून 'तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार' वगैरे गोंडस आणि सहज पटेल अशा भाषेत त्या 'सद्गुरु जीवनराव' पध्दतीने लोकांना आकर्षित करायचे. आपण जे काही बोलतो त्याच्या ध्वनीफिती,चित्रफिती,पुस्तके आणि असेच बरेच साहित्य लोकांच्या गळी उतरवायचे असा उघड उघड भावनांशी खेळ मांडून त्यातून अर्थप्राप्ती करायची.

कधी बाबा बनून मोठी थोरली सशुल्क योगशिबीरं घेऊन त्यातून गिर्‍हाईकं हेरायची आणि त्यांच्या गळ्यांत स्वनिर्मित आयुर्वेदिक औषधं भरमसाठ किमतींना मारायची. तर कधी आचार्य,महाराज बनून रामकथेच्या निमित्ताने कोट्यावधी रुपये गोळा करायचे असा हा फार मोठा नवा आंतरराष्ट्रीय धंदा बनला आहे. सगळीकडे श्रध्देचा नुसता बाजार मांडलाय!

आपली विवेकबुध्दी गहाण टाकलेल्या लोकांच्या कमजोरीचा फायदा उचलणारे असे हे महाभाग सद्या पदोपदी दृष्टीस पडतात आणि लोकही मेंढरांप्रमाणे त्यांच्या मागे जातात. आदिकालापासून सुरू झालेला हा खेळ जगाच्या अंतापर्यंत चालणार आहे. मदारी बदलतील पण माकडे तीच असणार आहेत! बाकी ह्या महाभागांची डोकॅलिटी शॉल्लीड आहे हां! एकदा ह्यांचा मेंदू तपासून पहायला हवा. त्यातून काही शोध लागायचा. इतक्या सर्व लोकांना बांधून ठेवायचे म्हणजे काय खायचे काम आहे?

शेवटी म्हटलेच आहे ना! दूनिया झुकती है!लेकिन झुकानेवाला चाहिये!

२ टिप्पण्या:

जयश्री म्हणाले...

अगदी खरंय. आपण सुद्धा बरेचदा असेच नकळत गंडवले जातो.

अनामित म्हणाले...

प्रमोदजी,
ह्या सामजिक विषयाला निर्भयपणे सार्वजनिक ठिकाणी वाचा फोडल्याबद्दल तुमचे हार्दिक अभिनंदन!

काही ओळखीच्या माणसांनी रामनामाच्या चोपड्यांची थप्पी अर्पण केलेली मी पाहिली आहे. हताशपणे बघत बसलो.

तुमच्या लेखाने एका जरी भक्ताला (?) सद‍बुद्धी झाली तर धन्य वाटेल!